Tuesday, January 19, 2021

कोरोना आणि ती ( खाजगी क्षेत्रात काम करणारी )

 कोरोना आणि ती 


3) खाजगी क्षेत्रात काम करणारी



 संसाराला हातभार लावायचा म्हणून , काळाची गरज म्हणून , जाणीवपूर्वक शिक्षण घेऊन ,  केल्याशिवाय पर्यायच नाही म्हणत आणि आपल्याकडे ही कला आहे तर का नाही करायचं असं म्हणत प्रत्येक स्त्रीचा काहीना काहीना उद्योग असतोच . त्याच स्वरुप घारगुती , फावल्या वेळातलं , व्यावसायीक आणि ठरलेल्या वेळेप्रमाणे काहीही असू शकतं . मग यामध्ये घरगुती पापड , लोणची , चटण्या , मसाले पुरविण्यापासून , शिवण शिवणे , ज्वेलरी शाॕप , घरगुती साडी व्यवसाय ते मोठ्या शाॕपपर्यंत काहीही असू शकते . कोरोनाचा परिणाम तर प्रत्येकावर झालाय पण त्याच्या झळा कमीजास्त प्रमाणात सर्वांनाच बसल्या . काहीजण होरपळून निघाले तर काहीजण पाॕज घेऊन रिफ्रेश झाले . याचा थेट संबध हा प्रत्येकाच्या आर्थिक  कुवतीशी होता .

     सुजाताची मुलं मोठी व्हायला लागली मग घरखर्च , सासुसासऱ्यांच औषधपाणी आणि मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागवतांना नाकी नऊ आले . संसाराला हातभार लागावा यादृष्टीने तिने घरगुती शिवण करायला सुरुवात केली . त्यात तिचा बऱ्यापैकी जम बसला होता . कोरोनाच्या कालावधीत सुरुवातीचे चार महिने गिऱ्हाईक फिरकलेच नाही . काम नाही पैसा नाही ! पदरमोड करत दिनक्रम सुरु होता . पण सुरळीत चालू असलेल्या गाडीला खड्डा पडला . पुर्वाची परिस्थिती अजूनच केविलवाणी होती नवरा फिटींगची काम करत होता .दोन हुशार मुली मग त्यांनी शिक्षिणात मागे पडू नये म्हणून तिने सुजातासारखेच शिवणाकाम सुरु केलं होतं स्वतःच्या कौशल्याने तिने चांगला जम बसवला होता . मग जास्तच शिवण येत होतं म्हणून तिने मोक्याच्या ठिकाणी भाड्याने गाळा घेऊन व्यवसाय वाढवला . थोड्याच कालावधीत कोरोनाच संकट आलं या परिस्थितीत मात्र एकीकडे उत्पन्न बंद तर दुसरीकडे घर भागवणं अधिक गाळ्याचं भाडं फुकट भरावं लागलं असे दुहेरी नुकसान झाले . गाळा सोडायचा तर पुन्हा तीच जागा मिळणे कठिण त्यामुळे आता सुरु होईलच या आशेवर अनेक महिन्याचे भाडे ती भरतच राहिली शेवटी शेवटी भाडं थकल्यामुळे बचत गटाकडून कर्ज काढून ते देणं भागवलंय . आता काम सुरु झालंय पण तितकासा जोर नाही मग चालू खर्च भागवणे व गटाचे हप्ते भरणे यातच कमाई संपते म्हणजे कामसुरळीत सुरु झालं तरी परिस्थिती आजून

" ना नफा ना तोटा "

अशीच आहे . पण भविष्यात जम बसवू या विश्वासावार पुन्हा तिने कंबर कसली आहे .





Sunday, January 17, 2021

कोरोना आणि ती ( 2 भाजीवाली )


कोरोना आणि ती


2) भाजीवाली


ली

" अन्न वस्त्र निवारा " 

या माणसाच्या मुलभूत गरजा आहेत त्यामुळे भाजी हा अन्नामाधील अपरिहार्य घटक आहे . मग भाजी विकणारावर कधी टाळेबंदीची वेळ येईल असे स्वप्नातही वाटले नव्हते . आमचा आठवडा बाजार शनिवारी असतो . मार्केटमध्ये शिरलं की बरोबर मध्यावर मोठी लाईन मोठ्या मोठ्या भाजीवाल्यांची असते मार्केटींगसाठी त्यांची चढाओढ लागलेली असते . धारदार आवाजात मोठमोठ्यांन मुख्य म्हणजे हसतहसत विशिष्ट पद्धतीने त्यांची शेरेबाजी ऐकत भाजी खरेदी केली की भाज्यासारखं मन पण प्रसन्न व्हायचं . ज्या भाज्या या भागात पिकत नाहीत त्या मिळण्याचं हमखास ठिकाण म्हणजे या मोठ्या भाजीवाल्यांची लाईन असते मग बहुतेक ठिकाणी मुख्य खुर्चीवर त्यांच्या कुटुंबातील पोक्ती बाई बसलेली असते . लिलावाच्या ठिकाणी नवरा आणि हाताशी आलेला मुलगा पण बरोबर गेलेला असतो . मग यार्डातून मंडईत भाजीच्या गोण्या आणून टाकायची हाॕटेलसारखी मोठी गिऱ्हाईकं करायची व लागेल ती मदत करायची ही कामे नवरा किंवा मुलगा करतो . मुलाचं लग्न झालं की या व्यवसायाची सवय नव्या सुनेला पण व्हावी म्हणून घरातलं सगळं आवरुन सगळ्याचे डबे घेऊन सून पण आकरानंतर मदतीला येऊन बसते . असं एकएक करत घरातले सगळेजण त्या धंद्याभोवती असतात . 

" उद्या रईवार हाय , तुमाला सुट्टी हाय पोटाला सुट्टी न्हाय कायबी घ्या धा ला पाव " .

असं म्हणत आत्मविश्वासाने चाललेला हा धंदा काही काळाकरता बंद होऊ शकतो ही गोष्टच न पटण्यासारखी होती . चापूनचोपून नेसलेल्या साडीचा पदर खोचून प्रसन्न चेहऱ्याने माधोमध खुर्ची टाकून ती रणरागिणी बसलेली असते . दोन्ही बाजूला चारचार फूटापर्यंत अँगलवर फळ्या टाकून पलंग तयार करुन त्यावर वीसपंचवीस प्रकारच्या वेगवेगळ्या भाज्यांच्या टोपल्या त्याच्यावर एकाला एक चिकटून ठेवायच्या एकीकडे फळभाज्या , एकीकडे पालेभाज्या , शेंगांचे प्रकार वेगळेच तर बाहेरून मागवलेल्या भाज्या वेगळ्याच , थोड्या लांब आंतरावर कांदे , बटाटे , टोमॅटो , काकडी , मिरच्या अशा तत्सम भाज्या ! आतिशय कल्पकतेने गिऱ्हाईक येण्यापुर्वीच भाज्यांची मांडामांड करुन एका बाजूला अनेक कप्पे असलेली पैशाची पेटी तर दुसऱ्या बाजूला गिऱ्हाईकाला द्यायच्या टोपल्या , पाण्याची बाटली तर अजून एक छोटीशी लाकडी पेटी त्यात पिग्मीची पुस्तकं , मोठ्या नोटांची पॕकेट , नगरपालीकेची पावती , किल्ल्या असं महत्त्वाचे साहित्य ठेवाण्यासाठी सोय असते . पाठीमागच्या बाजूला भाजी भरलेल्या गोण्या आणि समोर वजनकाटा ! हा सगळा जामानिमा करुन जय्यत तयारीनीशी गिऱ्हाईक सुरु व्हायच्या आधी सकाळी आठ वाजता बसलेल्या भाजीवाल्या , गर्दी सुरु झाली की अष्टभुजेप्रमाणे त्यांच काम सुरु होतं . एकाच वेळी पाचसात गिऱ्हाईकं लिलया सांभाळायची कला फक्त त्यांच्याकडेच असू शकते  . शिक्षण कमी पण हिशोब मात्र एकदम पक्का ! आपला हिशोब होईपर्यंत पाचसहा भाज्यांचे वेगवेगळ्या भावाने हिशेब करुन त्यात्या गिऱ्हाईकाकडे बोट करत

" ताई तुमचं एवडं झालं बगा न भाऊ तुमचं एवडं  "

असं सांगून पुढच्या गिऱ्हाईकाकडे वळायच्या सुद्धा !  एकावेळी इतकी वेगवेगळी कामं तीही बीनचूक! त्यातच थोडी गर्दी ओसरली की कमी झालेल्या टोपल्या पुन्हा भाजीने भरायच्या , मधूनच भाज्यावर पाणी शिंपडायचं , चहाची किटली घेऊन फिरणाऱ्या चहावाल्याला हात करुन बोलवायचं आणि दोन घोट चहा घेऊन तरतरीत होऊन पुढच्या कामाला भिडायचं . गिऱ्हाईकांनी आकर्षित व्हाव म्हणून समोरुन जाणाराला हटकत आपुलकीने

 हाक मारायची आणि  आपल्या भाजीला

" कवळीलूस हाय , बगा कशी हिरवीगार हाय  , कडक माल हाय एकदम बरका "

अशी विशेषणं लावत वळून पहायला लावायचं पाव किलोऐवजी आर्धा किलो तर आर्धा किलोऐवजी एक किलो भाजी विकण्याचं त्यांच कसब निराळच !

       तर दुसरीकडे स्वतःच्या शेतात पिकणारा मोजकाच शेलका माल घेऊन खेड्याच्या बायका मंडईच्या एका बाजूला नगरपालिकेची पावती फाडून छोट्या भाजीवाल्या होऊन ओळीनं बसायच्या . कोणाकडे हदग्याची फूलं , स्पेशल आमटीसाठी देशी पांढऱ्या भेंडीच्या बीया , ओल्या चवळीच्या शेंगा , तव्यावर मिरची भाजून तांब्यांन रगडून करायच्या ठेच्यात घालायला चटकदार लागणारी बोराएवढी लाललाल टमाटी , देशी कोथिंबीर , देशी लसूण असा वेचक माल खात्रीने फक्त त्यांच्याकडेच मिळणार त्यामुळे त्यांचा रुबाब काही औरच !  सरळसरळ जमिनीवर समोर तोंड करुन दुहेरी पोतं अंथरुन बसायचं , दुपारच्यावेळी स्वतःपेक्षा भाजीला उन्हाचा चटका लागू नये अशा पद्धतीने छत्री लाऊन ठेवायची . माल विकला की  येणारे पैसे पोत्याचा एक पदर वर उचलून नोटा एकीकडे तर नाणी एका बाजूला आत सरकवायची त्यांची खास पद्धत क्षणभर त्या कॕशियरच भासायच्या मला ! 

" थोडंच ऱ्हायलंय फिरुन याल तर मिळायचं न्हाय "

अशी थोडीशी धमकीच असायची त्यांची .

         इकडे मंडईच्या तोंडालाच सिझनप्रमाणे केळी , आंबे , डाळींबं , सिताफळं अशा विविध प्रकारच्या फळांनी भरलेला गाड्यावर वयस्कर भाभी बसलेल्या असायच्या . त्यांच ठरलेलं गिऱ्हाईक मात्र डोळे झाकून त्यांच्याकडेच खरेदी करायचं .

    काहीजणी मात्र मंडईत बसून भाजी विकू शकत नाही म्हणून डोक्यावर टाॕवेलची चुंबळ करुन त्याच्यावर भाजीचं टोपलं घेऊन मधूनच दोन्ही हात खाली सोडून सकाळच्या वेळी चालत

" भाजीsssss " 

अशी दणदणीत आरोळी ठोकतच गल्ली , सोसायटी , काॕलनीत प्रवेश करायच्या . मग तिच्याकडे कायकाय आहे हे अगदी विशेषणासह लयबद्ध पद्धतीने समजायचं .

" कवळी मेती , पालक , शेपू , देशी गवार , दोडका " तोवर चालत चालत घरासमोर आली की थोडासा स्वर बदलत 

" काटाळ वांगी हाईत , भरल्या वांग्याला घ्या वैनी "

असं म्हणत बाहेर यायला भाग पाडायच्या . ओरडत घरोघरी फिरून भाजी विकून आपला उदरनिर्वाह करायच्या . त्यांच्या दणदणीत आवाजाने ज्याला भाजी घ्यायची ते बाहेर येऊन त्यांची वाट बघत थांबायचे . हसत हसतच 

" आले आले थांबा वाईस " 

असं पुढ्यातलं गिऱ्हाईक करत समोरच्या घराकडे लक्ष !

         गल्लीपासून दिल्लीपर्यंत ज्या व्यवसायाला मरणच नाही अशी कल्पना असलेला भाजीवीक्री हा खात्रीचा  व्यवसाय आणि भाजीवाली हे व्यक्तिमत्त्व ! आठ तासापेक्षा जास्तवेळ ड्युटी करुनसुद्धा कोणत्याही खात्यांतर्गत न येणारा , कशाचीच हमी , सुरक्षा , भविष्य नसलेला हा व्यवासाय . अगदी पोटापूरतं मिळालं तरी बास म्हणत डोक्यावर टोपली घेऊन हिंडणारापासून भाजीचा मोठा स्टाॕल लावलेल्या आख्खा संसार या धंद्यावरच असलेल्या मोठ्या भाजीवालीपर्यंत प्रत्येकाला या कालावधीत वेगवेगळ्या समस्यानां तोंड द्याव लागलं .

     मार्चमध्ये लाॕकडाऊन सुरु झालं आणि उमज न पडणारी परिस्थिती निर्माण झाली . घराच्या आसपास जी भाजी मिळेल ती आणायची आणि भागवायचं हेच चित्र सर्वत्र होतं . आंतराअंतरावर , रस्त्यावर , गाड्यावर विवीध ठिकाणी पोलीसांचा दंडूका चुकवत भाजीवाले लोक भाजी विकताना दिसू लागले . तरतरीत दिसणाऱ्या भाजीवाल्या सुकलेल्या शेपूच्या पेंडीसारख्या भासू लागल्या त्यांच्या नजरेत भेदरलेपणा होता . एप्रिल-मे सारख्या कडक उन्हाळ्यात त्यांची अवस्था गारठल्यासारखी झाली होती . प्रत्येक आठवड्यात बदललेल्या आदेशाप्रमाणे नियोजन करावे लागायचं . सुरवातीच्या काळात अत्यंत गोंधळाची परिस्थिती होती . नेहमीकरता सगळं आवरुन सकाळी आठनऊ वाजता मंडई सुरु करायची ते  सगळा माल संपवूनच घरी परतायचं ही सवय आणि कोरोनामुळे सकाळी सात ते नऊ या वेळातच भाजी विकायला परवानगी मिळू लागली . सातला भाजी विकायला जागेवर बसायचं म्हणजे पहाटे चारपासूनच कामाला लागावं लागायचं . भाज्यांच्या लिलावात पण अनिश्चीतता असायची माल कुठून घ्यायचा तो कुठे ठेवायचा आणि कुठे विकायचा यामध्ये गोंधळ निर्माण व्हायचा . समजा हातगाड्यावर भाज्या घेऊन विकायचं ठरवलं तर काहीवेळा गिऱ्हाईक चोहोबाजूंनी गर्दी करायचे तशातच जर पोलीसांची गाडी आली तर जीव मुठीत घेऊन काठ्या लाठ्या चुकवण्यासाठी पळता भुई थोडी व्हायची . आधी अनियमीत दराने पैसे देऊन भाजी मिळवायची मग रिक्षा किंवा वहान मिळायचं नाही म्हणून मुलाच्या , नवऱ्याच्या गाडीवर पाठीमागे जास्तीतजास्त भाजीच्या गोण्या बसवायच्या यादृष्टीने साडीचा काष्टा घालून कमीतकमी जागेत गाडीवर दोन्हीकडे पाय टाकून गोण्या धरुन बसायचे . आणलेला माल हातगाडीवर कसाबसा माल लावायचा मग गिऱ्हाईक जास्त आलं , गर्दी झाली तर एकीकडे या गर्दीत  कोणी करोनाचं पेशंट असेल का ही धास्ती आणि पोलिसांची गाडी येते का ही दुसरी धास्ती समजा पोलीस आलेच तर गर्दी केली म्हणून आरडाओरडा , फटके कधीकधी माल उचलून नेणे , उधळून लावणे असेही प्रकार व्हायचे . जास्त गिऱ्हाईक आल नाही तर भाजी न संपण्याची भिती आणि नऊदहापर्यंत जर भाजी संपली नाही तर उरलेल्या भाजीचं करायचं काय दुसरे दिवशीपर्यंर सुकून जाणार म्हणजे नुकसानच ! मग पहाटेपासून एवढी ओढाताण करुन पदरात काय पडलं हा तर वेगळाच मुद्दा . 

        यातही सगळ्याच जागा बदललेल्या . नेहमीच्या ठिकाणी किंवा मंडईत शौचालयाची सोय असायची मग रोडवर किंवा गाडा घेऊन जायचं म्हणलं तर ही मोठी अडचण होऊन बसायची . त्यातही कोणी महिला गरोदर किंवा लहान बाळ असलेली असेल तर तिच्या वेगळ्याच समस्या असायच्या . मग या सगळ्यापेक्षा कामच न करण्याचा निर्णय घेतला तर काम नाही तर पैसा नाही अशी परिस्थिती निर्माण झाली . अनेकजणींनी थोडीफार धडपड केली पण त्रास अधिक नुकसान होतंय हे लक्षात आल्यावर घरीच थांबणे पसंत केले .

      डिसेंबरमध्ये मार्केट सुरु झालं . सुरु झाल्यावर पहिल्याच शनिवारी मी काळजी घेत बाजारात गेले . संपुर्ण मंडईत चक्कर मारली आपापल्या ठिकाणी भाजीवाल्यांना पाहिल्यावर मनाला समाधान वाटलं . या कोरोनाच्या कालावधीत भाजी घेताना जाणीवपुर्वक भाजीवाल्यांशी संवाद साधत होते . तर नव्याने बळ बांधत प्रत्येकजण उभं रहाण्याचा प्रयत्न करतोय पण प्रत्येकाच्या जिवनात कमीजास्त प्रमाणात खड्डे पडलेले आहेतच .

     बऱ्याचशा मोठ्या भाजीवाल्यांनी मुलांसाठी रिक्षा , गाडी , टीव्ही किंवा इतर कारणांसाठी फायनान्सचं कर्ज घेतलं होतं . धंदा बंद , गोंधळ निर्माण करणाऱ्या आफवा मग बँकेत पैसे भरले नाहीत परिणामी हप्त्याचे चेक परत गेल्यामुळे सहा सहा महिने दंडाची रक्कम बँकेत आणि फायनान्सवाल्यांकडे असे डबल डबल चार्जेस लागले . त्याविषयी व्यवस्थित माहिती मिळत नव्हती . आणि आता एकदमच हप्त्याचे व दंडाचे पैसे भरायचे शिवाय धंद्याचा तितकासा जम अजून बसलाच नाही , गोंधळ निर्माण करणाऱ्या परिस्थितीला तोंड द्यायची वेळ आली . मग सगळा मेळ घालणं कठीण होऊन बसलं . यासाठी पहिला मार्ग म्हणजे छोटेमोठे दागीने गहाण ठेऊन कर्ज काढणे .

     छोट्या भाजीवाल्यांना मात्र शेतात माल पिकूनसुद्धा आधी वाहतूकीची अडचण मग कसबसं शहर गाठलं तरी माल विकायचा कुठे आणि कसा आणि विकला तरी काहीवेळेस बरा भाव मिळाला तर काहीवेळेस कवडीमोल भावात विक्री करावी लागली . मग या गोंधळात मालाचं शेतातच नासून जाणं डोळ्यांनी पहावं लागलं फायदा तर नाहीच पण केलेला खर्चही गेला . नाशवंत मालाचं खूपच नूकसान झालं . योग्य वेळेत मार्केटींग जर झालं नाही तर मालाचा कचराच व्हायचा .

" तेल गेलं तूप गेलं हाती धुपाटणं आलं "

असं काहीसं बऱ्याजणाचं झालं .

    फळवाल्या बागवानांची काही वेगळी परिस्थिती नव्हती माल खरेदी केला आणि विकला गेला नाही तर डबल नुकसान व्हायचं मग निवांत बसलेलं बरं असं म्हणत गुपचूप बसायचे . मग जेवढा मोठा धंदा तेवढी बुडणूक जास्त व्हायची . आम जनतेने भाज्यांना पर्याय म्हणून डाळी कडधान्याची निवड केली पण त्यामुळे त्यावेळचा भाजीवाल्यांचा धंदा बुडलाच !


      या धंद्यासाठी ज्यांनी पुणे मुंबई सारखी शहरं जवळ केली त्यांना एकतर शिल्लक असेल तर असलेल्या शीलकेतून घर भागवणे किंवा परत गाव गाठणे हे दोनच पर्याय होते . पण दिवस गेला की त्यादिवसाची कमाई बुडायची असं मात्र खुपजणींच झालं .


डोक्यावर टोपलं घेऊन भाजी विकणारांना फारसा फरक पडला नाही त्यांच्या ठरलेल्या घरी त्यांची भाजी विकली जायची , भाजीला गिऱ्हाईक पण तितकच होतं पण सुसुत्रता नसल्यामुळे शेतकरी , व्यापारी आणि गिऱ्हाईक  या सगळ्यांना आडाचणीचा सामना करावा लागला हे मात्र कटू सत्य आहे ! खाणारांना पर्याय होता पण विकणारांनी काय करायचं हा मोठा प्रश्न होता .


 

काॕम्रेड सरिता कुलकर्णी 

sariakulkarni67@gmail.com

वूमन कौन्सिल कन्व्हेनर

बँक आॕफ महाराष्ट्र एम्प्लाॕईज युनियन औरंगाबाद




Friday, January 15, 2021

कोरोना आणि ती ( 1 घरकामवाली )


कोरोना आणि ती

माझं मनोगत




2021 साल उजाडलं आणि जनजिवन बऱ्यापैकी सुरळीत सुरु झालं म्हणायला हरकत नाही . 2020 सालासारखा अनुभव यापुर्वी येणं तर लांबच पण ऐकिवात सुद्धा नसलेली परिस्थिती मीच नाही तर संपुर्ण जगाने अनुभवली . आपल्या आजुबाजूला असणारी , नेहमीच संपर्कात असणारी इतकी माणसं यादरम्यान बऱ्याच दिवसांनी तर  काहीजण बऱ्याच महिन्यांनी भेटली . कहीजण अजून भेटायचे आहेत कदाचित ती भेट होईपर्यंत एक वर्षसुद्धा झालेलं असू शकेल . 
 या कालावधीत 
" बरंच पाणी पुलाखालून गेलं "
हा परवलीतला शब्दप्रयोग पण त्याचा खोलवर अर्थ लावायचा प्रयत्न केला तर खऱ्या अर्थाने कोरोनाकाळातच लागला . पाणी वहाण्याचा जो वेग असतो त्या वेगाने किंवा वाऱ्याच्या वेगाने लोकांना अनुभव येत गेले म्हटलं तर आतिशयोक्ती होणार नाही . मग काहींच्या जिवनात संथ वहाणाऱ्या कृष्णामाईप्रमाणे संथ अनुभव आले तर काहींना उंचावरुन कोसळणाऱ्या धबधब्याप्रमाणे अंगावर येणारे अनुभव आले तर काहीजणांच्या आयुष्यात वावटळ आलं . अनिश्चित आणि अकल्पीत असं काहीसं त्याचं स्वरुप आहे त्यामुळे संमीश्र आणि विचलीत भावना आहेत . बँकेत आणि संघटनेत काम करत असल्यामुळे संपुर्ण महाराष्ट्रात मैत्रिणी आहेत त्या फक्त मैत्रिणी नसून कार्यकर्त्या आहेत . आमचा फोनवर संपर्क व्हायचा तेव्हा चर्चेआंती हेही जाणवलं की भौगोलिक परिस्थितीनुसार सुद्धा अनुभवात वैविध्य आहे . बँकेत काम करत असतांना काऊंटरवर आलेल्या महिला किंवा रोजच्या व्यवहारात संपर्कात आलेल्या अनेकजणी आहेत जसं की  घरकामवाली , भाजीवाली , मजुरी करणारी , दुकानात काम करणारी , कोणत्याही खाजगी क्षेत्रात काम करणारी महिला . आरोग्य खाते , पोलीस खाते , बँका , शाळा , अंगणवाडी सेविका , आशा कर्मचारी आणि कोणत्याही सरकारी खात्यात काम करणारी महिला . कोणताही स्वतःचा छोटासा किंवा मोठा व्यवसाय करणारी महिला विशेष करुन बचत गटातील महिला ! यांचे चांगले , वाईट , भयावह , दारुण , हिंसक , व्यसनीधीनता असे अनेक अनुभव अनेकींच्या वाट्याला आलेले ऐकायला मिळालं . यातील प्रत्येक व्यक्तिमत्त्वाचे  वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे अनुभव आहेत त्यांच्याशी संवाद साधून भावना जाणून घेण्याचा प्रयत्न केला . आणि मैत्रीण असलेल्या प्रा. डाॕ. भारती रेवडकर यांच्याकडून मिळालेल्या प्रेरणेमुळे त्याच संकलन करत आहे . मग माझ्या काॕम्रेड मैत्रीणी आणि बहिणी यांच्याकडून नांदेड , औरंगाबाद , लातूर , सोलापूर ,अमरावती , नाशिक , पुणे , मुंबई इत्यादी ठिकाणाहून अनेक अनुभव ऐकायला मिळाले . त्याला अनेक कंगोरे होते . काही मन हळवे करणारे तर काही अंतःकरण पिळवटून टाकणारे तसेच काहींनी त्याचा आनंदही लुटला तर काहींना फारसा फरक पडला नाही . एकच परिस्थिती पण प्रत्येकाच्या नजरेतून वेगळी भासली . अशा विविध व्यक्तीमत्वांच आवलोकन करण्याचा  , शब्दबद्ध करण्याचा हा प्रयत्न .



1) घरकामवाली 


मंगल जवळजवळ पंचवीस वर्षापासून धुणं-भांड्याची कामं करते . सततच्या कष्टाने आणि पिणाऱ्या नवऱ्याचे तरुणपणीच निधन झाल्यामुळे तिला अकाली प्रौढत्व आलेलं . कसंबसं उसनवारी करत मुलीचं लग्न केलं तोवर मुलगा पण हाताशी आला चार पैसे कमवू लागला मग त्याचही लग्न तिने लवकरच केलं . केशकर्तन हा त्यांचा  पिढीजात धंदा पण भांडवलाअभावी मुलाला दुकान टाकणे शक्य झालं नाही म्हणून मग तो दुसऱ्याच्या दुकानात पगारावर काम करतो . मुलाचं मुलीचं थोडंस रांकेला लागलं असं वाटत होतं थोडीशी मोकळीक मिळाली असं मंगलला भासू लागलं तोवर जावई पण व्यसनी असल्याचं लक्षात आलं . तिच्या मनानं ते मान्य करेपर्यंत तर जावयाचं पीणं हाताबाहेर गेलं . संपर्कात आल्यामुळे मुलगा पण हळूहळू पिऊ लागला आणि त्याच वाटेवर चालू लागला त्यामुळे घर चालवण्याची हिची जबाबदारी काही संपली नाही उलट दोन नातवंडांची त्यात भरच पडाली  ! जावयाचं पीणं इतकं बेताल झालं की त्याचा शेवट वाईट झाला . दोन वर्षांपुर्वी तिचं स्वतःचं जे झालं तेच तिच्या मुलीच्या पदरी आलं जावई अकाली गेला आणि तरुण मुलगी व छोटीशी नात पुन्हा अनाथ झाल्या . या पंधरा वीस वर्षात या साऱ्या घटना मंगलच्या आयुष्यात उमज पडू न देता अतिशय वेगाने घडल्या ! मग नुकतीच  पन्नाशी ओलांडली असली तरी मंगल मानसिक व आर्थिक जबाबदाऱ्यांनी आहे त्यापेक्षा वयस्कर वाटू लागली  आताशा थकल्यासारखी भासू लागलीय .

      " आता मला लै कामं व्हुईना झालेती वैनी , बाकीची कामं सोडनार हाय मी . तुमचं आन , डाक्टरचं आशी दोनतीनच कामं करनार हाय बगा ".
 अधूनमधून असं सारखं तिचं चालू असतं पण घरच्या जबाबदाऱ्या पहाता तिला तसं करणं शक्य होत नव्हतं . त्यात कोरोनाचं वादळ आलं आणि एक दिवसाची संचारबंदी लागू झालेली तिने ऐकलं आणि कामाला घरी आल्यावर परत जातांना सांगू लागली , 
" वैनी , उद्या समदच बंद हाय जनू , मग न्हाय येनार लई कटाळा आलाय कामाचा बी ऱ्हाते बया घरी ".
आता काही ईलाजच नाही म्हटल्यावर मी गप्पच बसले पण संचारबंदीला जोडूनच लाॕकडाऊन झालं आणि लोकांचे फिरणं बंद झालं . कामाला कोणीच येत नव्हतं पण मनात फार धास्ती वाटत होती . कारण कपडे धूणं , केर फरशी कसही करता येईल पण आता मुलं घरी आली होती मग भांडी पण घासावी लागणार आणि ते काम माझ्यासाठी फार अवघड होतं आणि कामाला ये म्हणावं तर कोरोनाची धास्ती ! पाहू कसं होतं ते असं म्हणत मी वेळ नेली मारुन पण मालकीण म्हणून मी पुरती कोलमडून गेले होते . मग घरात सगळेजण वाटून कामं करु लागलो . आठ दहा दिवसात आमची हालत बेकार झाली होती कारण कामवालीची एखादी दांडी सुद्धा सहसा सहन होत नाही तिथं सलग काम करणं म्हणजे महाकठिणच . पंधरा दिवसांनी एप्रीलच्या दुसऱ्या आठवड्यात संध्याकाळी मंगल पैसे हवे म्हणून दारात हजर झाली आणि ती मला देवाप्रमाणे भासली मधूनच कोणी एप्रील फूल तर नाही करत ना असे मला वाटले . मी भानावर येत अंगणात गेले तर ती मला पाहून म्हणाली 
" वैनी उद्यापास्न मी मास्क बांधून येते , साबणानं हात धुते भांडी भाईरच घासून उनात वाळाय घालते चांगली तापल्यावर न्ह्या आत पण आता मी कामाला येते , कोणी आडवलं तर दावाया डाक्टरंनी मला पास दिलाय मग चालल ना तुमास्नी ".
मी आनंदाने तिला परवानगी दिली मला एकदम हायसं वाटलं होतं . कारण केर फरशीची कमल पण येत नव्हती घरात राहूदे पण बाहेरच्या बाहेर जेवढं होतं ते तरी करुदे मला तिची खूपच गरज होती . काळजी घेऊन करु , काय हरकत आहे नाहीतरी घरात सगळे बीझी आहेत हे काम अवघडच की ! मी लगेच परवानगी दिली व पडलेली भांडी घासायला देऊन थोडंस लांब कट्ट्यावर बसून तिच्याशी गप्पा मारु लागले . तर भांडी घासतच ती सांगू लागली 
" वैनी , तुमची दोनतीन घरं सोडली तर समद्या बायांनी मार्च महिन्याचं खाडा कापून तीन आठवड्याचंच पैसं दिलंत बगा . तेबी आता कामाला येऊ नगस आमी जवा सांगू तवाच ये म्हनून सांगितलय बगा  , आता मला कामंच न्हाईत काय करावं रेशन मिळतंय पर भागत न्हाई वर पैसा लागतोय बगा  ".
मग बराच वेळ तिच्याशी बोलत बसले आणि या गप्पा परवापर्यंत आमची भेट होईल तेव्हा सुरुच होत्या . तिचा या आठदहा महिन्यात झालेला प्रवास मात्र आंतर्मुख करायला लावणारा होता .
कामाचा कंटाळा आलेली मंगल आता काम कुठे मिळंल का ? या शोधात होती . ज्यांची कुवत आहे त्यांनीसुद्धा तीला खाड्याचे पैसे दिले नव्हते तर कोणी सढळ हाताने मदत केली होती . रेशनला तांदूळ जास्त मिळत होता तर ज्वारी महाग वाटत होती म्हणून ज्वारी-तांदूळ दोन्ही निम्मनिम्म करुन भाकरीसाठी दळून आणत होती . कित्येक दिवस डाळ-भात-भाकरी हेच त्यांच जेवण होतं .
सलून बंद असल्यामुळे मुलगा घरीच बसून होता . पैसा कमावणं लांबच पण वाडीवस्तीवर कुठं प्यायला मीळेल का यासाठी वणवण भटकायचा , पैशासाठी आईला , बायकोला भांडायचा . प्यायला मिळालं नाही की त्याला थरथर सुटायची मग घरात रोजंच भांडणं , हाणामारी , रडारडी व्हायची , लहानलहान पोरं पण रडायची . तिची सुन थोडफार हिच्याबरोबरच कामाला जात होती हिचीच कामं बंद झाली तर तिला कुठून काम मिळणार . दोनचार घरातून उसने पैसे नेऊन संपून गेले आता काय करायचं .बऱ्याचवेळा  टक्केवारीनं पण पैसे काढायची . तसं तिला हातातोंडाचा मेळ घालणं पण नेहमीच कठीण होत होतं मग व्याज भरुनभरुन ती बेजार व्हायची . मुलगा जरी नशेत धुंद असला तरी लहानलहान नातवंडांसाठी मंगलचं काळीज रक्तबंबाळ होत असायचं मग फिरुन बळ आणून ती कामाला जायची .....


याउलट कमलचं होतं . दोन मुलं आणि नवराबायको असं तिचं चौकोनी कुटूंब . नवरा एका खाजगी बँकेत सिक्युरीटीचं काम करतो , त्याला पगार कमी आहे मग मुलं शिक्षणात बरी आहेत पैसा पुरत नाही म्हणून थोडासा खर्चाला हातभार लागावा म्हणून कमल घराबाहेर पडली सुरुवातीला दोन वर्षे तिने दुकानात काम केलं . पण दुकानात दहा ते आठ असं दहा तास म्हणजे जरा जास्तवेळ बांधील रहावं लागतं म्हणून मग ते काम सोडलं आणि चार घरी स्वैयंपाकाचं आणि फरशीचं काम करायला सुरुवात केली . तिच्याकडे बांगड्या भरण्याची कला होती   म्हणून मग ती जोडधंदा म्हणून बांगड्याचा व्यवसाय  करायची त्यामुळे संसाराला थोडासा हातभार लागायचा  परिस्थिती जरा बरी झाली . त्यामानाने कमलचं वय लहान होतं चुणचुणीतपणा आणि काहीतरी करण्याची आस ,  ध्येय आणि धडपडी वृत्ती असल्यामुळे तिच्या डोळ्यांत नेहमी वेगळीच चमक दिसायची . लाॕकडाऊन झालं तसं तिचं कामाला येणं बंद झालं . मग मधूनमधून फोन करायची येऊ का विचारायची . कधीतरी उसने पैसे न्यायची . असंच जूनमध्ये एक दिवस घरी आली होती मग तिचं कसं चालू आहे हे जाणून घ्यायचा मी प्रयत्न केला .
तिने सांगितले काम नसल्यामुळे आधी महिनाभर जरा झोपच काढली मग आळशीपणा वाढू लागला सुस्ती आली म्हणून घराजवळ पोळीभाजी पुरवणारी एक संस्था होती तिथे पोळ्या करायला जात होती रोजगार मिळत होता . शिवाय मिळणारं रेशन , नवऱ्याचा पगार यात जेमतेम भागत होतं पण उदास वाटतं म्हणाली . कोरोनांमुळे लग्नंपण बंद होती आणि सणवार पण साजरे झाले नाहीत मग बांगड्याचा धंदा बंदच होता म्हणाली . मग हातात पैसा रहात नव्हता जेमतेम घर भागत होतं आणि आता घरीच बसून रहायचा पण कंटाळा आला म्हणून काम सुरु करावं असे तिला वाटू लागले . मंगल भांड्याला येते तर मी पण काळजी घेत माझ्या कामावर येते असा तिने तगादा लावला . पण हिला कामाला बोलावल तर हिचं काम घरात करावं लागणार होतं मग मी पण  थोडंस लांबवत लांबवत   सप्टेंबरपासून तिला बोलावलं तर त्याचाही तिला खूप आनंद झाला . एकूणच काय पैशासाठी म्हणा , गरज म्हणून म्हणा प्रत्येकजण आपल काम करायला मनापासून 
तयार होता हे खरं !!



 " पुणे तिथे काय उणे " म्हणत आलीकडे हाताला काम नसेल त्या बऱ्याचजणांनी पुणे गाठलंय , पूनम त्यातलीच एक ! तिचं मुळ गाव कोकणातलं पण भावाभावाच्या  वाटण्या झाल्यावर शेतीतील उत्पन्न त्यांना पुरेना त्यात दोन मुली एक मुलगा असं जरासं वाढलेलं कुटुंब आहे तर काहीतरी करुन खाऊ म्हणून दहा वर्षापासून पुण्यात रहातेय तसं बऱ्यापैकी बस्तान बसलं होतं . दोघं नवराबायको मिळून कमवत होती मुलांना शाळेत घातलं होतं पूनम फारशी शिकलेली नव्हती मग लोकांकडे   घरकाम करायला तिने सुरुवात केली . कोकणातल्या खेड्यातून आली पण पुण्यासारख्या शहरात एका वर्षातच तिने तिथल्या काम करण्याची पद्धत आणि गरज याचं निरिक्षण करत कामं मिळवत गेली मग दिवसभर पुरतील एवढ्या घरी कामं करायचा तिने सपाटा लावला . बऱ्यापैकी बस्तान बसलं घर व्यवस्थित चालू लागलं . आठनऊ वर्षे कशी गेली समजले नाही आणि लाॕकडाऊन झालं ! तरी सुरवातीचे दोनतीन महिने आहे ती पदरमोड करत असलेल्या शिलकेतून तिने घर भागवलं . काही घरी  पैसे दिले पण चारपाच महिन्यांनी घर चालवणं कठिण होऊ लागलं . घरभाडं थकू लागलं तसा तिने पुन्हा सगळं गबाळ गुंडाळून गावाकडे जाण्याचा निर्णय घेतला म्हणण्यापेक्षा तिला तो नाईलाजाने घ्यावा लागला......


नांदेडमध्ये काम करणाऱ्या रंजनाचा अनुभव काही वेगळंच शिकवून गेला . चांगल्या प्रतिष्ठित व्यक्तीचा घर आणि व्यवसायाचा मोठा व्याप होता . त्यामुळे त्यांनी आपल्याच कंपाऊंडमध्ये दहा वर्षापूर्वी रंजनाची कुटुंबासह  रहाण्याची सोय करुन दिली होती . रंजना व तिचा नवरा दोघेही त्यांच्याकडे राबत होतं . दुर्दैवाने मालकांचे वडील आजारी पडले एकदोन दिवसात ते कोरोना पाॕजिटीव्ह निघाले पर्यायाने त्यांच्या संपर्कात आलेल्यांना टेस्ट करण्यासाठी सांगण्यात आले . त्यात रंजनाला पण टेस्ट करण्यासाठी सांगण्यात आलं तर याठिकाणी रंजनाची व्यवस्था पहाण्यास मालकांनी नकार दिला . हे सारे सोपस्कार  रंजनाला स्वखर्चाने करावे लागले व ते करत असतांना रंजनाचे संपुर्ण कुटुंब दोन दिवस होरपळून निघालं . आणि रिपोर्टमध्ये मालकांचे पुर्ण कुटुंब पाॕजिटीव्ह आणि रंजनाचं कुटूंब निगेटीव्ह आलं . त्यांच घर मोठं असल्याने आजोबा सोडता बाकी सगळ्यांना घरातच क्वारंटाईन रहायला सांगितले तर त्यांनी रंजनाने घरात कामास येण्यासाठी आग्रह केला पण आता रंजना ही जोखीम स्वीकारू इच्छित नव्हती तिने ठाम नकार दिला कारण आलेल्या आनुभवावरुन आपल्याला कोरोना झाला तर मालक पहाणार नाहीत ही तिची खात्री झाली होती . तर रंजना कामाला न आल्याचा मालकांनी मनात राग धरुन तिला पैसे तर दिले नाहीतच शिवाय तिला जागा सोडण्यास भाग पाडले . कोरोनाच्या कालावधीमध्ये अनेक लोक एकमेकांना मदत करत असल्याचे दिसत होते तितकेच काहीजण निष्ठुरपणेही वागत होते यामध्ये रंजनासारखे मात्र होरपळून निघाले ...........


वंदनाचा अनुभव तर भयचकीत करणारा होता . आगदी सुरुवातीच्या काळातील ही घटना आहे . चार पोलीस एक फ्लॕट भाड्याने घेऊन रहात होते . एक वर्षापासून वंदना त्यांच्याकडे कामाला होती भाजी आणण्यापासून स्वयंपाक , झाडू-पोछा व भांडी अशी सगळी कामं ती करायची तिच्याकडे घराची एक किल्ली पण देऊन ठेवलेली होती . या कालावधीत पोलीसांना विविध विभाग दिले जायचे . त्यामुळे या चार जणांचे नऊ मित्रांना या विभागात वेगवेगळ्या शिफ्टमध्ये ड्युटी मिळाली . ते परगावचे होते त्यामुळे तेराजण आंघोळ जेवण व ड्युटीप्रमाणे आळीपाळीने फ्लॕटवर असायचे . यापैकी एकजण पाॕजिटीव्ह निघाला की लगेच गाडी येऊन फ्लॕटवर आसलेले सर्व पोलिस व काम करत असलेली वंदना यांना गाडीत घालून घेऊन गेली . दोन दिवस तिच्या घरच्यांना तिचा पत्ता लागला नाही . तु निगेटीव्ह निघाल्यावर तिला चौदा दिवसांसाठी क्वारंटाईन रहायला सांगून गाडी निघून गेली . कुठेच काही समजत नव्हते त्यामुळे दोन दिवस घरच्यांच्या तोंडचं पाणी पळालं एवढं खरं !


हे आणि यासारखे विविध ठिकाणी विवीध प्रसंग घडले . दिल्ली-मुंबई यासारख्या मोठ्या शहरातून तर घरकाम करुन घर चालवणाऱ्या लाखो महिला आहेत ज्यांचे संसार या कालावधीमध्ये अडचणीत आले . सरकारने तीन महिन्यांसाठी दरमहा देऊ केलेले रु.500/  बँक खात्याला आधारजोड नसल्यामुळे मिळू शकले नाहीत त्यासाठी अनेकजणी हळहळ करत गेलेल्या अनेक अनुभव बँकेत आले . तसेच अनेक घरी या कामवाल्यांचा वावर असल्यामुळे मोठमोठया सोसायट्यामध्ये त्यांच्या येण्यावर बंदी घातली गेली . पुढेपुढे तर त्यांनी फक्त एका सोसायटीतच काम करायचं त्यांच्यासाठी बंधनकारक केलं . सुरुवातीच्या कालावधीत तर काम नाही मग पगार नाही अशी त्यांची अवस्था झाली . काही ठिकाणी कोरोनाग्रस्तांकडे काम केल्यामुळे त्यांना स्वतःला आजाराला सामोरं जावं लागलं तर यांच्या माध्यमातून कोरोना पसरतोय या नजरेने लोक पहायचे त्याला तोंड देणं ही वेगळीच कटकट होऊन बसली होती . पण प्रत्येक बाई गरिब आसो वा श्रीमंत , शहरात असो वा खेड्यात शिकलेली असो वा आशिक्षीत समोर उभ्या ठाकलेल्या प्रसंगाशी मोठ्या हिमतीने दोन हात करत होती . आला प्रसंग निभावून नेत होती !



काॕम्रेड सरिता कुलकर्णी 

saritakulkarni67@gmail.com

वूमन कौन्सिल कन्व्हेनर

बँक आॕफ महाराष्ट्र एम्प्लाॕईज युनियन औरंगाबाद