Monday, October 27, 2025

आर के'ज गेट टुगेदर अँड ग्रँड सेलिब्रेशन* *एक गोड आठवण*

 *आर के'ज गेट टुगेदर अँड ग्रँड सेलिब्रेशन*
*एक गोड आठवण*



    ठरल्याप्रमाणे 25 आणि  26 ऑक्टोबर 2025 हे दोन दिवस सगळ्यांनी एकत्र जमून धमाल केली आणि जुन्या नव्या आठवणींना उजाळा देत , जागरण मस्ती करुन शरीराने थकलो असलो तरी मनाने तरुण होत , तृप्त होऊन एक प्रकारची एनर्जी घेऊन अगदी दोन वर्षाच्या आत्रेयपासून पंचाहत्तर वर्षांच्या भाऊजीपर्यंत प्रत्येकजण आपापल्या घरी गेले . 

     तसं तर आईकाका गेल्यापासून वर्षातून एक दिवस म्हणजे आईकाकांचा स्मृतीदीन 9 जुलै यादरम्यान आम्ही पंचकन्या एकत्र जमण्याचा निश्चय केलेला आहेच . पण 1 नोव्हेंबर 2024 ते 31 ऑक्टोबर 2025 हे वर्ष आमच्या फॅमिलीसाठी जरासे वेगळे होते . यावर्षी तशी वेगवेगळी कारणे पण होती . आम्ही सर्वजण भौगोलिक दृष्ट्या महाराष्ट्रभर विखुरलेले आहोत , मुख्य म्हणजे प्रत्येकाच्या मागे प्रचंड व्याप आहेत , प्रत्येकजण खूप बिझी आहे , फक्त कार्याच्या निमित्ताने एकमेकांकडे जाणे होते . मग एवढे Events कसे काय करावे असा प्रश्न मनात घर करुन होता . त्याप्रमाणे मुलांशी संपर्क साधू आणि पाहू काही हटके करता येईल ते , एखादा पॉईंट ठरवावा प्रत्येकाने स्वतः तिथे यावे गेट टुगेदर आणि सेलिब्रेशन करावे आणि तिकडूनच आपापली घरे गाठावी असे केल्यास सर्वांना सोयीचे होईल मुलांना पण मजा येईल वीकेंड एन्जॉय केल्याचा आनंद होईल. कारण आजकालची पिढी वेळ द्यायला तयार नसते त्यांच्या आवडीचा विचार केला तरच त्यांनाही एकत्र जमण्याची गोडी लागू शकेल असे काहीतरी ठरवण्याचा विचार होता कारण जबरदस्ती करुन उपयोग नाही त्यांना आवडेल असे केले तरच उत्स्फूर्तपणे ती सामील होतील , तसे तर मुलांना दोष देण्यात काहीच अर्थ नाही त्यांची ध्येये वेगळी , परिस्थिती वेगळी , धकाधकीचे जीवन त्यात त्यांना आवडेल असे काही केले तरच ती वेळ देणार त्यामुळे तसे काहीतरी मुलांच्या वेळा पाहून ठरवू असे ठरवले. प्रत्येकाला सवड म्हणलं तर हे फक्त दिवाळीच्या आसपासच होऊ शकेल. कसे करता येईल ते पाहू असे मी मनाशी ठरवले . 

    पहिल्यांदा मी यज्ञेश बरोबर बोलले , त्याला त्याच्या आईचा पन्नासावा वाढदिवस तर मोठा करायचा आहे पण काय करावे हे समजेना अशी त्याची अवस्था  झाल्याचे मला जाणवले . तो मला म्हणाला " करायचा तर आहे पण मला काय करावे ते समजत नाही."

पुन्हा दाक्षूला बोलले तर तिचीही काहीतरी करण्यासाठीची धडपड आणि मनोरे रचण्याची उत्सुकता मला तशीच जाणवली.

    कारण 1 नोव्हेंबर म्हणजे ज्योतीचा वाढदिवस असतो. यावर्षी तिला पन्नास वर्षे पुर्ण झाली त्यामुळे तीचे चालू वर्ष

" सुवर्ण महोत्सवी वर्ष "

 म्हणून आम्हाला करायचे होते. 


 15 नोव्हेंबर पुरंदरेना साठ वर्षे पुर्ण झाली म्हणजे त्यांची 

" शष्ठ्याब्धीपुर्ती " 

झाली त्यातच दुग्धशर्करा योग म्हणजे याचवर्षी एप्रिलमध्ये त्यांच्या लग्नाला पंचवीस वर्षे पुर्ण झाली . संजू म्हणजे काकांचा प्राण ! बाकी संपुर्ण फॅमिलीच्या पण केंद्रस्थानी ती असते . त्यांचं काहीतरी व्हायला पाहिजे हे डोक्यात होते .

   21 एप्रिलला मायडीची

 " शष्ठ्याब्धीपुर्ती "

झाली , तर आमच्या फॅमिलीतील सर्वात मोठे सदस्य म्हणजे एम बी के भाऊजीना 2 जूनला पंचाहत्तरावे वर्ष सुरु झाले म्हणजे त्यांचा

 " अमृत महोत्सव " 

आता काकांची तिसरी पिढी असलेल्या मंजुच्या लग्नाला 22 डिसेंबरला पंचवीस वर्षे पुर्ण झाली . म्हणजे त्यांचा 

" रौप्य महोत्सव !" 

अशी भली मोठी इवेंट्सची यादी होती.

     आम्ही सर्वजण पुणे , मुंबई , कोल्हापूर , किर्लोस्करवाडी आणि बार्शी अशा विविध ठिकाणी राहतो. आता कसा बसवायचा सगळ्यांचा मेळ हा मोठा प्रश्न होता. त्यावर गेट टुगेदर हाच मस्त उपाय आहे हे प्रकर्षाने अधोरेखित होत होते. तसे मी एकेकाला पर्सनल msg टाकत राहिले.

मग एका रविवारी दाक्षूने एक व्हॉट्सॲप ग्रुप तयार केला आणि त्याला तिने काकांचे नाव दिले

 "आर के'ज ग्रँड सेलिब्रेशन "

त्याला ह्या उत्सवमुर्ती सोडून बाकी सगळे add केले आणि त्यावर तिने msg टाकला त्याला उत्तर म्हणून मी एकूण पाच प्रोग्रॅम , आणि outing चा प्लॅन असा सविस्तर msg टाकला . आणि काय आश्चर्य सगळे एकदम एक्साईट झाले , महाचर्चेला उधाण आले . अनेक रिसॉर्टची नावे समोर आली , प्लॅन जमू लागले . माझ्या गृहिताप्रमाणे दुसरे दिवशी ग्रुप थंडगार , मग मीच एखादा msg टाकला की त्याला प्रतिसाद मिळे पण प्रत्येकजण आपापल्या व्यापात गर्क होता . पण दाक्षायणी आणि मी मात्र सतत संपर्कात होतो मध्ये मध्ये यज्ञेश असे . जसा वेळ मिळेल तशा चौकशा करत ती मला अपडेट्स देत होती .

     आता डेट ठरवायची होती त्यातही दोन गट पडले 25/26 ऑक्टोबर की 1/2 नोव्हेंबर दोन आठवडे कीस पाडून शेवटी 25/ 26 ऑक्टोबर फिक्स झाले मग रिसॉर्टची शोधाशोध सुरु झाली , बजेट बघत फायनली तेही पक्के केले आणि आता कार्यक्रम 100% होणार या भावनेने  माझा जीव भांड्यात पडला .

    मग पुन्हा उत्सवमुर्ती साठी गिफ्ट , डेकोरेशन , प्रत्यक्षात कार्यक्रम त्याचे सूत्र संचालन , सांस्कृतिक कार्यक्रम , एकूण येणारा खर्च त्यानुषंगाने contribution या चर्चा होत राहिल्या . कारण गेट टुगेटर 24 तासांमध्ये सगळे व्यवस्थित आणि सुटसुटीत बसवायचे होते . 

आणि दिवाळीपूर्वी एकूण कार्यक्रमाचे नियोजन पुर्ण झाले . सर्वांनी 25 तारखेला दुपारी तीन वाजेपर्यंत निसर्गाच्या कुशीत वसलेल्या , तोरणा राजगडच्या सान्निध्यात पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यातील पासली या गावातील ब्रम्हे यांच्या " निसर्गायन " रिसॉर्टवर भेटण्याचे ठरले आणि सर्वजण दिवाळी , खरेदी , फराळ भेटीगाठी यात गुंगले . 




दिवाळी संपली आणि पुन्हा ग्रुपवर msg चे फटाके उडू लागले . 25 तारखेला सकाळी 8 वाजल्यापासून आम्हा पाच बहिणींचा मुले , मुली , सुना , जावई , नातवंडे असा एकूण सत्तावीस जणांचा मोठा परिवार आपापल्या ठिकाणांहून निघाल्याचे msgs आले . आमची गाडी 1 च्या दरम्यान नसरापुर फाट्याला वळली आणि अर्ध्या तासामध्ये सगळेच मागे पुढे होते असे समजत होते . वेल्हेच्या पुढे मात्र आगदीच डोंगरातून घाट माथ्यावर गाडी चढू लागली . जियो सोडता सर्व मोबाईलची रेंज गेली पण रस्त्यातच सर्वांच्या भेटी झाल्या आणि पुढचा 14/15 किलोमीटरचा प्रवास गोंधळ , मजा मस्ती , फोटोग्राफी  करत आम्ही एकेक करत डेस्टिनेशनला पोहोचलो . तिकडे सगळीच चोख व्यवस्था होती . 
  आम्हाला आता मुख्य कार्यक्रमाचे वेध लागले होते कारण ज्यांचे कार्यक्रम होणार होते त्यांना अजिबातच कल्पना नव्हती . तिथे दोन बंगले होते , हुशारीने त्या सगळ्यांना एका बंगल्यात पाठवले . दुसऱ्या बंगल्यात आम्ही सर्वजण जय्यत तयारीनिशी होतोच , हॉलची सजावट सगळ्या मुलांनी दरवाजा लावून घेऊन करायला सुरुवात केली .  दिवाळीनिमित्त सर्वांनी ट्रेडिशनल कपडे घालायचे ठरलेले होते . सर्वजण थाटात सजून धजुन तयार होत होते . शेवटी तो क्षण आला , हॉलचे लाईट्स बंद केले होते त्या सात जणांना बाहेर खुर्च्यांवर बसवले आणि काही कळायच्या आत सर्वांनी जल्लोषात फुलांच्या पाकळ्यांची उधळण करत त्या सर्वांना हॉलमध्ये घेतले . 

    दाक्षू आणि धनुने माईकचा ताबा घेत मस्तपैकी कार्यक्रमाची सुरुवात केली . लगेच दाक्षूची 

" वडा वडा , चाय गरम " ची आरोळी आली आणि वातावरण एकदम फनी मूडमध्ये आलं . आत्रेय, इनिका आणि अवनी या बच्चे कंपनीकडून 

" आर के'ज गेट टुगेदर अँड ग्रँड सेलिब्रेशन"

या फलकाचे अनावरण करत टाळ्यांच्या गजरात कार्यक्रमाची सुरुवात झाली . मी विस्तृत प्रस्तावना करत एकूण कार्यक्रमाचे नियोजन सांगितले .  सगळेचजण एकदम भरवून गेले होते . सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद आणि कृतज्ञता ओसंडून वहात होती .



      



             




 प्रथम विविध कलाकारांप्रमाणे उत्स्फूर्तपणे केलेला विविधगुण दर्शनाचा कार्यक्रम सुरु झाला यामध्ये आत्रेयच्या 

" चिव चिव चिमणे " 

गाण्याने बहार आणली .  इनिकाच्या  गणेशाराधनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली . भरतनाट्यमच्या दोन गाण्यावर तिचा उत्कृष्ट परफॉर्मन्स झाला . एखाद्या सराईत नृत्यांगनेसारखे अवनीचे दोन परफॉर्मन्स झाले . धनु , मनू , ज्योती , मुकुंद , मंजू यांनी गीत गायन केले त्याचा सर्वांनी आनंद लुटला . 

आर केंचा एवढा मोठा परिवार एकत्र जमला आहे तर त्याला साजेसा 

" वऱ्हाड निघालं लंडनला "

या एकपात्री प्रयोगातील एक प्रसंग सादर करत कार्तिकने धमाल उडवून दिली .

 तर आकांक्षाने 

_.      " उन उन खिचडी साजूक तूप " 

या कवितेचे वाचन केले .

उत्स्फूर्तपणे अमोलने नटसम्राटमधील एक भन्नाट परफॉर्मन्स केला तर तायडीने पण तिच्या स्टाईलने तिच्या पोतडीतील नवरा बायकोच्या संबंधावर एक मजेदार किस्सा वाचून दाखवला .

    कार्यक्रमाची रंगत वाढत होती पण वेळ अपुरा वाटला इकडे जेवण तयार झाले होते . येणाऱ्या खमंग वासाने भूक चाळवत होती .

मग आम्ही या सर्वांच्या  सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाला सुरुवात केली . यात हार , बुके , crown , हातात अंक दर्शक , गळ्यात पट्टी , दिव्यांची ताटे , केक , फुलांची , पणत्यांची रांगोळी , फुगे , लाईटच्या माळा अशी भरगच्च तयारी केली होती . त्यांच्यापैकी कोणालाच याची कल्पना नसताना असा सत्कार करुन घेताना त्यांना सर्वांनाच भरुन येत होते . अत्यंत उत्साहात जवळजवळ दोन अडीच तास कार्यक्रम झाला नंतर जेवणे झाली . पुन्हा गप्पांची मैफिल , पत्ते , गाणी , भेंड्या करत रात्री एक वाजता सर्वजण झोपी गेले आणि पुन्हा पहाटे साडेपाच वाजल्यापासून एकेकजण उठले . मोठाले दोन लॉन्स , डोंगरांनी मस्त धुक्याची चादर लपेटली होती. मधूनच लालबुंद आभाळ दिसत होते , बदलत्या रंगछटा न्याहाळत , उगवत्या सुर्याला नमस्कार करत निसर्गाच्या सान्निध्यातली ती पहाट फारच प्रसन्न वाटत होती . सकाळचा चहा , नाष्टा आणि गप्पांची मैफिल आणि रात्रीचे राहिलेले सेशन पुढे सुरु झाले . 

        नेमक्या या प्रसंगाला अनुसरून कीर्तीने तिचे मनोगत व्यक्त केले , तशी RK फॅमिली मध्ये नवीनच असणारी ती पण तिला या ग्रुपमध्ये नात्यापेक्षा मित्रत्वाचा जास्त भास होत असल्याचे , जाणवल्याचे तिने सांगितले आणि पु. ल. देशपांडे यांच्या मैत्री या कवितेचे तिने वाचन केले . मायडीने तिच्या छान शैलीत सर्व उत्सवमुर्तींच्या वतीने कार्यक्रमाचे कौतुक आणि आभार व्यक्त केले तर चीनून

 "  दोन दिवसांपासून सर्वांचे कलागुण दर्शन मी पाहत आहे या चालू धकाधकीच्या जीवनात कोणतीही कला जोपासणे महत्वाचे आहे आपले पुढील गेट टुगेदर होईल तेव्हा मी नक्कीच काहीतरी सादर करेन "  

अशी इच्छा व्यक्त केली .

त्याच दरम्यान ज्योतीने मिरजवरुन ऑर्डर केलेली हार्मोनियम आमच्याबरोबर आणली होती . हा संपूर्ण सोहळा अनुभवता माझ्या मनात एक नाट्यगीत रुंजी घालू लागले 

" मर्मबंधातली ठेव ही "

ते मी पेटीवर वाजवले ते ऐकून सर्वजण धुंद झाले . पुन्हा सर्वजण फ्रेश झाले आणि हिरवळीवर , डोंगराच्या पायथ्याला , झाडीत फोटोग्राफी सुरु झाली . 

    चेरी ऑन द टॉप म्हणजे हे दोन दिवसातले सगळे प्रसंग ओजसने त्याच्या कॅमेऱ्यात अतिशय कल्पकतेने कैद करुन ठेवले आहेत . त्याची लिंक त्याने सर्वांना शेअर केली आहे ती पाहताना पुन्हा आपण तिथे असल्याचा भास होतो . मग कायमच सर्वांना आनंद देणारा हा प्रसंग शब्दबद्ध करावासा वाटला . कार्तिकने त्याच्या गुरुवारच्या व्हिडिओसाठी छान शूटिंग आणि फोटोग्राफी केलेली आहे लवकरच तेही आपल्याला पहायला मिळेल !







पुन्हा जेवणे झाली दुपारचा एक वाजला आणि सर्वांना परतीचे वेध लागले पण प्रत्येकजण रेंगाळत होता . जोडीला रिसॉर्टवाले ब्रम्हे यांनी पण स्वच्छता , जेवण , नाष्टा , चहा हे अगदी छान पद्धतीने पुरविले होते . शेवगा सूप , पालक सूप , दडपे पोहे , गरम वडे , मिसळ पोहे , बाकर वडी , पिठलं भाकरी , कढी खिचडी , अनेक प्रकारच्या चटण्या , पोळी , भाज्या , दलिया खीर अशी थंडगार वातावरणात वाफाळत असलेली गरमागरम भरगच्च खादगी ! अहाहा !!!!

   विशेष म्हणजे त्यांनी आम्हाला विशेष सहाय्य केले ते म्हणाले 

   " आमचे रिसॉर्ट झाल्यापासून लोक इथे अनेक सेलिब्रेशन करण्यासाठी येतात . पण अशा प्रकारचं , इतक्या लोकांनी एकत्र येऊन पाच पाच कार्यक्रमांचे सेलिब्रेशन पहिल्यांदाच होत आहे आणि त्याचा मला पण खूप आनंद झाला आहे " .

     छान आठवणींची सुगंधी कुपी घेऊन पुन्हा नक्कीच असे गेट टुगेदर करु असा निश्चय करुन आनंद , उत्साह , कृतज्ञता , आनंदाश्रु , हळवेपणा अशा सर्व भावनाची रसमिसळ घेऊन प्रत्येकजण परतीच्या प्रवासाला लागले . मुख्य म्हणजे आमच्याच कुटुंबातील काहीजण अडचणीमुळे येऊ शकले नाहीत ते आता लवकरच पुढचे गेट टुगेदर ठरवूया असे म्हणत आहेत . मीही नियोजनाची जबाबदारी आता दुसऱ्या दोघांकडे देणार आहे . पाहू आता पुढचा योग कधी येतो ते !!

No comments:

Post a Comment