Wednesday, October 7, 2020

लाॕकडाऊन डायरी प्रकरण 7

 लाॕकडाऊन यायरी प्रकरण 7

क्रमशः भाग 31 ते शेवट



क्रमशः भाग  31



        आली दिवाळी !!!

       आशिष-किर्तीच लग्न  झाल्यापासून  सगळे छोटेमोठे सण झाले आणि आता सगळ्यात मोठा सण म्हणजे दिवाळी आठवड्यावर येऊन ठेपली . त्यांची पहिली दिवाळी ! उत्साहाला अगदी भरतं आलं आहे . मुख्य म्हणजे सुट्ट्या-रजा मॕनेज करुन चांगली आठदहा दिवसांची मोठी सुट्टी मिळणार आणि खमंग-गोड-खुसखुशीत अशी फराळाची मेजवानी मिळणार , विशेष म्हणजे अनेक वर्षांनी दिवाळीपुर्वीच घरी असल्यामुळे दिवाळीच्या प्रत्येक ताज्याताज्या गरमगरम पदार्थाची लज्जत चाखायला मिळणार याचा आनंद वेगळाच . लक्ष्मीपूजन बार्शीला तर पाडवा मिरजेत ठरल्यामुळे दोन्हीही घरात उत्साहाला उधाण आलेलं आहे . 

         तसं तर बार्शीत आधी नविन मजला बांधला म्हणून , मग गेल्या वर्षी लग्न ठरलं म्हणून तर यावर्षी  नविन लग्न झालं म्हणत वरचा मजला लाईटींगनी उजळून निघाला . दोन्ही मजल्यावर लाईटचे व पोर्चमध्ये छोटे छोटे आकाशकंदिल लाऊन कालच बील्डींग सजून तयार झाली . त्यामुळे आठ दिवस आधीच घरात धामधूम सुरु झाली होती . 

         मग मी पण अगदी वसुबारसपासून घरीच आहे . तसं सगळे शास्त्र मी नेहमी करतेच पण आज मी पण थोडंस एन्जाॕय करायचं ठरवलं . कीर्तीची पण सुट्टी सुरु झालीय हल्ली तिला पण साड्या नेसण्याचा नाद लागलाय म्हणून तिला मग आज वासुबारसला  इरकल साडी , मॕचींग ब्लाऊज , ठुशी , काकींची एकदाणी , मोठी नथ , मोठ मंगळसुत्र , कानातली फुलं , चंद्रकोर असा सगळा जामानिमा दिला . ती पण हौसेने तयार झाली मग मी पण इरकलचाच गेटअप करुन तयार झाले .  समोर ग्राउंडवर गायी येतात , त्यांना गोग्रास खायची सवय आहे त्यामुळे त्यांनी छान पूजा करुन घेतली . रात्रीच्या जेवणात मेथी परोठ्याबरोबर ताज्या ताज्या खारी बुंदीच्या रायत्यांन लज्जत वाढविली . 

      आज धनत्रयोदशी ! यावर्षी काॕलनीत घरोघरी लाइटींग पणत्या दिसत आहेत . बरेचजण कोरोनामुळे बार्शीतच आहेत . थंडी चांगलीच वाढलीय मग तिन्हीसांजेला तयार होऊन सोनं , चांदी , पैसे याची धने गुळ ठेऊन पूजा केली . बरचसं लगेचच खाण्यास सुरुवात करता येणारं फराळाचं तयार झालेय . तर उद्या पहाटेच्या पूजेला नैवेद्यासाठी थोडेसे रवा लाडू करुन ठेवले .हे कसं लागतंय ते कसं झालंय म्हणत टेस्ट बघत बघत खाणं झालं मग तशी फारशी भूक कोणालाच नव्हती मग गरम गरम मूग डाळीची खिचडी केली . लवकर आवरुन झोपलो कारण उद्या  पहाटे उठायचं होतं . 

         यावर्षी दिवाळीत जाम थंडी आहे त्यामुळे गुडुप झोपायला  मजा येतेय . पण लवकरच उठून पहाटे आंघोळी झाल्या . यावर्षी  मंदिर बंद असल्यामुळे आमच्या

 " श्री स्वामी समर्थ क्लासेसचा "

पहाटगाण्याचा  नेहमीचा कार्यक्रम होऊ शकला नाही ही गोष्ट चुकल्यासारखी वाटतेय .

पण दारात रंगीत रांगोळी , देवपूजा , फुलं असं प्रसन्न वातावरण आहे . पुर्वीप्रमाणे आजकालची मुलं दिवाळीचा फराळ नाही करत काहीतरी गरम हवं असतं . जेवणात आज गुलाबजामुन होते . आजच  संध्याकाळी लक्ष्मीपूजन आहे मग लग्नाच्या श्रीमंतपूजनाच्या तयारीसारखी दुपारपासूनच आकांक्षा-कीर्ती-आशिषची आवराआवरीची लगाबग चालू आहे . फोटोसाठी सगळी धडपड !  नैवेद्यासाठी करंज्या व अनारसे तळून झालेत . पूजेची तयारी केली आम्ही पण  आवरुन  घेतलं मग नविन जोडीकडून आजची पूजा झाली . नेहमीप्रमाणे भरपूर पणत्यांनी घर उजळून निघालं . छान फोटो सेशन झालं . रात्री पुन्हा अनारसे तळले गरम गरम अनारसे खाण्याचा आमच्याकडे हा प्रोग्राम असतो . ताजा भात केला जेवणे झाली .

     उद्याचा दिवस भाकड आहे परवा पाडवा व भाऊबीज एकाच दिवशी आहे मग उद्या आशिष-किर्ती व आम्ही दोघं मिरजेला जाणार आहोत . इकडे आकांक्षाला सुट्टी नाही तर तिकडे केतकीला सुट्टी नाही . लग्नानंतर कोणाच्या भेटी होऊ शकल्या नाही म्हणत उद्याचा प्लॕन ठरला .  आम्ही बार्शीत सातजण राहातोय   सगळ्यांची कामं चालू आहेत त्यामुळे वेळ कसा जातो समजत नाही पण कीर्तीचे आई-बाबा दोघेजणच असतात  त्यामुळे ते खूपच कंटाळून गेलेत . त्यामुळे दिवाळसणानिमित्त गेटटुगेदर !!

      पुर्वी बरीच वर्षे दिवाळीत आम्ही परांड्यात असायचो तसं तर दिवाळीत भरपूर फटाके आणायचे व लक्ष्मीपूजनाला फटाक्याची मोठ्ठी माळ फोडायची हे काम नेहमीच सुनील भाऊजींच होतं . पण हल्ली प्रदुषण नको म्हणत मुलांचा फटाक्यांना विरोध असायचा आणि आता तर भाऊजीपण गेले आणि ती प्रथा खंडीत झाली . पण काही माणसं आपल्या इतकी जवळची असतात मग प्रसंगानुरुप त्यांच्या आठवणींचे उमाळे आल्याशिवाय रहात नाहीत . पण अकाली गेल्यामुळे भाऊजींची आठवण नेहमीच मनाला रुखरुख लावणारी चटका लावणारी असते .

       आमची घेरडीतली दिवाळी पण  भन्नाट असायची . घेरडीत सण किंवा कार्यक्रम असला की वाडा म्हणजे एक मोठ्ठ कुटुंब वाटायचं .

ब-याचशा कोरड्या कामासाठी आई निलाबाईला हाताशी घ्यायची . आठवडाभर आधीच साखर दळणे , चकलीची भाजणी दळणे , खोबरं खीसणे , करंजीचं सारण अशी कोरडी तयारी करुन ठेवली जायची आणि फराळाला सुरुवात करंज्यानी व्हायची मग किचकट काम म्हणत त्या कामात आम्ही मुली वाड्यात एकमेकींच्या घरी मदतीला जायचो . वसुबारसेपासूनच वाड्यात प्रत्येकाच्या आंगणात  पहाटे शेणाचा सडा टाकून शेणाच्या गवळणी , पेद्या , बळीराणा करायचं  काम आमच्या भागाबाई करायच्या . आम्ही थंडीत कुडकुडत त्यांच्याजवळ बसून बघायचो मग रोज गवळणीच्या डोक्यावरच्या खळग्यात दूध घालायचं कडेनी रांगोळीची कमान काढायची . आंगणात ठिपक्यांची मोठी रांगोळी काढायची . रंगीबेरंगी रांगोळीन भरायची .  उषा वहिनी , शांता वहिनी , पीलू वहिनी त्यांच्या मुली आणि आम्ही सख्ख्या-चुलत बहिणी सगळ्यांनी एकमेकींच्या रांगोळ्या पहायच्या . स्पर्धा , चढाओढ लागायाची . शेवटच्या दिवशी वैरण बांधायची दूध उतू घालवायचं . असा स्पेशल कार्यक्रम असायचा . 

     आमचे काका अगदी कमी प्रमाणात फटाके आणायचे .  टिकल्या ,  कावळे , लवंगी फटाकड्या , एखादं लक्ष्मी तोट्याचं पाकीट ,  फुलबाज्या  , झाडं  , भुईचक्र असे सगळे प्रकार पण कमी प्रमाणात  आणायचे त्यातलं आधीच थोडंथोडं तुळशीच्या लग्नासाठी काढून कपाटावर ठेवलं जायचं आणि राहिलेले फटाके आम्हांला वाटून द्यायचे मग आम्ही पण पुरवून पुरवून त्या उडवायचो . लक्ष्मीपूजन झालं की वाड्यात  एकमेकांच्या घरी हळदीकुंकवाचा कार्यक्रम असायचा . घेरडीत बारा बालुतेदारांची घरी येण्याची प्रथा होती . त्यामुळे उद्या पाडवा म्हणलं की रात्रीच आई फराळाचं , ब्लाऊज पीस , पैसे काढून ठेवायची . कारण पहाटेपासूनच बायका ओवाळायाला यायच्या . पहिला नंबर लावायची ती म्हणजे रोज वाडा झाडणारी शिवा . यादिवशी तिचा ढंग न्याराच आसायचा . उजाडायच्या आधी लवकरच  साडेपाचला ती कुंकू , अक्षदा , सुपारी आणि कणकीचे दोन दिवे असलेलं ताट घेऊन इरकलचं लुगडं नेसून डोक्यावर पदर , नाकात नथ , ठसठशीत कुंकू लाऊन हसतमुखाने

  " काका " म्हणत हजर व्हायची . मग काका टोपी घालून यायचे त्यांच्या मागोमाग आम्हीपण जाऊन तिच्यासमोर तोंड करायचो मग ती म्हणायची


" दिन दिन दिवाळी 

    गायी म्हशी ववाळी........

    इडा पीडा टळो 

    आन धन्याचं घर

    सुखासमाधानाने भरो "


असं म्हणत हसत हसत ओवाळायची मग आई तिचा मान तिला द्यायची . मग ठकू परटीण तिची मुलगी कमलला बरोबर घेऊन यायची तर कोळ्याची भामा यायची अशा एकएक बायका येतच रहायच्या . मग उजाडल्यावर गोंधळी , बहुरुपी , नंदीबैल , आस्वलवाला फेरीवाले थोडाथोडा वेळ आपापली कला सादर करायचे . मुकी , म्हसा , धोंडीआप्पा , म्हातारी असे सगळे लोक येऊन जायचे . फराळाचे डबे खालीच ठेवलेले असायचे आई ताट तयार करुन द्यायची मग आम्ही  फराळाचं ताट त्यांना द्यायचो तर काका पैसे  द्यायचे . दारात येणारांन खुशीत गेलं पाहिजे असे आई-काका म्हणायचे . यातले मजा वाटणारे दोन कार्यक्रम असायचे एक म्हणजे 

" बहुरुपी "

तो अगदी पोलिसासारखा खाकी ड्रेस , खाकी टोपी , पायत बूट हातात काठी घेऊन थाटात यायचा व आलं की त्याच यमक जुळवून केलेलं गाणं सुरु करायचा 


"चला काकू चला तुम्ही लग्नाला चला , 

पोर बांधा खांबाला न

 कुत्री घ्या काकला 

एकीचा शेंबूड तिघीजणी पूसा 

चला चला चला काकू जेवायला बसा  

पंक्चर झालंय बैलगाडीचं चाक

गंगूबाई पीत बसल्यात घरात ताक "


अशा प्रकारे विबांडनात्मक मोठीच्या मोठी रचना म्हणायचे . हसून हसून पुरेवाट व्हायची . आजकाल ही कला पण नष्ट होत चालली आहे . 

      सगळ्यात मजा यायची ती म्हणजे अस्वलाचा खेळ !

घराच्या आसपास दरवेशी आला की आस्वलाच्या मोठमोठ्या आवाजात गुरगुरण्याचा आवाज यायचा . आम्ही कान लावून बसलेलोच असायचो . पंधरावीस पोरांचा घोळका त्याच्यामागे असायचा . पतकी गुरुजींच्या वाड्यापासून आम्ही त्याच्या मागे आसायचो . आपल्या दारात केव्हा येणार ही उत्सुकता असायची . प्रत्येक घरासमोर आलं की त्याचा खेळ सुरु व्हायचा . शिकवलेलं असल्यामुळे दरवेशी जसंजसं बोलेल तसंतसं  अस्वल नक्कल करायचं . सासुबाईंनी रागे भरल्यावर रुसलेल्या सुनेची नक्कल ते फार मस्त करायचं 

" सुनबाई रुसली कोपऱ्यात जाऊन बसली "

असं म्हणलं की ते लांब मागे जाऊन खाली मान घालून बसायच . मग सासू , सासरा ,  नणंद , दीर , जाऊ प्रत्येकाचं नाव घेऊन समजवायला आले म्हणलं तरी जागचं हलायचं नाही . जास्तच रुसली गुलबी म्हणल की आहे तिथंच झोपायचं  कोणाच्याही समजावण्याला ते भीक घालायचं नाही सर्वात शेवटी दरवेशी ओरडायचा

 " मंबईहून गुलबीचे मालक आलेत . येताना गुलबीला साडी आणलीय , गाळ्यात घालायला चंद्रहार आणलाय .आता गुलबी उठली आहे आणि लगबगीनं 

नव-याला बसायला पाट , दिवळीच्या फरळीच ताट , आणि पाण्याचा तांब्या घिऊन आता गुलबी कशी निघाली "

असं म्हणलं की ते अंग झटकून उभ रहायचं मग आम्ही ओरडत लांब पळायचो . मग दरवेशी पुन्हा तालात म्हणायचा 

" आता आमची गुलाबी साडी नेसून नाचणार कशी 

गुलबी गुलबी गुलबी गुलबी "

असं ओरडला की अस्वल जागच्या जागी नाचायला लागायचं . आम्ही पण तालात टाळ्या वाजवायचो . मग त्याचे दोनचार केस ओढून तो काढायचा . ते घेण्यासाठी सगळ्यांची धडपड असायची का तर ते वहीत ठेवलं तर पेपर सोपा जातो असं म्हणायचे . मग त्याच्यामागे वाडाभर आम्ही फिरायचो . वाड्याबाहेर अगदी ताई आत्या , डोंगरे वाड्यातून बाहेर पडेपर्यंत मागेमागे जायचं . कधीकधी किती फिरायचं म्हणून आईचा ओरडा सुद्धा बसायचा पण आम्ही जायचोच .

      दिवाळीत वाड्यात कोणाच्या न कोणाच्या तरी घरात नविन लग्न झालेलं असायचं आणि  जावई आलेला असायचा मग त्याच्या दिवाळसणाचा सोहळा व्हायचा . संध्याकाळी मग प्रत्येक  घरात मामा लोकांच आगमन व्हायचं . आमच्याकडे गोंदा मामा व गंगाधर मामा न चुकता हजर असायचे . गोंदा मामा एक अविस्मरणीय प्रकरण आहे . तो पण मजा मजा करायचा ओवाळणीच्या बदल्यात आम्ही दमेपर्यँत  मनसोक्त तेल लाऊन चोळायला लावायचा . तिकडे  काकूंकडे म्हाळू मामा व उषा वहिनींचे चार भाऊ यायचे . आमच्या वाड्यात  पाहूण्यांना एकमेकांकडे फराळाला बोलवायची प्रथा होती . आलेल्या  पाहूण्यांची मात्र सगळ्यांकडे फराळाला जाऊन खाता खाता फजिती व्हायची . पुन्हा घरात जेवणाचा बेत असायचाच . भाऊजी लोक , मामा , मोहन आण्णा हे रात्री बेट लाऊन  ऊशीरपर्यंत पत्ते खेळायचे व रात्री उशीरा हारणारांकडून  हाॕटेलमध्ये चहा प्यायला जायचे कधीकधी भजी फीस्ट व्हायची . अशी आठवडाभर मजा चालायची . दिवाळी तीच आहे पण साजरी करण्याचे पॕटर्न बदलले आहेत . पण प्रसंगानूरुप भूतकाळात रमायला होतं हे नक्की !!



क्रमशः भाग  32



      उद्या पाडवा आशीष-कीर्तीची पहिली दिवाळी म्हणून आज सकाळी लवकरच मिरजेला निघायचं ठरलं . कीर्तीचा आनंद ओसंडून वहात होता . आम्ही एकदीड पर्यंत मिरजेत पोहोचणार होतो . कोरोनामुळे बाहेर कुठेही जाता येणार नव्हते मग विचार केला एक रात्र  किर्लोस्करवाडीला जाऊन येऊ कारण तायडी कुठेच जाणार नव्हती आणि वाडीला पण कोणी येणार नव्हते . तेवढाच तिला बदल होईल आपल्या भेटी होतील म्हणून बार्शीतून निघण्यापुर्वी तिला फोन करुन मिरजमध्ये जेवण करुन संध्याकाळपर्यंत पोहोचण्याचं पक्क केलं व लवकरच निघालो . कुठेही न थांबता जवळचा चहा घेत आम्ही दीड वाजता घरी पोहोचलो . विहिणबाई तशा खंबीर आहेत पण कोरोनाची दहशत त्यात त्यांना झालेला चिकन गुनिया , केतकीचं आजारपण त्यामुळे त्या थोड्या हळव्या झाल्यासारख्या झाल्यात मग कीर्तीला पाहून त्या खूपच भावनावश झाल्या . केतकीला पण दिवाळीला येता आलं नाही मग

" दोन्हीही मुली लक्ष्मुपूजनाला नाहीत असं पहिल्यांदा झालंय " 

असं म्हणत त्या मोकळ्या झाल्या . थोड्याफार फरकाने सगळ्यांचीच विशेषतः दोघेदोघे रहाणारांची हीच परिस्थिती आहे . एकटेपणा नकोसा झालाय आणि भेट झाली तरी भावनावश व्हायला होतंय . पण नंतर मात्र सुरळीत होतं दाटून आलेले मेघ बरसून निरभ्र झालेल्या आकाशाप्रमाणे ! थोड्या गप्पा झाल्यावर आराम करुन आम्ही मुक्कामाला वाडीला गेलो . तायडीकडे  चहापाणी झालं की तायडीच्या दोन्ही मुली-जावई , सून -मुलगा नातवंडं असा काॕन्फरन्स काॕल झाला . सगळेच आश्चर्यचकित झाले पण सगळ्यांना खूप बरं वाटलं की कोणीतरी वाडीत आलंय मग सगळ्यांनी एकच कल्ला केला . तायडी मनिषच्या लग्नानंतर वाडीला गेली आणि फक्त अधिक महिन्यात मंजूची भेट झाली मग कोणाचच कुठेच जाणंयेणं नाही . मग या कोरोनामुळे फीट रहाणं म्हणा कींवा वेळ जाणं म्हणा यासाठी तिने स्वतःला खूपच बीझी ठेवलंय . अगदी साधा फोन वापरणारी तायडी आधी व्हाट्सअॕप आणि आता युट्युबवर खूपच अॕक्टीव्ह  झालीय . अनेक प्रकारचे व्यायाम , रेसिपीज , स्तोत्रं सगळे डाऊनलोड करायचं व त्याप्रमाणे शिकायचा व करायचा तिला नाद लागलाय . ती हल्ली सहजपणे स्मार्ट फोन वापरते त्यामुळे आम्ही तिला स्मार्ट तायडी म्हणतो . वयाने 61 वर्षांची असलेली तायडी मनाने मात्र 16 वर्षांची आहे . रात्री , पहाटे यांच्या , माझ्या खूप सा-या गप्पा झाल्या मग पाडव्याचं सकाळी छान तयार होऊन छानसं फोटोसेशन झालं आणि फोटो फँमिली ग्रुपवर टाकले मग त्यावर मेसेजेसना उधाण आलं .मग आम्ही मिरजेला निघालो .

       इकडे पहिली दिवाळी !!

        घरी आलो तर दुपारच्या जेवणाची साग्रसंगीत तयारी झाली होती . लेक-जावई असल्यामुळे कीर्तीचे आई-बाबा खुशीत होते . थाटात जेवणं झाली . त्यांना पण वातावरणात बदल झाला . थोडासा आराम झाला की पुन्हा आशीष-कीर्तीची आवरा आवरीची लगबग सुरु झाली . सध्या  WFH मुळे बाहेरचे कपडे घातलेच जात नाहीत . कीर्तीने अगदी हौसेनं साखरपुड्याला शिवलेला लेहंगा पुन्हा घालायचा तिला चान्सच मिळाला नव्हता मग तो घालायचा ठरवून छानपैकी आवरुन थाटामाटात पाडव्याचं सेलिब्रेशन झालं आणि मग सगळेच खास फोटोसेशनसाठी गच्चीत गेलो . पाठीमागे जणू आपल्यासाठीच फटाके उडत होते मग त्याची रंगीबेरंगी कारंजे फोटोत पकडत पणत्यांच्या उजेडात आशिषने खूप  मस्त फोटो काढले . सगळ्यांना त्याचं खूप कौतुक होतं सगळे खूष !!  मग कीर्तीचे लहानपणीचे व सगळेच जुने फोटो पहात गप्पा , रात्रीची जेवणं झाली . सकाळी आम्ही बार्शीला निघालो आशीष-कीर्ती मिरजेत राहिले . आम्ही बार्शीत पोहोचतो तोवर ज्योती वाडीत हजर ! तिने पण कोणाच्या गाठीभेटी नाही म्हणत  दोन दिवसांचा दौरा काढला होता . आधी वाडी मग कराड सातारा करुन ती पुण्यात जाईल . तायडीला ज्योती बहिणीपेक्षा जास्त मुलगीच वाटते . ज्योतीच्या लग्नाच्या पंचवीसाव्या वाढदिवसाला एकत्र जमू शकत नव्हतो त्याची तायडीला खूपच चुटपूट लागली होती . पण ई-सेलीब्रेशनमुळे ती खूष झाली होती . त्यानंतर त्या दोघी पहिल्यांदा भेटल्या मग तायडीने रांगोळी वगैरे घालून पुन्हा एकदा धमाल केली त्यांच्या गप्पा झाल्या . एकूणच फोटो ,  स्टेटसवरुन सगळी कल्पना येत होती . मोबाईलमुळे कितीही जवळ आलो असलो तरी प्रत्यक्ष भेटीतील ओलावा , माया , प्रेम याला तोड नसते हेही तितकच खरं .

      अशाप्रकारे अगदी पाडवा ते दिवाळीपर्यंत सगळे सण आणि वाढदिवस या कोरोनाच्या काळात बार्शीत  झाले . आता आमच्या घरातील मुख्य माणूस की जे लहानपणापासून कायम वाढदिवसाची वाट पहातं ते म्हणजे आकांक्षा ! लहानपणापासून तिला वाढदिवसाचं खूपच आकर्षण  आहे आणि पण आमच्याकडे पद्धत नाही म्हणत हा कार्यक्रम नेहमीच स्कीप झालाय . त्याचा तिला राग येतो पण काय करणार . पण ती काॕलेजला गेल्यापासून तिच्या मैत्रिणी मात्र साजरा करतात . ती सध्या सीडॕकमध्ये खूप बीझी आहे आजकाल तिची माझी भेट सुद्धा फक्त रात्री जेवतांना होते . आता पुढच्या आठवड्यात तिचा वाढदिवस आणि पाठोपाठ तुळशीचं लग्न आहे . त्यापुर्वीच  आशीष-कीर्ती बार्शीला येतील .  तुळशीच लग्न म्हणजे छोटी दिवाळीच !

        माझ्या लग्नानंतर आम्ही दिवाळीला नेहमीच परांड्यात असायचो त्यामुळे बहुतेकवेळा तुळशीच्या लग्नाला मी घेरडीत असायचे . कोणतीही एखादी बहिण दिवाळीत घेरडीत असायची . तुळशीच्या लग्नासाठी आईनं करंजीचं सारण काढून ठेवलेलं असायचं मग आई त्याच्या ताज्या करंज्या ,  रव्याचे लाडू करायची दिवाळीतच आईने थोड्या चकल्या बाजूला काढून ठेवलेल्या असायच्या . मग ती छोटी दिवाळी साजरी व्हायची . घेरडीत ब-याचवेळा यांनी तुळशीचं लग्न लावलेलं आहे . दस-याप्रमाणे तुळशीच्या लग्नाचा सोहळाच असायचा घेरडीत ! आम्ही लहान होतो तेव्हा दोन दिवस आधीच आम्ही तयारीला लागायचो . तेलाचे चौकोनी डबे किंवा पत्र्याच्या बादलीत तुळस असायची . चुन्यात थोडंस पाणी घालून कुंच्यानी त्या बादलीला चुना लाऊन ठेवायचा मग ते खडखडीत वाळलं की दुसरे दिवशी काव पाण्यात कालवून काडेपेटीतील काडीला कापूस गुंडाळून बादलीवर 

" II श्री. राधा - दामोदर प्रसन्न II "

        "II तुलसीविवाह II"

असं लिहायचं मग स्वस्तीक काढायचं आणि वाळवत ठेवायचं  जातायेता न्याहाळून पहायचं . वाड्यात सगळ्यात छान अक्षर  कोणाच आलं या चर्चांना उधाण यायचं . लग्नादिवशी सकाळी धोंडीआप्पा बेल झेंडू , चाफा , फुटाण्यांच्या फुलाबरोबर चींचा , बोरं , आवळा द्यायचे .  पूजा करतांनाच आई काकांना  म्हणायची 

" बाळकृष्ण आणि घंटा काढून ठेवा संध्याकाळी तुळशीच्या लग्नाला  लागेल " .

आम्ही मुली दुपारीच पॕरणच्या दुकानात जाऊन छोट्या हिरव्या बांगड्या आणायचो मग चुरमुरे आणि सुई-दोरा  घेऊन बसायचो एकसारखे चुरमुरे दो-यात ओवून त्याच्या मुंडावळ्या करायचो . त्या करताना भारी मजा यायची चुरमुरे मोजत मध्ये दो-या बांधून बरोबर उंचीच्या मुंडावळ्या तयार झाल्या की जग जिंकल्याचा आनंद होई . अंतरपाट म्हणून पांढराशुभ्र बागाईतदार रुमालाची घडी ( गमशा) पूजेच्या ताटात ठेवली जायची . काका दोन ऊस आणायचे ते बरोबर तुलशीवर मंडप केल्यासारखे बांधायचे तुळशीसमोर शेणानं सारवायचं मोठी रांगोळी त्याला कमान काढून तयार ठेवायचो आणि मग एकमेकांच्या रांगोळीची तुलना करत वाडाभर फिरायचो . आई पूजेचं ताट तयार करुन ठेवायची त्यात हळदकुंकू , बांगड्या , गळसरी , फुलं , चिंच , बोरं , आवळा , चुरमुरे ,कांड्या-बत्तासे , लाडू-करंजी,  बाळकृष्ण , घंटा , जाडजूड चांदीचं फुलपात्र , पळी , समई , फुलवात , उदबत्ती असं सगळं व्यवस्थित मांडून ठेवायची . वाड्यात सगळ्यांची तिन्हीसांजेला तयारी व्हायची मग सगळेजण अगदी नविन कपडे घालून नटूनथटून तयार व्हायचे . आम्ही दिवाळीतले काढून ठेवलेले  फटाके , संपूर्ण चातुर्मासाचं पुस्तक सोप्यात आणून ठेवायचो . सगळी मुलं बायका तयार झाल्या की पुरुष मंडळी जमायचे . वाड्यात आमच्या घरापासून सुरुवात व्हायची सगळे आमच्या आंगणात जमायचे मोठ्या आवाजात पाच मंगलाष्टका , आरत्या व्हायच्या . बायकांमध्ये उषा वहिनी हमखास मंगलाष्टक  म्हणायच्या . लग्न चालू आसतांना वाड्याच्या छोट्या दारात नरसोबासमोर जावून आम्ही फटाके उडवून मुद्दाम राखून ठेवलेल्या अक्षदा घेऊन पाठीमागे उभे रहायचं आणि शेवटची मंगलाष्टक झाली की खोडसाळपणे ठरवून सगळ्या मुलांनी एखाद्याच्या डोक्यावर मारायची व नंतर मी त्यातला नाही असा निर्वीकार चेहरा करत प्रसाद वाटायला परत तयार असायचो आर्थातच पुढच्या घरी त्याची परतफेड होणार हे नक्की आसायचे . त्याचवेळी पुढचे लग्न ज्यांच्याकडे असेल तो मोठ्या आवाजात म्हणायचा

" सर्व व-हाडी मंडळींनी आमच्याकडे लग्नाला चलावे ".

मग सगळ्यांचा मोर्चा त्यांच्याकडे वळायचा . पुन्हा तिथे सगळे तेच सोपस्कार  व्हायचे तिन्हीसांजेला सुरु केलेली लग्नं वाड्यात एकूण पाच घरी लग्न लागेपर्यंत नऊ वाजायला यायचे . धावाधाव करुन आम्ही पण दमून जायचो . चेष्टामस्करी , गप्पा गोष्टींना उधाण यायचं . अशा प्रकारे तुलसीविवाहानंतर खरी दिवाळी संपायची .

    आजकाल शहरात भरपूर फटाक्यांचा आवाज येतो रोषणाई असते पण माणसांची इतकी गर्दी नसते . आता पुढच्या रविवारी बार्शीत पण हा सोहळा होईल यावर्षी घरचेच आम्ही सगळे असणार त्यामुळे ती मजा येणार हे नक्की ! बघता बघता मुलांना बार्शीला येऊन आठनऊ महिने पुर्ण होत आले .

मग आता संक्रांत झाली की एक फेब्रुवारीला तारखेंनी तर तिथीने रथसप्तमीला आशीष-कीर्तीच्या लग्नाचा वाढदिवस !! असं पुर्ण वर्ष कोरोनाच्या घोंगावातात गुंडाळल्यासारखं झाल पण बराच काळ एकमेकांच्या सहवासात रहाता आलं एवढं मात्र  खरं !!

           आता सगळेजण फिरत आहेत काही ना काही कामं निघतात . कीर्तीच्या दोनतीन मैत्रिणींची लग्नं आहेत त्यानुषंगाने आशीष-कीर्ती आता सारखे बार्शी-पुणे-मिरज असे दौरे करणार . आकांक्षाच पण डिसेंबरअखेर शेवटच्या टप्प्यात येणार , तिचा प्रोजेक्ट संपून सगळं पुर्ण व्हायला पंधरा फेब्रुवारी उजाडेल . पण सध्या सारखेच जाणेयेणे असल्यामुळे सगळेच बार्शीत आहेत असे नाही . पण हेडक्वाॕर्टर अजूनही बार्शीच आहे . येणाऱ्या दिवसात कोरोनाचं प्रमाण कसे असेल याविषयी अजूनही स्पष्टता नाही पण लस यावी व जनजिवन पुर्ववत व्हावे असे मात्र मनोमन वाटतेय !!




क्रमशः भाग 33




 " दिवाळी सण ओवाळी "


या उक्तीप्रमाणे खऱ्या अर्थाने सगळे सण संपतात . मग आता  आकांक्षाचा वाढदिवस आहे म्हणत दिवाळी झाली की आठ दिवसात आशीष-कीर्ती मिरजेहून परत आले .

 मला मनिषंच लग्न झाल्यापासून असं वाटायचं की मुलांचा त्यांचा एकमेकांचा तसेच त्यांचा आमच्याबरोबर पण एकत्र सहवास होत नाही . लग्न झाल्यावर आई-वडील मुलांकडे थोडंस जाऊन तरी रहातात पण मला तेही शक्य होणार नाही आणि रिटायरमेंटनंतर गेलो तर तोवर आकांक्षा कुठे असेल माहित नाही . मुलं कळती झाली तसं आपला सहवास कमी होतोय याचं शल्य होतं आणि ते स्वीकारलंही होतं इलाजच नव्हताच . पण ध्यानीमनी नसतांना कोरोनामुळे ,  लाॕकडाऊनमुळे या नऊ  महिन्यात ती कसर भरुन निघाली . 

" काही हरवले काही गवसले " 

  याप्रमाणे काहीसं झालं मग   संधी म्हणून आम्ही उपयोग केला . यादरम्यान घरातील सगळ्यांचे वाढदिवस झाले ,  आमच्या लग्नाचा वाढदिवस झाला . आता  24 नोव्हेंबर आकांक्षाचा वाढदिवस ! तिला वाढदिवसाचं खुपच औत्सुक्य असतं पण सध्या ती  सी-डॕक मध्ये  पुर्ण बीझी आहे मग आम्ही दोघे आणि आशीष-कीर्तीने सगळं प्लॕनिंग केलं . आकांक्षा-कीर्ती जरी केक शिकून आल्या असल्या तरी या दोनतीन महिन्यात घरात केक झाला नव्हता आणि करायचा तर यावेळी एकट्या कीर्तीला तो करावा लागणार होता . तशी ती मिरजेतून येताना पुर्ण तयारीनीशी आली होती . यावेळी आम्ही दोघी केक करणार होतो . हल्ली मैत्रिणीसोबतच आकांक्षा असायची त्यामुळे नेहा , नुपूर , आशीष-कीर्ती या सगळ्यांचे गीफ्ट आठ दिवस आधीच माझ्याकडे  कुरीयरने आले होते . 

मग कीर्तीने 23 तारखेला  संध्याकाळी सात वाजता केक करायला सुरुवात केली . मी फक्त आधारासाठी समोर उपस्थित असणं तिला आवश्यक होतं . ( समजा केक फसला तर दोघींनी केला म्हणता येईल म्हणून 😃) . मग आकांक्षाला आवडतो म्हणून चाॕकलेट केक करायला लागलो तोवर यांनी पण बाहेर जाऊन लाहानपणापासून आकांक्षाचं स्पेशल आवडीचं मोठ्ठ

  " कॕडबरी सेलीब्रेशन "

 आणून ठेवलं . तोवर कीर्तीने केलेला केक मस्त फुगला आता त्याच पुढचं सगळं राहिलं होतं आणि आकांक्षा खाली येते काय वाटू लागलं . खबऱ्या मनिष वरती होताच त्याला तिला वरंच गुंगवून ठेवायला सांगितले होते त्याप्रमाणे ते दोघे वरच होते . बहुदा आकांक्षाने समजून घेतलं असे आम्हांला वाटले . बऱ्याच दिवसांनी केला तरी एक नंबर केक तयार झाला , डेकोरेट केला आणि कीर्तीला खूप आनंद झाला मग पटापट सगळी आवाराआवरी केली केक फ्रीझरमध्ये ठेवला आम्ही हुश्श्य केलं , खूष झालो आणि आशीष-आकांक्षा खाली आले . मग आमची जेवणं वगैरे झाली आणि झोपायला निघालो . लहान मुलाला एखादी गोष्ट हवी असेल तर

"  मला ते नको आहे " 

असे म्हणते तसंच काहीसं आकांक्षाने सांगितले 

" माझा वाढदिवस आहे पण उगाच जागत बसू नकात मी पण लवकरच झोपणार आहे ".

बरं बरं म्हणंत आम्ही झोपलो . मग बारा वाजता आशीष-कीर्ती तिला खाली घेऊन आले आणि बऱ्याच वर्षांनी कुटुंबीयासमवेत आकांक्षाचा वाढदिवस साजरा झाला . बराचवेळ मैत्रिणींचे फोन चालू होते . सकाळी साधं जेवण रात्री पावभाजीचा बेत झाला . आणि 2020 संपत आले तसे आमचे वाढदिवस पण संपले . आता फक्त आशीष-कीर्तीच्या लग्नाचा वाढदिवस बाकी आहे .

आता 27 तारखेला तुळशीचं लग्न पण आदलेदिवशीच 26 ला कंपनीने कीर्तीला सप्लायरकडे पाच दिवसासाठी पुन्हा मिरजेला जायला सांगितलं . मग पुन्हा 27 लाच भल्या पहाटे आशीष-कीर्ती मिरजेला गेले . मुख्य म्हणजे लेक-जावयाची हजेरी मिरजेच्या तुळशीच्या लग्नांला लागली !त्यामुळे कीर्तीचे आई-बाबा खूष !  कीर्तीला पण खूप आनंद झाला फक्त चारपाच दिवसातच लगेचच प्रवासाची दगदग झाली आधीच माहित असतं तर कदाचित थांबली असती . आता मे महिन्यापासून पोस्टपोन होत असलेली तिच्या दोन मैत्रिणींची पण लग्नं आहेत . पुणे -मिरज -बार्शी असे दौरे त्यांना करावे लागणार आहेत . यानिमित्ताने आशिषचं मिरजेत रहाणं पडलं कोरोनामुळे बाकी काही नाही पण

" वेळच मिळत नाही "

हे पुर्णपणे खोडून निघालं घरी काम करत हवं तिथं रहायला मिळालं त्यामुळे सहवास घडतोय सहवासाने प्रेम वाढतं एवढं खरं ! आणि नाती लवकर आपलीशी होतात . 

परांड्यात मामांच्या घराची वास्तूशांती म्हणून परवाच काका-काकींना हे परांड्यात सोडून आले . सध्या आम्ही तिघेच बार्शीत आहोत कोरोनामुळे सध्या आजूबाजूला  लग्नं मर्यादित लोकसंख्येत केलीली दिसून येतात  मग आम्ही पण तुळशीच लग्न घरच्याघरी केलं असं मी मजेनी म्हणते  !

कोरोनावर लस अजूनही आलेली नाही पण येणार येणार म्हणत भीतभीत का होईना सगळं जनजिवन बऱ्यापैकी सुरळीत झालं आहे . नाॕर्मल आयुष्य जगण्यासाठी प्रत्येकजण आसुसलेला आहे . पुर्वी असं म्हणायचे की पाडव्यादिवशी आपण जे करतो खातो तसं वर्षभर मिळतं म्हणून चांगलं खावं , नवे कपडे घालावे पण यावर्षी त्याची खरं खरं प्रचिती आली पाडवाच आपण सर्वांनी  लाॕकडाऊनमध्ये केला , सगळी कामं स्वतः केली तर पुढचं वर्ष जवळजवळ तसंच गेलंय . पण आता मात्र काळोखानंतर पहाट होणारच या आशेने येणाऱ्या उषःकालाची सारेजण मोकळा श्वास घेण्यासाठी आतुरतेने वाट पहात आहेत हे नक्की .

आज आकरा डिसेंबर मघाशी आशीष-कीर्तीचा फोन झाला तर कीर्तीला आता जानेवरीमध्ये पुण्यात यायचा प्लॕन करा असं मिटींगमध्ये सांगितले . खरं तर तिचं काम तिथेच आहे तरी पण बार्शीत रहायची सवय झालीय आता कायमसाठी पुण्यात जायचं म्हणलं की उगाचच कसंतरी झालं . तशी दोनतीन कारण आहेत एकतर अजून लस मिळाली नाही ती घेऊन गेलं तर बिनधास्त होईल . दुसरं म्हणजे घरी कामाला बायका लगेच येऊ शकतील का ? आणि नाही आल्या तर मॕनेज होईल का ?आणि तिसरं म्हणजे आता सणामध्ये फक्त संक्रातीचा सण राहिलाय तो तोंडावर आलाय तो झाला की संपल आता पाहू काय होतं ते . माणसाच्या आशा वाढत असतात खरं . कीर्तीच्या मैत्रिणीचं लग्न झालं की 26 डिसेंबरला ती दोघं येतील बार्शीला . मग पाहूयात किती रहायला मिळतं त्यांना त्याप्रमाणे करु . आता आकांक्षाचा पण क्लास यामहिन्यात संपतोय पंधरा जानेवारीपर्यंत परिक्षा संपेल पुढे 15 फेब्रुवारीपर्यंत प्रोजेक्ट तिलाही वाटतंय प्रोजेक्ट क्लासमध्ये करावा पाहू आता काय होतं ते . एवढं नक्की की प्रत्येकाला नाॕर्मल आयुष्य जगावं असं वाटत आहे . तेही बरोबरच आहे पण 2020 हे कॕलेंडर वर्ष संपत आलंय तर त्याच्याबरोबरच करोना पण संपावा एवढीच इच्छा !

आज 27 डिसेंबर ! कालच आशीष-कीर्ती तब्बल एक महिना मिरजेत राहून परत आली . एक वर्षाच्या आत नविन सुनेचा सहवास जसा आम्हांला झाला तसाच कीर्तीच्या आई-बाबा व आशिष यांना एकत्र रहाता आल ! की जे असं कधी रहाता येईल असं वाटलं नव्हतं . कोरोनामुळे हेही झालं !  

लग्नाला एक वर्ष व्हायला आता फक्त एक महिना राहिला आहे .

आता सध्या भाज्यांची रेलचेल आहे पुन्हा सगळे एकत्र रहात आहेत मग पुन्हा खवय्येगीरीचा एकएक राऊंड करणार . आता मुलं आधी पुण्याला जातात का आशीष-कीर्तीच्या लग्नाचा  वाढदिवस आधी होतो हे पहायचं कारण क्रमशःची समाप्ती जे आधी होईल तेव्हा करणार !





क्रमशः भाग 34




        आता नविन वर्षात म्हणजेच 9 जानेवारी 2021 शनिवारी  मुलांच पुण्याला जायचं ठरलं आहे.  त्यानुषंगाने कामांची लिस्ट तयार झाली . आणि मन भूतकाळात गेलं . भारतात कोरोनाचं घोंघावतं वादळ सुरु झालं आणि हो नाही करत पाडव्याच्या आधी दोन दिवस  आशिष-किर्ती-आकांक्षा  बार्शीला येऊन पोहोचली . तसा कोरोनाचा फारसा अंदाज कोणालाच येत नव्हता आणि एकदोन दिवसांत एकवीस दिवसांसाठी  लाॕकडाऊन घोषीत  झालं आणि मुलांना वाटलं

" आता तीन आठवडे सगळंच बंद आहे तर बार्शीला आलो खूप बरं झालं आता रहाणं पडेल . "

          नविनच लग्न झाल्यामुळे आम्ही नुकताच आशिषचा नविन संसार लावून आलो होतो त्यामुळे त्यांनी अजून एखादा किलो तांदूळ पण बाहेरुन आणला नव्हता तर एकदम सगळं अंगावर पडलं तर गोंधळायला झालं असतं. पुण्यात राहून काय केलं असतं ? फजितीच झाली असती . आता इथे बार्शीत एकत्र रहायला तरी मिळेल थोडफार स्वयंपाक शिकता येईल असं म्हणत म्हणत पंधरा-पंधरा दिवस लाॕकडाऊन  वाढत राहिले . कंपनी WFH वाढवत राहिली . आकांक्षाचा क्लास आॕनलाईन सुरु झाला आणि  मग आज तब्बल नऊदहा महिने झाले आम्ही सगळे बार्शीत एकत्र राहतो आहोत ! 
       आलेला अनुभव लिहावा असे सुरुवातीला वाटले जवळजवळ एक महिन्यांनी बराच मोठा अनुभव लिहीला आणि माझे आप्तेष्ट व स्नेह्यांना पाठवला तर प्रतिसाद इतका छान मिळाला की 

 " लिहित रहा छान वाटतंय "

हा मेसेज जवळजवळ सगळ्यांनी दिला . सुरुवातीला रोजचा दिवस काहीतरी नविन अनुभव यायचा मग मला पण ते लिहायला व सगळ्यांना वाचायला आवडू लागलं . शेरे , टिपण्णी इतकी की मला काहीजणांनी सांगितले की

 " कीर्ती नविन सून आहे तसेच तू पण नविन सासू आहेस . लिहित रहा संग्रह करुन त्याचं पुस्तक तयार कर . एवढ्यावरच न थांबता नविन लग्न झालेल्या मुलींच्या व तिच्या सासूच्या  वाचनात येईल असेही पहा . त्यांच्यासाठी हे अनुभव नक्कीच दिशादर्शक ठरतील , नविन संसार टवटवीत रहातील ".
  
असे मेसेजेस , फोन ऐकल्यावर मात्र माझा लिहिण्याचा उत्साह वाढत गेला मग मी लिहीत राहिले . लिहीत लिहीत मी माझ्या बालपणात , मुलांच्या बालपणात पण फेरफटका मारुन आले .ओघाने आई-काकांंची आठवण ताजी झाली .  मनाला समाधान वाटायचं . बऱ्याचदा सुनिल भाऊजी व सुखदाची आठवण यायची आणि मनाला रुखरुख लागायची . मध्यंतरी मात्र तेच तेच वातावरण होतं . नविन काही घडत नसे , कोरोनाचा कंटाळा यायचा मग लिखाणात पण खंड पडायचा पण लिखाणाची नाळ तशी तुटू दिली नव्हती  आणि बघत बघत क्रमशः 33 भाग पुर्ण झाले . वाचणारांना पण याची सवय झाली . जास्तच खंड पडला तर 

" काय ग , आलीकडे बरेच दिवसात  क्रमशःचा  पुढचा भाग आला नाही " 

असे मेसेजेस यायचे तर काहीतरी घडलं की आशिष-किर्ती-आकांक्षा म्हणायचे 

" काही घडलं नाही म्हणून क्रमशः लिहीलं नाही आता हे तर लिहीलच पाहिजे "

मग माझा पुढचा भाग लिहीला जाई . या कालावधीत बरंच पाणी पुलाखालुन गेलं अनेक प्रसंग घडले त्याचे अनुभव लिहायचे व ते वाचताना खूप आनंद व्हायचा . काहीवेळा काळजी वाटायची ,  काहीवेळा घाबरायला व्हायचं . मायडी , केतकी यांना कोरोना होणं यासारख्या काही अस्वस्थ करणाऱ्या घटना या कालावधीतच  घडल्या तर खूप दिवसापासून कुठेही जाणंयेणं नसल्याने दोघदोघच घरात राहून अनेकजण कंटाळून गेलेलं पण जाणवायचं . ज्योतीच्या लग्नाला पंचवीस वर्षे पुर्ण झाली त्याचं केलेलं ई-सेलिब्रेशन आणि त्यावेळी मनाने सर्वजण एका साखळीत गुंफल्यासारखे असायचे मग त्याचा परमोच्च बींदू गाठल्यावर आनंदाला आलेलं उधाण ! यादरम्यान झालेले आमचे वाढदिवस , लग्नाचा वाढदिवस . सगळेच्या सगळे सण आणि लाॕकडाऊनमुळे सगळी कामे  घरीच करणे क्रमप्राप्त झाल्यामुळे पाककलांना आलेलं उधाण ! आणि पदार्थाच्या चविप्रमाणेच
 " सुगरण कन्या " 
ग्रुपवरची खमंग-गोड अशी चविष्ठ खुसखुशीत चटकदार चर्चा . यादरम्यान आमच्याकडे  "किचन" 
हा शब्द लोप पावला आणि आम्ही  
" मुदपाकखाना " 
हा शब्दप्रयोग करु लागलो कारण घरामध्ये खाणारी तरुणाई ते वृद्ध अशी सर्व वयोगटातील माणसं . आणि सगळी कामं स्वतःच करायची मग घाईच्या पण मर्यादित मुख्य म्हणजे सकाळच्या वेळेत मोकळं , पातळ, खमखमीत , आळणी , कडक , मऊ असा वैविध्यपुर्ण साग्रसंगीत स्वयंपाक करतांना होणारी दमछाक . बाहेरचं खाणं नाही त्यामुळे प्रमाण पण भरपूर . चहा सारखा करावा लागतो म्हणून मग एकदमच बारापंधरा  कप चहाच मिश्रण करुन ठेवलं की आशिषने त्यात आलं वगैरे भरपूर टाकून डावाने हलवत 
" सरितातुल्य चहा " 
असे म्हणत थर्मास भरणे व सगळ्यांना चहा देणे हे त्याचं काम होत . 
         एकूणच लाॕकडाऊनच्या प्रकारानुसार किराणा , भाजी आणि लागणारं सगळं सामान आणायचं . आणि प्रत्येकाने माझी वेळ झाली म्हणून पळायचं मग कमीजास्त सगळं पहायचं हे काम एकदोन दिवस नाही तर नऊदहा माहिने रोजच यांना करावं लागलं  . 
          अशा एक ना दोन  कायमस्वरुपी स्मरणात रहातील अशा अनेक घटना घडल्या . आणि आता बघता बघता मुलं पुण्याला परत जाण्याचा क्षण येऊन ठेपला ! आणि मन हळवं झालं . संपुर्ण घटनाक्रम फ्लॕशबॕकसारखा डोळ्यासमोर तरळतोय .
     तसं तर दहावी झाली की मुलं बाहेर आहेत त्यामुळे ते नसण्याची सवय झालीय पण........ 
आता ती परिपक्व झालीत आशिषचं लग्न झाल्यामुळे कीर्तीपण आहे .  मग नऊदहा  महिन्यात इतकी सवय झालीय की ते जाणार आहेतच हे माहित  असूनसुद्धा अगदी 9 जानेवारीला  जाणार आहेत म्हणलं की मनाची अवस्था कातर कातर झाली , आतल्या आत उमाळे येऊ लागलेत .भरभरुन होणारं लिखाण मागच्या भागापासूनच आकसल्यासारखं वाटतंय . खरं तर हे नऊदहा महिने एकत्र रहाणे हे अनपेक्षीत आहे . पण तो अगदी आपला हक्कच आहे असे वाटतं आहे . मन आहे जसा विचार करते तेच बरोबर आहे असे वाटत रहाते . सुख घटाघटा प्यायचं ही माणसाची प्रवृत्ती आहे . एखाद्या मुलीचं लग्न जमलं की घरच्यांना आनंद तर होतोच पण मुलगी सासरी जाणार म्हणून भरुन पण येतं , हुरहुर वाटते तशीच काहीतरी ही मानसिकता आहे . आजकाल नोकरीच्या निमित्ताने मुले दूर असतात आणि असणारच ही मानसिकता तयार झालेली असते . आयुष्यात धावण्याची शर्यत लावल्याप्रमाणे बाकी सगळं गौण समजत आपण पण  धावत रहातो . हातातून वाळू निसटावी त्याप्रमाणे असे काही क्षण निसटून जातात की या धकाधकीच्या जिवनात त्याचा कधी आपण विचारंच करत नाहीत त्यामुळे मला तरी मनोमन असं वाटतंय की कोरोनामुळे 

" काही हरवलं 
तर काही गवसलं "  

असं झालं हे नक्की !
माझं या भागाच लिखाण चालू होतं आणि आशिष-किर्ती येऊन बसले आणि म्हणू लागले . 

" आम्हांला पुण्याला नाही जावं वाटत बार्शीत रहावं वाटतंय . इथे बघ न सगळ छान वाटतंय , घरात माणसं आहेत खाणं , पीण , गप्पा , मजा येते . जेव्हा काम किंवा आराम करायचा असतो तेव्हा वरच्या घरात गेलं की संपलं . तिथे दोघेजणच मग आम्ही काय करु तिथे ? "

हे ऐकून मी मात्र आवाक झाले . लळा लागलाय हे मान्य आहे पण बार्शीत राहून करायचं काय ? मग हसतहसत चर्चा आपली स्वतःची एखादी कंपनी बार्शीच्या आसपास काढू इथपर्यंत येऊन पोहोचली ! पण जायला नको वाटतंय हे नक्की . बरोबरही आहे कारण गृहस्थाश्रमात प्रवेश केला तसं एकत्र कुटुंबात रहायची सवय लागली आहे पुण्यात गेलं की अ पासून सुरुवात करायची , तशी तर मागच्या वर्षी ती झाली होती पण आता विसरी पडली आणि हेच जिवन बरं वाटू लागलं म्हणून आता दोघेच रहायला नको वाटतेय . मग पुन्हा ठरलं कंपनीने आत्ता बोलावलं आहे तर जाऊन तरी पाहू . फारसं जावं लागणार नसेल तर जाणंयेणं करु . जशी परिस्थिती असेल त्याप्रमाणे मॕनेज करु . मला माहित आहे गाडीनं वेग घेईपर्यंत असतं हे . आधी येताना हो-नाही चाललेलं तर आता जायचं जीवावर आलंय !  तसं तर भावनावश सगळ्यांनाच होतंय . 
      आता आकांक्षाच सी-डॕकपण शेवाटच्या टप्प्यात आलं आहे त्यामुळे आता दोन महिने तिच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत त्यामुळे फेब्रुवारी अखेरपर्यंत तसे आम्हीपण बांधीलच आहोत !
      पुन्हा गप्पांमध्ये गाडी क्रमशः लिखाणावर आली .मी जर हे पुस्तक छापणार असेल तर त्याची प्रस्तावना कीर्ती करणार असे ठरलं आहे पाहूया आता केव्हा देते ते . तसं तिला वाचनाचा बऱ्यापैकी नाद आहे लिहिते पण छान आता मी प्रस्तावनेची वाट पहातेय . मग माझं मनोगत लिहून पुर्ण भागांची लींक तयार करण्याचा विचार आहे , पाहूयात कसे जमते ते . तर अशा संमिश्र भावना आहेत या सगळ्या . काय काय होतय हेच समजत नाही भावनांचा कल्लोळ आहे !!
           पण आता जाणार तर आहेतच मग तयारी पण करायलाच हवी . आता आधी एक दिवस परांडा दौरा करायचा आहे कीर्तीला पण परांड्याचं घर पहायचं आहे पाहू कसं जमतं ते . मग पुण्याला जाण्यापुर्वी किमान महिनाभर तरी बाहेर जायला लागू नये इतपत पीठं , किराणा , आठवडाभर पुरेल एवढी भाजी , नेहमीप्रमाणे थोडाफार कोरडा खाऊ ही सगळी तयारी करावी लागेल . आत्ता सगळ्यात जास्त त्रास देणारा विचार म्हणजे माझ्या मनात आलं की मी शनिवारी हुतात्माने जाऊन रविवारी परत येऊ शकेन अशी परिस्थिती कधी होणार ! असे सतत विचारचक्र सुरु आहे . पण हळुहळू जनजिवन पण सुरळीत होईल . कुठेही जाणंयेणं नाही . बहिणी , पाहूणे , मैत्रीणी , संघटनेतील सहकारी , गायन क्लास ग्रुप सगळ्यांच्या प्रत्यक्ष भेटी होऊन पण नऊदहा महिने होऊन गेलेत . फोन मेसेजेस चालूच आहेत पण प्रत्यक्ष भेटीची पण आस आहे . पाहूया कधी सगळं सुरळीत होतं ते !
        कधी नव्हे ते मध्यंतरी घरातच बुलबुलला अगदीच जवळून न्याहाळण्याचा योग आला . अथक परिश्रम करुन त्या युगुलाने तयार केलेलं उबदार घरटं मग त्यात अंडी घालणं आणि पिलांचा जन्म या प्रक्रिया पुर्ण होईस्तोवर जिवाचं रान करणं मग त्या पिलांना जिवापाड जपणं , संगोपन करणे , उडायला शिकवणं सरते शेवटी पंखात बळ आलं की पिलांनी घरटं सोडून उंच आकाशात भरारी घेणं त्यातच जन्मदात्यांनी समाधान मानणं ! सगळंच कसं अगदी क्रमाने ठरल्याप्रमाणे असतं ! पक्षी असो , प्राणी असो वा माणुस ! प्रत्येकाची जिवनशैली ही समानच असते आणि तशी जगता आली तरच समाधान वाटतं . सहवास , प्रेम , आनंद , विरह , समाधान आणि सर्वात शेवटी असंच घडलं तरच वाटणारी धन्यता !! नऊदहा महिने मी मुलांमध्ये पुरती गुरफटून गेले , मानसिकरित्या मुलांमध्ये गुंतले पण त्यांच्या पंखात बळ आलेलं आहे संधी मिळताच ते भरारी घेणार आणि त्यातच धन्यता मानली पाहिजे याचं जणू प्रात्यक्षिकच परमेश्वराने बुलबुलच्या रुपाने दाखविले असे म्हणायला हरकत नाही . माझी आई नेहमी म्हणायची

" पाण्याला पुढे धावण्याची ओढ असते , माणसाचही तसंच असत पुढेपुढे तो धावत असतो आणि असाव पण तसंच  ".

मनुष्य प्राणी हे एक अजब रसायन आहे तसंच न उलगडलेलं तरीपण हवहवसं वाटणारं कोडंदेखील  !!!





क्रमशः भाग 35

( शेवटचा भाग )



          जवळजवळ दहा-आकरा महिन्याच्या मोठ्या सुट्टीनंतर आशिष-किर्ती काल रहाण्यासाठी पुण्याला गेले आणि मनाशी संवाद सुरु झाला ! आकांक्षाचं सी-डॕक अजून चालू आहे त्यामुळे ती अजून इथेच आहे तिची परिक्षा , प्रोजेक्ट आणि बरंच काही महत्त्वाचे याच महिन्यात आहे त्यामुळे ती खूपच बीझी आहे पण घरात आहे तिला खायला व्यवस्थित देता येतंय घरात तिचा वावर आहे त्यामुळे थोडंस बरं वाटतंय फेब्रुवारी अखेर तिचं शिक्षण संपून नविन पर्व सुरु होईल . मुलांची घोडदौड सुरु झालीय त्यांना पुढची ध्येयं खुणावत आहेत . मग भरारी तर घेतलीच पाहिजे पण आशिष-किर्ती गेल्यामुळे घर अगदी खायला उठल्यासारख झालंय . तशी खूप कामं आहेत पण काहीच करावसं वाटत नाही . सगळं एकदम शांत........

       तसं बारातेरा वर्षे झाली मुलांचे येणे दोनतीन दिवस राहून जाणे ही सवय झालीय . जातांना थोडंस कसंतरी होतं पण पुन्हा लगेचच आपापल्या उद्योगात गुंतले जाते . पण यावेळी मनू आणि आकांक्षा दोघेपण त्यांच्या बारावीच्या सुट्टीनंतर इतके दिवस बार्शीला राहिलेत यावेळी त्यांच्याबरोबर कीर्तीपण होती. त्यामुळे खुप समाधान वाटलं . पण मुलं पहिल्यांदा शिकायला गेली तेव्हा जशी अवस्था झाली तशीच किंबहुना त्याहीपेक्षा काहीशी जास्तच आज झालीय असं वाटतय रितेपणा जाणवतोय ....

या झाल्या माझ्या भावना .

पण मागच्या आठवड्यातील माझं निरीक्षण मला सांगू लागल आहे की मला वाटलं त्याहीपेक्षा जास्त घालमेल आशिष-किर्तीची सुरु आहे छोटीशी तोंडं करुन बसतात . सकाळच्या वेळेत आशिषबरोबर गप्पा होतात तर संध्याकाळच्या वेळी कीर्ती गप्पा मारत असते एकूणच दोघांचाही नूर एकच असतो , काय करावं , आता तर जावं लागणार आहे पण जायची अजिबात इच्छा नाही . बार्शीत सगळ्याबरोबर रहायला मजा आली सगळ्यांशी कनेक्ट होता आलंय . कालपासून दोनतीनवेळा व्हीडीओ काॕल झाला अज्जिबात करमत नाही आसा त्यांचाही नूर येतोय पण खात्री आहे थोडंस रुळलं की नक्की रमणार . सध्या हे छान वाटत होतं सवय झाली होती भरपूर गप्पा व्हायच्या ते एकटं पडल्यासारखं वाटतंय . तसा माझा स्वभाव जरा जास्तच  बडबडा आहे पण यांचा तसा नाही . पण मी दिवसभर घरी नसायचे तर इतकं एकत्र रहाता आल्यामुळे त्यांना कीर्तीच्या व कीर्तीला त्यांच्या आवडीनिवडी , सवयी , स्वभाव चांगले माहित झालेत हाही महत्त्वाचा भाग आहे यांना चहा लागतो तो वेळेत द्यायचा हे काम कीर्ती चोख बजावायची तर कीर्तीला खायला जरा चाणाचूणा जास्त आवडतो तर लक्षात ठेवून आणायचं काम यांच असायचं  .

       असो पण त्यांचे पुढचे रुटीन सुरु होणे ही बाब पण तितकीच अत्यावश्यक आहे. अगदी सुरुवातीला मुलं तशी कंटाळली होती . घड्याळाच्या काट्यावर पळायची सवय ते बेहिशेबी वागणं फार काळ नकोस वाटायचं . तसं WFH खुप होतं त्यांना  , मनिष तर कामाला जाम त्रस्त झाला होता . आॕफिसला जाऊन आलेलं परवडलं पण हे नको असं त्याला वाटायचं . त्याचे क्लाएंट बाहेरचे असल्याने दुपारी चारच्यापुढे काम रंगात यायचं आणि घरुनच काम म्हणजे वेळेचं बंधनच नाही . मग तो पण आणि आम्ही पण वैतागायचो . घरात असून बोलणं होत नसे कीर्तीचं तर हे रुटीनच नव्हते सतत फील्डवर फिरायचं आणि बोलायचं एखादी चक्कर लॕपटाॕप समोर बसायचं . असे असल्यामुळे सतत लॕपटाॕपसमोरच्या कामात ती रमत नव्हती . आणि आकांक्षाला तर कधी एकदा मैत्रिणींना भेटू असं वाटायचं . तिच्या सहा महिन्याच्या कोर्सला एक वर्ष लागलं आता हत्ती गेलं आणि शेपूट राहिलंय .

 हे सगळं जरी खरं असलं तरी आत्ताच्या वातावरणात मुलांना  बार्शी एकदम निवांत वाटलं . नुकताच बांधलेला वरचा मजला त्याचा अगदी पुरेपूर वापर झाला . सार्थक झालं , पैसै फिटले असं वाटलं . आहे त्या वातावरणात प्रत्येकाने स्वतःला मोल्ड करुन आपापली जिवनशैली ठरवून घेतली होती त्यामुळे मी पहिल्या भागात म्हणलं तसं आर्धा ग्लास भरलेल्यावर लक्ष केंद्रीत केल्यामुळे कध्धीच मिळालं नसतं असं जिवन जगता आलं आणि मग आत्ता जसं चालू आहे ते छान वाटू लागलं . मुख्य म्हणजे आशिष-किर्तीनं नुकताच आयुष्यात टर्न घेतला होता . नविन जिवन सुरु झालं होतं . नव्या सुनेला घरात रुळायला वेळ द्यावा लागतो . तसंच संसारात रुळायलाही वेळ लागतोच की . तसं तिचं प्रत्येक सणाला बार्शीला येणं किंवा आम्ही पुण्यात चारआठ दिवस जाणं झालं असतं . पण यातून काही दिवसात नव्हे , महिन्यात नव्हे काही वर्षातसुद्धा आम्हांला इतके दिवस एकत्र रहाता आलं नसतं तेवढं या लॉकडाऊनमुळे शक्य झालं ! पाडव्यापासून सणांना सुरुवात झाली . मुख्य म्हणजे कुलदैवत असलेल्या नृसिंह जयंतीला हे आले असते ते आख्ख नवरात्र त्यांना अनुभवता आलं . आणि मग जेष्ठ पौर्णिमा , श्रावणात मंगळागौर , शुक्रवार , रक्षाबंधन , पोळा तर सगळ्यात मोठा सण म्हणजे गौरी-गणपती ! देवीचं नवरात्र , दसरा आणि सणांचा शेवट म्हणजे 

" दिवाळी आणि सण ओवाळी " 

त्यानंतरचं सटीचं नवरात्र इथपर्यंत सगळे सण अगदी व्यवस्थित थाटामाटात पार पडले , जवळून पहाता आले . तसं प्रत्येक सणाला ऐनवेळी येऊन सण साजरा करुन लगेच परताव लागलं असतं ते सलग दहा महिने राहून अगदी शिस्तीत सगळ्या रिती जवळून पहाता आल्या माणसांचा सहवास लाभला विशेष म्हणजे  काका-काकींना नातसुनेचा , स्वतःच्या नातवंडांचा सहवास कित्येक वर्षांनी मिळाला . हे क्षण मात्र कायम स्मरणात रहातील . विशेष दिवसांच्या स्मृती आशिषने जशा कॕमेरॕत टिपल्यात तशा मी पण या क्रमशःमध्ये नोंद केल्या आहेत भविष्यात केव्हाही वाचलं तर सुगंधी कुपी उघडल्यावर जसा सुवास दरवळावा तशा आठवणी मनात रुंजी घालतील हे नक्की ! आता फक्त संक्रांत सण व लग्नाचा वाढदिवस राहिलांय . तसं तर सुरुवातीला तरी लवकरच त्यांची चक्कर होईल मग एखाद्या रविवारी संक्रांत सण घालणार तिथिने लग्न रथसप्तमीला झालं होतं ! पाहूया कसं होतं ते .

       माझी शाखा सुरुवातीला कापड बाजारमध्ये होती तिथे शाखा इमारतीचे मालक असलेले रायचुरकर त्यांच्या कुटूंबाशी माझे जवळचे संबध होते . त्यांच व्यापारी घराणं होतं ! तर त्या काकू बोललेलं एक वाक्य मला खूप स्मरणात राहिलं होत व त्याची प्रचिती यादरम्यान आली त्या म्हणायच्या 

" आम्ही कापड दुकानदार ! आमचा मुलगा निलेश त्याला आम्ही पहिलं काय शिकवणार तर दुकान उघडून देवाला उदबत्ती , नमस्कार व मुख्य म्हणजे कपडा कापता आला पाहिजे , कात्री चालवता आली पाहिजे , कारण एखादं गिऱ्हाईक लवकर आलं तोपर्यंत जर नोकर आला नसेल तर भवानीच्या गिऱ्हाईकाला थांबावं लागू नये किंवा परतही जावं लागू  नये . ते संस्कार आम्हांला बालवयातच करावे लागतात . मोठं झालं की बोटं लवकर बसत नसतात आणि मनाची पण तयारी होत नसते . "

 किती अर्थ भरला आहे या वाक्यात ! म्हणजे काय तर थोडक्यात स्वावलंबीपणाचं थोडसं शिक्षणच की हे !  माझ्या मते सर्व ठिकाणी हा नियम लागू होतो. होय आपण सगळ्या कामासाठी नोकर ठेवलेत पण जर अडचण आलीच तर प्रत्येकाला पोटापुरतं करायला येणं ही महत्त्वाची गोष्ट आहे . आमची आई पण म्हणायची 

" जेवढं लवकर शिकाल तेवढं चुटूचुटू करता येतं . कणिक मळणे , भाजी चिरणे , आवराआवरी करणे ही कामे तुम्ही हाताखाली करायला पाहिजेत ."

आणि मग नकळतपणे स्वावलंबीपणा कधी आला कळलंच नाही . या कालावधीत कीर्तीला संसाराच , स्वयंपाकाच प्रॕक्टीकल ट्रेनिंग मिळालं एवढ खरं . देताना मी खूष घेताना ती खूष एकूणच आनंदीआनंद गडे !!  माझ्या परीने मी मनिषला पण यात सामावुन घेतलं आहे . धडे दिले आहेत . तसं लहानपणापासूनच आकांक्षा व आशीष मध्ये कधीही भेदभाव केला नाही . मुळात माझं बालपणच अशा संस्कारात गेलं आहे . त्यामुळे त्याचीपण मानसिकता तशीच आहे . समानता शिकवावी लागत नाही ती संस्कारातुन बिंबवावी लागते . मला नक्की खात्री आहे तेवढं काम मी केलंय !

        आमचं नविन नातं छान तर आहेच पण त्याची वीण घट्ट होण्याचं काम या दहा महिन्यात  झालं . न बोलता मनातलं ओळखणे म्हणतात नं तेवढे संबंध दृढ झालेत असं म्हणायला हरकत नाही . खुपवेळा डोळ्यांची भाषा समजते आम्हांला  . मग हसायला लागतो आम्ही . या कालावधीत आमच्या खूप साऱ्या गप्पा व्हायच्या . त्यामुळे अंतर्बाह्य ओळख म्हणतात तसं काहीसं झालयं एवढं खरं . अधिकार गाजवणं , गोड धाक या साऱ्याची अनुभूती आली . व्यायामाला दांडी झाली , माझ्या खाण्यात जास्तीचं गोड आलं , चहाचं प्रमाण वाढलं किंवा जास्त दगदग झाली की आकांक्षा-कीर्ती अगदी आळीपाळीने फैलावर घेतात . आकांक्षाला काय केल्यावर काय होतं हे जसं समजतं त्याच दर्जाचा कीर्तीच्या तब्ब्येतीचा व मनाचा दोन्हीचा माझा अभ्यास झाला आहे व अचूक अंदाज पण येतोय . तसंच  तीला पण एकूणच घराची , घरातल्या माणसांची ओळख अगदी छान झालीय . 

        बार्शीला इतका पाऊस होऊनही आमच्याकडे तीन दिवसाला पाणी येतं . कोणीही पाणी भरलं तरी काही न काही कारणांनी पाणी भरतांना फिसफीस असते . याची कीर्तीला मजा येते एखादेवेळी शांततेत पाणी झालं तर 

" आज जलयुद्ध झालं नाही त्यामुळे पाण्याची काहीच  मजा नाही आली "

असं ती म्हणते मग हशा पिकतो त्यानंतर एक फक्कड चहा होऊन जातो . असे हे पाणीपुराण !!

      चला मुलांना त्यांच्या आयुष्यात परमेश्वराने सुखी , निरोगी , मुख्य म्हणजे समाधानी असं माणूस म्हणून जगण्याची प्रेरणा द्यावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना  !!

या संपुर्ण प्रवासात सगळ्याच बाबतीत नव्याची नवलाई , कुतुहल , उत्सुकता , अधिरपणा अगदी जवळून न्याहाळता आला , अनुभवता आला . विवीध पाककृती करता आल्या ,  खाऊ घालता आल्या . सणवारांचा आनंद लुटता आला . अनेक बाबतीत कौतुक , माया तर अनेकवेळा बराच वेळ तसेच पडलेले चहाचे कप , सरबताचे ग्लास , खाण्याच्या डीश यासारख्या आळशीपणावर  घर डोक्यावर घेत केलेला ओरडा , खरडमपट्टी , कामाची झालेली दमछाक , कडक उन्हाळ्यामुळे झालेली उमघाम या सगळ्यावर शितल वाटणारे हास्याचे फवारे असे वातावरण होते त्यामुळे  बालपणीच्या सहवासानंतर तरुणाईची मौज पण जवळून न्याहाळता आली . असा जन्मभर आठवणीत राहिल असा आंबट-गोड झणझणीत तडका अशा अनेक आठवणींचा ठेवा आहे हा . स्मृतीगंध म्हणल्यास वावगे ठरणार नाही .


" Well beginning is half done "


   असं म्हणतात तर तसंच झालं आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही . 

त्याचबरोबर थोडीशी हुरहुर थोडीशी चूटपूटपण आहे .........



समाप्त


ता. क.

क्रमशःच्या निमित्ताने मी लिहीत गेले व तुम्ही माझे नातेवाईक , स्नेही माझा उत्साह वाढवत गेलात . लिखाणाची सवय लागली . छान वाटतं लिहिती रहा असा आग्रह सुरु झाला मग मी पण ठरवलंय काहीतरी नविन घेऊन तुमच्या भेटीला यायचं .

🙏🙏🙏🙏🙏









No comments:

Post a Comment