*आईच्या पवित्र नात्याला शिवीच्या कचाट्यातून मुक्त करा*
सध्याच्या वातावरणात महीला सबलीकरणाचे ढोल वाजवले जातात . त्यानिमित्ताने का होईना महिलांवरील अत्याच्याराला वाचा फोडली गेली आहे. सजग माणसाच्या मनातली तार छेडली गेली आहे. कायद्यात बदल, संस्कृतीत बदल, शिक्षणात बदल, प्रसारमाध्यमात बदल हे बदलाचे वारे वाहू लागले आहे , स्त्री-पुरुष समानता हा ऐरणीवरचा मुद्दा झाला आहे . पण एवढे मात्र नक्की की ही बदलाची आग धगधगती राहीली तरच समाजपरिवर्तन घडून येऊ शकेल.
माणूस घडत असताना त्याच्या आसपासच्या वातावरणाचा त्याच्या जडणघडीवर आपसूकच परीणाम होत असतो. जस लहान मुल चालू बोलू लागतं तस त्याच्या कानावर जे पडेल त्या बऱ्यावाईट गोष्टी त्याच्या मनावर कोरल्या जातात. आणि प्रसंगानुरूप आपोआपच त्याच्या वागण्या बोलण्यातून बाहेर येतात . त्यालाच संस्कार असे म्हणतात .
एक बारीक निरीक्षण जर केलं तर एक गोष्ट लक्षात येते . आपण रस्त्याने चाललो तर माणूस सहज बोलताना , रागाने बोलताना , भांडण करताना शिवीगाळ करतो व त्याची ती शिवी आई व बहीण यांना घेतल्याशिवाय पुर्णच होत नाही हे कशाच द्योतक आहे. मी म्हणेन स्त्रीला अत्यंत हीन समजण्याचे ध्योतक आहे . आईवरून शिवी देणं तिच्या अवयवाना हिणावणे विकृत आहे आणि ते म्हणजे समाजाच्या मानसिकतेत स्त्रीविषयी खोलवर रुजलेली विषवल्ली आहे .अशा शिव्यांमधून स्त्रीला अपमानाचं साधन बनवलं जातं . हे लैंगिक आणि मानसिक दोन्ही पातळीवर घातक आहे . आईवरून शिवी देणं ही “ताकद” नसून ते एक मानसिक कमकुवतपणाचं लक्षण आहे. हे इतकं भिनलंय न , माणसाच्या इतकं अंगवळणी पडलंय की कोणाच्या लक्षातही येत नाही की ज्या आईला आपण प्रेमस्वरूप आई , वात्सल्यरूप आई म्हणतो . स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी असे म्हणतो . आदिमाता , आदिशक्ती म्हणून जिची पूजा करतो , त्याच आईच्या नात्याला इतकं हीन लेखतो आहोत. ज्याप्रमाणे सती जाणं ही एक अनिष्ठ प्रथा होती त्यात तिच्या मनाविरूध्द बळी दिला जायचा त्याचप्रमाणे आईवरुन शिवी ही सुध्दा अनिष्ट प्रथा आहे . यात तिच्या स्त्रीत्वाचा खून होतो. तिच्या सन्मानाला तडा जातो . शिव्या ऐकताना कानावर अत्याचार होतात लाज वाटते.
संताप व्यक्त करताना आणि शिवी देताना समोरच्याला जास्तीत जास्त दुःख कसे होईल ह्याचा विचार केला जातो.
त्याच त्वेषाच्या भरत कोणत्याही व्यक्तीचे सगळ्यात पाहिले आणि जवळचे नाते - "आई" ह्याला ठेच पोचवायचा प्रयत्न होतो आणि अशीच सुरू होते मातृत्वाची उघड चेष्टा!
अलीकडे स्त्रीवाचक शिव्यांचा वापर तितक्या अतिसंतप्त टोकाच्या क्वचित होणाऱ्या आणि असंस्कृत वादासाठी राहिलाच नाहीये! ह्या शिव्यांचा प्रयोग आपल्या सभ्य समाजात इतका रुळला आहे की सहज गप्पा मारता मारता स्त्रीत्वाचे(आईचे, बहिणीचे) वाभाडे निघतात.
लाज वाटावी अशी भाषा अलीकडे भूषण आणि शक्तिप्रदर्शन म्हणून मिरवली जाते.
हे अधःपतन फक्त मराठी भाषेपुरते नाही , जगभरात सर्व भाषा ह्याला बळी पडल्या आहेत.
एकंदरीत समाज म्हणून आपण आपल्या भाषेसाठी आणि पर्यायी स्त्रीसाठीच्या आदरासाठी अपयशी ठरत आहोत
कुठतरी बदलायला हवं ! सामाजीक सुधारणा या राजकीय क्रांतीप्रमाणे कधीही एकदम होत नाहीत . सामाजीक सुधारणाची गती मंदच असते. परंपराप्रियता हा कोणत्याही समाजाचा महत्वाचा विषय असतो . त्यामुळे सातत्य व परिवर्तन याचे चक्र फिरत फिरत समाजात बदल होत असतात.
याचाच एक भाग म्हणून ८ मार्च या जागतिक महिलादिनाला वेगळं स्वरूप द्यावं अस वाटतं. हे करण्यासाठी तमाम समाजबांधवांना माझी कळकळीची विनंती आहे. थोडसं अंर्तमुख होऊन विचार करा. शिवी उच्चारण्यापूर्वी तुम्ही थोडसं तरी थांबलात तर नक्कीच तुमच्यातला माणूस जिवंत आहे आणि तुमचे तुम्हालाच पटेल की बापरे हे तर बरोबर आहे . आपण केवढे महापाप करतो आहोत. आणि मग प्रत्येकाने प्रयत्नपूर्वक स्वतःमध्ये हा बदल घडवून आणला पाहीजे, जाणीवपूर्वक बदलायला पाहीजे .
कालातंराने या बदलाला कायद्याचंपण संरक्षण घ्यावं लागेल. सुरूवातीला काही काळ नैतीक बदलाला द्यावा लागेल . नंतर मात्र काठोर कारवाई करावी लागेल .
सरकारी पातळीवर पण यासाठी अभियान राबविले पाहिजे ज्याप्रमाणे स्वच्छता अभियान , हागंदारीमुक्त अभियान , साक्षरता मोहीम रबविली जाते त्याप्रमाणे शिविमुक्त घर , गल्ली , गाव , तालुका , जिल्हा , राज्य , देश आणि जगभारत या सर्व पातळ्यावर काम करायला हवं .
“ वुमेन्स ॲट्रॉसीटी ॲक्ट कलम ….. नुसार ” अशा प्रकारची शिवी देणारा दोषी ठरवता येईल या कायद्यात कशी तरतूद करता येईल ?
या कामासाठी तमाम कायदेपंडीतांनी , समजसुधारकांनी , नेते मंडळीनी , विचारवंतांनी सामूहिक प्रयत्न करायला हवेत .
ह्या कायद्याने शिव्या कदाचित पूर्णपणे बंद होणार नाहीत पण किमान समाजाला अंतर्मुख तर करेलच !
सरिता कुलकर्णी
उपाध्यक्ष
बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉइज
युनियन संभाजीनगर युनिट
मोबाईल नंबर
9421607248
No comments:
Post a Comment