Tuesday, July 7, 2026

वंचितांची शाळा एक पाऊल प्रगतीकडे

 महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईज फेडरेशन अंतर्गत सोलापूर येथे 19 मार्च 2017 रोजी जागतिक  महिलादिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते सदर कार्यक्रमांमध्ये सहायक पोलिस आयुक्त शर्मिष्ठा घारगे , बँक ऑफ महाराष्ट्रच्या झोनल मेनेजर मृदल जोगळेकर यांचा सत्कार केला तर वंचित घटकासाठी काम करणाऱ्या सौ. अनु प्रसाद मोहीते हिला सन्मानित करण्यात आले . त्या दरम्यान या मुलीच्या  कार्याची माहिती मिळाली व तिचे भविष्यातील ठरलेले नियोजन समजले . हे ऐकत असताना ह्या कार्याची माहिती अनेकांपर्यंत पोहोचवावी असे वाटले म्हणून सर्व प्रसंग लिहून

" मिळून साऱ्याजणी " 

या मासिकात प्रसिद्धीस देण्यासाठी पाठविला होता तो फेब्रुवारी 2018 च्या अंकात छापून आला होता .



वंचितांची शाळा : एक पाऊल प्रगतीकडे

" खंरतर हा पुरस्कार नसुन ही एक जिम्मेदारी आहे की आम्ही जे काम करतो ते आणखी चांगल्या पध्दतीने व्हावं आणि अविरत व्हावं , समाजातल्या वंचित घटकांसाठी काम करताना खऱ्या अर्थाने मन  दु:खी होतं आहे . कारण आपण महासत्ता होण्याच्या मार्गावर असतांना एकीकडे अन्नाच्या घासासाठी कचराकुंडी हुडकणारे लोक पोटाची खळगी भरण्यासाठी भीक मागणारे चिमुकले हात…..रस्त्यावर फिरणारे मनोरुग्ण…..भिकारी……वृध्द……माणसाला एका घासासाठी तरसावं लागतं यासारखी दुसरी शोकांतिका नाही . पण कधी कधी हे समाधान वाटतंय की या दुर्लक्षित , वंचित घटकांची आपण सेवा तरी करतोय . फार मोठ काही नका नसेना पण त्यांना प्रामाणिकपणे सेवा देण्याचा प्रयत्न तरी करतोय . मित्रानों  हे काम कोणी एकटा करु शकत नाही यासाठी आपल्या सर्वांची मदत हवी आहे . समाजातील सर्वांनी ही आपली जिम्मेदारी आहे या दृष्टीकोनातून विचार केला तर समाजपरिवर्तन होण्यास वेळ लागणार नाही . पण आमच्यातली माणुसकी कुठेतरी संपत चालालेली दिसत आहे. तीच माणुसकी आपण जपायला हवी ".

   पंचवीस वर्ष वयाची बी ए एमएसडब्ल्यु झालेली सौ. अनु मोहीते तळमळीने व्यासपीठावर बोलत होती . निमित्त होते महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लाॕईज फेडरेशन महिला आघाडी सोलापूर यांनी आयोजित केलेल्या  महिलादिनाच्या कार्यक्रमाचे ! या संघटनेच्या सोलापुरात होणाऱ्या पहिल्याच कार्यक्रमात वंचित घटकांसाठी काम करणाऱ्या महिलेला सन्मानित करायचे ठरले होते. त्यासाठी सोलापुर मधेच सामाजिक कार्य करणाऱ्या सौ. नभा काकडे यांची मदत घेण्याचं ठरवलं . नभाला हा विषय बोलून दाखवताच तिने अनुच्या कार्याबद्दल माहिती दिली . ती ऐकून भारावून गेल्यासारख झालं आणि वाटलं ही करते ते कार्य समाजासमोर आलं पाहिजे. नभाने तिची माहिती दिली जणु सन्मान पत्रच !

      समाजातील वंचित घटकांसाठी काम करणे हा अनुचा ध्यास ! वंचितांची शाळा " एक पाऊल प्रगतिकडे " हे तिच्या प्रकल्पाचे नाव आहे हा प्रकल्प वंचित मुलांसाठी असुन जी मुल रस्त्यावर भीक मागतात , राहायला घर नाही , जागा मिळेल तिथे त्यांचे आईवडील झोपडी बांधून रहातात . झोपड्या महापालिकेने काढा म्हणले की काढतात . फुटपाथवर राहतात . अशा मुलामुलींना शोधून एकत्र करुन शाळा चालवते . सुरूवातीला मुलांना हे विचित्र वाटायचं , ती दगड मारायची , मरामारी करायची नुसतं हसत रहायची . पण समाजाच्या मुख्य प्रवाहात या मुलांना आणायला या ध्येयाने पतीच्या सक्रीय साथीने अनु हे काम करत आहे . सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळी वेगवेगळ्या ठिकाणी ही शाळा चालवते .

        याच प्रकल्पाच्या अंतर्गत रस्त्यावर भीक मागणारे मनोरुग्ण यांनाही आधार देण्याचा हे दोघे प्रयत्न करतात . अनेक मनोरुग्णांना इस्पितळात नेणे , त्यांच्या स्वच्छतेची काळजी घेणे , थंडी , ऊन , पाऊस यापासून सरंक्षण करण्यासाठी काहीतरी मार्ग काढण्याचा प्रयत्न करणे ही पण कामे ही दोघे करतात . महापालिका व पोलिस खाते यांच्या सहकार्याने त्यांना सिध्देश्वर शाळेसमोरील पोलिस चौक हाच कॅम्पस शाळेसाठी मिळाला आहे तर दुसरी शाळा हैद्राबाद रोडवरील पण्याच्या टाकीजवळ आहे . उघड्यावर 

" गुरूकुल " या पध्दतीने या शाळा चालतात ती एमएसडब्ल्यु  झाली आहे याचा ती खरोखरच समाजकार्यासाठी उपयोग करते . आपल्या आसपास कुटुंबाचा भार वाहणाऱ्या  दिवसरात्र कष्ट करणाऱ्या  , रुढी परंपरांनी पिचलेल्या स्त्रीया आपण पाहतोच . पण याच स्त्रिया समाजाचाही भार वाहून , कष्ट करून रूढी परंपरांच्या बंधनाला भिरकावतात याचं एक उदाहरण म्हणजे अनु आहे . प्रसाद मोहिते याच्याशी तिने परवाच सामुदायिक विवाह सोहळ्यात लग्न केलं आणि वाचलेला पैसा त्यांच्याच शाळेतील पाच मुलींच्या नावे एफडी करून ठेवले . सासरचे पहिले स्वागत आपल्या विधवा सासुच्या हातूनच झालं पाहिजे आणि आपली ओटी पण त्यांनीच भरली पाहिजे हा अनुने आग्रह धरला ! सोलापूर जिल्ह्यातील वैराग जवळचे इर्लेवाडी हे प्रसादाचे ग्रामीण भागातील गाव आहे . लोकांनी खूप विरोध केला , अशुभ होईल म्हणून भीती घातली परंतु अनुचे उत्तर होते की ज्या आईने शेतीकर्जामध्ये आत्महत्या केलेल्या पतीच्या पश्चात मुलाला शिकवलं , सामाजिक संस्कार केले , मोठ केल ती प्रसादची आई माझ्यासाठी अशुभ असूच शकत नाही . उलट तिचेच आशिर्वाद माझ्यासाठी प्रथम महत्वाचे आहेत . अशी ही बंडखोर , प्रेमळ , कष्टाळु आणि समाजमन जाणणारी अनु हीचा आज आम्ही सत्कार करत आहोत . तिचा हा सत्कार समाजात तिच्यासारखे काम करणाऱ्या  तमाम महिलांच्या कार्याचा सन्मान आहे भविष्यामध्ये वंचित घटकांसाठी कायमस्वरुपी प्रकल्प उभारण्याचा मोहिते पतिपत्निचा मानस आहे . त्यास मनापासून शुभेच्छा ! 

  कार्यक्रमामध्ये आनुचा परिचय दिला आणि एकप्रकारची गंभीर शांतता पसरली होती . अंतर्मुख व्हायला होत होतं . पण अनु अगदी सहजपणे व्यासपीठावर आली व आपले अनुभव आणि अपेक्षा उकलत होती . हिच्या शाळेच्या आसपासच एक जागा आहे की ज्याठिकाणी लोक उतारे टाकतात . ती सांगत होती हिच्या शाळेतल्या मुलांना हे चांगलाच माहिती आहे आणि ते एवढ मोठ चांगल अन्न लोक उतारे म्हणून टाकतात आणि ही मुल तो उतारा घेऊन येतात आणि खातात . आनु म्हणली

" अशा आंधश्रध्दामधून जर मुलांची पोटं भरणार असतील तर त्या चाललेल्या बऱ्या ! आईवडिल मुलांना वाढवत असतांना आईवडिलांना बजेटचा कधीच प्रश्न पडत नाही पण त्याच आईवडिलांना जेव्हा सांभाळायची वेळ येते तेव्हा बजेटचा प्रश्न कसा काय उद्भवू शकतो ? आणि वृध्दाश्रमात कसे काय चालु शकतात? माझ्या कुटुंबाच मासिक उत्पन्न रु सात असून त्यात आमच तिघांचं व्यवस्थित भागते पण लोकांना पैसे कसे काय पुरत नाहीत हे मला न उलगडलेलं कोड आहे .

     आपण रस्त्यावर भीक मागणारे लोक तसेच व्यसनाच्या आहारी गेलेले मनोरुग्ण पाहतो . पण आपण त्यांचा विचार करत नाही कारण आपण आपल्याच जीवनात इतके व्यस्त झालेले असतो की आपल्याला आसपास काय चालले आहे याच्याकडे पाहायला कुठून वेळ आणणार ? खरे तर हे लोक खूप दिवस अंघोळ करत नाहीत , स्वच्छतेची काळजी घेत नाहीत , नखे , केस न कापणे दात न घासणे भरपुर बिड्डया सिगरेट पिणे मग ही माणसं समाजातुन बाहेर फेकली जातात . त्यांच अंतर्मन जाणुन घेता आलं पाहिजे त्याचं दु:ख आपलसं करता आलं पाहिजे . तर कुठे या गोष्टी शक्य होतील . असे लोक दिसले तर त्यांना मदत जर करणे तुम्हाला जमणार नसेल तर करु नकात पण त्यांचा तिरस्कार तरी करु नकात . आम्ही अशाच लोकांसाठी काम करतो . मैत्रिणिनों हा शिवधनुष्य पेलणे हे एकट्याचे काम नाही जर आपला हातभार लागला तर नक्कीच हे शिवधनुष्य पेलण्यास मदत होणार आहे . आणि एकही माणूस उपाशी राहणार नाही . 

तिने केलेलं आव्हाहन हे ऐकत होत्या त्या बऱ्यापैकी कमवत असलेल्या भगिनी होत्या . बऱ्याचजणींनी त्या कार्यक्रमानंतर आपले मानस बोलुन दाखवले . कोणी वाढदिवसाची घोषणा तर कोणी स्मरणदिनाचे औचित्य साधण्याचा मानस बोलुन दाखवत होत्या आणि कार्यक्रमाचे सार्थक होत आसल्याचे जाणवत होते . थोडासा आशेचा किरण दिसू लागला होता…….



 कॉ. सरिता कुलकर्णी 

वूमन कौन्सिल कन्व्हेनर

बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉइज युनियन औरंगाबाद युनिट

मोबाईल :- 9421607248

Sunday, April 12, 2026

 *भारताला स्वातंत्र्य मिळाले*


 आणि देश स्वातंत्र्य , समता , बंधुता या लोकशाही तत्वाने पेटून उठला . विकासाला चालना मिळावी म्हणून विविध प्रयत्न केले गेले . पायाभूत व मूलभूत उद्योगांना चालना देणे हा त्याचाच एक भाग होता . 

यामध्ये वित्तपुरवठा करणाऱ्या संस्थांचा रोल अतिशय महत्वाचा ठरत गेला . 

कारण यापूर्वी सावकारी हा जोमाने चालणारा धंदा होता .

मनमानी व्याज आकारात जमीन मालमत्ता गहाण ठेऊन त्याबदल्यात कर्जे दिली जात त्यात कर्जदार पिचून जात असे . आणि म्हणूनच देशाचा कणा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वित्तीय संस्था त्यावर जनतेची मालकी असावी त्या *सरकारी मालकीच्या असाव्यात म्हणून 1969 साली प्रथम 14 बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले* . जाणीवपूर्वक बँकांचे जाळे खेड्यापाड्यात , तळागाळापर्यंत पोहोचण्यात आले . जनतेच्या ठेवी गोळा करत देशभरातील बेरोजगार , गरीब जनता , शेतकरी , शेतीला पूरक उद्योग , छोटमोठे उद्योगांना माफक दरात कर्जपुरवठा केला जाऊ लागला , बँकांच्या कक्षा रुंदावल्या सामान्य माणूस बँकिंग वर्तुळात आला . मूलभूत व पायाभूत उद्योगांना कर्जपुरवठा केला जाऊ लागला आणि देशाची विकासाकडे वाटचाल होऊ लागली . हरितक्रांती , धवलक्रांती घडून आली . बँकांची भूमिका लक्षात घेत पुढे 1980 साली आणखी बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले . 

या समस्यांचे पूर्णपणे निराकरण झाले नाही पण काही अंशी त्यावर मात करण्यात आली . सावकारी पाशातून लोकांची थोडीफार सुटका झाली .

अलीकडच्या काळात *कल्याणकारी योजना*

शिक्षण 

आरोग्य

अनुदान 

वित्तपुरवठा 

या बाजूला पडत चालल्या आहेत दिवसेंदिवस देशामध्ये शिक्षण क्षेत्रात अर्थसंकल्पीय तरतूद कमी होत चालली आहे , त्याचा परिणाम म्हणजे सरकारी शाळांची गुणवत्ता घसरते , आजकाल सरकारी दवाखान्यांची अवस्था केविलवाणी होत चालली आहे . सगळ्या सेवा सुविधांचे खाजगीकरण होत चालले आहे मग ते light , bus , gas ya दैनंदिन गरजा ज्या आहेत त्यांच्या किंमती भरमसाठ झाल्या आहेत आणि त्या वाढत आहेत . सामान्य आणि गोरगरीबाना रोजचे जीवन जगणे मुश्किल होत आहे .


घरातील कोणाला तरी गंभीर आजार झाला तर महागडे खाजगी रुग्णालय गाठावे लागते . मुलांना उच्च शिक्षण देण्यासाठी भरमसाठ फी भरावी लागते . याशिवाय पर्यावरणातील बदल , शेतमालासाठी शेतकऱ्यांना मिळणारा अनिश्चित भाव , मुलांची लग्ने , पारंपरिक रितीभाती दैनंदिन गरजा भागवण्यासाठी पैसे अपुरे पडतात . मग पैशासाठी मार्ग शोधले जातात . 


2010 च्या दरम्यान देशभरात स्वयंसहायता बचत गटांची चळवळ पुढे आली यामध्ये दहा महिलांनी एकत्र येत बचत गट स्थापन करावा सर्वांची बचत एकत्र कारवी आणि गरजू महिलेला थोडेफार व्याज घेऊन ती मदत द्यावी , एकदीने काही लघुउद्यग सुरू करून स्वावलंबी बनावे असे करत बचत गटाने गावोगावी बाळसे धरले . जवळजवळ प्रत्येक घरातील महिला बचत गटाची सभासद असेच असे . अनेकांची आयुष्ये यातून बदलली . बँका कारण आणि तारण पाहून कर्ज द्यायच्या पण इथे थोडेफार व्याज देत विनाकारण विनातारण कर्ज मिळू लागले आणि नेमके याचवेळी कोट्यवधी लोकांची गरज ओळखत 


" *नॉन बँकिंग फायनान्स* " क्षेत्रातील वित्त कंपन्यांनी कर्जपुरवठा करण्यात उडी घ्यायला सुरुवात केली . सुरुवातीला आंध्र प्रदेशात मायक्रो फायनान्सचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरले आणि नंतर देशभर झपाट्याने यांची संख्या वाढत गेली . बँकिंगचे कर्जपुरवठा करताना कारण आणि 

*तारण पाहून कर्ज ही मूळ तत्व बाजूला सारत विनाकारण विनाकारण कर्जपुरवठा करणाऱ्या मायक्रो फायनान्स कंपन्यांनी पाय रोवायला आणि फोफावला सुरुवात झाली*

    नड भागवण्यासाठी बँक कर्ज देत नाहीत पण त्याच कारणासाठी जास्त व्याजदरात सुलभपणे फायनान्सचे कर्ज उपलब्ध होऊ लागले . 

*मुळात मायक्रो फायनान्सला देशभर पसरू देणे हा राजकीय व्यवस्थेचा निर्णय आहे तो समजून घेणं अतिशय महत्वाचं आहे* .


देशामध्ये कल्याणकारी योजना कमी होऊ लागल्या , शासन आपली मायबापची भूमिका सोडत गरीबांना कर्जपुरवठा करणाऱ्या 


*मायक्रो फायनान्स सारख्या क्षेत्राला खतपाणी घालते त्याचे जाळे देशभर पसरेल याची खबरदारी घेते , त्यांच्या व्याजदरावर कोणतेही नियंत्रण नाही . त्यांची कर्जवसुलीची पद्धत म्हणजे रोगापेक्षा इलाज भयंकर अशी आहे . वसुली करत असताना धाकदपटशा , अपमान करणे , मालमत्ता ओढून नेणे अशी अमानवी कृत्ये केली जातात त्याची कोठेही दाद मागण्याची सोय नाही डायरेक्ट रिझर्व्ह बँकेकडे तक्रार करावी लागते आणि आधीच कर्जबाजारी झालेली मानहानी झालेली व्यक्ती ही पाऊल उचलू शकत नाही* .

*गरीब जनता एक ते फेडण्यासाठी दुसरे तिसरे चौथे असे व्याजदर वाढवत वाढवत कर्जाच्या जाळ्यात घट्ट अडकली जाते* .


साधे उदाहरण घ्या मुलाला *एक मोबाईल* घ्यायचा असतो त्यासाठी 16500 रु. कर्ज घेतले जाते त्याचे 50 हप्ते व्याजदर 19.50% , प्रक्रिया शुल्क 411 , विमा हप्ता 116 , gst 44.98 रु म्हणजे 11% म्हणजे लाडक्या बहिणीचे 1500 रुपये जमा होण्याआधी इकडून गेले .


    महिलांनी कर्ज घ्यावे म्हणून 100 पैकी 

*एक महिला जी कर्ज घेऊन यशस्वी* 

झालेली असते तिची यशोगाथा गावोगावी पोहोचवली जाते पण अयशस्वी ठरलेल्या कर्जबाजारी 99 महिलांविषयी काहीही सांगितले जात नाही .


मुलीच्या *लग्नाला* कर्ज द्यायचे , पुन्हा सणवारासाठी आणखी कर्ज पुन्हा लेकीचे बाळंतपण मग मोठ बारसे यासाठी नवी जुनी करत कर्जे घ्यायची त्यासाठी मग काही गुंठे जमीन गहाण ठेवायची . पहिल्या कर्जाचे 2/3 हप्ते थकले की ती रक्कम 5000 होते पुन्हा ते फेडण्यासाठी जादा व्याजाने 8000 कर्ज घेऊन आता दोन हप्ते सुरू होतात पुन्हा तिसरे कर्ज पुन्हा नाईलाजाने चौथे कर्ज काढायचे शेवटी मालकीचा असलेला थोडासा शेताचा तुकडा विकून कर्ज भरायचे आणि मग मोलमजुरी करायला घरातल्या सगळ्यांनी बाहेर पडायचं .


*घरकुल* योजने अंतर्गत प्रकरण करायचे कर्ज काढून बांधकाम सुरू करायचे , अनुदानाचे पैसे मिळवेपर्यंत चिरीमिरी पैसे वाटत रहायचे . घराचे बांधकाम पूर्ण होईपर्यंत एवढ मोठ कर्ज होते पुन्हा ते फायनान्स कडे गहाण ठेवायचं पुन्हा त्याचे हप्ते थटले की अशीच कर्जे काढायची शेवटी घर विकून टाकायचं .


*अशी घरगुती वस्तू म्हणजे फ्रिज , टीव्ही , गाडी* 

दुकानातच तुम्हाला कर्ज मिळण्याची सोय झालेली असते . छोट्या व्यवसायासाठी , शिक्षण , आजारपण , लग्न , सण अशा एक न दोन विविध कारणासाठी कर्ज घेतली जातात आणि त्याच्या गर्तेत एकदा सापडलं की सुटका होणे मुश्किल आहे .

मायक्रो फायनान्स चे कर्ज म्हणजे 


*कार्पोरेट रुपी आजगराचा* विळखा आहे आणि त्याला 

शासनाचे वरदानआहे .

एक गोष्ट सूर्यप्रकाशाइतकी स्वच्छ आहे की सरकारी बँका जर विना तारण विना कारण कर्ज देत नसतील तर या मायक्रो फायनान्स कंपन्या अशी कर्जे कारण आणि तारण का पाहत नाहीत ?त्यांचा

 *गरीबांप्रति कल्याणकारी आणि मानवतावादी दृष्टिकोन आहे का* ? 

तर तो मुळीच नाही जी कोट्यवधी जनता बँकिंग वर्तुळाच्या बाहेर राहिली त्याच बॉटम ऑफ पिरॅमिड मधील कोट्यवधी जनतेला या फायनान्स कंपन्यांनी आपल्या कवेत ओढलं .

एकीकडे कमी उत्पन्न आणि दुसरीकडे जास्त खर्च याचा ताळमेळ बसत नाही 

*आमदनी आठंन्नी खर्चा रुपय्या*

यातूनच मग कुटुंबप्रमुखाची आत्महत्या यासारखे धोके उद्भवतात .

महत्वाचे मुद्दे लक्षात घेतले पाहिजेत ते म्हणजे


*पेपर आणि काही टाचणे* याआधारे काही आकडेवारी मी याठिकाणी सांगते 

2025 च्या अहवालानुसार देशभरातील कर्जवितरणात या कंपन्यांचा हिस्सा 4.43 लाख कोटीचा आहे 2024 च्या तुलनेत त्यात 17% वाढ झाली . तर संसदेत या प्रश्नाचे लेखी उत्तर देण्यात आले त्यात सरकारने 2024 ते 2025 दरम्यान यात 6.2% वाढ झाल्याचे सांगितले आहे . महाराष्ट्रात या कंपन्यांचा हिस्सा 124.70 कोटींचा आहे आणि तो दिवसेंदिवस वाढत आहे . यातील 94% कर्ज ही व्यवसायासाठी दिली जातात असा दावा केला जातो तर 28 राज्ये आणि 5 केंद्रशासित प्रदेशात मायक्रो फायनान्स कर्ज वितरित करते . त्याच्या व्याजदरावर नियंत्रण नाही .

इकडे सांगताना असे सांगितले जाते की बँकांचे व्यवहार विस्तारत आहेत , महिला बचत गटांच्या माध्यमातून सुधारत आहेत असे सांगितले जाते पण कर्ज तितक्या सुलभतेने उपलब्ध होत नाही . बँकिंग व्यवसायातून आपल्या लोकशाही व्यवस्थेमध्ये किती नफेखोरी करायची हा मूलभूत प्रश्न जर सरकारला पडला तर बरे होईल .


*थोडसं बँकिंग विषयी*


आधी 14 नंतर 6 अशा 1980 पर्यंत 20 बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले होते . नंतर कल्याणकारी योजना बंद करण्यात आल्या आणि कर्जवाटपात राजकीय हस्तक्षेप सुरू झाला मोठमोठ्या भांडवलदारांना कर्जे वाटप करण्यात आली आणि ती हेतुपुरस्कर ठरवण्यात आली त्यामुळे बँकांचे कंबरडे मोडले . मुंबईत बोटावर माती बसेल एवढी पण जमीन शिल्लक नाही परंतु सर्वात जास्त शेती कर्ज मुंबईत आहे . वर्गीकरण चुकीचे करत ही आकडेवारी दाखवली जाते पुन्हा तिकडे थकीत दाखवून बुडीत घोषित करून बँकांना वेठीस धरायचं आणि बँकांची कुवत नाही म्हणत ती करणे पुढे करत राष्ट्रीयकृत बँकाच्या खाजगीकरणाचा आणि एकत्रीकरणाचा रेटा पुढे आला . त्यातूनच 2017 मध्ये पहिल्यांदा स्टेट बँकेत तिच्या सहा सबसिडरी बँका विलीन करण्यात आल्या नंतर 2019/20 मध्ये BOB मध्ये आणि PNB मध्ये इतर नावांचे विलिनीकरण करण्यात आले आणि राष्ट्रीयकृत बँकांची संख्या 12 झाली परिणामी जवळजवळ असणाऱ्या शाखा बंद करण्यात आला अतिरिक्त स्टाफ म्हणत नोकरभरती बंद केली .

याविरोधात जर आवाज उठवायचा असेल तर आम जनतेला सहभागी करून घ्यावं लागेल .


प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ संजीव चांदोरकर म्हणतात 

1) राजकीय धोरणात्मक हस्तक्षेपामुळे अर्थव्यवस्थेच्या इतर उपक्षेत्राप्रमाणे फायनान्स कंपन्यां जनकेंद्री बनल्या आहेत .

2) मायक्रो फायनान्स क्षेत्राला देशभर पसरू देण्याचा निर्णय हा राजकीय व्यवस्थेचा आहे तो बँकिंग किंवा वित्तक्षेत्रातील व्यवस्थापकांचा नाही .

3) मायक्रो फायनान्सच्या फील्ड स्टाफ किंवा एजंटच्या जाळ्यात गरीब जनता ओढली जाण्यासाठी अनुकूल परिस्थिती राजकीय अर्थव्यवस्था निर्माण करते . गरीबांना हतबल करणाऱ्या अनेक प्रक्रिया राजकीय अर्थव्यवस्थेत घडवल्या जातात , आपले राहणीमान टिकवण्यासाठी गरीब जनता मायक्रो फायनान्सच्या जाळ्यात ओढली जाते .

4 ) विविध पक्षांच्या निवडणूक जाहीरनाम्यात जनकेंद्री वित्तक्षेत्राच्या मागणीचे प्रतिबिंब पडेल असे प्रयत्न करता येतील .

5).........



यावरून एक निष्कर्ष काढता येईल तो म्हणजे आपण स्वतः होऊन काही बंधने पाळली पाहिजेत .

पहिलं म्हणजे आपल्याकडे *पाच वर्षातून एकदा मतदानाचे हत्यार*  

येते त्याचा वापर करताना या गोष्टी विचारात घ्याव्यात . आपलं अमूल्य मत कोणाला द्यावं याचा पाच वर्षे विचार करून ती एक क्षणाची कृती करावी .

सध्या परिस्थितीत आम जनतेने एकत्रितपणे *सरकारला कल्याणकारी , जनहिताच्या गोष्टी करण्यास भाग पाडावे* ,

 प्रामुख्याने बेकारी दूर व्हावी , कामाचा योग्य मोबदला मिळावा , शेतकऱ्याला हमीभाव मिळावा , gas सारख्या नित्योपयोगी वस्तू माफक दरात मिळाव्यात यासाठी *जनआंदोलन* व्हायला हवी , सरकारला यागोष्टी करण्यास भाग पाडावे .

*लाडक्या बहिणी* म्हणत तोंडाला पाने पुसण्याचा कृती धुडकावून लावाव्या .

कारण आपणच मोठ्या उद्योगपतींच्या धंद्याला खतपाणी घालतो . *सेवा शुल्क आणि विविध प्रकारचे कर* म्हणजे सामान्य माणसाच्या खिशाला कात्री आहे . प्रत्येक ठिकाणी विमा म्हणत तो पैसा गोळा करण्याचा मार्ग आहे . यातून विमा कंपन्या धनदांडग्या होत आहेत . त्या चालवणारे मोठमोठे कार्पोरेट आहेत . तीच गोष्ट मोबाईल कंपन्यांची आहे . BSNL सारख्या प्रचंड जाळे असणाऱ्या कंपनीला डबघाईला आणायचं आणि अंबानीसारख्याची jio ला आपल्या मदतीने धनदांडगे बनवायचं ऊर्जितावस्था आणायची हे सरकारचे छुपे आजंडे आहेत . ते उलथवले पाहिजेत , आपण स्वतः साक्षर झालं पाहिजे , *आपल्या विचारशक्तीला चालना दिली पाहिजे* .

*महात्मा गांधींची खेड्याकडे चला* ही शिकवण विसरू नये . बापजाद्याने सांभाळून ठेवलेली जमीन कसावी नाही ती विकू नये , गहाण ठेऊ नये , छोटा मोठा उद्योग करावा , कष्ट करावे प्रत्येकाने पुणे मुंबई गाठायची गरज नाही तिथे पण फार पैसे मिळतो असे नाही .

अंथरूण पाहून पाय पसरावे , अनावश्यक कारणासाठी , अनुत्पादक कारणासाठी कर्ज काढू नये .

शेजारणीने सोन्याची सरी घातली म्हणून आपण दोरी घालू नये तिने घातली तर घालुदे आपण आपल्या गळ्याभोवती दोरीचा फास नाही तयार करायचा .

ऐपत नसताना महागड्या वस्तू घेणे टाळावे , यामध्ये प्रामुख्याने गाड्या आणि मोबाईलचा मोठ्या प्रमाणावर समावेश होतो .

एक लाखाची गाडी पण आपल्याला कामाच्या ठिकाणी पोहोचवते आणि अडीच लाखाची गाडी पण तेच काम करते पण त्यासाठी आपल्या उत्पन्नाचा मोठा भाग हप्ता म्हणून आपण देतो आणि इकडे अत्यावश्यक कारणासाठी पैसे अपुरा पडतो तीच गोष्ट मोबाईलची तीच गोष्ट टीव्हीची .

*राहणीमान उंचवाव पण हिशोबाने वागावे* .

सारांश म्हणाल तर आपणही स्वतःवर काही बंधने घालून घ्यायला हवीत .

मृगजळाच्या पाठी न धावता कारणाशिवाय कर्ज काढू नये . *शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये असे आपल्या पूर्वजांनी सांगितले आहे तसे फायनान्स chya चक्रव्युहात अडकू नये* त्याचप्रमाणे अंथरूण पाहून पाय पसरावे . अनावश्यक गोष्टीसाठी , अनुत्पादक कारणासाठी मायक्रो कंपन्यांच्या कर्जाच्या विळख्यात अडकू नये .

आणि प्रामुख्याने व्यवस्था बदलण्याचे प्रयत्न स्वतःला करता नाही आले तरी ते बदलण्यासाठी जिथे जिथे आंदोलन केले जाते तिथे तिथे आपण सामील व्हायला पाहिजे . कारण माझे भविष्य आणि माझी पुढची पिढी सुरक्षित ठेवणे हे माझे कर्तव्य आहे !

Saturday, March 7, 2026

आईच्या पवित्र नात्याला शिवीच्या कचाट्यातून मुक्त करा*

 *आईच्या पवित्र नात्याला शिवीच्या कचाट्यातून मुक्त करा*


सध्याच्या वातावरणात महीला सबलीकरणाचे ढोल वाजवले जातात . त्यानिमित्ताने का होईना महिलांवरील अत्याच्याराला वाचा फोडली गेली आहे. सजग माणसाच्या मनातली तार छेडली गेली आहे. कायद्यात बदल, संस्कृतीत बदल, शिक्षणात बदल, प्रसारमाध्यमात बदल हे बदलाचे वारे वाहू लागले आहे , स्त्री-पुरुष समानता हा ऐरणीवरचा मुद्दा झाला आहे . पण एवढे मात्र नक्की की ही बदलाची आग धगधगती राहीली तरच समाजपरिवर्तन घडून येऊ शकेल.


माणूस घडत असताना त्याच्या आसपासच्या वातावरणाचा त्याच्या जडणघडीवर आपसूकच परीणाम होत असतो. जस लहान मुल चालू बोलू लागतं तस त्याच्या कानावर जे पडेल त्या बऱ्यावाईट गोष्टी त्याच्या मनावर कोरल्या जातात. आणि प्रसंगानुरूप आपोआपच त्याच्या वागण्या बोलण्यातून बाहेर येतात . त्यालाच संस्कार असे म्हणतात .

एक बारीक निरीक्षण जर केलं तर एक गोष्ट लक्षात येते . आपण रस्त्याने चाललो तर माणूस सहज बोलताना , रागाने बोलताना , भांडण करताना शिवीगाळ करतो व त्याची ती शिवी आई व बहीण यांना घेतल्याशिवाय पुर्णच होत नाही हे कशाच द्योतक आहे. मी म्हणेन स्त्रीला अत्यंत हीन समजण्याचे ध्योतक आहे . आईवरून शिवी देणं तिच्या अवयवाना हिणावणे विकृत आहे आणि ते म्हणजे समाजाच्या मानसिकतेत स्त्रीविषयी   खोलवर रुजलेली  विषवल्ली आहे .अशा शिव्यांमधून स्त्रीला अपमानाचं साधन बनवलं जातं . हे लैंगिक आणि मानसिक दोन्ही पातळीवर घातक आहे . आईवरून शिवी देणं ही “ताकद” नसून ते एक मानसिक कमकुवतपणाचं लक्षण आहे. हे इतकं भिनलंय न , माणसाच्या इतकं अंगवळणी पडलंय की कोणाच्या लक्षातही येत नाही की ज्या आईला आपण प्रेमस्वरूप आई , वात्सल्यरूप आई म्हणतो . स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी असे म्हणतो . आदिमाता , आदिशक्ती म्हणून जिची पूजा करतो , त्याच आईच्या नात्याला इतकं हीन लेखतो आहोत. ज्याप्रमाणे सती जाणं ही एक अनिष्ठ प्रथा होती त्यात तिच्या मनाविरूध्द बळी दिला जायचा त्याचप्रमाणे आईवरुन शिवी ही सुध्दा अनिष्ट प्रथा आहे . यात तिच्या स्त्रीत्वाचा खून होतो. तिच्या सन्मानाला तडा जातो . शिव्या ऐकताना कानावर अत्याचार होतात लाज वाटते.

संताप व्यक्त करताना आणि शिवी देताना समोरच्याला जास्तीत जास्त दुःख कसे होईल ह्याचा विचार केला जातो.

त्याच त्वेषाच्या भरत कोणत्याही व्यक्तीचे सगळ्यात पाहिले आणि जवळचे नाते - "आई" ह्याला ठेच पोचवायचा प्रयत्न होतो आणि अशीच सुरू होते मातृत्वाची उघड चेष्टा!

 अलीकडे स्त्रीवाचक शिव्यांचा वापर तितक्या अतिसंतप्त टोकाच्या क्वचित होणाऱ्या आणि असंस्कृत वादासाठी राहिलाच नाहीये! ह्या शिव्यांचा प्रयोग आपल्या सभ्य समाजात इतका रुळला आहे की सहज गप्पा मारता मारता स्त्रीत्वाचे(आईचे, बहिणीचे) वाभाडे निघतात.

लाज वाटावी अशी भाषा अलीकडे भूषण आणि शक्तिप्रदर्शन म्हणून मिरवली जाते.

हे अधःपतन फक्त मराठी भाषेपुरते नाही , जगभरात सर्व भाषा ह्याला बळी पडल्या आहेत.

एकंदरीत समाज म्हणून आपण आपल्या भाषेसाठी आणि पर्यायी स्त्रीसाठीच्या आदरासाठी अपयशी ठरत आहोत 

कुठतरी बदलायला हवं ! सामाजीक सुधारणा या राजकीय क्रांतीप्रमाणे कधीही एकदम होत नाहीत . सामाजीक सुधारणाची गती मंदच असते. परंपराप्रियता हा कोणत्याही समाजाचा महत्वाचा विषय असतो . त्यामुळे सातत्य व परिवर्तन याचे चक्र फिरत फिरत समाजात बदल होत असतात.


याचाच एक भाग म्हणून ८ मार्च या जागतिक महिलादिनाला वेगळं स्वरूप द्यावं अस वाटतं. हे करण्यासाठी तमाम समाजबांधवांना माझी कळकळीची विनंती आहे. थोडसं अंर्तमुख होऊन विचार करा. शिवी उच्चारण्यापूर्वी तुम्ही थोडसं तरी थांबलात तर नक्कीच तुमच्यातला माणूस जिवंत आहे आणि तुमचे तुम्हालाच पटेल की बापरे हे तर बरोबर आहे . आपण केवढे महापाप करतो आहोत. आणि मग प्रत्येकाने प्रयत्नपूर्वक स्वतःमध्ये हा बदल घडवून आणला पाहीजे, जाणीवपूर्वक बदलायला पाहीजे .

कालातंराने या बदलाला कायद्याचंपण संरक्षण घ्यावं लागेल.  सुरूवातीला काही काळ नैतीक बदलाला द्यावा लागेल . नंतर मात्र काठोर कारवाई करावी लागेल .

सरकारी पातळीवर पण यासाठी अभियान राबविले पाहिजे ज्याप्रमाणे स्वच्छता अभियान , हागंदारीमुक्त अभियान , साक्षरता मोहीम रबविली जाते त्याप्रमाणे शिविमुक्त घर , गल्ली , गाव , तालुका , जिल्हा , राज्य , देश आणि जगभारत या सर्व पातळ्यावर काम करायला हवं . 


“ वुमेन्स ॲट्रॉसीटी ॲक्ट कलम ….. नुसार ” अशा प्रकारची शिवी देणारा दोषी ठरवता येईल या कायद्यात कशी तरतूद करता येईल ?

या कामासाठी तमाम कायदेपंडीतांनी , समजसुधारकांनी , नेते मंडळीनी , विचारवंतांनी सामूहिक प्रयत्न करायला हवेत .

ह्या कायद्याने शिव्या कदाचित पूर्णपणे बंद होणार नाहीत पण किमान समाजाला अंतर्मुख तर करेलच !


सरिता कुलकर्णी 

उपाध्यक्ष 

बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉइज 

युनियन संभाजीनगर युनिट 

मोबाईल नंबर 

 9421607248

Friday, January 2, 2026

निर्भयाचे कुमारवयीन समाजास पत्र*

 *निर्भयाचे कुमारवयीन समाजास  पत्र*


आज जरी तुम्ही शाळेत जाणारे , असलात बालक
तरी उद्या होतालच की तुम्ही , सुजाण पालक
होय रे बाळांनो , चुक पिढ्यान पिढ्याची झालीय
लहानपणापासून खास अशी विचारांची बाळगुटी , द्यायची राहूनच गेली
आख्खं आयुष्य गेलं , ही विचारांची बाळगुटी जमवायला
आता मात्र वारसाहक्कानं वेळेतच ती तुमच्या स्वाधीन करतेय
जरा उशीरच झालाय , माहितीय मला 
मला हेही माहितीय  की , घालमेल चाललीय तुमची 
काय घडतंय आजूबाजूला 
आणि तुम्हांला कावरंबावरं होतांना पण पहातेय मी 
तुमची ही संभ्रमीत अवस्था होण्यास , खरंतर रुढीच आहे जबाबदार
म्हणूनच वेळेत सावध करतेय तुम्हांला 
तुमचं बाळ जन्माला आलं न ,
की लगेचच त्याला ही बाळगुटी द्या
म्हणजे सुदृढ विचारांच , गुटगूटीत संस्काराच ,
ते मुल मोठं केल्याचा 
आभिमान वाटेल तुला
जमलं तर हेही कर
त्याला समजायला लागल्यापासूनच सांगत रहा
तू एक मनुष्य जातीच्या वेलीवर उमललेलं फूल आहेस म्हणून , 
स्त्री आणि पुरुष ,  ही तर निसर्गाची देण आहे म्हणावं 
निसर्गाचा समतोल राखाण्यासाठी ,  विज्ञानयुगातसुद्धा 
त्याची उत्पत्ती , निसर्गच करतो म्हणावं 
तू त्याला धक्कासुद्धा लावू नकोस
असं ठसवंच त्याच्या मनावर
खेळायची आणि हसायची जेवढी मोकळीक देशील
तेवढंच मनसोक्त रडू देत जा त्याला
मुलींसारख मुळूमुळू रडू नकोस , 
असं म्हणत विषमतेच्या बिजाची पेरणी करायची चूक नको करुस 
फुकटच्या पुरुषी विषवल्ली फोफावायला , खतपाणी घालायची पण चूक करायचं कटाक्षांन टाळ
एकएक करत , मुलींभोवती बंधनाचा गोफ विणायची अजिबात चूक करु नकोस ,
होऊदे मुक्तपणे बाळं तुझी मोठी
तुझ्या बाळाला तू , स्त्रीकडे आदराने बघण्याच्या दृष्टीकोनाच्या गुटीचा घुटका देशील ना 
तेव्हा , मोकळा श्वास घेतल्याचा भास होईल तुला
सध्याच्या बरबटलेल्या मानसिकतेतून , ओरबाडणाऱ्याच्या तावडीतून , येणाऱ्या पिढीला मुक्त केल्याचा विश्वास वाटेल तुला 
त्याला सांग , तुला आई आहे , बहिण आहे , आजूबाजूच्या मुलीबाळींचा सन्मान राख म्हणावं .
तुझं बाळ कोणीही असूदे , मुलगा किंवा मुलगी
प्रेम , माया , शिक्षण , संस्कार 
वाटण्यासाठी दोघांसाठी एकच माप ठेव म्हणावं 
आगरकरांच्या म्हणण्याप्रमाणे होऊदे शिक्षणाचे लोकशाहीकरण
आणि होऊदे
सावित्रीच्या पाठी उभे रहाणारे जोतिबा घरोघरी तयार
अंधानुकरणाच्या खोट्या खोट्या दुनियेत फार रमू नकोस म्हणावं
आयुष्यातील महत्त्वाचा वेळ तिथे वायाच जातो म्हणून समजून सांग त्याला
आपल्या देशात मोठमोठे साहित्यीक , समाजसुधारक , क्रांतिकारक , विचारवंत होऊन गेलेत , त्यांची ओळख करुन द्यायला त्यांना वाचायला भाग पाड त्याला .

कॉ. सरिता कुलकर्णी 
मोबाईल  9421607248
saritakulkarni67@gmail.co.in

 ---------------------------------------------