Sunday, November 22, 2020

लाॕकडाऊन डायरी पुर्ण

 

 लाॕकडाऊन डायरी प्रकरण 1


भाग 1 ते 5



भाग 1 ला


 
कोरोनाचं संकट आणि नविन नात्याची गुंफण  , कुटुंबातील वाढता आपलेपणा



धुमधडाक्यात आशिषचं ( मनिष / मनू ) लग्न होऊन आता दीड महिना होऊन गेलाय. अजुनही रोज वेगवेगळे आणि तेचतेच फोटो पहाणं , video पहाण कोणत्याही नातेवाईकाशी किंवा स्नेह्याशी लग्नाच्या गप्पा मारणं आणि तीच मधुर चव जिभेवर रेंगाळणं सुरुच आहे. त्यांचा नविन संसार पहातांना ऐकतांना काही होत असलेली फजिती ऐकतांना मन एकदम 30 वर्षे मागे जातं आणि फिल्म रिवाईंड होतेय असं वाटतं. थोडा पिढीतला बदल बाकी नाविण्याचा अनुभव तोच की !!

सगळे आपापल्या ठीकाणी गेले आहेत. आकांक्षाचा क्लास पण जोमानं सुरु झालायं . काका-काकीपण ( सासू-सासरे )  6 महिने बार्शीला राहिले त्यांना परांड्यात थोडे दिवस जावस वाटलं म्हणून त्यांना  परांड्याला सोडून आम्ही पण 8 दिवस पुण्याला जाऊन घरात सगळ कमी जास्ती पाहून रूटीन चालवता येईल असा आशिष-कीर्तीचा नविन संसार लावुन आलो . लग्नानंतर एक महिन्यानंतर येतीजाती व मामेभावाच्या मुंजीचं गृहमख यासाठी ते दोघे मिरजेला जाऊन आले. कीर्तीचे आई-बाबा पण लेकीचा संसार आगदी धावती भेट देऊन पाहुन गेले. डिसेंबरपासून यांच पण शेताकडे लक्ष नव्हते .कलिंगडं मिरच्या लावल्यात त्यांनी पण आता शेताकडे मोर्चा वळवलाय. सगळ्यांच छान रुटीन सुरु झालय.
     आता पाडव्याला नविन वर्ष सुरु होतेय . पहिला सण . कीर्तीला छानसा पांढरा ड्रेस शिवायला ज्योतीला सांगितले . आकांक्षा पाडव्याला यायला जमणार नाही म्हणाली पण आशिष-कीर्ती व काका-काकी येतील. चला मग आपण 6 जण करु पाडवा. सगळी तयारी व्यवस्थित करु बायका तर सगळ्या सांगून ठेवल्यात . मंगळागौरीचं नियोजन पण आत्ता केलं तरच ललिता , संस्कार-भारतीचा ग्रुप ठरवता येईल. तसं बार्शीला दुसरी मंगळागौर करावी असा मानस मी विहिणबाई व कीर्तीला बोलुन ठेवलाय पण ती पाडव्याला आली की प्रत्यक्षात बोलुन ठरवता येईल. आत्ता तिच्या डोक्यात पाडव्याला कायकाय घालावं ? दोन मैत्रीणींची लग्न आहेत त्याला काय घालाव याचं प्लॕनिंग चालु आहे .बार्शीला आली की माझा सगळा खजाना बघ आणि ठरव काय काय हवं ते असं तिला सांगायचं असं मी ठरवलंय .
           आता पुण्यात त्या दोघांचही रुटीन चांगलं सुरु झालय . पुण्यात कीर्तीला विचारुन स्वयंपाक करायला कुवळेकर काकुनां लावल तसं सकाळच्या स्वयंपाकापुरते फक्त लावाव व रात्रीचे मी घरी करेन असं कीर्ती दबकत दबकत म्हणाली पण तिला आता नारायणबागेतून जा-ये करावी लागेल तस लांब होतय , बऱ्यापैकी पैकी मोठा ब्लॉक , नविनच लग्न झालेले , शिवाय मोठी रजा झाल्याने आॕफिसमध्ये साठलेली कामे हे सगळंच एकदम अंगावर पडले तर आजारी पडेल आणि तिला कितपत जमते माहीत नव्हते उगाच तिची दमछाक व्हायला नको , लग्न झालं म्हणजे नोकरी करणाऱ्या मुलींनी घरकाम करत सुपर उमनचा रोल करावा या मताशी मीच सहमत नाही म्हणून मीच कुवळेकर काकुंना दोन्ही वेळेचं ठरवून आले. जेमतेम तीन आठवडे व्यवस्थित चालले असेल अचानक कुवळेकर काकुंचे सासरे आजारी पडले म्हणून त्या गावाला गेल्यामुळे स्वयंपाक करण्याचं कीर्तीला काम सुरु झालं . फारशी सवय / सराव नसल्यामुळे तिची दमछाक व्हायला लागली . चारपाच दिवसांनी वरकामाच्या मोहिते काकु पण गावाला गेल्या आणि या दोघांचीही फाजिती व्हायला लागली . काय करावं मनूला पण कळेना . सकाळ संध्याकाळ फोनवर काहीतरी सांगावे आणि प्रायोगिक तत्त्वावर वन डिश त्यांनी कराव असं होऊ लागलं . तसं adjust करायचा दोघांचापण प्रयत्न चालू होता. त्यादरम्यान भारतात कोरोनाचा प्रसार होऊ लागला. पुणे शहर रडारवर आलं . या दोघांचीही कामे घरुन सुरु झाली .आकांक्षाच  Cdac खूप जोमात सुरु होतं मुळात तिला नारायणबागेत राहायचं नव्हतं तिचं म्हणणं होत आत्ताच त्यांचं नवीन लग्न झालय तर करु दे त्यांना एन्जॉय तुम्ही मला तिथे राहायचं सांगू नका आधीच दादा वहिनी इथेच रहा म्हणून मागे लागले आहेत त्यांना त्यांची स्पेस राहूदे आणि मला पण मैत्रिणींबरोबर बॅचलरपणा एन्जॉय करु दे . तशी ती लाघवी आहे पण स्वतंत्र मतवादी आहे . स्वतः कोणाला त्रास देणार नाही मग तशीच अपेक्षा समोरून ठेवते ती . सध्या तिला सीडॅक सारख्या हेक्टीक कोर्सचे निमित्त पण होते मग ती म्हणायची 
" मला कशात गृहीत धरु नका सहा महिने . "
आणि तिने हिंजेवाडीत राहणे पसंत केले तिकडे सामान शिफ्ट केले आणि तिच्या मनाप्रमाणे तिचे रूटीन सुरू झाले होते . तिचे म्हणणे पण बरोबर होते तिला जायला यायला वेळ पण खूप लागला आता शिवाय प्रचंड अभ्यास तिला सगळ करण शक्य नव्हत . पण कोरोनाचा प्रादुर्भाव इतका वाढला की आकांक्षाला 15 ते 25 मार्च क्लासला सुट्टी दिली गेली . पुन्हा बार्शीला यायचं तर प्रवासाचा धोका नको म्हणून सर्वांच्या आग्रहाखातर ती पण नारायणबागेत रहायला आली. आता घरात कामाला कोणीच नाही आणि या तिघांच घरुन काम आणि घरातल काम असे बऱ्यापैकी सुरु झालं . आकांक्षा आल्यामुळे कीर्तीला थोडसं हायसं वाटलं तिला आकांक्षाची मदतच होऊ लागली . मनिष पण म्हणू लागला जरा जमतय व्यवस्थित म्हणून . 
इकडे कोरोनाच्या उलटसुलट बातम्या कानावर पडू लागल्या . सतत नवनव्या घोषणा होऊ लागल्या आणि 31 मार्चपर्यंत बऱ्यापैकी एकएक बंदचा फतवा निघाला . कलिंगड्याची तीन महिन्याची मेहनत , खर्च केलेले फळ हातातोंडाशी आलं आहे . आणि अशी परिस्थिती त्यामुळे ह्यांची अस्वस्थता वाढलेली. आता काय करावं हा यक्ष प्रश्न ! 
      तस आता पाडव्यासाठी आशिष-कीर्ती बार्शीला येणारच होते. आकांक्षाला पण 31 पर्यत सुट्टी घोषीत झाली. म्हणून 18/19 मार्चला मी आशिषला तुम्ही तिघेपण 21 तारखेला बार्शीला गाडीतून या व पाडवा झाल्यावर 31च्या आधी परत जा असं सांगितले . तसं ठरल सुद्धा ! पण  20  तारखेला दुपारपासून खुप उलटसुलट बातम्या  ऐकायला यायला लागल्या संचारबंदी करताहेत , फिरु देत नाहीत आणि दुपारी आशिषचा फोन आला आम्ही येत नाही  . पंधरा दिवस पुरेल एवढा किराणा आणतो आणि तिघेजण इथेच रहातो. मला खुप भिती वाटली . यांना पाचसहा दिवस इतके त्रासदायक गेलेत समजा इतर देशासारखं लॉकडाऊन झालं तर काय करावे . नकोनको ते विचार घोंगावु लागले. हे चीनने मुद्दाम केल आहे. काय कराव आपण इथे मुलं तिथे . तसही 22 तारीख कर्फ्यु जाहीर केलाय. मी माझी चिकाटी सोडली नाही काहीही कर उद्या येता येत नसेल तर आज पाच वाजता निघा रात्री दहापर्यंत घरी याल असं सांगितले . इकडे बँकेत पण 50% लोकांनी बँकेत यायचं असं सर्क्युलर आल . मी 23/24 आॕफ घ्यायचं ठरवलं आणि घरी आले . आशिष येत नाही म्हणायचा मी यायचा आग्रह करायचे . दोन्ही जिल्ह्याच्या ओळखीच्या पोलिसांना फोन लावले . त्यांनी प्रवासात काही अडचण येणार नसल्याचे सांगितले . दोन्हीकडे वातावरण तंग झालं . रात्री 8 वाजता आशिषचा त्रोटक फोन आला
" आम्ही सकाळी लवकर निघतो , येतोय बार्शीला  ". 
आणि जीव भांड्यात पडला. डोक्यात अनेक विचार येऊन गेले. तिसरे महायुद्ध होईल का ? पुणे धोकादायक आहे का ? काही असो चिडचीड करतील पण डोळ्यासमोर असतील आठवडाभर मग वातावरण निवळलं की जातील . असो पाहुयात.
शनिवारी मी बँकेत आले आणि हे तिघे सकाळी 7 वाजता गाडीतून पुण्याहून निघाले . तासातासाला कीर्ती मेसेज करत होती. 11 वाजता घरी पोहोचलो असा मेसेज आला आणि निवांत वाटलं . इकडे ठरवल्याप्रमाणे पाडव्याची काहीच तयारी केली नव्हती काका-काकींना  सोमवारी आणायचं ठरलं . रविवारी उडीद वड्याचा बेत ठरला . कर्फ्युमुळे सगळे घरीच असणार होते.रविवारी दिवसभर आशिष फुगलेला होता.
" तु हट्टी आहेस "
असं मला म्हणत होता . चुक की बरोबर कोणालाच कळत नव्हते . कीर्ती आणि आकांक्षा आम्हांला मध्ये घेऊ नका असं म्हणत होत्या . हळुच झालं असतं पुण्यात मॕनेज , आम्ही सामान आणलं होतं असही म्हणत हसायच्या. कीर्ती मात्र पुण्यात स्वयंपाकाची उडालेली धांदल आणि खाण्याचे झालेले वांदे लक्षात घेऊन आपल्याला कामापुरते आलेच पाहिजे असे ठरवून 
" काहीही करून मला जुजबी स्वयंपाक शिकवाच किमान आकांक्षा करु शकते तेवढं तरी मला आलाच पाहिजे " 
असे मला स्पष्टपणे सांगून लक्ष देऊन चिकाटीने उडीद वड्याच्या मागे लागली . एव्हाना कीर्तीला स्वयंपाकातील फारसे येत नाही जुजबी येत असावे हे माझ्या लक्षात आलं होतं असेल तिची तयारी , इच्छा तर मला शिकवायला आवडेलच . मला हेही जाणवले  की थोडफार आपल्याला जमलच पाहिजे हा तिने निश्चय केला होता . रात्री तर मी हॉलमध्ये बसायचं आणि ती वडे करणार आणि आम्ही वडे खायचे असं सांगण्या इतपत तिचा आत्मविश्वास  वाढला. आणि आता पुण्यात मी एकटी वडे करणार हे तिने जाहिर केलं . मिरजेत आईला उडीदवड्याचं पात्र आणून ठेवायला फोन झाला. 
22 तारखेचा कर्फ्यु वाढत त्याच रुपांतर 21 दिवसांच्या  लाॕकडाऊन मध्ये झालं . पुन्हा एकदा इतकी भिती वाटली बापरे आपलं सगळं पार पडलं . ही पोर कुठ लांब दुसऱ्या टोकाला न्युझीलंडला जाऊन पंधरा फेब्रुवारीला परत आली . समर्थांचीच कृपा म्हणाव लागेल . नाहीतर काय खरं होतं . पुराचा साखरपुड्याचाच अनुभव होता . देवा तुझीच कृपादृष्टी म्हणावी लागेल . आता मात्र आशिष-कीर्ती आकांक्षा तिघेपण हसायला लागले बरं  झालं बाबा बार्शीला आलो ते . नाहीतर अडकलो असतो तर काय करावे समजले नसते. मग कीर्ती हळुच म्हणते 
" आपण बार्शीला जाऊ असा निर्णय मीच घेतला ". 
मग पहिला नंबर माझा न दुसरा तिचा असं म्हणत हशा पिकला , आशिषचा राग कुठल्या कुठे पळून गेला . असो , इकडे मात्र  काका-काकी परंड्यात आडकले. आम्ही पाच जणं बार्शीला ! तसं फारशी काळजी करण्यासारखं नव्हते गरज पडलीच तर अर्ध्या तासात पोहोचु एवढ्या अंतरावर आहेत . फक्त कामाला बायका यायला पाहिजेत आणि त्यांची औषधे वेळेवर पोहोचली पाहिजेत . तसही ते बाहेर जात नाहीतच . शेताकडची चिंता मात्र सतावु लागली काहीच मार्ग निघत नव्हता  . पण परिस्थितीच अशी निर्माण झाली की कोणीही काहीही करु शकणार नव्हते. फक्त  बार्शीला घरात मात्र सगळे एकत्र , अगदी ठरवुनसुद्धा आम्हांला कुठेच इतके दिवस एकत्र रहाणे शक्य नव्हते ते साध्य झाले या बंदमुळे ! हा एक प्लस पॉईट होता . तो असा गप्पा मारत सगळ्यांना पटला . मग ठरवलं की ही आपल्याला मिळालेली संधी आहे त्याचा योग्य वापर करु. नविन सून जवळ रहाणं कोणाला नको असतं . मनं जुळायला तर ही सुवर्णसंधीच म्हणावी लागेल . तसं आकांक्षाच तिच अगदी मैत्रीचे नात झालय चला आता कुटुंबातील एकरुपता आपोआपच वाढणार शिवाय त्यांची आॕफिसची कामं घरुन चालूच रहाणार होती त्यामुळे ठीक आहे. पुण्यापेक्षा बार्शी केव्हाही चांगल . मोकळी हवा, मोठी जागा , घरात माल भरलेला आहेच आनंदानं दिवस घालवु . फक्त थोडेसे पाणी जपून वापरावे लागणार आणि इकडचा उन्हाळा !! पाहू.  आहेत कुलर करु काही मॕनेज ! पण मुलं बार्शीला आली आहेत म्हणल्यावर सगळ्यांनाच हायस वाटलं . विहिणबाई तर फोन करुन म्हणाल्या 
"एकीची तरी काळजी मिटली बार्शीला आलेत म्हणल्यावर अगदी निर्धास्त झालो आम्ही . केतकीचा इलाजच नाही पण काळजी वाटते ".
कीर्तीला पण बाबा आणि केतकीची खूप काळजी वाटायची . पण काय करावं. 
    तसा पुण्यात कीर्तीला आठदहा दिवसांचा घरकामाचा चांगलाच अनुभव आला होता. त्यामुळे तिने स्वयंपाकघरात पुर्ण लक्ष द्यायचं आणि सगळं शिकुन घ्यायचं हा चंगच बांधला . दुसरे दिवशी ईडली झाली , मग घावन , की लगेच पाडवा आला . ललिताला  येऊ नको म्हणून सांगितले . मंदा शोभाला सुट्टी आणि आमचा पुरणाचा बेत ठरला ! घरात मात्र सगळेजण काम करत होते अगदी झाडून काढणं , भांडी घासणं , फरशा पुसणे , धुणं धुणे सगळ्या कामात मदत होती. अभ्यासामुळे आकांक्षाला वेळ कमी मिळत होता तरी लुडबुड आसायची.
    सकाळी लवकर उठुन आहे त्यात धुतवस्त्राने सगळं करायचं ठरलं . छान आवरुन गुढी उभी केली आणि पुरण सुरु झालं . कीर्तीने स्वयंपाकघर सोडलं नाही . सगळ्या कामात मदत आणि निरिक्षण सुरु होतं तिचं . तिचा स्वभाव , सवयी, चिकाटी मुख्य म्हणजे मानसिकता बऱ्यापैकी आकांक्षाशी मिळत्याजुळत्या वाटल्या मला. त्यामुळे तिला टिप्स द्यायला अवघड नाही गेलं . सगळं करत असलेले फोटो न video सगळीकडे पाठवत होते. सगळे खुष आणि कौतुकाचा वर्षाव त्यामुळे ती पण खुष . पुरणाचा स्वयंपाक तिला मी दोन टप्प्यात शिकवला  . पाडव्यादिवाशी पुरण आणि एकदोन दिवसांनी फक्त पोळ्या करण्याची training . मला खात्री होती ती करेल याची. पण जेव्हा  भरपूर पुरण घालून केलेल्या पोळ्या टुमटुम फुगल्या तेव्हा सगळ्यांना खुप आनंद झाला तिचा तर आनंद गगनात मावेना . 
" माझी बायको सुगरण "
असे म्हणत आशिष तर नाचायलाच लागला. सगळ्यांकडून सुगरणपणाची पावती मिळाली. कीर्ती खुष!!!
मला खात्री होती आजकालच्या मुली जिद्दी असतात . ज्या मुली एवढं उच्च शिक्षण घेतात , अभ्यास करतात त्या जिद्दी असतात काहीही शिकू शकतात ही शिकणारच ! फक्त करण्याची तयारी असली पाहिजे . मानसिकता असली पाहिजे . 
" पाककला काही सोपी नाही पण अवघड मात्र  मुळीच नाही करणाराला ती जमतेच "
तुम्ही रोज करु नका पण यायला पाहिजे हे माझं वैयक्तिक मत आहे . कारण 30 वर्षांचा माझा अनुभव आहे जरी सगळ्या कामाला बायका असल्या तरी त्यांची सुट्टी कधी असेल सांगता येत नाही त्यावेळी इतर कामे केली नाहीत तरी चालतील पण पोटात चार घास गेलेच पाहिजेत त्यासाठी ते स्वतःला येणं गरजेचं आहे 
आणि कीर्ती जिद्दीने शिकणार आणि करणारच अशी खात्री होती . मुख्य म्हणजे तिच्या बाबांच आणि पप्पांच अगदी लक्ष देऊन विचारणा करणे , दाद देणे सुरु होते. आई , आजी , सगळे फॕमिली ग्रुप अगदी तोंडभरुन कौतुक चालु होत !! 
आता रोज घरची सगळी कामं आणि काहीतरी नविन पदार्थ खायला करणे यात खीर , भजी , मिसळ , सांजा , मलिदा , कोथिंबीर वडी , भाताचे विविध प्रकार ,  वरणफळं , उकडशिंगोळे , पाकातल्या पुऱ्या , पाणीपुरी भेळ.........आणि बरच काही !! आजून ढोकळा , एकदा कीर्ती स्पेशल पुरणाची trial , खव्याचे पदार्थ व्हायचे आहेत.  वेगवेगळ्या भाज्या रोजचा खाण्याचा नविन बेत आणि संध्याकाळी आशिष-कीर्ती आकांक्षा तिघांनी टेरेसवर जाणे फोटो काढणे , पेटी वाजवणे , ब्रम्हविद्या , टीव्हीवर  30 वर्षांनी पुन्हा रामायण महाभारत सुरु झालं. ते सगळ्यांनी एकत्र बसून पहाणे कॕरम खेळणे असं रुटीन सुरु झालं . सगळे एकत्र बसले की हशा पिकतो पण समोर टीव्ही वर करोनाच्या बातम्या पहिल्या की सगळे शांत होतात . प्रत्येकाच्या मनात भविष्यात काय होणार ही भिती आहेच. विशेषतः आकांक्षाच मन थाऱ्यावर नाही काय होणार ? असं वाटत तिला . आपल आजून काहीच झालं नाही ही काळजी वाटते तिला . माझं बीई आता सीडॅक झालं की चांगला जॉब मिळेल मग मला थोडंसं कला क्षेत्रात , अभिनय क्षेत्रात काम करायचं आहे आणि हे वैश्विक संकट आले आहे किती दिवस खाते कोण जाणे . माझे दिवस वाया जातात असे ती म्हणत असे तसे तर घरात बसून कामाला सगळेच कंटाळून गेलेत . डांबून घातल्यासारखं होतेय . सारखे हात धुवा बाहेरून काही आणले की संशयाने पहा. मला आता रोज बँकेत जाव लागतेय कधीकधी खूप भिती वाटते आपण बाहेर जातोय लोकांच्या , नोटांच्या संपर्कात येतोय पुन्हा मनाची समजूत घालायची शक्य तेवढी काळजी घ्यायची  व कामाला लागायचं . इकडे कीर्तीची चुळबुळ सुरु झालीय . अत्यावश्यक सेवेत आम्हाला समाविष्ट केलेय काय कराव लागेल माहित नाही म्हणते. ती आणि आकांक्षा आपापले रुटीन कधी सुरु होईल याला अधिर झाल्या आहेत. त्यांना काहीही वाटू देत . पुर्णपणे सुरक्षित वाटल्या शिवाय मी काही परवानगी देणार नाही मनिष आणि हे पण असंच म्हणतात रुटीन सुरु व्हाव असं तर सगळ्यांनाच वाटतेय. पण परिस्थितीच गांभिर्य पाहून निर्णय घ्यावे लागतील .
मी तर विचार करते की माणसाला किती गोष्टी ठरवुन ठेवायचा सोस असतो पण भविष्याच्या उदरात काय दडलय हे कोणालाच कळत नाही हे खरं . सगळ्या गोष्टी  आपल्या हातात नसतातच. विधात्यांने कशाचाच अंत लागू दिलेला नाही. परिस्थिती मुळ पदावर यायला किती काळ लागेल हे आत्ता तरी सांगू शकत नाही. हे कळायला पण थोडी प्रगल्भता यावीच लागते की . आणि वयाप्रमाणे असणार यात वाद नाही.
काहीही असो मी तर सध्या खुष आहे . नेहमीच सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे गरजेचे आहे . आहे त्यात समाधान शोधले पाहिजे. अर्धा ग्लास भरलेला पहायचा का रिकामा पहायचा हे ठरवणे ज्याच्या त्याच्या मनोवृत्तीवर अवलंबून आहे . पण परिस्थितीला आपल्यावर आरुढ होऊ न देता परिस्थितीवर मात करता आली तर जिवन यशस्वी होऊ शकतं हे नक्की !!!
आज आता 7  एप्रील आहे. लॉकडाऊनचे पंधरा दिवस संपलेत रोज नविन अनुभव येतोय . सकाळी आॕफिसच्या कामाची सुरुवात करण्यापुर्वी कणिक तिंबणे , कमीतकमी  पाचसहा पोळ्या करणे , नाष्टा , भाजीत मदत करणे हे करायचच असं  कीर्तीने ठरविले आहे. तिने इतकं मनावर घेतलं आहे तर मग रोज थोडथोड सांगत रहायचं शिकवायचं असे मीही ठरवलंय . पाहु आता किती दिवस रहायला मिळते. सहवास घडतो ते. आणि रोजचा अनुभव काय येतो लिहीत राहू.


क्रमशः  भाग 2



    प्रत्येक आईला आपलं मुल गुणी वाटतच पण खरंचच आशिष गुणी मुलगा आहे . फक्त थोडासा आळशी आहे.  पण या करोनाच्या परिस्थितीत आपण बार्शीला आहोत ही त्याच्यासाठी आता समाधानाची गोष्ट आहे मुख्य म्हणजे निश्चिंत असल्याचे वाटतंय असं म्हणतो .  कामाची तशी फारशी सवय नाहीच आणि जवळजवळ तेराचौदा वर्षे झाली एकटाच रहायची सवय झालीय त्यामुळे कुटुंबातील शिस्तबद्धता जरा त्याला टोचतीय . तरी पण सध्या घरात दिसत असलेल्या कामात खारीचा वाटा उचलायची तयारी तरी नक्कीच आसते. WFH मुळे त्याच काम जोमात चालू आहे हा पण मुद्दा महत्त्वाचा आहे. पण एकूणच नविन जोडप्याचा घरातील वावर खुप मस्त वाटतो. आपणच दहा वर्षांनी लहान झाल्यासारखे वाटते.घरात  खळखळुन हस्याचे फवारे उडतात . घरात तरुणाईचा वावर मनाला प्रफुल्लीत करतो हे खरं!!
     आता सगळेजण एकत्र रहायला लागून पंधरावीस दिवस होऊन गेले. सगळच रुटीन चेंज झाल आणि हे नविन रुटीन साधारणपणे रोजचं तेच आता सुरु झालं. मला पण घरकामाची तितकीशी सवय नाही . कीर्तीला तर हे सगळ नविनच आहे . पण आता पर्याय नाही करणे क्रमप्राप्त आहे म्हणतो आणि पुन्हा हसत कामाला लागतो  . उद्या काय करायचं यावर रात्री चर्चा होते. सकाळी नाष्टा , पोळी-भाजी दुपारी सरबत , कलिंगडं काहीतरी चाणाचुणा व रात्री one dish meal यावर सगळीकडुन शिक्कामोर्तब झालय.
       सकाळी छान कणिक मळणे आणि चारपाच पोळ्या करणे हा कीर्तीचा निश्चिय आहे त्यामुळे विवीध आकाराचे नकाशे , पापड ते लुसलुशीत गोल टुमटुमीत फुगलेली पोळी असं तिचं स्वतःच निरिक्षण नोंदवत खुषीत सकाळी कट्ट्याजवळ तिचा अर्धा तास जातो . यात एखादा चहा करणे मग नाष्ट्याला भाजीला थोडी मदत आणि गप्पा असतात . ती स्वतःशीच खुष असते खुप कमी वेळात बरच काम होतय असं तिचं म्हणण आहे . आणि प्रत्येक पदार्थाला आशिषकडुन 
"माझी बायको सुगरण " 
म्हणत मिळणारी मिठी तिला खुष करते.  
"practice makes man perfect  " 
हे इथे लागु होतं असं मी सांगितले आहे तिला . सासु डबा बाटली घेऊन आॕफिसला जाते. सासरेबुवांची घरकामात बऱ्यापैकी मदत मुख्य म्हणजे रोज न चुकता दुपारी कलिंगडं चिरुन बीया , साल काढुन मोठ्या डब्यात फोडी करुन ठेवायच्या आणि भरदुपारी प्रत्येकाने गारेगार डीश भरुन खायच्या . एखाद्या दिवशी कोरडी भाजी दिसते किंवा पालेभाजी दिसते की जी कीर्तीला फारशी आवडत नाही पण तिने खाणार म्हणून सांगितले आहे तर तिला जोडीला काहीतरी तिच्या आवडीचे असले पाहिजे म्हणून त्यांच्या बॕचलरपणातला रविवारचा मस्तपैकी कोशिंबीरीचा बेत करायचा आणि त्या चौघांनी ताव मारायचा मला मेसेजेस करायचे असं काहीसं मजेशीर चीत्र आहे सध्या घरात . आम्ही त्याचा पण आनंद घेतोय .
       ह्यांना तसे आकांक्षाविषयी पहिल्यापासून वेगवेगळे विचार मुख्य म्हणजे काळजी वाटत असते पण अशिषचे लग्न झाल्यापासून कीर्ती घरात आल्यापासून एक दिवस आपल्या आकांक्षाचे पण लग्न होणार आणि ती पण आपल्याला सोडून जाणार . ती तर एवढी नाजूक आहे लहानपणापासून तिने आपल्याला किती जीव लावला आपण तिला कशी लहानाची मोठी केली आहे , ती खूपच नाजूक आहे , हळवी आहे , तिच्यात अतिशय सच्चेपणा आहे ,  ती खूप हुशार आहे मुख्य म्हणजे स्वतंत्र मतवादी आहे पुढे तिचे कसे होणार तिला फुलासारखे जपणारे सासर मुख्य म्हणजे तिला जोडीदार मनाजोगता मिळाला पाहिजे असे अनेक विचार त्यांच्या मनात सुरू असतात मग काळजी फार वाटत असते त्यांना . माझ्याशी बरेचदा बोलताना ते जाणवत असते माझीही भावना तशीच असते फारशी वेगळी नसते पण इतकं हळवे राहून कसे चालेल ते पुढे अवघड जाईल म्हणत मीच त्यापासून त्यांना परावृत्त करत असते त्यांना नेहमी सांगत असते 
" जसे जगात होते तसेच होणार पण आजकाल पूर्वीसारखे कुठे राहिले आहे . लोक समंजस असतात सर्वांना समान वागणूक असते . मुख्य म्हणजे ती स्वतः शिकलेली आहे , खंबीर आहे त्यात काळजी करण्यासारखे काही नाही ."
मी असे बोलले की त्यांना थोडासा धीर येतो ते तिच्या बाबतीत पहिल्यापासूनच खूप हळवे आहेत बापलेकीचे नाते तसेच असते . आता कीर्ती घरात आल्यापासून त्यांना तिचीपण फार काळजी वाटते तिला आपल्या घरात कसे वाटते आपलेपणा वाटतो का , माहेर ते माहेर असतेच पण सासरी पण तिला काही कमतरता वाटत नाही ना याची ते सतत खबरदारी घेतात कुठेतरी आकांक्षाशी तिला रीलेट करतात हे मला पण जाणवते . त्याचा मला पण आनंदच होतो वाटते चला आपल्या घरातील प्रत्येक मेंबर कीर्तीचा वेगवेगळा पण चांगला विचार करतात काही हरकत नाही ती आपल्यात छान रुळेल अशी खात्री पटली आणि प्रत्येकाने आपल्याला वाटेल तसे वागावे कोणीच कोणालाही कोणताच सल्ला देऊ नये नैसर्गिक रित्या प्रत्येकाची नाती फुलू द्यावी तरच घर आणि घरातील नातेसंबंध सुदृढ राहतील हे नक्की !
    तश्या आम्ही पाचजणी बहिणी त्याही मागच्या पिढीतल्या पण आम्हाला आमच्या आईकाकानी हे कुठे जाणवू दिले नाही . लहानपणापासूनच मुलगा मुलगी समान ह्या मानसिकतेत आम्ही मोठ्या झालो तेही आमच्या आई वडिलांच्या विचारधारेमुळेच . त्यामुळेच आम्ही सर्व बहिणीपण स्वतंत्र मतवादी आहोत मुख्य म्हणजे आमचे सगळ्यांचे जोडीदार पण तसेच आहेत त्यामुळे सासर माहेर असा भेदभाव कधी मनात आला नाही आणि वागणूकही तशी कुठे मिळाली नाही त्याच पद्धतीने काकांचे सर्व जावई त्यांच्या शेवटपणापर्यंत आगदी जबाबदारीने वाढले त्यामुळे आमच्या सर्व नातेवाईकांमध्ये सगळेजण आमच्या आईकाकाना नशीबवान म्हणतात . पण त्यांनीही जावयांना तितकेच प्रेम दिले आणि जबाबदारीने समजून घेतले . त्याच संस्कारात आमच्या मुलांची जडणघडण झालेली आहे . सासुरवाडी आणि जावई म्हणजे काही फार वेगळे वागायचे असते असे कसले विचार आमच्या घराण्यात कोणाच्याही मनाला शिवले नाहीत . त्यामुळे कीर्तीला आमच्याकडे मिक्सअप व्हायला जड जायचे कारण नव्हते ही झाली माझी मानसिकता तिला तसे वाटण्यासाठी थोडा वेळ तर द्यावा लागेल . तसे तिला लग्नापूर्वीच दोन अनुभव आले एक बाबांचे मिरजेत अडमिट होणे आणि त्यावेळी आशिषने मागचा पुढचा विचार न करता मिरजेत राहणे आणि साखरपुड्यानंतर कीर्तीचे पुण्यात आजारपण त्यात आकांक्षा आशिषने घेतलेली तिची काळजी . या दोन्ही प्रसंगानंतर कीर्तीच्या आई तर फारच निश्चिंत झाल्या होत्या त्या म्हणाल्या 
" मला तर आशिष माझ्या बहिणीची मुले वागतात तसच वागल्यासारखा वाटलं  , माझी फार इच्छा होती की आमचा जावई आमच्या घरातील मेंबर असावा त्याच्या वागण्यात त्रोटकपणा , पाहुणेपणा नसावा . कौतुक तर आम्ही करणार त्यात वाद नाही पण वागण्यात आपुलकी असावी आणि ती आशिषमध्ये मला जाणवली . एकमेकांना आधार वाटावा दुसरे काही नाही ".
मी त्यांना सांगितले 
" तुम्ही त्याबाबतीत निश्चिंत रहा , तो तुमचा जावई आहे पण तुम्हाला त्याच्या वागण्यात जावईपणा कधीच जाणवणार नाही . आणि रीती वगैरे आम्ही मनात नाही आम्हाला फक्त माणुसकीची रीत माहीत आहे ."
त्यावर त्या अगदी निश्चिंत झाल्या होत्या आणि जसजसे दिवस जात होते ओळख वाढत होती तसतशी त्यांना त्याची प्रचिती येत होती . आयुष्यात येऊन शेवटी मिळवायचे काय आहे असा मी विचार करते .


क्रमशः  भाग 3



दिवसेंदिवस कोरोनाचे बाधित वाढतच होते त्यामुळे लाॕकडाऊन अजुन 30 एप्रील पर्यंत वाढण्याची शक्यता होती. एकूणच सामाजिक परिस्थिती अवघड होत होती . इकडे बँकेत जनधन खात्यावर 500 रु. जमा झाल्याने बँकेत गर्दी वाढत होती . ते तरी काय करणार हातावर पोट असणारे लोक होते ते. काम बंद पैसा नाही. शेतकऱ्यांचे वेगळेच हाल ! कवडीमोल भावात पिकवलेला माल जात होता . रोजचे कस्टमर खुप कमी यायाचे बँकेत . मेडीकलवाल्यांचा फक्त रोज भरणा आसायचा . एक दुधाचा व्यापारी सांगत होता 25 जनावरं  आहेत घरी 100 लिटर दुध रोज ओतुन द्याव लागतं . जनावरांना चारापाणी तर द्यावे लागतेच वर स्वच्छता रोज धारा सगळं करावे लागते. काय करणार  ? मला पण रोज से मास्क , हँडग्लोज , स्टोल घालून सगळ्या तयारीनिशी बँकेत जायच , उन्हाळ्याच्या झळा होत्याच , चहा नाही , सारखे हात धुवायचे सँनिटायझर वापरायचं घरी आलं की सगळं धुवायचं डोक्यावरून आंघोळ अशी कामापेक्षा इतर कामच खुप झालं होतं . पण हे सगळं करणं क्रमप्राप्त होतं . आख्ख जगच जागेवर थांबलय आपण काय करावे. 
      इकडे घरातलं बऱ्यापैकी रुटीन सुरु आहे . तीन आठवडे झालेत . त्याचत्याच भाज्यांचे पुन्हा पुन्हा नंबर आले की ती कीर्तीने  एकटीने करायचं मी खुर्चीवर बसुन फक्त पहायचं हा नियम होऊन बसला .
परवा भाकरी करायचा बेत ठरवला . यापुर्वी मीच भाकरी केव्हा केली हे मलाही आठवत नव्हते . पण करायचं ठरवलंय . कारण खुप कामे हल्ली केलेलीच नाहीत विसरल्यासारखं झालय . परावलंबीपणा खुप वाढालाय . पण त्याला इलाजच नाही . सगळं स्वतः नाही करु शकत . पण घरकाम उरकत नाही . खुप वेळ लागतोय कामाला . दमायला होतय . परवा मला वाटलं की ही कामं करणाऱ्या लोकांचे पांढरपेशा वर्ग शोषण करतोय . आपला त्यांचाकडे पहाण्याचा दृष्टिकोन चांगला नाही . त्यांचे कष्ट आणि त्यामानाने दिला जाणारा मोबदला खूप कमी आहे पुर्ण महिनाभर भांडी घासली तर 500 ते 900 रुपये दिले जातात . तेही भौगोलिक परिस्थितीवर अवलंबून आहे . पण मला वाटतं हे माझं म्हणणे पटलं तरी रुचणार नाही बऱ्याच जणांना . पण आपल्याला किती कष्ट पडतात हे तरी मान्य आहे का ??
आरे हो भाकरीचं आर्धच झालं. युद्ध करायच्या तयारीनीशी खुप आत्मविश्वासाने कीर्ती उभी राहिली एक भाकरी मी केली मस्त झाली . मनोमन माझ्यावरच  मी  खुश झाले. तीचा पण जरा स्वयंपाकघरात वावर सहज होऊ लागलाय आणि ज्या सहजतेने एकएक करत मोठ्या पातळ आगदी माझ्या आईसारख्या 7 भाकरी तिने केल्या . तिच्या आजीला पण खुप आनंद झाला. कांद्याची चटणी , हरभ-याची भाजी , दही आणि भाकरी असा फक्कड बेत होता ! सगळे खुश. भाकरी करतानाचा video अगदी कीर्तीच्या मैत्रिणीपर्यंत गेला . सगळीकडुन कौतुक झाल्याने कीर्ती आणि मी पण खुष झालो. चला कोरोनाचा हा दुसरा परिणाम चांगला झाला म्हणलं !!
        शेवटची भाकरी आकांक्षाने केली तिला पण छान जमली . आकांक्षाला सुगरणपणाचा वारसा घेरडीच्या आजीकडून मिळाला आहे . आकांक्षा पाचवीत असताना काका गेले , तेव्हाच आशिष पण पुण्याला शिकायला गेला आणि यांची बदली पंढरपूरला झाली मग तिला सोबत होते म्हणून दरवर्षी आई मार्च ते जून बार्शीत असे तिचे आजीशी फारच अतूट नाते होते . मला अगदी अभिमानाने नमूद करावेसे वाटते की तिच्याकडे जी संस्काराची शिदोरी आहे ती आमच्या आईनी दिलेली आहे , आम्ही बहिणी जशा आईच्या शिस्तीत तरबेज झालो तीच शिस्त आकांक्षाला मिळाली मी मुद्दाम ते होऊ दिले कारण आजकालच्या काळात ते मिळणं ही सुवर्णसंधी होती , आईच्या तालमीत आकांक्षा बावान कशी सोन्याप्रमाणे तावून सुलाखून निघत होती . दुपारच्यावेळी त्या दोघीच घरी असायच्या मग अनेक गोष्टी सांगणे , गाणी म्हणणे , वेगवेगळे पदार्थ करणे , नऊवार साडी नेसणे , असे उद्योग चालायचे . ती सहसा फार कोणाच्या जवळ जात नाही पण एकदा का जीव लागला की ते तिच्यासाठी खास असते . आई , पप्पा , दादा आणि आजी हे तिच्यासाठी खास आहेत त्यात आता कीर्तीची भर पडली आहे . लहानपणी सुद्धा आशिष जगमीत्र होता कोणाकडेही जात असे पण हीचे तसे नव्हते तिला फक्त आम्ही तिघे हवे असायचो मग बँकेत जाताना पण कसरत करावी लागे . मी गेल्यावर मात्र देशपांडे कुटुंबाशी ती छान रमायची पण पाच वाजायची वेळ झाली की दरवाजात येऊन वाट पाहत बसे . त्या पण हसून म्हणायच्या काय पोरगी आहे ग हिला कसं समजत बरं आई यायची वेळ झाली ते ? आशी ही माझी तकी/ तकडी ! ती सोडून पण फारशी राहत नसे तिला घर प्रिय आहे . ती पप्पांसारखी बरीच शिस्तबध्द आहे , फारसा पसारा करत नाही , सांगावं लागत नाही शाळेत किंवा क्लासला जायला पण शिस्तीत आवरून पाच मिनिट आधी तयार असे याउलट आशिषचे असायचे . तिला तिच्या वस्तू , कपडे कोणी हात लावलेले चालत नाही आणि दुसऱ्याचे पण ती घेत नाही . थोडक्यात शिस्तबध्द , चाकोरीत राहायला आवडतं , स्वतः कोणाला त्रास देणार नाही आणि कोणी त्रास दिला तर तेही सहन करणार नाही . तब्ब्येत नाजूक पण आवडी आणि ध्यास खूप आहे गायन , नृत्य , अभिनय , वक्तृत्व , चित्रकला आणि अभ्यास सगळ्या गोष्टी तिने एकाच वेळी केल्या आणि प्रत्येक परीक्षेत आगदी जीव ओतून केले मनापासून केले . मला नेहमी प्रश्न पडतो हिला जोडीदार कसा शोधावा , तिच्या कलागुणांचे चीज झाले पाहिजे त्यामुळे तीच्या मनाप्रमाणे स्थळ मिळणे फार गरजेचे वाटते मला . तशी ती खूप लाघवी आहे सगळेच गुण छान आहेत मग  लोकांना ते बोचत असते फारशी शिस्त आवडत नसते ती जाचक वाटते .
 तिचे कीर्तीबरोबर फारच छान सुर जुळले आहेत आगदी दोघी कपडे पण घालतात एकमेकींचे . शेवटी काय समोरचा माणूस कसा वागतो ते पाहून वागत असतो आपण पाहू आता नंबर तिचाच आहे कसे कसे होते ते . अशी दोन्ही मुले मला वेगवेगळी गुणी वाटतात .




क्रमशः  भाग 4




     आज चैत्रा गौरीची मधली तीज होती . मला स्वप्नातसुद्धा वाटलं नव्हतं की गौर बसवतांना कीर्ती बार्शीत असेल . कारण आशिषचे लग्न ठरले तसे मी काही गोष्टी मनाशी पक्क्या केलेल्या होत्या . त्या म्हणजे सणवार , रीतिरिवाज , व्रतवैकल्य , पाहूणारावळा या सगळ्या गोष्टी नवीन सुनेला माहिती म्हणून सांगायच्या . माझ्या सासूबाई काय करत होत्या ,  त्यापैकी मला काय करणे शक्य झाले आणि मी कायकाय करते हे सांगायचं . त्यातलं आवश्यक काय आहे ते कशा प्रकारे करायचं , मी करते त्यातले तुला किती करणे शक्य होईल सुटसुटीतपणा यावा त्यासाठी मी करत होते त्यात अजून काय सुधारणा करता येईल हे संवाद करत दोघींच्या विचाराने ठरवायचे . मुख्य म्हणजे सणवारासाठी तिने बार्शीत असावे हा अट्टाहास मी करणार नाही जसं जमेल तसे करायचे . काहीवेळा मी पण पुण्यात जाईन बार्शीतील घर  मोठ आहे इथेच सगळ झालं पाहिजे असे नाही  आणि रीतीपण काटेकोर पाळल्या पाहिजेत हे बंधनकारक नसणार कारण धकाधकीच्या जीवनात पुण्यासारख्या ठिकाणी मुळात त्यांचे त्यांना किती वेळ मिळेल हे माहीत नाही आणि त्यात काही नियम ठेवले तर ते जाचक होतील . जेवढे तुम्ही घट्ट पकडाल तेवढी निसटण्याची जास्त धडपड असते आणि मुक्त सोडले तर सगळ्यांनाच सुखकारक होते ही खूणगाठ मी मनाशी पक्की केली होती . तीच बाब रीतिरिवाज करताना पण ठरवली आहे कारण मी स्वतः त्यातल्या दोन गोष्टी अगदी पहिल्यापासून हद्दपार केल्या आहेत त्या म्हणजे सोवळे आणि उपवास की ज्याचा संबंध दैनंदिन जीवनाशी येतो . मी सोवळे करत नाही धुतवस्त्र आणि स्वच्छ मन त्याबरोबर दोन हस्तक तिसरे मस्तक यावर विश्वास आहे श्रद्धाळू आहे पण अंधश्रद्धेला माझ्याकडे थारा नाही त्यामुळे उपवास कर्मकांड मी करत नाही माझी स्वामी समर्थावर लहानपणापासून श्रद्धा आहे आणि त्यांचे नाम घ्यायला वेळ , काळ , मुहूर्त कशाचेच बंधन नाही त्यामुळे माझी वृत्ती तशीच आहे त्यामुळे अनेक रीती , नियम मी कमी केले आहेत शिथिल केले आहेत कारण सुधारणा फक्त बोलण्यात नसावी ती आचारात आणि विचारात पण हवी . मला वाटतं याच पद्धतीने सर्वच सासूसूनानी वागायचं ठरवलं तर त्यांचे नाते फुलत राहील आणि हेल्दी संबंध प्रस्थापित होतील . मी तिला आपण दोघी गप्पा मारु असे म्हणून समोर बसवून तिला सांगितले 
" हे बघ अशी एक समज रुढ आहे की सासूसून या नात्यात कडवटपणा आसतो , 90% पेक्षा जास्त जणांचे संबंध फार सुरळीत नसतात . आपण याला छेद देऊ . सर्वात आधी आपण सासूसून आहोत , आणि सासूसून हेच आपले नाते रूढ राहील त्यातला गोडवा आपण समाजासमोर आणू . त्या नात्याला आईमुलगी म्हणण्याचे अजिबात कारण नाही फक्त आई मुलीचे नाते गोड असते सासूसुनेचे नाही असे असू शकत नाही आणि असे नसते ते आपण सिद्ध करु . दोन्ही नाती आपापल्या ठिकाणी सुंदर आहेत मुलीप्रमाणे वागणे हा शब्द योग्य आहे पण तू माझी मुलगीच आहेस असे म्हणणे म्हणजे सासूसून या नात्यावर अन्याय होईल त्यामुळे आपण वागत असताना तू माझी मुलगी म्हणण्याचे कारण नाही . सूनही लाडकी असते हे जगाने मान्य केले पाहिजे आणि आपण ते दाखवून देऊ . आपल्या नात्यातील वीण घट्ट करु आणि आपल्या नात्याचा विणलेला सुंदरसा शेला आदर्श सासुसून म्हणून आपण निर्माण करु. आणि आजुन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपलं प्रत्येकाचे एकमेकाशी वेगवेगळे नाते आहे त्यात गोडवा आहे तसेच मतभिन्नता पण आहे त्यामुळे वाद तर होतातच पण इतरांच्या वादाचा तुझ्याशी तू संबंध लावायचा नाहीस म्हणजे आशिष आकांक्षा भांडले किंवा आशिष आणि माझा वाद झाला तर त्याचा तू आकांक्षा किंवा तू मी यांच्या वागण्यात काहीही फरक पडला नाही पाहिजे प्रत्येक नात वेगळं राहिलं पाहिजे खुलले पाहिजे . उलट ते दोघे भांडत असतील तर तू त्याची मजा घे किंवा दुर्लक्ष कर तेच चांगले !"
माझं हे बोलणे ऐकले आणि ती इतकी खुलली आणि तिने माझ्याशी मोकळेपणाने गप्पा मारायला सुरुवात केली ती म्हणाली
" मी न आत्तापर्यंत मैत्रिणींशी बोलताना खूप प्रमाणात हेच ऐकलं आहे की सासुशी जमवून घेताना अवघड जाते . त्यामुळे माझी अशी फार इच्छा होती की पाहिलं माझा नवरा निर्व्यसनी असावा , स्वभाव चांगला असावा आणि त्यानंतर दुसरी महत्वाची अपेक्षा म्हणजे मला सासू मनातल ओळखणारी , मला समजून घेणारी असावी . जसे माझे नवऱ्याबरोबर सुर जुळले पाहिजेत तसेच सासुबरोबर पण माझे सुर जुळायला हवेत . आणि मला वाटतं की आपण या लेव्हलला जर संवाद साधत असू तर काही अडचण येण्याचे कारणच नाही . आणि खरं सांगते मी एक वर्षापूर्वी बार्शीत आले आणि आपण पहिल्यांदा भेटलो तर तुम्ही चक्क मला मिठी मरलीत , पहिल्यांदा घरी आलीस म्हणून औक्षण केलं याचं मला प्रचंड अप्रूप वाटलं . भेट काय दिली यापेक्षा मिठी आणि औक्षण या दोन गोष्टी मला खूपच भावल्या . आपल्यातलं अंतर केव्हाच गळून पडले आणि तेव्हाच वाटलं की हे जरा वेगळच समीकरण आहे . पुन्हा लग्नानंतर आमच्या दोघांच्याही रजा तुटपुंज्या आहेत हे समजले तर साखरपुडा झाला की तुम्ही आम्हाला सांगून टाकलं तुमचे प्लॅन ठरवा बुकिंग करा त्याप्रमाणे आम्ही मॅनेज करु तर 1 फेब्रुवारीला लग्न झाले आणि आम्ही 5 फेब्रुवारीला तर न्यूझीलंडला रवाना झालो . तीच बाब प्रिवेडींगची झाली वेळ मिळत नव्हता तर तुम्ही आकांक्षाला बरोबर घेऊन जा , वेळ काढा पण प्रिवेडींग झालच पाहिजे ते पुन्हापुन्हा होत नसतं , कोणती हौस राहिली अस नको व्हायला म्हणत तेही करायला लावल . साखरपुडा झाला त्याहीवेळी बार्शीत हॉटेलवर येऊन केलेले स्वागत आणि औक्षण , माझा पंचविसावा वाढदिवस त्याचे आशिषने केलेलं सेलिब्रेशन वेगळं आणि त्यावेळी खास रजा काढून पुण्यात थांबणे , घरी बोलावून  तुमचं आणि आकांक्षाच वेगळच सेलिब्रेशन ! मी तर तेव्हाही खूप भारावून गेले होते . लग्न , नंतरचे विधी आणि आजपर्यंत जेजे अनुभव आले त्यात प्रत्येक अनुभव हा प्रथेपेक्षा हटके अनुभवला हे मात्र नक्की ! असे कितीतरी प्रसंग या एका वर्षात मला अनुभवायला आले . आज त्याची पुनश्च एकदा प्रचिती आली मला वाटतं मी नक्कीच नशीबवान आहे . मला एक जाणवले आहे कोणी काय केलं , काय पद्धत आहे याचा किस न पाडता , दुसऱ्याचे अनुकरण न करता तुम्ही तुम्हाला काय आवडत आणि मुख्य म्हणजे समोरच्याला कसा आनंद होईल हे तुम्ही पाहता त्यामुळे आई मुलगी राहूदे पण आपण मैत्रिणी नक्कीच झालो असे वाटते . आणि मुलगी मुलगा समान हे न बोलता कृतीतून दाखवता मला पहिल्यापासूनच तुमचं दडपण आलं नाही पण आता मात्र मोकळेपणाची खात्री पटली . भांडणाच म्हणाल तर मी आई किंवा मी आणि केतकी भरपूर भांडतो अगदी राडा घालतो त्यामुळे तुमच्यात कोणताही वाद झाला तर मी नक्कीच मजा घेईन माझ्याशी त्याचा संबंध जोडणार नाही . मी नक्कीच या तुमच्या सगळ्या बोलण्याचा विचार करेन आणि तुमच्या मदतीने छान आयुष्य जगेन असा मला विश्वास वाटत आहे आणि खात्री सुद्धा पटली आहे ."
  तिचे इतके भरभरून आणि मनापासून बोलणे ऐकून मला पण खूप समाधान वाटले . तिच्यावर कोणता ताण राहू नये तिने कशाचे दडपण घेऊ नये असे मला मनोमन वाटायचे . आपण बोलू असे मी ठरवले होते पण आमचा तेवढा सहवास तरी व्हायला पाहिजे असे वाटत होते आणि करोनामुळे तो झाला ! म्हणलं चांगली सुरुवात म्हणजे आर्धी लढाई जिंकल्यासारखे असते . आमची आई नेहमी म्हणायची 
" पाण्याला नेहमी पुढची धाव असते ते कधी उलटे वाहत नाही त्याचप्रमाणे आपण पण पुढे चालत राहायचं मागे पहायचं नाही . पुढे चालणे म्हणजे गरजेनुसार बदल करत राहणे आपला आपला रस्ता शोधणे त्यातच माणसाची प्रगती असते . थोडक्यात पहिल्या पिढीने दुसऱ्या पिढीवर काही लादू नये , त्यांच्या मनाप्रमाणे मोकळीक दिल्यास ते जास्त जबाबदारीने वागतात . आपण आपल आयुष्य आपल्या मनाप्रमाणे जगलो आहोत त्यांना त्यांच्या प्रमाणे जगू द्या आणि सर्वजण सुखी व्हा ! "
     आता प्रत्यक्षात ते वागण्याची वेळ आली आहे . मी बँकेत लागल्यापासून AIBEA ची सभासद आहे 2009 नंतर बँकेत मुलींची वाढती संख्या पाहून संघटनेने महिलांसाठी व्यासपीठाच्या कक्षा रुंदावल्या आणि 2010 मध्ये सीनिअर म्हणून औरंगाबाद युनिटच्या  Women's council ची convenor म्हणून  माझ्यावर जबाबदारी टाकली गेली . आणि तेव्हाच मी ठरवलं की ते पद म्हणून न मिरवता विचारपूर्वक आचरणात आणायचे . आणि आता प्रत्यक्षात ती वेळ आलेली होती . 
    फूल टाईम नोकरी करणे आणि बाकी सगळं जस आहे तसं सांभाळणे हा काही जोक नाही हे मी पूर्णपणे जाणून आहे . परंतु सातत्याने संघटनेची वर्कशॉप्स , अधिवेशने आणि विविध कार्यक्रम करत असताना आतून खतखत असणाऱ्या गोष्टीचं मला उत्तर मिळालं होत आणि ते मी निम्मे आयुष्य संपल्यावर भितभित मुख्य म्हणजे लोक काय म्हणतील , पाहुणेरावळे काय म्हणतील याचा विचार करत थोडा थोडा बदल करत आचरणात आणते आहे . मला आकांक्षा मुलगी आहे त्यामुळे मुलींची मानसिकता भरपूर जवळून अनुभवता येते आहे . आम्ही पाच बहिणी , बहिणींच्या मुली आणि आता बँकेतील मुलींशी संवाद साधत असताना अनेक बाबीवर मी विचार करत असते . पुरोगामी विचारांशी जर आपल्याला जुळवून घेता आलं तर नवीन पिढीचे वागणे खटकत नाही . त्यांचे सगळ बरोबर असेल असे नाही पण आपण स्वतःला त्या ठिकाणी ठेऊन पाहिले तर काम सोप होऊन जात . आजची कीर्तीची खुशी , तिचा मोकळेपणा आणि आत्मविश्वास पाहून मला पण एकप्रकारची उर्मी आली आणि मी ठरवलं की सगळं काही सबुरीने घ्यावं , प्रत्येकाला आपापल्या मर्जीप्रमाणे वागू द्यावं , स्वातंत्र्य द्यावे ! मुलींनी उच्च शिक्षण घ्यावं , मोठ्या पदाच्या जबाबदाऱ्या स्विकरव्यात पण सगळ सांभाळून करावं अशी अपेक्षाच करू नये . विनाकारण तिला सुपर वूमनची पदवी देवून दबवून टाकू नये . हुंदडायला सोडलं आहे तर घेऊ द्यावी भरारी , तिच्याभोवती ठराविक परिघाची मर्यादा आपण घालू नये . यासाठी मी घरातच आशिष आकांक्षा यांच्यात फरक कधी केला नाही . त्यामुळे मनू पण व्यवस्थित जबाबदारी सांभाळेल ही माझी खात्री आहे . शेवटी संसार त्या दोघांचा आहे तो त्यांनीच करावा त्यांनी मागितला तर आवश्यकतेप्रमाणे सल्ला द्यावा , जमल्यास मदत करावी पण अपेक्षांचं ओझ लादू नये . कारण अपेक्षा फक्त पैशाची नसते तर रोजच्या वागण्यातील पण असते . उगाचच प्रत्येक गोष्टींचे त्यांनी अपडेट द्यावे , सगळ विचारून करावे हे न बोलता गृहीत धरू नये . कारण बँकेतील मुलींशी संवाद साधताना या गोष्टींची मला प्रकर्षाने जाणीव झाली त्या सांगत असतात 
" मॅडम काय सांगू आहो आमच्या सासूबाई सगळ करतात , मुलांना त्या बघतात म्हणून मी नोकरी करू शकले पण वागण्यातून न बोलता दबाव खूप टाकतात शब्दात सांगता येत नाही पण मोकळ वाटत नाही . सगळ त्यांना सांगावं अशी अपेक्षा असते ."
ही गोष्ट मला खूप खटकते एकतर मुलाचे लग्न होणे ही खूप मोठी घटना आहे . मुलगी ज्याप्रमाणे माहेर सोडून सासरी येते ते सहज मानले जाते पण मुलाच्या आयुष्यात एक नवीन व्यक्ती आलेली आहे त्यासाठी त्याला बराच वेळ द्यावा लागणार आहे त्यामुळे पूर्वीप्रमाणे फोनवर  बोलणे किंवा इतर वेळ त्याने आपल्याला द्यावा याला पहिली फुली मारली पाहिजे . वेळ मिळाला की ते आपोआप फोन करतील , घरी येतील बायको आला की विसरला असे म्हणून मुलाला पण कात्रीत पकडलं अशी आवस्था करु नये . त्याला बायकोला तिच्या नातेवाईकांना वेळ तर द्यावाच लागणार आहे . तसेच आपण वयाने , अनुभवाने मोठे आहोत नातवंडे सांभाळली म्हणजे उपकार किंवा घरकामात मदत केली तर उपकार कसा होऊ शकतो तोही फक्त सूनेवर , मुलावर नाही ! याठिकाणी मी मुलींना संवाद साधण्याचा सल्ला दिला . काही मुलीपण आगाऊपणा करतात हेही माझ्या लक्षात आले , त्याठिकाणी मी त्यांचीही कानउघडणी केली . एकूणच संबंध सुरळीत ठेवायचे असतील तर दोन्ही बाजूने नात्यात मोकळेपणा आणि गोडवा असायला हवा . आणि ही गोष्ट या वर्षभरामध्ये माझ्या आणि कीर्तीच्या बाबतीत झाली असे म्हणायला हरकत नाही . आणि कोरोनामुळे अशक्य असणारी गोष्ट म्हणजे आम्ही एकत्र राहणे ती शक्य झाली हे मात्र खरे आहे . पाहू येणाऱ्या काळतच कळेल आमचे नवीन नाते कसे फुलेल कसे बहरेल !!
      यात एक महत्वाची गोष्ट झाली ते म्हणजे यांचं लग्न ठरल्यानंतर जवळजवळ नऊ दहा महिन्यांनी झाले . यादरम्यान विहीणबाई आणि मी इतक्यावेळा फोनवर बोललो की आमचेच नाते मैत्रिणीसारखे झाले . कीर्तीचा आशिषचा  स्वभाव , आवडीनिवडी याबद्दल एकमेकींना माहिती मिळाली . त्या नेहमी म्हणायच्या
" मला मुलाला बहीण असावी असे फार वाटायचे कारण मुलींचे काहीच सांगावं लागणार नाही आणि तुमच्याशी बोलताना तर मला खूपच जाणवते . फार पुढचा विचार आहे तुमचा आम्हाला काळजीचे कारणच नाही . श्रीमंत स्थळे खूप भेटतात पण मनाची श्रीमंत असणारी माणसं आम्हाला हवी होती ती कीर्तीला मिळाली हे नक्की त्यामुळे आमची एका मुलीची चिंता मिटली . आजकाल खूप विचित्र प्रकार पाहायला मिळतात कुठेतरी संस्कार कमी पडतात . त्यासाठी घराणे पाहायचे बघा ".  
   कीर्ती बरोबर आज इतक्या दिलखुलास गप्पा झाल्यामुळे मला एकदम मोकळं वाटू लागलं . मनकवडा तर कोणीच नसतो त्यामुळे संवाद साधण्यावर माझा भर आहे . कारण मनात काही खदखदत ठेवण्यापेक्षा मोकळेपणाने संवाद केव्हाही छान . मुलीने सासरी जाणे ही रीत जरी असली तरी वयाच्या पांचविशिपर्यंत एका संस्कारात वाढलेल्या मुलीने ते सगळ सोडून सासरी रुळावे हे मला सुद्धा अजब वाटते म्हणून मी ठरवलं होत किमान सुनेला तरी आपण हळुवारपणे उमलू द्यावे याठिकाणी मात्र मी कीर्तीला आकांक्षाशी रीलेट करते ते सून आणि मुलगी म्हणून नव्हे तर एक मुलगी एक स्त्री म्हणून . आज कोरोनाच्या निमित्ताने तिचे इतके दिवस बार्शीत राहणे पडले . आम्हाला बोलायला वेळ मिळाला , एकमेकींना जाणून घेता आले आधी पहिली तीज आता दुसऱ्या तीजेची पण पुजा तिच्याकडून होणार ! खूप समाधान वाटलं मग कैरीची डाळ खीर आणि कलिंगडं असा बेत केला नैवेद्याला . 
आत्ता मलापण तीन दिवस सुट्टी लागून आलेली. लॉकडाऊन 30 एप्रीलपर्यंत वाढलं. सोलापूर जिल्ह्यात आतापर्यंत एकही रुग्ण नव्हता ही एक जमेची बाजू होती. पुन्हा एकदोन दिवस गव्हाची खीर , बीट परोठे झाले . एक महिना पुरेल एवढा किराणा दोघांनी जाऊन मोठ्या गाडीतून आणला. आता फक्त भांड्याला मंदा सकाळी येऊ लागली . साबणाने हात धुऊन घासलेली भांडी उन्हात दिवसभर ठेऊन आत घेऊ लागलो थोडी ओढाताण कमी झाली.
     मध्ये एकदा काका-काकींची औषधे पोहोच करण्यासाठी डॉक्टरांची फाईल सोबत घेऊन हे परांड्याला टुव्हीलरवर जाऊन आले . तेवढेच तिथे काय कमीजास्त आहे पहाता आलां सगळं ठीक होतं . प्रत्यक्षात भेट घडली . सहजासहजी जाता येत नव्हते पण . मग शेताची परिस्थिती काय तेही पाहून आले होते. पुन्हा आज गेले आणि खुप वाईट वाटलं , कलिंगड्याच्या  22/23 टन मालापैकी फक्त तीन टन माल कवडीमोल किंमतीत विकला गेला होता आणि सव्वा एकरात जवळजवळ 18/19 टन मोठाली कलिंगडं नासून बसली होती वेल सुकुन गेले होते . इलाज नव्हता . नैसर्गिक आपत्तीच की ही ! आता मिरच्या लकडल्या आहेत उद्यापासून तोडा करायचा आहे पाहू त्याला कशी मिळते बाजारपेठ ते.
   इकडे बँकेत जनधनची गर्दी वाढते सोशल डिस्टनसींगमुळे लोकांना उन्हात थांबावे लागते म्हणून फक्त सोलापूरच्या कलेक्टरंनी बँक सकाळी 8 ते 2 ठेवावी असा आदेश काढला. तसा बँकेचा पण मेसेज आला म्हणजे उद्या 7.45 ला घर सोडावे लागणार तर ! तेवढ्यात सोलापूरमध्ये पहिला करोना रुग्ण सापडला तो मृत झाल्यानंतर करोना पाॕजिटीव्ह आल्याचे समजले. पुन्हा संकट इकडे आलं . पाहू आता काय परिस्थिती होणार ते.
आकांक्षा पण खुप अस्वस्थ होती काही मुलांनी online class ला objection घेतले होते. त्यामुळे उद्या class होणार नव्हता . खरं तर अभ्यासाची लींक चालू राहिली असती तर बरं झालं असतं . पाहुया आता कायकाय होतं  ते.



  क्रमशः भाग 5





सकाळी 8 वाजता बँक अशी परिस्थिती 30 वर्षात पहिल्यांदाच आली . हेच शेड्यूल आता 30 एप्रीलपर्यंत रहाणार असं समजतय . तसं सगळीकडे बरच कडक वातावरण आहे . शाखेतपण रोज सॉनिटायझींग केलं जातय . शक्य ती काळजी घेतली जातेय. आता माझी आयुर्वेदीक औषधे संपलीत त्याचे टेन्शन आलेय पण डॉ. निलिमाने डायेट आणि व्यायामावर कंट्रोल करु शकता म्हणून सांगितले आहे.पाहु कसं होतं ते. याबाबतीत कीर्ती जरा जास्तच काटेकोर आहे.बाबांच्या पथ्याची तिला सवय आहे चहा आणि गोडावर करडी नजर ठेवतीय माझ्या. सारखा ग्रीन टी किंवा डीपडीप चहा देऊ का चालू असते. ते मला जड जातय पण माझ्या चांगल्यासाठी आहे असो.   रात्रीच आम्ही उद्याचं बरचसं नियोजन करुन ठेवलं होतं . त्याप्रमाणे पहाटे 5.30 ला उठले . कीर्तीपण लवकरच खाली आली . तिला लवकर जाग येते म्हणते . रात्री मात्र 9 वाजले की तिची घंटा वाजते झोपेची. याउलट आशिषचं रात्री उशीरापर्यंत जागं रहायचं सकाळ होईल तशी याची साखरझोप सुरु होते . मला खूप हसु येतय हे सगळं ऐकून . आता कॕरममध्ये सगळ्यांना मजा येतेय . यांचा तो खूप आवडता खेळ आहे. पुर्वी बँक सुटली सगळा स्टाफ कॕरम खेळायचा . बार्शीला तर बँकेच्या स्पर्धा व्हायच्या . ते दिवसच खूप वेगळे होते . काम सगळ हाताने लिहून असायचं. भरपूर स्टाफ असायचा , कामाचं स्वरुप वेगळं होतं मजा यायची. त्यामुळे सध्या यांना पण मजा येतेय थोडसं भूतकाळात रमलेत ते . आठ वाजले की बोर्ड हॉलमध्ये मांडून वाट पहात बसतात . लहानपणी खेळल्यामुळे मनिष छान खेळतो. आकांक्षाला व कीर्तीला फारसं येत नव्हते हे शिकवतात त्यांना बऱ्यापैकी जमू लागलय तिघांचा खूप गोंधळ , आरडाओरडा ,भांडाभांडी, चिडाचीड  सुरू असते . मनिष खेळात भिडू नको असतो या दोघींना आपल्या मनाप्रमाणे खेळू देत नाही तो असं म्हणून या दोघी एकत्र असतात. मग छान रंगतो त्यांचा खेळ . नेटवरुन पण यांची सारखी भांडण सुरु असतात , नेट स्लो झालं की प्रत्येकजण एकमेकांना तुझं बंद कर म्हणतात . सारखे मीच का ? असं भांडण सुरु असते . मला मजा येते बघायला . काय कारणं आहेत वादाची असं वाटतं आणि हसायला येतं. तस जरा घरात बसून त्यांना  कंटाळा पण आला असणार . मनिष-आकांक्षा लहान असल्यासारखे चक्क मारामारी पळापळी पण करताहेत . फोटोग्राफी मात्र खुप सुरेख चालू आहे त्याची.  रोज सनसेटला गच्चीत जातात . सुर्याचे खुप कल्पकतेने विविध फोटो काढलेत त्यांने मॉडेल म्हणून दोघी हजरच असतात . आणि सध्या भेडसावणारा प्रश्न म्हणजे खादगी. बाहेरचं खाणं आजिबात नसल्यामुळे तीनत्रीकाळ काय द्याव हा प्रश्न पडतोय . सकस , चविष्ट फक्त घरचच मिळते .



लाॕकडाऊन डायरी प्रकरण 2


भाग 6 ते 10


क्रमशः   भाग 6



आता 3 मेपर्यंत लॉकडाऊन  !!  आज पुन्हा मनिष म्हणतोय आई काहीही असो तेव्हा जरा झाली चिडचीड पण बार्शीला आलो ते फार बरं झालं बाबा ! आकांक्षा व  कीर्तीला पण असच वाटतय . इकडे आल्यामुळे खुप काही साध्य झालं असे वाटतेय सगळ्यांना . थोडासा इकडचा उन्हाळा त्रासदायक आहे . विशेषतः कीर्तीला हे नविन आहे . पाणीप्रश्न आणि उन्हाळा ! सरबत ,थंड कलिंगडं , द्राक्ष याचा मारा व कुलर एवढाच एक उपाय करु शकतो . यांचे बार्शीला इतके रहाणे पडेल असे कधी वाटलेच नाही. नाहीतर एसी बसवून घेतला असता.  खरा उपयोग पुण्यात होणार असे वाटले होते . आता सध्यातरी दुकाने बंदच आहेत त्यामुळे काहीच करता येत नाही असो . सध्या परिस्थितीत जे आहे ते खुप चांगले आहे असुदेत असे म्हणतात मुले . आता माझी रोज सकाळी आठची बँक ! आता पुन्हा रुटीन चेंज केलं . रात्रीच कट्टा पुसून सगळी सकाळची जय्यत तयारी कट्ट्यावर व फ्रीजमध्ये करुन ठेवायची  . हे पण आशिष-कीर्तीला आतिशय उपयोगी पडणारे प्रात्यक्षिकच होतं . कारण काकू नसतील तर त्यांना हेच करावे लागणार . त्यामुळे अच्छा असं केल तर होतय की असा त्यांचा संवाद होतोय . सकाळचा चहा पाच जणांचा नाष्टा , भात-आमटी , भाजी व दोन पोळ्या एवढं सगळं 7.30 ला तयार असावं लागतेय . मग राहिलेल्या पोळ्यात आकांक्षाची मदत असं काहीसे होतेय . तेही एकदोन दिवसात छान बसले रुटीन . मी बँकेत जायला निघते तर लोक दारात ब्रश करायला उभे राहिलेले दिसतात . असो , मला घरी जायला दुपारचे आडीच  वाजतात. त्यानिमीत्ताने रोज एक वेगळी जबाबदारी तिच्यावर सोपवायचं काम चालू आहे. पालेभाजी कीर्तीला आवडत नाही पण करेल तेव्हा मी खाणार असं तिने सांगून ठेवलय त्यामुळे कोणालाही काहीच न विचारता शक्य असेल ते करणे चालू आहे त्यामुळे कोणालातरी न आवडणारा तोच दुसऱ्याला खूप आवडणारा पदार्थ होतो . चला त्यातही मजा आहे . मनाला मुरड घालणे हे फक्त सगळे एकत्र असतील तरच शक्य होतं .एरव्ही आपण स्वतःच्या आवडीचच करतोच की ! मला पुर्वीचा जमाना आठवायला लागला . मी आत्त्याकडे शिकायला होते त्या सांगायच्या आम्ही सात जावा होतो .अबब !! खुप काही सांगायच्या त्या . लहानपणी सुद्धा घेरडीत सुट्टीत आतेमामे भावंड येणं आम्ही मामाकडे सुट्टीला जाणं असायचं . मामा पण यायचा आक्की , तायडी सहकुटुंब यायच्या आंब्याचा रस पोळ्या , भजी , हुरड्याच्या घुगऱ्या , पापड कुरडया . आईच्या हातचं रोज काहीतरी नविन चटकदार जेवण . काका , फक्कड काका, मोहन आण्णा , पंत काका सगळ्यांनी आंबे डालींनी घेणं आणि त्याची आढी घालणं . सगळ्यांना एकत्र जमा करायचा आट्टाहास काकांचा असायचा आई पण खुश असायची पण कष्ट खूप पडायचे तिला . सगळे आले न रस भजी असली की मोठी पोळ्यांची चवड लागायची. दमायला व्हायचं तिला . सगळ्या मुलींनी करायचं असा काकांचा शिरस्ता असायचा पण कमीजास्त आहे नाही पहाणं जबाबदारी तिच्यावर असायची. पुन्हा आक्की वारली . मग मायडीचं लग्न झालं ती पण सहकुटुंब आंब्याच्या दिवसात असायची स्वतःच्या पाच मुली सहा नाती एक नातू आणि इतर पाहुणे वेगळेच पाच खणी स्वयंपाक घर चार खणी सोपा आंगण समोर एकावर एक दोन खोल्या एवढं घर आणि खुप सारी माणसं असायची . रात्री लाईट नसणं वाड्यातल्या सगळ्यांनी महादेवाला जाऊन आलं की आंगणात संध्याकाळी सात वाजताच आपाआपली जागा पकडून ठेवणं. आम्ही लहान होतो तेव्हातर  गुलाब आण्णा किंवा मावशींनी गोष्टी सांगायच्या . आम्ही सगळ्यांनी त्यांच्याभोवती घोळका करुन बसयचं हा नित्यनेम होता . आजकालच्या मुलांना वाडासांस्कृती अनुभवायला नाही मिळत पण या करोनामुळे कुटुंबाला तरी एकत्र रहायला आलं. या बंदमुळे खुप नुकसान होणार असं म्हणतात पण विचार केला तर हेही नक्की आहे की आपण ठरवुनसुद्धा आशा प्रकारे जिवन जगणे केवळ कल्पनातीत राहिलं असतं . पैसा मिळवायला उभ आयुष्य आहे . सध्या जे अमुल्य क्षण उपभोगता येतात ते का घालवावे . मनमुराद आनंद लुटावा त्याचा !!


क्रमशः  भाग 7


   आज बँकेतुन दुपारी घरी गेले. आंघोळ झाली . मला कीर्ती समोर दिसली नाही म्हणून मी रुममध्ये डोकावलं . तर ती काम करत होती म्हणलं असेल थोडफार जास्तीच काम . पण चेहरा पण छोटासा वाटला तिचा . तब्बेत बरी नसावी असं वाटलं पिरियड आले तरी मुली कोमेजतात , प्रत्येकाचा वेगळा अनुभव असतो . गरम पाण्याची पिशवी आणि आराम याची मला आकांक्षामुळे सवय आहे म्हणून जवळ गेले डोके कंबर दाबू का म्हणून विचारले तर तसा काही त्रास नाही होत म्हणाली . मी तिथेच थांबले तर मनिषने सांगितले तिच्या मानलेल्या आजोबांचे म्हणजे भाऊकाकांच आज दुपारी पुण्यात निधन झाले आहे . आणि लॉकडाऊनमुळे कोणालाच जाता येणार नव्हते . थोडफार तिच्याशी बोलले . मग मीपण आराम करायला गेले. 
    हल्ली आम्ही बऱ्याचदा कामं करतकरत मिरज घेरडी परांडा अशा खूप गप्पा मारल्यात. ह्याच आजोबांविषयी ती भरपूर सांगत होती मला
भाऊकाका असं त्यांना म्हणायचे. ते तिच्या आजोबांचे मित्र ! कीर्तीची आजी लवकरच गेल्यामुळे घरात तिचे आजोबा काका , आत्या आणि बाबा होते. भाऊकाकांनी लग्न केलेलं नव्हते . ब्रम्हचारी होते ते मग मित्राला मदत करण्यासाठी ते यांच्याकडे रहायला आले . सर्वांत लहान कीर्तीचे बाबा होते आई नसल्यामुळे त्यांना भाऊकाकांचा खुप लळा लागला . आत्या व काकांचे लग्न झाले . दोघे मित्र सगळं करायचे पुढे बाबांच लग्न झाल्यावर आजोबा , भाऊकाका वआईबाबा एकत्र रहायचे . कीर्तीने जन्मापासूनच घरात दोन आजोबांना पाहिलय अनुभवलय . तिचे आजोबा गेले तरी यांनी भाऊकाकांना जाऊ दिलं नाही . केतकीला तर फक्त भाऊकाका हे एकच आजोबा म्हणून आठवतात. त्यांची शिस्त खूप होती . माया प्रेम पण तितकच दिलं . एवढेच नाही तर भांडणं ,  रुसणं पण व्हायचं घरात इतके ते घरचे सदस्य झाले होते . आलीकडे मुली मोठया झाल्यावर जवळच ते स्वतंत्र राहू लागले . पण रोजचं जाणयेण असायचं . लहानपणी आईची सकाळची कामं होईपर्यत या दोन्ही मुलींना घेऊन  देवळं फिरुन व्हायची त्यांची . रात्री आठ वाजले की शिस्तबद्ध गादी , मच्छरदाणी लावुन द्यायची मग हीने झोपायचे . 
" त्यामुळे मला लवकर झोपायची सवय आहे "
असे कीर्ती म्हणते . असे अनेक लाड त्यांच्याकडून करुन घेतलेल्या आठवणी तिने परवाच सांगितल्या . यांच्या एका कुटुंबालाच नव्हे तर  आत्या , काका आणि बाबांच्या  पुर्ण मित्रपरिवारात ते सर्वांना आपलेसे वाटायचे . सर्वसमावेशक असा त्यांचा स्वभाव होता . संपुर्ण आयुष्य त्यांचे मिरज सांगलीत गेलं . आता नव्वदीच्या पुढे वय गेलय , लकवा झाला . त्यांना एकटे ठेवायला नको म्हणून परवाच दीड महिन्यापुर्वी त्यांच्या भावाने त्यांना पुण्यात हलवलं . त्यांना अजिबात पुणे नकोस वाटतं असं ते सांगू लागले आणि लगेचच करोनाचं संकट आलं होतं . त्यामुळे कोणालाही काहीच करता येईना .  हे सगळं ऐकून मला पण खूप कुतुहल वाटलं. अशाप्रकारे नात्यांची जपणूक विरळच ! क्वचितच असं पहायला मिळत . आणि तेच आजोबा गेल्याचं दुपारी समजलं होतं . झालं ते त्यांच्या दृष्टीने चांगले झालेय शरीर यातना नाही झाल्या त्यामुळे त्यांच सोनं झालं पण उगाचच एकदोन महिन्यासाठी ते पुण्यात गेले असं वाटतय सगळ्यांना . विशेष म्हणजे लग्नानंतर आशिष-किर्ती त्यांना भेटून पण आले. आशिषला ते बोलले सुद्धा होते !
   आशिष हळुच सांगून गेला आई ती खूप रडली . हे पण म्हणाले ती अस्वस्थ आहे बोललीस का तू ? अजून नाही पण बोलते म्हणलं . मी उठून चार वाजता सरबत प्यायला कीर्तीला बोलावले . तशी जरा गप्पच होती ती मग मीच तिला थोडेसे बोलत केलं . झालं हे ठीक आहे त्यांना क्लेश झाल्यापेक्षा ठीक आहे . वय पण खूप झालेय पण या परिस्थितीत असं व्हायला नको होतं . कोणीच जाऊ शकत नाही याची रुखरुख लागलीय तिला . हेच बाबांनी खूप मनाला लावून घेतलं असणार म्हणून तिला बाबांची काळजी वाटत होती . बाबा घडघड बोलत पण नाहीत पण खूप हळवे आहेत म्हणाली. थोड्या वेळाने फोन कर आईबाबांना मग तुला पण बरं वाटेल म्हणलं . तिचा फोन झाला आईंशी मी पण बोलले आमचं पण चहापाणी झालं . मग थोडी नॉर्मल वाटली ती . अशा घटनांचा विसर पडायला , पचनी पडायला काळ हेच औषध असते!
    रात्री मग रोजच्याप्रमाणे झालं वातावरण . आज आकांक्षाने मी भाकरी करणार हे जाहिर केलं . ती पण भाकरी पहिल्यांदा करणार होती . झालं मग प्रयोग सुरु झाले आणि वातावरण निवळलं . हशा पिकला . बरं झालं असं मला वाटलं .


क्रमशः  भाग 8


आज तिसरा शनिवार त्यामुळे मला  बँक तर आकांक्षाला क्लास होता . दोन दिवस सुट्टी देऊन पुन्हा क्लास सुरु झाल्यामुळे तीला थोडा लोड होता .
आशिष-किर्तीला सुट्टी . त्यामुळे माझ्या एकटीपुरतं नाष्ट्याला थालीपीठ करुन घेतलं बाकी काय करायचं ते कट्ट्यावर ठेवलं . कसं करायचं याच्या टीप्स दिल्या आहेत . सगळेजण मिळून करणार पण चार्ज कीर्तीकडे असणार . ह्यांचा शनिवार आहे त्यामुळे ह्यांना वेफर्स व तिघांचा नाष्टा आणि पाच जणांचा स्वयंपाक आकांक्षा व कीर्ती दोघी मिळून या दोघांना मदतीला घेऊन करणार आहेत . नाष्ट्याला घावन मिक्सींग करुन ठेवलय ते आज मनिष करणार आहे . तर जेवायला पोळी , आख्ख्या मसूरची भाजी , भात , गाजराची कोशिंबीर असा बेत आहे . 
            कालपासून कीर्तीच्या आजोबांचा विषय डोक्यात घोळत होता . मी विचारमग्न होत गेले की रक्ताच्या नात्याइतकीच किंबहुना काहीवेळा जास्तच जोडलेली नाती ही खूप घट्ट असतात का ? काही कारणांनी भेट झाली नाही तरी अंतरीक ओढ किंवा जोडलेला धागा असतो तो हृदयाची तार छेडायची भूमिका करत असतो . तीस वर्षापूर्वी नोकरीच्या निमित्ताने बार्शी व मुलांसाठी म्हणून आमच्या आयुष्यात देशपांडे वाडा व कृष्णा आज्जी अविस्मरणीय आहेत . पुर्वी मँटर्नीटी लीव्ह तीनच महिने असायची . मनिषचा जन्म झाला आडीच महिने मजेत गेले . बालपण , बारसं ,  कोडकौतुक घेरडी आणि परांडा ! आता जॉईन व्हायला फक्त आठ दिवस बाकी असतांना रुटीन बसवायला बार्शीला आम्ही तिघे आलो . काहीही ठरवलेले नव्हतं , फारसं कळत पण नव्हतं . देशपांडे वाड्यात भाड्याने रहायचो . वाड्यात वातावरण घेरडीसारखं होत .  घरमालकांना मुलबाळ नव्हते त्या एकूण सहा जणी जावा व तीन नणंदा असा मोठ्ठा परिवार होता . सगळेजण त्यांना बाबा-मम्मी म्हणायचे . नविनच लग्न होऊन आल्यामुळे त्यांनी आम्हांलापण त्यांच्या बहिणभावाच्या मुलांप्रमाणे मानलं . मग आमचेपण ते मम्मी बाबा झाले . मम्मींची एक जाऊ म्हणजे वर्षा काकू ! मग त्यांच कुटुंब तात्या , प्रसन्ना आणि गौरी . मम्मी व वर्षा काकू ह्यांच्याबरोबर आमचा खूप स्नेह जडला होता. त्यामुळे बाळाला घेऊन परत आले की ही दोन कुटुंब आणि बाकीच्या जावा त्यांची मुलं , सागडे ताई , दिवटे काकू , सिंधूताई असे शेजारी सगळे जणू आदल्या जन्मीचे सोयरेच !  मग मी त्यांना बाळाला सांभाळायला बाई बघायला सांगितले . शोधत शोधत आठ दिवस निघून गेले मम्मी म्हणाल्या आपण बाई पाहू ती मिळेपर्यंत तू माझ्याकडे मनिषला  सोडून जा . तीन महिन्याचं अतिशय खेळकर बाळसेदार गुटगुटीत बाळ घरी ठेवून ड्युटी सुरु झाली . मम्मी याला दिवसभर सांभाळायच्या वर्षा काकूंनी पण तितक्याच प्रेमाने अगदी वेळ काढून यायचं . सागडे ताईंनी त्याला फिरवून आणायचं आणि खेळवायला गौरी प्रसन्ना बाकी मुलं आसायची . जगमीत्र आहे तुझं बाळ असं म्हणायचे सगळे.  मधल्या सुट्टीत मी घरी येऊन जायचे . बाई पहाण्यात आठ दिवस गेले माझ्या आधी मम्मी व वर्षा काकूंनाच बाई मनास येत नव्हती . काय कराव मोठ्ठा प्रश्न होता . रविवारी बोलत बसल्यावर मम्मींनी जाहिर करुन टाकलं एवढं छान बाळ कोणाच्याही हातात द्यायला मन धजत नाही . आणि आताच्या आठ दिवसाच्या अनुभवावरुन मी त्याला सांभाळू शकते असा मला विश्वास आहे . वर्षा आहे मदतीला कधी आम्ही दोघी गावाला गेलो तर प्रश्न पडेल अन्यथा तू चिंता सोड मनिष बाहेर कुठेही जाणार नाही ! आमचा आनंद गगनात मावेना . समर्थांवर सगळा भार सोपवला होता . त्यांनीच मार्ग काढला . आणि हे तीन महिन्याच बाळ मोठ्या गोतावळ्यात वाढू लागलं . तसं मम्मींच्या मोठ्या वहिनी नोकरी करत होत्या त्यांच्या  तिन्ही मुलांचा सांभाळ मम्मीनीच केला होता .आलिकडेच सगळे विभक्त रहायला लागले होते त्यामुळे त्यांना करमत नसे . त्या मनापासून मनिषला सांभाळू लागल्या . त्याचा गोंडसपणा वाढू लागला.  सहा महिन्याच बाळ नऊ महिन्याच म्हणून सांगायचं अशी सक्त ताकीद होती मम्मीची . त्याच्या बाळलीलामध्ये सगळे गुंग होते मला पण निर्धास्त वाटत होते . पुढे तीन वर्षात आमचा बंगला बांधून आम्ही  रहायला आलो. पण मनिषला रोज देशपांडे वाड्यात सोडायचं त्याचा शिशुविहारचा टांगा सुद्धा वाडा-शाळा-वाडा असा होता. रविवारी व सुट्टीदिवशी पाच वाजता त्याला वाड्यात न्यावच लागायचं इतकी सवय झाली होती . दुसऱ्याचं बाळ रोज सांभाळणं म्हणजे तसं समाजात अवघडच की ! आणि देशपांडे कुटुंब गर्भश्रीमंत होतं . विघ्नसंतुष्टी लोक असतातच की . तुम्ही मुलं सांभाळता का असं विचारतात  लोक असं कोणीतरी मुद्दाम विचारायचे . पण मम्मी ठाम होत्या 
" कोणाचे सांभाळायचं असेल तर पाठवा माझ्याकडे पाहून घेईन माझं मी "
असं म्हणायच्या. त्या खूप गुंतल्या होत्या मनिषमध्ये पण कटाक्षाने मी गुंतणार नाही असं सांगायच्या त्या . पुढेपुढे तर मम्मीपेक्षा बाबाच त्याच्यावर जीव ओवाळून टाकू लागले . पाच वर्षे हे रुटीन छान चालले आणि एक दिवस मम्मींना गाईने मारल्याचं निमित्त झालं शुगर डिटेक्ट झाली पण त्यांची औषधे चुकली त्या आजारात गुंततच गेल्या एकानंतर एक आजार उद्भवले . दरम्यान आकांक्षाचा जन्म झाला. त्यांनी आधीच सांगितलं मनीषचं करते पण आता लहान बाळाचं मला जमायचं अवघड आहे . पुन्हा प्रश्न ! सहज वर्षा काकूंना बोलले . त्या लगेच म्हणाल्या मम्मींना शक्य नसेल तर सोड माझ्याकडे . मम्मींची तब्बेत खालावत गेली . मनिषची शाळा आता 11 ते 5  झाली रोज आकांक्षा आणि वेळ पडेल तसं मनिष दोघेपण  वर्षाकाकूकडे . इथुन पुढे वर्षा काकूचं पर्व सुरु झालं.


क्रमशः भाग 9

मम्मीकडे मनिष पाच वर्षांचा कसा झाला समजले नाही. नंतर मात्र  दिवसेंदिवस मम्मीचं आजारपण , दवाखाना वाढतच गेला त्यांच पहायला  , मदतीला वर्षा काकू असायच्या तेव्हा तात्या नोकरीनिमीत्त कोकणात होते. वर्षा काकूंचा भाऊ खेड्यात होता त्यामुळे त्यांचे  दोन भाचे , एक भाची, गौरी , प्रसन्ना असे सहाजणं  मिळून ते रहात होते . मम्मीचं करायचं आणि मनिषला पहायचं काम बऱ्यापैकी बाबा करायचे आणि कमीजास्त वर्षा काकू असं रुटीन झालं . आमचा काहीतर ऋणानुबंध असणार असे म्हणायचे सगळे . दरम्यान आकांक्षाचा जन्म झाला . ती जन्मता नाजूक होती . त्यावेळी बाळंतपणासाठी  आई-काका व संजू बार्शीला येऊन राहिले होते. आम्ही वडिलांना काका म्हणायचो . प्रत्येकाच्या जिवनात आईवडिलांना विशेष  महत्त्व असते . नव्हे आयुष्याची , जिवनाची सुरुवातच त्यांच्या बोटाला धरुन होत असते. पण मला माझे आईवडील  खूप वेगळे असल्याची नेहमी जाणीव होत रहाते. मी त्रयस्तपणे त्यांचा जिवनपट चाळत असते . मला तो छंदच जडलाय . चारचौघांसारखे ते मला कधी वाटलेच नाहीत त्यांची जिवनशैली म्हणण्यापेक्षा मानसिकता हटके होती . त्यामुळेच की काय त्यांच्या पोटी जन्म घेतलेल्या आम्ही सहा मुली म्हणजे त्यादोघांच अस्तित्व म्हणजे चमकदार हिऱ्याच कोंदण आणि आम्ही मुली म्हणजे कोंदणाभोवती मोत्याची कुडी होतो. दुर्दैवाने एक मोती निखळला . काळाप्रमाणे कोंदण लुप्त झालंय पण त्याची किरणे मात्र मोत्यावर चमकतात त्या आम्ही पंचकन्या . हे कोंदण त्यांचे जिवन त्यांनी घालून दिलेले आदर्श मला विस्तृत स्वरुपात  जगासमोर आणायचं आहे  . स्त्री-पुरुष समानता म्हणजे काय ? याचा कोणताही गाजावाजा न करता प्रत्यक्ष कृतीतून तो ते कसे जगले व कसे घडविले हा एक आजच्या काळात चिंतन करण्याचा भाग आहे . पाहू कसा योग येतो ते समर्थांनी बळ दिलं की सारं काही साध्य होतं , असो. 
तशी  मी रजा आधीच घेतली होती पण एक महिन्यांनी आकांक्षाचा जन्म झाला . खूप नाजूक पण खणखणीत आवाज विशेष म्हणजे पाचव्या दिवसापासून ती मनिष आणि पप्पांना ओळखू लागली, हसू लागली . सगळ्यांना खूप आश्चर्य वाटलं आम्ही प्रयोग करुन पाहिले पण तिला खरचंच समजत होतं. काका म्हणायचे पोटातला एक महिना पकडा तिचा बुद्धी एक महिन्यांनी मोठी आहे !! मजा यायची . मनिष फार खूश होता . इकडे बंगल्यात रहायला आल्यामुळे त्याला एकटं एकटं वाटायचं . मला खेळायला आली रे आसं म्हणायचा.
आकांक्षा चार महिन्याची झाल्यावर मी जॉईन झाले. तोवर वर्षा काकूंंशी बोलणं झालं होतं. त्यांच्याकडे आठवी ते बारावीच्या दरम्यानचे ते पाचजण होते. त्यात दिवसभर आकांक्षा व शाळेच्या आधी नंतर सुट्टीदिवशी मनिष  कधी त्यांच्याकडे कधी मम्मीकडे जायचा . असं रुटीन सुरु झालं .


क्रमशः  भाग 10

आता स्वयंपाकाचं चक्र व्यवस्थित बसलं होतं . पण नेहमीची जिवनशैली व लॉकडाऊनमुळे जगत असलेली जिवनशैली यात जमीन आस्मानचा फरक जाणवत होता. माणूस यंत्रवत झालाय . मुख्य म्हणजे पैशाच्या बळावर आपल्या मनाला येईल तसं वागत आहे. पण करोनाने सगळ्यांना काही बाबतीत तरी एका समान पातळीवर आणून ठेवलंय . आपली स्वतःचीच कामं स्वतः करायला जड जाते . माणूस पैसा कमावतोय पण स्वावलंबीपणा लुप्त झालायं हे खरं !  जुन्या पिढीला थोडंस नावं ठेवत का होईना आपण आळशी झालो आहोत असं वाटतंय . पण हे तात्कालिक असू शकते  भविष्यात आपली मानसिकता पुर्वपदावर येणार नाही याची खात्री नाही . नव्हे स्वावलंबीपणाचे आत्ता गायलेले गोडवे तेव्हा टोचणार . पण करोना जिवनाची मुल्यं  शिकवून मात्र नक्कीच जातोय !
      आशिषला फोटोग्राफी आवडते . फक्त एवढेच आम्ही म्हणायचो . सध्या त्याचे रोज चाललेले प्रयोग पाहून मला तरी हरकायला होतं . पाणी , ग्लास , चाळणी किंवा  शोभेसाठी म्हणून घेतलेला हत्ती ! तो गच्चीत नेऊन सुर्यास्त वेगवेगळ्या प्रकारे हत्तीभोवती पकडणे ! पाण्याच्या थेंबात सुर्य पकडणे . आडकित्त्यात सुर्य पकडणे आणि एक क्षण पकडण्यासाठी तासंतास गच्चीवर घालवणे . व्वा ! भन्नाट कल्पना वाटली मला ती . माणसाने कधीतरी स्वतःमध्ये पण डोकावायला वेळ दिला पाहिजे याची प्रचीती आली. 
आकांक्षा एक वेगळच समीकरण आहे ती खूप हुशार आहे आणि तेवढीच किंबहुना काकणभर जास्त ती कलाकार आहे . भरतनाट्यम तीन , क्लासिकल गाण्याच्या तीन , एलिमेंटरी तीन अशा वेगवेगळ्या तिच्या परीक्षा झाल्या आहेत . तीच वक्तृत्व भन्नाट आहे . अभिनय सुरेख करते ती पुढे जाऊन काय होईल याचा मला खूप मोठा प्रश्न पडतो . अभ्यास तर खूपच करते त्यातपण कुठे कमतरता तिला चालत नाही . पण तिच्यात एक कलाकार दडला आहे असे मला सतत वाटतं असते . मी मात्र तिला हवी ती मुभा दिलेली आहे त्यामुळे तिचे शिक्षणाकडे पण जबाबदारीने लक्ष देणे सुरू असते . ती नेहमीच म्हणते 
" आई मला फक्त चांगली नोकरी लागुदे मग बघ मी काय करते ते . मला आतून आपण काही तरी वेगळं केलं पाहिजे असे सतत वाटते बघ मी काय करीन ग ? आई मला वाटतं सर्वसामान्य माणसासारखे जीवन जगावे असे मला तर वाटत नाही जन्माला यावं खूप पैसे मिळवावे आणि चाकोरीबद्ध संसार करावा यात मला तरी फारशी मजा वाटत नाही काही तरी हटके केलं पाहिजे असं मला आतून वाटतं बघ . येईल ना मला माझ्या मनाप्रमाणे वागता किंवा थोडसं वेगळं वळण घेता ?"
असे प्रश्न विचारते अशावेळी मला ती गूढ वाटते , मी पण विचारात पडते हिला नेमका काय ध्यास असेल ? मी तर म्हणते माणसाला स्वतःच्या छंदांना जोपासता आलं तर माणसात दडलेलं मूल तसंच रहातं . मनिष म्हणतो मी करेल तोवर नोकरी करेन नंतर फोटोग्राफी करणार . दोन्ही मुलं अवलिया आहेत का ? का मीच अवलिया आहे ? असा मला कधी कधी प्रश्न पडतो कधीकधी काळजी पण वाटते . जगात मुलांची आणि पालकांची शिक्षण घेऊन वेल सेटल होण्यासाठी धडपड असते . इथे तर दोघेही हुशार आहेत आणि शिक्षणासाठी तर त्यांना आंम्ही कशाचीच दादाद पडू दिली नाही . आशिष व्यवस्थित सेटल झालाय ही पण त्या मार्गावर आहे पण हीची स्वप्ने मला थोडीशी वेगळी वाटतात . पाहूया काळाच्या उदरात काय दडले आहे ते . 
    माणूस संसाराच्या रगाड्यात अडकला की तेच जग आपलंसं वाटत हेही खरचं आहे . आता हेच पहा घरात खास सोलापूरला जाऊन हौसेनी आणलेला कॕरम बोर्ड !  त्यांन घरातला कोपरा केव्हा गाठला लक्षातच नाही आलं . पण गेला महिनाभर झालं तो रोज निघतो आहे आणि या तिघांबरोबर हास्यकल्लोळात रोज एखादा तास यांचा कसा जातो समजत पण नाही . सात वाजायची वाट पहात असतात ते . मानिष लहान असतांना त्याला शिकवत हे खेळायचे . सर्वसामान्यांप्रमाणे आमचं चौकौनी कुटुंब. मुलांचा आभ्यास घेणे . दोघांचीही नोकरी म्हणून यांनी सातत्याने मला मदत करणे . बंगला गावाबाहेर असल्याने गाडीशिवाय पर्याय नाही म्हणत तीस वर्षापूर्वी बार्शीत मला गाडी शिकण्यास प्रवृत्त करणे . पुढे शिक्षणानिमित्त मुलं बाहेर गेल्यावर माझी आवड लक्षात घेऊन मी पेटी वाजवणे , संघटनेत सक्रियपणे काम करणे सुरु केले . मी जे करते त्याला प्रोत्साहन देणे . अडथळा न आणता जमेल ती मदतच करणे . संजूसारख्या माझ्या बहिणीसाठी आतिशय मनापासून काही जबाबदाऱ्या उचलणं . तिच वागण्याची लकब परांडा कुटुंबातील प्रत्येकासाठीच आई-वडील , बहिण-भाऊ आणि त्याची कुठेही वाच्यता न करणं . ह्यांच जिवन सामान्य नव्हतं काही न काही कारणांमुळे आडथळ्यांची शर्यत झालं होतं . त्यामुळे आई-काका आणि हे या तिनही व्यक्तींच की ज्यांच्या  वाट्याला चारचौघांसारखे नाही तर वेगळं जिवन आलं , ते जगले आणि मी ते जवळून पाहिलं , अनुभवलं  त्यांना माझ्या जिवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे . त्यांची सर्व सुख दुःख वाटून घेतली .
    ह्यांच्यातला मला टोचणारा भाग म्हणलं तर माझ्या दृष्टीने ह्यांची आतिस्वच्छता व इतरांच जीव ओतून सगळं पहायचं पण स्वतःच्या तब्बेतीकडे दुर्लक्ष ! या दोन गोष्टी जर त्यांनी बदलल्या तर इतरांपेक्षा त्यांना स्वतःला त्याचा फायदा होईल.
    पण हे मात्र नक्की की या सगळ्याचा परिणाम मुलांच्यात दिसून येतो . सुसंस्कृतपणा आपोआप त्यांच्यात उतरला आहे . तशीच कीर्तीसारखी जोड हीपण परमेश्वराचीच इच्छा आणि कृपा पण !!
मी कीर्तीला पण सतत विचारत असते की तुला कोणता छंद आहे त्याची जोपासना कर ती म्हणते माझ्याकडे विशिष्ठ अशी कला नाही पण वाचन हा तिचा छंद आहे . तिला साहित्याची जाण आहे , वागण्यात सुसंस्कृतपणा आहे . परमेश्वर कृपेने दोन्ही मुलं छान आहेत सर्वगुण संपन्न आहेत त्याला साजेशी सून मिळाली आहे , त्याचा मला अभिमान आहे असच साजेसा जावई मिळाला की जीवनात अजून काय हवं ? सर्वांकडे शिक्षणाचे खणखणीत नाणे आहे , हिम्मत आहे तर नक्कीच आपल्याला हवे तसे जीवन जगू शकतात . पण माणसाकडे जीवनाचा समतोल साधण्यासाठी काहीतरी कला असणे हेही तितकेच महत्वाचे आहे . आशिषचा आवाज पण गोड आहे तो छान गातो . कीर्ती म्हणते मला या दोघांच्या कला पाहायला आवडते असो मी तिच्या मागे लागले आहे पेटी तरी वाजव म्हणून पाहू शिकते का !!


लाॕकडाऊन डायरी प्रकरण 3


भाग 11 ते 15


क्रमशः भाग 11


सकाळी 8 ची बँक आता पुढील निर्देश येईपर्यंत रहाणार आहे. सध्या लॉकडाऊन असल्यामुळे बँकेत फारशी गर्दी नसते मुळात लोकांना 10 च्या पुढे बँकेत यायची सवय आहे त्यामुळे पहिला एकदीड तास असाच जातो . घरातून येईपर्यंत मात्र माझी गडबड सुरुच रहाते  . सकाळच्या पोळ्यांना काही माझा हात नाही लागत . पण अगदी उत्स्फुर्तपणे कीर्ती आणि आकांक्षा दोघीजणी वाटून घेऊन काम चाललेलं असतं . 
      मागच्या आठवड्यात सोलापूर मधील करोनाबाधितांची संख्या अचानक वाढत गेली . ग्रीन झोनमध्ये आसलेला जिल्हा रेड झोनमध्ये गेला . सोलापूर शहर 3 दिवसांसाठी बंद पुकारलं गेलं . खबरदारी म्हणून पंढरपूर मग बार्शी बंदचे जनादेश निघाले . बँका अत्यावश्यक सेवा म्हणून सुरु होत्या . 
   आज सकाळी सहा वाजता मी गेट उघडत होते तेव्हा  नगरपालिकेच्या दोन झाडूवाल्या मला पाहून दारासमोर आल्या . आयटक आॕफिसला मी जात असते . जेव्हा भारत बंदची हाक असते तेव्हा बार्शीत सर्व कामगार संघटनांचा एकत्रित मोर्चा आसतो. त्या बायका मला पाहून थांबल्या , थोड बोलल्या . त्यांना थोड मन मोकळं करावसं वाटलं . हातावर ज्यांच पोट आहे त्यांची भयानक अवस्था आहे . कमवायला बाहेरच पडता येत नाही त्यांनी काय करावं . त्या म्हणत होत्या तुम्ही TV वर बघता एक प्रत्यक्षात परिस्थिती खूप वेगळी आहे. हे माहित होतच . पण प्रत्यक्ष भरडल्या जाणारांकडून विदारक सत्य ऐकायला मिळालं मन सुन्न झालं . आता आणखी काही दिवस जर ही परिस्थिती राहिली तर या अशा करोडो लोकांच कसं होणार  ? आजचं काम बुडलं की कमाई बुडली पण पोट भरायला काय करायचं हा अनुत्तरीत प्रश्न आहे.
    लॉकडाऊनला तर पर्याय नाहीच पण हे काय झालय "करे कोई भरे कोई "  
किंवा 
" कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे " 
असं होऊन बसलय सगळं . राज्य सरकार केंद्र सरकार पराकोटीचे प्रयत्न करत आहेत पण निर्माण झालेल्या परिस्थितीत ते अत्यंत तोकडे पडत आहेत . माणसाच्या 
 "अन्न , वस्र व निवारा " 
या मुलभूत गरजा
 "भागवणे"  
मुष्कील झालं आहे . माणूस सगळं सहन करु शकतो पण त्याचं पोट त्याला स्वस्थ नाही बसू देत .
     परवा आमच्या युनीटची संघटनेची मिटिंग ड्यु होती . पण एकत्र जमणे कठीण होते  म्हणून रविवारी पहिल्यांदाच आमची आॕफिस बेअररर्सची  झुम मिटिंग झाली . एकूणच परिस्थितीचा आढावा घेतला गेला . त्याहीवेळी असंघटीत क्षेत्रातील लोकांच्या एकूणच परिस्थितीवर चर्चा झाली . अनेक ठिकाणी गरजू  लोकांना अन्नधान्य वाटप सुरु होते .  20 एप्रीलला AIBEA या संपुर्ण बँकिग क्षेत्रातील सर्वात मोठी असलेल्या  संघटनेला 75 वर्षे पुर्ण झाली . अमृत महोत्सवी वर्ष !  त्यानिमित्त वर्षभर विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होतं  . पण 20 एप्रिलला काही करता आलं नाही . भविष्यात काहीतरी करावे असे ठरले .
         देशात करोनासारखं महासंकट असतांना सुद्धा सरकारने मात्र जाहीर केल्याप्रमाणे  1 एप्रीलला सार्वजनिक क्षेत्रातील 10 बँकांच्या एकत्रीकरणाचा घातलेला घाट पार पाडून घेतला . त्याला विरोध म्हणून 27 मार्चला आमचा संप होता . पण करोनाचं वादळ पहाता तो झाला नाही . पण एकत्रीकरण झाले !  पुन्हा बडे भांडवलदार आधिक श्रीमंत तर गरीब आणखी गरीब होत जाणार आहेत . खरं तर बँकांच्या राष्ट्रीयीकरणाला मोठा इतिहास आहे . तसेच प्रत्येक बँकेला भूगोलही आहे . जसं की बँक आॕफ महाराष्ट्र ही महाराष्ट्राची अस्मिता आहे तसंच प्रत्येक बँकेला त्या त्या प्रादेशिक भागात महत्त्व आहे मुख्य म्हणजे त्यात्या ठिकाणच्या जनतेशी वेगळं नातं आहे . नाळ जोडली गेलेली आहे . पण या सगळ्याची पायमल्ली करत सरकारची ही कृती आहे  . सध्याच्या या परिस्थिती नंतर निर्माण होणाऱ्या आर्थिक संकटांचा सामना करायचा असेल तर एकत्रीकरण व हळुहळु खाजगीकरणाकडे होणारी वाटचाल ही धोकादायक आहे . मुख्य म्हणजे ही मागणी ना बँकांची आहे ना कर्मचाऱ्यांची आहे ना ही आम जनतेची आहे . फक्त बड्या भांडवलदारांना मोठ्या प्रमाणात कर्जपुरवठा करण्यासाठी घेतलेला हा निर्णय आहे. की जो धोकादायक आहे . सरकारच्या या कृतीची किंमत भविष्यात मोजावी लागणार आहे . आणि पुन्हा चुकलेल्या निर्णयाचा फेरविचार करावा लागेल तोवर होणाऱ्या हानीला कोण जबाबदार ?
आज बँकेच्या एकूण व्यवहारापैकी जवळजवळ दोन तृतीयांश व्यवहार हे राष्ट्रीयकृत बँकामार्फत होत आहेत . सर्वसामान्यांच्या पैपै जमा केलेल्या बचतीतील पैसा लोक बँकेत ठेवतात . यांची मालकी सरकारी आहे म्हणूनच झिरो बँलन्स से खाती उघडली जातात . जनतेचा पैसा जनतेसाठी आहे . तो कोण्या भांडवलदारांच्या लूटीसाठी नाही . पण आजची बँकेची जी दुरावस्था आहे त्याला फक्त बडे भांडवलदार आणि त्यांना पाठीशी घालणारे सरकार आहे मग ते कोणत्याही पक्षाचं असो ! बँकांच शोषण होतंच आहे . या धनदांडग्या कर्जबुडव्यांच्या मुसक्या आवळल्या की आपोआपच बँकेची परिस्थिती सुधारेल . आणि त्यांच राष्ट्रीयीकरण अबाधीत राहिलं तर आणि तरच सर्वसामान्य जनतेचा पैसा सुरक्षित राहू शकतो . अन्यथा त्याला सुरुंग लागायला वेळ नाही लागणार . त्यामुळे या लढाईत सर्वसामान्य जनतेने  या सर्व गोष्टींकडे डोळे उघडे ठेऊन पाहिलं पाहिजे . या लढाईत बँक कर्मचारी संघटनांच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहिलं पाहिजे . कारण संकट तुमच्या दाराशी येऊन ठेपलय !
       सध्याच्या करोनाच्या महामारीत आख्खा देश नव्हे तर जग लॉकडाऊन मध्ये आहे पण बँका तळागाळाच्या लोकांपर्यंत जनधन खात्याच्या माध्यमातून मदत पोहोचण्याचं काम करत आहेत . त्यांच्या सुरक्षीततेची अपेक्षा!!


क्रमशः   भाग 12


        साडेतीन मुहुर्तापैकी एक मुहुर्त  म्हणजे "अक्षयतृतिया"  ! कीर्तीचा बार्शीला  पहिला पाडवा झाला , चैत्रागौर झाली आता दोन दिवसात बसेल ते कुलदैवत श्रीनृसिंहांच नवरात्र मग नृसिंह जयंती त्यादिवशी अभिषेक सायंकाळी जन्म मग वसंत पूजा आणि दुसरे दिवशी पौर्णिमेला  पारणं त्याला  "वैशाखी " म्हणतात . या सगळ्यासाठी दरवर्षी मुंजा, सवाष्ण-ब्राम्हण , गुरुजी असतात . पण यावर्षी कोरोनामुळे हे बहुदा घरापुरतेच मर्यादित ठेवावे लागणार असे दिसते . पण एक विशेष गोष्ट म्हणजे हे सगळं कीर्तीला आनुभवायला मिळणार आहे . तसं बहुतेक वेळा आशिष आकांक्षा जयंतीला आलेलेच असतात पण तिघेपण नवरात्र बसण्यापासून घरी असणार आहेत , परमेश्वराची इच्छा ! पण जिल्हाबंदी असल्यामुळे काका-काकींना परांड्यातून आणण्यात अडचणी येताहेत  . आता पोलिस परवानगी घेतल्याशिवाय इलाज नाही तो प्रयत्न चालू आहे . पाहू काय होतं ते . सध्या सगळं घरातल्या घरात चालू आहे बाहेरचं चटक मटक खादगी नाही मुख्य म्हणजे पाणीपुरी आणि आईस्क्रीम नाही ! कीर्ती आणि आकांक्षा दोघींचीपण हे दोन पदार्थ मिळविण्यासाठी चाललेली धडपड आणि तगमग !  काहीतरी करतात पण सगळं साहित्य उपलब्ध नाही  म्हणून मग आकांक्षा आणि कीर्ती थोड्या अस्वस्थ असतात , त्यावर उपाय म्हणून सुरु असतं काहीबाही करणं . पण मनासारखा काही मेळ बसलेला दिसत नाही . मी आपली निवांत पहात बसते .  बघा म्हणलं थोडी कळ काढायला शिका . आसो . 
           यावर्षी पावसाळा अनियमीत झाला त्यामुळे इकडच्या भागात आंब्याला मोहोरच नाही आला तर आंबे कुठून येतील . दारात एवढं मोठ्ठ आंब्याच झाड पण आंबा नाही हे जरा  चुकल्यासारखं होतय . कारण या दिवसात कैरीच्या पदार्थाची रेलचेल आसते घरात आधी छोटीशी कैरी मग तिखटमीठ लावलेल्या फोडी,  नंतर लोणच , चटणी , कायरस , मेथांबा , छुंदा ,आंब्याचा शिरा , ओला नारळ घालून वड्या , गुळांबा , साखरांबा रोज रस आणि कधीमधी जोडीला भजी शेवटी आंबा पोळी ! कित्ती पदार्थ ते , प्रत्येकाची चव न्यारीच !  पण निसर्गच तो थोडाच आपल्या मनाप्रमाणे चालेल ?  यावर्षी इकडच्या भागात बाजारात पण कैरी नाही असो . पुढच्या वर्षीची वाट पहायची दुसरं काय .
      निसर्गाच दुसरं रुप मात्र सध्या न्याहाळता येतय . हल्ली हल्ली पक्षांचा वावर खूप कमी झाला होता . पुर्वी खूप  वावर असायचा . 12/15 वर्षापूर्वी एकदा दारातल्या झाडावर  चिऊताईनं घरटं बांधल होतं . त्यात 3 अंडी घातली होती छोटी छोटी पिल्ल पण पहायला मिळाली तेव्हा . मनु आकांक्षाचा तेव्हा रोज निरिक्षण करणं हा छंदच झाला होता आणि तो सगळा अनुभव घेतांना मला खूप आनंद व्हायचा . पण हल्ली हळुहळु  चिमण्यांची किलबीलच बंद झाली होती . पण करोनाच्या शांततेमुळे पुन्हा पक्षांचा वावर वाढला आहे . परवा तर वरच्या घरात रात्री चिमणी हॉलमध्ये येऊन बसली होती . आम्ही लहान असतांना हा अनुभव रोज घ्यायचो. घेरडीत धाब्याच घर होत . आणि दरवाज्याच्या वर हवा येण्यासाठी सळया लाऊन झरोका सोडलेला असायचा . त्यातून हक्काचं घर असल्याप्रमाणे मुक्कामाला तीनचार चिमण्या यायच्या . आढी खांब याच्या वळचणीला बसायचं व सकाळ झाली की निघून जायचं हा त्यांचा नियम होता . सोप्यात दरवाज्यावर काकांनी मोठ्ठा आरसा लावलेला होता. सकाळी आरशाच्या फ्रेमवर चिमणी बसायची आणि तिच्याच प्रतिबींबाशी टोच्या मारत बसायची . कधी कधी तर इतकी ओरडायची आणि जोरजोरात चिवचिव करत भांडण करायची मग आम्हांला तिला हुसकून लावायला भाग पडायच कधीकधी . पण त्यांच प्रतिबींबाशी चाललेलं द्वंद्व पहायला काही वेगळीच मजा वाटायची .   
        आता हे अनुभव लुप्त झालेत पण सध्याच्या लॉकडाऊनच्या शांततेमुळे पहाटे दार उघडलं की आल्हाददायक गारवा त्यातच चैत्र पालवी फुटलेला आंब्याच्या पोपटी पानांचा हिरवट सुवास पारिजातकाच्या पालवीचा सुवास मन मोहून टाकतो . आणि त्याचवेळी आंगणात चिमण्यांची चिवचिव , कोकीळा कुजन,  मधुनच खूपदिवसांनी भारद्वाज पक्षाची फडफड निरनिराळे रंग वेगवेगळे आवाज आणि सुवास मन प्रफुल्लीत करतं . पाणी कमी असलं की उन्हाळ्यात झाडांना बादलीनं पाणी घातलं जातं . दारात सडा आणि झाडांना पाणी कामवाली नसल्यामुळे  कित्येक वर्षांनी हे काम माझ्याकडे आलय . पण तोही अनुभव खूप मस्त आहे . पाणी घालतांना झाड आपल्याशी बोलतात असं वाटतं . ती डोलायला लागली की नृत्य करतात असा भास होतो. दुपारी तप्त उन्हाच्या काहिलीवर सकाळच्या प्रसन्न , शितल गारवा मिळाला की येणारा दिवस सुसह्य होतो .



क्रमशः    भाग 13

    सध्या साधारणपणे रोजचं रुटीन सारखच होऊन बसलयं . महत्प्रयासाने परवा छोटे छोटे चार आईस्क्रीम मिळाले तर ते पाहून या पोरांना परमानंद झाला . सहज मिळतं तेव्हा इतकं आप्रुप कधीच वाटत नाही . मनात येईल तेव्हा व हवं तितकं खायचं हे सगळ्यांचच आहे पण सध्या परिस्थिती वेगळी आहे . तिघजण ते आणि आईस्क्रीम चार झाले . एक एक्स्ट्रॉ कोण खाणार आशा नजरा भिरभिरायला लागल्या . प्रत्येकजण एकमेकांना आग्रह करतोय पण स्वतःला मिळालं तर बरं असं प्रत्येकाला वाटतय . सगळेच लहान झालेत असं वाटलं मला ! तसंच खाण्याचं पण झालंय सगळं घरी बनवलेलं पारंपारिक खाणं सुरु आहे . काहीतरी वेगळं करायचं असेल तर एखादं काही मिळत तर काही मिळत नाही . तसं मॕफको मटार ,  पनीर , क्रीम , बटर , फ्लॉवर , ढोबळी , दुधी किंवा बाहेरुन येणाऱ्या काही  भाज्या जरा मिळतच नाही . परवा किराणा आणतांना पाणी पुरीचे दोन पॕकेट मिळाले या दोघींना काय आनंद झाला .पण रगडा करायला मटार नाही . कांदे , बटाटे , टोमॅटो , वांगी , शेवगा आणि पालेभाजी एवढं रोज मिळते . तेच आलटून पालटून करायचं , कडाधान्यं करायची . तसच कामं पण स्वतःच करत असल्याने काही कामं लक्षातपण नाही येत. सध्या भाज्यापण फारशा  नसल्यामुळे फ्रीजकडेपण फारसं नाही पाहिलं जात त्यामुळे तो डिफ्रॉस करायचा राहून गेला . आईस्क्रीमचा गोंधळ पाहून परत दुसरे दिवशी मिळु शकेल म्हणाल्यामुळे आज यांनी पुन्हा जाऊन चार आईस्क्रीम आणले जास्त मिळेना . आणुन ठेवलेले आईस्क्रीम खायला  काढण्यासाठी मनिषने फ्रीजर उघडला तर त्याला बर्फाचा हिमालय झालेला दिसला . त्यांन कुलरला वापरु म्हणून स्क्रु ड्रायव्हरने तो बर्फ उचकला हे पण होते त्याच्याबरोबर आणि तो जोरात ओरडाला आई तुला भाजीला मटार सापडले .आम्ही तिघीजणी  
" आणि काय हवं " मधला "पुरणपोळी " 
हा भाग पहात बसलो होतो . हे बाहेर आले आणि म्हणाले आता मटारची उसळ वगैरे होईल एकदोन वेळा पुरतील एवढे मटार सापडलेत बघ फ्रीजमध्ये . खजाना हाती लागला की काय असं आकांक्षा-कीर्ती पळत फ्रीजकडे आल्या . पाठोपाठ मी पण आले पाहिलं तर चांगले एकदीड किलो मटार असतील ते . दोघीजणी खूष ! चला आता पाणीपुरीचा मस्त रगडा होतोय तर ! मनिष म्हणतोय बरं झालं ना आता भाजीला ? मी म्हणलं वेड्या भाजी कसली म्हणतोयस आता याचा चारपाच वेळेस तरी नक्की उपयोग होणार दोनतीन वेळा रगडा एकदा पावभाजी . तर हळुच म्हणतोय मटारच्या करंज्या होतील काय ? बघा मग कसं वाढत चाललं सगळं .
      मला पुर्वी एक "SSY" म्हणजे सर्व सिद्धी समाधी योग असा क्लास होता त्याची  आठवण झाली 21 दिवसांचा कोर्स असायचा शेवटचे तीन दिवस ते ठिकाण न सांगता मुक्कामी न्यायचे सगळं त्यांचच असायचं . खायला अगदी मोजून दिलं जायचं . सगळेजण ताट स्वच्छ करायचे कारण काय तर अन्न कमी दिलं जायचं . भरपूर फी भरुन आरोग्यासाठी लोक करायचे हा कोर्स ! परत आल्यावर मात्र प्रत्येकजणाला अन्नाची किंमत कळायची . तसं काहीसे झालेय या कोरोनामुळे . सगळी मुल्यं समजु लागली आहेत . सर्व काही पैशाने होत नाही जनजिवन सुरळीत असलं पाहिजे निसर्गचक्र व्यवस्थित चाललं पाहिजे . कशाचाच अतिरेक नसला पाहिजे . तसच
 मनावर पण ताबा ठेवता आला पाहिजे .


क्रमशः भाग 14


        या लॉकडाऊनमुळे काय अनुभव यायला लागलेत खरं पण मजा आहे ! 30 एप्रिल हा माझा जन्मदिवस ! तसं लहानपणापासून वाढदिवस साजरा करणे असं काही फारसं माहेरी नव्हतं आणि लग्नानंतर पण इकडे सासरी तसंच . त्यामुळे सेलिब्रेशन किंवा केक करणे या भानगडीत मी कधी पडले नाही . मनिषचा जन्म श्रावणी पोळ्यादिवशीचा, पिठोरीचं वाण असतं त्यादिवशी आमच्याकडे त्यामुळे दरवर्षी पुरण आणि वाण ठरलेलं असतं . तोच वाढदिवस म्हणतो आम्ही तर आकांक्षा दिवाळीनंतर त्रिपुरारी पौर्णिमेची ! वाढदिवसाचा म्हणून एखादा जास्तीचा ड्रेस दिवाळीतच घेऊन ठेवायचा आणि रविवारी पाणीपुरी करायची . ती फार भुणभुण करायची आपण का नाही करत वाढदिवस म्हणून . पण आजकाल पुण्यात गेल्यामुळे  होस्टेलवर मैत्रिणी करतात त्यामुळे बरं आहे .
     आता लॉकडाऊनमुळे सगळे बार्शीला आहेत, तर करु काहीतरी खायला असा मी विचार केलेला. सध्या बँकेत काम कमी म्हणून पुन्हा रोटेशननी काम करुयात तर हो-नाही चाललेलं . काय ठरते ते मला कळवा असं सांगून मी 29 ला बँकेतून घरी आलेले सुट्टीचं नक्की नाही म्हणून कोणालाच बोलले नाही. 
     सकाळी उठले तर मँनेजरचा मेसेज होता आज तुम्ही  येऊ नका म्हणून, बरं झालं म्हणलं . तोवर कीर्ती आली मला शुभेच्छा दिल्या . मी तिला सांगितले मला सुट्टी आहे तर होका एवढच म्हणाली . मी लवकर जाते बँकेत , तोवर मनु आकांक्षा उठत नाहीत  , तर आज  7.30 लाच मनिष खाली आला तु बँकेत जाशील म्हणून तुला शुभेच्छा द्यायाला उठलो म्हणाला , मी सुट्टी घेतली म्हणलं तर होका म्हणाला . 10 मिनिटांत आकांक्षाच पण तसंच झालं . मी सुट्टी सांगतेय आणि,हे तिघे एकमेकांकडे बघतात मला कळेना . पुन्हा स्वयंपाक घरात माझं काम सुरू झालं कीर्ती म्हणाली आज मी सँडवीच करणार तुम्ही खावा मीच करणार सगळं,  बरं म्हणलं . मग स्वयंपाक पण झाला . मी आतच होते मग आकांक्षा म्हणाली 
" तू अचानक सुट्टी घेऊन आमचा पोपट केलास आता तिकडे जाऊन बस आम्हांला काहीतरी करायचय तु बघायचं नाहीस " 
मग लक्षात आलं मी दोन वाजता परत येईपर्यंत काहीतरी करायचा यांचा प्लँन होता . यांना माझी अडचण झाली दिसतय  . असो म्हणून मी हॉलमध्ये बसले दोनतीन तास त्यांचे अथक परिश्रम चालू होते. मनिषची पण लुडबुड सुरु होती . पुन्हा जेवायची वेळ झाली सगळे बसलो जेवायला . तर सकाळी केलेलं सगळं तेच होतं . आरे काय केलय दाखवा तरी म्हणलं तर चार वाजता बघ आता तु आराम कर म्हणाले .बरं , असुदे म्हणलं परत झोपले . मग मला whatsapp  करतात या दोघी 
"आपली गरज आहे या इकडे " .
मी गेले तर दोघीपण छोटासा चेहरा करुन बसलेल्या . ओमफस्स झालंय काहीतरी हे लक्षात आलं माझ्या .
       पाहिलं तर मनिष फींगर चीप्स आणि या दोघी केक करणार होत्या . एक केक बिघडला म्हणून जेवणानंतर त्यांनी दुसरा केलेला तर दोन्ही केक दगड होऊन बसलेले ! आता काय करावं ? दोघी रडकुंडीला आल्या . मी तर कध्धीच केक केलेला नाही आकांक्षाला पण येत नाही कीर्तीला पण नाही पण ज्योती आणि युट्युब follow करुन केलेला केक पुर्ण बिघडला होता . केक, ढोकळा , सुरळीच्या वड्या आणि चायनीज याच्या मी नादी लागत नाही . एकदोन वेळा केलेला प्रयत्न फसल्यामुळे पुर्वीच नाद सोडला मी . याचं आकांक्षाला फार वाईट वाटतं ती सारखी माझ्या मागे असते . सगळे करताता आई आपण पण करु . बरोबर दोन वर्षापुर्वी तिने याकारणास्तव ओव्हन घ्यायला लावला . पण तो सध्या कव्हर घालून वरच्या घरात असतो . आकांक्षाला आता कीर्तीची जोड मिळाली आणि ठरवला त्यांनी बेत . चार वाजता सुंदर केक कापतांना फोटो काढून ग्रुपवर , स्टेटसला टाकायचं असं  त्यांच ठरलेलं . रोज सगळ्यांचे फोटो स्टेटस बघुन त्यांच्या तोंडाला पाणी सुटत असतं .म्हणून अगदी हिरिरीने दोघींनी युद्धाच्या तयारीसारखी तयारी केलेली पण स्वप्न भंग पावलं त्यांचे 
सगळी मेहनत पाण्यात !  मुख्य  म्हणजे सगळे फॕमिली ग्रुप काहीतरी सरप्राईजची वाट पहात आसणार सगळा पचका झाला असं त्या तिघांना वाटू लागलं . मला एकदम मी आणि मायडीनं बदलापूरला केलेल्या तिळगुळाच्या वड्यांची आठवण झाली . संक्रांतीच्या हळदीकुंकासाठी  आम्ही पण महत्प्रयासाने दुपारभर राबराबून वड्या केल्या कशातरी त्या झाल्या . भाऊजींच्या येरझाऱ्या सुरु होत्या . काहीतरी बेत फसलाय हे लक्षात आलेलं त्यांच्या . आम्ही त्या वड्या  स्टीलच्या कुंड्यात भरुन ठेवल्या थोड्या वेळांनी भाऊजींनी वरची वडी घेण्याचा प्रयत्न केला तर आख्खा कुंडा उचलला गेला . भाऊजी आम्हांला चिडवू लागले
 "काय घातलाय बहिणी बहिणींनी गोंधळ
  बजरंग बली की जय "
  म्हणून उचलावी लागतेय वडी !  असंच काहीसं आजच्या केकचं झालंय. हसून हसून पुरेवाट झाली तेव्हाही आणि आजही ! परवा मागच्या आठवड्यात ढोकळा पण साधला नव्हता . यावेळी मग ठरवलंय केक आणि ढोकळा जमलाच पाहिजे आपल्याला काय चुकतं ते आपण पाहू . 
       मग फक्त फिंगर चिप्स खात फोटो काढायचं ठरलं . मग पुन्हा छान आवरुन बसायचा आग्रह . आम्ही खात असतांना आकांक्षा व कीर्ती उठुन आत गेल्या . दीड महिन्यापासून सगळे घरातच असल्यांने गीफ्टची शक्यता नव्हती . तरी उत्सुकता ताणली गेली. हात मागे बांधुन दोघी बाहेर आल्या . मग एक सुदंर पाकिट दोघींनी माझ्या हातात दिलं आणि सांगितले हे पाकिट घरातल्या कागदापासून अतिशय कल्पकतेने आकांक्षाने बनवलय आणि आतलं आहे ती कीर्तीने ! काय आहे बघ आमची उत्सुकता ताणली गेली . मग पाकिट उघडलं तर आतमध्ये चार पानी पत्र 
"सौ. कीर्तीकडून सौ .आईनां! "
मग ते उघडून मी वाचलं आमच्या पहिल्या भेटीपासून आजपर्यंतचा प्रवास आणि त्यात्या वेळच्या तिच्या भावना खूप सुंदर लिहिल्या आहेत तिने त्या . सुंदरशा पत्राची भेट ! कल्पनाच इतकी भन्नाट वाटली न मला. यापेक्षा सुंदर गीफ्ट काय आसू शकतं माझ्यासाठी  ?
मग त्याच वाचन केलं मी , थोडा वेळ भारावल्यासारखं झालं वातावरण . कीर्तीला लिहायची सवय आहे . वाचनही भरपूर आहे . त्याची झलक दिसली . मी पण परमेश्वराकडे हे एकच मागणं केलं देवा सर्वांना चांगली बुद्धी दे नात्यातला गोडवा समृद्ध होऊ दे . सर्वांना सुखी ठेव !
      मग आमच्या कुटुंबाला प्रीय असलेला फक्कड चहा झाला . आज ज्योतीला फोन करुयात ढोकळा आणि केक उद्या जमलाच पाहिजे हा निश्चय केला .पुन्हा हास्स्याचा कल्लोळ सुरु झाला . कॕरम निघाला आणि उद्याचा केकचं नियोजन करत  खेळ सुरु झाला.




कीर्तीकडून मिळालेलं पत्र 
30/04/2020



Dear mom-in-law 

( आहो आई )



आशिषची आई , माझ्या होणाऱ्या सासुबाई , mom-in-law , अग्गबाई सासुबाई आणि आता आहो आई असा आपला प्रवास!
       एप्रिल महिन्यात तुमचा वाढदिवस आणि आपल्या भेटीचासुद्धा !  सासुबाई
ह्या व्यक्तीमत्वाचा खरं तर बागुलबुवा होता माझ्या मनात . मैत्रीणी , बहिणी ह्यांच्याकडून ऐकून एक व्यक्तीरेखा तयार होत गेली होती . त्या प्रतिमेला तडा देत मला भेटलात तुम्ही ! Cool सासुबाई !
       पहिल्या भेटीतच 
" शगुन के कंगन " 
म्हणत हातात बांगड्या घालून मिठी मारली ना तेव्हाच समजलं मला की मज्जा येणार आहे खुपच ! हे रसायन काही वेगळंच आहे :-)
           पहिल्या दिवसांपासून अगदी आजपर्यंत दडपण कधी येऊनच नाही दिलं मला कोणताही event असो , तुमचा उत्साह आम्हां तरुणांना लाजवेल असा असतो . सुनेच्या 25 व्या वाढदिवसाला 25 गिफ्ट्स करुन सरप्राईज देणाऱ्या सासु आणि नणंद असतात का कुठे ? मैत्रीणीच आहात तुम्ही माझ्या !
मग आला साखारपुडा .
" केले की जमतेच " 
हे तुमचे ब्रीदवाक्य : आमची केतकी नाचु शकते ? ते ही इतके छान ? मानलं राव तुम्हाला ! कार्यक्रमाला रंगत आणाली ती तुमच्या कवितेने . सर्वांनाच डोळ्यासमोर आमची Arranged Love story  अगदी Film सारखी दिसली .
       एकच वर्ष झालंय तसे . पण आठवणी उफाळून येत आहेत . ब्लाऊजवरुन झालेला राडा तर आठवायलाच नको ! बाळासारखी समजूत घातलीत तुम्ही माझी  . माझी आई असती तर रागावली असती शिस्तीत . आणि खरंच तुम्ही म्हणालात  तसं आता एक नंबरचं ब्लाऊज वाटतेय ते मला .
         लग्नाची धामधूम सुरु करायच्या तयारीत असतांना एकदम मी अजारी पडले . ह्यापुर्वी कधी ताप न आल्यांने जरा घाबरलेलेच होते मी . आई-बाबा सुद्धा टेन्शनमध्येच होते . तेव्हा तुम्ही मला पत्र लिहिलेले . आज ही मी अधूनमधून वाचते. धीर येतो वाचतांना खरच . घाबरायचं नाही आजिबात हे शिकते आहे मी तुमच्याकडून . जशी एक आकांक्षा तशीच दुसरी कीर्ती हे नुसते लिहीण्यापुरतं वाक्य 
नाहीच . ते प्रत्येक गोष्टीमध्ये जाणवतसुद्धा होतं मला . 
           आई-बाबा पण नेहमी उल्लेख करतात की काळजींच नाही इतकं छान सासर मिळाले आहे तुला असंच म्हणतात नेहमी . शंभर टक्के सत्य !
    कुठल्याशा serial मधल्या त्या शुभ्रावरुन आपलं सुरु झालं अग्गबाई सासुबाई पर्व ! रोजचे GM चे मेसेज चुकत नाहीत आणि दिवसभर गप्पाटप्पा नाही झाल्या तर चुकल्यागत वाटते . असे करत लग्नाच्या तयारीत दिवस भराभर पळत होते . लग्न महिन्यावर  आले आणि चक्क तुम्ही आशिषला pre-wedding shooting साठी आग्रह केलात . खरंच परत कधीच झालं  नसतं की ! मज्जा आली हो खूप.
     हा हा म्हणता लग्न झालं की .... चि.सौ.कां.ची  झाले मी सौ.कुलकर्णी ! तसा बार्शीमधला मुक्काम धावपळीतच गेला . एकटं awkward किंवा नविन अशा भावनांचा लवलेशच नाही कुठे. 
         न्युझीलंड ट्रीप पुर्ण करुन घरी परत येणे जीवावर आलेलं. आरे संसार संसार सुरु करणे सोप्प आहे का ?  तरी तुम्ही येते म्हणालेलात त्यामुळे काळजी नव्हतीच . प्रदीर्घ प्रवास करुन एकदा घर आलेलं तेव्हा इतकं बरं वाटलं . पहाटे 6 ची वेळ पण उत्साहाला वेळकाळ असते का ? चक्क डोळे चोळत फुलांचा गुच्छ घेऊन तुम्ही , पप्पा आणि आकांक्षा तयार होते स्वागताला .......मस्त वाटलं ओ ! शीणच ओसरला प्रवासाचा . 
         पुढचे दिवस मस्त घरात सामान लावणे , स्वयंपाकाच्या काकू ठरवुन देणे अशी मस्त घडी बसवून दिलीत. सर्व डाळींपासून ते किसलेल्या गुळापर्यंत सगळं आणलेलं . प्लँनिंग किती perfect करायचं असतं हे पण शिकते आहे मी तुमच्याकडून !
         संध्याकाळी आल्यावर कुलुप बघायची सवय लगेच 5/6 दिवसात मोडलीच की . व्यायाम करायचा , चहा प्यायचा , गप्पा मारायच्या बार्शीला गेलात ना तेव्हा घर खायला उठलेलं मला आणि आशिषला.
पाकशास्त्रामध्ये माझे प्रयोगातून विज्ञान सुरू होतेच. कोरोना मुळे इकडे बार्शीला आले तसे सुरू झाले अहो आईं चे पर्व.
बाकी जग ठप्प झाले असले. तरी ह्या कोरोना मुळे मिळालेला वेळ आपल्या दोघींसाठी सुवर्णसंधी ठरली.
मला जमेल की नाही किंवा मला जमतच नाही... अशी माझी सुरुवात असते नेहमीच. तुम्ही मला इतकं मस्त motivate केलत ना..
पाककला सोप्पी मुळीच नाही पण अवघड मात्र नक्कीच नाही.. हे वाक्य बिंबवले माझ्या मनात.

पापडासारख्या पोळ्या बनवणारी मी हा हा म्हणता पदार्थ बनवायला शिकले की ओ! उडीद वडे, साधी पोळी, वरण फळे, थालीपीठ, भाकरी आणि साग्रसंगीत पुरणपोळी सुद्धा!! अबब..! माझी आई, आजी, मावश्या विस्फारून माझे पदार्थांचे फोटो बघत असतात. अनिरुद्ध ने तर पुण्यात आमच्याकडे राहायला येणार असेच सांगितले. पाककलेच माहीत नाही पण confidence नक्कीच वाढलाय माझा
All credit to अर्थातच: अग्गबाई सासूबाई!
आणि तुम्ही मला इतकं लाडावून ठेवलंय ना.. ऑफिसच ट्रेनिंग पूर्ण केल्यावर ice cream देणार म्हणून promise केलं आणि चक्क खरंच एकदम ice cream आणलं सुद्धा. त्या ice cream ची मज्जा काही औरच! Ice cream मधे लाड आणि प्रेम उतरलं होते भरभरून!
सौ बातो की एक बात: लाडकी लेक, लाडकी बहिण सगळ्याच असतात. लाडकी सून बनायला भाग्य लागते. अशा भाग्यवान सूनेकडून सुपर डुपर मस्त सासूबाईंना पहिल्यावहिल्या पत्रातून वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा!
तुमचीच,


लाडकी सूनबाई!!






क्रमशः   भाग 15


        एकूणच माझा वाढदिवस स्मरणात राहिल असा साजरा झाला . दिवसभर फोन चालूच होते. संध्याकाळी  ज्योतीचा फोन आलाच . केक , ढोकळा , सुरळीच्या वड्या व चायानीजसाठी तिच्याकडे ट्रेनिंग घेणार हे ठरवून झालं. आदलेदिवशी या दोघींचा फोन झालेला होता मग काय झालं विचारणा सुरु होती. आम्ही दोघी बोलल्यावर हे लक्षात आलं की प्रत्येक वेळी बेकींग पावडर ही फ्रीजमध्ये ठेवलेली बरीच जुनी वापरण्यात येत होती . पुन्हा रात्रीच मी जाहिर करुन टाकलं उद्या सकाळी मनिष बेकिंग पावडर व सोडा आणेल व आम्ही रव्याचा केक करणार . 1 मे कामगार दिनाची सगळ्यांना सुट्टी होती . आज पहिल्यांदा हापूस आंबा मिळाला होता . आणि कैऱ्या पण . सोडा व बेकिंग पावडर या  छोट्या दोन वस्तूंसाठी  सकाळी दुकानासमोरच्या मोठ्या रांगेत मनिषला उभं रहावं लागलं . म्हणलं बरोबर आहे केक तर आठवणीत राहिलाच पाहिजे . रसाचा बेत केला . आणि आम्ही केक करायला 4.30 वाजता सुरुवात केली . उगाचच सगळ्यांची उत्सुकता वाढली होती .सुट्टी होती त्यामुळे कैरीची चटणी , पन्हं मेथांबा आणि उपासासाठी शेंगदाण्याचे लाडू इतक्या कामाचं नियोजन होतं.  मनिष आणि हे इतक्या उकाड्यात उगाचच केक बघायला स्वयंपाकघरात येऊन बसले . केकचा कुकर व्हायला वेळ लागत होता . उगाचच  मनिषला चैन नव्हती  एवढावेळ बसण्यापेक्षा सगळ्यांसाठी उखळात कुटुन  लाडू करण्याची जबाबदारी त्यांने स्वतःहून घेतली .आणि तेल सुटेपर्यंत शेंगदाणे कुटून मस्त लाडू केले . तोवर केक काढायची वेळ झाली . परवा महाभारतात वस्त्रहरणाच्या सीनमध्ये लज्जारक्षणासाठी  द्रौपदी जसं डोळे झाकून  "हे श्रीकृष्ण " म्हणत होती तशी प्रार्थना  आकांक्षाने कुकरभोवती प्रदक्षिणा घालून केली .
 "आमच्या केकची ख्याती खूप गाजलेली आहे आमच्या आईने सर्वदुर आजच्या केकचा डंका पिटला आहे हे श्रीकृष्णा वाचव केक चांगला  फुगू दे " 
आणि कुकरच टोपण उघडले असता लुसलुशीत टम्म फुगलेला केक पहायला मिळाला आणि आनंदाने दोघी उड्या मारु लागल्या . 
त्यानंतर आता विविध प्रकारच्या केकची आणि ढोकळ्याची घोषणा झालेली आहे . यथावकाश तेही पदार्थ घरी तयार होतीलच . कारण तीन मे ला लॉकडाऊनची मुदत संपत असली तरी तिसरा लॉकडाऊन जाहिर होणार आहे त्यामुळे पुढच्या 15 दिवसांसाठी नविन खादगी शिकायला आणि खायला मिळणार . या आठवड्यात आता पहिला आठवडा म्हणून मला भरपूर काम आहे . पेन्शन , पगार , जनधन मदत तसेच नृसिंह-जयंती पण आहे . सोलापूरला करोनाची संख्या रोज वाढतेय त्यामुळे बार्शी बरेच कडक केलंय त्यामुळे ह्यांना परांड्याला जाता येत नाही . त्यामुळे जयंतीला काका-काकी येणं कठीण वाटु लागलय .दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागते . विविध प्रमाणपत्र लागत आहेत शिवाय  प्रवासासाठी वयाचीपण अट आहे  65 पेक्षा जास्त वयाला प्रवास नाही करता येत .पाहू कसं मँनेज करता येतंय ते . नाहीतर 18 मे पर्यंत शांत बसणे . इलाज नाही 
         केक चवीला पण छान लागला दिसायला पण छान दिसला . चला तर मग अजुन एका पदार्थात वाढ !


लाॕकडाऊन डायरी प्रकरण 4


भाग 16 ते 20



क्रमशः    भाग 16


    नृसिंह जयंती आणि वैशाखी हे ज्याचं कुलदैवत आहे त्यांच्याकडेच असल्याने याला थोडसं सणाचं स्वरुप येतं . गेल्या 30 वर्षात फक्त जवळच्या नातेवाईकाच्या लग्न किंवा मुंजीला गेल्यामुळे दोनतीन वेळी मी नव्हते . नाहीतर आम्ही सगळे एकत्र वैशाखी करतो विशेष म्हणजे आत्याकडे ( मुलांची प्रतिभा आत्या ) नसल्यामुळे त्या दरवर्षी येत असतात . त्यांची उन्हाळ्याची सुट्टी परांड्यात असते . पण लॉकडाऊनमुळे त्याही पुण्याहून येऊ शकल्या नाहीत . सध्या काका-काकी मात्र नेहमीप्रमाणे त्यांची वाट पहातात . लॉकडाऊन कधी संपणार विचारतात . काय सांगावे त्यांना  ?  बालपण आणि म्हातारपण सारखेच असतं म्हणतात . त्यामुळे मुलांच्या भेटीसाठी त्यांनी अतुर असणं सहाजिकच आहे पाहू आता सुरळीत होण्याची वाट पहाणे .
      पुर्वी सणाला आम्ही परांड्याला जायचो हल्ली सगळे बार्शीला असतात . काका-काकी परांड्यात आम्ही बार्शीत असं कधी होत नाही . हल्ली मुलांच्या रजा , परिक्षा यामुळे त्यांना कधीकधी यायला जमलं नाही पण एकत्र असण्याचीच सवय आहे . यावेळी आशिष-किर्ती आकांक्षा घरी आहेत पण काका-काकी नाहीत ती रुखरुख मनाला लागली . फोनवरून बोलणं झालं फक्त  . 
       तसं काकींच कडक सोवळं , व्रत-वैकल्य , कडक उपवास अशी धाटणी होती . कट्टर मराठवाडी बाणा !  त्या नेहमीच आत्मकेंद्रीत राहिल्या . फारसं स्पष्टपणे बोलणं नाही .पण त्यांनी मला हे करण्याचा आग्रह कध्धीच केला नाही . त्या स्वतः करत रहायच्या . तयारी करुन ठेवायच्या करावे अशी अपेक्षा मात्र स्पष्ट जाणवायची . मी पण ते आनंदाने केलं अजुनही करते . आता काळही बदलला आहे व्याप वाढला आहे . मग मी पण त्यात सोयीस्कर बदल करत आणले आहेत . पण मी करेल ते चालवून घेतात सगळेजण . काळानुरुप चालणं गरजेचं आहे हे सर्वांना पटते त्यामुळे सणवार पण एखाद्या समारंभासारखा करण्याचा माझा प्रयत्न आसतो . थोडाफार पुढच्या पिढीचा पण विचार करायला हवा . कोणतही औडंबर न वाटता समाधान मिळालं पाहिजे ! आईचं थोडफार सोवळं असायचं ते लहानपणी  पाहिलेले . एकूणच  सुवर्णमध्य साधण्याचा माझा प्रयत्न आहे .
       काकांच मात्र बिनबोभाटपणे काम सुरु असतं . याही वयात ते स्वस्थ बसत नाहीत त्यामुळे त्यांची तब्बेत व्यवस्थित असते . थोडा अस्थम्याचा त्रास पहिल्यापासून आहे . सत्तर वर्षापूर्वीचे ते सोलापूरच्या दयानंद कॉलेजचे ग्रॕज्युएट आहेत . इंग्लिशवर चांगली कमांड आहे . काकी पण त्यांना सातवीत मिळालेल्या स्कॉलशिपवर केलेली ही अंगठी आहे असं बोटातली आंगठी दाखवून म्हणत असतात . गेल्या तीस वर्षापासून मी पहाते या दोघांच्याही तब्बेती अशाच तुडतुडीत आहेत . आत्या व काका पण तशेच . आमच्या घरातला एक निखळलेला तारा म्हणजे काका ( सुनिल भाऊजी )  . त्यांच्या आकाली जाण्यांने उलटसुलट घडल्यांने नको त्या परिस्थितीला तोंड द्यावे लागले . आशिषच्या लग्नाच्यावेळी आई-काका व सुनिल भाऊजी-सुखदा यांच्या उणीवा प्रकर्षाने जाणवल्या . त्यात्यावेळच्या भावना पण मी लिहून ठेवल्या आहेत . भाऊजींची मात्र उणीव नेहमीकरता भासतच रहाते . उतारवयात काका-काकींना रुखरुख आहे . पाडवा , वैशाखी , गौरी-गणपती , दसरा , दिवाळी या सगळ्या सणाला आम्ही एकत्र असायचो . मुलांशी काकाच आतूट नातं होतं . त्यामुळे आशाप्रसंगी मनात घालमेल होते व या सगळ्या आठवणी प्रकर्षाने होतात . काळ हेच यावरचं औषध आहे !
     पण यावर्षी घरात आकांक्षा , नविन जोडी असल्याने वातावरण छान होतं . कोरोनामुळे सगळे सोपस्कार  घरातल्या घरात पार पडले तरी नृसिंह जयंतीला सगळ्यांनी छान आवरुन तयार झालो सगळ्यांनी उपास केलेला मग थंडगार खरबूज , पन्हं , थोड्या गप्पा , रात्री जेवण असा कार्यक्रम पार पडला . कीर्तीला हे सगळं नविन होतं  पण सगळीकडे कुतुहलाने निरीक्षण व शंका विचारणं सुरु होतं . दुसरेदिवशी पुरण होत त्यामुळे मग ते तर तीच करणार हे तिने ठरवून टाकलेलं  . याठिकाणी आपला नंबर लागू शकत नाही हे आकांक्षाला माहित होत म्हणून आदले दिवशीचं मी करणार हे तिने ठरवलं . त्याप्रमाणे दोघींनी आपला नंबर येण्याची वाट पाहिली . त्यामुळे यावर्षी स्वयंपाकाला बाई नव्हती तरी उत्साहानं स्वयंपाक झाले तेही उत्तम !! चला कोरोनाच्या निमित्ताने हाही एक प्रयोग !! काम टाळण्यासाठी नाही तर करण्यासाठी दोघांचीही चढाओढ असते . कीर्तीकडून नेहमीच काहीतरी केलेलं ऐकायला मिळतं त्यामुळे केतकी , आई-बाबा , आजी , आत्या , मावशा सगळेजण ऐकायला उत्सुक असतात . खुप कौतुक वाटतं सगळ्यांना . आता आम्हांला केव्हा तुझ्या हातचं खायला मिळणार असं बोलणं चाललेले असतं . ती पण खूप उत्सुकतेने वाट पहातेय मी कधी हे करुन घालणार सगळ्यांना . इकडे आमच्या फॕमिली  ग्रुपवर पण सगळे रोज फोटोची वाट पहात आसतात . आणि मग चर्चांना उधाण येतं . सध्या आमच्या ग्रुपला
 " आम्ही सारे खवय्ये " 
असं नाव द्यावसं वाटतय . चला आता लॉकडाऊन संपायची वाट पहायची . आता लवकर कोरोना निर्मुलन होऊन जनजिवन सुरळीत व्हायला पाहिजे असं  वाटतय खरं !!!


क्रमशः   भाग 17


            सोलापूर जिल्हा रेड झोनमध्ये आहे पण कोरोनाबाधित रुग्ण सोलापूर शहरात आहेत त्यामुळे शहर वगळता जिल्ह्यातील इतर ठिकाणी लॉकडाऊन मध्ये थोडीफार शिथिलता आणली आहे . तीन मे नंतर बार्शीत हळुहळु तुरळक दुकाने उघडत होती . बऱ्याच दिवसांनी फोन करुन पहिल्यांदा चष्म्याच दुकान गाठलं . फ्रेम तुटल्यामुळे एक महिन्यापासून स्पेअरमधला चष्मा वापरतेय पण रोजच्या सवयीचा चष्मा मला हवा आहे . तो मिळेल आता सोमवारी .  उकाडा वाढतच होता . वैशाख महिन्यात 43/44 तापमान असतेच . त्यामुळे हैराणी होत होती . आशिष-किर्तीला रात्री झोप होईना . पिळून निघाल्या सारखे व्हायचे . आंम्ही दुकानदाराला आधीच फोन करुन ठेवला होता त्याप्रमाणे आम्हांला तीन तारखेला एसी आणता आला . त्यामुळे त्यांना  चढता उन्हाळा सुसह्य होऊ लागला . सगळ्यांना हुश्श्य झालं . आणि तापमानांन रोजचा  44 चा पारा गाठला , 8 दिवसांपासून धगधगत्या भट्टीसारखं वातावरण होतं , पण आम्हांला एसी व कुलरमुळे थोडीफार  त्यावर मात करता आली . 
       आज रविवार 10 मे सगळ्यांनाच सुट्टी  ! आज दुपारी परवाच्या राहिलेल्या पुरणाच्या गरम पोळ्याचा बेत होता . पुरण मुरल्यामुळे जायफळ आणि वेलचीचा जरा जास्तच कैफ चढला होता . त्यामुळे सगळ्यांनी दुपारी ताणून दिली . चार वाजता इतके झाकाळून आलं , विजांचा कडकडाट होऊ लागला , सोसाट्याचा वारा सुटला तसे जागे होत सगळेजण कट्ट्यावर येऊन उभे राहिले आणि वातावरणाचा रंग पाहून  चातकासारखी पावसाची वाट पाहू लागले  . काळेकुट्ट ढग मधुनच पळत होते पाऊस पडेल की पळून जाईल असं वाटत असतांनाच पावसाला सुरुवात झाली . आणि आर्धा तास तुफान पाऊस ! सुरुवातीला तप्त मातीवर पावसाचे थेंब आणि त्याचा येणारा सुगंध हावऱ्यासारखा सगळ्यांनी घेतला थोड्याच वेळात सगळीकडे पाणीचपाणी ! समोर मैदांनावर रस्त्यावर पाणी सुसाट पळू लागलं . क्षणभर वाटलं  परवाच नृसिंह जन्म झालाय . हिरण्यकश्यपूचा वध केल्याप्रमाणे कोरोनाचा वध तर होत नाही न  ? बघता बघता वाटू लागलं या वाहत्या पाण्यातून कोरोनाला वाहून घालवण्यासाठी हा पावसाचा  घाट घातला आहे का  ? इतका पाऊस पडून आकाश निरभ्र झालंय तशी या पावसात पृथ्वी कोरोनामुक्त होईल का ? काही सांगता येत परमेश्वराची लिला अगाध आहे . माणसांने विज्ञानात खूप प्रगती केलीय , सगळं मुठीत घेतलंय असं म्हणत असतांना सगळं फोल ठरवत एका झटक्यात मुसक्या आवळल्या गेल्यात जग काही दिवस नव्हे तर अनेक महिने मागं गेलंय . सगळी पृथ्वी माझीच म्हणणाऱ्या माणसाला त्याची जागा दाखवलीय . असो निसर्गाचा समतोल साधला जावा व पुर्ववत आयुष्य सुरु व्हावे एवढी अपेक्षा . कारण आपण इतका पैसा ,  वीज वापरुन मिळणारा एसीचा थंडावा आणि दहा मिनीटांत निसर्गाने दिलेला गारवा ! आहाहा !! निसर्गाची कशाशीच तुलना होऊ शकत नाही . बार्शीला तीन दिवसांनी पाणी येतं त्यामुळे झाडांना दिवसभर इतकं उन पेलल्यावर रोज सकाळी त्यांच्या बुडाशी आर्धी बादली पाणी मिळायतंय  त्यामुळे कशीबशी  तग धरुन आहेत ती  . पण शेवटी निसर्गच तो ! आर्ध्या तासात  वातावरण इतकं बदललं की माणसं सुद्धा सगळी लहान मुलांसारखी उल्हासीत झाली . आकांक्षा-कीर्तीने पहिल्या पावसात भिजायचा आनंद लुटला तर दवबींदू पकडायला मनिषचा कॕमेरा सज्ज झाला . पोर्चमध्ये खुर्चीवर बसून आम्ही दोघेही या आनंद सोहळ्यात सामिल होत होतो . काहीतरी काम करण्याच्या निमित्ताने पावसात पळत जाऊन परत येण्याचा मोह आम्हांला पण नाही आवरता आला . आशिष-कीर्ती मधुनच आपल्या पावसाळ्यात ट्रेकींगचं नियोजन केलं आहे त्याचं काय होणार हा विचार करतकरत या क्षणी पहिल्या पावसाचा आनंद लुटू लागाले . पावसात सगळे गार झाले आणि जे वातावरण निर्माण झाले ते पाहून अनुभवुन लगेचच आकांक्षाला कदमची भजी , देशपांडे वडेवाले आठवले सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटलं . पण काहीच मिळणार नव्हते . फक्त चर्चा करुन गाप्प बासावे लागणार होते . मग  एकमेकांकडे पहात सगळ्यांना डोळ्याची भाषा उमगली आकांक्षा-कीर्तीने पळत स्वयंपाक घर गाठलं . घरात ब्रेड होताच मग बघता बघता गरमागरम ब्रेड पकोडे आणि वाफाळलेला चहा तयार झाला त्याचा अस्वाद घेऊन सगळे तृप्त झाले  . पुन्हा कॕरम आणि रात्री कट्ट्यावर बसून आईस्क्रीम आणि गप्पा . पण पुन्हा कोरोनामुक्तीची अपेक्षा करत  सध्यातरी कोरोनासाठी आवश्यक असलेली काळजी घेत काम करण्याचा निश्चय करत शुभरात्री केल ! कारण कालच प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांच्याशी
" कोरोनाशी लढतांना अर्थाचा भार पेलतांना " 
या संघटनेनी आयोजित केलेल्या फेसबुक संवादात सहभागी होऊन मनोधैर्य वाढवण्याचा सकारात्मक प्रयत्न केला आहे  त्यामुळे प्रत्यक्षात फरक पडेपर्यंत लस निघेपर्यंत वाट पहावी लागणार आहे ! त्यांनी सांगितले आहे तुर्तास 2020 च कॕलेंडर मनात गुंडाळून ठेवा . मनोधैर्य वाढवा , परिस्थिती जेवढी लवकर निवळेल तो आपल्याला मिळालेला बोनस समजा म्हणजे हे बुडतंय अशी रुखरुख नाही लागणार . चला मग सकारात्मकतेने कामाकडे वाटचाल !!



क्रमशः  भाग 18

       कोणत्याही नवीन गोष्टीचा अनुभव घेताना
 " नव्याचे नऊ दिवस "
 म्हणत रोज नवा अनुभव देऊन जातो . आणि कोणतीही मानसिकता तयार व्हायला परिस्थिती मान्य करायला 21 दिवस लागतात असे म्हणतात . कोरोनाच्या बाबतीत तसंच झालं म्हणायला हरकत नाही . ही एक आपत्ती आहे हे सर्वांनाच माहित होतं पण तोही सगळ्यांना पहिलाच अनुभव की  ! सगळे फक्त ऐकून होते .
 " दुरुन डोंगर साजरे " 
या उक्तीप्रमाणे संकट पण लांब असेल तर त्याच्या झळा फारशा नसतातच . 22 मार्चला एक दिवसाचा कर्फ्यु जाहीर झाला . दिवसभर बाहेर न जाता पाच वाजता सगळ्यांनी टाळ्या पण वाजवल्या . पाठोपाठ संकट दारात येऊन उभं ठाकलं म्हणलं की परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता पहिला लाॕकडाऊन जाहीर झाला . संमिश्र भावना होत्या सगळ्यांच्या . रोजच रुटीन गर्रकन वळुन पुर्णपणे वेगळीच जिवनशैली सुरु झाली . गरगर फिरणार जिवनचक्र कुठल्यातरी शक्तीने जगच्या जागी रुतवल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली . 
       लहान मुल रडरड रडतं मधुनच त्याला आनंद वाटेल असं काही दिसलं की रडतरडत ते हसायला लागत डोळ्याबरोबर नाकातून पाणी गळत असतं रडूनरडून दमलेलं असतं ते . डोळे आणि गाल लालबुंद होतात आणि थकवा येतो मग झोप येते . त्याला काहीच कळत नसतं तशी माणसाची अवस्था कोरोनामुळे या लॉकडाऊनमध्ये झाली . काय होतय तेच कळेना . सगळेच घरात बंदिस्त आहेत काहीच  काम नाही काही पण भरपूर कामं आहेत  . नातेवाईक , स्नेही , सहकारी यांच्याशी फोनवरून  गप्पाटप्पा मेसेजेस वेगवेगळ्या पाककृती , विविध कलाविष्कार, लिखाण , कविता तसंच भावनांच पण होतय .  हसताहसता एकदम गंभीरपणा भितीयुक्त वातावरण निर्माण होतं असं एक न दोन अनेक आविष्कार ! व्यक्ती तितक्या प्रकृती आहेत एवढ खरं . 
     इकडे जसजसा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढेल तसातसा दुसरा तिसरा आणि आता चौथा लॉकडाऊन सुरु झाला . तोतो माणसाचा धीर सुटत गेला तेचतेच करायचा कंटाळा पण आला तर इकडे हातावरच पोट असणारांना पोट स्वस्थ बसू देईना . मग गावाकडे जाण्याची धडपड मिळेल त्या वहानाने , गाडीने , सायकलवर प्रसंगी चालत लहान , मोठे,  स्त्री-पुरुष सगळेच प्रत्येकाच्या सोयीप्रमाणे आपापले निर्णय घेऊ लागले . शासनव्यवस्थापण तोकडी पडू लागली . माणूसच तो थोड्याफार फरकाने प्रत्येकाची विचारसरणी अशीच होत गेली आज 26 मे म्हणजे जवळजवळ सव्वादोन महिन्यांपासून परिस्थिती अशीच आहे फक्त मानसिकता बदलत गेल्या . पण सध्या इकडे तरी उलटच चाललय सगळं . कोरोना वाढतोय तसं वातावरण शिथिल होत चाललंय पण एक मात्र नक्की  माणूस स्वतःच स्वतःची काळजी घ्यायला , कोरोनासह जगायला शिकायची धडपड करताना दिसू लागलय . परिणाम  काय होईल हे आज तरी सांगता येत नाही पण जनजिवन सुरु करावं लागणार हे नक्की . कारण आपल्या रोजच्या व्यस्ततेतून  दोनतीन दिवस वेळ काढायला सुद्धा  तयार नसणारी माणसं दोन महिन्यांपासून जागच्या जागी थांबलीत , घरात आहेत . 
      आशिष-कीर्ती , आकांक्षा आणि आम्हीसुद्धा याला अपवाद असू शकत नाही  . यापरिस्थितीत  एकत्र आहोत , नविन नाती जगता येतात नवनवीन पाककृती शिकायला व शिकवायला मिळतात त्याचा आनंद आहे . विचारात व परिसरात मोकळेपणा आहे लांब असण्याची काळजी नाही . तशी कामं सगळ्यांना आहेत . पण रोज तेच कपडे घालायचे व समोर लॕपटाॕप घेऊन घरातच आपापल्या जागेवर बसायचं . तसा टाईमपास पण चांगला होतो कॕरम , पेटी , टीव्ही गाणी .  तसं बार्शीत तिसऱ्या लॉकडाऊनमध्ये बरीचशी शिथिलता होती . इकडे रुग्णसंख्या ठराविक ठिकाणी वाढतेय पण वातावरण आणि परिसरातील स्थिती पाहून नियमात शिथिलता येतेय . बार्शी तसं सुरक्षित आहे पण परगावच्या लोकांची ये-जा वाढली त्यामुळे काळजी पण वाढते . पाठोपाठ चौथा लॉकडाऊन जाहीर झाला पण बाहेर लोकांचे व्यवहार बऱ्यापैकी यापैकी सुरळीत झालेत . घरात मात्र तेचतेच करायचा कंटाळा येऊ लागला आहे . फारसं नविन काही घडत नाही तर रोज तेच काय लिहावं म्हणत माझ पण लिखाण बंदच आहे .  
      परवा सहज गप्पा मारत बसलो . लग्नानंतर कीर्तीची मिरजेला दोन दिवस येतीजाती झाली व तिचे आई-बाबा पुण्याला अगदी धावती भेट देऊन गेले त्यानंतर प्रत्यक्ष भेट कोणाचीच झाली नाही . केतकी तर लगेचच कोकणात गेली . माहेरी गुजगोष्टी , हितगुज करायला कीर्तीला वेळच मिळाला नाही . मध्येच केतकी तिकडे आजारी पडली मग बाबा व पुन्हा आई असे आजारपणाचे सगळ्यांचे नंबर झाले . फोन झाला की मला सगळं सांगायची . बाबांची तब्बेत बरी नव्हती तेव्हा म्हणाली नेहमीसारखं असतं तर विकेंडला मिरज ट्रीप झाली असती . तेही बरोबरच आहे लांब असलं की हुरहुर लागते मनाला तेच प्रत्यक्ष भेटीने समाधान होते तिची तगमग मला उमजत होती . मला वाटलं थोडी घालमेल तर होतच असणार तिची म्हणून तिच्या  मनात हळुवारपणे  डोकावायचा प्रयत्न केला . जरा गप्पा मारल्या थोडेसे मग तिला जरा बोलतं केलं . पण परिस्थितीप्रमाणे विचार करते ती असं जाणवलं . आणि एकूणच आम्ही गप्पा मारतांना , मैत्रिणी ,  नातेवाईक यांच्याशी बोलताना आत्ताच्या घडीला आपला लग्न समारंभ झाला , फिरुन येणं अगदी व्यवस्थित पार पडलेय सगळे सोपस्कार पार पडलेत त्यामुळे तसा ताण कोणाच्याही मनावर नाही व आतातर बार्शीत एकत्र रहाता येतय हेच खूप महत्त्वाचे आहे स्थिरता तर आहे होईलच की हळुहळु सुरु अशा तिच्या भावना आहेत . बरं वाटलं मला पण मोकळेपणानं बोलल्यामुळे . नविन आहे निश्चिंतपणे तिने रहावं असेही वाटते . आई-बाबांशी फोनवर होतात गप्पा . भेट झाल्यासारखे वाटावे तेवढंच मनाचं समाधान म्हणत कधीकधी video call कधीमधी आजी ,  आत्या , मावशीबरोबर गप्पा होतात . पण एकंदर खुष आहे काळजी नाही हे जाणवलं . 
      दुकाने उघडली म्हणल्यावर मागच्या आठवड्यात आम्ही दुपारी जरा बाहेर जाऊन आलो . तेचतेच कपडे त्यांना घालायचा व मला पहायचा कंटाळा आला म्हणून थोडीफार खरेदी केली . आल्यापासून मनिष तर बाहेर गेलाच नव्हता . सगळे फिरुन आले म्हणल्यावर त्याला पण  काहीतरी वाटलं आणि बसल्या बसल्या रविवारी तो म्हणाला 
" काय बाबा कायकाय ठरवलेलं मी  विकेंडला पिक्चर पहायचा  ,  हॉटेलमध्ये जायचं आता पावसाळा सुरु झाला की मस्त ट्रेकिंगला जायचं गाडीवर बसून लांब फिरुन यायचं तर कधी फोर व्हीलरनं लाँग राईड मारायची . ते एकदम बंद आणि हे काय झालं बाबा कंटाळा आलाय आत्ताच्या आत्ता बाहेर जावसं वाटतंय " . 
मग मी म्हणलं 
" उठ आणि गाडीवर गावाबाहेरुन एक चक्कर मारुन या दोघेजण " .
या घडीला तर तेवढंच शक्य आहे मग जाऊन आले दोघेजण बायपासवरुन चक्कर मारुन . फार बरं वाटलं बाहेर चक्कर मारल्यावर म्हणाला  .
     मागचे  आठदहा दिवस झाले कीर्ती-आकांक्षा माझ्या  मागे लागल्यात क्रमशः पुढचा भाग येत नाही का लिहीत नाही  . आलाच पाहिजे . कीर्ती तर म्हणाली सुगारणपणा छान लिहीलात आता बिघडलेलं पण लिहा की  . भविष्यात ते वाचायला मजा येईल . आणि हो ते तुमच्या भाषेत सांडग्याची माझ्याकडून झालेली  "राखुंडी" किंवा पोळीभाकरीच   
" दुपटं " हे पण वाचायला आवडेल . तसे माझे असे  अनेक शब्द आहेत की जे आईकडून वारसा हक्काने आलेत ते आम्हा बहिणींमध्ये ! सगळे एकत्र जमलो की हमखास ते शब्द ती वाक्य वापरल्याशिवाय भेट झाल्यासारखे वाटत नाही . आमची मुलं तर त्याच्या पुढची पायरी आहे . हळुहळु अनुश्रीला माहित झालंय पण सलग दोन महिने सहवासात आल्यामुळे कीर्तीला माझे बरेचसे ठेवणीतले शब्द काही वाक्यं माहित झालीत .  काहीकाही किस्से फोड करुन सांगावे लागतात . तिला त्याच्या मागचे किस्से सांगितले की मग मजा येते . मनिष म्हणतो आई बऱ्याच गमतीजमती हीला माहिती व्हायला दोनतीन वर्षे लागली असती पण हीला तर सहा महिन्याच्या आत सगळे माहित होतय . आसुदे म्हटलं  " ठब्ब  " परिवारात लवकरच मिक्स होतीय ती ! ठब्बचीही वेगळीच कथा आहे !!
         ठीक आहे उद्या लिहिते  म्हटलं आगोदर मला जरा आलेली मरगळ तरी झटकू दे . मग ताजतवान होऊन तुझ्या बिघडलेल्या पदार्थांचा स्वाद पुढच्या भागात चाखू  !!



क्रमशः  भाग 19

माझी आई आणि पाककलेच शास्त्र !!


      माझी आई म्हणजे साक्षात अन्नपुर्णेचा वरदहस्त लाभलेली जणू लक्ष्मीच ! साधा शिळ्या पोळ्याचा चुरा करुन कांदा , भरली मिरची घालून चरचरीत फोडणी टाकली तर 
" आहाहा काय खमंग वास येतोय "
असे म्हणत सोप्यात बसलेल्याने स्वयंपाकघरात आलच पाहिजे . किंवा तोंडाला चव नाही म्हणत काही न खाता वाड्यात झोपलेल्या आजारी माणसाला तिने पेज करुन दिली तर ती पिऊन तरतरी आली बाबा म्हणत त्यांन उठून बसलंच पाहिजे . तसंच काही सण समारंभाला केलेला साग्रसंगीत स्वयंपाक असो की साधं लसूण मेतकूट घालून केलेलं खुमासदार भडंग असो . मसाले , मेतकूट , चटणीपूड , सांडगे , मुरांबे लोणच्यासारखे वार्षिक पदार्थ असो की दिवाळीचा तिखट-गोड फराळ असो  . एक न दोन कित्तीतरी पदार्थ तिने करावे आणि खाणाराने तृप्तीची ढेकर द्यावी .  प्रत्येक पदार्थाला तिच्या हातची खास चव असायची . मन लावुन करण्याची तिची पद्धत होती . त्याहीपेक्षा समोरच्याने मनापासून खावे व तृप्तीची ढेकर द्यावी अशी त्या नवराबायकोत ( आई-काकामध्ये ) जणू स्पर्धा असायची . बाजार आणण्याचा काकांचा उत्साह तर त्याचं अमृत करुन समोरच्याला तृप्त करण्याचा आईचा स्वभाव . 
घराजवळून जातायेता दिसणारी एखादी सून असो लगेच तिला 
"बस दोडा दोन घास खाऊन जा "
असं म्हणत हाताला धरुन बसवुन खायला घालायचं नाहीतर एखादी माहेरवाशीण आलेली दिसली की
" नवजुनं दिसतंय तुझ्याकडे बस दोडा घटकाभर खाऊन जा " 
असं म्हणत काहीतरी डीशमध्ये घालून डीश पुढ्यात ठेवली जायची पुन्हा 
" घे आजून एक तुकडा " 
म्हणत आग्रह करायची . कामाच्या बायकांना
 " आधी दोन घास पोटात घाल मग पाणी पिऊन काम कर "
असं म्हणणार . सढळ हाताने करण्याची दोघांचीही वृत्ती तिथे त्यांनी हिशोब कधी केलेला मी पाहिलाच नाही . 
        आपण कोणताही पदार्थ करताना सात्त्विक भाव ठेवावा जशी आपली मनाची अवस्था असते तीच चव पदार्थात उतरते असं ती  म्हणायची . म्हणून घरच्या बाईने समाधानी वृत्ती ठेवली तर घर समाधानी असतं असं बारिकसारिक गोष्टी तिने मनावर लिलया बिंबवल्या .      संस्कार असेच घडत असतात हाताला धरुन नाही करावे लागत . आईचं अध्यात्माचं अफाट वाचन  होतं कोणतही औडंबर न करता  काळाबरोबर चालणारी सर्वसमावेशक वृत्ती असे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते तिचे . 
        तिच्याकडून पदार्थ करायला शिकायचं हे मुली म्हणून आम्हीच नाही तर पुतण्या , सुना , जावा , नाती , शेजारी , स्नेही आणि कोणीही उत्सुक असायचं . कोणीही घरी आलं तर ते दोन घास खाल्याशिवाय परत जात नसे व मुख्य म्हणजे खाणाराच्या ते स्मरणात रहात असे . मग त्याला ते शिकण्याची आस लागे अशी सुगरण आई होती माझी . 
         तिला शिकवायला पण फार आवडायचं  .  ते शिकवत असतांना अनेक टीप्स द्यायची ती  दोनतीन वेळेला शिस्तीत समजून ते सांगत असतांना काय करु नये तसं केलं तर पदार्थ कसा बिघडतो हे तिच्या खास शैलीत हसतखेळत सांगायची की शिकणाराला ते अगदी लक्षात रहायचं . मायाळु होती तसेच  शिस्तीचा दंडूका पण होता तिच्याकडे  मजा घेत शिकायचं असं पाककलेचं शास्त्र  शिकवणारं जगातलं भारी विद्यापीठ होतं ते .
            वारसाहाक्काने आईच्या पाककलेबरोबर शब्दभांडारपण माझ्यातच नव्हे तर तिच्याकडून शिकणाऱ्या प्रत्येकात आलं आहे . मुली , नातींमध्ये तर भिनलय ते .
       कोणतीही वस्तू भाजतांना किंवा तळतांना त्याला आच कशी द्यावी म्हणजे तो पदार्थ कसा 
" खमंग "
 होतो ,  कमी आच झाली तर कसं कच्च होतं तर
 "फराफरा स्टोव्ह किंवा गॕस " सोडला तर कशी
 "राखुंडी" 
होते हे ती सांगायची .
पोळी कशी
" आलवार लाटावी "  लाटताना
 " खटांगखटांग " 
 आवाज करु नये किंवा भाकरी कशी 
" न्ह्याsssर"  
थापावी 
" गौऱ्या बडवू नयेत "
 पचल्याशिवाय उलथणाने उलटू नये असं सरळ न सांगता 
" लगेच खुरप खुपसू नये "
असं म्हणायची .  पोळी किंवा भाकरी फार पातळ केली तर 
 " पापड किंवा पानगी "  
झाली म्हणायची तर जास्त जाड झाली तर  
" दुपटी बडवून ठेवली " 
असं म्हणायची .
कोणतीही वस्तू भाजतांना ती हलवण्याचं कौशल्य पणाला लागायचं तिच्यासमोर . सुरवातीला मोठा गॕस मग भाजतांना जरा
 "हात सरासरा  हालवावा "
   " टराटरा " भाजायचं नाही
 " टाँगटाँग " आवाज करायचा नाही . भाजत भाजत वस्तू हलकी होते हालवतांना तसं जाणवतं . अशा खास ठेवणीतले शब्दप्रयोग , वाक्यप्रचार असायचे तिचे . नंतर नंतर तिला दिसणं कमी झालं होतं तर वस्तूच्या वासावरुन व ती हलवतांना जाणवणाऱ्या हलकेपणावरुन ती भाजल्याचं तिला ओळखता यायचं . मग मंद आचेवर भाजून गॕस बंद करुन तसंच ठेवले की वस्तू
 " खमंग "
होते . असं भन्नाट गणित होतं तिचं . 
असे प्रत्येक कृतीसाठी 
" आडीच घरं तिरके चालणारे "
 शब्द वापरायची .  त्यात दबाव किंवा कुजकेपणाचा लवलेश नसायचा . गंमतजंमत करत शिक्षण असायचं ते . तिच्याकडून  100%  मार्क मिळवायचे म्हणजे भरुन पावल्यासारखं वाटायचं . तिच्या वयाच्या बायकांपासून अगदी परवापरवापर्यंत आकांक्षाकडून  सुद्धा सुगरणपणाचे धडे तिने गिरवून घेतलेत . या सगळ्या बिघडलेल्या पदार्थांना किंवा करण्याच्या चुकीच्या पद्धतीला तिचा खास शब्दप्रयोग होता.
" उंडग्याचा येभाव "
 तो आमच्याकडे प्रसिद्ध आहे अगदी भाजी मोठी चिरलेली दिसल्यावर मी नुसतं शोभा म्हणून हाक मारली की ती हसत विचारते 
 " वैनी येबाव झाला का हो "
      तिच्या सुगरणपणाबरोबर तिचे खास शैलीतील शब्द भांडार पण मला माझ्यातच नव्हे तर आम्हा सगळ्यात असल्याचे जाणवते  व मग जात्यावर बसली की ओवी आठवते तस प्रसंगानुरुप तिचे शब्द ओघाने येतात .
       सध्या लाॕकडाऊनमुळे घरात रोज पाककलेचे ज्ञान पाजळलं जातंय त्या निमित्ताने आईची प्रकर्षाने आठवण होते .  माझ्या लहानपणी ती तरुण होती . गोंडाळ शरिरयष्टी , गोरा रंग , आंबाडा , नऊवारी साडी आणि समाधानी सात्त्विक वृत्ती . डावा गाल थोडासा वर उचलत हसण्याची लकब होती तिची . खेड्यात रहाणं होतं शेती त्या अनुषंगाने येणारा राडा , जनावरांचा राबता असे असले तरी स्वच्छतेच्या बाबतीत तिचं ठरलेलं असायचं . केस पुसायला पांढरा स्वच्छ पंचाच असायचा तर शक्यतो मलमलचे पांढरे ब्लाऊज घालण्यावर भर असे . गबाळेपणा , आळशीपणा तिच्या आसपास फिरकत नसे . प्रसंगानुरुप निटनेटकं , प्रसन्न  रहायचा शिरस्ता होता तिचा . तसंच खाण्यात पण चविष्ट , सात्त्विक असलं पाहिजे . काका गेल्यानंतर पुढे आठ वर्षे होती ती पण फार समजुतीनं आणि धोरणानं वागणे होतं तिचं . नाविण्याची आस असल्यामुळे अगदी नातवंडांबरोबर तिचे मित्रत्वाचे संबध होते . जुनाट विचार तिला स्पर्श पण करत नसत . आई म्हणजे असं भन्नाट व्यक्तिमत्त्व होत.
      आशिषचे लग्न जमल्यापासून क्षणोक्षणी तिची आठवण येत राहिली अजूनही येतेय . आत्ता समजा कीर्तीसोबत तिला रहायला मिळालं असतं तर कोण कौतुक वाटलं असतं तिला .
      परवा मजा अशी झाली सकाळी मी भाजी करायचे शेजारी कीर्ती पोळ्या करायची गप्पागोष्टी चालू असायच्या हाताबरोबर माझं तोंडही चालू असायचं  ( भाजीच्या कृतीसंदर्भात ) आणि तिला पण भाजी केल्याचा फील यायचा . एक दिवस आळूची भाजी करायची होती सगळी तयारी करुन ठेवली व तोंडी कृती सांगून गेले . पण करताना तिला गडबडायला  होऊ लागली . दहाबारा  मेसेजेश आले तिचे मला . मग सविस्तर कृती लिहून पाठवली . भाजी छान झाली . मी घरी आल्यावर गप्पा मारत बसलो हसुनहसुन बेजारी .
परत एकदा सांडग्याची भाजी करायची होती . मी करतांना तिने  पाहिली होती परत एकदा कृती  सांगितली आधी सांडगे तळून घे व त्यातच कांदा फोडणी टाक . मी बाजूला सरकले . कढई जरा जास्त तापली असावी त्यामुळे  तेल जास्त तापलं तिने गडबडीने सगळे सांडगे एकदमच त्यात टाकले . मी चहा पीत होते वास आल्यावर  पटकन  उठून मी सांडगे काढले अन ओघातच म्हणून गेले आग आग 
" सांडग्याची राखुंडी झाली बघ " 
आणि पुढची कृती सांगून मी 
वेळ झाल्यामुळे बँकेत गेले . आम्हांला दोघींनाही अंदाज आला होता पण दुपारी जेवताना आम्ही एकमेकींकडे हळुच पाहिलं व हसत गप्पच बसलो . भाजी बऱ्यापैकी करपट लागत होती . जेवतांना मनिष पटकन म्हणाला 
" वेगळी लागतीय न भाजी " 
मग आम्ही हसायला लागलो कीर्तीनं उत्तर दिलं 
" अरे , सांडग्याची राखुंडी झाली"
 मग एकच हाशा पिकला . मग लक्षात आलं की मी शेजारी असले की लक्ष दिलं जातं  तिला सांगितले जातं मग आमच ठरलं की  सगळी तयारी करुन ठेवायची पण मी गेल्यावर तिने भाजी करायची . व भाजी करत असतांना मोबाईल बाजूला ठेवायचा . आणि आजून एकदा सांडग्याची भाजी तिने करायची. 
      पुन्हा एकदा भाकरी करता करता पीठ घट्ट झाल्याने भाकरी पसरेचना चांगलीच जाड झाली पटकन मी म्हणून गेले पीठाला थोडेसे पाणी लावायला हवं होतंस पीठ घट्ट झालंय आणि भाकरी झाल्यावर हातात धरुन 
" आगं दुपटं झालंय हे "
असं सहजच बोलून गेले .
असे आईचे शब्द ओघाने येत रहातात मग कीर्ती विचारत रहाते 
" म्हणजे काय " 
मग तिला विस्ताराने आजीचा किस्सा सांगावा लागतो . अच्छा असं आहे काय म्हणत ती चूक सुधारण्याचा प्रयत्न असतो तिचा . पुढच्या भाकरी मात्र चांगल्या जमल्या .
         असे मधूनमधून काही किस्से घडतात . पुढे एकदोन दिवस चघळायला तो विषय असतो आमच्याकडे . मग परवा कीर्तीच म्हणाली बिघडलेल्या केकचं वर्णन ऐकायला आणि पुन्हा पुन्हा वाचायला व आठवायला मजा येते . राखुंडी आणि दुपटं तर स्मरणात राहिलच पाहिजे तुम्ही लिहाच मग तिच्या हट्टापायी  हा लेखनप्रपंच !!!



क्रमशः   भाग 20


कोरोनासह जगणं हळुहळु आपल्या सगळ्यांच्या अंगवळणी पडलंय असं काहीसं सध्याचे वातावरण आहे असं म्हणायला हरकत नाही . कारण चार लाॕकडाऊन झाले आणि आता अनलाॕक 1.0  सुरु झालेय . आता पुर्ण अनलाॕकची वाट पहायची त्यासाठी लसीकरण होणे गरजेचे तोपर्यंत कोणीच त्याविषयी काहीच वक्तव्य करु शकत नाही किंवा हमी देऊ शकत नाही हे तितकेच खरे . 
          इतके दिवस सुरक्षित असलेल्या बार्शीला आणि अनेक ठिकाणी ग्रामीण भागात नविन रुग्ण सापडू लागले आहेत . चिंता वाढतेय पण लोक आपणहून स्वतःची  काळजी घेत आहेत . सोशल डिस्टनसींग , मास्क , सॕनिटायझर हे जिवनाचे अविभाज्य घटक मानत जनजिवन सुरळीत व्हायला लागले आहे . आणि तेच गरजेचे आहे कारण सक्तीपेक्षा स्वेच्छा प्रभावीपणे काम करते . माझी आयुर्वेदीक औषधे परवा मिळाली त्याच्याबरोबर ज्योतींने वेळेत सुचीत केल्याप्रमाणे सगळ्यांसाठी अँटीव्हायरसचा डोस पण मिळाला आहे . त्यामुळे थोडंस निश्चिंत वाटतेय . बाकी उद्योग व आॕफिसेस पण टप्प्याटप्प्यांनी सुरु व्हायला लागले आहेत . आयटीवाले WFH करु शकतात पण मेकवाल्यांना प्रत्यक्ष जाव लागू शकतं . गेल्या आठवड्यात मनिष म्हणाला कीर्तीच्या  एका मैत्रिणीला पुण्यात यायला सांगितले आहे ती रत्नागिरीहून पुण्याला जाईल रविवारी येत्या  . कीर्तीला अजून नाही पण दहाबारा दिवसात जाव लागू शकतं . ते ऐकुन अचानक मला उगाच पोटात खड्डा पडल्यासारखं वाटलं . मोहात आडकणे चांगले नव्हे व मोहात आडकवणे त्याहून योग्य  नाही . समजते पण उमजत नाही असं काहीसं म्हणावे लागेल . पण लगेचच मी स्वतःला सावरलं .
तसं तर आशिष-आकांक्षा कित्येक दिवसांनी इतके दिवस बार्शीला राहिले यावेळी सोबत कीर्ती आहे .आडीच महिने एकत्र रहायची सवय झाली . माझी जिवनशैली काय होती हे पुर्णपणे विसरलेय मी व सध्याचा दिनक्रम आंगवळणी पडलाय माझ्या  . घरकामाचा ताण पडतोय पण सहवासाच्या आनंदापुढे तो फिका वाटतोय . घरात सगळ्यांना कीर्तीने खुप लळा लावला आहे . छान वाटतं सगळे मिळून रहायला हे जरी खरं असलं तरी त्यांच-त्यांच काम , रुटीन सुरु होणे हेही महत्त्वाचेच की !! त्यामुळे मनाला समजावून सांगितले .
     आता एक जुनपासून माझी बँक 10 ते 5 सुरु झाली त्यामुळे पुन्हा आमची जोडगोळी एक तास कट्ट्यासमोर उभी रहातेय . मुख्य म्हणजे माझी सकाळची धावाधाव कमी झाली . 
         पाडवा झाला , वैशाखी झाली आता वटपौर्णीमा !
काल ठरल्याप्रमाणे कीर्ती सकाळी 6.30 लाच खाली आली छान आवरुन आम्ही दोघींनी पुजा , आरती , कहाणी 8.30 वाजता सगळं झालं आमचं !! मग कहाणीवर चर्चा ,  फोटो नेहमीप्रमाणे सुरु . एक गोष्ट माझ्या लक्षात आली की या नविन पिढीला सगळं जाणून घ्यायची इच्छा आहे , त्यानिमित्ताने जिवनक्रम बदलतो , नविन कपडे घालायला मिळतात , खाण्यात वैविध्य येतं फक्त हे नव्या पिढीला  कसं पचनी पडेल त्या पद्धतीने द्यावं हे मात्र घरच्या मोठ्यांच कसब आहे . कारण change of work is rest या उक्तीप्रमाणे कोणतच औडंबर न करता मजा घेत जिवनाची लज्जत वाढवली पाहिजे मग  समाधान मिळतं . त्यामुळे बोजडपणा , सोवळे या गोष्टी न लादता मुलांच्या कलाने काही गोष्टी घेतल्या तर सर्वांना सुख समाधान लाभते .
परवा कीर्ती म्हणाली लग्नानंतर मी दीड महिना पुण्यात व  अडीच महिन्यापासून बार्शीत रहातेय . अगदी काहीही सांगितले तरी मी कुठे काय आहे ते सांगू शकते वर असेल तर घेऊन येऊ शकते फक्त जिन्यात मांजर नसले पाहिजे !!
      " मांजर आणि कीर्ती "
हे एक अजब समिकरण आहे . मुली पाल झुरळ पाहून किंचाळतात , पळत सुटतात हे माहित होतं . पण हीला मांजर दिसले की ही पळत सुटते .  खुर्चीवर , बेडवर जाऊन उभी रहाते खुप घाबरते . तिला लहानपणी मांजराची भिती बसलेली आहे . बार्शीत तर जिन्यातून , खिडकीतून आसपास  बऱ्यापैकी मांजरांचा वावर आहे . तिची भिती मोडावी म्हणून मी अनेक प्रयोग करतेय .  परवा कंपाऊंड वालच्या पीलरवरआंब्याच्या सावलीत  मांजर झोपलं होतं . आम्ही सगळे होतो तीला चल पहायला म्हणलं तर लहान मुलं पडायच्या भितीने कसे घट्ट पकडतात तसं पकडून ती बाहेरच्या कट्ट्यावर उभी राहिली. तिला मांजर चालताना बिबट्या चालतो असा भास होतो म्हणाली . मांजर मान कशी करतं पहातं कसं याची मजेदार प्रात्यक्षिके ती करुन दाखवते त्याचबरोबर लहानपणी केतकीने मांजरावरुन कसं ब्लॕकमेल केलं हेही किस्से तिने सांगितले . जसं की तिच्याबरोबर अंगणात यायचं असेल तर केतकीची सायकल काढून ठेवणे , तिच्या वाटणीची कामे हीने करणे अशा गंमती जमती सांगितल्या . बाहिणी-बहिणींची भांडणं आणि प्रेम याला कशाचीच उपमा नाही देता येत हे मात्र खरं . 
      मग तिला म्हणलं कट्ट्यावर आलीस की मांजर दिसते म्हणतेस मग बागकाम कसं करणार ? कारण ती पंधरा दिवसापासून माझ्या मागे लागलीय आपण भाजी लावू . परवा छान पाऊस झालाय , वातावरण बदललय आता लावू शकतो आपण . मग एकीकडे मी व एकीकडे आकांक्षा ही मध्ये उभी राहून मोठ्या हौसेनी मेथी , कोथिंबीर , वांगी व भेंड्या याच्या बिया लावल्यात . आज सकाळीच कोथिंबीरीचे छान कोंब पण दिसले . पाहू आता कशी भाजी येते मुलांना कितपत खायला मिळते !


लाॕकडाऊन डायरी प्रकरण 5



भाग 21 ते 25




क्रमशः भाग 21

कोरोना आणि सौ. ज्योती व श्री मुकुंद घळसासी यांच्या लग्नाचा  रौप्य महोत्सव !!


  
         बार्शीला खूप वर्षांनी यावर्षी मृग नक्षत्रात जूनच्या पहिल्याच आठवड्यात  पावसाला सुरुवात झाली . आणि जीवाची काहिली काहीशी शमली . सगळीकडे वातावरणात सुखद गारवा जाणवतोय . उन्हाळ्याच्या  कडाक्याने तप्त झालेली धरणीमाता तृप्त झाली आठदहा दिवसांत लगेचच सगळीकडे हिरवळ दिसू लागली . निसर्गाची कीमया ! मनाला व तनाला पण अल्हाददायक वाटते आहे . कोरोनाचा प्रभाव अजून कमी झालेला नाही उलट वाढलाच आहे . पण जनजिवन सुरळीत होऊ पहातय . पुणे-मुंबई , सोलापूर , औरंगाबाद याठिकाणी तर संख्या वाढतेच आहे . अधुनमधुन बार्शीत पण रुग्ण सापडतात पण प्रमाण कमी आहे . पण लोक हळुहळु कोरोनासह जगण्याचा प्रयत्न करत आहेत .
          आज 22 जून 2020 !! सौ. ज्योतीच्या लग्नाचा 25 वा वाढदिवस !! 
कोरोनाच्या वैश्वीक संकटाचे सावट असताना हा समारंभ कसा करायचा आणि करायचा नाही हे तर कोणालाच मान्य नव्हते . कीर्तीला हे सगळे नविन होतं . फॕमिली प्रोग्रामचं ती ऐकून होती तशी वाट पण पहात होती . काय करावे हा तर यक्षप्रश्न होता त्यातूनच 
 "  ई-सेलीब्रेशनची "
 कल्पना उदयाला आली . ठीक आहे 
" ना मामुसे नकटा मामू अच्छा "
असे म्हणत सुरुवात केली आणि पत्र , कविता , गाणी , किस्से कोणी audio तर कोणी video  अक्षरशः पाऊस पडला . अगदी इनिकापासून एमबीके भाऊजींपर्यंत सगळे तर मोहन आण्णाची आख्खी फॕमिली , गोविंद काका आणि ज्यांचाशी संपर्क होऊ शकला त्या तिच्या खास मैत्रिणी !  प्रत्येकाने आपल्याआपल्या खास  शैलीत अगदी मनापासून सहभाग नोंदवला आणि एकसे बढकर एक अशा कलाकृती उदयाला आल्या . मन भरुन आलं प्रसन्न वाटले !!!
 त्यासाठी प्रत्येकाला संपर्क करणे आणि त्यांच्या कडून audio , video आल्यानंतर आकांक्षा-कीर्तीने ते एडीट करणे बरोबर एकत्र करणे असा दहाबारा दिवस हा कार्यक्रम चालला . सगळ्यांचे मिळून 
पुर्वरंग 45 मिनीट
उत्तररंग 56 मिनीट
असा पावणेदोन तासांचा video तयार झाला . नंतर त्याची लींक तयार होईपर्यंत नेट प्राॕब्लेममुळे होणाऱ्या गंमतीजमती , धडपड मला जवळून पहाता आली . लहानपणी खेळात आपण पत्त्याचा बंगला करायचो,  उंचउंच करत जायचं आणि शेवटचं पान लावायला गेल की सगळं कोसळायचं तसं नेटमुळे आपलोडींग  98% पर्यंत जायचं गोलगोल होत पुन्हा बंद पडायचं पुन्हा उद्याच्या रात्रीची वाट पहायची असं काहीस होत होत . शेवटी ते पुर्ण झालं आणि हुश्श्य झालं . कारण ते वेळेत पुर्ण होऊन दोनतीन दिवस आधी यदुकडे  पोहोचणे आवश्यक होते . ते पोहोचले शेवटी यदुकडे . ती पण एक वेगळीच मजा . तो पहिल्यांदा काही होणार नाही म्हणून नाराज होता पत्राच बोलल्यावर त्यांन काय होणार पण असं जरा नाखुषीतच बोलला पण जसजसा यात रंग भरु लागला तसा तो पण खुष झाला आणि एकएक video टाकू लागल्यावर मात्र त्याचा मुड बदलला . ए कडक आहे मावशी असे मेसेजेस येऊ लागले . भन्नाट होणार म्हणत त्यांने जे लोक माझ्याशी संपर्क करु शकले नाहीत त्यांना सामावुन घेण्यासाठी मोठी कामगीरी केली . हे सगळं करत असतांना त्याची फार पंचाईत व्हायची आई-बाबा समोर असायचे आणि कोणाचातरी फोन यायचा त्याला बोलता यायचं नाही . त्यांना काही कळू द्यायचं नाही लपवत लपवत करायचं . हे करत असताना माझा फोन गेला आई बाबा समोर असले की त्याची तारांबळ उडायची . पण लींक पाहून तो जाम एक्साईट झाला होता . प्रोजेक्टर , केक , झुम मीटींग हे अगदी लपत छपत छान मॕनेज केलं त्यांने . 
आमची तयार झालेली लींक आम्ही 20 ला ग्रुपवर टाकली . ते दोघं सोडता सगळ्यांनी पाहिली . 21 तारखेला रात्री 9.30 ला त्यांना हा video यज्ञेश दाखवणार व 11.45 वाजता तो प्रोजेक्टर लाऊन गुगल मीट अॕरेंज करणार व केक कापायला लावणार असा ग्रुपवर कल्ला 20 ला रात्री सुरु झाला . बोलत बोलत 21 च्या मीटची trial 20 ला घ्यायचं ठरलं सगळे join पण झाले . पण आई-बाबा समोर होते त्याला join होता आल नाही . पण 21 ला रात्री मात्र सगळे ठारल्याप्रमाणे पार पडले . सगळं पहाताना त्या दोघांना सुखद धक्के बसत होते . आनंद , हळवेपणा , कौतुक , आठवणी , निशब्दपणा अशा संमिश्र भावनांचा मिलाप होता तो . अशा सप्तरंगी भावनानी 22 तारखेची सुरुवात होणं सुख म्हणजे यापेक्षा निराळं ते काय असतं ? पण हे करत असताना आम्हांला पण एक प्रकारे समाधान लाभले की चला काहीतरी छान झालं हे नक्की . नाही नाही म्हणत एक गोड असा अविस्मरणीय समारंभ झाला . हे होत असतांना प्रत्येकाचा माझ्याशी संपर्क झाला . आणि प्रत्येकाच्या ज्योती विषयीच्या  भावना मला ऐकायला मिळाल्या . 
          ज्योती माझ्यापेक्षा चांगली साडेसात वर्षांनी लहान आहे . पण आमच्या कुटुंबात सगळ्यात मोठ्ठ म्हणजे तायडीपेक्षा पण मोठ्ठ जर  कोण असेल तर ती ज्योती आणि सगळ्यात लहान म्हणजे संजूपेक्षा पण लहान जर कोण असेल  तर ती पण  ज्योतीच अशी ही 
 "आडवा दांडू " 
म्हणजे आमची ज्योती . मी तिला कालच्या पत्रात सांगितले आहे की माझ्या ढीगभर आठवणी आहेत म्हणून . पण सगळ्याच थोडीच आपण सांगू शकतो ? तर नाही . पण काल प्रत्येकाकडून तिच्याविषयी एक कॉमन फॕक्टर ऐकण्यात आला तो म्हणजे समोरच्याला मनापासून , जीव ओतून करणे  व सढळपणे , आनंदाने  खाऊ घालणे ,  तृप्त करणे . आणि तो सढळपणाचा  व अन्नपुर्णेचा गुण तिच्यात आई-काकांनी ओतप्रोत भरुन दिलाय . लहानपणी तर आई म्हणायची  " हीच्या मुठी चौड्यावर आसतात " .
       सुगरणपणा तिच्याकडे वारसाहक्काने आलाय . पण तिची एक खास शैली आहे .  पाककलेचा तसा तिला कधी प्रयोग करुन पहावा लागला नाही . केलं की हमखास जमलेच !  असंच आहे तिचे लहानपणापासून . मला एक किस्सा आठवतो . आमच्या घरी धुण्याभांड्याला बाई होती  .  ज्योती सातआठ वर्षाची असतांना घरात आई , मायडी व मी मोठे असल्यामुळे स्वयंपाकाच तसं तिच्यापर्यंत येत नसे तर ही हीची कामाची हौस तिच्या पिंकी नावाच्या मैत्रिणीच्या घरी पुर्ण करुन घ्यायची . पिंकीची आई नोकरीमुळे घरी नसायची त्यांच्या  बाईने सुट्टी घेतली की ही जाऊन स्वयंपाकात आणि अगदी भांडी घासण्यात सुद्धा पिंकीला मदत करायची . मी तिला पकडून आणले की आईचा  मार मिळायचा . अशी गम्मत व्हायची . पुरणपोळी करायलासुद्धा ती लग्नापुर्वीच शिकली . 
" दांडगा सोस आहे ज्योतीला "
असे आई कौतुकाने सांगायची 
ती पुढे कॉलेजमध्ये गेल्यावर शिवण शिकतांना तिला साधे कापड चालायचे नाही डायरेक्ट भारी कपड्यांवर प्रयोग करायला तिला आवडायचे आणि ते खासच व्हायचं . असा तिच्यामध्ये प्रचंड आत्मविश्वास आहे . ती शिवायला लागल्यापासून माझे ड्रेस शिवणेच नाही तर कपडा पसंती पण तिची असते. तिने खास शिवलेले ड्रेस , ब्लाऊज घालून माझ्या मैत्रिणींमध्ये भाव मारायला मला खूप आवडते . कपड्यांच्या बाबतीत मात्र तिने मला अपडेट ठेवले आहे . मनिषच्या साखारपुड्यात , लग्नात तर आहाहा...... सातत्याने नाविण्याचा शोध घेत असते ती . तशी शिवणाची घरातून सुरुवात मग 
" मिनाक्षी क्रीएशन "
 या  फर्मचं रजिस्ट्रेशन आणि 6 मे 2011  रोजी अक्षयतृतियेच्या शुभमुहुर्तावर नवऱ्याच्या भक्कम पाठिंब्यातून उद्घाटन सोहळा ! त्यासाठी मला आईला घेऊन जाण्याचा योग आला तर कोण आनंद झाला होता तिला . काका,  नाना , सासुबाई हे तिघे  तर हयात नाहीत किमान आईने तरी हा क्षण पहावा ही तिची तळमळ होती . त्यावेळी तायडीकडे चिनूची मुंज होती तर मायडीकडे पृथाचं बाळंतपण होतं . मी डायरेक्ट कोल्हापूरहून आईला घेऊन पुण्याला गेले तर तिचा आनंद गगनात मावेनासा झाला होता . आणि घरापासून व्यवसायाला सुरुवात करत सिंहगड रोडला दुसरी शाखा उघडण्यापर्यंतच्या यशस्वी वाटचाल जवळून  पहाणारी मी साक्षीदार आहे . तिचा मुळ स्वभाव लाघवी , धाडसी आणि निर्मळ मनोवृत्ती मुख्य म्हणजे आई-काका , आई-नाना यांची पुण्याई , आशीर्वाद व महाराजांच्या कृपाशीर्वादांने यशाचे शिखर गाठले आहे . ही घोडदौड अशीच पुढे चालू रहाणार कारण त्यांच्या कुटुंबाचे कष्ट तर आहेतच पण नातेवाईक व स्नेही मंडळीच्या मनापासून शुभेच्छा व आशीर्वाद आहेत  की जे  फार कमी जणांना मिळतात . मोबदला तर सगळेच घेतात पण सद्सद्विवेक बुद्धी जागृत असणं हेही फार कमी जणांना जमतं आणि त्याबाबतीत ती जागरुक आहे . 
       तिचं लग्न झाल्यानंतर मायडी म्हणाली तसं वयोमानामुळे आई-काका हळवे झाले होते . वारंवार त्यांना दवाखाना लागत आसे . काकांना  पेस मेकर बसवाव लागले होते . त्याकाळात या दोघांचीही कामगीरी खूप मोलाची ठरली . 
       तसं मला स्वतःला घळसासी कुटुंबाकडून अनेकवेळा सहकार्य झाले आहे . मी बार्शीत आणि मुलांच्या शिक्षणासाठी ,  नोकरीसाठी पुण्याला पर्याय नव्हता . मग अगदी पुण्यात फ्लॕट घ्यायचा तर लोकेशन शोधण्यापासून खरेदी पुर्ण होईपर्यंत त्यांचा सिंहाचा वाटा . पुढे मनिष आणि आकांक्षा दोघेही आकरावीतच पुण्यात गेले अनेकवेळा अनेक प्रसंग अचानक आले . सण आहे , आजारपण आहे , काही अडचण आहे तर अश्वासक म्हणून पहिले नाव डोक्यात येणार ते ज्योती मावशी , मुकुंद काका . मुलांना तत्क्षणी आईइतकाच आधार जर कोणाचा वाटला असेल तर तो ज्योती मावशीचाच होता . आणि 250 किलोमीटर वरुन आत्ता जवळ  ज्योती आहे न मग काळजी नाही असे वाटून मी आश्वस्त झाले आहे . 
आपल्या अंतर्मनातल समजतं अशा काही मोजक्या व्यक्ती प्रत्येकाच्या आयुष्यात असतात तसे नाते माझे व ज्योतीचे आहे .तिच्याविषयी असं खूप जणांना वाटतं हेही एक विशेष आहे . खूप वेळा बऱ्याच दिवसांनी भेटलो तर अगदी पहाटेपर्यंत आम्ही गप्पा मारत बसलेलो असतो . आणि खूप दिवस भेट झाली नाही तर फोनवर एकमेकींच्या मनातलं आम्ही ओळखलेलं असते .
आमचा कोणताही कौटुंबिक कार्यक्रम असेल तर सगळी भाचे कंपनी ज्योती मावशीची अतुरतेने वाट पहात असतात . डिझाईनर म्हणून तर आहेच पण ओसंडून वहाणारा उत्साह जो आहे तो ती आल्याशिवाय पुर्णत्वाला जात नाही व कार्यक्रमाची शोभा वाढत नाही . तिच्या स्वभावात निरागसता , मोकळेपणा , प्रेम , आपुलकी आणि भक्ती आहे . त्यामुळे ती हक्क गाजवून सगळ्यांशी बोलते . तिच्या बुटीकमध्ये व घरी पण व्यवसायानिमित्त कामासाठी अनेक मुली आहेत . प्रत्येकीशी कामाव्यतीरीक्त हीचं प्रेमाचं स्वतंत्र नात आहे . स्वच्छ मनानं जवळीक असते . नविन पहाणाराला ही किती ओरडते आसं वाटू शकत पण ते तिचे गाढवी प्रेम असतं .  
        अध्यात्मवादी वृत्ती तसंच भक्तीरसात चिंब होणं हे वयाच्या मानाने तिला लवकर साध्य झालं आहे . कदाचित ही देणगी तिला आईकडून मिळाली असावी . देवळात नमस्कार केल्यानंतर मुर्तीच्या पायावरची फुलं जरी ओटीत मिळाली तरी त्याच्याकडे आतिशय तल्लीन होऊन पहाणे जसं की देवच तिच्या भेटीला आला आहे . हा तिचा भक्तीभाव ! साधी श्रावणातील शुक्रवारची  सवाष्णसुद्धा जेवायला घालण्याची तिची पद्धत हटके आहे . महालक्ष्मीचा सण तर तिच्याकडे मोठा उत्सव असतो . सगळे नातेवाईक स्नेही जमतात . नेहमी काही न काही चालू असते तिच्याकडे . मोठ्या हाताची म्हणतो आम्ही तिला .
      या तिच्या लग्नाच्या 25 व्या वाढदिवसानिमित्ताने गेले दीडदोन महिने मन तिच्याभोवती रुंजी घालत होतं . अनेक प्रसंग आठवतात . ही भावना माझीच  नव्हे तर सगळ्यांचीच आहे . आता वाटतंय काही कार्यक्रम झाला असता तर सगळे एकत्र भेटलो असतो . पण प्रत्येकाच्या मनात असलेल्या भावना तशाच मनात  राहिल्या असत्या त्याच काय ? का असेना या निमित्ताने खोलवर निरिक्षण तरी करता आले . तिच्याविषयी व्यक्त होता आलं हेही नसे थोडे ! 
तीने जपलेलं तिच्या स्वभावतील  बालपण आणि सद्सद्विवेकबुद्धी  अबाधीत राहो . पुनश्च एकवेळ त्या दोघांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी भरभरुन शुभेच्छा !!

तुझी शरु ताई



क्रमशः  भाग 22

     ज्योतीच्या लग्नच्या रौप्यमहोत्सवाच ई-सेलीब्रेशन   तिच्या घरी ते तिघेच असतांना अगदी दणक्यात झाला . जणूकाही सगळेजण आवतीभोवती वावरताहेत अशा भावना त्यांच्या होत होत्या . जसं काही एखाद कार्यच मोठ्या धामधुमीत झालं अशी अवस्था सगळ्यांची झाली . आम्ही सगळे एकमेकांच्या संपर्कात होतोच . तसं ई-सेलीब्रेशन हा आमच्या कुटुंबातील पहिला प्रयोग होता . त्यामुळे नवलाई , कुतुहल , उत्सुकता आणि मुख्य म्हणजे प्रत्येकाला वाटत होतं की 
" माझं प्रेझेंटेशन कसं झालं "
कारण मोबाईच्या का असेना पण  कॕमेऱ्यासमोरचा प्रत्येकाचा हा पहिला परफॉर्मन्स होता की जो अनेकजण पहाणार होते . त्यामुळे दीड-दोन महिन्यापासून बहुचर्चित असलेल्या विषयाला फुलस्टाॕप मिळाला . फुलस्टाॕप कसला आता
 " आपण कसलं भारी केलं "
या आनंदात पुन्हा चर्चांना उधाण आलं . हे करत असतांना काही वेळेस झोप लागली नाही . 
      विशेष म्हणजे 21 तारखेला तर रात्री 2 वाजेपर्यंत अगदी इनिका , आराध्य अवनी ही छोटीशी मुलं सुद्धा जागी होती , गुगल मीटला जॉईन झाली होती . 21 ला रात्री सगळे दमून झोपले तर उत्सवमुर्ती बरोबर सगळ्यांना कार्य झाल्यावर लागतात तशा मांडवझळा लागल्या होत्या . 
       यदुने  आधी 15/16 तारखेला  video ची trial घेतली . त्याला ते खूपच आवडलं . हे सगळ इतकं उत्साहात होतय म्हणल्यावर त्याला पण खूपच  हुरुप आला होता . 21 च मॕनेजमेंट त्यांन भन्नाट केलं होतं त्यांने आई-बाबांना रात्री आठ वाजता आधी आवरुन बसायला लावले व प्रोजेक्टरवर दोन्हीही video दाखवले . अनपेक्षीतपणे video मधून जणू काही सगळेजण प्रत्यक्षात तिथे उपस्थित आहेत या आविर्भावात प्रत्येकाचे परफाॕरमन्स होत होते . एकामागोमाग एक सुखद धक्के बसत होते .याची सुरुवात स्वामीनी सिरियलच्या टायटल साँगवर त्यांच्या लग्नातील फोटोपासून दोघांच्याही आई-वडीलांसमवेत ते परवाच्या फोटोपर्यंत टाकलेले सुंदर दृश्य असे होते . ते पाहून दोघेपण  आवाक झाले . त्यांना खूप भावनावश व्हायला होत होतं . ज्योतीला आनंदाश्रु आवरण मुश्कील होत होतं .   ते सगळं  live आम्हांला यदु ग्रुपवर टाकत होता दोन तास हा video पहाण्याचा  प्रोग्राम चालला . नंतर त्यांची जेवणं  झाल्यावर केक कापायचा आता असे सांगून  त्यांना छान आवरुन बसायला लावले व 12 वाजता गुगल मीट सुरु झाले . हा आजून एक मोठ्ठा धक्का होता , छान आवरुन बसलेली डीझायनर जोडी व स्क्रीनवर सासर माहेरचे सगळे नातेवाईक मग केक कापणं , दोघांनाही छानपैकी  सील्व्हर एक आणि गोल्डन एक असे क्राऊन .  हे सगळे अनुभवतांना त्या दोघांचीही अवस्था खुप भारावून गेल्यासारखी झाली होती , अजून यदुने बाबांच्या  कॉलेजमधल्या व वेगवेगळ्या मित्रांशी संपर्क केला होता . त्यांच्याकडूनही अशाच स्वरुपाचा प्रतिसाद मिळत गेला . रात्रीच्या एक दीड वाजेपर्यंत हेच चालू होते .
      तर दुसरे दिवशी  22 तारखेला घरी दुपारी यज्ञेशने राणी व त्रीशालाच्या मदतीने दोन्हीही बुटीकमधील स्टाफसाठी जेवणाची पार्टी मॕनेज केली होती . ज्योती व मुकुंद यांना  22 तारीख कशी उजाडली व आख्खा दिवस कसा संपला हे उमजत नव्हते . काय बोलाव हे त्यांना समजत नव्हते . आम्ही पण फोनवर फक्त शुभेच्छा दिल्या . जास्त बोलू नका असे सांगितले कारण ते तिला शक्य होत नव्हते .
         आज 26 तारीख आहे . सेलीब्रेशन होऊन पाचसहा दिवस झाले तरी ज्योती आजून सेटल झाल्यासारखी वाटतच नव्हती . जवळजवळ रोज माझ बोलणं होत होतं . तिला या सगळ्याच खूप नवल , कुतुहल व कौतुक वाटत होतं . सहाजीकच आहे आमचं खलबत दोन महिने चालले होते व ही त्याची फलश्रुती होती आम्ही सुरुवातीला ठरवलं होतं त्यापेक्षा तयार झालेली कलाकृती खूपच उंच गेली होती आम्हांला त्याचं आश्चर्य वाटत होत . ते तिला लगेचच पेलणं शक्य नव्हते . काल तिने तिच्या भावना लिहून मोठ्ठा मेसेज पाठवला आहे त्यात शेवटी
 " सध्या तरी आम्ही उभयतांनी सगाळ्यांच्या प्रेमाच्या ऋणात रहाण ठरवलं आहे "
असे लिहीले आहे तेव्हा कुठे तिला थोडंस शांत वाटतय म्हणते असो .
 याची मुळ कल्पना जरी माझी होती तरी त्याला कोंदण लावण्याची कामगीरी  सगळ्यांनी खूप छान पार पाडली  होती .  अनेक कल्पना मिळत गेल्या . मुख्य म्हणजे आकांक्षा ! सध्या लॉकडाऊनमुळे  सगळे घरीच . रोज रात्री यावर चर्चा व्हायची सगळ्यांकडून गोळा करणे त्याचा क्रम ठरवणे हे काम माझं तर पुढे एडीटींग करणे फोटो टाकणे हे काम आकांक्षाच त्यात तिला कीर्तीची खूप मदत होत होती अधूनमधून मनिष असायचा कसं दिसते हे बघायचं काम यांच असायचं मग चर्चा . आणि फोन व्हायचे  असा जुन्या नव्याचा छान मिलाफ झाला होता . जुन्या आठवणींना उधाण आलं  होतं .
" जुन ते सोनं " 
अशी अवस्था झाली होती पण प्रत्यक्ष कलाकृतीला मुर्त स्वरुप येण्यासाठी टेक्नाॕलाॕजीची पण तितकीच गरज होती आणि नवनवीन कल्पनांची व सहभागाची पण आवश्यकता होती . अगदी दोन वर्षाच्या इनिकापासून ते 68 वर्षाच्या एमबीके भाऊजीपर्यंत ! मग आम्ही 
" नव ते हवं " 
असे म्हणू लागलो .
" जुन ते सोनं न नवं ते हव " !
प्रत्यक्ष सहभागी कलाकारांचे अनुभव तर भन्नाटच आहेत . पाहूयात मग ते पुढच्या भागात ..



क्रमशः भाग 23

       ज्योतीच्या लग्नाच्या रौप्यमहोत्सवाच्या ई-सेलीब्रेशनची सुरुवात स्वामीनीच्या टायटल साँगने झाली नंतर संपुर्ण कार्यक्रमाचा घोषवारा असलेल माझं प्रास्ताविक झालं. माझं दोन्हीही शुटींग एकाचवेळी रविवारी केलं होत . आधी प्रास्तविक व नंतर पत्रवाचन तर दोन्हीही शुटींग मी हौसेनं वेगवेगळ्या साड्या नेसून केलं होत . कार्यक्रमाची सुरुवातयज्ञेशच्या बोलण्यांने करायची होती . त्यासाठी त्याचा  video हवा होता . तो काढायला पण त्याला खूप त्रास झाला . त्याला वाईट वाटायचं आई-बाबा विषयी बोलायचं म्हणून त्याला भरुन येत होत . कशीबशी थोडी तयारी केली तर आईबाबा घरात नसतांना  video काढायला काम करणाऱ्या त्रीशालाची मदत घ्यावी लागली . त्यादरम्यान माझं त्याच्याशी video साठी  व इतर नियोजनासाठी फोनवर बोलणं व्हायचं . मी सारखी मागे लागते , आई-बाबा असतात , मला बोलता येत नाही आणि तू एकशे सत्तावन वेळा मला फोन करतेस  म्हणून तो चिडायचा . तर तू मेसेजेस बघत नाहीस फोन उचलत नाहीस मीस्ड कॉल बघून परत फोन करत नाहीस म्हणून मी चिडायचे . सगळं पुर्ण होईपर्यंत आम्ही दोघांनी एकमेकांना त्रास पण खूप दिला व फिसफीस पण खूप केली पण मजा आली . 
आता तायडी
इकडे " जुनं ते सोनं " म्हणंत कार्यक्रमाची सुरुवात करायची होती . तायडीचं अगदी सुरुवातीला 
" पत्र लिहून काय वाढदिवस केल्याच समाधान मिळणार गं ,  उलट रडायचं काम होईल " 
असं चाललेलं . मी म्हणलं लिही तरी आधी , आणि मी माझं पत्र लिहून वाचतांना video काढून ग्रुपवर पाठवला . बाकी सगळ्यांना कल्पना आवडली होती .  मग तिने लिहिलीले पहिले पत्र मला पाठवले . नंतर तिचा हुंदके देत रडक्या आवाजातला  audio आला . तिला म्हणलं तू आता तीनचार वेळा वाचन कर म्हणजे पुन्हा रडायला येत नाही  .  मग औक्षणाचं ताट जवळ ठेव आणि पत्र वाचनाचा video पाठव  . तर बघते आता दोनतीन दिवस थांब असे म्हणाली . आणि काहीतरी  गवसल्या सारखा  तीनचार दिवसांनी तिचा मला फोन आला व म्हणाली मला काहीतरी सुचतंय मी उद्या तुला पाठवते  . आणि लगेचच दुसरे दिवशी तिचा यात दाखवलेला फायनल video आला . 
         तो मी डाऊनलोड केला आणि पहायला लागले तर मला काही सुचेचना रडायला येऊ लागलं  . तायडी एकदम कलंदर अवलिया निघाली . मला तिला फोनच करता येईना . मला काय बोलाव सुचेना मग मी तीला फक्त whatsapp  मेसेजेस करत राहिले . तिला कसं हे सगळे सुचलं असे वाटू लागले . केसांना डाय केलेला , छानपैकी आवरुन जसे काही ज्योतीची पुर्ण फॕमिली समोर बसलीय असं समजून तिने अगदी हसत हसत बोलत कुंकू लावून औक्षण केलं मग स्वतः केलेला केक कापला आणि मग गोविंद विडा दिला . अबब !!! काय भन्नाट कल्पना ! बघणारा तोंडात बोटच घालायचा . जसं काही नाटकात काम करणारी सराईत कलाकारच आहे ती ! असा सगळा सीन वाटला तो .
   त्यादरम्यान मायडीला फोन झाला तिला म्हणलं तायडी औक्षण करतेय तू बुके दे . लाॕकडाऊनमुळे बुकेचं सोड पण साधं फूल सुद्धा मिळत नाही  म्हणाली . पण काहीतरी दिव्य करुन तीने बुके मिळवला आणि मायडीने पण तोडीसतोड अगदी पीवर सील्कची साडी नेसून छानसा हिरॉईनसारखा  मेकअप करत लगबगीने तायडीला
 " झालं का ग तायडे तुझं " 
 असं विचारत जणू काही तिथे सगळा कार्यक्रम चालू आहे त्या आविर्भावात बुके हातात घेऊन प्रवेश केला ते करत असतांना मंद आवाजात सनईचे सुर सुरु ठेवले होते जसं काही फंक्शन चालू आहे असा फील आला व पुढचा सीन अगदी त्याला साजेसा वटवला तिने ! हे पहात असताना काटाच आला अंगावर . काय म्हणावं या दोघींना असं वाटल . विशेष म्हणजे लॉकडाऊनमुळे या दोघीही दोघेदोघेच रहातात . त्यामुळे शुटींग करणे पाठवणे त्यांच त्यानींच केलं .
    पुन्हा यदुच्या  काका-काकूचे पत्र वाचन झाले काकांनी जुन्या आठावणींना उजाळा दिला तर काकू भरभरुन बोलल्या . नंतर  तायडी-भाऊजी , मायडी-भाऊजी , आंम्ही दोघे ओळीनं पत्र वाचन केले बऱ्यापैकी त्यांच्या जुन्या आठवणी शेअर केल्या मग संजू व पुरंदरेनी त्यांच्या खास शैलीत शुभेच्छा दिल्या . त्यांचा तो छोटासा video घ्यायला मला खूप मजा आली होती .  संजू पण जरीची साडी नेसून शुटींगसाठी मस्त आवरुन माझी वाट पहात बसली होती . नेहमीप्रमाणे तिचं पीनअप करुन दिल . मग शुटींग केलं. खूप आनंद झाला तिला पण . या शुटींगमध्ये सगळी पुरुष मंडळीसुद्धा छान आवरुन कपडे बदलून अगदी उत्साहानं सरसावून बसली होती .
       यानंतर ज्योतीच्या मैत्रिणींचा  भिशी ग्रुप होता . त्यात पण कोणी गाणं कोणी चारोळी कोणी पत्र तर कोणी कविता असं सादरीकरण करत तिच्या सुगरणपणाचं , लाघवी स्वभावाच तर लाड पुरवणारा मायाळू साथीदार म्हणत त्यांच पण खूप कौतूक केलं . विशेष म्हणजे त्या सगळ्याजणी पुण्यात होत्या तीला भेटल्यासुद्धा होत्या . पण कोणीच या कानाची खबर त्या कानाला लागू दिली नाही . अगदी सिक्रेट ठेवलं .सख्ख्या मैत्रिणीच त्या !! त्यांना या सगळ्याचं भारी कौतूक वाटत होतं . मिनू भाग्यवान आहे म्हणायच्या . अगदी फोन करुन मेसेजेस करुन सगळी चौकशी करायच्या . झालं का ग ? आलं का सगळ्यांच ? कसली भारी कल्पना आहे . अशा चर्चा व्हायच्या .
         पुर्वरंग म्हणून पहिला भाग केलेला बऱ्यापैकी भावनीक , भूतकाळात , बालपणात रमायला लावणाऱ्या आठवणींनी खचाखच भरलेला होता . ते एकत्रित पहातांना त्या दोघांची पण अवस्था प्रेमात दबल्यासारखी झाली होती. निशब्द झाले होते ते .
       Video चा क्रमंच आम्ही असा लावला होता की सगळे बौद्धिक , हळवे प्रसंग पहिल्या भागात संपले होते . आता दुसरा भाग म्हणजे उत्तररंग सुरु झाला यामध्ये सगळ्या भाचे कंपनीने आपल्या जोडीदार व मुलांसह हजेरी लावली होती . एकदम हलकाफुलका , मजा , मस्ती , नाचगाणी असे त्याचे स्वरुप होते.
         याची सुरुवातच आकांक्षाने जसं काही TV वर अँकरींग करतो या अविर्भात केली . मिमीक्री नाच सगळं थोडक्यात पण फार मस्त केलं तिने .
लगेचच चिनू-ओजसने निलेश साबळे व भारत गणेशपूरे स्टाईलने एन्ट्री घेतली . त्यांच्या परफाॕर्मन्सने आवाक झाले सगळे . जसं काही 
"हवा येऊ द्या " 
ही सिरियल बघतोय असे वाटले . कधी स्वप्नातसुद्धा ही पोरं असं काही करतील असे वाटले नव्हते . अर्थात मंजूचं स्क्रीप्ट भारी होत . आणि आनंद यांचा फीनिशींग टच होता त्याला .
" आर. के'ज फॕमिली , घेरडी "
या वाक्याने भारावून सोडलं !!!
      मग आली 
"मो . गु'ज फॕमिली " !
उषा वहिनी व मोहन आण्णा (काका मोहन गुरुजी म्हणजे मो . गु . म्हणायचे ) यांच्याकडून सांस्कृतिक कार्यक्रमाचा वसा घेतलेली त्यांची तिन्ही मुलं अगदी उत्साहात सहकुटुंब सहभागी झाली .
      त्यांच्या खऱ्या नावापेक्षा चिमू बबलू छबलू या नावाने त्यांच्याशी बोलण्यात जास्त जवळीक वाटते ( तरी मोठे झाल्यापासून कान्हा मात्रा वेलांटी वापरत नाही ) असो.
या कार्यक्रमाच्या नियोजनाची सुरुवात झाल्यापासून मला चिमूचा खूपवेळा फोन झाला . तिला चैन पडायची नाही . मला यादरम्यान ती शाळेतली आठवली . माझं शेपूट असायची तेव्हा . तीचे पुर्ण कुटुंब चंदेरी दुनियेशी निगडीत असल्याने तिचे पत्र व video पहिल्यांदा आला ! नंतर कलंदर अर्थातच बबलू ! कृतीकासह एकदम खुमासदार पद्धतीने त्याचं सादरीकरण झालं . तो ज्योती बरोबरचा असल्यामुळे लहानपणापासून त्यांची मस्ती चालायची . मग छबलूचा नंबर लागला तर एकट्या राखीने इतक्या गोड आवाजात वाचन केलं की ते ऐकतांना तिच्यातली आकाशवाणीतली निवेदिका डोकावत होती . ऐकणाराला  तिचं वाचन संपूच नये असंच वाटत होतं .
यानंतर वयाप्रमाणे काकांच्या नातवांडांचे नंबर लागले . पहिल्यांदा अंजू ! तिने मस्तपैकी आवरुन झाडाजवळ बसून ज्योतीबरोबरच्या लहानपणीच्या आठवणी सांगितल्या तर मंजू-आनंद जोडीने आठवणींबरोबर अगदी शेर-शायरी पेश केली . गायत्री तर म्हणाली मी सातआठ  वेळा केलंय शुटींग बघ तिने पण भरपूर अठवणी सांगितल्या . पुन्हा आला मेधाचा नंबर . मास्तरीणबाई ! तिला सांगितलं सलग 45 मिनिटे नाही बोलायचं पाच मिनिटं वेळ दिलाय  . आधी मी बोलणार म्हणत अवनीने गोड शुभेच्छा दिल्या . मग मेधा तिची 4 मिनिटे संपली की अमोलनी माईकचा ताबा घेतला . मग लागला नंबर धनु आणि आमच्या थोरल्या सुनबाईंचा !  काय बोलावं समजत नाही म्हणत त्यांची कर्नाटक एक्सप्रेस धाडधाड सुटली . सगळ्यात जास्त वेळ या दोघांनी घेतला . खूप साऱ्या आठवणी अगदी आठवून आठवून सांगितल्या . मग एक छानसी कविता पृथाने सादर केली . नंतर आमचं पात्र म्हणजे दाक्षु 
"चाय चाय " 
करत आलं . ज्योतीच्या लग्नातले फार भन्नाट अनुभव सांगितले तिने . मग नंबर लागला आमच्या गँगचा . तिघांनी छानपैकी मैफिल भरवली ,  भारतीय बैठक मांडली त्यात सुरुवात कीर्ती
 " कार्यक्रमाचा मास्टर माईंड आमच्या आई  "
 म्हणत भाव खावुन गेली .  आशिषने मुकुंद काकांचे आवडतं गाणं " रुपास भाळलो मी " म्हणले तर त्याला ज्योती मावशीकडून उत्तर म्हणून आकांक्षाने 
"फुलले रे क्षण माझे " 
हे गीत सादर केले . आकांक्षाने अजून एक स्पेशल गीफ्ट तयार केले आहे ते म्हणजे त्या दोघांच एक सुंदर स्केच काढले आहे , ते प्रत्यक्ष भेटीत त्यांना ती देणार आहे .
     यानंतर बच्चे कंपनी सुरु झाली
पृथाच्या मुली आर्ता व ईभा यांनी गोड शुभेच्छा देऊन खूपच सुरेख डान्स केला . नंतर धनूच्या आराध्यचा नंबर लागला .  खूप बोलला तो . त्याच्या वयाच्या मानाने त्यांने खूप आठवणी सांगितल्या . त्याच्या हातात जादू आहे त्यांने खूप सुंदर चित्र काढलं होत या दोघांसाठी . आणि गोड शेवट दाक्षुच्या पील्लूने म्हणजे इनिकाने तिच्या डॕडीबरोबर डान्स करत शुभेच्छा दिल्या . पुर्ण कार्यक्रमाचा आढावा घेत मेधा मॕडमनी समारोप केला .
      अशाप्रकारे भल्या मोठ्या कार्यक्रमाचे आम्ही नियोजन केले होते  . जवळजवळ दोन महिने गुऱ्हाळ चालू होत . हसणं , रडणे , भावनावश होण अनेक प्रकारचे आविष्कार या कालावधीत पहायला मिळाले  आणि सगळ्यांसाठी कायमस्वरुपी लक्षात रहाणारी उत्कृष्ट  कलाकृती करायला मिळाली . मुख्य म्हणजे उत्सवमुर्ती बेहद्द खूष आहेत त्यामुळे सगळे सार्थक झाल्यासारखे वाटते .



क्रमशः भाग 24

    

सध्या लग्नाच्या वाढदिवसाच्या मुडमध्ये असल्यामुळे ज्योतीच्या पाठोपाठ आलेला आमच्या लग्नाचा वाढदिवस पण वेगळ्या धाटणीत साजरा झाला .
 27 जून  ! 
आमच्या लग्नाला 31 वर्षे पुर्ण झाली . नेहमीच येतो मग पावसाळा म्हटल्याप्रमाणे एकामागून एक सहप्रवासाची 31 वर्षे पुर्ण झाली . यावर्षीचं विशेष म्हणजे वाढदिवसाला घरात मुलगा , नवी सुन , मुलगी असे नव्या दमाचे हौशी कलाकार  होते . उद्या या मुलांना बार्शीला येऊन 100 दिवस होतात . त्यामुळे वेगवेगळ्या सणांबरोबर वाढदिवस पण यादरम्यान साजरे होत आहेत . मग खाण्यात पण जास्त येतं . सध्या कॕलरीयुक्त जरा जास्तच खाल्ले जाते असे म्हणत आकांक्षा-कीर्तीने 20 दिवस झाले त्यांनी अगदी सिरियसली एक्सरसाईझला सुरुवात केलीय . मोबाईलवर बघत चालू असतं त्यांच . त्यांना 
"बेली फॕट " कमी करायचा आहे म्हणे . रोज अर्धा तास त्यांचा व्यायाम चालतो , घामाघूम होतात . मी सहज बघायला गेले या काय करतात तर मी त्यांना म्हणलं मला तर तुम्ही तुमचं शरीर गोधड्या बडवल्यासारखं करताय असं वाटतय . त्या हसायला लागल्या म्हणे
 " स्पाॕट रिडक्शन " 
होत नसतं म्हणून आसं करावे लागते . मला तर खरं ब्रम्हविद्या आणि योगा सुर्यनमस्कार  हे सगळे  प्रकार त्यामानाने चांगले वाटतात . पण त्यांना हे हवंय , पण पोट कमी करतांना गाल पण कमी झालेत त्यांचे . आधीच बारीक त्यात आणखी चपट्या दिसतात तर म्हणे वजन बघ अजिबात कमी नाही आम्ही फीट आहोत आम्हांला 
" आवर्स ग्लास फीगर "
करायची आहे . करा म्हणलं मग . पाहू किती दिवस करतात ते . कीर्तीला ब्रम्हविद्याचा क्लास करायचा आहे  सध्या माझ्याबरोबर करते फ्रेश वाटतं म्हणून . एक बरं वाटलं की हल्लीची पीढी हेल्थ काॕन्शियस आहे . पाहू कितपत सातत्य ठेवतात ते .
        30 एप्रीलचा माझ्या वाढदिवसाचा केक बराच गाजला होता . पुन्हा एकवेळ रवा केक चांगला झाल्यावर वातावरण जरासं  थंड झालं होतं  .
         दरम्यान माझ्या बँकेतील ढाणकेंची सून आईस-केक शिकून आली होती . सध्या लॉकडाऊनमुळे ती घरगुती केकची आॕर्डर पण घेत होती एक दिवस त्यांनी सगळ्यांसाठी बँकेत पण केक आणला होता . खूप मस्त होता . मी विचारलं ती शिकवत का नाही तर म्हणाले आता खूप प्रॕक्टीस झाली आहे व नुकतेच क्लास घ्यायला तिने सुरुवात केली आहे . लगेच मी घरी मेसेज केला तर या दोघी आम्हांला शिकायचं म्हणून नाचायलाच लागल्या . दुसरे दिवशी शनिवार होता त्याच दिवशी मॕनेज केलं . कोरोनाचा प्रादुर्भाव आसल्याने अगदी सगळी काळजी घेत करण्याचं त्यांनी कबूल केलं . एक तर खूप दिवसांनी बाहेर जायला मिळणार होतं आणि आवडीचा मामला होता . त्या दुपारी 12 ला गेल्या मी पण संध्याकाळी 5 वाजता पहायला गेले  होते .  एका दिवसात पाच केक शिकून संध्याकाळी 7 वाजता या अगदी तरबेज झाल्याच्या आविर्भावात  घरी आल्या .आनंदी आनंद गडे !  मग चर्चांना उधाण आलं  जसं की पुण्यात गेलो की आपण नारायणबागेत आता केकच्या आॕर्डरस घ्यायच्या किंवा शनिवार-रविवार केक शिकवण्याचे क्लासेस घ्यायचे वगैरे वगैरे.......
      आता केक घरी करायचा तर साहित्य तर लागणार  मग एकदोन दिवसांनी 
" नालीसाठी घोडं खरेदी " 
मोहिम सुरु झाली . दुकानात शोधून शोधून बीटर , नोजल , पाईपींग बॕग्ज , पॕटल नाईफ , मेजरींग कप , स्पून्स , मोल्ड इत्यादी खरेदी अती उत्साहात झाली . तर प्रीमीक्स  व क्रीमसह सगळं साहित्यसुद्धा आणलं  .  हे सगळं आकांक्षाने बरोबर पप्पांच्या मागे भुंगा लावुन आणलं . तिचं ठरलं की ठरलं असं असतं पिच्छा सोडत नाही ती . मागे माझ्याकडे ओव्हन नव्हता तर तीनचार वर्षापुर्वी असंच आकांक्षा म्हणाली होती आपल्याकडे ओव्हन नाही म्हणून आपण केक करत नाहीत तर तेव्हा माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने तीने ओव्हन घ्यायला लावला होता पण ओव्हन बार्शीत ती पुण्यात पुन्हा केक मागेच पडला होता . आता आणखी हे साहित्य आलं घरात !
खरं तर पुर्वी केकचं घरी करण्याचं इतकं प्रस्थ नव्हतं . मग मी पण फारशी नादी लागले नव्हते . चायनीज पण मला फारसं जमत नाही . (मी पहिल्यापासून चीनच्या विरोधात आहे 🤪 ) . 
     मग एवढ सगळं आणून घरी मँगो केक केला मस्त झाला . मनसोक्त खाल्ला .  पोरींचा आत्मविश्वास वाढला !
आता लगेचच आला तो आमच्या लग्नाचा वाढदिवस ! आता बऱ्यापैकी सगळं मिळतंय या तीन महिन्यात खवा आणला नव्हता म्हणून आज गुलाबजामुनचा बेत होता . आमच्या फॕमिलीत माझे 
" लवंगाचे गुलाबजामुन " 
फारच प्रसिद्ध आहेत . त्याची एक वेगळीच कथा आहे . 2014 ला आमच्या लग्नाचा पंचवीसावा  वाढदिवस होता . त्याच वर्षी  28-29 जुनला आईचं पहिलं वर्षश्राद्ध होतं ते बार्शीत करायचं ठरलं . मी वाढदिवसाचं काहीही ठरवलं नव्हते . श्राद्धासाठी सगळे 28 ला पहाटे येणार होते पण सगळ्यांनी ठरवून मला कळू न देता 27 ला पहाटे 5 वाजता बुके घेऊन हजर झाले . तो दिवस पुर्ण आनंदानं साजरा केला व पुढे 2 दिवस श्राद्ध झालं . दुःखी रहाणे आईला आवडले असते का ? असे म्हणत सगळ्यांनी तो दिवस साजरा केला . सगळं मॕनेज केलं . तेव्हा सगळेजण माझ गुलाबजामुन खूप छान करते बार्शी स्पेशल  म्हणून कौतूक करत होते तर यांनी  आतिउत्साहात सगळ्यांची री ओढली होती व म्हणाले की
" हो हो तिचे गुलाबजामुन फारच मस्त होतात पाकात लवंग वगैरे घालून छान करते "
 सगळे कुजबुज करत माझ्याकडे पाहू लागले कसं काय ग गुलाबजामुन मध्ये लवंग  घालतेस . बुंदीच्या लाडूच्या पाकात घालतो आपण . हे काही नविन आहे का ? मी तर पुर्ण गोंधळून गेले की मी काही लवंग घालत नाही गुलाबजामुन मध्ये कशी लवंग चांगली लागेल ? हे काय यांनी सांगितलं बरं ? मग लक्षात आलं की बायकोचं कौतूक होतंय म्हणल्यावर अतिउत्साहात यांनी काहीतरी फेकली होती आणि मग एकच कल्ला झाला होता
 " लवंगाचे गुलाबजामुन " 
तेव्हापासून आमच्याकडे हा पदार्थ फेमस आहे .
मग आज पुरी , कुर्मा , गुलाबजामुन
काकडीची कोशिंबीर , कायरस आणि जोडीला 
चाॕकलेटचा केक !!! असा तो थाट होता . 
सगळा स्वयंपाक या दोघींनी केला मी फक्त गुलाबजामुन केले . मग छान आवरुन थोडंस फोटोसेशन झालं , ताटं सजवली केक कापला मग छानपैकी गप्पा मारत जेवणं झाली .



क्रमशः भाग 25


         मध्यंतरी कोरोना अनलाॕक सुरु झालं आणि आता बऱ्यापैकी व्यवहार सुरु होणार असं वाटू लागलं . कीर्तीला पण पुण्यात या असे सांगतील असे वाटू लागले  . एकदा पुण्यात गेली की मिरजेला जायचं पुन्हा अवघड पडेल म्हणून त्यांनी दोघांनी मिरजेला जाऊन यायचा प्लॕन केला . 1 जुलैनंतर परिस्थितीचा अंदाज घेऊन जायचं ठरलं . बऱ्याच दिवसांनी जायला मिळणार म्हणून कीर्ती एकदम खूष झाली . लाॕकडाऊनमध्ये शिकलेल्या रेसीपीजमधलं आई-बाबांना काय काय करुन घालायचं याचे तिचे प्लॕन सुरु झाले . मधूनच आॕफिसमधुन कोणालातरी पुण्यात यायला सांगितलं जायचं . त्यामुळे पटकन मिरजेला जाऊन येऊ म्हणजे आल्यावर बोलावलं तर आंदाज घेऊन पुण्याला कधी जायचं हे ठरवता येईल असे वाटले  . पण 1 तारखेनंतर मिरजेत व बार्शीत कोरोनाचं प्रमाण वाढू लागला मग पुन्हा थोडंस थांबूनच जाऊ असे ठरले . दरम्यान सहासात जुलैला केतकीला ईंटर्नशिपचा भाग म्हणून रत्नागिरी सिव्हिल हाॕस्पिटलला कोव्हीड ड्युटीसाठी जाव लागणार म्हणून समजले . तसं ती स्वतः एक्साईट झाली पण कीर्तीला थोडंस टेन्शन आले सहाजीकच आहे तिच्या आईबाबांना पण काळजी वाटणार न ! पण शेवटी तो तिच्या शिक्षणाचाच भाग आहे म्हणत सगळ्यांनी परिस्थितीचा स्विकार केला . काळजी करण्यापेक्षा काळजी घेणं महत्त्वाचे म्हणत तिचे काम सुरु झाले .
      आता 9 जुलै म्हणजे आई-काकांचा स्मृतीदिन ! आई-काका गेले म्हणजे माहेर संपलं असं होता कामा नये . तसेच त्यांच्या स्मृतींना उजाळा मिळाला पाहिजे असे ठरवून 2014 पासून म्हणजे आईच्या  पहिल्या श्राद्धापासूनच आम्ही पंचकन्या कोणाही एकीकडे जमतो तो दिवस फक्त आम्ही पंचकन्या व आई-काकांच्या आठवणी यासाठी राखीव असतो . पण यावेळी कोरोनामुळे यात खंड पडला . तरी आम्ही मात्र कान्फरन्स काॕलवर भेटलो बोललो मायडीने भजन म्हणलं . थोडक्यात समाधान मानावे लागले .
        आता 12 जुलै कीर्तीचा वाढदिवस ! ओघानेच तो बार्शीत साजरा झाला . गेल्या वर्षी लग्न ठरलेलं होतं आणि तिचा पंचवीसावा वाढदिवस होता . आकांक्षाने खूप मस्त प्लॕनिंग करुन पुण्यात सेलिब्रेशन केलं होतं . आता नविन-नविन काय काय फंडे आणावेत अशा आमच्या चर्चा सुरु झाल्या मग तिच्याचसमोर आम्ही उद्या गुलाबजामुन करु असे ठरविले व यावर्षी नविन म्हणजे नुकताच शिकलेला केक तर  होताच . पण तो आम्हांला सरप्राईज करायचा होता मग 11 तारखेला शानिवारी दुपारी आम्ही झोपण्याचा प्लाॕन केला व कीर्ती झोपल्यावर आकांक्षाने व मी गुपचूप चाॕकलेट केक बनवून ठेवला . याचा तिला काही पत्ता लागू दिला नाही . आशिषला सांगून मग रात्री बारा वाजता झोपेतुन उठवून तिला खाली आणले केक आणि आमच्याच बागेतील
"रेड रोज "
आशिषने सरप्राईज दिला मजा केली . दुसरे दिवशी मग दुपारी जेवणात गुलाबजामुन  व रात्री रगडा-पॕटीस झालं . नेहमीप्रमाणे फोटोसेशन झाले . वाढदिवसाच्या स्पेशल ड्रेसची ज्योतीला आॕर्डर दिलींय . बहुतेक सगळे ड्रेस एकदमच घ्यायचे असं दिसतेय . या चार महिन्यात वाढदिवस पण पाठोपाठ येत आहेत त्यामुळे बहुतेक मनिषचा येणारा पण 
"लॉकडाऊन वाढदिवस "
 होणार का असे म्हणत सगळे हसत बसलो . 
       सध्या कोरोनाची परिस्थिती अगदी चिखलात रुतलेल्या चाकासारखी झालीय . कमी व्हायचं नावच नाही उलट प्रचंड वाढतच आहे . त्याला आता बार्शी पण अपवाद नाही . ओळखीतल्या लोकांविषयी समजलं की भिती वाटते . सध्या  कडक उपाय म्हणून 17 जुलै ते 27 जुलै बार्शी पुर्ण बंदचे आदेश निघाले आहेत . आता या दरम्यान श्रावण महिना सुरु होईल बाकी मोठं काही करता येणार नाही पण मंगळागौरीची पुजा घरच्याघरी करायची हे ठरवलं तसे काकी , प्रतिभा तर इकडे तायडी , मायडी , ज्योती , विहीणबाई सगळ्यांचे फोन झाले . मग मी पण 11 तारखेलाच सुट्टीदिवशी जाऊन मंगळागौर , वाती व बाकीचं सामान आणून ठेवलंय . कारण यावेळी नुसतं लॉकडाऊन नसून  कर्फ्यु आहे फक्त दुध व औषधे मिळणार त्यामुळे मोठी नसली तरी व्यवस्थित पूजा तरी करता यावी हा उद्देश . 
          18 जुलै आज शनिवार होता ग्राहकांसाठी बँका बंद आहेत पण आमची अंतर्गत कामे सुरुच आहेत पण 50% लोकांवर काम भागते त्यामुळे जरा सोयीनुसार जाता येतं .10 दिवस इतकी धावपळ नाही मग पहिली मंगळागौर ,  पहिला शुक्रवार पुरणाचा करावा असं नियोजन चालू होतं . रात्री नऊ वाजता अचानक पृथाचा फोन आला व ती म्हणाली मम्मी कोरोना पाॕजिटीव्ह निघाली तिला प्राईव्हेट हॉस्पिटलमध्ये अॕडमीट केलंय आणि पप्पांना क्वारंटाईन सेंटरला नेलंय . फोनवर बोलले मात्र पण पायाखालची जमीनच सरकली , क्षणभर काहीच सुचेना . हातापायात त्राण नसल्यासारखं जाणवत होतं .  माझ्या बोलण्यावरुन मायडीविषयी बोलणं चालू आहे याचा सगळ्यांना अंदाज येतच होता . वातावरण एकदम गंभीर झालं , थोडंस थांबले मग सगळ्यांना सविस्तर सांगितले .
        पण माणासाचं मन फार विचित्र असतं म्हणतात नं 
" वैरी न चिंती ते मन चिंती " 
लोकांच ऐकणं , टीव्ही वर पहाणं वेगळं पण आपल्याच घरातील व्यक्तीवर आलेला हा प्रसंग पचावायला थोडंस जड गेलं . मग सगळे फोन  मेसेजेस सुरु झाले . पहिला भाऊजींना फोन केला त्यांनी सविस्तर सांगितले . रविवारीच थोडा त्रास सुरु झाला की लगेचच सोमवारपासून त्यांनी त्याच दृष्टीने फॕमिली डाॕक्टरांची ट्रीटमेंट सुरु केली होती . व शंका आली की लगेच स्वॕब दिलेला होता . रिपोर्ट येईपर्यंत आज शनिवार उजाडला . पण रिपोर्ट पाॕजिटीव्ह आला की नियमानुसार सगळे करावे लागते पण भाऊजींनी सगळी धडपड करुन तिला प्राईव्हेट हाॕस्पिटलला अॕडमीट केलं पृथाचे मामेसासरे ठाणे जिल्ह्याचे  सिव्हिल सर्जन असल्याने त्यांची  बरीच मदत झाली  . कीर्तीने पण केतकीला फोन लावला तीला  सगळे रिपोर्ट पाठवले . फारसं काळजीचं कारण नाही लवकर  बऱ्या होतील फक्त अशक्तपणा जाणवेल म्हणाली . माझ्या एका मैत्रिणीला पण कोरोना झालेला . सगळ्यांशी बोलून अनेक गोष्टी माहित करुन घेतल्या व शेवटी हक्काचं ठिकाण म्हणजे श्री स्वामी समर्थांवर सगळा भार सोपवला मग जरा निवांत वाटलं . मग आधी ज्योतीला फोन केला . तिची पण अवस्था काही वेगळी नव्हती . मी शांत आहे असे ती भासवत होती पण  आतून मात्र पुर्ण हलली होती . डाॕ. निलीमाचं औषध मी पोहोच करतेय तिला तशी व्यवस्था केलीय हेही तिने सांगितले . दोघीपण एकमेकींना आधार देत होतो . पुन्हा तायडीला फोन केला ती मात्र ढासळली . ती हल्ली खूपच हळवी झालीय सहन होत नाही तिला . तिचे एकच सारखे होतं कुठं गेली होती कुणास ठाऊक बाई . कशाला बाहेर जात होती कुणास ठाऊक . अशक्तपणा खूप येतो . आगं नाजूक आहे ग ती , तिला कुस्करुन खावं लागतं . काय देतात काय माहित . शनिवारपासून मला ती रोज सकाळ संध्याकाळ फोन करत होती . तेवढंच मनाला हलकं वाटत असणार . अस्वस्थ असते तसं मायडीचं आमच्या पंचकन्या ग्रुपवर  चाटींग सुरु असते त्यामुळे बरं वाटतं . रविवारी थोडीशी आॕक्सिजन लेव्हल कमी झाली पण लगेच एकदोन तासात नाॕर्मल झाली . सोमवारी चांगली इंप्रुव्हमेंट व्हायला सुरुवात झाली फक्त अशक्तपणा जाणवतो म्हणाली . कालपासून ताप आला नाही कफ पण नाही सात दिवसात होईल सगळे व्यवस्थित मग घरी सोडतील असे वाटतेय . नियमाप्रमाणे भाऊजींचा पण स्वॕब दिला आहे . त्यांना काही त्रास होत नाही . पण मनात सारखा तो विचार असतो घरी आले एकदा व त्यांच व्यवस्थित रुटीन सुरु झालं की समाधान वाटणार  , वेळ तर द्यावा लागणार . दरम्यान दाक्षु-पृथा दोघींशीपण बोलणे झाले . काळजी तर सगळ्यांनाच वाटते पण तब्बेतीत होत असलेली सुधारणा ऐकून सगळ्यांना समाधान वाटतेय . पण कोरोनाचा अंत झाला पाहिजे असे मात्र मनोमन वाटतंय . खूप कंटाळा आला आहे या सगळ्याचा . धसका तर आहेच पण आता राग चीड यायला लागलीय कधी लस येतेय असं झालंय . कोणाचं आपल्याकडे येणंजाण नाही व आपणही कुठे जाऊ शकत नाही !
          आज सोमावार दिव्याची अमावस्या व उद्या मंगळवारी श्रावण सुरु !  कीर्तीची पहिली मंगळागौर ! लग्न झालं की एकदोन महिन्यात मंगळागौरीचं नियोजन करुन ठेवलं होतं .अगदी स्वयंपाकाची बाई संस्कार भारतीचा ग्रुप ,  तसं मंगळागौर जागवणे हे लहानपणापासून मी पहात आलेय . घेरडी तसं छोटंस गाव पण भावकीची 30/35 घरं गावात होती . त्यामुळे चैत्रागौर , श्रावणी शुक्रवार , महालक्ष्म्या ,  दसरा ,  संक्रांत सगळे सण फार उत्साहात व्हायचे तसंच नविन लग्न झालं की मंगळागौर ही  ठरलेली असायची आणि त्याचं जागरण म्हणजे उत्साहाला उधाण यायचं . संध्याकाळी सगळ्यांना बोलावलेले असायचं गरम गरम मुगाच्या डाळीची खिचडी आणि बरोबर लाडू-करंजी सगळं फराळाचं असायचं . ते झालं की आधी बैठ्या स्वरुपात गाणी , भेंड्या , उखाणे करत करत आंगणात उतरायचं मग फुगड्या , झिम्मा , फेर , नकला आणि निरनिराळे खेळ पहाटे तीनपर्यंत तरी रंग भरलेला असायचा . तीच प्रथा आम्ही पुढे चालू ठेवली आहे . घेरडी ,  किर्लोस्करवाडी ,  बदलापूर याठिकाणी जागरणं झालीत . आजकाल हे कोणाला जमत नाही मग प्रोफेशनल संस्कारभारतीचा ग्रुप बोलावला जातो पण त्यांनी पण हे सगळे पारंपारिक खेळ शिकून घेतल्याचं दिसून येतं . आम्ही घरचेच सगळे खेळू शकतो त्यामुळे आता सगळेजण बार्शीच्या जागरणाची वाट पहात होते . पण कोरोनामुळे सगळ्यालाच मर्यादा आल्या . आता हे घरच्याघरी सगळं करावे लागणार . पूजा  घरच्याघरी असली तरी सगळं करायचं व कामाला कोणी नाही त्यामुळे प्लॕनिंगनी कामं ठरवली . पूजेची कोरडी तयारी करुन ठेवली . स्वयंपाकाचा पुर्ण चार्ज आकांक्षाने घेतला .अगदी उत्साहाने नाचतनाचत उरक्याने 10.30 वाजता तर साग्रसंगीत पुरणाचा सगळा स्वयंपाक तिने तयार केला . साडेआकरा वाजता तिचा क्लास  होता मग त्यापुर्वी सगळं तिला पहायचं होतं . इकडे आशिष-किर्तीने सुट्टी घेऊन एन्जाॕय करायचं ठरवलं . जोडी छान कपडे घालून मस्त तयार होऊन हजर . हल्ली दुसरे कपडे घातले जात नाहीत त्यामुळे आवरलं की सगळ्यांना खूप बरं वाटतं .  सकाळी लवकर उठून यांची पूजा माझं बाकीच आवरणं झालं . त्या दोघांचपण  छान आवरुन जोडीने पूजा झाली . पूजा सांगायचे गुरुजींच काम यांनीच केलं त्याचबरोबर आसपास हिंडून आघाडा , दुर्वा आणल्या व लागेल त्याला मदत होतीच  . आकरा प्रकारची पत्री व टोपलीभर फुले तर आंगणातच निघाली . अगदी साग्रसंगीत पूजा व सुग्रास जेवण झाले . मात्र  माणसांची उणीव खूपच जाणवली . पण जवळजवळ सगळ्यांचे फोनवर बोलणे झाले मग फोटो , व्हीडीओ स्टेटस सुरु झाले . 
          कालच्यापेक्षा आज आणखीन तब्बेतीत सुधारणा असल्याचे  मायडी , भाऊजी दाक्षु या सगळ्यांचे मेसेजेस होत आहेत . आम्ही आता ती घरी येण्याची वाट पहात आहोत . फोटो वगैरे पाहून रात्री मायडीने मेसेज केला कीर्तीला नाव घ्यायला लाव , जोडीनं , सासू-सुना , नणंद-भावजय फुगड्या खेळा . मग मात्र खात्री पटली आता हीला हाॕस्पिटलला रहाणं ही शिक्षा आहे . पण ईलाज नाही . ट्रीटमेंट तरी पुर्ण केली पाहिजे .
       आज आॕफिस असल्यामुळे सकाळी लवकरच आवरुन उत्तरपूजा केली . तोवर दाक्षुचा मेसेज आला की रात्रीचे इंजक्शन बंद केले आहेत आता सगळच नाॕर्मल आहे फक्त आॕब्झर्हेशनखाली ठेवलय शनिवारी फारफार तर सोमवारी सोडतील . दुपारी भाऊजींचा मेसेज आला की त्यांचा रिपोर्ट निगेटीव्ह आला त्यांना घरी सोडणार ! खूप बरं  वाटलं आता मायडीला सोडण्याची वाट पहाणे सध्यातरी एवढंच करु शकतो . तोवर मायडीला घरी जायला परवानगी मिळाल्याचा भाऊजींचा मेसेज आला आणि खऱ्या अर्थाने जीव भांड्यात पडला !!




लाॕकडाऊन डायरी प्रकरण 6

क्रमशः  भाग 26 ते 30


क्रमशः भाग 26


    

        तेचतेच वातावरण असल्यामुळे हल्ली क्रमशः काय लिहाव हा प्रश्न पडत होता पण श्रावण सुरु झाला व सण सुरु झाले तसं पुन्हा नव्याची नवलाई डोकावू लागली मग माझी लेखणी पण सज्ज झाली . तसेच  आॕगस्ट महिन्याची सुरुवात लाॕकडाऊन वाढदिवसाने म्हणजेच यांच्या 2 आॕगस्टच्या वाढदिवसाने झाली . नेहमीप्रमाणे त्यांच्या आवडीचा इडली-चटणी-सांबार बेत झाला . इकडे श्रावण महिना असल्यामुळे बाहेर जरी सगळं बंद असले तरी घरात मंगळागौर व शुक्रवार याची धामधुम सुरु होती तर पंधरा दिवसानंतर बँका उघडल्या होत्या व पहिला आठवडा त्यामुळे बँकेत पण  प्रचंड गर्दी होती मला उसंतच नव्हती . आता पाच आॕगस्टनंतर जिल्हाबंदी उठली तर मिरजेला जाऊन यावे असे कीर्तीला वाटत होते ते बरोबरही होते . कारण आई-बाबांची भेट होऊन पाच महिने झाले होते तेही लग्नानंतर लगेचच . त्यामुळे जिल्हाबंदी उठण्याची वाट न पहाता ई-पास काढून जाऊन यावे अशी चर्चा झाली व  6 तारखेला पास काढला आणि आता मात्र कीर्तीला आनंदी आनंद झाला . इतके दिवस इलाजच नाही म्हणून तीने संयम ठेवलेला होता . कारण मागच्या महिन्यात जायचं गाजलं व पुन्हा कॕन्सल झालं मग सगळ्यांचाच मूड गेलेला म्हणून पक्क ठरेपर्यंत शांत रहायचं असं तिने ठरवलेलं पण आता पक्के झाल्यावर मात्र आठ तारीख केव्हा येते व मी मिरजेला कधी पोहोचते असे तिला झालेलं . मला सुद्धा कीर्ती कधी माहेरी जाईल असे झाले कारण कितीही छान सासर असेल तरी नव्या नवरीला माहेरची ओढ असणारच की . या कोरोनामुळे तिला जाता आले नाही पण आता जाईल . आता घरच्या घरी का होईना पण कीर्तीला माहेरी मंगळागौर ,  श्रावणी शुक्रवार मिळणार होता .

      सध्या सगळीकडे कोरोनानं भीषण रुप घेतलं आहे त्याला बार्शी आपवाद नाही पण  सगळीकडेच नियम मात्र  शिथिल केले आहेत त्यामुळे हे पण परांड्याला दोनतीन दिवस गेले होते काका-काकींची औषधे , घरात कमीजास्त पाहून आले . आता आकांक्षाचा क्लासपण रिशेड्युल झालाय . 31 जानेवारीला संपणार फेब्रुवारी अखेर तिचे पुर्ण होऊन जाईल .

     आठ तारखेला सकाळी लवकरच आशिष-किर्ती मिरजेला गेले . चारपाच महिन्यांच्या सवयीमुळे घर मात्र एकदमच शांतशांत वाटू लागलं . आणि मिरजेत आनंद ओसंडून वहात होता . खूप दिवसांनी भेटी झाल्या होत्या . फोटो , स्टेटस आणि फोनवरुन मिरजेतील मंगळागौर , शुक्रवार अगदी उत्साहात पार पडलेले समजत होते . ठरवल्याप्रमाणे शुक्रवारी कीर्तीने पुरणाचा स्वयंपाक करुन आई-बाबांना चकित केलं . केतकी पण चार महिने झाले आली नव्हती त्यामुळे घरात दोघेच राहून तेही कंटाळले होते मुख्य म्हणजे केतकीची काळजी करुन करुन आई बेजार झाली होती . तेही खरंच होतं कारण उत्साहाच्या भरात केतकीचं काम चालू होतं . रोज नविन नविन अनुभव आम्हांला पण ऐकायला मिळत होते पण रोजची तीची ड्युटी कोव्हीड पाॕजिटीव्ह वार्डमध्ये होती . कितीही काळजी घेतली तरी विस्तवाशी खेळ होतोय तो त्यामुळे तिच्या आईच्या जिवाला चैन नव्हती . आधीच केतकीची तब्बेत नाजूक , जेवायला व्यवस्थित मिळत नाही परवाच कावीळ झाली त्यानंतर दोनदा आजारी पडली त्यामुळे प्रतिकारशक्ती कमी झालीय . असे उलटसुलट विचार करुन अस्वस्थ झालेल्या मनाला आशिष-किर्तीच्या जाण्यांने थोडासा दिलासा मिळाला , बदल झाला , मुलं आल्यावर ते जरा रिफ्रेश झाले . आठवडाभर राहून आशिष-किर्ती रविवारी बार्शीला निघाले . पण येण्याआधी केतकी आजारी पडली होती तिला ताप येत होता व टाईफाईड झाल्याचे निदान झाले . पुन्हा कोरोनाची टेस्ट केली होती त्यामुळे पुन्हा सगळ्यांच्या काळजीत भर पडली होती . भित्यापाठी ब्रम्हराक्षस म्हणतात तसं झालं .  बार्शीला येताना  रस्त्यातच केतकी कोरोना पाॕजिटीव्ह निघाल्याचे समजले.......पुन्हा सगळे चलबिचल झाले पण केतकी मात्र फर्म होती . हे होणारच होतं असे तिचे म्हणणे होते . एकदोन दिवसांत ताप कमी झाला होता पण औषधांमुळे थकवा जास्त आला होता . गोळ्यांनी पोट भरते म्हणायची . तिची चिडचीड वाढली होती आणि सहनशक्ती उरली नव्हती त्यामुळे फोनवर बोलायचं म्हणलं की तिला रडायला येत होतं ती आईबरोबर तर बोलायचीच नाही पण कीर्तीसोबत बोलायची मग मी  पण बोलत होते . पिळून निघाली होती , फोन झाला की कीर्ती खूप  अस्वस्थ व्हायची पण आम्ही चारपाच जण असल्यामुळे वातावरण लगेचच बदलायचं . आता केतकीला काहीच होत नव्हते पण दहा दिवस अॕडमीट रहावं लागणार होतं . नंतर सात दिवस क्वारंटाईन ! मग यानंतर मिरजेला आणायचं ठरलं . पण केतकी जाम वैतागली . असेच काळजीत दोनतीन दिवस गेले नंतर केतकी फोनवर व्यवस्थित बोलू लागली मग जरा सगळ्यांना हायसं वाटलं .

      आता बार्शीला आल्याआल्या शेवटची मंगळागौर  व पोळा ( आशिषचा तिथिने वाढदिवस )  एकाच दिवशी आला त्यामुळे पुरण व दुसरेच दिवाशी म्हणजे 19 आॕगस्टला आशिषचा तारखेनी लाॕकडाऊन वाढदिवस आला . किर्तीने आधीच गीफ्ट मागवून ठेवलं होतं तर आकांक्षाने सुंदरसा लाॕकडाऊन क्राऊन तयार केला होता . केक झाला व रात्री त्याच्या आवडीचे उडीदवडे केले . 

      आता लगेचच हरितालिका ,  गौरी-गणपती येणार ,  सगळ्यात मोठा सण !  प्रवास करता येत होता मग यांनी पण परांड्याला जाऊन काका-काकींना बार्शीला आणलं . बऱ्याच दिवसांनी ते आले होते . आता घर माणसांनी भरलं वातावरण सगळं छान वाटतेय पण कोरोनामुळे बाहेरचं  वातावरण तसं गंभीरच आहे . पण बाप्पाच्या आगमनाने घरात चैतन्य आलं . जोडीला निरनिराळे पदार्थ खायला मिळत होते मग सगळे अगदी खूशच ! कामाला कोणीच नाही त्यामुळे तो ताण जरा जास्तच येतोय म्हणून गौरीची तयारी जरा लवकरच सुरु केली . त्यामुळे घरात धामधूम सुरु झाली . उभ्या लक्ष्म्याचं कीर्ती ऐकून होती त्यामुळे कसं असणार सगळं याविषयी तिला खूप उत्सुकता होती . तसही गौरीला दोन दिवस ती येणार हे गृहित होतं पण कोरोनामुळे पाडव्यापासून तिचे सगळे सणवार बार्शीत अगदी शिस्तीत होत होते . अगदी जुन्या जमान्यांसारखं तिचे सासरी रहाणं पडलं आहे . वरचा मजला बांधल्याचं सार्थक झाल्यासारखे वाटतेय . पण सगळं खुशीत चालू आहे , मुख्य म्हणजे प्रत्येक गोष्ट जाणून घेण्याची तिची प्रवृत्ती व करण्याची धडपड माझा उत्साह वाढवत होती .  तिला बरोबरीने वेळेप्रमाणे आकांक्षा जोडीला होतीच त्यामुळे उत्साह अगदी ओसंडून वहात होता . अगदी मंडप घालणे , पडदे घालणे गौरीच्या साड्या नेसवणे , थोडथोडच पण सगळं फराळाचं त्यात रव्याचे लाडू , बेसन लाडू , करंज्या ,  फुलोरा सगळं या दोघींनी विचारत विचारत पहिल्यांदा  केलं . फक्त माझ्या देखरेखीखाली व नियोजनबद्ध पद्धतीने सगळं चाललं होतं . एक दिवस आधीच सगळी तयारी या दोघींना हवी होती कारण त्यादिवशी त्यांना स्वतःला नटायचं होतं . दुपारची जेवणं झाली की या तयारीला लागल्या मस्तपैकी साडी , मेकअप ट्रेडीशनल लुकमध्ये तयार ! जणू चालत्या बोलत्या जेष्ठा कनिष्ठाच !!  मला पण नऊवारीचा आग्रह मग काकींना पण सेमीपैठणी नेसायला लावली . आणि गौराईच्या स्वागताला तीन पिढ्या तयार झालो . आयुष्यभर करून करून  वार्धक्याकडे झुकलेल्या काकी , जुन्या नव्याचा मेळ घालत सामंजस्याने , कर्तव्यदक्ष ,पोक्तेपणा उत्साह , जुने अनुभव नव्याची नवलाई अशा अनेक भूमिकेतून मी स्वतः तर तरुणाईचा खळाळता झरा असलेल्या कुतूहल वाटणाऱ्या कीर्ती आणि आकांक्षा अशा तीन पिढ्या एकत्र होतो . वाजतगाजत थाटामाटात आनंदाने गौराईचं आगमन दोरे घेणं , फराळांनी पोटं भरणे तर पुजेची तयारी ताटात हळदीकुंकू  पंचामृत , गंध , अत्तर , हिरव्यागार दुर्वांच्या जुड्या ,  आघाडा , दारातली जास्वंदीची लाल  फूलं , बाकी रंगीबेरंगी फूलं , पांढरीशुभ्र पण हळदी-कुंकवाने रंगवलेली टपोरी  माळावस्त्र , भिजवलेल्या वातींचा जुडगा हे सगळं 16-16  गौरीसाठी ,  8-8  बाळांसाठी तर 21-7  गणपती व जिवातीसाठी अशी तीन दिवसांची तीन ताट त्यात दुसरे दिवशी फक्त साळी-डाळी वहायच्या आणि हे सगळे क्षण वैविध्यपुर्ण पद्धतीने  कॕमेऱ्यात टिपण्याची आशिषची कला व ते पाहून आकांक्षा-कीर्तीचं हरखून जाणं ! नवदांपत्याकडून गौरीची शोषडशोपचारे पूजा ! बाकी फारशी आरास न करता समोर फळं , पाणी भरुन तांब्या-भांडं , तांदूळ व हरभरा डाळीच्या राशी , असोल्या नारळाने ओटी , दक्षणा मग सगळ्यांनी मोठ्या आवाजात सात आरत्या धूप-कापराचा सुवास मंद लाईटींग व त्यात प्रसन्न मुद्रेने गौराई ! आणि मग पुढचे दोन दिवस अगदी धामधुमीत कसे गेले समजले नाही . लहानपणापासून आकांक्षाची लुडबूड असते पण यावर्षी तिने पण जबाबदारीने अंगावर घेत काम केलं . दुसरे दिवशी कीर्तीने स्वयंपाकघरात एन्ट्री तर सकाळी लवकरच  घेतली विचारुन विचारुन सगळं काम चालू होतं . लक्ष्म्याचा स्वयंपाक तसा चिकटच असतो पण त्यात मी बऱ्यापैकी  सुटसुटीतपणा आणला आहे .कोणताही आती काटेकोरपणा ठेवला नाही .  एकत्र करुन एकूण दोनच भाज्या एकएकच चटणी व कोशींबीर ,  विकतचं श्रीखंड बासुंदी आणि थोडासा साखरभात , खीर आणि भरपूर पुरण हे पंचपक्वान्न तर पडवळाची कढी , मिरचीच पंचामृत , कटाची आमटी तळणात आळू , घोसावळ , मिरची व पालक भजी , वडे ,  कुरडया हे मात्र यथासांग करत असते कारण सगळेजण आवडीने खातात विशेषतः काका-काकी . मुख्य म्हणजे पाडवा , वैशाखीला ते नव्हते . आणि वयपरत्वे स्वतः करुन खाणे जमत नाही . मग सगळं निरिक्षण करत करत हे काय ते काय असं विचारात यातला मोठा पुरणाचा भाग कीर्तीने उचलला व बाकी मी केल . हिरवी भाजी , केशरी साखरभात , पांढरा भात , भजी असा रंगीबेरंगी स्वयंपाक हिरव्यागार केळीच्या शेंड्याच्या पानावर नैवेद्याचं पान सजलं . सगळं मजेत हसतहसत चालू होतं त्यामुळे जरी दगदग खूप झाली असली तरी फारसा थकवा जाणवला नाही . या सगळ्यामध्ये आव्याहतपणे न सांगता यांची खूप मदत नेहमीच असते . जमेल तसं हातभार लावण्याची आशिषची तयारी होती . मुख्य म्हणजे दिवसातून सहावेळा चहा ! काकांचीपण काहीना काही हालचाल सुरु होती . विडे लावणे , भाज्या-दुर्वा निवडणे काकींच्या मदतीने करत होते . नव्याची नवलाई  , प्रौढत्व आणि परिपक्व अशा तीन पिढ्या हा सण एकत्रितपणे साजरा करत होत्या . हे दोनतीन  दिवस मात्र आकांक्षा-कीर्ती-आशिष फोटो स्टेटस यात अगदी तल्लीन होते . या सगळ्याचं  कीर्तीच्या माहेरी , आजी , आत्त्या ,  मावशा , मैत्रिणी सगळ्यांना खूप कौतुक होतं . तर इकडे आमचा पंचकन्या परिवार ,  काका-काकी  , आत्या , मैत्रिणी , माझे सासर माहेरचे सगळे ग्रुप अगदी कौतुकाने मेसेजेस फोन करत होते . नविन सुनबाईसोबत व वयस्कर सासुबाईंबरोबर  सगळ्यांना छान वाटत होतं . पिढ्यानपिढ्या हे सण तितक्याच  उत्साहाने , श्रद्धेने मनापासून करण्याची रीत आहे लहानपणी माहेरच्या आंगणात आईच्या शिस्तीत मायेच्या उबीत तर लग्न झाल्यावर सासरी थोडंस जबाबदारीने सासूबाईंच्या पद्धतीने घरोघरी हा सण साजरा केला जातो . त्याच परंपरेत नाविण्यपुर्ण पद्धतीने नविन पिढीला अलगदपणे सामावून घेणं , वसा देणं त्यापासून मिळणारं समाधान नव्या पिढीला आधोरेखीत करणं ही आपली जबाबदारी आहे , संस्कृती आहे . तीची जपणूक तर व्हायलाच हवी ! आजकाल कामं तर  सगळ्यांना आहेत वेळ नसतो पण वेळ राखीव ठेऊन हे सगळं जसं रुचेल आणि पचेल व झेपेल असं केलं तर उर्जा मिळते हे तर स्वानुभवानेच सिद्ध होते !! आता सध्या सकाळ संध्याकाळ बाप्पाची आरती असते . अनंतचतुर्दशीला आमच्याकडे बाप्पाचे विसर्जन असते . आता नवरात्रोत्सवापर्यंत थोडंस शांत आहे . माझ्या माहेरी जेष्ठी पौर्णिमेला बेंदूर असतो तर मी लहानपणी आईकडून खूपवेळा  ऐकलं आहे 

" बेंदूर न लागलं सणाचं लेंडूर

दिवाळी न सण ओवाळी "

खरंच आहे हे . यावर्षी मात्र कोरोनामुळे कुटुंबातील माणसं एकत्र राहिली आहेत व सणांमध्ये किती उत्साह असतो याची पुनश्च प्रचीती आली आहे !!!!


क्रमशः भाग 27


आज अनंत-चतुर्दशी , गणपती बाप्पाचे विसर्जन !

गेले दहा दिवस बाप्पाच्या सहवासात , धामधुमीत कसे गेले समजले नाही . नेहमीप्रमाणे मोठ्या जल्लोषात पुढच्यावर्षी येण्याचे आमंत्रण देऊन बाप्पाला निरोप दिला .

 आज आशिष-किर्तीला सुट्टी होती पण मला बँक होती . त्यामुळे मी बँकेतुन आले की आम्ही चहा घेत बसलो होतो तेव्हा कीर्ती म्हणाली

 " आमच्या खिडकीत पक्षाने घरटं केलंय आणि त्यात चार अंडी घातली आहेत ."

हे ऐकलं मात्र पण ते केव्हा एकदा  पहाते याची मला खूप उत्सुकता लागली .

पटकन चहा घेतला आणि लगबगीने वरती गेलो . तोपर्यंत अनेक प्रश्न माझ्या डोक्यात येऊन गेले .

" नेमकं कोणत्या पक्षाचं घरटं असेल . आत्तापर्यंत चिमणीचं घरटं पाहिलय पण कीर्तीने अंड्याच्या व घरट्याच्या केलेल्या वर्णनांवरुन तर ते  चिमणीचं तर नसणार मग कोणता पक्षी असेल नेमका तो ? "

तोवर आम्ही वर पोहोचलो . मागोमाग आकांक्षा पण आली . पडदा बाजूला सरकवला तसा पक्षी उडून गेलेला दिसला . मग हळूंच काच सरकवली तर इतकं सुंदर असे बाहेरुन जाड्या भरड्या काड्या वापरुन द्रोणासारखं पण थोडंस अंडाकृती आणि आतून मऊसुत गवत वापरुन अगदी वार्तुळाकार गोल केलेलं घरटं  आणि त्यात अतिशय चमकदार  जांभूळाच्या बियाच्या रंगाची व आकाराने पण तेवढीच चार अंडी ! मुख्य म्हणजे ते घरटं पाहून क्षणभर असं वाटलं ना पट्टी , ना टेप , ना कुठलं हत्यार कसं केलं असेल ?  ते तयार करताना या पक्षांनी वास्तूशास्त्र आणि विज्ञान याचा अभ्यास केला की काय ? कारण इतकं खोपचात ते आहे की पाऊस आला तर तो लागणार नाही पण सुर्याची कोवळी किरणे त्यावर नक्कीच पडणार !  ग्रीलच्या आत पण काचेच्या बाहेर , बरोबर स्लाईडींगच्या तीन चॕनलवर अगदी अलगद बनवलेलं आणि त्यात ती अंडी घातलेली ! परमेश्वराची लिला अगाध आहे . कोणत्या विद्यापीठात घेतली पदवी त्यांनी ? ते सगळं पाहून इतकं हरकायला झालं . हे घरटं किंवा अंडी चिमणीचं नाही , हा तर सुगरणीचा खोपा पण नाही मग कोणाचं असेल ?  अशी आम्ही चर्चा करत होतो तर एक चिमणीपेक्षा मोठा पण डोक्यावर तुरा असलेला लांब शेपटाचा काळा पक्षी खिडकीत येऊन इतका जोरात कलकलाट करुन गेला की क्षणभर तो पक्षी आत आला की काय असेच वाटले . पण तो आम्हांला रागवून गेला होता . असं वाटलं की तो म्हणतोय , 

 " हा इलाका माझा आहे . माझं इथे घरटं आहे थोड्याच दिवसात इथे पिल्लू येणार आहे . मला इथे तुमची लुडबूड आजिबात चालणार नाही ".

मग आम्ही हळूच काच बंद केली काचेतून बाहेरचं दिसत होतं . थोड्याच वेळात पक्षीण येऊन घरट्यात बसून गेली . वाटलं जणू काही सगळं अलबेल आहे ना हे पहाण्यासाठी ती येऊन गेली असावी . 

हे सगळं पाहून आम्हांला इतका आनंद झाला की त्याचे फोटो काढून आम्ही स्टेटस टाकले होते . तोपर्यंत पक्षी कोणता याची शोधाशोध सुरु होती . बाहेर जाऊन खिडकीखाली बसले व घरट्याभोवती घिरट्या घालणाऱ्या पक्षाचे निरिक्षण करत बसले . बुलबुल असावा असा तर्क चालू होता तेवढ्यात माझ्या स्टेटसला एका मैत्रिणीकडून 

" व्वा बुलबुलचं घरटं !" 

असा रिप्लाय आला . मग आम्ही गुगलवर 

" बुलबुल पक्षाचे घरटे " 

शोधले आणि अगदी आमच्या खिडकीतल्या घरट्याप्रमाणे अंड्यासहीत घरटी दिसली . मग ते घरटं आणि अंडी बुलबुलची आहेत यावर शिक्कामोर्तब झालं. 

मला खूप काळजी वाटतेय त्या अंड्यांची . खूप उंचीवरआहे ते घरटं ,  त्या पक्षांच्या जोडगोळीला त्या खिडकीतच दाणापाणी ठेवावे का ? का तांदूळ ठेवले तर ते खायला इतर पक्षी येतील ? आणि माणसाची चाहूल लागते म्हणून हे पक्षी अंड्याकडे फिरकलेच नाहीत तर ??

छे छे ! असं होता कामा नये म्हणून मी मुलांना खिडकी उघडूच नका म्हणून सांगितले ! पण डोळ्यासमोरुन ते घरटं आणि अंडी हालतच नव्हती . खरं तर हे सगळं नैसर्गिक आहे . त्याची एवढी चिंता करण्याची गरजच नाही . किती पक्षी आणि किती घरटी असतील पण ते अगदी घरातच आल्यामुळे एवढी उत्सुकता वाढली हे खरं ! सकाळी उठल्या बरोबर आधी पक्षी घरट्यात येऊन बसल्याची कीर्तीकडून खात्री करुन घेतली आणि जीव भांड्यात पडला आणि आता त्याला अजिबात विचलीत करायचं नाही असे ठरविले आहे . पुन्हा संध्याकाळी आतूनच पक्षी आहे का खात्री केली . कीर्ती म्हणाली

" दिवसभर दिसत होता पक्षी मधूनमधून चक्कर मारुन यायचा पण  आहे . "

बरं वाटलं चला म्हणजे आपला त्याला डिस्टर्ब नाही होत तर . मग मी गच्चीत गेले . तिथुन मात्र पक्षी उडाले की स्पष्ट दिसत होते बुलबुलचंच प्रेमी युगूल होतं ते . मधुनच आंब्याच्या , रामफळाच्या ,  चिक्कूच्या झाडावर फेरफटका मारुन परत घरट्यात  येऊन बसत होते ते .

 " अच्छा असं आहे तर . सगळ आलबेल आहे की यांच चालूदे आता आपला त्यांना काही त्रास होणार नाही न ?"

फक्त  हे पहायचं मी ठरवलं . मला एकदम हलकं हलकं वाटलं , प्रसन्न वाटलं . सुमन कल्याणपूरकरचं गाणं गुणगुणावासं वाटलं.


" पक्षीणी ,

प्रभाती चारियासी जाये

पिलू वाट पाहे उपवासी "


हे चित्र दिसू लागलं 

मग खाली येतांना सगळ्यांना सक्त ताकीद देऊनच खाली आले . खरं तर हा सगळा कोरोनाचा परिणाम आहे . बऱ्याच वर्षांनी प्रदूषण नाही , गर्दी नाही , कलकलाट नाही त्यामुळे निसर्ग मात्र खूष आहे . शांततेमुळे पक्षी प्राणी मनसोक्त विहार करु लागले आहेत . 

        यावरुन मला माझे कॉलेजचे दिवस आठवले . माझी शेवटची दोन वर्षे सांगोल्यात झाली . तेव्हा मी आत्त्याकडे रहायला होते . आत्या ,  त्यांचे यजमान त्यांना आण्णा म्हणत असत दोघेही म्हातारे झाले होते . त्यांची मुलगी मंगल , नातू अतुल व मी रहायचो . खूप जुना धाब्याचा  दगडी वाडा होता तो ! वाड्यात पाच भाडेकरु होते .  हे जुने भाडेकरु होते मग त्यांच्यात वाद होता त्यामुळे जागा सोडत नव्हते म्हणून घरमालकांनी यांची लाईट बंद केली होती . वाड्यात अगदी कोपऱ्यात तीन फूट रुंदीच्या आंधाऱ्या लंबुळक्या बोळातून गेलं की आत्याच्या घरात प्रवेश व्हायचा ! दोन अंधाऱ्या खोल्या आत स्वयंपाक घर कोपऱ्यात न्हाणीघर बाहेरची एक खोली त्यात पण शेतमालाची पोती असायची . पावसाळ्यात ओल यायची .  दिवसा वाचायचं असेल तरी उजेडासाठी समोरच्या दारात किंवा सवण्याखाली बसाव लागायचं व रात्रीचा अभ्यास तर कंदिलावर ! घेरडीत सगळ्या सुखसोई होत्या पण शिक्षणाची सोय नव्हती आणि मुलींना बाहेर एकटं ठेवणे त्या जमान्यात मान्य नव्हते मग आम्ही पण काहीच तक्रार करत नव्हतो शिकायला मिळतं हाच आनंद होता . मायडीपासून शिकायला बाहेर गेलो आम्ही . सुरुवातीला तायडीकडे किर्लोस्करवाडीला व पुढे आत्याकडे सांगोल्याला . आत्त्याचा वाडा मोडकळीस आलेला होता व भरपूर कपारी होत्या त्यामुळे पक्षी बरेच असायचे . कधी कधी पिल्लं पण दिसायची . खूपदा वाड्यात साप पण निघायचे आणि घर शेणानं सारवलेलं असायचं व भिंती पण सारवायच्या होत्या उंदीर असायचे त्यामुळे घरात बीळं व्हायची आणि मग धग वाढली की विंचू निघायचे . रोज दुपारी बीळं बुजवायचं काम आत्त्या करायच्या . त्यांच्या घरात सगळ्यांना ती सवय झाली होती मला मात्र ते नविन होतं . विंचू निघाला की आण्णा किंवा मंगल तो कातडी चप्पलने मारत असत . मी मात्र धूम ठोकायची विंचू मारल्याची खात्री झाली की मग घरात यायचे तर लगेच आण्णा नाकातून मोठा आवाज काढत म्हणयचे


" उंदीर म्हणती माझे घर

पाल म्हणती माझे घर

ढेकूण म्हणती माझे घर

विंचू म्हणती माझे घर  "


माझी मात्र बोबडी वळलेली असायची . 

         आण्णा हे एक भन्नाट व्यक्तिमत्त्व होते . पंचाहत्तरी ओलांडलेले पण स्वभावाने तापट होते देवाची पूजा करत नसत पण दोनवेळा संध्या चुकत नसे त्यांची . सारखं पद्मासनात बसून डोळे मिटलेले आणि गुंईई असा आवाज सुरु असायचा . प्राणायाम ,  शिरसासन पण करायचे . शेतात चार किलोमीटर चालत जाऊन यायचे . फारसं कोणाशी बोलत नसायचे पण  त्यांच्या मनात बोलायचं असलं की समोर बसायला लावायचे मग इंग्रजीत बोलायचे , ग्रामर विचारुन भांबेरी उडवायचे मधूनच कोणतही स्तोत्र म्हणायचे व मागे म्हणायला लावायचे . एकश्लोकी रामायण व एकश्लोकी महाभारत त्यांनीच पाठ करुन घेतलं . खूप वेळ सोडलं नाही की आत्त्या येऊन म्हणायच्या 

" तिला तासाला जायचंय 

बाहेर तिची मैत्रीण आलीय ".

मग माझा जीव भांड्यात पडायचा ते फक्त आत्याकडे तिरके डोळे किलकीले करुन पहायचे .

" केलीत का सुटका , पळा "

एवढं म्हणायचा आवकाश मी लगेच पळ काढायची . 

      एकदा रात्री मी कंदिलाच्या ऊजेडात अभ्यास करत बसले होते मार्च महिना असल्यामुळे गरम होत होतं . मंगल जवळ येऊन बसली व म्हणाली 

" शरे , चल वर , धगाटा जास्त आहे , यायचा एखादा विंचू . वर मागच्या भिंतीला लागून लाईटचा पोल आहे , उजेड येतोय तिथं आभ्यास कर , वाड्यातले सगळेजण वर येतात झोपायला , ऐक माझं  गार हवेत बैस ."

विंचवाचं नाव निघालं की मी घाबरले पटकन उठून उभी राहिले आणि आता दप्तर उचलायची पण भिती वाटू लागली . खरंच वहीखाली विंचू असला तर ? या विचारानेच घाम फुटला मग गयावया करत मी मंगलला मदत मागितली . आणि भित्यापाठी राक्षस म्हणतात तसं पसरलेल्या दप्तराखाली मोठा विंचू होता . माझी पळता भुई थोडी झाली . वर गेलेली सकाळीच खाली आले . 

अशा या प्राणी , पक्षी , किटक असलेल्या  वाड्यात दोन वर्षे राहिले होते मी . आणि कंदिलात व रोड लाईटवर अभ्यास केला . पण आमच्या  आत्त्या खूप प्रेमळ होत्या . जसं आहे त्यात ताज ताज खायला करुन द्यायचा त्यांचा अटापीटा असायचा . त्यांचा स्वयंपाक चुलीवर असे . मला यायला एक वाजतो म्हणून साडेसातला काॕलेजला जाताना खाऊनच जायचं हा आग्रह असायचा त्यांचा . जोडगहू भरडून गुळ घालून केलेला गोड सांजा किंवा लाल तिखट शेंगदाणे हळद घालून केलेला तिखटाचा सांजा , थालीपीठ , गरम भाकरी  हे ठरलेले पदार्थ आसायचे त्यांचे . थंडीच्या दिवसात गरमगरम खायला मजा यायची . मी येईपर्यंत सगळं काम व्हायचं  त्यांच आणि दुपारी वाड्याच्या दारात येऊन माझी वाट पहात बसायच्या त्या . वाड्यातल्या शेजाऱ्यांना कौतुकाने सांगायच्या 

" आमच्या भावाचं घर खेड्यात आहे पण फरशी आहे तिथं . श्रीमंत बापाची लेक आहे ही . एका निमित्ताने राहिलीय आमच्याकडे  " 

आणि मी घेरडीला गेले की शेणानं सारवण्याचं काम उरकून घ्यायच्या .माहेरचा , भावाचा , भाच्यांचा एवढ्या म्हातारपणी सुद्धा इतका अभिमान !!!

एका बुलबुलच्या घरट्याने काॕलेज जीवनातील पक्षी , प्राण्यांच्या सहवासातील गोड , भितीदायक प्रसंगाची आठवण झाली . सध्या या पक्षांचा गोड आवाज आता प्रकर्षाने जाणवतो . वाढलाय असे वाटतेय . आता ही पिल्ल कधी होतील , कशी आसतील , किती दिवस त्यांचा मुक्काम आमच्या खिडकीत असेल याविषयी मात्र उत्सुकता लागली आहे हे खरं !!


क्रमशः भाग 28


        आशिष-किर्तीला पुण्याहून बार्शीला येऊन सहा महिने पुर्ण झाले . येतांना अगदी हो-नाही करत आले होते आणि आलं की परत जाणेच झाले नाही त्यामुळे घरात कायकाय झालं असेल , नुकतच फर्निचर केलय धूळ कितपत झाली असेल ,  पेपरचा ढीग पडला असेल काय , फ्रीजची परिस्थिती कशी आहे हे सगळे प्रश्न सतावत होते . त्यात दोघांच्याही कंपनीने आम्ही जोपर्यंत सांगत नाही तोवर  WFH च करावे असे सांगितले . आता प्रवास पण सहजासहजी करता येत होता त्यामुळे पुण्याला एखादी चक्कर मारुन आलेल बरंच होईल म्हणत भाज्या आणि आठवडाभरासाठी लागणारं सगळं सामान गाडीत टाकून आजच ते दोघं पुण्याला गेले आणि घर एकदमच रिकामं रिकामं वाटायला लागलं . घरात काही कामच नाही आणि असलं तरी करावसं वाटेना .

          आज जवळजवळ तीन आठवडे झाले आमचं आख्ख कुटुंब बुलबुलभोवती रुंजी घालत होत . काल पिल्लं घरट्यातून उडाली आणि बुलबुल प्रकरणावर पडदा पडला .  बुलबुल पक्षी एवढंच माहिती होतं . तसं बुलबुलला इतक्या जवळून न्याहाळण्याचा पहिलाच प्रसंग ! त्यामुळे त्यांच्या सवयी किंवा त्यांच्याविषयी काहीही  माहिती नव्हती . पण या पंधरावीस दिवसात सतत त्यांचा वेगवेगळ्या मुडमधला किलबीलाट ऐकून त्यांचा आवाज  ओळखीचा झाला होता . सकाळ संध्याकाळ ते ऐकण्यासाठी माझे तर कान आसुसलेले असायचे त्यांच निरिक्षण करण्यात मन रमायचं . त्यांच उडणं , पिल्लांना भरवणं , पिल्लांच्या रक्षणासाठी माणसं किंवा मांजर दिसलं तर जोरजोरात कलकलाट करणं आणि आवडता खाऊ मिळाला तर आनंदाने किलबील करणं प्रत्येक आवाज न्याराच असायचा . पुन्हा एकदा खात्री पटली की परमेश्वराची लीला अगाध आहे ! निसर्ग भन्नाट आहे ! त्याचा पण आनंद आपल्याला लुटता आला  पाहिजे . 

        सुरुवातीला घरट्यात अंडी पाहिल्यानंतर एकदोन दिवस फक्त खिडकी उघडून पाहिली होती मग त्यांना डिस्टर्ब नको म्हणून पुन्हा मात्र त्यांना आम्ही काचेतूनच पहात होतो . पण हळूहळू त्यांना पण आमची सवय झाली होती . सुरवातीला पडदा थोडासा जरी हलला तरी उडून जाणारी ती आता आमचा आवाज आला तरी आरामात घरट्यात  बसून रहायची . दोनतीन दिवस तर एखादी चक्कर मारायची नाहीतर सतत घरट्यातच बसलेली असायची . आणि नऊ तारखेला सकाळी आम्हांला थोडीशी किलबील जाणवली आम्ही आतूनच आंदाज घेत होतो . बहुतेक पिल्लु झालंय असे वाटत होते . मग दुपारी ती उडून गेल्यावर या मुलांनी हळूच खिडकी उघडून डोकावलं तर डोळे बंद असलेलं एकदम  छोटंस एक लाल पिल्लु दिसलं . आशिषने शिळ घातली  तसं लालबुंद चोच उघडून आ केलं की त्याची मान लकलक  हलत होती आणि असा भास होत होता  की जणूकाही ते म्हणतंय

" मला खाऊ , मला खाऊ "

एका सेकंदात तर लगेच त्याचं मुटकुळ झालं पण त्याच्या उघडलेल्या चोचीचं दृष्य इतकं लोभसवाणं दिसत होतं की हरकायला होत होतं . त्या  दोघांचेही अथक परिश्रम सुरु होते . चोचीत चारा घेऊन यायचं  त्याला भरवायचं पुन्हा चारा आणायला जायचं . पण एकावेळी ते दोघे बाहेर जात नसत . एकजण ग्रीलवर , पाईपवर बसलेला असायचं . चारा घेऊन एकजण आलं की दुसरा जायचा . मधुनच बुलबुल पिल्लाला उब देण्यासाठी  घरट्यावर पंख पसरुन बसून रहायची . पुन्हा संध्याकाळी किलबील जराशी  वाढल्या सारखी जाणवत होती मग संध्याकाळी मी घरी गेल्यावर ती नाही असे पाहून पुन्हा एकदा हळूच  काच सरकवली व शिळ घातली तर दोन पिल्लांनी चोच उघडून मान वर  केली . दोन अंडी अजून तशीच होती . इतक गोड दृश्य दिसत होतं ते  पटकन फोटो , video काढला तोवर बुलबुल जोरात आवाज करत ग्रीलजवळ येऊन गेली . जणू ती आम्हांला रागवतेय असे वाटले मग आम्ही लगेच काच बंद केली . त्यानंतर आम्ही छोटीशी सफरचंदाची फोड हळूच  घरट्याजवळ ठेवून काच बंद केली तर लगेचच बुलबुल येऊन बसली स्वतः तीनचार वेळा फोड चाखून पाहिली जणूकाही तिने खात्री केली की 

" माझ्या पिल्लांना हे चालेल न "

 मग दोन्ही पिल्लांना तिने आनंदाने आळीपाळीने भरवले व फोड चोचीत घेऊन उडून गेली . बराच वेळ ती परतच आली नाही मग उगाचच शंकेची पाल चुकचुकली 

" काय झालं बाबा ? आपण पिल्लाला खायला घालतो असे तर तिला वाटले नसेल ? आणि परत आलीच नाही तर ? "

 अंगावर काटाच आला , तिथंच बसले तर जवळजवळ पाऊण तासांनी बुलबुल परत ग्रीलवर येऊन बसली . तिला पाहून मला खूप आनंद झाला . आंम्ही जवळच गप्पा मारत बसलेलो होतो तर तिने काचेवर चोचीने टकटक केले . गेल्या आठदहा दिवसांत कधीच हा अनुभव आला नव्हता  मग आम्ही आंदाज बांधला तिला सफरचंद हवे आहे . मग पुन्हा फोड ठेवली तर  पुन्हा तोच अनुभव आला ती थोड खायची थोडंस पिलांना भरवायची व फोड घेऊन उडून जायची असे दोन तीन वेळा झाले .

      दुसरे दिवशी सकाळी पिलांचा किलबीलाट जरा  आणखीनच  वाढला होता पुन्हा पाहिलं तर तीन पिल्लं दिसली . अजून एक पिल्लू दिसायला हवं होतं आम्ही वाट पहात होतो . आता मात्र चारा भरवण्यासाठी त्या दोघांचे खूप हेलापाटे होत आहेत असं वाटायच मग आम्ही पण जरा सफरचंदाच्या जास्तच फोडी ठेऊ लागलो . पुन्हा एकदा मोसंबीची फोड ठेवली तीने ती चाखून पाहिली पण पुन्हा तोंड लावलं नाही पिलांना पण भरवलं नाही ती फोड तशीच ठेवली मग आम्ही पण ती काढून टाकली पुन्हा सफरचंदाचीच ठेवली तर स्वतः खाऊन पिल्लांना भरवून फोड घेऊन ती उडत जायची तोच अनुभव सारखा येत होता . ती फोड कुठे नेऊन ठेवते याचं आम्हांला कोडं पडत होतं . मग मी गच्चीत जाऊन पाहिलं तर ती मागे शेतात बदामाच्या झाडावर जात होती . आता त्यांना आमची सवय झाली होती ते घरट्यात नाहीत असे पाहून आम्ही जरी  खिडकी उघडली तरी फारसा दंगा करत नसत . पिल्लं मात्र शिट्टी वाजवली की तोंड वर करुन चोच उघडून किलबील आवाज करायची पण डोळे बंदच होते . पहिलं पिल्लू दोनच दिवसात मोठ वाटू लागलं तर तिसरे दिवशी त्यांच्या अंगावर काळे केस दिसू लागले . घरट्यात तळाशी बसलेली पील्लं वरवर येतात असे वाटू लागले . चार दिवासात तर पंख दिसु लागले . जागच्या जागी ती भरपूर हलचाल करायची चौथं पिल्लू मात्र दिसलं नाही . या तीनमध्ये पण एक जरासं मोठं दिसायचं व दुसरी दोन लहान वाटायची . त्या द्रोणाएवढ्या घरट्यातसुद्धा मोठं पिल्लू या छोट्यांना आत ढकलून स्वतः वर यायचं ! आम्हांला भारी मजा वाटायची पहायला , पण भिती पण वाटायची हे जर बाहेर आलं तर खालीच पडेल म्हणून  . मुख्य म्हणजे त्यांना पंख फुटले की ते गोजिरवाणे दिसेनात काळे काळे पीस दिसत होते पण शेवटी परमेश्वराची लिला ती ! असणारच काहीतरी असे वाटायचे .

पाच दिवसाची पिल्लं मात्र चांगलीच मोठी वाटू लागली छोटे छोटे पंख दिसत होते . अगदी कोंबडीच्या जन्मलेल्या छोट्याशा  पिलाएवढी ती दिसू लागली . घरट्याच्या काठापर्यंत पिल्लं दिसू लागली . दाटीवाटीने एकमेकांना ढकलून शिट्टी वाजवली की तिन्ही पिल्लं चोच उघडून गोड आवाजात किलबील  करायची . तासंनतास रमायला व्हायचं . मी तर एवढ्या गडबडीत पण सकाळी पंधरा  मिनीटं आणि संध्याकाळी एक तास वरच असायची . आता एकदोन दिवसात ही चालत बाहेर येतील की काय असं वाटत होतं . सहावे दिवशी मात्र मला संध्याकाळी उशीर झाल्यामुळे पहाता आलं नाही . पण आज मात्र डोळे उघडले होते , शिटी वाजवली की डोळे उघडून पहायचे व लगेच डोळे झाकून निवांत झोपायचे तर फक्त त्यांची आई आली तरच चोच उघडायचे . आज घरट्यातच पंख पसरुन जागेवर उडी मारल्या सारखे करत होते . हे सगळे अपडेट्स मला घरी गेले की मिळाले . सहाच दिवसांत कित्ती शहाणपण ते ! असे मला वाटले अजून आठदहा दिवस तर नक्कीच रहातील इथे ग्रीलवर उड्या मारायला जागा आहे फक्त खाली पडायला नको . असा विचार करत मी झोपले . रात्रभर गडगडाटासह  खूप पाऊस झाला . झोपेतच ती पिल्लं मला डोळ्यांसमोर दिसू लागली . पाऊस तिरका असेल तर भिजलं असेल का घरटं ? असा विचार करत मी सकाळी पिल्लांना पहायला गडबडीने वरती गेले तर घरट्यात दोनच पिल्लं ! बापरे पडलं की काय एक पिल्लू असं वाटलं . खाली जाऊन खिडकीखाली पाहिलं पण तिथेही पिल्लू  दिसलं नाही .  नेलं का काय दुसरीकडे ? पण कसं नेलं असेल . माझी अस्वस्थता वाढली  विचार करतच मी  बँकेत आले तर मुलांनी अर्ध्या तासातच मला  मेसेज केला की घरटं रिकामं आहे पिल्लं नाहीत . मुलं पण पिल्लं पडली असावीत म्हणून खाली बोळात पळत गेली तर दोन पिलांना ते दोघे उडायला शिकवत होते व ती पील्लं मस्त उडत होती . बोळात मात्र कोणालाच येऊ देत नव्हती प्रचंड कलकलाट करत तोंडाजवळून जात होती . आता मात्र घरट्यात येतील का नाही याची शंका होती . मग मुले पण त्यांना विचलीत करायला नको म्हणत घरात आली . एकदोन तासात बोळातला आवाज बंद झाला पाहिलं तर सर्वजण उडून गेले होते . दुपारी दोनतीनवेळा बुलबुल मात्र घरट्यात येऊन सफरचंद घेऊन गेली . घरट्यात तळाशी एक अंड तसंच राहिलं होतं .  त्यासाठी येत होती का काय माहित नाही . आता मात्र एकएक गोष्टीचा उलगडा होत गेला नक्कीच यांनी कुठेतरी पिलांसाठी घरटं बनवलं असणार . जसं मांजर पिलांची जागा बदलते तसं पक्षी पण बदलत असणार . निसर्गाची किमयाच न्यारी आहे त्याचा ठाव घेण इतकं सोपं नाही. सगळ्यांना खूपच सुनसुनं वाटत होतं . संध्याकाळी मी गच्चीत जाऊन बसले तर ते दोघेही आंब्याच्या झाडावर दिसत होते मधूनच लांबच्या बदामाच्या झाडावर जात होते आवाज ओळखायला येत होता . नक्कीच त्यांच पिलांसाठीच नवं घरटं बदामाच्या झाडावर असणार . कारण अजून त्यांना निवाऱ्याची गरज आहे असे मला वाटते आहे . आकाशात भरारी घेण्याइतपत पंखात बळ आलं की पील्लं ते घरटं सोडून आपोआपच  जातील हे नक्की ! 

आज मात्र पील्लं घरट्यात नाहीत म्हणून थोडीशी हूरहूर , थोडीशी चुटपूट लागली पण त्यांनी भरारी घेण्यासाठी पहिला धडा गिरवला याचा पण आनंद आहे . मुख्य म्हणजे जवळून पहाण्याचा आनंद आम्हाला मिळाला त्याचे अनेक फोटो  व video संग्रह करता आला हेही नसे थोडके

!!!





क्रमशः भाग 29



           परवाच आठ दिवसांसाठी आशिष-किर्ती पुण्याला जाऊन घरातील थोडी स्वच्छता करुन  आले . एकूणच पुण्यातील वातावरणात व बार्शीच्या वातावरणातील बदल त्या दोघांनाही प्रकर्षाने जाणवला . पुण्याच्या मानाने बार्शी जरा जास्तच सुरक्षित वाटलं . तसेच मोठ घर , मोकळं आंगण , मुख्य म्हणजे घरात असल्यामुळे सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित मॕनेज होऊ शकतात याची पुनश्च प्रचिती आली !

           इकडे आम्हांला पण अगदीच सुनंसुनं वाटत होतं . हे दोघे आल्यावर पुन्हा घर भरल्यासारखे वाटले . साधारणपणे तीन आठवडे वेड लावून बुलबुलने तिच्या पीलांसह  मागच्या आठवड्यात पलायन केले होते . तेही पचनी पडायला जरा जडच गेलं .

पक्षांच्या निरिक्षणाचा जरा नादच लागल्यासारखं झालं होतं मला . दोनतीन दिवस तर बँकेतून घरी गेल्यावर मी त्या खिडकीजवळ जाऊन बसायची सफरचंदाची फोड ठेऊन आता येईल बुलबुल म्हणत उगाच वाट पहात .......        पण पुन्हा काही ते फिरकले नाही.......                                       पहिल्या दिवशी तर मी गच्चीत जाऊन बसले . झाडावर बुलबुलची जोडी दिसली . उगाचच मला वाटलं हीच ती असावी .......

थोड्या वेळानं छोटी पीलं उडतांना दिसली . आपल्यात होती तीच असतील का ? येईल का पिलांना घेऊन  खिडकीत ती ? अशी मनाची घालमेल झाली .

पण पुन्हा मनाची खात्री पटली आकाशात स्वच्छंदी विहार करणारे जीव आहेत हे ! असे थोडीच घरात रमतील ते ? यांनी असंच बागडावं आणि आपण फक्त आनंद लुटावा . पण उगाचच  अस्वस्थता , चुटपूट मात्र लागत होती .

           दुसरे दिवशी सकाळी अगदी उजाडत असतांनाच बाहेर कट्ट्यावर जाऊन  बसले . पक्षांचा इतका किलबीलाट ,  चिवचिवाट ऐकायला येत होता .  हे निसर्गाचे खरं रुप अनुभवायला खूप मस्त वाटत होतं मनाला प्रसन्न वाटत होत .

            सत्तावीस वर्षापूर्वी आम्ही या घरात रहायला आलो त्यावेळी या परिसरात पक्षांचा खूपच वावर होता . पोपट तर थव्यांने येत असत . झाडांवर निरनिराळ्या रंगाचे पक्षी दिसायचे . एकदा चिमणीनं घरटं केलं होतं . तेव्हाही असाच नाद लागला होता . पण हळूहळू माणसांची वर्दळ वाढत गेली . पाऊसमान कमी होत गेलं . वाहनं वाढली प्रदूषण वाढलं आणि नकळत पक्षांचा वावर कमी होत गेला . तुरळक प्रमाणात पक्षी दिसायचे .

          यावर्षी कोरोनामुळे माणसाचे जगणं मुश्कील झालं आहे पण निसर्ग खुलला आहे . पक्षी , प्राणी यांना जणू पर्वणी लाभल्यासारखं झालं आहे . त्यांचा मुक्त वावर , मुक्त संचार अनेक ठिकाणी दिसून येतोय . पाऊस तर जूनला जो सुरु झालाय तो अजून थांबलेला नाही . प्रत्येक नक्षत्राचा व्यवस्थित पाऊस आहे . ओढेनाले  भरुन वहाणं , रस्ते बंद होणं हे प्रकार आलीकडे बंद झाले होते , ऐकीवात  येत नव्हते . पण सध्या चित्र बदललंय पावसाचं वातावरण अगदी चाळीस  वर्षापूर्वी प्रमाणे झाल्यासारखे वाटत आहे .

            परवाच जवळजवळ चाळीस वर्षांनी घेरडीत प्रचंड पाऊस झाला . मारुतीच्या पायरीला पाणी लागलं . शेताचे बांध तुडूंब भरले होते . गावाचा संपर्क तुटला होता  त्या पावसाचे राखीने केलेलं वर्णन , फोटो , व्हीडीओ पाहून मला आमच्या  लहानपणीची आठवण झाली .  त्याहीवेळी मारुतीच्या पायरीला पाणी लागले होते . त्या काळात बऱ्याच असा पाऊस होत असे  मग सगळीकडे पाणी पाणी व्हायचं . आमचं धाब्याचं घर असल्यामुळे माडीवर एकदोन महिन्यात गवत वाढायच . मग गवत काढणं झालं नाही की मुळं पाणी धरायची मग घर गळायला लागायचं . वाड्यातल्या मधल्या अंगणात पाणी साठायचं थोडासा  पाऊस आला की वहायला लागायचं मग आम्ही त्यात कागदी होड्या सोडायचो त्या एकमेकांना धडकल्या की कल्ला  करायचो . खूप पाऊस झाला की पाऱ्यांच तळं भरायचं मग तळ्याची सांड सोडली जायची ते पाणी ओढ्यात यायचं मग ओढ्याचा पूर जरी ओसरला तरी पुढे बरेच दिवस पाणी वहातं रहायचं . उषा वहिनी , शांता वहिनी , पिलू वहिनी , विद्या अशा वाड्यातल्या सगळ्यांबरोबर ओढ्याला धुणं घेऊन जायला मजा वाटायची . ओढ्याच्या काठावर खरबरीत दगड मांडलेले असायचे दगड पकडायचा आणि धुणं धुवायचं . लांब कपडे किंवा साडी धुवायची आणि एका बाजूला पकडून वहात्या पाण्यात सोडून ती चुन्या करताना ओढायची हे तर  धुण्याचं काम न वाटता तो खेळ वाटायचा .

    पाऱ्यांच तळं हा एक आमच्यासाठी जिव्हाळ्याचा विषय होता . दरवर्षी शाळेची सहल गाजून गाजून एकतर बनाळीला जायची नाहीतर तळ्यावर जायची . 1972 च्या दुष्काळात बांधलेले हे तळं आहे . पारे गावापासून जवळच  आलीकडे हे तळं आहे . घेरडीपासून पाच किलोमीटरवर असेल . आम्ही मुली रोज जाणाऱ्या बसने जायचो एखादे सर बरोबर असायचे मुलं सायकलवर यायची . सगळ्यांनी तळ्यावर एकत्र भेटायचं ! अशीच एकदा जतहून येणारी बस खूपवेळ आली नाही नंतर ती पंक्चर झाल्याचे समजले तर वाट न पहाता सरळ चालत परत यायचं सरांनी ठरवलं त्याप्रमाणे आम्ही चालत आलो मात्र पाय खूप दुखले . 

            साधारणपणे दिवाळी झाली की सहल ठरायची आपापला जेवणाचा डबा व पाणी घेऊन जायच . तळ्याच्या काठावर उंच टेकडीवर टुमदार कौलारु गेस्ट हाऊस आहे . गेल्याबरोबर आख्खा परिसर फिरुन यायचं . खूप पाणी असेल तर सांडवा सोडलेला असायचा त्याचं पाणी घेरडीच्या ओढ्यात मिळायचे . तळ्यात छोट्या छोट्या मासळ्या असायच्या . पक्षांचे थवे पाण्यावर उतरतांना पहायला मजा यायची . हे करत असतांना भरपूर दंगामस्ती व्हायची मग थकून भागून गोलाकार बसायचं . जेवणं व्हायची मग थोडावेळ बसूनच गाणी-भेंड्या मग खेळ व्हायचे मग सगळ्यांना ओळीनं बसवून प्रत्येकवेळी शिवाजी महाराजांच्या इतिहासातील काही भाग वाईकर सर अगदी जोशात कथाकथन स्वरुपात सादर करत असत . ते ऐकताना अगदी स्फुरण आल्यासारखे होई  . मग संध्याकाळी परत घरी यायचं . कधीकधी वाड्यातील व भजनी मंडळातील  सगळ्या बायका जायच्या  . त्यांच्याबरोबर आम्हांला जायला मिळत असे . यावेळी आई सगळ्यांना पुरेल एवढा मोठा डबा भरुन तिचा स्पेशल रावणभात घ्यायची . सगळे अगदी खूश असायचे . 

         पुर्वी अगदी आषाढ महिन्यातच धुव्वादार पावासाला सुरुवात होत असे त्यामुळे सगळीकडे हिरवळ असायची . दिंडी हाही घेरडीत  एक आनंददायी सोहळा असे . आषाढी  एकादशीसाठी कर्नाटकमधून पंढरपूरला निघालेल्या दिंडीचा घेरडीत एक मुक्काम असे . दिंडी आली की पहिल्यांदा ती आमच्या वाड्याच्या बाहेरच्या चौकात यायची . दिंडीचे मानकरी डोंगरे होते त्या चौकाच्या दुसऱ्या बाजूला त्यांचा वाडा होता . दोन दिवस आधीच वाड्याची आसपासची स्वच्छता होई . डोंगरे वाड्यात आडाजवळ एक मोठा दगडी हौद होता तो धुऊन भरण्यासाठी एक गडी दिवसभर असायचा . वारकऱ्यांची मुक्कामाची सोय शाळेत केली जायची त्यामुळे त्यादिवशी सकाळीच शाळा भरायची व आकरा वाजता सुटायची दुपारी दोन वाजल्यापासूनच दिंडीतले काही लोक स्वयंपाकासाठी पुढे आलेले असायचे . मग आसपासच्या घरातून तवा-परात , पोळपाट लाटणं घेऊन जायचे ते कन्नड बोलत असत मग खूणेनेच हवी ती भांडी मागायचे आम्ही मुद्दाम काहीतरी बोलायचो तर ते पण कन्नडमध्ये बोलायचे . दोघांनापण एकमेकांच्या भाषा समजायच्या नाहीत मग ते हसत हसत निघून  जायचे . भात-पिठलं भाकरी ते दगडाच्या चुली मांडून करत आणि गावकऱ्यांकडून लाप्शी केली जायची . त्यासाठी मोठा चर खांदला जाई बैलगाडीतून मोठाली लाकड आणून त्यात टाकली जायची व जवळजवळ दहा फुटाचा घेर असलेली तीन फुट उंचीची काईल त्या चरावर चढविली जाई व  त्याच्यावर आधण ठेवलं जायचं . भरडलेले गहू पोत्यात असायचे व गुळाच्या ढेपा असायच्या . काईल चढवतांना , आधणात पोत्यांनी भरड ओततांना मोठ्यांदा विठूनामाचा जयजयकार व्हायचा तो लांबपर्यंत ऐकायला यायचा . हे पाच वाजेपर्यंत झालेलं असे तोवर पायी दींडी आलेली असायची . स्वागतासाठी गावातलं भजनी मंडळ तयार आसायचं . चार वाजल्यापासून आम्हा मुलांचे दिंडीच्या  आवाजाचा वेध घेत दिंडी कुठंपर्यंत आली हे पहायला हेलपाटे असायचे . समोरच्या बोळात दिंडी दिसली की आनंदीआनंद होई . ताईआत्त्याच्या कट्ट्यावर  आम्ही वाड्यातले सगळे तर गावातले लोक बोळातल्या घरांवर , कट्ट्यावर जशी जागा मिळेल तसे दाटीवाटीने उभे रहायचो . दुतर्फा रांगेत मोठ्या दिमाखात दिंडीचं आगमन व्हायचं सुरवातीला त्यांचे स्वयंसेवक त्यांच्यामागे डोक्यावर तुळशीवृंदावन ,  तुळशीचा हार घातलेल्या मुर्ती घेऊन काही बायका मग विविध वाद्य वाजवत भजन करत येणारं मंडळ आणि मागे वारकरी आसायचे . चौकात मोठा गोल करुन हे मंडळ आणि मुख्य वारकरी उभे रहायचे आणि स्थानीक मंडळ आणि दींडीचं मंडळ गोलाकार उभे रहायचे टाळाच्या ठेक्यावर नाचत आतबाहेर पावलं टाकत  तल्लीन होऊन भजन चाले . असा तो नेत्रदिपक सोहळा पार पडत असे . मग आर्ध्या तासांनी आसपासच्या घरांमधून कळशा भरुन चहा यायचा . त्याचं सगळ्या वारकऱ्यांना वाटप व्हायचं . थोडावेळ इकडेतिकडे झालं की पंगत बसायची तयारी सुरु व्हायची इकडे लाप्शीचा घमघमाट सुटलेला असायचा . कधीकधी प्रसाद म्हणून त्याची चव पण घेतली आहे . आम्ही उगाचच इकडूनतिकडे जणू काही घरचं कार्यच आहे अशा थाटात फिरायचो . पुर्ण बोळात काठ्या पुरुन लाईटची व्यवस्था केली जायची . दुतर्फा पंगत बसायची . दोनतीन पंगतीत त्यांची जेवणं व्हायची . जेवलेले लोक झोपायला पटकन निघून जायचे . रात्री सगळं संपायला दहा आकरा व्हायचे . नेलेली भांडी ते लोक रात्रीच परत आणून द्यायचे . अशातच पाऊस आला की फजिती व्हायची . सगळ्यांची झोपायची सोय शाळेत केली जायची कधी कधी जागा पुरली नाही तर कोणाच्याही ओसरीवर त्याच्यातले मुख्य वारकरी येऊन झोपायचे . पहाटे तर दिंडी गेलेली असायची . असा तो दिंडी सोहळा पार पडायचा  .






क्रमशः भाग 30


         चैत्री पाडव्यापासून अगदी श्रावण महिन्यापर्यंत असे वाटायचे की आशिषचे नविन लग्न झालंय कोरोनामुळे बरेचसे सण मिळाले आणि आता तोंडावर आलेले पण बरेचसे सण आहेत . कंपनीने बोलावलं तर जावं तर लागणारच पण पुन्हा सणासाठी येता येईल का ? रजा मिळेल का ? असे प्रश्न पडायचे . पण बघत बघत गौरी-गणपती झाले , नवरात्र-दसरा  झाला आणि आता दिवाळी आली . यामध्ये सगळ्या सणांबरोबर नृसिंहाचं व देवीचं नवरात्र  कुलधर्म कुलाचार पण पाहण्यात आला ह्याचं समाधान वाटलं . गेल्या आठ महिन्यांपासून सगळे एकत्र रहातोय . पाहुणे मंडळी बोलावता आली नाही पण घरच्याघरी का असेना सगळे सण अगदी यथासांग पार पडले . साग्रसंगित स्वयंपाक आणि छानपैकी आवरणे हे दोन अगदी अलिखीत नियम झाले होते . माझं बँकेत जाणे आणि काही  कामिनिमीत्त यांच बाहेर जाण याव्यतिरीक्त सुरुवातीला सहा महिने कोणी घराबाहेर पडलेच नाही . अगदी सुरुवातीला कलिंगडाच्यावेळी शेतात जायचं असे आमचे ठरले होते पण तेव्हा तर लाॕकडाऊनचे एकदम कडक  नियम लागू  झाले . आणि मार्चपासून अनेकदा शेतात जायचा आम्ही प्लॕन करायचो आणि काही न काही कारणांमुळे जाणं कॕन्सलच व्हायचं . एकवेळेस तर पहाटे उठलो पण पावसाचा इतका जोर होता की परत कॕन्सल करावं लागले . परवाच्या रविवारी मात्र खूप दिवसांपासून ठरवत असलेला प्लॕन यशस्वी ठरला . आकांक्षाचं शेड्यूल बीझी असल्याने ती आली नाही मग आम्ही चौघेजण निघालो . बरोबर आल्याचा चहा घेऊन सकाळी सव्वासहाला आम्ही घरातून बाहेर पडलो कारण आशिषला गावाबाहेर छान हिरवळ असेल तिथे सुर्योदयाच्यावेळी थांबायचे होते . कॕमेरा घेऊन तो सज्जच होता . मग आम्हीपण पाऊण तास ती सकाळ उगवता सुर्य न्याहाळत अगदी रोडवर घालवली . थंडी होतीच त्यामुळे आल्याचा गरमागरम चहा प्यायला मजा आली . निसर्गाच्या सानिध्यात आमचे पण फोटो आले ! रमत गमत आम्ही साडेसातला शेतात पोहोचलो . वाटेकऱ्याची बायको सुनिता तिची चूल पेटलेली होती तिने लगेच चहा केला . सकाळी जरी हवेत गारठा वाटत असला तरी दहाच्यापुढे ऊन चांगलंच तावत होतं त्यामुळे आम्ही शेतात लवकर फिरायचं ठरवूनच निघालो होतो . यावर्षी पाऊस खूपच झाला होता त्यामुळे तूर खूपच जोमाने वाढलीय आणि पिवळ्या धमक फुलांनी बहरलीय हे यांच्याकडून ऐकून होतो . सुनिता म्हणाली थंडीत सकाळच्या वेळी तूरीत दव फार असतं , तुम्ही जरा तासाभरांनी जावा . तसं आशिष पटकन ऊठला आणि म्हणाला  

" तीच तर मजा अनुभवायची आहे , निघुया आपण चला "

मग आम्ही सगळेच निघालो आणि पहिल्यांदा तूरीच्या शेतात जायचं ठरवलं . 

       आमच्या शेतातून चाळीस वर्षापुर्वी कॕनाॕल गेला आहे त्याला फार पुर्वी चांदणी तलावाचं पाणी सोडत असायचे म्हणे पण मी पहाते तसं या तीस वर्षात कधी पाणी नव्हतं हा भाग वेगळा !  पण कॕनाॕल आहे व पलीकडे जाण्यासाठी त्यातूनच पायवाट आहे पावसाळ्यात तिथे गवत वाढतं मग पलिकडे जाता यावं म्हणून कॕनाॕलवर साधारण एक फूट रुंदीचा व वीस फूट लांबीचा सिमेंटचा पोल आहे . आता आम्हांला पोलवरुनच पलिकडे जावे लागणार होते आणि आपल्यासाठी ती कसरत असते . कीर्तीसाठी तर हे नविन होतं सातआठ फूट खोल असलेल्या कॕनाॕलच्या पोलवरुन आम्ही पलिकडे गेलो . मी पण बऱ्याच दिवसांनी पोलवरुन गेले पण मजा आली . बांधावरुन उतरलो की तूरीचं शेत होतं . एवढी उंच तूर मी पण पहिल्यांदाच पाहिली . मधेमधे देशी भेंड्यांची व देशी गवारची झाडं लकडलेली होती . आकांक्षाला भेंडीबियांची आमटी फार आवडते मग भेंड्या व गवार तोडत हे पुढे त्यांच्या पाठोपाठ आम्ही असे पुढेपुढे निघालो . धुक्याच दव , गारठा आणि तूरीची पिवळी फूलं जणू काही हील स्टेशनच्या बागेत फिरतोय असा भास झाला . तेवढाच एक विकेंड एन्जाॕय करायला मिळाला असं मुलांना वाटलं . तसं तर घरी रहायला मिळत असलं तरी खरं तर वर्क फ्राॕम होममुळे मुलं अगदी वैतागून गेली आहेत फिल्ड वर्कची सवय असल्यामुळे आशिषपेक्षा कीर्तीला फोनवर मॕनेज करणं तसं त्रासदायक होतंय . मग मोकळ्या वातावरणात शेतात फिरायला जोडी आगदी खुशीत होती . चला तेवढाच बदल म्हणत यांच्या मागोमाग आम्ही शेतात फिरु लागालो .

        यांनी सुरुवातीला अगदी काॕलेजला असतांना दोन वर्षे शेती पाहिली होती पुन्हा बँकेत नोकरी लागल्यावर जालन्याला जावं लागलं पुढे बदली झाल्यावर लग्न झालं मग दोघांची नोकरी लहान मुलं त्यामुळे मात्र लक्ष देता आलं नाही . तेव्हापासून सुनिल भाऊजी लक्ष देऊ लागले मग यांनी पण दुर्लक्ष केलं . पण भाऊजी गेल्यावर सगळंच पहायचं यांच्याकडे आलं . हळुहळु बघत रिटायर झाल्यावर यांनी शेतीत चांगलंच लक्ष द्यायला , सुधारणा करायला सुरुवात केली . प्रामुख्याने पाणी प्रश्न सतावतो आहे हे लक्षात आल्यावर तीन चार बोअर घेतले . तरीही पाण्यावाचून काम आडतच होते मग एक मोठा निर्णय घेतला आमच्या शेतात एकच सामायीक विहीर होती त्याचं पाणी पुरत नव्हते म्हणून स्वतंत्र विहिर घ्यायचं ठरवलं . आणि दोन वर्षांपुर्वी विहीरीचं खोदकाम झालं , पाणी लागलं व गेल्या वर्षी विहीरीचं बांधकाम झालं . हे सगळं करतांना कारण नसताना भरपूर त्रास झाला पण हल्ली त्यांची शेतीची ओढ मात्र खूप वाढली व त्यांच्या नादाने म्हणा किंवा घरात होणाऱ्या चर्चेमुळे म्हणा आम्ही सगळेच शेती या विषयावर रमू लागलो . काका-काकींना हे सगळं ऐकायला मिळत वयोमानामुळे शेतात जाता येत नाही पण  काका मात्र कौतुकाने म्हणत आसतात  

" आमचं गाव म्हणजे आसू ! त्याला सावळारामाचं आसू म्हणून ओळखले जातं . शेतातली आत्ता जी सामायीक विहीर आहे ती सावळारामांनी घेतलेली त्यांच्या  काळातील ती जुनी विहीर आहे त्यानंतर पाच सहा पिढ्या गेल्या पण कोणीही विहिर घेण्याचं धाडस केलं नाही पण सावळारामांनंतर ते काम आनिलनं केलंय पुढच्या अनेक  पिढ्यांसाठी ते खूप महत्त्वाचे आहे  ".

आणि खरंचच तसे झाले आहे कारण विहिर घेणं त्याचं बांधकाम करणं हे काम आजच्या काळात एवढं सोपं नाही . या दोन वर्षात त्यानुषंगाने लेव्हल करणे , बांध भरुन घेणे अशी पुढची कामं निघत गेली व ते करत राहिले . ऊस , कलिंगडे , मिरच्या , टोमॅटो अशी पीकं घेत राहिले व जास्त जास्त शेतात गुंतत गेले . पण यावर्षी आधी कोरोना मग जास्तीचा पाऊस त्यामुळे ताली फुटणे , मोठाल्या भगळी , खूप मोठं गवत ही कामं वाढली गेली . आता पुन्हा सगळी डागडूजी करणं आलं .

         शेतात कुठे काय केलं होतं व आता पावसामुळे काय झालं हे दाखवत ते पुढे व आम्ही त्यांच्या मागोमाग चालत होतो कीर्ती पहिल्यांदा शेतात आली होती मग तिला , आशिषला सगळी माहिती सांगत ते चालत होते . मग आम्ही नव्या विहीरीकडे गेलो . सध्या विहीरीला चांगलं पाणी आहे उपसाच नाही . हल्ली आशिष पण बरेचवेळा शेतात आला आहे सगळीकडचे फोटो घेत त्याचं पण निरिक्षण चाललं होतं . आडीच तीन तास फिरुन आम्ही जुन्या विहीरीवर आलो तर यावर्षी या विहीरीला पण भरपूर पाणी आहे पण गाळपण तितकाच आहे . पण या विहीरीचं बांधकाम चिरेबंदी आहे नविन विहीरीच बांधकाम रींग टाकून स्लॕब टाकलेलं आहे हाच तो फरक आहे दोन्ही विहीरीत . आता आम्ही वस्तीकडे निघालो . आता मात्र ऊन्हाचा चटका वाढला होता आणि पोटात पण कावळे ओरडत होते .

तोवर इकडे सुनिताने कारल्याची भाजी , पिठलं , तव्यावर ठेचून खरडा करुन ठेवलं होतं व चुलीवर भाकरी चालू होत्या ते पाहूनच तोंडाला पाणी सुटलं . कीर्ती पहिल्यांदा आली म्हणून सुनिताने तळण पण तळले होते . खमखमीत जेवण असणार हे माहित होते त्यामुळे मी बरोबर ताकाची बाटली घेतलीच होती . चार घास जास्तच खाऊन  फक्कड जेवण करुन दुपारच्या विश्रांतीसाठी आम्ही घरी पोहोचलो !!

     आता वेध दिवाळीचे आहेत . घराची साफसफाई बऱ्यापैकी झाली आहे . यांनी कालच भरगच्च किराणा आणून ठेवला आहे . आकाशकंदील , पणत्या , लाईटच्या माळा ही कामं आजउद्या होतील तर माझी पण कोरडी तयारी तर झाली आहे . आज रविवार मग करंजीचं सारण , अनारसा पीठ तयार झालं आहे , भाजणी दळून आणलीय . कायकाय करताय करत कीर्तीचं निरीक्षण चालू  आहे . येत्या शनिवारी लक्ष्मीपूजन आहे मग तू काय घालणार मी काय घालणार करत आकांक्षा-कीर्तीची कालपासूनच  लगबग सुरु आहे ज्वेलरी , कपडे , पार्लर अशी त्यांची धावपळ सुरु आहे कारण मुख्य आकर्षण फोटोचं आहे . तयारी करुन ठेवली म्हणजे बरं  पुन्हा उद्यापासून आपापले उद्योग सुरु होतात .


लाॕकडाऊन यायरी प्रकरण 7

क्रमशः भाग 31 ते शेवट



क्रमशः भाग  31



        आली दिवाळी !!!

       आशिष-किर्तीच लग्न  झाल्यापासून  सगळे छोटेमोठे सण झाले आणि आता सगळ्यात मोठा सण म्हणजे दिवाळी आठवड्यावर येऊन ठेपली . त्यांची पहिली दिवाळी ! उत्साहाला अगदी भरतं आलं आहे . मुख्य म्हणजे सुट्ट्या-रजा मॕनेज करुन चांगली आठदहा दिवसांची मोठी सुट्टी मिळणार आणि खमंग-गोड-खुसखुशीत अशी फराळाची मेजवानी मिळणार , विशेष म्हणजे अनेक वर्षांनी दिवाळीपुर्वीच घरी असल्यामुळे दिवाळीच्या प्रत्येक ताज्याताज्या गरमगरम पदार्थाची लज्जत चाखायला मिळणार याचा आनंद वेगळाच . लक्ष्मीपूजन बार्शीला तर पाडवा मिरजेत ठरल्यामुळे दोन्हीही घरात उत्साहाला उधाण आलेलं आहे . 

         तसं तर बार्शीत आधी नविन मजला बांधला म्हणून , मग गेल्या वर्षी लग्न ठरलं म्हणून तर यावर्षी  नविन लग्न झालं म्हणत वरचा मजला लाईटींगनी उजळून निघाला . दोन्ही मजल्यावर लाईटचे व पोर्चमध्ये छोटे छोटे आकाशकंदिल लाऊन कालच बील्डींग सजून तयार झाली . त्यामुळे आठ दिवस आधीच घरात धामधूम सुरु झाली होती . 

         मग मी पण अगदी वसुबारसपासून घरीच आहे . तसं सगळे शास्त्र मी नेहमी करतेच पण आज मी पण थोडंस एन्जाॕय करायचं ठरवलं . कीर्तीची पण सुट्टी सुरु झालीय हल्ली तिला पण साड्या नेसण्याचा नाद लागलाय म्हणून तिला मग आज वासुबारसला  इरकल साडी , मॕचींग ब्लाऊज , ठुशी , काकींची एकदाणी , मोठी नथ , मोठ मंगळसुत्र , कानातली फुलं , चंद्रकोर असा सगळा जामानिमा दिला . ती पण हौसेने तयार झाली मग मी पण इरकलचाच गेटअप करुन तयार झाले .  समोर ग्राउंडवर गायी येतात , त्यांना गोग्रास खायची सवय आहे त्यामुळे त्यांनी छान पूजा करुन घेतली . रात्रीच्या जेवणात मेथी परोठ्याबरोबर ताज्या ताज्या खारी बुंदीच्या रायत्यांन लज्जत वाढविली . 

      आज धनत्रयोदशी ! यावर्षी काॕलनीत घरोघरी लाइटींग पणत्या दिसत आहेत . बरेचजण कोरोनामुळे बार्शीतच आहेत . थंडी चांगलीच वाढलीय मग तिन्हीसांजेला तयार होऊन सोनं , चांदी , पैसे याची धने गुळ ठेऊन पूजा केली . बरचसं लगेचच खाण्यास सुरुवात करता येणारं फराळाचं तयार झालेय . तर उद्या पहाटेच्या पूजेला नैवेद्यासाठी थोडेसे रवा लाडू करुन ठेवले . हे कसं लागतंय ते कसं झालंय म्हणत टेस्ट बघत बघत खाणं झालं मग तशी फारशी भूक कोणालाच नव्हती मग गरम गरम मूग डाळीची खिचडी केली . लवकर आवरुन झोपलो कारण उद्या पहाटे उठायचं होतं . 

         यावर्षी दिवाळीत जाम थंडी आहे त्यामुळे गुडुप झोपायला  मजा येतेय . पण लवकरच उठून पहाटे आंघोळी झाल्या . यावर्षी  मंदिर बंद असल्यामुळे आमच्या

 " श्री स्वामी समर्थ क्लासेसचा "

पहाटगाण्याचा  नेहमीचा कार्यक्रम होऊ शकला नाही ही गोष्ट चुकल्यासारखी वाटतेय .

पण दारात रंगीत रांगोळी , देवपूजा , फुलं असं प्रसन्न वातावरण आहे . पुर्वीप्रमाणे आजकालची मुलं दिवाळीचा फराळ नाही करत काहीतरी गरम हवं असतं . जेवणात आज गुलाबजामुन होते . आजच संध्याकाळी लक्ष्मीपूजन आहे मग लग्नाच्या श्रीमंतपूजनाच्या तयारीसारखी दुपारपासूनच आकांक्षा-कीर्ती-आशिषची आवराआवरीची लगाबग चालू आहे . फोटोसाठी सगळी धडपड !  नैवेद्यासाठी करंज्या व अनारसे तळून झालेत . पूजेची तयारी केली आम्ही पण  आवरुन  घेतलं मग नविन जोडीकडून आजची पूजा झाली . नेहमीप्रमाणे भरपूर पणत्यांनी घर उजळून निघालं . छान फोटो सेशन झालं . रात्री पुन्हा अनारसे तळले गरम गरम अनारसे खाण्याचा आमच्याकडे हा प्रोग्राम असतो . ताजा भात केला जेवणे झाली .

     उद्याचा दिवस भाकड आहे परवा पाडवा व भाऊबीज एकाच दिवशी आहे मग उद्या आशिष-किर्ती व आम्ही दोघं मिरजेला जाणार आहोत . इकडे आकांक्षाला सुट्टी नाही तर तिकडे केतकीला सुट्टी नाही . लग्नानंतर कोणाच्या भेटी होऊ शकल्या नाही म्हणत उद्याचा प्लॕन ठरला .  आम्ही बार्शीत सातजण राहातोय सगळ्यांची कामं चालू आहेत त्यामुळे वेळ कसा जातो समजत नाही पण कीर्तीचे आई-बाबा दोघेजणच असतात त्यामुळे ते खूपच कंटाळून गेलेत . त्यामुळे दिवाळसणानिमित्त गेटटुगेदर !!

      पुर्वी बरीच वर्षे दिवाळीत आम्ही परांड्यात असायचो तसं तर दिवाळीत भरपूर फटाके आणायचे व लक्ष्मीपूजनाला फटाक्याची मोठ्ठी माळ फोडायची हे काम नेहमीच सुनील भाऊजींच होतं . पण हल्ली प्रदुषण नको म्हणत मुलांचा फटाक्यांना विरोध असायचा आणि आता तर भाऊजीपण गेले आणि ती प्रथा खंडीत झाली . पण काही माणसं आपल्या इतकी जवळची असतात मग प्रसंगानुरुप त्यांच्या आठवणींचे उमाळे आल्याशिवाय रहात नाहीत . पण अकाली गेल्यामुळे भाऊजींची आठवण नेहमीच मनाला रुखरुख लावणारी चटका लावणारी असते .

       आमची घेरडीतली दिवाळी पण  भन्नाट असायची . घेरडीत सण किंवा कार्यक्रम असला की वाडा म्हणजे एक मोठ्ठ कुटुंब वाटायचं .

बऱ्याचशा कोरड्या कामासाठी आई निलाबाईला हाताशी घ्यायची . आठवडाभर आधीच साखर दळणे , चकलीची भाजणी दळणे , खोबरं खीसणे , करंजीचं सारण अशी कोरडी तयारी करुन ठेवली जायची आणि फराळाला सुरुवात करंज्यानी व्हायची मग किचकट काम म्हणत त्या कामात आम्ही मुली वाड्यात एकमेकींच्या घरी मदतीला जायचो . वसुबारसेपासूनच वाड्यात प्रत्येकाच्या आंगणात  पहाटे शेणाचा सडा टाकून शेणाच्या गवळणी , पेद्या , बळीराणा करायचं काम आमच्या भागाबाई करायच्या . आम्ही थंडीत कुडकुडत त्यांच्याजवळ बसून बघायचो मग रोज गवळणीच्या डोक्यावरच्या खळग्यात दूध घालायचं कडेनी रांगोळीची कमान काढायची . आंगणात ठिपक्यांची मोठी रांगोळी काढायची . रंगीबेरंगी रांगोळीन भरायची .  उषा वहिनी , शांता वहिनी , पीलू वहिनी त्यांच्या मुली आणि आम्ही सख्ख्या-चुलत बहिणी सगळ्यांनी एकमेकींच्या रांगोळ्या पहायच्या . स्पर्धा , चढाओढ लागायाची . शेवटच्या दिवशी वैरण बांधायची दूध उतू घालवायचं . असा स्पेशल कार्यक्रम असायचा . 

     आमचे काका अगदी कमी प्रमाणात फटाके आणायचे .  टिकल्या ,  कावळे , लवंगी फटाकड्या , एखादं लक्ष्मी तोट्याचं पाकीट ,  फुलबाज्या  , झाडं  , भुईचक्र असे सगळे प्रकार पण कमी प्रमाणात आणायचे त्यातलं आधीच थोडंथोडं तुळशीच्या लग्नासाठी काढून कपाटावर ठेवलं जायचं आणि राहिलेले फटाके आम्हांला वाटून द्यायचे मग आम्ही पण पुरवून पुरवून त्या उडवायचो . लक्ष्मीपूजन झालं की वाड्यात  एकमेकांच्या घरी हळदीकुंकवाचा कार्यक्रम असायचा . घेरडीत बारा बालुतेदारांची घरी येण्याची प्रथा होती . त्यामुळे उद्या पाडवा म्हणलं की रात्रीच आई फराळाचं , ब्लाऊज पीस , पैसे काढून ठेवायची . कारण पहाटेपासूनच बायका ओवाळायाला यायच्या . पहिला नंबर लावायची ती म्हणजे रोज वाडा झाडणारी शिवा . यादिवशी तिचा ढंग न्याराच असायचा . उजाडायच्या आधी लवकरच  साडेपाचला ती कुंकू , अक्षदा , सुपारी आणि कणकीचे दोन दिवे असलेलं ताट घेऊन इरकलचं लुगडं नेसून डोक्यावर पदर , नाकात नथ , ठसठशीत कुंकू लाऊन हसतमुखाने

  " काका " म्हणत हजर व्हायची . मग काका टोपी घालून यायचे त्यांच्या मागोमाग आम्हीपण जाऊन तिच्यासमोर तोंड करायचो मग ती म्हणायची


" दिन दिन दिवाळी 

    गायी म्हशी ववाळी........

    इडा पीडा टळो 

    आन धन्याचं घर

    सुखासमाधानाने भरो "


असं म्हणत हसत हसत ओवाळायची मग आई तिचा मान तिला द्यायची . मग ठकू परटीण तिची मुलगी कमलला बरोबर घेऊन यायची तर कोळ्याची भामा यायची अशा एकएक बायका येतच रहायच्या . मग उजाडल्यावर गोंधळी , बहुरुपी , नंदीबैल , अस्वलवाला फेरीवाले थोडाथोडा वेळ आपापली कला सादर करायचे . मुकी , म्हसा , धोंडीआप्पा , म्हातारी असे सगळे लोक येऊन जायचे . फराळाचे डबे खालीच ठेवलेले असायचे आई ताट तयार करुन द्यायची मग आम्ही  फराळाचं ताट त्यांना द्यायचो तर काका पैसे  द्यायचे . दारात येणारांन खुशीत गेलं पाहिजे असे आई-काका म्हणायचे . यातले मजा वाटणारे दोन कार्यक्रम असायचे एक म्हणजे 

" बहुरुपी "

तो अगदी पोलिसासारखा खाकी ड्रेस , खाकी टोपी , पायत बूट हातात काठी घेऊन थाटात यायचा व आलं की त्याच यमक जुळवून केलेलं गाणं सुरु करायचा 


"चला काकू चला तुम्ही लग्नाला चला , 

पोर बांधा खांबाला न

 कुत्री घ्या काकला 

एकीचा शेंबूड तिघीजणी पूसा 

चला चला चला काकू जेवायला बसा  

पंक्चर झालंय बैलगाडीचं चाक

गंगूबाई पीत बसल्यात घरात ताक "


अशा प्रकारे विबांडनात्मक मोठीच्या मोठी रचना म्हणायचे . हसून हसून पुरेवाट व्हायची . आजकाल ही कला पण नष्ट होत चालली आहे . 

      सगळ्यात मजा यायची ती म्हणजे अस्वलाचा खेळ !

घराच्या आसपास दरवेशी आला की अस्वलाच्या मोठमोठ्या आवाजात गुरगुरण्याचा आवाज यायचा . आम्ही कान लावून बसलेलोच असायचो . पंधरावीस पोरांचा घोळका त्याच्यामागे असायचा . पतकी गुरुजींच्या वाड्यापासून आम्ही त्याच्या मागे आसायचो . आपल्या दारात केव्हा येणार ही उत्सुकता असायची . प्रत्येक घरासमोर आलं की त्याचा खेळ सुरु व्हायचा . शिकवलेलं असल्यामुळे दरवेशी जसंजसं बोलेल तसंतसं  अस्वल नक्कल करायचं . सासुबाईंनी रागे भरल्यावर रुसलेल्या सुनेची नक्कल ते फार मस्त करायचं 

" सुनबाई रुसली कोपऱ्यात जाऊन बसली "

असं म्हणलं की ते लांब मागे जाऊन खाली मान घालून बसायच . मग सासू , सासरा ,  नणंद , दीर , जाऊ प्रत्येकाचं नाव घेऊन समजवायला आले म्हणलं तरी जागचं हलायचं नाही . जास्तच रुसली गुलबी म्हणल की आहे तिथंच झोपायचं  कोणाच्याही समजावण्याला ते भीक घालायचं नाही सर्वात शेवटी दरवेशी ओरडायचा

 " मंबईहून गुलबीचे मालक आलेत . येताना गुलबीला साडी आणलीय , गाळ्यात घालायला चंद्रहार आणलाय . आता गुलबी उठली आहे आणि लगबगीनं 

नवऱ्याला बसायला पाट , दिवळीच्या फरळीच ताट , आणि पाण्याचा तांब्या घिऊन आता गुलबी कशी निघाली "

असं म्हणलं की ते अंग झटकून उभ रहायचं मग आम्ही ओरडत लांब पळायचो . मग दरवेशी पुन्हा तालात म्हणायचा 

" आता आमची गुलाबी साडी नेसून नाचणार कशी 

गुलबी गुलबी गुलबी गुलबी "

असं ओरडला की अस्वल जागच्या जागी नाचायला लागायचं . आम्ही पण तालात टाळ्या वाजवायचो . मग त्याचे दोनचार केस ओढून तो काढायचा . ते घेण्यासाठी सगळ्यांची धडपड असायची का तर ते वहीत ठेवलं तर पेपर सोपा जातो असं म्हणायचे . मग त्याच्यामागे वाडाभर आम्ही फिरायचो . वाड्याबाहेर अगदी ताई आत्या , डोंगरे वाड्यातून बाहेर पडेपर्यंत मागेमागे जायचं . कधीकधी किती फिरायचं म्हणून आईचा ओरडा सुद्धा बसायचा पण आम्ही जायचोच .

      दिवाळीत वाड्यात कोणाच्या न कोणाच्या तरी घरात नविन लग्न झालेलं असायचं आणि जावई आलेला असायचा मग त्याच्या दिवाळसणाचा सोहळा व्हायचा . संध्याकाळी मग प्रत्येक घरात मामा लोकांच आगमन व्हायचं . आमच्याकडे गोंदा मामा व गंगाधर मामा न चुकता हजर असायचे . गोंदा मामा एक अविस्मरणीय प्रकरण आहे . तो पण मजा मजा करायचा ओवाळणीच्या बदल्यात आम्ही दमेपर्यँत  मनसोक्त तेल लाऊन चोळायला लावायचा . तिकडे  काकूंकडे म्हाळू मामा व उषा वहिनींचे चार भाऊ यायचे . आमच्या वाड्यात  पाहूण्यांना एकमेकांकडे फराळाला बोलवायची प्रथा होती . आलेल्या  पाहूण्यांची मात्र सगळ्यांकडे फराळाला जाऊन खाता खाता फजिती व्हायची . पुन्हा घरात जेवणाचा बेत असायचाच . भाऊजी लोक , मामा , मोहन आण्णा हे रात्री बेट लाऊन  ऊशीरपर्यंत पत्ते खेळायचे व रात्री उशीरा हारणारांकडून  हाॕटेलमध्ये चहा प्यायला जायचे कधीकधी भजी फीस्ट व्हायची . अशी आठवडाभर मजा चालायची . दिवाळी तीच आहे पण साजरी करण्याचे पॕटर्न बदलले आहेत . पण प्रसंगानूरुप भूतकाळात रमायला होतं हे नक्की !!



क्रमशः भाग  32



      उद्या पाडवा आशीष-कीर्तीची पहिली दिवाळी म्हणून आज सकाळी लवकरच मिरजेला निघायचं ठरलं . कीर्तीचा आनंद ओसंडून वहात होता . आम्ही एकदीड पर्यंत मिरजेत पोहोचणार होतो . कोरोनामुळे बाहेर कुठेही जाता येणार नव्हते मग विचार केला एक रात्र  किर्लोस्करवाडीला जाऊन येऊ कारण तायडी कुठेच जाणार नव्हती आणि वाडीला पण कोणी येणार नव्हते . तेवढाच तिला बदल होईल आपल्या भेटी होतील म्हणून बार्शीतून निघण्यापुर्वी तिला फोन करुन मिरजमध्ये जेवण करुन संध्याकाळपर्यंत पोहोचण्याचं पक्क केलं व लवकरच निघालो . कुठेही न थांबता जवळचा चहा घेत आम्ही दीड वाजता घरी पोहोचलो . विहिणबाई तशा खंबीर आहेत पण कोरोनाची दहशत त्यात त्यांना झालेला चिकन गुनिया , केतकीचं आजारपण त्यामुळे त्या थोड्या हळव्या झाल्यासारख्या झाल्यात मग कीर्तीला पाहून त्या खूपच भावनावश झाल्या . केतकीला पण दिवाळीला येता आलं नाही मग

" दोन्हीही मुली लक्ष्मुपूजनाला नाहीत असं पहिल्यांदा झालंय " 

असं म्हणत त्या मोकळ्या झाल्या . थोड्याफार फरकाने सगळ्यांचीच विशेषतः दोघेदोघे रहाणारांची हीच परिस्थिती आहे . एकटेपणा नकोसा झालाय आणि भेट झाली तरी भावनावश व्हायला होतंय . पण नंतर मात्र सुरळीत होतं दाटून आलेले मेघ बरसून निरभ्र झालेल्या आकाशाप्रमाणे ! थोड्या गप्पा झाल्यावर आराम करुन आम्ही मुक्कामाला वाडीला गेलो . तायडीकडे  चहापाणी झालं की तायडीच्या दोन्ही मुली-जावई , सून -मुलगा नातवंडं असा काॕन्फरन्स काॕल झाला . सगळेच आश्चर्यचकित झाले पण सगळ्यांना खूप बरं वाटलं की कोणीतरी वाडीत आलंय मग सगळ्यांनी एकच कल्ला केला . तायडी मनिषच्या लग्नानंतर वाडीला गेली आणि फक्त अधिक महिन्यात मंजूची भेट झाली मग कोणाचच कुठेच जाणंयेणं नाही . मग या कोरोनामुळे फीट रहाणं म्हणा कींवा वेळ जाणं म्हणा यासाठी तिने स्वतःला खूपच बीझी ठेवलंय . अगदी साधा फोन वापरणारी तायडी आधी व्हाट्सअॕप आणि आता युट्युबवर खूपच अॕक्टीव्ह  झालीय . अनेक प्रकारचे व्यायाम , रेसिपीज , स्तोत्रं सगळे डाऊनलोड करायचं व त्याप्रमाणे शिकायचा व करायचा तिला नाद लागलाय . ती हल्ली सहजपणे स्मार्ट फोन वापरते त्यामुळे आम्ही तिला स्मार्ट तायडी म्हणतो . वयाने 61 वर्षांची असलेली तायडी मनाने मात्र 16 वर्षांची आहे . रात्री , पहाटे यांच्या , माझ्या खूप साऱ्या गप्पा झाल्या मग पाडव्याचं सकाळी छान तयार होऊन छानसं फोटोसेशन झालं आणि फोटो फँमिली ग्रुपवर टाकले मग त्यावर मेसेजेसना उधाण आलं .मग आम्ही मिरजेला निघालो .

       इकडे पहिली दिवाळी !!

        घरी आलो तर दुपारच्या जेवणाची साग्रसंगीत तयारी झाली होती . लेक-जावई असल्यामुळे कीर्तीचे आई-बाबा खुशीत होते . थाटात जेवणं झाली . त्यांना पण वातावरणात बदल झाला . थोडासा आराम झाला की पुन्हा आशीष-कीर्तीची आवरा आवरीची लगबग सुरु झाली . सध्या  WFH मुळे बाहेरचे कपडे घातलेच जात नाहीत . कीर्तीने अगदी हौसेनं साखरपुड्याला शिवलेला लेहंगा पुन्हा घालायचा तिला चान्सच मिळाला नव्हता मग तो घालायचा ठरवून छानपैकी आवरुन थाटामाटात पाडव्याचं सेलिब्रेशन झालं आणि मग सगळेच खास फोटोसेशनसाठी गच्चीत गेलो . पाठीमागे जणू आपल्यासाठीच फटाके उडत होते मग त्याची रंगीबेरंगी कारंजे फोटोत पकडत पणत्यांच्या उजेडात आशिषने खूप  मस्त फोटो काढले . सगळ्यांना त्याचं खूप कौतुक होतं सगळे खूष !!  मग कीर्तीचे लहानपणीचे व सगळेच जुने फोटो पहात गप्पा , रात्रीची जेवणं झाली . सकाळी आम्ही बार्शीला निघालो आशीष-कीर्ती मिरजेत राहिले काही दिवस मिरजेला वातावरण बदल . आम्ही बार्शीत पोहोचतो तोवर ज्योती वाडीत हजर ! तिने पण कोणाच्या गाठीभेटी नाही म्हणत दोन दिवसांचा दौरा काढला होता . आधी वाडी मग कराड सातारा करुन ती पुण्यात जाईल . तायडीला ज्योती बहिणीपेक्षा जास्त मुलगीच वाटते . ज्योतीच्या लग्नाच्या पंचवीसाव्या वाढदिवसाला एकत्र जमू शकत नव्हतो त्याची तायडीला खूपच चुटपूट लागली होती . पण ई-सेलीब्रेशनमुळे ती खूष झाली होती . त्यानंतर त्या दोघी पहिल्यांदा भेटल्या मग तायडीने रांगोळी वगैरे घालून पुन्हा एकदा धमाल केली त्यांच्या गप्पा झाल्या . एकूणच फोटो ,  स्टेटसवरुन सगळी कल्पना येत होती . मोबाईलमुळे कितीही जवळ आलो असलो तरी प्रत्यक्ष भेटीतील ओलावा , माया , प्रेम याला तोड नसते हेही तितकच खरं .

      अशाप्रकारे अगदी पाडवा ते दिवाळीपर्यंत सगळे सण आणि वाढदिवस या कोरोनाच्या काळात बार्शीत  झाले . आता आमच्या घरातील मुख्य माणूस की जे लहानपणापासून कायम वाढदिवसाची वाट पहातं ते म्हणजे आकांक्षा ! लहानपणापासून तिला वाढदिवसाचं खूपच आकर्षण  आहे पण आमच्याकडे पद्धत नाही म्हणत हा कार्यक्रम नेहमीच स्कीप झालाय . त्याचा तिला राग येतो पण काय करणार . पण ती काॕलेजला गेल्यापासून तिच्या मैत्रिणी मात्र साजरा करतात ती सगळ्यांचे वाढदिवस , स्वागत फार प्रेमाने आणि प्रत्येकवेळी काहीतरी  नाविन्यपूर्ण करत असते . आमच्या लग्नाचा पंचवीसावा , आशिषचा पंचवीसावा , कीर्तीचा पंचवीसावा इतके विविधतेने तिने साजरे केले की कायम स्मरणात राहतील असे . तिच्यात creativity खूपच आहे , ती संवेदनशील खूप आहे हौशी आहे तसच हौशी कुटुंब आणि जोडीदार तिला मिळायला हवा असं मला सतत वाटत असत . कारण अशी माणसे मनाने खूप हळवी असतात ते लोकांचं खूप मनापासून आठवणीत ठेऊन करत असतात . त्यांना स्वतःची पण हौस व्हावी अशी इच्छा असते पण त्यांच्याईतके कलात्मकतेने जमत नाही ते मात्र व्हायला हवे त्यासाठी तिला मिळणारा जोडीदार त्याचे कुटुंब तोडीसतोड असावे अशी मी नेहमी स्वामी समर्थ चरणी प्रार्थना करत असते . ती बावन कशी सोनं आहे त्याचं चीज व्हायला हवं यासाठी मी जोडीदार कसा असावा याची स्वप्न पाहत असते . अगदी लहानपणापासून ती काहीही करण्याच्या तयारीत असेल तर त्यासाठी लागणारे साहित्य आणून देण्यात आमची चढाओढ असते . त्यामुळे तिला तशी कशाची कमतरता कधीच भासली नाही आत्तापर्यंतचे तिचे आयुष्य राजकुमारीप्रमाणे गेले आहे . आशिषसाठी पण ती वेगळीच महत्त्वाची आहे आणि आता कीर्तीच्या पण ती जिवाभावाची सखी आहे . नणंद भावजय या नात्यापेक्षा त्यांच्यात मित्रीचे नाते खूप खुलले आहे . त्यांच्या लग्नापूर्वी आकांक्षाने मला निक्षून सांगितले होते मी नारायण बागेत राहणार नाही . त्यांच्या त्यांना राहूदे आणि मलाही बॅचलरपण एन्जॉय करुदे त्याप्रमाणे आम्ही पण तिला हिंजवडीत रहाण्याची सोय करुन दिली होती पण कोरोना मुळे सगळाच डाव फसला आणि आता त्यांनाच एकमेकींना सोडणे अवघड झाले आहे विशेषतः कीर्तीला ते अवघड वाटते . ती सोडणार नाही म्हणते मी त्यांच्यावर सोपवले आहे तुमचे तुम्ही काय असेल ते ठरवा म्हणून . आकांक्षा सध्या सीडॕकमध्ये खूप बीझी आहे आजकाल तिची माझी भेट सुद्धा फक्त रात्री जेवतांना होते . आमच्याकडे वाढदिवसाची पद्धत नाही पण तिच्या हौसेखातर मी हळुहळू करायला सुरुवात केली आहे . आता पुढच्या आठवड्यात तिचा वाढदिवस आणि पाठोपाठ तुळशीचं लग्न आहे . त्यापुर्वीच आशीष-कीर्ती बार्शीला येतील .  तुळशीच लग्न म्हणजे छोटी दिवाळीच !

        माझ्या लग्नानंतर आम्ही दिवाळीला नेहमीच परांड्यात असायचो त्यामुळे बहुतेकवेळा तुळशीच्या लग्नाला मी घेरडीत असायचे . कोणतीही एखादी बहिण दिवाळीत घेरडीत असायची . तुळशीच्या लग्नासाठी आईनं करंजीचं सारण काढून ठेवलेलं असायचं मग आई त्याच्या ताज्या करंज्या ,  रव्याचे लाडू करायची दिवाळीतच आईने थोड्या चकल्या बाजूला काढून ठेवलेल्या असायच्या . मग ती छोटी दिवाळी साजरी व्हायची . घेरडीत बऱ्याचवेळा  यांनी तुळशीचं लग्न लावलेलं आहे . दसऱ्याप्रमाणे तुळशीच्या लग्नाचा सोहळाच असायचा घेरडीत ! आम्ही लहान होतो तेव्हा दोन दिवस आधीच आम्ही तयारीला लागायचो . तेलाचे चौकोनी डबे किंवा पत्र्याच्या बादलीत तुळस असायची . चुन्यात थोडंस पाणी घालून कुंच्यानी त्या बादलीला चुना लाऊन ठेवायचा मग ते खडखडीत वाळलं की दुसरे दिवशी काव पाण्यात कालवून काडेपेटीतील काडीला कापूस गुंडाळून बादलीवर 

" II श्री. राधा - दामोदर प्रसन्न II "

        "II तुलसीविवाह II"

असं लिहायचं मग स्वस्तीक काढायचं आणि वाळवत ठेवायचं जातायेता न्याहाळून पहायचं . वाड्यात सगळ्यात छान अक्षर कोणाच आलं या चर्चांना उधाण यायचं . लग्नादिवशी सकाळी धोंडीआप्पा बेल , झेंडू , चाफा , फुटाण्यांच्या फुलाबरोबर चींचा , बोरं , आवळा द्यायचे .  पूजा करतांनाच आई काकांना  म्हणायची 

" बाळकृष्ण आणि घंटा काढून ठेवा संध्याकाळी तुळशीच्या लग्नाला लागेल " .

आम्ही मुली दुपारीच पॕरणच्या दुकानात जाऊन छोट्या हिरव्या बांगड्या आणायचो मग चुरमुरे आणि सुई-दोरा  घेऊन बसायचो एकसारखे चुरमुरे दोऱ्यात ओवून त्याच्या मुंडावळ्या करायचो . त्या करताना भारी मजा यायची चुरमुरे मोजत मध्ये दोऱ्या बांधून बरोबर उंचीच्या मुंडावळ्या तयार झाल्या की जग जिंकल्याचा आनंद होई . अंतरपाट म्हणून पांढराशुभ्र बागाईतदार रुमालाची घडी ( गमशा) पूजेच्या ताटात ठेवली जायची . काका दोन ऊस आणायचे ते बरोबर तुळशीवर मंडप केल्यासारखे बांधायचे तुळशीसमोर शेणानं सारवायचं मोठी रांगोळी त्याला कमान काढून तयार ठेवायचो आणि मग एकमेकांच्या रांगोळीची तुलना करत वाडाभर फिरायचो . आई पूजेचं ताट तयार करुन ठेवायची त्यात हळदकुंकू , बांगड्या , गळसरी , फुलं , चिंच , बोरं , आवळा , चुरमुरे ,कांड्या-बत्तासे , लाडू-करंजी,  बाळकृष्ण , घंटा , जाडजूड चांदीचं फुलपात्र , पळी , समई , फुलवात , उदबत्ती असं सगळं व्यवस्थित मांडून ठेवायची . वाड्यात सगळ्यांची तिन्हीसांजेला तयारी व्हायची मग सगळेजण अगदी नविन कपडे घालून नटूनथटून तयार व्हायचे . आम्ही दिवाळीतले काढून ठेवलेले  फटाके , संपूर्ण चातुर्मासाचं पुस्तक सोप्यात आणून ठेवायचो . सगळी मुलं बायका तयार झाल्या की पुरुष मंडळी जमायचे . वाड्यात आमच्या घरापासून सुरुवात व्हायची सगळे आमच्या आंगणात जमायचे मोठ्या आवाजात पाच मंगलाष्टका , आरत्या व्हायच्या . बायकांमध्ये उषा वहिनी हमखास मंगलाष्टक  म्हणायच्या . लग्न चालू असतांना वाड्याच्या छोट्या दारात नरसोबासमोर जावून आम्ही फटाके उडवून मुद्दाम राखून ठेवलेल्या अक्षदा घेऊन पाठीमागे उभे रहायचं आणि शेवटची मंगलाष्टक झाली की खोडसाळपणे ठरवून सगळ्या मुलांनी एखाद्याच्या डोक्यावर मारायची व नंतर मी त्यातला नाही असा निर्वीकार चेहरा करत प्रसाद वाटायला परत तयार असायचो आर्थातच पुढच्या घरी त्याची परतफेड होणार हे नक्की असायचे . त्याचवेळी पुढचे लग्न ज्यांच्याकडे असेल तो मोठ्या आवाजात म्हणायचा

" सर्व वऱ्हाडी मंडळींनी आमच्याकडे लग्नाला चलावे ".

मग सगळ्यांचा मोर्चा त्यांच्याकडे वळायचा . पुन्हा तिथे सगळे तेच सोपस्कार  व्हायचे तिन्हीसांजेला सुरु केलेली लग्नं वाड्यात एकूण पाच घरी लग्न लागेपर्यंत नऊ वाजायला यायचे . धावाधाव करुन आम्ही पण दमून जायचो . चेष्टामस्करी , गप्पा गोष्टींना उधाण यायचं . अशा प्रकारे तुलसीविवाहानंतर खरी दिवाळी संपायची .

    आजकाल शहरात भरपूर फटाक्यांचा आवाज येतो रोषणाई असते पण माणसांची इतकी गर्दी नसते . आता पुढच्या रविवारी बार्शीत पण हा सोहळा होईल यावर्षी घरचेच आम्ही सगळे असणार त्यामुळे ती मजा येणार हे नक्की ! बघता बघता मुलांना बार्शीला येऊन आठनऊ महिने पुर्ण होत आले .

मग आता संक्रांत झाली की एक फेब्रुवारीला तारखेंनी तर तिथीने रथसप्तमीला आशीष-कीर्तीच्या लग्नाचा वाढदिवस !! असं पुर्ण वर्ष कोरोनाच्या घोंगावातात गुंडाळल्यासारखं झाल पण बराच काळ एकमेकांच्या सहवासात रहाता आलं एवढं मात्र  खरं !!

           आता सगळेजण फिरत आहेत काही ना काही कामं निघतात . कीर्तीच्या दोनतीन मैत्रिणींची लग्नं आहेत त्यानुषंगाने आशीष-कीर्ती आता सारखे बार्शी-पुणे-मिरज असे दौरे करणार . आकांक्षाच पण डिसेंबरअखेर शेवटच्या टप्प्यात येणार , तिचा प्रोजेक्ट संपून सगळं पुर्ण व्हायला पंधरा फेब्रुवारी उजाडेल . पण सध्या सारखेच जाणेयेणे असल्यामुळे सगळेच बार्शीत आहेत असे नाही . पण हेडक्वाॕर्टर अजूनही बार्शीच आहे . येणाऱ्या दिवसात कोरोनाचं प्रमाण कसे असेल याविषयी अजूनही स्पष्टता नाही पण लस यावी व जनजिवन पुर्ववत व्हावे असे मात्र मनोमन वाटतेय !!



क्रमशः भाग 33



" दिवाळी सण ओवाळी "


या उक्तीप्रमाणे खऱ्या अर्थाने सगळे सण संपतात . मग आता  आकांक्षाचा वाढदिवस आहे म्हणत दिवाळी झाली की आठ दिवसात आशीष-कीर्ती मिरजेहून परत आले .

 मला मनिषंच लग्न झाल्यापासून असं वाटायचं की मुलांचा त्यांचा एकमेकांचा तसेच त्यांचा आमच्याबरोबर पण एकत्र सहवास होत नाही . लग्न झाल्यावर आई-वडील मुलांकडे थोडंस जाऊन तरी रहातात पण मला तेही शक्य होणार नाही आणि रिटायरमेंटनंतर गेलो तर तोवर आकांक्षा कुठे असेल माहित नाही . मुलं कळती झाली तसं आपला सहवास कमी होतोय याचं शल्य होतं आणि ते स्वीकारलंही होतं इलाजच नव्हताच . पण ध्यानीमनी नसतांना कोरोनामुळे ,  लाॕकडाऊनमुळे या नऊ  महिन्यात ती कसर भरुन निघाली . 

" काही हरवले काही गवसले " 


    याप्रमाणे काहीसं झालं मग   संधी म्हणून आम्ही उपयोग केला . यादरम्यान घरातील सगळ्यांचे वाढदिवस झाले ,  आमच्या लग्नाचा वाढदिवस झाला . आता  24 नोव्हेंबर आकांक्षाचा वाढदिवस ! तिला वाढदिवसाचं खुपच औत्सुक्य असतं पण सध्या ती  सी-डॕक मध्ये  पुर्ण बीझी आहे मग आम्ही दोघे आणि आशीष-कीर्तीने सगळं प्लॕनिंग केलं . आकांक्षा-कीर्ती जरी केक शिकून आल्या असल्या तरी या दोनतीन महिन्यात घरात केक झाला नव्हता आणि करायचा तर यावेळी एकट्या कीर्तीला तो करावा लागणार होता . तशी ती मिरजेतून येताना पुर्ण तयारीनीशी आली होती . यावेळी आम्ही दोघी केक करणार होतो . हल्ली मैत्रिणीसोबतच आकांक्षा असायची त्यामुळे नेहा , नुपूर , आशीष-कीर्ती या सगळ्यांचे गीफ्ट आठ दिवस आधीच माझ्याकडे  कुरीयरने आले होते . 

मग कीर्तीने 23 तारखेला  संध्याकाळी सात वाजता केक करायला सुरुवात केली . मी फक्त आधारासाठी समोर उपस्थित असणं तिला आवश्यक होतं . ( समजा केक फसला तर दोघींनी केला म्हणता येईल म्हणून 😃) . मग आकांक्षाला आवडतो म्हणून चाॕकलेट केक करायला लागलो तोवर यांनी पण बाहेर जाऊन लाहानपणापासून आकांक्षाचं स्पेशल आवडीचं मोठ्ठ

  " कॕडबरी सेलीब्रेशन "

 आणून ठेवलं . याचं आणि आकांक्षाच स्पेशल नात आहे जागतील बहुतेक बापलेकीच असत तसच . हे आजकालच्या लोकांसारखे स्पष्ट दाखवत नाहीत पण काळजी मात्र प्रचंड असते . एकवेळ स्वतः ला काही नसेल तरी चालेल पण त्यासाठी आकांक्षा मात्र हिरमुसली तर त्यांना चैन नसते . तिच्यासाठी काहीपण अशी त्यांची वृत्ती आहे . माझा स्वभाव बडबड करण्याचा आहे त्यांचे ना बोलता असते . अगदी लहानपणापासून तिची तब्ब्येत नाजूक आहे म्हणत तिला प्रचंड जपतात ते . तिला दहावीनंतर पुण्यात ठेवायचं पण यांच्या खूप जीवावर आलेलं पण तिने हट्ट सोडला नाही मग नाईलाजाने तिला सोडले पण कित्येक दिवस त्यांना काळजी वाटे . अजूनही तिची तब्ब्येत नाजूक आहे म्हणत फार काळजी करतात जेवढ्या सुखसोयी देता येतील तेवढ्या देत राहतात . आता त्यात कीर्तीची भर पडली तिला पण जास्त ताण पडत नाही ना याकडे त्यांचे जातीने लक्ष असते . मी नोकरी केली पण केवळ त्यांच्या सहकार्याने सुकर झाली म्हणावी लागेल . ते कोणताच अट्टाहास करत नसत परांड्यातील अनेक गोष्टी ते स्वतः पेलत असत . त्यामुळे मला फारसा ताण त्यांनी दिला नाही . ते आशिषला पण बजावत असतात बायको तुझी जॉब करते तेवढं सोपं नसत तू जातीने आयुष्यभर लक्ष दिले पाहिजे . 

याबाबतीत मला आमच्या काकांची म्हणजे माझ्या वडिलांची फारच मोलाची आठवण आहे ती मी लिहिलीच पाहिजे . कारण आजकाल मुली नोकरी करतात मी जवळजवळ तीस वर्षांपूर्वी सुरुवात केली होती . काका तसे सुधारक प्रवृत्तीचे होते त्यांनी मला समोर बसवून सांगितले 

" आता तू नोकरी करणार तुला पगार सगळ्या सारखा मिळणार त्यामुळे तुला कामही तसेच करावे लागणार . शिक्षिका हा पेशा सोडला तर इतर क्षेत्रात वेळ हा द्यावाच लागतो तू तर बँकेत आहेस त्यामुळे तू पूर्णवेळ कामात असणार . हे जवळजवळ 40 वर्षे चालणार त्यामुळे  सुरुवातीपासून स्वतः तब्बेत जपली पाहिजे . कष्टाची कामे करायची नाहीत आपण मिळवतो त्यातील 25 % पैसा हा फक्त स्वतः साठी वापर करायचा . नोकरी निमित्ताने स्वतःसाठी कपडालत्ता , कामवाल्या बायका आणि सुखसोयी . 25% पैसा हा तुझी स्वतःची बचत ठेवली पाहिजे जी आपल्याला आपल्या मर्जीने खर्च करता आली पाहिजे आणि 50% तुम्ही संसारासाठी वापरा . "

मी आजही हेच शास्त्र तंतोतंत वापरते . संघटनेत उमेन कौन्सिलची कनव्हेनर आहे तिथे मुलींना सांगते सगळया आवक होतात .

" मॅडम तुम्हाला हे इतक्या पूर्वी तुमच्या वडिलांनी सांगितलं का हो ? किती विचारी होते तुमचे वडील "

पण खरच प्रत्येक बापाची आपल्या मुलीविषयीची हीच भावना असते फक्त इतक्या स्पष्ट पणे प्रत्येकाला समजावून सांगता येत नसते . मी यांना जेव्हा हे सांगितले तेव्हा हे म्हणाले मी काकांच्या मताशी 100% सहमत आहे तू याच पद्धतीने कर . आणि आशिषचे लग्न झाल्यावर आम्ही कीर्तीला पण तेच सांगितले . ती म्हणते 

" इतका विचार करणारे माझे सासर आहे . यालाच पुढारलेपण म्हणतात . मी नशीबवान आहे मला काहीच विचार करावा लागणार नाही " अशा आमच्या काकांच्या या आठवणी आणि विचार आहेत मी त्यांची मुलगी असल्याचा मला खूप अभिमान वाटतो . आज आकांक्षाच्या वाढिवसानिमित्त या आठवणींना उजाळा मिळाला असो .

इकडे तोवर कीर्तीने केलेला केक मस्त फुगला आता त्याच पुढचं सगळं राहिलं होतं आणि आकांक्षा खाली येते काय वाटू लागलं . खबऱ्या मनिष वरती होताच त्याला तिला वरंच गुंगवून ठेवायला सांगितले होते त्याप्रमाणे ते दोघे वरच होते . बहुदा आकांक्षाने समजून घेतलं असे आम्हांला वाटले . बऱ्याच दिवसांनी केला तरी एक नंबर केक तयार झाला , डेकोरेट केला आणि कीर्तीला खूप आनंद झाला मग पटापट सगळी आवाराआवरी केली केक फ्रीझरमध्ये ठेवला आम्ही हुश्श्य केलं , खूष झालो आणि आशीष-आकांक्षा खाली आले . मग आमची जेवणं वगैरे झाली आणि झोपायला निघालो . लहान मुलाला एखादी गोष्ट हवी असेल तर


"  मला ते नको आहे " 


असे म्हणते तसंच काहीसं आकांक्षाने सांगितले 


" माझा वाढदिवस आहे पण उगाच जागत बसू नकात मी पण लवकरच झोपणार आहे ".


बरं बरं म्हणंत आम्ही झोपलो . मग बारा वाजता आशीष-कीर्ती तिला खाली घेऊन आले आणि बऱ्याच वर्षांनी कुटुंबीयासमवेत आकांक्षाचा वाढदिवस साजरा झाला . बराचवेळ मैत्रिणींचे फोन चालू होते . सकाळी साधं जेवण रात्री पावभाजीचा बेत झाला . आणि 2020 संपत आले तसे आमचे वाढदिवस पण संपले . आता फक्त आशीष-कीर्तीच्या लग्नाचा वाढदिवस बाकी आहे .

आता 27 तारखेला तुळशीचं लग्न पण आदलेदिवशीच 26 ला कंपनीने कीर्तीला सप्लायरकडे पाच दिवसासाठी पुन्हा मिरजेला जायला सांगितलं . मग पुन्हा 27 लाच भल्या पहाटे आशीष-कीर्ती मिरजेला गेले . मुख्य म्हणजे लेक-जावयाची हजेरी मिरजेच्या तुळशीच्या लग्नांला लागली !त्यामुळे कीर्तीचे आई-बाबा खूष !  कीर्तीला पण खूप आनंद झाला फक्त चारपाच दिवसातच लगेचच प्रवासाची दगदग झाली आधीच माहित असतं तर कदाचित थांबली असती . आता मे महिन्यापासून पोस्टपोन होत असलेली तिच्या दोन मैत्रिणींची पण लग्नं आहेत . पुणे -मिरज -बार्शी असे दौरे त्यांना करावे लागणार आहेत . यानिमित्ताने आशिषचं मिरजेत भरपूर रहाणं पडलं कोरोनामुळे बाकी काही नाही पण


" वेळच मिळत नाही "


हे पुर्णपणे खोडून निघालं घरी काम करत हवं तिथं रहायला मिळालं त्यामुळे सहवास घडतोय सहवासाने प्रेम वाढतं एवढं खरं ! आणि नाती लवकर आपलीशी होतात . 

परांड्यात मामांच्या घराची वास्तूशांती म्हणून परवाच काका-काकींना हे परांड्यात सोडून आले . सध्या आम्ही तिघेच बार्शीत आहोत कोरोनामुळे सध्या आजूबाजूला  लग्नं मर्यादित लोकसंख्येत केलीली दिसून येतात  मग आम्ही पण तुळशीच लग्न घरच्याघरी केलं असं मी मजेनी म्हणते  !

कोरोनावर लस अजूनही आलेली नाही पण येणार येणार म्हणत भीतभीत का होईना सगळं जनजिवन बऱ्यापैकी सुरळीत झालं आहे . नाॕर्मल आयुष्य जगण्यासाठी प्रत्येकजण आसुसलेला आहे . पुर्वी असं म्हणायचे की पाडव्यादिवशी आपण जे करतो खातो तसं वर्षभर मिळतं म्हणून चांगलं खावं , नवे कपडे घालावे पण यावर्षी त्याची खरं खरं प्रचिती आली पाडवाच आपण सर्वांनी  लाॕकडाऊनमध्ये केला , सगळी कामं स्वतः केली तर पुढचं वर्ष जवळजवळ तसंच गेलंय . पण आता मात्र काळोखानंतर पहाट होणारच या आशेने येणाऱ्या उषःकालाची सारेजण मोकळा श्वास घेण्यासाठी आतुरतेने वाट पहात आहेत हे नक्की .

आज आकरा डिसेंबर मघाशी आशीष-कीर्तीचा फोन झाला तर कीर्तीला आता जानेवरीमध्ये पुण्यात यायचा प्लॕन करा असं मिटींगमध्ये सांगितले . खरं तर तिचं काम तिथेच आहे तरी पण बार्शीत रहायची सवय झालीय आता कायमसाठी पुण्यात जायचं म्हणलं की उगाचच कसंतरी झालं . तशी दोनतीन कारण आहेत एकतर अजून लस मिळाली नाही ती घेऊन गेलं तर बिनधास्त होईल . दुसरं म्हणजे घरी कामाला बायका लगेच येऊ शकतील का ? आणि नाही आल्या तर मॕनेज होईल का ?आणि तिसरं म्हणजे आता सणामध्ये फक्त संक्रातीचा सण राहिलाय तो तोंडावर आलाय तो झाला की संपल आता पाहू काय होतं ते . माणसाच्या आशा वाढत असतात खरं . कीर्तीच्या मैत्रिणीचं लग्न झालं की 26 डिसेंबरला ती दोघं येतील बार्शीला . मग पाहूयात किती रहायला मिळतं त्यांना त्याप्रमाणे करु . आता आकांक्षाचा पण क्लास यामहिन्यात संपतोय पंधरा जानेवारीपर्यंत परिक्षा संपेल पुढे 15 फेब्रुवारीपर्यंत प्रोजेक्ट तिलाही वाटतंय प्रोजेक्ट क्लासमध्ये करावा पाहू आता काय होतं ते . एवढं नक्की की प्रत्येकाला नाॕर्मल आयुष्य जगावं असं वाटत आहे . तेही बरोबरच आहे पण 2020 हे कॕलेंडर वर्ष संपत आलंय तर त्याच्याबरोबरच करोना पण संपावा एवढीच इच्छा !

आज 27 डिसेंबर ! कालच आशीष-कीर्ती तब्बल एक महिना मिरजेत राहून परत आली . एक वर्षाच्या आत नविन सुनेचा सहवास जसा आम्हांला झाला तसाच कीर्तीच्या आई-बाबा व आशिष यांना एकत्र रहाता आल ! की जे असं कधी रहाता येईल असं वाटलं नव्हतं . कोरोनामुळे हेही झालं !  

लग्नाला एक वर्ष व्हायला आता फक्त एक महिना राहिला आहे .

आता सध्या भाज्यांची रेलचेल आहे पुन्हा सगळे एकत्र रहात आहेत मग पुन्हा खवय्येगीरीचा एकएक राऊंड करणार . आता मुलं आधी पुण्याला जातात का आशीष-कीर्तीच्या लग्नाचा  वाढदिवस आधी होतो हे पहायचं कारण क्रमशःची समाप्ती जे आधी होईल तेव्हा करणार !




क्रमशः भाग 34




        आता नविन वर्षात म्हणजेच 9 जानेवारी 2021 शनिवारी  मुलांच पुण्याला जायचं ठरलं आहे.  त्यानुषंगाने कामांची लिस्ट तयार झाली . आणि मन भूतकाळात गेलं . भारतात कोरोनाचं घोंघावतं वादळ सुरु झालं आणि हो नाही करत पाडव्याच्या आधी दोन दिवस  आशिष-किर्ती-आकांक्षा  बार्शीला येऊन पोहोचली . तसा कोरोनाचा फारसा अंदाज कोणालाच येत नव्हता आणि एकदोन दिवसांत एकवीस दिवसांसाठी  लाॕकडाऊन घोषीत  झालं आणि मुलांना वाटलं

" आता तीन आठवडे सगळंच बंद आहे तर बार्शीला आलो खूप बरं झालं आता रहाणं पडेल . "

          नविनच लग्न झाल्यामुळे आम्ही नुकताच आशिषचा नविन संसार लावून आलो होतो त्यामुळे त्यांनी अजून एखादा किलो तांदूळ पण बाहेरुन आणला नव्हता तर एकदम सगळं अंगावर पडलं तर गोंधळायला झालं असतं. पुण्यात राहून काय केलं असतं ? फजितीच झाली असती . आता इथे बार्शीत एकत्र रहायला तरी मिळेल थोडफार स्वयंपाक शिकता येईल असं म्हणत म्हणत पंधरा-पंधरा दिवस लाॕकडाऊन  वाढत राहिले . कंपनी WFH वाढवत राहिली . आकांक्षाचा क्लास आॕनलाईन सुरु झाला आणि  मग आज तब्बल नऊदहा महिने झाले आम्ही सगळे बार्शीत एकत्र राहतो आहोत ! 
       आलेला अनुभव लिहावा असे सुरुवातीला वाटले जवळजवळ एक महिन्यांनी बराच मोठा अनुभव लिहीला आणि माझे आप्तेष्ट व स्नेह्यांना पाठवला तर प्रतिसाद इतका छान मिळाला की 

 " लिहित रहा छान वाटतंय "

हा मेसेज जवळजवळ सगळ्यांनी दिला . सुरुवातीला रोजचा दिवस काहीतरी नविन अनुभव यायचा मग मला पण ते लिहायला व सगळ्यांना वाचायला आवडू लागलं . शेरे , टिपण्णी इतकी की मला काहीजणांनी सांगितले की

 " कीर्ती नविन सून आहे तसेच तू पण नविन सासू आहेस . लिहित रहा संग्रह करुन त्याचं पुस्तक तयार कर . एवढ्यावरच न थांबता नविन लग्न झालेल्या मुलींच्या व तिच्या सासूच्या  वाचनात येईल असेही पहा . त्यांच्यासाठी हे अनुभव नक्कीच दिशादर्शक ठरतील , नविन संसार टवटवीत रहातील ".
  
असे मेसेजेस , फोन ऐकल्यावर मात्र माझा लिहिण्याचा उत्साह वाढत गेला मग मी लिहीत राहिले . लिहीत लिहीत मी माझ्या बालपणात , मुलांच्या बालपणात पण फेरफटका मारुन आले .ओघाने आई-काकांंची आठवण ताजी झाली .  मनाला समाधान वाटायचं . बऱ्याचदा सुनिल भाऊजी व सुखदाची आठवण यायची आणि मनाला रुखरुख लागायची . मध्यंतरी मात्र तेच तेच वातावरण होतं . नविन काही घडत नसे , कोरोनाचा कंटाळा यायचा मग लिखाणात पण खंड पडायचा पण लिखाणाची नाळ तशी तुटू दिली नव्हती  आणि बघत बघत क्रमशः 33 भाग पुर्ण झाले . वाचणारांना पण याची सवय झाली . जास्तच खंड पडला तर 

" काय ग , आलीकडे बरेच दिवसात  क्रमशःचा  पुढचा भाग आला नाही " 

असे मेसेजेस यायचे तर काहीतरी घडलं की आशिष-किर्ती-आकांक्षा म्हणायचे 

" काही घडलं नाही म्हणून क्रमशः लिहीलं नाही आता हे तर लिहीलच पाहिजे "

मग माझा पुढचा भाग लिहीला जाई . या कालावधीत बरंच पाणी पुलाखालुन गेलं अनेक प्रसंग घडले त्याचे अनुभव लिहायचे व ते वाचताना खूप आनंद व्हायचा . काहीवेळा काळजी वाटायची ,  काहीवेळा घाबरायला व्हायचं . मायडी , केतकी यांना कोरोना होणं यासारख्या काही अस्वस्थ करणाऱ्या घटना या कालावधीतच  घडल्या तर खूप दिवसापासून कुठेही जाणंयेणं नसल्याने दोघदोघच घरात राहून अनेकजण कंटाळून गेलेलं पण जाणवायचं . ज्योतीच्या लग्नाला पंचवीस वर्षे पुर्ण झाली त्याचं केलेलं ई-सेलिब्रेशन आणि त्यावेळी मनाने सर्वजण एका साखळीत गुंफल्यासारखे असायचे मग त्याचा परमोच्च बींदू गाठल्यावर आनंदाला आलेलं उधाण ! यादरम्यान झालेले आमचे वाढदिवस , लग्नाचा वाढदिवस . सगळेच्या सगळे सण आणि लाॕकडाऊनमुळे सगळी कामे  घरीच करणे क्रमप्राप्त झाल्यामुळे पाककलांना आलेलं उधाण ! आणि पदार्थाच्या चविप्रमाणेच
 " सुगरण कन्या " 
ग्रुपवरची खमंग-गोड अशी चविष्ठ खुसखुशीत चटकदार चर्चा . यादरम्यान आमच्याकडे  "किचन" 
हा शब्द लोप पावला आणि आम्ही  
" मुदपाकखाना " 
हा शब्दप्रयोग करु लागलो कारण घरामध्ये खाणारी तरुणाई ते वृद्ध अशी सर्व वयोगटातील माणसं . आणि सगळी कामं स्वतःच करायची मग घाईच्या पण मर्यादित मुख्य म्हणजे सकाळच्या वेळेत मोकळं , पातळ, खमखमीत , आळणी , कडक , मऊ असा वैविध्यपुर्ण साग्रसंगीत स्वयंपाक करतांना होणारी दमछाक . बाहेरचं खाणं नाही त्यामुळे प्रमाण पण भरपूर . चहा सारखा करावा लागतो म्हणून मग एकदमच बारापंधरा  कप चहाच मिश्रण करुन ठेवलं की आशिषने त्यात आलं वगैरे भरपूर टाकून डावाने हलवत 
" सरितातुल्य चहा " 
असे म्हणत थर्मास भरणे व सगळ्यांना चहा देणे हे त्याचं काम होत . 
         एकूणच लाॕकडाऊनच्या प्रकारानुसार किराणा , भाजी आणि लागणारं सगळं सामान आणायचं . आणि प्रत्येकाने माझी वेळ झाली म्हणून पळायचं मग कमीजास्त सगळं पहायचं हे काम एकदोन दिवस नाही तर नऊदहा माहिने रोजच यांना करावं लागलं  . 
          अशा एक ना दोन  कायमस्वरुपी स्मरणात रहातील अशा अनेक घटना घडल्या . आणि आता बघता बघता मुलं पुण्याला परत जाण्याचा क्षण येऊन ठेपला ! आणि मन हळवं झालं . संपुर्ण घटनाक्रम फ्लॕशबॕकसारखा डोळ्यासमोर तरळतोय .
     तसं तर दहावी झाली की मुलं बाहेर आहेत त्यामुळे ते नसण्याची सवय झालीय पण........ 
आता ती परिपक्व झालीत आशिषचं लग्न झाल्यामुळे कीर्तीपण आहे .  मग नऊदहा  महिन्यात इतकी सवय झालीय की ते जाणार आहेतच हे माहित  असूनसुद्धा अगदी 9 जानेवारीला  जाणार आहेत म्हणलं की मनाची अवस्था कातर कातर झाली , आतल्या आत उमाळे येऊ लागलेत .भरभरुन होणारं लिखाण मागच्या भागापासूनच आकसल्यासारखं वाटतंय . खरं तर हे नऊदहा महिने एकत्र रहाणे हे अनपेक्षीत आहे . पण तो अगदी आपला हक्कच आहे असे वाटतं आहे . मन आहे जसा विचार करते तेच बरोबर आहे असे वाटत रहाते . सुख घटाघटा प्यायचं ही माणसाची प्रवृत्ती आहे . एखाद्या मुलीचं लग्न जमलं की घरच्यांना आनंद तर होतोच पण मुलगी सासरी जाणार म्हणून भरुन पण येतं , हुरहुर वाटते तशीच काहीतरी ही मानसिकता आहे . आजकाल नोकरीच्या निमित्ताने मुले दूर असतात आणि असणारच ही मानसिकता तयार झालेली असते . आयुष्यात धावण्याची शर्यत लावल्याप्रमाणे बाकी सगळं गौण समजत आपण पण  धावत रहातो . हातातून वाळू निसटावी त्याप्रमाणे असे काही क्षण निसटून जातात की या धकाधकीच्या जिवनात त्याचा कधी आपण विचारंच करत नाहीत त्यामुळे मला तरी मनोमन असं वाटतंय की कोरोनामुळे 

" काही हरवलं 
तर काही गवसलं "  

असं झालं हे नक्की !
माझं या भागाच लिखाण चालू होतं आणि आशिष-किर्ती येऊन बसले आणि म्हणू लागले . 

" आम्हांला पुण्याला नाही जावं वाटत बार्शीत रहावं वाटतंय . इथे बघ न सगळ छान वाटतंय , घरात माणसं आहेत खाणं , पीण , गप्पा , मजा येते . जेव्हा काम किंवा आराम करायचा असतो तेव्हा वरच्या घरात गेलं की संपलं . तिथे दोघेजणच मग आम्ही काय करु तिथे ? "

हे ऐकून मी मात्र आवाक झाले . लळा लागलाय हे मान्य आहे पण बार्शीत राहून करायचं काय ? मग हसतहसत चर्चा आपली स्वतःची एखादी कंपनी बार्शीच्या आसपास काढू इथपर्यंत येऊन पोहोचली ! पण जायला नको वाटतंय हे नक्की . बरोबरही आहे कारण गृहस्थाश्रमात प्रवेश केला तसं एकत्र कुटुंबात रहायची सवय लागली आहे पुण्यात गेलं की अ पासून सुरुवात करायची , तशी तर मागच्या वर्षी ती झाली होती पण आता विसरी पडली आणि हेच जिवन बरं वाटू लागलं म्हणून आता दोघेच रहायला नको वाटतेय . मग पुन्हा ठरलं कंपनीने आत्ता बोलावलं आहे तर जाऊन तरी पाहू . फारसं जावं लागणार नसेल तर जाणंयेणं करु . जशी परिस्थिती असेल त्याप्रमाणे मॕनेज करु . मला माहित आहे गाडीनं वेग घेईपर्यंत असतं हे . आधी येताना हो-नाही चाललेलं तर आता जायचं जीवावर आलंय !  तसं तर भावनावश सगळ्यांनाच होतंय . 
      आता आकांक्षाच सी-डॕकपण शेवाटच्या टप्प्यात आलं आहे त्यामुळे आता दोन महिने तिच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत त्यामुळे फेब्रुवारी अखेरपर्यंत तसे आम्हीपण बांधीलच आहोत !
      पुन्हा गप्पांमध्ये गाडी क्रमशः लिखाणावर आली .मी जर हे पुस्तक छापणार असेल तर त्याची प्रस्तावना कीर्ती करणार असे ठरलं आहे पाहूया आता केव्हा देते ते . तसं तिला वाचनाचा बऱ्यापैकी नाद आहे लिहिते पण छान आता मी प्रस्तावनेची वाट पहातेय . मग माझं मनोगत लिहून पुर्ण भागांची लींक तयार करण्याचा विचार आहे , पाहूयात कसे जमते ते . तर अशा संमिश्र भावना आहेत या सगळ्या . काय काय होतय हेच समजत नाही भावनांचा कल्लोळ आहे !!
           पण आता जाणार तर आहेतच मग तयारी पण करायलाच हवी . आता आधी एक दिवस परांडा दौरा करायचा आहे कीर्तीला पण परांड्याचं घर पहायचं आहे पाहू कसं जमतं ते . मग पुण्याला जाण्यापुर्वी किमान महिनाभर तरी बाहेर जायला लागू नये इतपत पीठं , किराणा , आठवडाभर पुरेल एवढी भाजी , नेहमीप्रमाणे थोडाफार कोरडा खाऊ ही सगळी तयारी करावी लागेल . आत्ता सगळ्यात जास्त त्रास देणारा विचार म्हणजे माझ्या मनात आलं की मी शनिवारी हुतात्माने जाऊन रविवारी परत येऊ शकेन अशी परिस्थिती कधी होणार ! असे सतत विचारचक्र सुरु आहे . पण हळुहळू जनजिवन पण सुरळीत होईल . कुठेही जाणंयेणं नाही . बहिणी , पाहूणे , मैत्रीणी , संघटनेतील सहकारी , गायन क्लास ग्रुप सगळ्यांच्या प्रत्यक्ष भेटी होऊन पण नऊदहा महिने होऊन गेलेत . फोन मेसेजेस चालूच आहेत पण प्रत्यक्ष भेटीची पण आस आहे . पाहूया कधी सगळं सुरळीत होतं ते !
        कधी नव्हे ते मध्यंतरी घरातच बुलबुलला अगदीच जवळून न्याहाळण्याचा योग आला . अथक परिश्रम करुन त्या युगुलाने तयार केलेलं उबदार घरटं मग त्यात अंडी घालणं आणि पिलांचा जन्म या प्रक्रिया पुर्ण होईस्तोवर जिवाचं रान करणं मग त्या पिलांना जिवापाड जपणं , संगोपन करणे , उडायला शिकवणं सरते शेवटी पंखात बळ आलं की पिलांनी घरटं सोडून उंच आकाशात भरारी घेणं त्यातच जन्मदात्यांनी समाधान मानणं ! सगळंच कसं अगदी क्रमाने ठरल्याप्रमाणे असतं ! पक्षी असो , प्राणी असो वा माणुस ! प्रत्येकाची जिवनशैली ही समानच असते आणि तशी जगता आली तरच समाधान वाटतं . सहवास , प्रेम , आनंद , विरह , समाधान आणि सर्वात शेवटी असंच घडलं तरच वाटणारी धन्यता !! नऊदहा महिने मी मुलांमध्ये पुरती गुरफटून गेले , मानसिकरित्या मुलांमध्ये गुंतले पण त्यांच्या पंखात बळ आलेलं आहे संधी मिळताच ते भरारी घेणार आणि त्यातच धन्यता मानली पाहिजे याचं जणू प्रात्यक्षिकच परमेश्वराने बुलबुलच्या रुपाने दाखविले असे म्हणायला हरकत नाही . माझी आई नेहमी म्हणायची

" पाण्याला पुढे धावण्याची ओढ असते , माणसाचही तसंच असत पुढेपुढे तो धावत असतो आणि असाव पण तसंच  ".

मनुष्य प्राणी हे एक अजब रसायन आहे तसंच न उलगडलेलं तरीपण हवहवसं वाटणारं कोडंदेखील  !!!




क्रमशः भाग 35


( शेवटचा भाग )





          जवळजवळ दहा-आकरा महिन्याच्या मोठ्या सुट्टीनंतर आशिष-किर्ती काल रहाण्यासाठी पुण्याला गेले आणि मनाशी संवाद सुरु झाला ! आकांक्षाचं सी-डॕक अजून चालू आहे त्यामुळे ती अजून इथेच आहे तिची परिक्षा , प्रोजेक्ट आणि बरंच काही महत्त्वाचे याच महिन्यात आहे त्यामुळे ती खूपच बीझी आहे पण घरात आहे तिला खायला व्यवस्थित देता येतंय घरात तिचा वावर आहे त्यामुळे थोडंस बरं वाटतंय फेब्रुवारी अखेर तिचं शिक्षण संपून नविन पर्व सुरु होईल . नवीन पर्व नुसते नोकरीचे नाही तर तिच्या डोक्यात अनेक विचार आहेत ती म्हणते तिने शिक्षणाचा टप्पा पूर्ण केलाय आता तिला नोकरी लागेल आता थोडंसं तिला स्वतःमध्ये डोकावायचे आहे . अभिनयाचे थोडंसं शास्त्रोक्त शिक्षण घ्यायचे आहे , इंस्टावर ॲक्टिव्ह व्हायचे आहे डान्स , कविता ,  इतर काही छोटेछोटे रिल्स बनवायचे आहेत . काहीतरी नाविन्याचा ध्यास आहे तिला . मुलांची घोडदौड सुरु झालीय त्यांना पुढची ध्येयं खुणावत आहेत . मग भरारी तर घेतलीच पाहिजे पण आशिष-किर्ती गेल्यामुळे घर अगदी खायला उठल्यासारख झालंय . तशी खूप कामं आहेत पण काहीच करावसं वाटत नाही . सगळं एकदम शांत........


       तसं बारातेरा वर्षे झाली मुलांचे येणे दोनतीन दिवस राहून जाणे ही सवय झालीय . जातांना थोडंस कसंतरी होतं पण पुन्हा लगेचच आपापल्या उद्योगात गुंतले जाते . पण यावेळी मनू आणि आकांक्षा दोघेपण त्यांच्या बारावीच्या सुट्टीनंतर इतके दिवस बार्शीला राहिलेत यावेळी त्यांच्याबरोबर कीर्तीपण होती. त्यामुळे खुप समाधान वाटलं . पण मुलं पहिल्यांदा शिकायला गेली तेव्हा जशी अवस्था झाली तशीच किंबहुना त्याहीपेक्षा काहीशी जास्तच आज झालीय असं वाटतय रितेपणा जाणवतोय ....


या झाल्या माझ्या भावना .


पण मागच्या आठवड्यातील माझं निरीक्षण मला सांगू लागल आहे की मला वाटलं त्याहीपेक्षा जास्त घालमेल आशिष-किर्तीची सुरु आहे छोटीशी तोंडं करुन बसतात . सकाळच्या वेळेत आशिषबरोबर गप्पा होतात तर संध्याकाळच्या वेळी कीर्ती गप्पा मारत असते एकूणच दोघांचाही नूर एकच असतो , काय करावं , आता तर जावं लागणार आहे पण जायची अजिबात इच्छा नाही . बार्शीत सगळ्याबरोबर रहायला मजा आली सगळ्यांशी कनेक्ट होता आलंय . कालपासून दोनतीनवेळा व्हीडीओ काॕल झाला अज्जिबात करमत नाही आसा त्यांचाही नूर येतोय पण खात्री आहे थोडंस रुळलं की नक्की रमणार . सध्या हे छान वाटत होतं सवय झाली होती भरपूर गप्पा व्हायच्या ते एकटं पडल्यासारखं वाटतंय . तसा माझा स्वभाव जरा जास्तच  बडबडा आहे पण यांचा तसा नाही . पण मी दिवसभर घरी नसायचे तर इतकं एकत्र रहाता आल्यामुळे त्यांना कीर्तीच्या व कीर्तीला त्यांच्या आवडीनिवडी , सवयी , स्वभाव चांगले माहित झालेत हाही महत्त्वाचा भाग आहे यांना चहा लागतो तो वेळेत द्यायचा हे काम कीर्ती चोख बजावायची तर कीर्तीला खायला जरा चाणाचूणा जास्त आवडतो तर लक्षात ठेवून आणायचं काम यांच असायचं  .

      असो पण त्यांचे पुढचे रुटीन सुरु होणे ही बाब पण तितकीच अत्यावश्यक आहे. अगदी सुरुवातीला मुलं तशी कंटाळली होती . घड्याळाच्या काट्यावर पळायची सवय ते बेहिशेबी वागणं फार काळ नकोस वाटायचं . तसं WFH खुप होतं त्यांना  , मनिष तर कामाला जाम त्रस्त झाला होता . आॕफिसला जाऊन आलेलं परवडलं पण हे नको असं त्याला वाटायचं . त्याचे क्लाएंट बाहेरचे असल्याने दुपारी चारच्यापुढे काम रंगात यायचं आणि घरुनच काम म्हणजे वेळेचं बंधनच नाही . मग तो पण आणि आम्ही पण वैतागायचो . घरात असून बोलणं होत नसे कीर्तीचं तर हे रुटीनच नव्हते सतत फील्डवर फिरायचं आणि बोलायचं एखादी चक्कर लॕपटाॕप समोर बसायचं . असे असल्यामुळे सतत लॕपटाॕपसमोरच्या कामात ती रमत नव्हती . आणि आकांक्षाला तर कधी एकदा मैत्रिणींना भेटू असं वाटायचं . तिच्या सहा महिन्याच्या कोर्सला एक वर्ष लागलं आता हत्ती गेलं आणि शेपूट राहिलंय .


 हे सगळं जरी खरं असलं तरी आत्ताच्या वातावरणात मुलांना  बार्शी एकदम निवांत वाटलं . नुकताच बांधलेला वरचा मजला त्याचा अगदी पुरेपूर वापर झाला . सार्थक झालं , पैसै फिटले असं वाटलं . आहे त्या वातावरणात प्रत्येकाने स्वतःला मोल्ड करुन आपापली जिवनशैली ठरवून घेतली होती त्यामुळे मी पहिल्या भागात म्हणलं तसं आर्धा ग्लास भरलेल्यावर लक्ष केंद्रीत केल्यामुळे कध्धीच मिळालं नसतं असं जिवन जगता आलं आणि मग आत्ता जसं चालू आहे ते छान वाटू लागलं . मुख्य म्हणजे आशिष-किर्तीनं नुकताच आयुष्यात टर्न घेतला होता . नविन जिवन सुरु झालं होतं . नव्या सुनेला घरात रुळायला वेळ द्यावा लागतो . तसंच संसारात रुळायलाही वेळ लागतोच की . तसं तिचं प्रत्येक सणाला बार्शीला येणं किंवा आम्ही पुण्यात चारआठ दिवस जाणं झालं असतं . पण यातून काही दिवसात नव्हे , महिन्यात नव्हे काही वर्षातसुद्धा आम्हांला इतके दिवस एकत्र रहाता आलं नसतं तेवढं या लॉकडाऊनमुळे शक्य झालं ! पाडव्यापासून सणांना सुरुवात झाली . मुख्य म्हणजे कुलदैवत असलेल्या नृसिंह जयंतीला हे आले असते ते आख्ख नवरात्र त्यांना अनुभवता आलं . आणि मग जेष्ठ पौर्णिमा , श्रावणात मंगळागौर , शुक्रवार , रक्षाबंधन , पोळा तर सगळ्यात मोठा सण म्हणजे गौरी-गणपती ! देवीचं नवरात्र , दसरा आणि सणांचा शेवट म्हणजे 


" दिवाळी आणि सण ओवाळी " 


त्यानंतरचं सटीचं नवरात्र इथपर्यंत सगळे सण अगदी व्यवस्थित थाटामाटात पार पडले , जवळून पहाता आले . तसं प्रत्येक सणाला ऐनवेळी येऊन सण साजरा करुन लगेच परताव लागलं असतं ते सलग दहा महिने राहून अगदी शिस्तीत सगळ्या रिती जवळून पहाता आल्या माणसांचा सहवास लाभला विशेष म्हणजे  काका-काकींना नातसुनेचा , स्वतःच्या नातवंडांचा सहवास कित्येक वर्षांनी मिळाला . हे क्षण मात्र कायम स्मरणात रहातील . विशेष दिवसांच्या स्मृती आशिषने जशा कॕमेरॕत टिपल्यात तशा मी पण या क्रमशःमध्ये नोंद केल्या आहेत भविष्यात केव्हाही वाचलं तर सुगंधी कुपी उघडल्यावर जसा सुवास दरवळावा तशा आठवणी मनात रुंजी घालतील हे नक्की ! आता फक्त संक्रांत सण व लग्नाचा वाढदिवस राहिलांय . तसं तर सुरुवातीला तरी लवकरच त्यांची चक्कर होईल मग एखाद्या रविवारी संक्रांत सण घालणार तिथिने लग्न रथसप्तमीला झालं होतं ! पाहूया कसं होतं ते .


       माझी शाखा सुरुवातीला कापड बाजारमध्ये होती तिथे शाखा इमारतीचे मालक असलेले रायचुरकर त्यांच्या कुटूंबाशी माझे जवळचे संबध होते . त्यांच व्यापारी घराणं होतं ! तर त्या काकू बोललेलं एक वाक्य मला खूप स्मरणात राहिलं होत व त्याची प्रचिती यादरम्यान आली त्या म्हणायच्या 


" आम्ही कापड दुकानदार ! आमचा मुलगा निलेश त्याला आम्ही पहिलं काय शिकवणार तर दुकान उघडून देवाला उदबत्ती , नमस्कार व मुख्य म्हणजे कपडा कापता आला पाहिजे , कात्री चालवता आली पाहिजे , कारण एखादं गिऱ्हाईक लवकर आलं तोपर्यंत जर नोकर आला नसेल तर भवानीच्या गिऱ्हाईकाला थांबावं लागू नये किंवा परतही जावं लागू  नये . ते संस्कार आम्हांला बालवयातच करावे लागतात . मोठं झालं की बोटं लवकर बसत नसतात आणि मनाची पण तयारी होत नसते . "


 किती अर्थ भरला आहे या वाक्यात ! म्हणजे काय तर थोडक्यात स्वावलंबीपणाचं थोडसं शिक्षणच की हे !  माझ्या मते सर्व ठिकाणी हा नियम लागू होतो. होय आपण सगळ्या कामासाठी नोकर ठेवलेत पण जर अडचण आलीच तर प्रत्येकाला पोटापुरतं करायला येणं ही महत्त्वाची गोष्ट आहे . आमची आई पण म्हणायची 


" जेवढं लवकर शिकाल तेवढं चुटूचुटू करता येतं . कणिक मळणे , भाजी चिरणे , आवराआवरी करणे ही कामे तुम्ही हाताखाली करायला पाहिजेत ."


आणि मग नकळतपणे स्वावलंबीपणा कधी आला कळलंच नाही . या कालावधीत कीर्तीला संसाराच , स्वयंपाकाच प्रॕक्टीकल ट्रेनिंग मिळालं एवढ खरं . देताना मी खूष घेताना ती खूष एकूणच आनंदीआनंद गडे !!  माझ्या परीने मी मनिषला पण यात सामावुन घेतलं आहे . धडे दिले आहेत . तसं लहानपणापासूनच आकांक्षा व आशीष मध्ये कधीही भेदभाव केला नाही . मुळात माझं बालपणच अशा संस्कारात गेलं आहे . त्यामुळे त्याचीपण मानसिकता तशीच आहे . समानता शिकवावी लागत नाही ती संस्कारातुन बिंबवावी लागते . मला नक्की खात्री आहे तेवढं काम मी केलंय !


        आमचं नविन नातं छान तर आहेच पण त्याची वीण घट्ट होण्याचं काम या दहा महिन्यात  झालं . न बोलता मनातलं ओळखणे म्हणतात नं तेवढे संबंध दृढ झालेत असं म्हणायला हरकत नाही . खुपवेळा डोळ्यांची भाषा समजते आम्हांला  . मग हसायला लागतो आम्ही . या कालावधीत आमच्या खूप साऱ्या गप्पा व्हायच्या . त्यामुळे अंतर्बाह्य ओळख म्हणतात तसं काहीसं झालयं एवढं खरं . अधिकार गाजवणं , गोड धाक या साऱ्याची अनुभूती आली . व्यायामाला दांडी झाली , माझ्या खाण्यात जास्तीचं गोड आलं , चहाचं प्रमाण वाढलं किंवा जास्त दगदग झाली की आकांक्षा-कीर्ती अगदी आळीपाळीने फैलावर घेतात . आकांक्षाला काय केल्यावर काय होतं हे जसं समजतं त्याच दर्जाचा कीर्तीच्या तब्ब्येतीचा व मनाचा दोन्हीचा माझा अभ्यास झाला आहे व अचूक अंदाज पण येतोय . तसंच  तीला पण एकूणच घराची , घरातल्या माणसांची ओळख अगदी छान झालीय . 


        बार्शीला इतका पाऊस होऊनही आमच्याकडे तीन दिवसाला पाणी येतं . कोणीही पाणी भरलं तरी काही न काही कारणांनी पाणी भरतांना फिसफीस असते . याची कीर्तीला मजा येते एखादेवेळी शांततेत पाणी झालं तर 


" आज जलयुद्ध झालं नाही त्यामुळे पाण्याची काहीच  मजा नाही आली "


असं ती म्हणते मग हशा पिकतो त्यानंतर एक फक्कड चहा होऊन जातो . असे हे पाणीपुराण !!


      चला मुलांना त्यांच्या आयुष्यात परमेश्वराने सुखी , निरोगी , मुख्य म्हणजे समाधानी असं माणूस म्हणून जगण्याची प्रेरणा द्यावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना  !!


या संपुर्ण प्रवासात सगळ्याच बाबतीत नव्याची नवलाई , कुतुहल , उत्सुकता , अधिरपणा अगदी जवळून न्याहाळता आला , अनुभवता आला . विवीध पाककृती करता आल्या ,  खाऊ घालता आल्या . सणवारांचा आनंद लुटता आला . अनेक बाबतीत कौतुक , माया तर अनेकवेळा बराच वेळ तसेच पडलेले चहाचे कप , सरबताचे ग्लास , खाण्याच्या डीश यासारख्या आळशीपणावर  घर डोक्यावर घेत केलेला ओरडा , खरडमपट्टी , कामाची झालेली दमछाक , कडक उन्हाळ्यामुळे झालेली उमघाम या सगळ्यावर शितल वाटणारे हास्याचे फवारे असे वातावरण होते त्यामुळे  बालपणीच्या सहवासानंतर तरुणाईची मौज पण जवळून न्याहाळता आली . असा जन्मभर आठवणीत राहिल असा आंबट-गोड झणझणीत तडका अशा अनेक आठवणींचा ठेवा आहे हा . स्मृतीगंध म्हणल्यास वावगे ठरणार नाही .




" Well beginning is half done "




   असं म्हणतात तर तसंच झालं आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही . 


त्याचबरोबर थोडीशी हुरहुर थोडीशी चूटपूटपण आहे .........






समाप्त




ता. क.


क्रमशःच्या निमित्ताने मी लिहीत गेले व तुम्ही माझे नातेवाईक , स्नेही माझा उत्साह वाढवत गेलात . लिखाणाची सवय लागली . छान वाटतं लिहिती रहा असा आग्रह सुरु झाला मग मी पण ठरवलंय काहीतरी नविन घेऊन तुमच्या भेटीला यायचं .


🙏🙏🙏🙏🙏