सोन्यासारखा दसरा
परवाच गौरी गणपती झाले आणि आता नवरात्र दसरा आला . आपल्या संस्कृतीप्रमाणे प्रत्येक सणाचे खास असे वैशिष्ठ्य आहे . दर पंचवीस वर्षांनी पिढी बदलते म्हणतात आता तर ट्वेंटी-ट्वेंटीचा जमाना आहे . त्यामुळे पिढी बदलाचा कालावधी पण पाच वर्षाचा झाला म्हणायला हरकत नाही .
माझं बालपण तसं वाडा संस्कृतीत गेलं . आता सर्रास बंगला फ्लॅट संस्कृती आहे त्यामुळे प्रत्येक सणाच्या , प्रसंगाच्या खास अशा आठवणी आहेत . प्रसंगानुरूप एखादी सुगंधी कुपी उघडावी आशा त्या भासतात . असाच एक दसऱ्याचा सोहळा !!
घेरडी गाव बारा बलुतेदारांचा !
प्रत्येकाची कामे , सणवार , रीतिरिवाज ठरलेले असत . घेरडीत कुलकर्णी , पाटील , धनगर , सनगर जरा जास्त आहेत तिथले पाटील हे मुसलमान आहेत . पण सगळे गुण्या गोविंदाने राहतात धनगर समाजाची घेरडी गावाच्या चोहो बाजूंनी शेती व वाड्या वस्त्या आहेत . त्यांच्याकडे घरटी एक तरी मुलगा मुंबईला गोदीमध्ये कामाला आहे त्यामुळे घेरडीचे धनगर लोक सधन आहेत . त्यामुळेच गणपतराव देशमुखांच्या प्रयत्नांनी पंचेचाळीस वर्षांपुर्वी
" घेरडी - मुंबई "
गाडी सुरु झाली आजही छोट्याशा खेड्यातून डायरेक्ट मुंबई गाडी मोठ्या दिमाखात चालू आहे . घेरडीत सगळ्याच सणाचे , उत्सवाचे विशेष वैशिष्ठ्य आहे त्याचप्रमाणे दसऱ्याचं पण खूप प्रस्थ आहे . बदामीची देवी हे आम्हा कुलकर्ण्यांचे कुलदैवत , त्यामुळे वाड्यात पण नवरात्र आणि दसरा मोठ्या प्रमाणात आनंदाने साजरा केला जातो .
तशी तर दसऱ्याची पुर्वतयारी पक्ष पंधरवड्यात सुरु केली जाई . नवरात्र बसण्यापुर्वी वाड्याच्या आसपासचा परिसर गवत काढून साफ करुन घेतला जाई . गावात एक मुकी होती ती आशी कामे करुन तिचे पोट भागवायची . तीला ऐकायला बोलायला येत नव्हते तरी पण अशा कामाच्या वेळी बरोबर हजर असायची . तिला पैशात रोजगार द्यायचा आणि दिवसभर आपल्याबरोबर चहा , नाष्टा , जेवण सगळं तिला आई द्यायची . इतर वेळी सुद्धा कधीकधी तिला काम नसले की तिच्याकडे पैसे , नसायचे मग बरोबर घरी यायची . उगाचच मागचे दार , परसदार साफ करायची. आई ओळखायची आज हीच्याकडे पैसे नाहीत लगेच तिला चहा द्यायचा व काही छोटंमोठं काम सांगायची आणि जेवण करुन जा म्हणायची . तीला खूप आनंद व्हायचा . नवरात्र बसायच्या आधी ती वाड्याभोवतीचा परिसर स्वच्छ करुन जायची . घरोघरी साफसफाई , घरे सारवणे , रंग देणे अशी कामे व्हायची अशा कामात वाड्यात सगळ्यांच्या घरी नीलाबाईला हाताशी धरले जाई .
नवरात्र सुरु झाल्या दिवसापासून रोज सकाळी साडेसातला गावात देवीचे गोंधळी होते , ते त्यांच्या खास पोशाखात , कपाळावर कुंकवाचे ठसठशीत पट्टे ओढून , गळ्यात कवड्यांची माळ घालून देवीचे भोपी होऊन पहाडी आवाजात देवीची गाणी म्हणत घरोघरी जात असत . साथीला खणखणीत संबळ आणि दिमडी वाजवत वाड्यात प्रत्येकाच्या दारासमोर गाणी म्हणत वातावरण भारावून टाकत असत . वाड्यातील सगळे लोक आंगणात येऊन ते ऐकत असत . हा कार्यक्रम नऊ दिवस रोज होत असे .
नवरात्रात बायकांचे भाजणीचे उपास आसत , मग भाजणीची पिठे दळली जायची तर रोजच्या नैवेद्यासाठी डाळ आणि गहू भाजून पीठ दळले जाई . ते दूध-गुळात कालवून रोज त्याचा नैवेद्य केला जाई . फार खमंग चव असे त्याची . नऊ दिवस देवापुढे दिवा तर सुरुवातीला खारीक खोबरे दोऱ्यात ओवून मंडपीला बांधून ती मंडपी देवघरावर सोडली जायची . रोज धोंडी आप्पा फुले माळ देत आसत . पूजा झाली की गळ्यात कवड्याची माळ घालून दिवटीवर तेल घालून ती पेटवायची व त्या दिवटीने काका आरती करायचे . हे सगळ होत असताना सात्विक भाव असे . धूप , दीप , उदबत्ती याचा सुगंध घरात दरवळे . क्षणभर मंदिरातील गाभाऱ्यात आहोत की काय असा भास होई . स्वच्छ्ता , सात्विकता यांनी वातावरण भारावलेले असे त्यामुळे यादरम्यान काका
" गुरुचरित्राचे पारायण "
करत असत . पाचव्या माळेला आई , प्रभा काकू , मावशी , आमच्या काकू , उषा वहिनी , पिलू वहिनी , शांता वहिनी सगळ्या मिळून भावकी सोडून इतर पाच घरी जोगवा मागायला जायच्या . त्यात माई मावशीच्या मळ्यात , डोंगऱ्याची दोन घरे , विठू देशपांडे , देशपांडे वहिनी , महाजन वहिनी अशी घरे ठरलेली असत . सकाळी साडेनऊला जाऊ असां ठरलेला निरोप रमा काकू , वरलीकडच्या उषा काकीना गेलेला असे . गावाबाहेर ओढ्याच्या वर गेलं की माई मावशींचा मळा होता , मग सगळेच बरोबर त्यावेळेत त्यांच्या मळ्यात हजर व्हायचे . तिथे छाया ताई अंगणात मोठी सतरंजी टाकून वाट पाहत थांबलेली असायची . आम्ही मुली पण बायकांच्या मागेमागे जायचो तिथे खास आदरातिथ्य , आगत्य होत आसे . मळ्यात गच्च भरलेली चिरेबंदी विहीर होती . त्या विहिरीचं पाणी घराजवळ असलेल्या पाटातून सगळ्या मळ्यात वाहत जात असे . मळ्यात देशी केळीची बाग , विड्याच्या पानाचा मळा , विविध रंगी फुलझाडे होती . खास करून पिवळ्या धम्मक फुटण्याच्या फुलांनी झाड बहरलेले असे . एकमेकींना बसण्याचा आग्रह होई मग देवीची जोगव्याची गाणी म्हणली जायची आणि आवडीचा कार्यक्रम म्हणजे चढाओढीत उखाणे घ्यायचे . गप्पागोष्टी , हास्य कल्लोळ होत असे . छोटीशी पण चविष्ट अशी देशी केळी , दूध सगळ्यांना दिले जायचे
दोन तास कसे जायचे समजत नसे . येताना मग बायका नवरात्रात नाविन ब्लाऊज , बांगड्या घालायचं म्हणून हसन पाठणाकडे महिन्यापूर्वी टाकलेलं ब्लाऊज
" झालं का बाबा "
म्हणत डोकावायच्या तर हमखास ते झालेले नसे " आज दुपारी नक्की पाठवतो काकी "
असे तो सांगे
" आज नाही दिलेस तर पुन्हा तुझ्याकडे टाकणार नाही बघ "
असा नेहमीप्रमाणे लटकेच रागवून बायका निघायच्या .
पुढे वाड्यालगत असलेल्या मणेऱ्याच्या गल्लीत मालन , प्यारन , शहाजानची बायको अशा ठरलेल्या बांगडेवाल्याकडे सगळ्याजणी बांगड्या भरत असत . असा तो त्या दिवसाचा सकाळचा सोहळाच असे .
जोगव्यात भाजणीची मिक्स पिठे येत आसत मग त्या मिक्स झालेल्या पिठात ताक घालून आई त्याची थालीपिठं करत असे ती फार खमंग लागायची . सात दिवस झाले की अष्टमीला कडकण्या करायच्या , जवळचे देवीचे ठाणे म्हणून अष्टमीला बनाळीच्या देवीला कडकण्याचा नैवेद्य , खणा-नारळाची ओटी घेऊन जायचं . यासाठी उषा वहिनी , शांता वहिनी , पिलू वहिनी हमखास निघत , मग त्यांच्याबरोबर आम्ही मुली निघायचो , आई क्वचित यायची . सकाळी सातला बनाळीला जायला जत-घेरडी गाडी असायची , पहाटे उठून सगळ आवरून आम्ही निघायचो . खरं तर बनाळी हे आईच आजोळ , त्यामुळे तिथे गेलो की पहिल्यांदा आम्ही आईचे मामा म्हणजे शंकर मामांकडे जायचो , अष्टमीदिवाशी त्यांचं घर पाहुण्यांनी गच्च भरलेलं असे . घरी थोडा वेळ थांबून आम्ही सगळे बनात जायचो , तिथे देवीची यात्रा भरलेली असे . बनात चिरेबंदी दगडाचे देवीचे मंदिर आहे . त्या परिसरात दोन तीन मोठाल्या चिरेबंदी विहिरी आहेत , त्यावर रहाट बसवलेले आहेत , विहिरीत कासव आणि मासे असल्यामुळे पिण्यायोग्य स्वच्छ पाणी असे . उन्हाळ्यात गावातील सगळ्या विहिरी कोरड्या पडत , पण बनातल्या बारवेचं पाणी कधी आटत नसे . देवळासमोरच्या विहिरीत कमळाची फुले असायची . रहाट फिरताना विशिष्ट लयीत येणारा आवाज , विविध प्रकारची फळा फुलांची झाडे , मोर , विविध रंगी पक्षी असा खूप निसर्गरम्य परिसर आहे तो . बनात केवड्याची पण झाडे आहेत . केवड्याच्या झाडाखाली नाग असतो म्हणून तिकडे सहसा कोणाला फिरकू देत नसत . पण केवड्याची पिवळी धम्मक कणसे मात्र तिथे मिळत आसत . आख्ख कणीस विकत घेऊन त्याची पाने घरोघरी बायकांना दिली जायची . बायका पण त्याची विशिष्ठ प्रकारे घडी घालून पिनेतूने वेणीत किंवा अंबड्यावर घालत असत खूप सुगंध दरवळे त्याचा . खूप गर्दीतून सगळ्यांनी एकत्र राहून देवीचे दर्शन घेऊन परत गाडीच्या वेळेपर्यंत शंकर मामांच्या घरी थांबायचो . देवीला आलेले भरपूर पाहुणे घरी येतात म्हणून मामींनी मोठ्या पातेल्यात भगर , आमटी ,खिचडी केलेली असे . प्रत्येकाने आपल्याबरोबर फराळाचं काहीतरी , फळे आणलेली असायची . लीला मावशी , सुमा मावशी , सुंता मामी आलेल्या सगळ्यांना केळीच्या पानावर फराळ वाढायच्या . हरी मामा , विद्या मामी , मुरला मामा , शामा मामी पुण्याहून आलेले असत . आईचे एक ब्रम्हचारी मामा होते त्यांना इसू मामा म्हणत त्यांच्याकडे एक घड्याळ होते
" हे शंभर वर्षांपूर्वीचे घड्याळ आहे "
असे ते सांगत असत . कुलुपे , दिवे अजून बऱ्याच जुन्या वस्तू त्यांच्या ट्रंकेत असत . आम्ही मुले गोलाकार बसून त्या पाहण्याची मजा घ्यायचो . विशेष करून पपीच्या म्हणजे त्यांच्या भाचीच्या मुली म्हणून आमचा लाड जास्त होत असे . या मामाकडे गणपतीच्या मूर्ती तयार केल्या जायच्या त्याचे साचे , वेगवेगळे रंग , ब्रश असे बरेच साहित्य त्यांच्याकडे असे .
डिकसळ , बनाळी आणि घेरडी या तीन गावात सगळे एकमेकांचे नातेवाईकच होते . जवळजवळ सगळ्यांच्या त्याठिकाणी गाठीभेटी होत असत मग भरभरून गप्पांना उधाण येतं असे . प्रत्येकाने बरोबर काहीतरी फराळाचं आणलेलं असे केळी , रताळी बाकी फळांनी टोपली भरलेली असे . पका मामाचे निर्जळी उपवास असत . शेवटचे तीन दिवस तो फक्त नारळाचे दूध घेत असे . पाच वाजले की सगळे परत घेरडीला यायला निघायचे सकाळचीच गाडी पुन्हा मुक्कामाला घेरडीला येत असे त्यांनी आम्ही परत यायचो . येईस्तोवर संध्याकाळ होई . दुसरे दिवशी नवमी किंवा दासरा असायचा .
" दसरा सण मोठा नाही आनंदा तोटा "
या उक्तीप्रमाणे आमच्या गावचा दसरा होत असे . वाड्यात आमच्या घरासमोरच्या आंगणात मधल्या मोठ्या आंगणातून दोन पायऱ्या वर चढून यावं लागे . आमच्या पाचही घरांचा हा दसऱ्याचा संध्याकाळचा कार्यक्रम एकत्र होत असे . मग आमच्या आंगणाचा स्टेज सारखा उपयोग केला जाई . काका चार वाजताच आंगणात आधी चवाळ त्यावर घोंगडी मग मोठी सतरंजी त्यावर लांबट दोन गाद्या अंथरुन पाच तक्के मागे भिंतीला लाऊन पांढरे शुभ्र भट्टीचे बेडशीट आणि तक्क्याला कव्हर घालून बैठक तयार करून ठेवायचे . आंधार पडला की आंगाणात उजेड दिसायला पाहिजे म्हणून दोनशेचा बल्ब लावायचे . वाड्यात सगळ्यांची एकत्र खरेदी केली जायची . मग विड्याच्या पानाची आख्खी करंडी , किलोभर सुपाऱ्या , आकरा नारळ , भिजवलेली हरभऱ्याची डाळ , हे सगळं तयार करुन ठेवलेलं असायचं . वस्तीवरच्या लोकांना लागते म्हणून दोनचार तंबाखूच्या पुड्या , एखादे बिडीचे पुडके , काडेपेटी , अडकित्ता , सुपारी हे एका ताटात घालून ठेवलेलं असायचं .
दसऱ्यादिवशी घेरडीत दुपारी दोन वाजल्यापासूनच आसपासच्या वस्त्यावरुन मानाचे ढोल यायला सुरुवात व्हायची . बिरोबाची पालखी असायची , प्रत्येक ढोलाबरोबर लेझीम किंवा पितळी झांज आणि रुमाल हातात असलेल्या वीस-पंचवीस लोकांच पथक असायचं . अंगात शर्ट विजार किंवा धोतर डोक्याला टोपी किंवा बहुतेक गुलाबी रंगाचे पागोटे , हातात मोठे गमशे असा पेहराव या लोकांचा असे . यात रंगा माळी आणि बुरंगेच्या ढोलाची चढाओढ असे . जवळजवळ पाच वाजेपर्यंत शाळेजवळच्या चौकात पाळीपाळीने प्रत्येक पथकाचा ढोलाच्या तालावर लेझीमवर गोलाकार नाच व्हायचा .
पंधरा दिवस आधी प्रत्येक पथकाची प्रॅक्टीस सुरु झालेली असायची . पहायला तुंबळ गर्दी व्हायची बहुतांश पुरुष असायचे आम्ही छोट्या मुली पहायला जायचो . आणि पाच वाजता सिमोल्लंघनासाठी एकामागून एक ढोल निघायचे , त्यांच्या पाठोपाठ गावकरी निघत असत . मारुतीला जाऊन पुढे ओढ्याच्या वर ते ठिकाण होतं . त्याला गावातून घराघरातून पुरुष मंडळी घटातलं उगवलेलं धान्य टोपीत खोचून आपट्याची फांदी हातात घेऊन सामिल व्हायचे .
घरी आईचा पण उत्साह भारी असायचा . दुपारी जेवायला पुरणा वरणाचा स्वयंपाक करुन सगळ आवरुन पुन्हा चार वाजताच ती स्वतः आवरायला घ्यायची . मोठ्या निळ्या पेटीत सुती कपड्यात गुंडाळून ठेवलेली खास काठपदर असलेली जरीची साडी ती नेसाण्यासाठी काढे . त्यात मधेच कधीतरी केवड्याचं पान ठेवलेलं असे , ते वाळलं तरी पण साडीला कसा वास येतो म्हणत घडी उकलून स्वतः हुंगुन पही मग आम्हीपण
" मला मला "
करत तीच्या भोवती जाऊन वास घ्यायचो . नीटनेटकं आवरुन नऊवार साडी छान काठ काढून ती नेसत असे . मग पितळेच्या डबीत कापसात गुंडाळून ठेवलेले दागिने काढून गळ्यात अष्टपैलू मण्याचं मंगळसुत्र , टपोऱ्या मण्याची एकदाणी , श्रीमंत हार , पाटल्या , बिलवर , नाकात नथ आणि लांबट डाळींबी खडा व त्याच्या भोवती सोन्याचे बारीक बुंदके असलेली आंगठी घालून आंबाडा वर गजरा असं तिच सोज्वळ रुप नटून थटून तयार होत असे . काकांचा पण दसऱ्यादिवशीचा ठरलेला पोशाख असे . पांढरंशुभ्र ब्रासलेटचं धोतर , वर भट्टीचा कडक पांढरा शर्ट व डोक्यावर टोक काढून टोपी . आणि बोटात डाळींबी रंगाचा ठसठशीत गोल खडा आसलेली आंगठी असा त्यांचा रुबाब असे . मग आवरुन सगळे सिमोल्लंघनाला निघत .
वाड्यातील प्रत्येकाचा रुबाब वेगळाच असे . सगळ्यात जेष्ठ पण एकदम तुडतुडीत शरीरयष्टी असलेले पंत काका , शुभ्र धोतर-शर्ट काळी टोपी घालून पाठीमागे हात बांधून दोन बोटात पेटलेली बिडी असे , मग मधूनच त्याचा झुरका घेत वाड्यात नरसोबाच्या दारापासून ते मोठ्या दारापर्यंत वडिलकीच्या नात्याने सगळी तयारी नीट झाली न असे पाहत चार वाजल्यापासून हेलपाटे घालायचे . त्यांच्याकडे सगळेजण आदरयुक्त भीतीने पाहत असत . मोहन अण्णा , रमेश अण्णा , नंदू इस्त्रीचे पँट शर्ट तर राजा भाऊ दादा विजार शर्ट घालून तयार होत असे . सगळ्यात शेवटी पाच नंतर मस्त झोप काढून फक्कड काका त्यांच्या पाठोपाठ सुधीर बाहेर यायचे . सुनील , सचिन , पंपु , बबलू , छाबलू , सख्याहरी ही मुलं पण पळापळी करायची . पण प्रत्येकाच्या कपाळावर कुंकवाचा नाम, डोक्यावर टोपी आणि त्यात देवापुढे उगवलेल्या धान्याचा तुरा आणि हातात आपट्याच पेंडक मात्र असायचं . आम्ही मुली नवीन कपडे घालून तयार व्हायचो , कुणाला लहर आली तर उगाच साडी नेसायची , सगळं आवरुन सावरुन आम्हा मुलांची पळापळी सुरू असे . बायका सगळ्या छान नवीन साड्या गजरे किंवा शेवांतीच्या वेण्या घालून नटून थटून तयार होत असत . तिकडे आपट्याची आणि सौंदडाच्या झाडाची पूजा व्हायची त्यासाठी डोंगरे दादा , पोलीस पाटील , तलाठी , ग्रामसेवक अशा लोकांचां मान असायचा . बऱ्याचदा काका घेरडीत ग्रामसेवक असायचे तेव्हा ते तीन वाजताच तयार होऊन बाहेर जायचे .
सीमोल्लंघन करुन सगळे पुरुष आले की कोणीतरी एखादी काकू वाड्याच्या दरवाजातच भाताची मूद त्यावर गुलाल घालून ओवाळून टाके . गुलाब आण्णांनी रामायणातील सांगितलेल्या गोष्टी ऐकलेल्या असत , त्यामुळे सगळे पुरुष दरात आलं की प्रत्येकाच्या पायावर पाणी घातले जाई . मग जस काही युद्ध जिंकून आले असे वातावरण वाटायचे . मग घरात आलं का प्रत्येकीने औक्षण करायचं , कडकण्या खायला द्यायच्या . सगळे एकमेकांच्या घरी जाऊन सोनं देऊन किंवा घेऊन आंगाणात टाकलेल्या बैठकीवर येऊन बसत . आपापल्या पायरीवर बायका बसत . आम्ही लहान मुलं वाडाभर फिरायचो .
मग तिकडून येताना ढोल ठरलेल्या क्रमाने गावात कुलकर्णी वाडा , डोंगरे वाडा , सोनार वाडा, दिवाण वाडा अशा बऱ्याच मानाच्या ठिकाणी जायचे . वाड्यात ढोल आले की मधल्या आंगणात त्यांचा खेळ रंगे . रंगा माळ्याच्या पथकामध्ये वाड्यातील अगदी मोहन आण्णापासून छोट्या मुलापर्यंत सगळे सामील व्हायचे . या ढोलाबरोबर डोंगऱ्याचा सुरेश आवर्जून येत असे आणि मग तो नाच जो रंगे त्याला तोड नसे . त्यावेळी काही टेपवर गाणी लावली जात नसत . ढोल , ताशा , लेझिम , झांज याचे आवाज निघत असत .
" आडीपांग डीप्पांग "
अशा ढोलाच्या तालावर गोलाकार उभे राहिलेले लोक डावा पाय जागेवर नाचवत , उजवा पाय एकदा मागे एकदा पुढे करत नाच सुरु होई . मधूनच उलटी सुलटी गिरकी घ्यायची , मधूनच जोर काढायचा असे करताना प्रत्येकाच्या हातात असलेल्या पितळी झांजेचा , लेझिमचा आवाज कमीकमी करत न्यायचा आणि पुन्हा एकदम आवाज वाढवत तालाची लय वाढवत न्यायचा आणि त्याच कैफेत रंगा माळ्याने पोटावर बांधलेल्या ढोलावर दांड्या बडवत उड्या मारत जो नाच केलेला असे त्याला तोड नसे . कमरेला बांधून हातात गमशे घेऊन तालात त्यांचा रंगलेला सोहळा पाहून क्षणभर गोकुळात कृष्ण सवंगड्याबरोबर दंग झाला की काय असे दृश्य दिसे . खेळून झालं की प्रत्येकाने बैठकीवर यायचे , सगळ्या काकांना सोनं द्यायचं , त्यांना सगळ्यांना पानसुपारी द्यायची , मानकऱ्याना नारळ द्यायचा आणि उभे राहून प्रत्येकाच्या गळाभेटी व्हायच्या . अगदी नयनरम्य सोहळा असे तो . गावातील प्रतिष्ठित लोक , सोनार मंडळी , डोंगरे दादा , अरविंद काका , आंता काका , बाळू काका , सगळी शिक्षक मंडळी येत असत . गप्पा गोष्टी होतात तोवर दुसरा ढोल वाजत गाजत वाड्याबाहेर आलेला असे . रात्री नऊ साडेनऊ वाजेपर्यंत हा उत्सव सुरु असायचा .
ढोलवाल्याला नारळ बाकी सगळ्यांना पान सुपारी सोनं दिलं जायचं . बरेचशे लोक आईला पण सोन देऊन नमस्कार करुन जायचे . शेवटी सगळे आंगणात बसून गप्पा मारायचे . त्यावेळी वाड्यात देशपांडे सर राहायचे त्यांची मुलं सख्याहरी , उन्नती आणि भारती ही पण सामील व्हायची . तर वाड्याबहेर एक नर्सबई राहत असत त्यांची मुलं पिंट्या , पाप्या आणि पिंकी ही वाड्यातलीच मेंबर असल्यासारखे वाटत असे . फक्कड काकांची बहिण ताई आत्या त्यांच सासर घेरडीच होत , त्यापण वाड्याशेजारी रहायच्या , पतकी वाड्यातील मंडळी असे सगळेजण आशावेळी वाड्यात येऊन बसत . आमच्या वाड्यात बरीच मुलं मुली असल्यामुळे डोंगऱ्याची मुलं-मुली , अवी-रवी , आमच्या वाड्यात यायची आम्ही त्यांच्याकडे जायचो रात्री बराच उशीरपर्यंत हे चालायचे .
लहानपणी आमच्या वाड्यात , गावात सण असे माणसांच्या गर्दीने आणि उत्साहाने बहरलेले असत त्याची ऊर्जा पुढे पंधरा पंधरा दिवस मनाला प्रफुल्लित ठेवत असे हे सगळं वैभव आम्हाला घेरडी गावाने दिले त्यामुळे आई-वडील यांच्याइतकेच त्या गावचे आमच्यावर ऋण आहे हे नक्की !!
सौ. सरिता अनिल कुलकर्णी
मो . 9421607248
saritakulkarni67@gmail.com
बार्शी
No comments:
Post a Comment