Thursday, May 20, 2021

आकांक्षा वाचन


कविता  वाचन

1) ऊन ऊन खिचडी साजुकसं तुप,

     वेगळं राहायचं भारीच सुख.


ऊन ऊन खिचडी साजुकसं तुप,

वेगळं राहायचं भारीच सुख.

एक नाही दोन नाही माणसं बारा,

घर कसलं मेलं ते बाजारच सारा.

सासुबाई- मामंजी,नणंदा नी दीर,

जावेच्या पोराची सदा पीर पीर.

पाहुणे रावळे सण नी वार,

रांधा वाढा जीव बेजार.

दहा मध्ये दिलं ही बाबांची चुक,

वेगळं राहायचं भारीच सुख.

सगळ्यांना वाटतं माझ घर प्रेमळ,

प्रेमळ प्रेमळ म्हटलं तरी सासू ती सासू,

अन् एवढासा जीव झाला तरी विंचु तो विंचु.

चिमुकली नणंदबाई चुगलीत हलकी,

वीतभर लाकडाला हातभर ढलपी.

बाबांची माया काय मामंजीना येते,

पाणी तापवलं म्हणुन साय का धरते?

बहीण अन् जाऊ यात अंतरच खुप,

वेगळ राहायचं भारीच सुख.

दोघांचा संसार सदा दिवाळी दसरा,

दोघात तिसरा म्हणजे डोळ्यात कचरा.

दोघांनी रहायचं, छान छान ल्यायचं,

गुलुगुलु बोलायचं नी दुर दुर फिरायच.

आठवड्याला सिनेमा, महिन्याला साडी,

फिटतील साऱ्या बाई आवडी निवडी.

दोघांचा असा स्वयंपाकच काय?

पापड मेतकुट अन् दह्याची साय ,

त्यावर लोणकढ साजुक तुप,

वेगळं राहायचं भारीच सुख.

रडले पडले नी अबोला धरला,

तेव्हा कुठे वेगळा संसार मांडला.

पण मेलं यांच काही कळतच नाही,

महिन्याचा पगार कसा पुरतच नाही.

साखर आहे तर चहा नाही,

तांदुळ आहेत तर गहु नाही.

ह्यांच्याही वागण्याची तऱ्हाच नवी,

घोटभर पाणि द्यायला पण बायकोच हवी

बाळ रडल तर ते खपायचं नाही,

मिनीटभर कसं त्याला घ्यायचही नाही.

स्वयपाक करायला मीच,

बाळ रडलं तरी घ्यायचं मीच.

भांडी घासायची मीच,

अन् ह्यांची मर्जी पण राखायची मीच.

जिवाच्या पलीकडे काम झाल खुप,

वेगळं रहायच कळायला लागल सुख.

सासुबाई रागवायच्या पण बऱ्याच होत्या,

सकाळचा स्वयंपाक निदान

करीत तरी होत्या

मामंजी दिवसभर बाळाला घ्यायचे,

बाजारहाट करायला भावजी जायचे.

कामात जावेची मदत व्हायची,

नणंद बिचारी ऊर नीपुर निस्तरायची.

आत्ता काय कुठल्या हौशी नी आवडी,

बारा महिन्याला एकच साडी.

थंडगार खिचडी, संपलय तुप,

अन् वेगळं व्हायचं कळलय सुख.


2) कविता वाचन 

       

मुक्तता आणि व्यथा


सावित्रीची लेक मी पडलेत मला प्रश्न अनेक

देईल का मग उत्तर त्याच तुमच्यापैकी कोणी एक II ध्रुII

 

रूप माझं मोलकरणीचं, कष्टकरी शेतकरणीचं

गणित सारखं आखत आसते उत्तरी मेळाचं

दिवसं-दिवस, महिनोंमहींने सरलं सार वर्ष

तरी का मग सुटत नाही गणित हे मेळाच

बेरीज कमी अन वजाच जास्त पारड का नाही समतोलाच

हसत हसत स्वागत करते येणाऱ्या प्रत्येक दिवसचं

मग आत्महत्या न दारू-जुगार हत्यार का या पुरुषांच II 1 II


मी बाई पडले पांढरपेशी कशाला करू कोणाची चौकशी

उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही

सणवार, ,व्रतवैकल्ये नेमानं मी करतच राहीन

मी केल ते तू पण कर म्हणत पुढच्या पिढीला रेटतच राहीन

सवाल येतो काय कमी आहे तुला या भरल्या संसारी

पण सन्मान माझा कुठे गेलाय ? मन आक्रांदतय उरी II 2 II


एकविसव्या शतकात म्हणे स्त्री स्वतंत्र झाली

करीयरच्या नावाखाली तिला कवाडं मुक्त केली

का एकटीच अडकतीय ती नोकरी-रिवाजाच्या जोखडात घट्ट 

का मग बांधलाय गळ्यात तिच्या कासरा बंधनाच घट्ट

आखीव परिघातच राहून तिने हुंदडायचाय म्हणे मुक्त

 नभी उंच भरारी घेत तिने का पाळायचेत रीतिरिवाज सक्त II 3 II


जन्माआधीच मुलीच आस्तित्व नाकारणारी जात

लेकीबाळीचं भक्ष्य करणारी लांडग्याची जात

हुंडाबळी, शोषणकर्ती नराधमांची जात

गल्लीपासून दिल्ली पर्यंत वय पण नं पाहणारी जात

मेलेल्यांच्या टाळूवरचे लोणी खाणारी जात

कधी करणार आहोत आपण या मानसिकतेचा नि:पात  II 4 II



8  मार्चच्या संघर्षदिनाला का आलय उत्सवाच रूप

उत्सव कसला म्हणताय त्याला आलय बैल पोळ्याच स्वरूप

एक दिवस करताय कौतुक घालून बेगडी झुल

चार दिवस सोहळ्याचे, झाले स्थिर की पुन्हा सारे गूल

सन्मान असावा माणसासारखा नको मला ही नुसती झुल

राहील का मग माझ्यासाठी प्रत्येक दिन जणू उमलत फुल II 5 II


सावित्रीची लेक मी पडलेत मला प्रश्न अनेक

देइल का मग उत्तर त्याच  तुमच्या पैकी कोणी एक

पण ----------पण ---------

सावित्रीचीच लेक मी उत्तर शोधीन नक्कीच नेक

लढेन व्यवस्थेशी बदलून टाकीन करून सर्वाना एक



3) वाचन - पत्र

निर्भयाचे समाजातील कुमारवयीन 

मुला-मुलींना उद्द्शून पत्र


आज जरी तुम्ही शाळेत जाणारे , असलात बालक

तरी उद्या होतालच की तुम्ही , सुजाण पालक

होय रे बाळांनो , चुक पिढ्यान पिढ्याची झालीय


लहानपणापासून खास अशी विचारांची बाळगुटी , द्यायची राहूनच गेली


आख्खं आयुष्य गेलं , ही विचारांची बाळगुटी जमवायला


आता मात्र वारसाहक्कानं वेळेतच ती तुमच्या स्वाधीन करतेय


जरा उशीरच झालाय , माहितीय मला 

मला हेही माहितीय  की , घालमेल चाललीय तुमची 

काय घडतंय आजूबाजूला 


आणि तुम्हांला कावरंबावरं होतांना पण पहातेय मी 


तुमची ही संभ्रमीत अवस्था होण्यास , खरंतर रुढीच आहे जबाबदार

म्हणूनच वेळेत सावध करतेय तुम्हांला 


तुमचं बाळ जन्माला आलं न ,

की लगेचच त्याला ही बाळगुटी द्या

म्हणजे सुदृढ विचारांच , गुटगूटीत संस्काराच ,

ते मुल मोठं केल्याचा 

आभिमान वाटेल तुला


त्याला समजायला लागल्यापासूनच सांगत रहा


तू एक मनुष्य जातीच्या वेलीवर उमललेलं फूल आहेस म्हणून , 

स्त्री आणि पुरुष ,  ही तर निसर्गाची देण आहे म्हणावं 

निसर्गाचा समतोल राखाण्यासाठी ,  विज्ञानयुगातसुद्धा 

त्याची उत्पत्ती , निसर्गच करतो म्हणावं 


तू त्याला धक्कासुद्धा लावू नकोस

असं ठसवंच त्याच्या मनावर


खेळायची आणि हसायची जेवढी मोकळीक देशील

तेवढंच मनसोक्त रडू देत जा त्याला

मुलींसारख मुळूमुळू रडू नकोस , 

असं म्हणत विषमतेच्या बिजाची पेरणी करायची चूक नको करुस


फुकटच्या पुरुषी विषवल्ली फोफावायला , खतपाणी घालायची पण चूक करायचं कटाक्षांन टाळ


एकएक करत , मुलींभोवती बंधनाचा गोफ विणायची अजिबात चूक करु नकोस ,

होऊदे मुक्तपणे बाळं तुझी मोठी


तुझ्या बाळाला तू , स्त्रीकडे आदराने बघण्याच्या दृष्टीकोनाच्या गुटीचा घुटका देशील ना 

तेव्हा , मोकळा श्वास घेतल्याचा भास होईल तुला


सध्याच्या बरबटलेल्या मानसिकतेतून , ओरबाडणाऱ्याच्या तावडीतून , येणाऱ्या पिढीला मुक्त केल्याचा विश्वास वाटेल तुला 


त्याला सांग , तुला आई आहे , बहिण आहे , आजूबाजूच्या मुलीबाळींचा सन्मान राख म्हणावं .


तुझं बाळ कोणीही असूदे , मुलगा किंवा मुलगी

प्रेम , माया , शिक्षण , संस्कार 

वाटण्यासाठी दोघांसाठी एकच माप ठेव म्हणावं 


आगरकरांच्या म्हणण्याप्रमाणे होऊदे शिक्षणाचे लोकशाहीकरण

आणि होऊदे

सावित्रीच्या पाठी उभे रहाणारे जोतिबा घरोघरी तयार


अंधानुकरणाच्या खोट्या खोट्या दुनियेत फार रमू नकोस म्हणावं

आयुष्यातील महत्त्वाचा वेळ तिथे वायाच जातो म्हणून समजून सांग त्याला


आपल्या देशात मोठमोठे साहित्यीक , समाजसुधारक , क्रांतिकारक , विचारवंत होऊन गेलेत , त्यांची ओळख करुन द्यायला त्यांना वाचायला भाग पाड त्

 


4) नाटक - ती फुलराणी मंगल साळुंखेचे स्वगत

    तुला शिकवीन चांगलाच धडा


मंजुळा : (रागानं ताडकन उठते. ज्या दिशेला ते दोघे गेले तिकडं पाहून )
असं काय मास्तरसाहेब ? गधडी काय? नालायक? हरामजादी?
थांब 
थांब तुला शिकवीन चांगलाच धडा, तुज्या पापाचा भरलाय घडा!
मोटा समजतो सोताला मास्तर, तुजं गटारात घाल जा शास्तर.
तुजं मसणात गेलंय ग्यान, तुज्या त्वाँडात घालीन शान.
तुजा  क, तुजा ख, तुजा ग, तुजा घ, मारे पैजंचा घेतोय इडा !
तुला शिकवीन चांगलाच धडा!
तुजा उतरीन समदा माज, तवा येशील गुंडाळून लाज, 
माजी चाटत येशील बुटं, मी म्हनन, काय आज इकडं कुठं?
हात पसरून मागशील भीक, मी म्हनन जरा शुद्ध बोलायला शीक.
मग उडवून हात, सांगीन धरायला वाट, चाल भाईर मुकाट
उगं वळवळ करतोय किडा! तुला शिकवीन चांगलाच धडा!
तुला दाखवतेच बघ चोरा, तू बघशील माझा तोरा,
ओ हो हो , आ हा हा, ओ हो हो , आ हा हा 
हाऊ स्वीट, हाऊ स्वीट,
लव्हली, चार्मिंग, ब्युटी हाय, समदे धरत्याल मंजूचे पाय. 
कुत्र्यावानी घोळवीत गोंडा, तरन्या पोरांचा दारात लोंढा 
हाय मंजू, हाय दिलीप....
हाय मंजू, हाय फिलीप...
मंजुबेन केम छो, हाऊ डू यु डू
कम कम, गो हँगिंग गार्डन, आय बेग युवर पार्डन?
कुनी आनतील सिलीकची साडी, कुनी देतील मोत्याची कुडी,
कुनी घालतील फुलांचा सडा! तुला शिकवीन चांगलाच धडा!
मग ? कुठूनसा येईल राजकुमार, सफेद घोड्यावर होऊन स्वार,
नदरेला जेव्हा नदर भिडंल, झटक्यात माज्या पायाच पडंल  
म्हनल, रानी, तुज्यावर झालो फिदा, क्या खुबसुरती कैसी अदा.
माग, माग, काय हवं ते माग, प्यारी माज्यावर धरू नकोस राग.
मी मात्तर गावठीच बोलीन, मणाची गाठ हळूच खोलीन
गालावर चढंल लाजेची लाली, नदर जाईल अलगत खाली 
म्हनेन त्याला, ह्ये काय असं, लोकांत उगंच होईल हसं
कुम्पणापातर सरड्याची धाव, टिटवीनं धरावी का दर्याची हाव?
हि-याच्या कंठ्याला सुतळीचा तोडा? गटाराच्या पान्याला सोन्याचा घडा ? 
मग राजाच येईल रथात बसून, म्हनंल, कसं बी कर पन हो माझी सून  
दरबारी धरत्याल मुठीत नाक, म्हनत्याल, राजाचा मान तरी राख 
तोरणं बांधा न् रांगोळ्या काढा, त्या अशोक्याला शिकवीन चांगलाच धडा  !
मग मंजू म्हनल, म्हाराज ऐका, त्या अशोक मास्तरला बेड्याच ठोका. 
शिशाचा रस त्याच्या कानांत वता, आन लखलख सुरीनं गर्दन छाटा 
मास्तरला घोड्याच्या शेपटाला जोडा, आन पाटलून काढून चाबकानं फोडा.
म्हाराज म्हनत्याल, भले हुशार, धाडून द्या रे घोडंस्वार
हा हा हा हा 
जावा राजाचं शिपाई धरत्याल तुला, म्हनशील मंजे सोडीव मला. 
धरशील पाय आन लोळ्शील कसा, रडत -हाशील ढसाढसा 
तुझा ए, तुझा ओ, तुझा न तुझा ण, तुज्या श्या, तुजं वसकन आंगाव येणं
भोग आता गप तुज्या कर्माची फळं, तुज्या चुरूचुरू जिभेला कायमचं टाळं
म्हाराज म्हनत्याल, ह्याची गर्दन तोडा, मी म्हनन जाऊद्या, गरिबाला सोडा
तू   म्हनशील, मंजुदेवी तुला आलो मी शरन
मी म्हनन शरन आल्यावं देऊ नये मरन.  



5) नाटक - ती फुलराणी मंगल साळुंखेचे गाणे

     मला फोरिस्टाच्या शापामधल्या बाईगत.....


हे मला फोरीस्टाच्या शापामधल्या बाईगत हुयाचं हाय

( 3 वेळा )


ये काचच्या म्हागं हुब ऱ्हाऊनशेनी

फूलं इकायची हाये


मला फोरीस्टाच्या शापामधल्या 

बाईगत हुयाचं है

( 2 वेळा )


आन आमचं हे फाटक्या पायताणावानी बोलनं 

मंग फोरीस्टाच्या शापात चाकरी कशी भेटाची


तितल्या पोरी कशा 

खीसपीस खीसपीस खीसपीस 

मंजूळ बोलत्यात


चकपक चकपक चकपक

चकंपकं दिसत्यात


या फोरीस्टाच्या शापामधल्या 

बाईगत हुयाच है


काल राती ह्यो बाबा म्हनाला

पैकं दी म्या शिकिवतो


आन आज म्या पैकं घेऊन 

टॕक्शीत बसूनशान आले 


आन अंगावर पाल चढल्यागत झटकतोय


सर मला फोरिस्टाच्या शापामधल्या

बाईगत हुयाचं हाय  

( 3 वेळा )


काचच्या म्हागं हुब ऱ्हाऊनशेनी फूलं ईकायची हाये


मला फोरिस्टाच्या शापामधल्या बाईगात हुयाचं हाय

( 3 वेळा )



6 ) नवरात्रीचे नऊ रंग



1 ) अनाथांची माय 

      सिंधुताई सपकाळ



बेटा निराशेतून आशेकडे जावूयात न आपण ,
आपल्याला पाहिजे तो रस्ता आपणच काढायचा न ? आपल्यापासून दुसऱ्याचं भल व्हावं , आपल्यालाही जगता यावं हा माझा मधला रस्ता असतो !
बाकी इकडल तिकडल मला काही कळत नाही , अडाणी आहे रे मी .
मुक्काम पोस्ट फिरस्ती , जहा खाना वहा बस्ती !
जिथे भाषण आसत तिथे राशन मिळतं बाबा
मग मी जाते 
माझ्या भाषणामुळे लेकर वाढले , जबाबदाऱ्या वाढल्या .
भाषण झालं की पदर पसरून मागते 
देगा उसका भला ना देगा उसका भी भला 
भाषणाचे विषय माझे जगण्याचे असतात जे जगते ते फेकते , शिक्षण नाही आडाणी माई !
मायेचा रस्ता एवढा सोपा नसतो बेटा
फुलांच्या पायघड्यावरून चालताना काटे बोचले तर सहन करायला शिका . कारण काटयाना फक्त बोचण माहीत आसत वेदना कळत नसतात .
म्हणून कटयांशी दोस्ती करा.
पाय इतके मजबूत करा की काटे तुम्हाला सांगतील आईये वेलकम , हम चुबता है तुम चलना सिखो . 
काट्यातून चालणार फार मजबूत होत असतो बेटा .
फुलांसह काटे स्वीकारा .



2 ) पहिली महिला पंतप्रधान
      श्रीमती इंदिरा गांधी

मैं आज यहॉं हूं , कल शायद यहॉं ना रहूं ,

मुझे चिंता नही है , के मै जीवित रहू या नहीं रहू ,

मेरी लंबी उमर रही है ,

और मुझे गौरव किसी चीज पे है ??

तो इसी पे है , मेरा सारा जीवन सेवा मे चला गया , 

केवल इसी चीज पे गौरव है .

और जब तक मुझमे सांस है , तब तक सेवाही मील जये , 

और जब मेरी जान जायेगी , तो मैं कह सकती हूं , एक एक खून का कतरा , जितना मेरा है , एक एक बूँद एक भारत को जीवित करेगा ,

भारत को मजबुती देगा , और मेरी आशा है , नौजवान हो , या महिला हो ये सब इसको आप सोचे



Wednesday, May 5, 2021

कोंदण भाग 6

प्रकरण 26 वे

माझं पहिलं बाळंतपण

05/05/2021

          पहिली दिवाळी साजरी करुन आम्ही  किर्लोस्करवाडीहून आधी परांड्यात व मग बार्शीला आलो . आम्ही दिवाळीत स्कूटर घेतली होती त्याकाळात गाडी असणं हे फार आप्रुप वाटायचं . आम्ही बार्शीत रहात होतो पण प्रत्येक शनिवारी परांड्याला जायचं व सोमवारी परत यायचं तसेच केव्हाही सुट्टी असेल तेव्हा , प्रत्येक सणाला जायचं व बँक असलेल्या दिवशी सकाळी यायचं हा अलिखित नियम होता थोडक्यात बँक नसली की आमचा मुक्काम परांड्यात असे . माझे डोहाळे खूपच त्रासदायक होते मला पाणीसुद्धा पचत नव्हतं .  फक्त आईस्क्रीम तेवढं चालायचं त्यामुळे रोज दुपारच्या सुट्टीत हे आईस्क्रीम घेऊन घरी यायचे व जाताना मला बँकेत सोडून जायचे . गमंत म्हणजे मला परांड्यात गेलं की काही होत नसे तिथे सगळं पचायचं व मी तिथे काम पण करायचे . तब्ब्येत तशी बरीच अशक्त झाली होती . तसं माझ्यावर बराचसा परिणाम हा  परांड्यातील वातावरणाचा झाला होता . एकदा तर मी यांना गंमतीने  म्हणाले 

" मला तर आपलं लग्न म्हणजे घरच्यांचा विरोध असतांना तुम्ही हट्टानं केलेलं लव्ह मॕरेज आहे असं वाटतंय ."

मी असे काही बोलले की यांना खूप अपराध्यासारखं वाटायचं .

" तसं काही नाही , तुला उगाच तसं वाटतं , घरच्यांना कमी बोलायला लागतं जरासं ."

असं म्हणत त्यांची सारवासारवी चालायची . खरंतर सासुबाई नणंद दोघी किंवा शेजारी , मामी यांच्याशी त्यांच्या भरपूर गप्पा चालायच्या माझ्याशी फक्त बोलत नसत . मग मी पण तो विषय सोडून देऊन जसं जमेल तसं अॕडजस्ट करायचं ठरवलं . एकमेकांना त्रास होणार नाही हे पहायचं व पुढे चालायचं असे अगदी ठरवूनच टाकले . माझा स्वभाव एकदम मोकळा , हौशी , बडबड्या व सतत हसरा असल्याने मला हे सगळं जमवायला फार कठीण गेलं . कोणताही सण , समारंभ असला की आम्ही परांड्यात असायचो पण त्यात कौतुक , उत्साह , खेळीमेळीचं वातावरण असं अजिबातच नसायचे . उलट वातावरण तंग असायचं कडक सोवळ ओवळ आणि कडक उपास याचं प्रमाण जास्तच होतं त्यामुळे हे सगळ पचनी पडायला मला त्रासदायक गेलं . माझ्याशी सुनील भाऊजी तेवढे गप्पा मारायचे , माझ्याशी कोणी बोलत नाही हे त्यांच्या पण लक्षात यायचं . त्यामुळे मला ह्यांच्यानंतर घरात भाऊजींचा आधार वाटायचा . हसतखेळत बोलणं काय ते फक्त त्यांच्याशी व्हायचं . ते काहीही आणलं की मला व नणंदेला अगदी एकसारखं आणायचे . 

          आम्ही जेव्हा दिवाळीला किर्लोस्करवाडीला गेलो तेव्हा चारपाच महिन्यांचा हा घरचा अनुभव माझ्यासाठी खूपच त्रासदायक झाला होता . सगळ्यांना ते समजत होतं बऱ्याच गप्पा झाल्या . तेव्हा मग आई-काका व तायडी यांनी मला अगदी समोर बसवून सांगितले होते .

" हे बघ हा सगळा कोरडा त्रास आहे .परांडकर स्वभावाने एक नंबर आहेत . तुला काही त्रास होणार नाही याची ते पुरेपूर दक्षता घेतात त्यांना परांड्यातील जबाबदारी आहे ती झटकून टाकता येणार नाही आता तू त्यांच्याबरोबर उभं राहिलं पाहिजेस त्यांची आडकित्त्यात सुपारी करायची नाही प्रतिभाचं लग्न झालं की वातावरण बदलून जाईल ही खात्री बाळग ."

त्यानंतर मी पण मग विचार करु लागले . सगळं सोडून द्यायला शिकले त्याचा योग्य परिणाम आमच्या दोघांवर झाला . सासू , सासरे , नणंद आणि नवरा अशा चार भूमिका ते एकटेच बजावत असत . आपल्या घरच्यांना कोणी नावं ठेऊ नयेत हा एकच त्यांचा उद्देश असायचा . पण हे सगळं करत असतांना त्यांची दमछाक व्हायची , खूपच त्रास व्हायचा पर्यायाने मला पण त्याच्या झळा बसायच्या . 

       आम्ही तीन महिने रोज परांडा-बार्शी जाऊनयेऊन केलं . पावसाळ्यात पाणी यायचं म्हणून बार्शीत घर केलं तर आमच्या बरोबरसुद्धा कोणी आलं नव्हतं उलट यांच्याशी पण बोलणं बंद केलं . पुढे दिवस गेल्यावरही कधी कोणी आलं नाही आम्हीच परांड्याला जायचो . तेव्हा आम्ही देशपांडे वाड्यात रहात होतो . आमचे घरमालक म्हणजे मम्मी व बाबा मला मुलगी मानत असत . मम्मी मात्र खूप कौतुक करायच्या  हवं नको पहायच्या . त्यांच्या चार दिरांची घरं शेजारी होती त्यांच्याकडे आमची बऱ्यापैकी उठबस असायची . त्याचदरम्यान आई दोनदा बार्शीला आली होती व दोन्हीही वेळेस ती आली की माझी तब्ब्येत जास्तच बिघडली होती व दोन्हीही वेळेस मला अॕडमीट करावे लागले होते त्यामुळे तिला जरा काळजी वाटायची . पण मम्मी व त्यांची जाऊ वर्षा वहिनीनी आईला खूप धीर दिला होता व सांगितले की

" तुम्ही सरिताची अजिबात काळजी करु नका काही झालं तर आम्ही आहोत पहायला ".

पद्माकर काकांनी पण आई-काकांना काळजी करु नका कमीजास्त पहायला आम्ही आहोत असे सांगितले  मग जरा आई बिनधास्तपणे घेरडीला गेली . आमच्या घरी मुलगा मुलगी समान धरलं जायचं पण मुलींपैकी कोणालाही दिवस गेले की आसपास , पाहुण्या रावळ्यात सगळ्यांचे कान अगदी टवकारलेले असायचे . आता हीला काय होणार याविषयी चर्चा असायची . आईपण मग तेवढ्या कालावधीत अस्वस्थ असायची . मग डोहाळे कसे आहेत यावरुन तर्क बांधले जायचे वाड्यात पण सगळ्या काकू , वहिनी चर्चा करायच्या . आईला माझी लक्षणं वेगळीच वाटायची त्यामुळे मला घेरडीला नेणं जरा धोकादायक वाटायचं . मग आई-काकांंनी चर्चा केली व ठरवलं आणि आम्हांला पण  आईने सांगितले

" घेरडीत काही दवाखान्याची सोय नाही , राणीच्या वेळी फजिती झाली होती आता परिक्षा नको पहायला . शरुला  जरा जास्तच त्रास होतोय तिचं  नाव बार्शीतल्या दवाखान्यात  घालू . गणपती झाल्यावरची  तिला तारीख दिलीय त्यावेळी  महालक्ष्म्या झाल्या की लगेच मी बार्शीला येईन व नंतर बाळंतीण झाली की तिला स्पेशल गाडी करुन घेरडीला नेईन . तोवर रजेचं पण कसंकसं आहे ते तुम्ही  बघा काय असेल ते व दवाखान्यात असल्याने बिनधास्त असेल काळजीचं कारण पण रहाणार नाही ."

       आम्ही पण मग त्याप्रमाणे करायचं ठरवलं . पुढे सातव्या महिन्यात आईने घेरडीला डोहाळजेवणाचा मोठ्ठा कार्यक्रम ठेवला होता . परांड्यात  डोहाळजेवण करण्याची आमच्याकडे पद्धत नाही म्हणून आईने सर्वांना घेरडीला यायचे आमंत्रण दिले होते पण घेरडीला पण कोणी आले नाही मग आम्ही दोघेच घेरडीला गेलो होतो . काकांनी पंढरपूरला जाऊन हार , गजरे , फुलं आणली होती . सोप्यात फुलांची सजावट केली होती व गावातील सगळ्या बायका जमल्या होत्या . आईने सगळ्यांसाठी फराळाचं केलेलं होतं . कोणताही कार्यक्रम असो घेरडीत बायका जमल्या की उत्साहाला अगदी उधाण येत असे . उखाणे व गाण्यांची अगदी चढाओढ लागली होती . उषा वहिनी व मावशी सुरेल आवाजात डोहाळे म्हणत होत्या . ह्यांना या सगळ्याचं भारी आप्रुप वाटत असे . ते म्हणत असत

"  खेडेगाव आहे पण घेरडीत असं निवांत व समाधानी वाटतं वातावरण एकदम आनंदी व चैतन्यमय असतं ." 

परांड्यात अजून लग्नाचा जम बसला नव्हता त्यामुळे दिवसेंदिवस ताण वाढतच होता . दोन्हीकडील वातावरणात असलेला फरक बघून यांना फार कसंतरी व्हायचं काय केलं तर सगळं एकदम सुरळीत होईल याचा विचार करुन करुन त्यांना दमायला व्हायचं . 

           पुन्हा आम्ही बार्शीला आलो मग मला प्रवासाचा त्रास व्हायला लागला म्हणून रविवारी हे एकटे परांड्याला जायचे व मी देशपांडे वाड्यात ! आता माझे दिवस भरत आले होते तरी माझ्या उलट्या बंद झाल्या नव्हत्या . पंधरा दिवस आधी आराम असावा म्हणून मी 20 आॕगस्ट सोमवारपासून रजा घेतली होती . 18 आॕगस्टला रात्री 10 वाजता आमचे घरमालक बाबांच्या आईचे सोलापूरला अचानकपणे निधन झाल्याचे समजले व सगळेजण रात्री 11 वाजता सोलापूरला गेले . आख्ख्या वाड्यात आम्ही दोघेजणच होतो . दुसरे दिवशी रविवार होता पण वाड्यात कोणी नाही म्हणून हे परांड्याला गेले नाही . मला अस्वस्थ वाटत होतं म्हणून आम्ही डॉ.यादवच्या दवाखान्यात जाऊन आलो तर रविवार सुट्टीमुळे डाॕक्टर गावाला गेल्या होत्या त्या भेटल्याच नाहीत . फार काही होत नसेल तर उद्या या असे आम्हांला दवाखान्यातून सांगितले मग आम्ही घरी आलो मी स्वयंपाक केला व जेवण करुन आराम केला पाच वाजता मात्र मला पोटातच दुखायला लागलं . काहीच समजेना म्हणून  हे पद्माकर काकांच्या घरी जाऊन काकूंना घेऊन आले . त्या म्हणाल्या 

" जरी दिलेली तारीख लांब असली तरी आपण आता यादव डाॕक्टरकडे जाऊ त्या नसतील तर आपण दुसरीकडे घेऊन जाऊ पण आता घरी नको थांबायला ".

मग आम्ही रिक्षाने दवाखान्यात गेलो अजून यादव मॕडम आल्या नव्हत्या म्हणून रिक्षा तशीच माढेकर हाॕस्पिटलला नेली तर तिथे मला अॕडमीट करायला सांगितले . हे मात्र पुरते गोंधळून गेले होते करावे यांना समजेना तशात त्यांनी डाॕक्टरना विचारलं

" दिलेली तारिख लांब आहे मग कसं अॕडमीट करायचं एकदोन दिवसात तिच्या आईला बोलावतो तोवर चालेल का "

मग डाॕक्टरनी हसूनच सांगितले कोणी असो नसो ती दवाखान्यात आहे आणि आज डिलीव्हरी होणार शक्य असेल कोणाला बोलावणं तर बोलवा नाहीतर तुम्ही व आम्ही आहोतच ".

       तोवर संध्याकाळचे सात वाजायला आले मग यांनी बसस्टाॕपवर जाऊन परांड्याला घरी मला अॕडमीट केल्याचा  निरोप दिला . शेवट गाडीने दहा वाजता काका-काकी आमच्या लग्नानंतर पहिल्यांदा बार्शीला आले तोवर पद्माकर काका पण आले व 19 आॕगस्टला रात्री आकरा वाजता मी सुखरूपपणे मुलाला जन्म पण दिला आणि माझी मॕटर्निटी लीव्ह 20 आॕगस्टपासून सुरु झाली !

    डाॕक्टरनी दिलेल्या तारखेच्या जवळजवळ  पंधरा दिवस आधी बाळाचा जन्म झाला होता . बाळ  एकदम गुटगुटीत साडेनऊ पाऊंडाचे होते . सगळी फजिती झाली होती पण आनंदाला उधाण आलं होतं . आता घेरडीला निरोप जाणे गरजेचे होते . पद्माकर काका ह्यांना म्हणाले 

" परांडकर मी रात्रीच्याच गाडीने निघतो म्हणजे सकाळपर्यंत घेरडीला पोहोचतो . जरा आवराआवारी करुन एकदोन दिवसांत भाऊसाहेबांना यायला सांगतो तोवर आमच्या घरुन डबा देतो ."

तोवर पुन्हा काका-काकींना बार्शीतलं काहीच माहित नाही म्हणून त्यांना घरी सोडणं त्यांची  जेवणाची व्यवस्था सगळं करुन परत दवाखाना अशी यांची पळापळ सुरु होती .

        पद्माकर काकांना रात्री दोन वाजताच्या गाडीत यांनी बसवून दिलं . अशी संध्याकाळी पाच वाजल्यापासून यांची एकट्याचीच स्कूटरवरुन प्रत्येकाला आणायला व सोडायला धावपळ चालू होती . पण बाळ बाळंतीण एकदम मस्त होते त्यामुळे आनंदात सगळी कामं होत राहिली . 

        तेव्हा फोन नव्हते काही समजायला मार्ग नव्हता त्यामुळे यांनी बसमधून परांड्याला घरी निरोप दिला होता तर सुनिल भाऊजींना निरोप मिळताच त्यांनी परांड्यात  दोन किलो पेढे वाटले व दुपारी दोन वाजता दवाखान्यात हजर झाले . त्यांना पण खूप आनंद झाला होता त्यादिवशी श्रावणपोळा होता काकी त्यांना पूजेचं विचारु लागल्या तर ते म्हणाले 

" मला वाटलच होतं इथ काहीतरी गडबड असणार म्हणून मी सकाळीच सगळं केलय , पूजा नैवेद्य करुन आलोय  . आता तू परांड्यातली काही काळजी करु नकोस वहिनी घेरडीला जाईपर्यंत तू इथच थांब काकांना परांड्याला घेऊन जातो तू रहा .

        इकडे पद्माकर काका सकाळी सात वाजताच घेरडीत पोहोचले . स्टँडवर त्यांना आंता काका भेटले . आंता काका तंबाखू चोळत सांगोल्याला जाण्यासाठी बसची वाट पहात उभे होते . पद्माकर काकांना पहाताच त्यांनी येण्याचे प्रयोजन विचारले तेव्हा पद्माकर काकांनी सांगितले 

" भाऊकाकांना नातू झाल्याचा निरोप घेऊन आलोय ".

तेव्हा आंता काकांनी आनंदाने दोन्ही हात जोडून नमस्कार करत कपाळाला लावला तर हे करतांना हातात तंबाखू असल्याचेसुद्धा त्यांच्या लक्षात राहिले नाही सगळी तंबाखू अंगावर सांडली . वाड्याच्या मोठ्या दरवाजातच मोहन आण्णा , उषा वहिनी , फक्कड काका , प्रभा काकू सगळ्यांना बातमी समजली सगळे अगदी आनंदात त्यांच्या बरोबर घराकडे आले . काका आंघोळ करत होते तर आई मागच्या दारात होती . सगळ्यांचा हसण्याचा आवाज व बरोबर पद्माकर काका दिसले तर आई-काकांना आंदाज आलाच . पद्माकर काका आई-काकांंना म्हणाले 

" काय राव नातू तुम्हांला झालाय आणि आख्ख्या घेरडीला आनंद झालाय . बातमी ऐकली की लोकं खूष होतायत . कसं काय असं हो ? त्या आंतामास्तरंना तर तंबाखू हातात असलेलं सुद्धा लक्षात राहिलं नाही ."

यावर सगळे हसू लागले 

" शरुला पहिला मुलगा झाला भाऊकाकांना नातू झाला सगळ्यांना आनंद झालाय "

असे सगळे म्हणू लागले मग  चहापाणी झाल्यावर पद्माकर काकांनी सगळा वृत्तांत सांगितला आई-काकांंच्या आनंदाला अगदी भरतं आलं . पद्माकर काका निघू का म्हणाले तसं आई म्हणाली 

"दोन दिवसांनी नाही फक्त दोन  तास थांबा जेवणं करुन दहाच्या गाडीनं आपण सगळेच जाऊ . "

त्यादिवशी श्रावणी पोळा होता दोनतीन दिवसात गणपती बसणार होते . उषा वहिनीला मदतीला घेऊन आईने सगळी तयारी केली व पद्माकर काकांच्याबरोबर आई-काका दुपारीच बार्शीत आले व चार वाजता दवाखान्यात हजर झाले . बाळाला पाहून तर आई-काका , संजू एकदम खूश झाले . ह्यांची एकट्याची पळापळ झालेली ऐकून आई त्यांना म्हणाली 

" फार मोठ्ठ काम केलंय तुम्ही आता जरा निवांत बसा . सगळ बघतो आम्ही ".

खरंच तसं झालं होतं पण . तायडी , मायडी , गोंदा मामा या तिघांनाही काकांनी लगेचच पत्र पाठवून ही बातमी कळवली . मग दोन दिवस राहून उद्या गणपती बसणार म्हणलं की काका संजूला घेऊन घेरडीला गेले व गणेश चतुर्थीला आम्ही स्पेशल गाडीने घेरडीला जाणार असे ठरले . काकांनी पुढे जाऊन बाळंतीणीचं बाजलं , पडदे टाकून सामान सगळ जागेवर ठेऊन आमच्या स्वागताची अगदी जय्यत तयारी करुन ठेवली ! गणापती बसवून आमची वाट पहात बसले . गणेशचतुर्थीला सकाळी लवकरच आम्ही बार्शीहून निघालो बरोबर हे व पद्माकर काका आले होते . घेरडीत सगळ्खया काकू , वहिनी  काका ,संजू सगळे वाटच पहात होते . खरंतर लक्ष्म्याचा सण झाल्यावर बाळंतपणासाठी आई बार्शीला येणार होती तर लक्ष्म्याच्या सणाला आई मला व बाळाला घेऊन घेरडीला गेली ! आणि लक्ष्म्याला घरी नातू आला म्हणून तिने लक्ष्म्या येण्याच्या दिवशी हौसेनी गोडाचा नैवेद्य म्हणून बेसनाचे लाडू केले व आई  जाईपर्यंत शेवटपर्यंत तिने लक्ष्म्या येतात त्यादिवशी बेसनलाडू करण्याची प्रथा ठेवली !

    घरात बाळ-बाळंतीण असल्यामुळे आईला भरपूर काम होतं तरीही भागाबाई , निलाबाई आणि बाळ-बाळंतीणीसाठी खास शांता परटीणीला हाताशी धरुन आईने नियोजन करत त्यावर्षीचा गौरी-गणापतीचा सण घेरडीत अगदी धुमधडाक्यात केला . आईच्या उत्साहाला उधाण आलं होतं . गुटगुटीत नातवाला कुठे ठेऊ नी कुठे नको असं तिला झालेलं . बाळाची तब्ब्येत छान राहिली पाहिजे यासाठी माझ्या पथ्यपाण्याचं चाललेलं तिचं नियोजन खूप भारी होतं . बार्शीत किराणा छान मिळतो म्हणत बार्शीतून जातानाच डिंक लाडू , वेगवेगळ्या खिरी यासाठी लागणारा वेचक किराणा तिने घ्यायला लावला होता तर घेरडीत गेल्यावर काका आईला सांगायचे

" संपलं तर संपलं कच्चून कर तिला खायला पुन्हा जतेला जाऊन येईन पाहिजे तर ".

असं माझ्यासाठी व बाळासाठी काय करु नी काय नको असं आई-काकांना झालेलं . तायडी मायडीची लगेच पत्राला उत्तर आली होती . सगळ्यांना आता बाळाला पहायची ओढ लागली होती . हे घेरडीहून बार्शीला यायला निघाले तेव्हा मात्र त्यांचा केविलवाणा चेहरा पाहून काकांनी ह्यांना सांगितले 

" तुम्ही आपलं शनिवारी बँक सुटली की घेरडीला येत जावा , आठवड्याला नाही जमलं तर पंधरा दिवसाला येत जावा ". 

मग हे त्या दोनअडीच महिन्यात पंधरा दिवसाला घेरडीला यायचे . पंधरा दिवसात दोन पत्र त्यांनी मला व मी त्यांना उत्तराची वाट न पहाता पाठवायची असं आमचं ठरलं होतं त्याप्रमाणे आम्ही जवळजवळ वीसवीस पत्रे एकमेकांना पाठविली ! आता बारसं कधी करायचं हा मुख्य चर्चेचा विषय होता कारण बारशाला सगळे येणार आणि तोंडावर दिवाळी आलेली तर बाळाची नक्षत्रावर शांत पण करावी लागणार होती . 

       पहिल्यांदा पंधरा दिवसांनी हे जेव्हा घेरडीला आले तेव्हा मग दिवाळीत वसुबारशाला आधी शांत व बारसं करायचं ठरलं . तशी सगळ्यांना पत्र पाठविली . त्याप्रमाणे तायडी मायडी दोन्ही भाऊजी बारशाला आणि दिवाळीला घेरडीला यायचे ठरले व तयारीला सुरवात झाली !!




प्रकरण 27 वे

आई - काकांची मनीषा पूर्ण

25/05/2021




       माझ्या बाळंतपणात  जवळजवळ सव्वा महिना होईपर्यंत आई रोज वेगवेगळ्या खिरी आणि पथ्यांचे प्रकार अगदी हिरिरीने करत रहायची तिची ती नेहमीचीच पद्धत होती . बाळंतीणीची काळजी घेण्याची तिची खास शैली होती . हेळसांड केलेली तिला अजिबात चालत नसे मग पथ्यात दूध , तूप , खसखस , डिंक , खारीक , खोबरं , बदाम , सुका मेवा , मेथ्या , पालेभाज्या  शेकशेगडी हे अगदी लक्षपुर्वक ती करायची व सगळं झालंच पाहिजे हा तिचा अट्टाहास असे . मला हे सगळे पदार्थ खायला खूप आवडायचे व पचायचे पण मग ती म्हणायची 

" नऊ महिने तुला खाण काही अंगी लागलच नाही , विश्रांती काय ती आत्ताच दोन महिने मिळणार . तुझ्या मागं डबल म्हणलं तर तिबल जबाबदारी आहे . एक तुझा स्वतःचा संसार , दुसरं नोकरी व आता बाळ आणि तिसरं परांड्याकडची जबाबदारी या कशातूनच तुला काही अंग काढून घेता येणार नाही . करावं तर लागणारच मग रडत करण्यापेक्षा हसतमुखानं  केलं की आपल्याला सुख व समाधान जास्त मिळतं त्यासाठी आपली तब्बेत आपणच जपावी म्हणजे सगळं सोपं जातं . म्हणून आत्ता मी करतेच आहे आणि तू पण बिनबोभाट खातेस हे मला फार बरं वाटतंय . बेबीनं बाळंतपणात खायला फार नकुसकंगोरा केलाय मला त्याचा भारी राग यायचा . पण राणी मात्र बिनबोभाट खात होती आणि तू तर आवडीनं खातेस मग मला पण करायला हुरुप येतो बघ !" 

       आईला स्वतःच्या सहा व तीन मुलींच्या प्रत्येकी दोन अशा एकूण बारा बाळंतपणाचा अगदी बारीकसारीक अनुभव होता . शिवाय वाड्यात , शेजारी असा अनेक बाळंतपणाचा तिला अनुभव होता . प्रत्येक वेळी जिवाचा आटापीटा करत अगदी उत्साहाने ती बाळंतपण करायची . कशातही कमतरता तिला मान्य नसे . आता माझ्यावेळच्या आईच्या भावना तर आणखीनच वेगळ्या होत्या . नाही म्हणलं तरी मुलगा झाल्याने आई-काका दोघेही मनोमन खूष होते . आई नेहमी म्हणायची 

" आमच्याकडे जरा मुलांची वणवा आहे वाणीकिणीचं हा दुसरा मुलगा झालाय घरात , लहान बाळ असतांना मुलं जरा  नाजूक असतात मला मुलांच्या तब्बेतीचा फारसा अनुभव नाही त्यामुळे जरा भिती वाटते ".

मग काय करु आणि काय नको अशी तिची मानसिकता झाली होती . बाळाची तब्बेत थोडी जरी नरम गरम झाली की आई लगेच  हवालदील व्हायची .

     तीन आठवड्यानंतर बाळाला बीसीजी लस द्यायला आई घेऊन गेली व बरोबर काका पण गेले तर दवाखान्यात नर्सबाई काकांना म्हणाल्या 

" आरे व्वा आज दस्तूरखुद्द काका तुम्ही आलात नातवा बरोबर ! नवलच म्हणावं लागेल . आता बाळाचं नाव रजिस्टरला काय लिहू ते पण तुम्हीच सांगा ."

अजून बारसं झालेलं नव्हते त्यामुळे काय सांगावं त्यांना प्रश्न पडला .पण लगेचच काका  बोलून गेले 

" आमची मुलाची मानिषा पुर्ण झाली त्यामुळे लिहा मनिष "

आणि त्यादिवसापासून बाळाला सगळे मनिष म्हणू लागले .

 बाळ पण जन्मताच गुटगुटीत होत आणि दिवसेंदिवस  चांगलच बाळसं धरत होतं . आलीकडे आईचंही वय पन्नाशीच्या पुढे गेलेलं , भरपूर जबाबदाऱ्या व केलेले कष्ट त्यात डायबेटीस त्यामुळे तीला जरासा हळवेपणा आला होता . त्यातच बाळाला काही झालं की तिचा धीर सुटायचा . एकदा तर रात्रभर बाळ रडत होतं तिच्या अंदाजाप्रमाणे बाळाचं पोट दुखत होतं पहाटे तिने काकांना सांगितले 

" तसं तर मी बऱ्याच बाळांना घरगुती उपचार करते तसे याला पण केले आहेत पण या पोरावर प्रयोग करायला माझं मन धजत नाही आणि आता घरी थांबायचं माझं धाडस नाही सकाळी आठच्या गाडीला आपण बाळाला घेऊन पंढरपूरच्या दवाखान्यात जाऊ ."

काकांना पण मग दम निघत नसे ठरल्याप्रमाणे आम्ही आवरलं तर नेमका त्याच दिवशी बसचा संप असल्याचे काकांना बाहेर गेल्यावर समजले मग बाहेरुन येतानाच काका स्पेशल गाडी ठरवून आले व आम्ही दवाखान्यासाठी म्हणून पंढरपूरला गेलो . बाळाचे असे अनेक किस्से आहेत . 

      बाळाला न्हायला घालायला शांता परटीण होती . तेल लाऊन मनापासून खेळवत ती बाळाला चोळून मोळून आंघोळ घालत असे . बाळ तसं वजनदार होतं . चोळून झालं की मोरीत ती पाय पसरुन बसायची व बाळाचे पाय हातात धरुन बाळाला उलटं करुन हिंदोळे द्यायची तसतसं बाळ खूप हसायचं . ती शांताची पद्धत आईला माहिती होती पण आई तिला म्हणायची

" शांता पोर जरा मस्तीखोर आहे नको खेळवत जाऊ असं ".

आणि एक दिवस बाळाने उलटं केलं तसं पायाला जोरात झटका दिला आणि तेलकट बाळ तिच्या हातातून निसटलं पायावरुन लांब पुढे मोरीच्या तोंडाशी गेलं . आई पाणी घालायला जवळच उभी होती . काही सेकंद बाळ रडलं नाही आई व शांता दोघीपण इतक्या घाबरल्या की  विचारायची सोय नाही . पुन्हा बाळ मोठ्यानं तळतळून रडलं तसं त्यांना हायसं वाटलं पण  त्यादिवशी दिवसभर शांता घरी हेलपाटे घालत होती आईच्या तर तोंडचं पाणी पळालं होतं . दोघींना पण चैन नव्हती शेवटी मीच दोघींना समजावलं 

" काळजी करु नका आधी पायावर पडून ते पुढे घसरलय त्यामुळे बाळाला काही लागलं नाही तेवढ्या वेळापुरतं ते खूप  रडलय पण पुन्हा शांत आहे ".

पण पुढे आठवडाभर आई मात्र बेचैन होती . शांता मात्र भितभीतच बाळाला आंघोळ घाली आई म्हणाली 

" दोडाचं भित्यापाठी ब्रम्हराक्षस आहे बाई "!

          बार्शीला बिऱ्हाड केलं होतं  तेव्हापासूनच  काकांनी शेतीचा बराचसा व्याप जाणूनबुजून कमी करत आणला होता . एक तर त्यांच वय पण साठीकडे झुकले होते आयुष्यभर बरीच उलाढाल केली होती . सगळ्या मुली आहेत त्यांच शिक्षण पुर्ण करुन चांगली मुलं पाहून द्यायचं व त्यांना स्थिरस्थावर करायचं यादृष्टीने त्यांनी त्यांचा संसार आवरता घ्यायला सुरुवात केली होती . नविन कोणताही व्याप वाढवायचा नाही आहे तो हळूहळू कमी करत आणायचा . शेतीतले गडी काढून वाटेकरी ठेवला होता त्यामुळे देखारेखीपुरतं किंवा वेळ जात नसला तर ते शेतात जायचे . त्यांचा हल्ली गुढगा पण दुखत असायचा . घरात त्यांची अगदी पहिल्यापासूनची कामं ठरलेली होती त्यात अंथरूण घालणे ,  काढणे , बंब पेटवणे , खड्ड्यातून पाण्याच्या घागरी भरुन देणे अशी कामात त्यांची मदत असायची . तर हल्ली रिटायर झाल्यापासून घरात छोट्या छोट्या कामात पण ते मदत करायचे दुपारच्या वेळी आई काही निवडत बसली की ते पण आईच्या शेजारी आराम खुर्चीत चष्मा घालून बसत व  गप्पा मारत ताटात धान्य घेऊन खडे काढून देत असत . लहान बाळांना खेळवणे हा त्यांचा आवडीचा छंद असायचा . वाड्यात ज्यांच बाळ लहान असेल ते एखादा तास तरी आमच्याकडे असायचं . आणि आमचं घरात जर बाळ असेल तर बराचवेळ ते घेऊन बसत असत . ते म्हणायचे 

" बाळ दिवसभर खेळूनखेळून दमतं त्याचे हातपाय चेपले की ते शांत झोपतं " 

असं म्हणत बाळाला काॕटवर टाकायचं आणि खेळवत खेळवत त्याचे हातपाय दाबायचे . मग बाळांना पण त्यांची सवय लागायची . मनिषला पण तशी सवय लागली होती त्याला काॕटवर टाकलं की आनंदाने पाय आपटत त्याचा खेळ सुरु होत असे.  दिवसेंदिवस  मनिष गोंडस दिसत होता . तोतो  आई-काका त्याच्यात खूप गुंतले होते . आता नवरात्र तोंडावर आलं होतं मनिष एक माहिन्याचा झाला होता . घेरडीत दसरा प्रकरण खूप भारी असतं , हे पण दसऱ्याला येणार होते मग बाळाला सगळे घेणार , त्याला बाहेर आणलं जाणार , मी पण इकडे तिकडे हिंडणार म्हणून सव्वा महिना झाला की नवरात्रातच एक दिवस आईने मला व बाळाला देवाला नेऊन आणलं . परत घरी येताना  दुसऱ्याच्या घरी थांबून घरी यायचं शास्त्र करायचं म्हणून मग येताना मी उषा वहिनी व प्रभा काकूकडे थांबून घरी आले .

वाड्यात कोणाच्याही घरी नविन बाळबाळंतीण  गेली की चहानाष्टा मग कौतुकाने ओटी भरणे , बाळाची टाळू माखणे हा कार्यक्रम अगदी सोहळा असल्यासारखा होई . अशावेळी  वाड्यातल्या सगळ्या काकू वहिनी एकत्र जमायच्या वाड्यात गप्पांना कधीच कारण लागत नसे आपापल्या दारात येऊन उभं राहिलं की सगळे एकत्र जमल्यासारखे वाटायचं आणि घरी निघालं की 

" आता उखाण घे बरं"

असा प्रेमळ हट्ट व्हायचा व चेष्टामस्करी , हसणे याला उधाण यायचं आणि एकीबरोबर सगळ्यांजणी एकमेकींना उखाण्याचा आग्रह करायच्या त्यात दीडदोन तास कसे जायचे समजायचं नाही . देवाला जाऊन आलं की मी जरासं वावरायला सुरुवात केली  मनिषला सोप्यात आणलं जायचं आणि दसऱ्या दिवशी तर थोडावेळ अंगणात पण आणलं  मग लगेच आई हाक देऊ लागली व म्हणू लागली

"शरु , देवाला जाऊन आलीस म्हणजे वागायला उठली नाहीस घरात चल आता बास झालं ".

आणि मग तिन्हीसांजेला गुटी वगैरे झाली की वेगवेगळ्या पद्धतीने बाळाची दृष्ट काढायची हे आईचं नित्यनेमाचं काम असे . 

घेरडीतला दसऱ्याचा सोहळा पाहून यांना तर खूप आश्चर्य वाटलं होतं . एवढं छोटसं गाव त्यात पाचसहा बिऱ्हाडं असलेला तीसचाळीस माणसं रहाणारा एवढा मोठा वाडा त्यात दसऱ्यासारखा सण इतक्या उत्साहात व एकत्रितपणे आंगणात संध्याकाळी चारपाच तास साजरा होतांना पाहून खूप वेगळं वाटलं . वाड्यात लहान मुलं , तरुण वहिनी व सगळे भाऊ , पोक्ते काका-काकू अशा प्रत्येक वयोगटातील लोकांचा वावर दसऱ्याची शोभा वाढवत होता . त्यातून मिळणारी ऊर्जा पुढे पंधरा दिवस तरी टिकून रहायची . त्यात गावातली मंडळी झाडून सोनं द्यायला पानसुपारी घ्यायला यायचे , मानाचे ढोल खेळले जायचे . अशा प्रकारे मोठ्या धामधूमीत दसरा झाला व तोंडावर दिवाळी व मुख्य म्हणजे बाळाचं बारसं त्याची शांत असे वेगवेगळे कार्यक्रम डोळ्यासमोर दिसू लागले . वसुबारशा दिवशी सकाळी शांत , दुपारी जेवणे व संध्याकाळी नामकरण विधी करावा असे एकूण कार्यक्रमाचे  नियोजन झाले .

तायडी , मायडी , गोंदा मामा दोन्ही आत्त्या , अंजू गायत्री व परांड्याचे पाहूणे शिवाय वाड्यातले सगळे असे बारशाला असणार होते व पुढे दिवाळी असणार होती . त्यानुषंगाने आई-काकांनी कामाला सुरुवात केली . किराणा खरेदी  , कपडा खरेदी , भटजी आचारी ठरवणे इ . कामासाठी जवळा , जत , सांगोला , पंढरपूर वेळ पडली तर सोलापूर असे काकांचे हेलपाटे होत होते . फॕशनेबल कपडे  मुंबईहून मायडीला तर सोनं खरेदी सांगलीहून तायडीला करायला सांगितले . आईने पण निलाबाईला हाताशी धरुन बारसं आणि दिवाळीच्या कोरड्या तयारीला सुरुवात केली . आठ दिवस आधीच जय्यत तयारी झाली .  बारशाच्या आदले दिवशीच दुपारपासून एकएकजण यायला सुरुवात झाली व रात्री घर पाहुण्यांनी भरुन गेलं . बाळाला पहाण्यात चेष्टामस्करी करत झोपायला बारा वाजले दुसरे दिवशी सकाळपासून शांत ,  दुपारी जेवणं व संध्याकाळी बारसे असे एकएक कार्यक्रम मोठ्या थाटात पार पडले  पार पडले बाळाचं नाव

 " आशिष"

 ठेवलं . आलेले पाहूणे काहीजण दुसरे दिवशी गेले बाकी तायडी माडी  दिवाळीसाठी घर गच्च भरलेलं होतं .ज्योती शिकायला बदलापूरला होती त्यामुळे नेहमी करता घेरडीत आई-काका व संजू हे तिघेच रहायचे . मग सगळ्या मुली , जावई नातवंडानी घर भरलं की आई-काका खूष असायचे . त्यावर्षीची दिवाळी पण अगदी धूमधडाक्यात झाली आमाचा नविन संसार होता सणाच्या निमित्ताने आम्ही खरेदी करायचो . त्याकाळात टेपरेकॉर्डर व कॕमेरॕच खूपच आप्रुप होतं म्हणून एसके भाऊजींना सांगून या वस्तू आम्ही मुंबईहून आणायला सांगितल्या होत्या तेही खूप मस्त वाटलं होतं . भरपूर पाहूणे , फराळ , कपडालत्ता अशी मजेत दीवाळी झाली . आईची मात्र कामाने बऱ्यापैकी चिडचीड पण व्हायची . हल्ली आई काकांना संजूची फार काळजी वाटत असे . आभ्यासात तिची काहीच प्रगती होत नव्हती , ती आता नऊदहा वर्षाची झाली होती त्यामुळे तिचे वय वाढेल तसं आई-काकांंची चिंता वाढत होती . मग आम्ही कोणी घेरडीत असलो की आई-काकांंना बरं वाटत असे तिला सुधारण्यासाठी काय करावं यावर चर्चा होत असे . 

      दिवाळी झाल्यावर पंधरा दिवसांनी मला परांड्यात न्यायचे ठरले . आता आशिष खूपच खेळकर झाला होता त्याला समजायला लागलं होतं . मग जसजसे मी गावाला जायचा दिवस जवळ येऊ लागला तसतशी आई-काकांंची हूरहूर वाढू लागली होती . आता करमणार नाही असे त्यांना वाटायचे आणि मुख्य कारण म्हणजे माझी नोकरी हे होतं . कारण आशिष तीन महिन्याचा झाला की माला बँकेत जाॕईन व्हाव लागणार होतं . बाळाला कसं आणि कोण सांभाळणार याविषयी काहीही ठरलेलं नव्हतं . त्यामुळे आईला असंख्य प्रश्न डोक्यात घोळत असत ती माझ्याशी बोलत असे 

" याला आंघोळ घालावी लागेल तुला तर जमत नाही . पोरग भुकेचं आळकी आहे थोडापण दम धरत नाही , बाळसेदार आहे त्याला व्यवस्थितच खायला प्यायला दिलं पाहिजे , त्याची भूक , खोड्या वाढत जाणार  तुझं तर काम सुरु होणार काय आणि कसं करणार "

असे ती विचारायची यावर 

" काहीच माहित नाही "

हे माझं उत्तर ठरलेलं असायचे तोतो तिला फार चिंता वाटायची .

काका म्हणायचे

" इथपर्यंत केलंय आता पुढे काय करायचं ते त्यांच्या घरच्यांनी ठरवलं असेल . तू का काळजी करतेस परांडकरांच घरी बोलणं झालं असेल . सगळ्यांना मोकळं बोलायची सवय नसते काय करतात पाहूयात ".

यावर आई गप्प बसायची वाड्यात सुद्धा हा विषय चर्चेचा ठरला होता . आता शरुला नोकरी सोडावी लागणार इतपत चर्चा कानावर येऊ लागली .

आईने मग ठणकावून सांगितले 

" नोकरी सोडण्यासाठी तिने एवढे प्रयत्न केले नाहीत . जगात नोकरी करणाऱ्या बायका नाहीत काय ? तिचा नवरा चिकार खंबीर आहे करतीलच काहीतरी फक्त लेकराची आबाळ होऊ नये म्हणून काळजीपोटी आम्हांला आपलं वाटतं  ".

       तुळशीच्या लग्नानंतर हे व काकी मला न्यायला घेरडीला आले व जवळजवळ अडीचतीन महिन्यांनी माझं बाडबिस्तार गुंडाळलं व आम्ही परांड्याला आलो . 

    खऱ्या आर्थाने आता काकांच्या सहा मुलींपैकी चार मुलींच्या जबाबदाऱ्या संपल्या होत्या . आता ज्योती व संजू यांचे मार्गी लावणे बाकी होते . त्यातही ज्योतीचे शिक्षण सुरु होते ती दिसायला छान होती व चुणचुणीत होती . ज्योती मायडीकडे बदलापूरसारख्या ठिकाणी रहात होती तीची प्रगती होत होती . संजू दिसायला छान होती पण तीची शैक्षणीकच नाही तर बाकीची पण प्रगती  चारचौघींसारखी होत नव्हती आणि ही गोष्ट दिवसेंदिवस ठळक होत चालली होती . याचा परिणाम म्हणून आईपेक्षा काका संजूच्या बाबतीत जास्तच हळवे होत चालले होते  . तिच्या बारिकसारीक गोष्टी पण ते सतर्कपणे पाहू लागले .

आता काकांना ज्योती व संजू या दोघी तर दिसत होत्याच शिवाय आक्कीच्या मुली पण मोठ्या होऊ लागल्या होत्या . त्यामुळे आई म्हणायची

" आता उतार वयात जबाबदाऱ्या संपत येतात का वाढत जातील हे येणारा काळच ठरवेल !

पाहुया कसं कसं होतं ते ".





 प्रकरण 28 वे

नवा गडी नवं राज्य


24/07/2022




      माझं बाळंतपण झालं आणि आई-काका खऱ्या अर्थाने चार मुलींच्या जबाबदारीतून मुक्त झाले होते . पण लग्न झालं चार चौघासारखे रीतिरिवाज केले की संपले असे काकांचे आजिबात नव्हते . मला न्यायला हे आले होते तेव्हा काकांनी यांना जवळ कॉटवर बसायला सांगितले व मला चहा करून घेऊन ये म्हणाले जवळच आई पण मधल्या खांबासमोर खुर्ची टाकून बसली . मला अंदाज आलाच होता . कोणत्याही महत्त्वाच्या विषयावर आईकाका आधी चर्चा करत असत आणि मग तो विषय सर्वासमोर बोलत असत . मी पण चहा घेऊन आले आणि कपाटाजवळ बसले . मग काकांनी बोलायला सुरुवात केली .

" परांडकर आता तुम्हाला नोकरी लागून सात वर्षे होऊन गेली दोघेपण आता बार्शीत आहात पुढेही बार्शीतच रहणार . मग किती दिवस भाड्याच्या घरात राहायचं , मुलगा पण झाला आहे आता तुम्हाला स्वतःच घर असायला पाहिजे . त्यादृष्टीने तुम्ही प्लॉट बघायला सुरुवात करा तुम्हाला घरासाठी बँक कर्ज देते मात्र प्रश्न प्लॉटचा असू शकतो . कोणताही आडपडदा न ठेवता मी तुम्हाला स्पष्ट सांगतो मी पाठीशी उभा आहे तुम्ही प्लॉट बघा , खरेदीसाठी मी तयारीनिशी येतो , बांधकाम तुमचं तुम्ही करा त्यासाठी बँक कर्ज देतेच आहे . " 

एवढं काकांचं बोलणे ऐकले आणि यांना धक्काच बसला यांना खूप अवघडल्या सारखे झाले . ते म्हणाले 

" काका खरं आहे सगळं , आम्हाला घर तर घ्यायचं आहेच पण बजेटचा प्रश्न आहे , बँक कर्ज देते त्यात प्लॉट घेऊन बांधकाम होत नाही . मी आमच्या घरी काही बोलू शकत नाही तुमच्या तर अजून जबाबदाऱ्या आहेत आणि तुम्हाला कसं मागू " .

मग काका म्हणाले 

" तुम्ही कुठे मागताय , मीच देतोय की ".

त्यांना तोडत मध्येच आई म्हणाली 

" आमचं सगळ ठरलंय बघा , आम्हाला आमच्या  मुली-जावई मुलाप्रमाणे आहेत त्यामुळे आहे ते सगळ मुलींचं आहे . आम्ही काही पैसे कोणाला देत नाहीत फक्त इथली इस्टेट ही दुसरी इस्टेट तयार होताना द्यायची , आणि वेळेला मदत द्यायची हे आमचं ठरलेलं आहे . त्यामुळे तुम्ही तो विचार करू नका , भीड बाळगायचा काही कारण नाही ".

मधेच काका नाक फुगवत हसत हसत म्हणाले 

" हा आता तुम्ही दोघं मिळवताय फारच वाटलं तर तुमच्याकडे पैसे आल्यावर परत द्या मला , मी काही नाही म्हणणार नाही . अजून बराच खर्च करायचा आहे मला पण " . 

मग चहा पिऊन ती मीटिंग तिथेच संपली . हे मला म्हणू लागले 

" काका किती धोरणी आहेत ते खूप पुढचं पाहतात . किती सहज आणि स्पष्टपणे मुख्य म्हणजे समोरच्याला अजिबात दडपण येणार नाही असे बोलतात , मला खूप मोकळेपणा आणि सच्चेपणा वाटला त्यांच्या बोलण्यात . खरं तर त्यांच्याकडून पैसे घेणे मला कसतरी वाटते पण त्यांनी अगदी क्लिअर ऑफर दिलीय . आपण विचार करू खरंच ते म्हणतात तसे त्यांना गरज पडेल तेव्हा जमतील तसे आपण पैसे परत करू पाहू कसे होते ते ". 

आम्ही घराचा विचार करतच होतो पण काकांनी डोक्यात सोडलेल पिल्लू घेऊन आम्ही बार्शीत आलो . बरोबर लहान आशिष , आता बँक सुरू होणार त्याला बाहेर सोडून जावं लागणार ते कसं करायचं असे अनेक प्रश्न घेऊन आम्ही आधी परंडा मग बार्शीत आलो आणि आमचं पर्व इकडे सुरू झालं .

    घेरडीत अजून ज्योती व मुख्य म्हणजे संजूची पुर्ण जबाबदारी होती कारण संजू दिसायला सुंदर होती पण तिची बुद्धी आणि प्रगती चारचौघींसारखी नव्हती आई-काकांंच्या उतारवयात त्यांना लागलेला घोर होता तो . शिवाय आक्कीच्या दोन मुली पण आता दहाबारा वर्षाच्या झाल्या होत्या

तसं तर आई संसारातून विरक्त व्हायचा प्रयत्न करत होती . तिच्यामध्ये वाचनामुळे बरीच प्रगल्भता आली होती . पण स्वतःच्या सहा मुली त्यातही मुलींच्यात अंतर जास्तीचं असल्यामुळे तिचा संसार तसा नेटका नव्हता त्याला लांबड लागलेलं होतं . पण तिच्या उत्साहाला मात्र तोड नव्हती .

ज्योती बदलापूरला शिकायला होती उन्हाळा व दिवाळीच्या सुट्ट्यांचा कालावधी सोडला तर आई-काका व संजू असे तिघेच घेरडीत रहात असत . काकांनी शेतीचा व्याप जाणूनबुजून कमी केलेला होता व संजूचं शिक्षणात फारसं लक्ष नसल्यामुळे व फारशी प्रगती नसल्यामुळे  आजकाल ते तीघेही बऱ्याच वेळा मुलींकडे जायचे . आकरावीमध्ये काॕलेजला ज्योती बदलापूरहून किर्लोस्करवाडीला आली होती . आता आई-काकांच्या डोळ्यासमोर ज्योती होती . तिच्या पाठोपाठ अंजू-गायत्री होत्या आणि वय वाढेल तसे संजूच्या काळजीची धार तीव्र होत चालली होती . संजुसाठी कोणीही सांगेल तो दवाखाना काका करायचे . एके ठिकाणी तिला पंचधातू दुधात उगाळून त्यात चूर्ण खलून त्याचं चाटण द्यायला सांगितले होते तर काकांनी सोने चांदीसह पाच धातूच्या अंगठ्या करून आणल्या होत्या आणि कित्येक महिने रोज स्वतः सहाणेवर उगाळून त्याच चाटण करुन संजुला  द्यायचे . काहीही करु पण संजू चार चौघीसारखी नॉर्मल व्हावी असे त्यांना वाटत असे . त्या चाटणाचा परिणाम संजुवर बऱ्यापैकी झाला होता शरीरातील सगळेच घटक वाढले होते . ती आणखीनच सतेज , गोरीपान दिसू लागली , तिचे केस कमरेपर्यंत वाढले . शरीर पण सशक्त झाले वयाच्या 14 व्या  वर्षीच तिला मासिक धर्म सुरू झाला . तिला वेणीपण घालता यायची नाही . तिला स्वतः काहीच करता येत नसे सगळ आईला करावे लागे . आम्ही बहिणी असू तेव्हा आम्ही करायचो . आईला मात्र वाईट वाटायचे त्याबरोबरच सांजुचा राग पण यायचा आणि कीव पण यायची . चोवीस तास संजू आईबरोबर असायची त्यामुळे ती म्हणायची 

" उभ आयुष्य कसं टेचात गेलंय आणि उतार वयात भलतीच काय ही चिंता आपल्याला पोखरयला लागली आहे . रेखाचं दुःख तरुणपणाच्या बळावर निभावलं पण आता कठीण वाटतं आहे हे . " 

पण काकांना वाटायचे

 " आपल्या उतारवयात मुख्यतः आईची ताकद नसताना , आईला डायबेटिस झाल्यानंतर संजूचा जन्म झाला आहे आणि त्यामुळे तिच्यात काहीतरी कमतरता आहे त्यात तिचा काय दोष आहे . ती आपली जबाबदारी आहे तिला न्याय देणे आपलं काम आहे . " .

अशी आई काकांची घुसमट व्हायला लागली होती .

इकडे ज्योतीचे राहणे आधी दोन अडीच वर्षे बदलापूर आणि आता किर्लोस्करवाडी याठिकाणी पडल्यामुळे ज्योतीने त्याचा पुरेपूर फायदा उचलला होता . दिसायला घरंदाजा प्रमाणे आणि आधीच अंगी उत्साह , चौकसपणा , धडाडी , लाघवीपणा यासारखे गुण आसलेल्या ज्योतीला पोषक वातावरण मिळत गेले व त्याचे तिने सोने केले . माझ्या बाबतीत नोकरीमुळे लग्न ठरविण्यात येणारी सुलभता पाहता काका ज्योतीला बँकेच्या परीक्षा दे म्हणून मागे लागत होते . तिचे शैक्षणिक करियर चांगले होते पण ती फारसे त्यात रमत नसे . नोकरीसाठी फारसा मनापासून विचार करत नसे . ती जराशी बिनधास्त , आणि नाविन्याचा ध्यास असलेली होती स्वतः काहीतरी नवीनच करायचं आणि चार लोकांना आपल्या नादी लावायचे असं काहीसं तिचं होतं . तिचा शिवणकामाकडे जास्त कल होता . तिने तो क्लास लावला आणि ज्यांच्याकडे ती क्लासला जायची त्यांनाच ती त्यातली विविधता शिकवून यायची , त्या बाबतीत तिच्यातील कला ठळकपणे उठून दिसत होती . संपूर्ण क्लासमध्ये तिच्या कलेच आणि धाडसाचं कौतुक होत होतं आणि ती त्यात रमत होती . तिने शिवण काम शिकण्यासाठी कधीच साधा कपडा वापरला नाही . एकदम भारी कपड्याला हात घालायचा आणि त्याची सुंदर कलाकृती करायची , त्याचं सगळ्यांनी तोंडात बोट घालून कौतुक करायचं . स्वतःच्या डोक्यातून नवनवीन फॅशन काढायची आणि ते करून दाखवायचं . अगदी लहान वयात तिने सगळ्यांना चकित करून सोडलं होतं . आई , तायडी आम्ही सगळ्या बहिणी , वड्यातले , किर्लोस्करवाडीचे सगळेजण तिचे तोंडभर कौतुक करायचे . तिचा त्यामुळे आत्मविश्वास वाढत गेला आईला तर तिचं भारी कौतुक वाटायचं लगेच तिच्या डोळ्यासमोर संजू दिसायची मग ती थोडंसं उद्विग्न होऊन म्हणत असे 

" एकाचढीत एक पोरी आहेत आमच्या , चढती कमान पहायची मला सवय आहे . परमेश्वराने एकवेळ संजुला रंगरूप कमी दिलं असतं तर चाललं असत पण संजू सगळ्या पोरीसारखी व्हायला पाहिजे होती पण काय आहे देवाला ठाऊक " .

      इकडे आमच्या डोक्यात आमच्या घराचा विचार घोळत होता . मी बँक आणि आशिष यात पूर्णपणे गुरफटून गेले होते . तसही प्लॉट , बांधकाम हे विषय मला फारसे समजत नव्हते पण आपलं घर असले पाहिजे एवढं नक्की वाटत होतं . बँकेत बरेचसे सहकारी साधारण यांना समवयस्क असल्याने बऱ्याच जणांचे घराचे काम चालू होते त्याप्रमाणे यांनी प्लॉट शोधायला सुरुवात केली लवकरच त्याला यश आले . बार्शीत त्यामानाने जागेच्या किंमती पहिल्यापासूनच जास्त आहेत . आम्ही दबकत दबकत एक प्लॉट फिक्स केला व त्याप्रमाणे काकांना कळवले . तेव्हा पद्माकर काकांचे आमच्याकडे भरपूर येणंजाणं असायचं . पत्र मिळताच काका बार्शीला आले प्लॉट पाहिल्यावर काकांना पण प्लॉट आवडला मग  मालकांची भेट , बोलणी झाली , इसार दिला आणि खरेदीची तारीख पक्की केली . बाकी सगळी तयारी यांना करायला सांगून काका घेरडीला गेले . प्लॉटचे मालक पाचजण भाऊ होते आणि सगळे वेगवेगळे राहत होते ते एकमेकांशी बोलत नव्हते फक्त व्यवहार एकत्र करायचे . त्यामुळे यांना एक गोष्ट करायची झाली तर पाच जणाकडे फिरावे लागे . स्टॅम्प खरेदी लिखापाडी अशी सगळी तयारी झाली आणि खरेदी उद्यावर आली मग काका घेरडीहून आले . सकाळी हे , काका व पद्माकर काका कचेरीत जायचं ठरलं मी बँकेत जाणार होते . काकांना असे जमिनीचे किंवा जागेचे व्यवहार करायचे असले की भारी उत्साह असायचा . तरुणाला लाजवेल अशी त्यांची तयारी , लगबग असायची . अगदी तसच त्याही दिवशी ते लवकर उठून दाढी , आंघोळ , नाष्टा करून कडक इस्त्रीचे शर्ट पँट घालून पेपर चाळत कॉटवर लोडला टेकून पद्माकर काकांची वाट पाहत बसले . यांची पण अवराआवरी चालू होती पण त्यांना टेन्शन आले आहे असे जाणवत होते . तोवर पद्माकर हजर झाले . ते दोघे गप्पा मारत बसले काका माझ्याकडे पाहून हसत म्हणाले

" परांडकराना टेन्शन आलं असं दिसतंय एवढी काळजी करू नका म्हणावं होत असतं सगळ ".

पण असे काही असले की यांना खरच खूप टेन्शन यायचं त्याचा परिणाम जेवणावर व्हायचा , त्यांना घशाखाली अन्न उतरत नसे . दहा वाजता सगळे जायला निघाले तसे काकांनी त्यांची पैसे ठेवलेली लेदरची बॅग कपाटातून काढली नेहमीप्रमाणे बकोटित धरली नाक फुगवत हसत हसत माझ्याकडे पाहिले आणि ते तिघेजण निघाले मी मात्र आपलं घर होणार फक्त या आनंदात होते . बाकी खरेदी , बांधकाम त्याच नियोजन काय असते यातील ओ की ठो मला समजत नव्हते . फक्त आपल्याबरोबर काका आहेत सगळ नीट होणार आशी खात्री होती . आमच्या दोघांमध्ये मी बरीचशी अल्लड तर हे खूपच दीर्घ विचारी असे चित्र होते . त्यामुळे घराच्या बांधकामाची सर्वस्वी जबाबदारी यांच्यावर होती . मी फक्त नोकरी असल्यामुळे पैशाची काही व्यवस्था करु शकणार होते . 

मी बँकेतून आले तोवर प्लॉटचा व्यवहार करून हे सगळे घरी आले होते . मग रात्री गप्पा मारत असताना यांनी पुढचं बांधकाम कसे करणाऱ याचे नियोजन काकांना सांगितले .

आता पुढचे सुरू करा असे सांगून काका दुसरे दिवशी घेरडीला गेले . बँकेचं कर्जप्रकरण करायचं होतं त्यामुळे सर्च रिपोर्ट , प्लॅन आणि बरीच कागदपत्रे जुळवाजुळव करण्यासाठी यांची धावपळ साधारण जानेवारी 92 ला सुरू झाली ते जून 93 ला घराची वास्तुशांती झाल्यावरच संपली . 

आम्ही इंजिनियर कडे फक्त प्लॅन आणि देखरेख एवढंच काम दिले होते . बाकी बांधकामावर आवश्यक तसे वाळू , सिमेंट , विटा असे सामान आणणे , लाकडी साहित्य , ग्रिल , बांधकामावर पाणी मारणे , लाईट कनेक्शन , पाण्याचं कनेक्शन , लाईट फिटिंग , अशी सगळी कामे वेळकाळ न पाहता दीड वर्ष अहोरात्र यांनी एकट्याने करवून घेतली यांना स्वतःला खूप कष्ट करावे लागले , आणि आमचा सुंदरसा बंगला तयार झाला . 

आशिष एक वर्षाचा झाल्यापासून हे काम सुरू झालं तो अडीच वर्षाचा झाला तेव्हा आम्ही या बंगल्यात राहायला आलो . तो जवळजवळ रोज एकदा तरी यांच्याबरोबर बांधकामावर यायचा

" पॉटवर यायचं मला " 

असे म्हणत तो स्कुटरवर येऊन बसायचा . लाईट फिटींग चे काम चालू होते त्यादिवशी पहाटे अडीच पर्यंत तो जागा राहिला होता . घरी सोडतो चल म्हणाल की भोकाड पसरायचा . त्यामुळे त्यालाही या जागेविषयी खूप लळा लागला होता . मी मात्र कधीतरी सुट्टीदिवशी चक्कर मारत असे . बाकी फेफरी मात्र यांची एकट्याची उडत असे . 11 जूनला वास्तुशांती करायचे ठरले त्याप्रमाणे 30 एप्रिल 1993 रोजी आम्ही गृहप्रवेश केला आणि माझ्या  26 व्या वाढदिवशी स्वतःच्या घरात राहायला आलो . आता वास्तुशांती !!

वास्तुशांतीच्या आधी आठ दिवस तायडी , तिची मुलं आणि ज्योती व संजू बार्शीत आले होते बार्शीत पहिल्यापासून उन्हाळा जास्तच असतो त्यामुळे रात्री इथली प्रसिद्ध मावा मस्तानी खायला जाणे हा पण मजेचा भाग होता . आम्ही मात्र  जय्यत तयारीत होतो . दोन्हीकडच्या पाहुण्यांनी घर गच्च भरले होते . मोठ्या थाटामाटात वास्तुशांती झाली . मी लग्नात जेवढं मेकअप केलं नव्हत तेवढे आज मला ज्योतीने तयार केले होते . बार्शीत जरा खव्याचे प्रस्त जास्त आहे तर खवा घालून बुंदीचे चविष्ट लाडू जेवायला होते तर रात्री मावा मस्तानी असा बेत होता . 

माडीवर असलेल्या भाड्याच्या दहा बाय दहाच्या दोन रूम मधून चार रूमच्या मोठ्या बंगल्यात आम्ही तिघेजण राहायला आलो ! एक कॉट , गोदरेजचे कपाट , भांड्याचे रॅक आणि ओनीडाचा टीव्ही एवढंच मोठ समान आणि छोटी छोटी भांडी कुंडी घेऊन आमचं बाडविस्तार घेऊन आम्ही स्वतःच्या घरात राहायला आलो ! समोर मोकळं मैदान , भोवताली बागीचासाठी सोडलेली जागा , तसा बंगला म्हणलं तर आमचाच पहिला झाला होता त्यामुळे त्याचं फार कौतुक होत होतं .

आता ज्योतीची अजून दोन वर्ष राहिली होती पण ती खूपच उठावदार दिसत होती त्यामुळे पाहणारे तिच्या विषयी विचारात असत . इकडे अंजू गायत्री मेडशिंगीला राहत होत्या त्यांच्या बाबतीत  जवळजवळ सगळे निर्णय त्यांचे काकाकाकु घेऊ लागले . खेडेगाव आसल्यामुळे आणि मोठं कुटुंब असल्यामुळे मुलींना फारसे शिक्षणात त्यांनी गुंतू दिले नाही बराचसा त्यांचा वेळ घरकामात जात असे . त्याचा परिणाम असा झाला की त्यांची शिक्षणाची ओढ पूर्ण कमी झाली . मार्क्स चांगले मिळेनात मग आंजू आगदीच पंधरा वर्षांची झाली की 94 साली तिचे खात्यापित्या घरात त्यांनी लग्न ठरवले , शेती करणाऱ्या मुलाशी तिचे लग्न ठरले . मुलींनी शिकाव आशी मनापासून तळमळ असूनसुद्धा लग्नासाठी मदत करण्याखेरीज काका आणि आम्ही काही करू शकलो नाही . त्यावेळी मात्र यांनी आगदी प्रयत्नपूर्वक काही पैसे जमा केले व काकांना दिले . काका म्हणाले 

" तुमच्या समाधानासाठी आता घेतोय पण आता पुन्हा पैशाची व्यवस्था झाली की त्याचे 6 वर्षाचं NSC घेऊन ठेवा मुदत संपल्यावर त्याचं काय करायचं मी सांगतो . पुन्हा मात्र तशीच बचत आम्ही करत गेलो . ती तशीच वाढवत जावा आणि पुढे गरज पडेल तशी वपरा मला काही परत देऊ नका असे काकांनी सांगून टाकले . ज्योतीपेक्षा लहान असूनही पंधराव्या वर्षीच आंजुचे तिच्या काकांनी ठरवल्याप्रमाणे लग्न झाले .

        इकडे ज्योतीचे एस वायचे वर्ष सुरू होते . पुढच्या वर्षी ती बी. कॉम होणार होती आता वीस वर्षाची होईल म्हणत तिच्या लग्नाविषयी घरातल्यापेक्षा बाहेरचे लोकच चर्चा करू  लागले , तायडीला लग्नाविषयी विचारू लागले . ज्योतीमध्ये तायडी जरा जास्तच गुंतली होती नात्याने ती बहीण आसली तरी दोघींच्या वयात जवळजवळ पंधरा वर्षाचे अंतर असल्यामुळे व तायडीच्या मुली ज्योतीच्या पाठोपाठ असल्यामुळे तायडी व भाऊजी ज्योतीला मुलीप्रमाणे मानत असत . त्यामुळे तिचं लग्न जमवणे आपली जबाबदारी असे तायडीला वाटत असे . काकांनी तर वरसंशोधनाची तयारी सुरू केलीच होती पण शिक्षण पूर्ण झाल्याशिवाय लग्न करायचे नाही यावर घरात शिक्कामोर्तब झाले होते . तरी चर्चा होत असे काका वाडीला गेले की तायडीशी ते चर्चा करत असत आणि त्यांनी ठरवून टाकले की ज्योतीच्या शेवटच्या वर्षाची सहामाही परीक्षा झाली की दिवाळीनंतर तिच्या लग्नाचं पहायचं म्हणजे फायनल झाली की लग्न होईल . तयडीला मात्र चैन पडत नव्हती मग शेवटच्या वर्षी दिवाळीत तिची आजुन परीक्षा होते तोवरच पत्रिका देणे मुलांच्या चौकशा करणे ही लगबग तीने सुरू केली होती , विशेष म्हणजे तिच्याकडे ज्योतीसाठी मागण्या पण येत होत्या . या धडपडीला मार्चमध्ये यशही लगेच आले . मूळचा कराडचा असलेला परंतु नोकरीनिमित्त पुण्यात रहात असलेल्या एका मेकॅनिकल इंजिनीअरच्या स्थळाविषयी तायडीला माहिती मिळाली . लगेचच तिने पत्रिका फोटो दिला सगळ व्यवस्थित जमते  असे समजले की तातडीने त्यावर हालचाली करत ज्योतीची परीक्षा झाली की दाखवण्याचा कार्यक्रम ठरवला . ज्योतीची परीक्षा झाली की आता तिचे शिक्षण संपले आहे तर तिला यावेळी न्यायला तुम्ही या असे तिने काकांना आधीच कळवून ठेवले होते त्याप्रमाणे काका आदले दिवशी वाडीत हजर झाले . काका आल्यावर तायडीने सविस्तर माहिती काकांना सांगितली आपण उद्या दाखवून तरी येऊ असे ठरले व त्याप्रमाणे गुरूवारी कराडला मुलगी दाखवण्याचा कार्यक्रम झाला . काकांना मुलगा व एकूण स्थळ पसंत पडले होते . ज्यांच्याकडे काका , ज्योती , तायडी व भाऊजी उतरले होते तिथेच दिवसभर थांबले होते . त्याच दिवशी मुलाने अजून दोन मुली पहिल्या व ज्योती पसंत असल्याचे संगितले . तसा लगेच काकांना निरोप मिळाला . काका पण याबाबतीत खूप तत्पर होते . लगेचच सगळेजण पुन्हा एकदा मुलाच्या म्हणजे मुकुंद घळसासी यांच्या घरी गेले काकांची व मुलाचे वडील म्हणजे नाना यांनी चर्चा केली . कच्ची बोलणी करून साखरपुड्याची तारीख पक्की केली व बाकी बोलणी  त्यादिवशी करू म्हणत सगळेजण वाडीला परत आले . तायडीच्या आनंदाला सीमा राहिली नाही . सगळे एकदम खुश होते . 

 आता ज्योतीची परीक्षा व एकूणच शिक्षण संपले होते आणि लग्नही ठरले होते . दुसरेदिवाशी काका बरोबर ज्योती घेरडीला जाणार होती . ज्योती जवळजवळ पाच वर्षे तायडीकडे राहिली होती . मंजू मेधा पण बऱ्यापैकी कळत्या झाल्या होत्या त्या तिच्या मैत्रिणीच होत्या . सगळ्यांनाच एकमेकांची इतकी सवय झाली होती की ज्योती बॅग भरू लागली तशी वातावरण एकदमच हळवे झाले . सगळ्या गोष्टी इतक्या पटपट झाल्या होत्या की विचार करायला कोणाला वेळच मिळाला नाही . खरं तर सगळ मनासारखं झालं होत , लग्न ठरलं होतं , मनासारखा मुलगा मिळाला होता . पण लगेचच दोनतीन महिन्यात लग्न होणार आता थोडंसं आईकाका बरोबर रहावस वाटतं होतं . इकडे वाडी कायमची सोडायची याची हुरहूर लागली होती तर तिकडे नाविन्याची आस होती . नवीन जोडीदार कसा असेल आता घेरडी वाडी सगळी माणसं सोडून एकदम पुण्याला राहायला जाणार होती . नवनवीन स्वप्ने उराशी बाळगत हसत हसत साश्रू नयनांनी ज्योतीने बॅग भरली आणि दुसरे दिवशी चार वाजता काका ज्योतीला घेऊन घेरडीत हजर झाले . 

    इकडे आईला याविषयी आईला अजिबात कल्पना नव्हती . आता ज्योती जवळजवळ सातआठ वर्षांनंतर घेरडीत राहणार , बघू आता थोडंसं एकत्र राहू मग लग्नाचं पाहायचं या विचारात आई होती . काकांनी हातपाय धुतले आणि आईला म्हणाले 

 " वाड्यातल्या सगळ्यांना बोलावणं पाठवतो चहा कर सगळ्यासाठी " . 

आणि हसत हसत ज्योतीचे लग्न जमवून आल्याचे सांगितले . आई एकदम भावनावश झाली  

" आहो , आत्ता तर पोरीच शिक्षण झालंय आपल्याजवळ ती राहिलीच नाही चार दिवस जवळ राहील आसे वाटलं होतं  आणि तुम्ही तर लग्नच ठरवून आलो म्हणता, आस कसं हो ".

काकांनी सविस्तर सगळ आईला सांगितले व म्हणाले  

"इतका छान योग जुळून आलाय तर वाट कशाला पहायची म्हणून आलो ठरवून बघ कसं वाटतं तुला . " 

तिला रडू आवरेना पण ते आनंदाश्रू होते . आईने जड अंःकरणाने चहाच आधण टाकलं तोवर मोहन आण्णा , उषा वहिनी , फक्कड काका , प्रभा काकू , मोठ्या काकू बाकी वहिनी भाऊ हजर झाले . चहापाणी झालं गप्पा रंगल्या आणि एकूणच उत्साहाला उधाण आलं . आता सगळ्यांना पुढचे वेध लागले होते . वड्यातली सगळी भावंडं , भाचे , भाच्या वहिनी ज्योतीला चिडवत होती , चेष्टा मस्करी सुरू झाली  !!!







प्रकरण 29 वे


ज्योतीच्या लग्नाचे स्वर घुमू लागले

11/04/2022


      दरवर्षी 14 एप्रिलच्या दरम्यान बँकांना दोनतीन दिवस सुट्टी येते आणि बहुतेक चैत्र महिना सुरू असतो . माझं लग्न झाल्यापासून रजेचा प्रश्न असायचा मग रविवारला जोडून सुट्टी आली की दोनतीन दिवसांची रजा काढून मी घेरडीला जात असे मग आई पण त्या दरम्यान चैत्रा गौरीचं हळदीकुंकू ठेवायची नुकतच मला काकांचं 

 " परवाच ज्योतीच्या लग्नाचे पक्के करून आलो ".

असे पत्र आले आणि कधी एकदा मी घेरडी गाठते असे मला झाले नेहमीप्रमाणे याहीवर्षी मी घेरडीला गेले . आई-काका , ज्योती , संजू , वाड्यातले सगळे माझी वाटच पाहत होते . घरी गेल्यावर लग्नाचां सगळा वृत्तान्त समजला , घरातील वातावरण एकदम खुशीत होते . ज्योती तर हवेतच होती , त्या दोघांची एकमेकांची पसंती झाली होती पण साखरपुडा , नंतर लग्न , ते कधी , कसे याविषयी अजून काही ठरले नव्हते . तिकडे तायडी कराडच्या संपर्कात राहणार होती . 

आईचे मात्र एक लेक चार दिवसांसाठी माहेरी आली आहे तर दुसरी लवकरच लग्न करुन सासरी जाईल असा विचार करत हळव्या स्वरात स्वगत सुरू होते .

" पोरी शिकवून सवरून मोठ्या करायच्या , त्यांची लग्न करायची आणि हाहा म्हणता चिमण्या उडून गेल्या सारख्या एक दिवस भुर्र उडून जातात , रमतात आपापल्या संसारी , जगाचीच रीत आहे ही म्हणा " .

असे म्हणत म्हणत तिच्या खास स्टाईलने दोन्ही हात वर करत हलवत पाणावलेल्या डोळ्यांच्या कडा लपवत गौराईच्या हळदीकुंकवाच्या तयारीला सुरू होती . तसं ज्योती नववी पासून शिकण्याच्या निमित्ताने बाहेर होती . ती दिसायला फारशी रेखीव नसली तरी पहिल्यापासून ती मोहक , स्मार्ट आणि रसरशीत दिसायची . आपलं गाव खेडे गाव आहे टवाळी मुलं असतात यापेक्षा शहरात चांगलं शिकेल तिचे कल्याण होईल . पाहू शिक्षण झाल्यावर थोडंसं राहील घेरडीत असे तिला वाटत होते पण ज्योतीचे लग्न चुटकीसरशी जमले आणि आईला एकीकडे आनंद तर एकीकडे पोरीला जवळ राहायला मिळालं नाही याची चुटपुट लागली होती . मग आता आम्ही जमलो तर करु जराशी मज्जा म्हणत यावर्षीचे तिचे हळदीकुंकू स्पेशल होते . पोरी आल्या की गप्पांच्या नादात काम होत नाही म्हणत ओल्या नारळाचा चव घालून साजूक तुपातले रव्याचे लाडू , भरपूर खसखस घालून केलेल्या सारणाच्या करंज्या आणि खमंग काहीतरी आसले पाहिजे म्हणून तिचे खास मेतकूट लावून , भरपूर शेंगदाणे घालून केलेलं भडंग ही सगळी तयारी तिने आदले दिवशी करून ठेवली होती . तर रात्रीच घागरीच्या पितळी पातेल्यात हरभरे भिजायला घालून सकाळी ते पातेलं मागच्या दरात तिने हरभरे फुगण्यासाठी उन्हात ठेवले होते . मंडईतून आणलेल्या त्यातल्या त्यात चोच दिसणाऱ्या दोन कैऱ्या कुंकू लावून पोपट म्हणून दोन ग्लासवर ठेवण्यासाठी तिने बाजूला काढल्या , एकदोन कैऱ्या तिने डाळीसाठी खीसल्या आणि बाकीच्या पन्हं करण्यासाठी उकडायला टाकल्या . 

दुपारची जेवणे लवकरच आटपून आम्ही दोन वाजताच तयारीला लागलो . आईची डाळ खूपच प्रसिद्ध होती . हलक्या हाताने उखळात कुटायची त्यात कैरीचा खीस , मीठ , साखर , कोथिंबीर घालून मोठसर वाटायची आणि त्याला हिंग , जिरे , भरली मिरची घालून चरचरीत फोडणी द्यायची .

आणि संध्याकाळपर्यंत जास्त आंबट होऊ नये म्हणून डब्यात घालून त्यावर पांढरा रुमाल टाकून तिने तो डबा डेऱ्याखाली पाण्यात ठेऊन दिला . 

     तोपर्यंत इकडे सोप्यात काकांनी नेहमीप्रमाणे गौरीच्या मखराची तयारी केली . उंच काळ्या पिपावर मोठा पाट आडवा टाकून पहिली पायरी , मोठ्या निळ्या पेटीची दुसरी पायरी आणि खाली एक छोटी ट्रंक ठेऊन तिसरी पायरी केली त्यावर छानस बेडशीट टाकून आणि वर सुतळ्या बांधून त्यावर साड्या टाकून छानस मखर तयार झाले . तोवर आईने लेकीच्या मायेने देवघरात खण घालून बसवलेली लाकडी गौर काढून उंच समईवर बांधून तीला साडी नेसवून , गजरा माळून त्या मखरात नेऊन बसवली . मग स्वतः माझ्या लग्नात मायडीने घेतलेली कठापदराची नऊवारी सिल्कची चिंतामणी कलरची साडी त्यावर जांभळं ब्लाऊज घालून केसांचा आंबडा त्यावर काकांनी खास आणलेला ग्रीष्मात दरवळणारा मोगऱ्याचा गजरा माळून छान आवरून तयार झाली .

ती अशी तयार झाली की काका नाक फुगवत तिच्याकडे पाहून हसायचे तर ती पण लाजायची . एवढं वय झालं होतं पण दोघेही चिरतरुण होते . तरुणांना लाजवेल असाच त्यांचा उत्साह असायचा . हल्लीहल्ली आई थोडीशी थकल्यासारखी वाटायची एक तर वय साठीकडे झुकलेले होते , गेल्या पंधरा वर्षांपासून शुगरचा त्रास मुख्य म्हणजे दिसामासाने वाढणारी संजू आणि तिची काळजी . आम्ही मुली जमलो की त्या दोघांना प्रकर्षाने संजूची काळजी वाटायची . तिच्याविषयी गप्पा मारताना ते हवालदिल होत असत . संजू चांगली दिसावी , चारचौघात ती एकटी पडू नये यासाठी त्या दोघांचा अटापिटा असे . जिथे जातील तिथे खास तिच्यासाठी कपडा खरेदी करत असत . ती फक्त चौदा वर्षांची होती पण उफाड वाटायची , देखणी दिसायची , नजरेत भरत असे पण बुध्दी फारशी चाणाक्ष नव्हती . त्याचीच आईकाकाना खूप आरण होती . आईने तिला पण छानसा ड्रेस घालून तयार करायला आम्हाला सांगितले कारण ती आमच्या बरोबरीने दिसावी , राहावी , मागे पडू नये हा मुख्य उद्देश .

तोवर आम्ही गौरीभोवती लाकडी केळीची फणी , कैरीचे पोपट , नक्षीदार कापलेले कलिंगडे , वेगवेगळी खेळणी ठेऊन आरास केली . यावेळी ज्योतीने आणि मी खास एक रांगोळी काढली होती . गौरीसमोर मधोमध थाळ्यामधे दुपारीच पाणी ओतून ते संथ होऊ दिले त्यावर चाळणीने दाट बुक्का चाळला आणि त्यावर हळुवार हाताने ज्योतीने सुंदर रांगोळी रेखाटली , रंग भरले , थाळ्याच्या कडेनी नाजूक महिरप काढला आणि त्या दिवसाचे 

" पाण्यावरची रांगोळी "

 हे हळदी कुंकवाचे खास आकर्षण ठरले .

आईने आधी फराळाची दोन ताटे गौरी समोर आणून ठेवली , पाण्याचं चांदीच तांब्या भांड ठेवले मग एका ताटात हळदीकुंकवाचे पंचपाळ , आत्तरदाणी , डाळ , पन्हं , पाटीत ओटीसाठी भिजलेले हरभरे घेवून देवापुढे असलेल्या मोठ्या पितळी समईत तेल घालून सगळे साहित्य घेऊन ती सोप्यात आली . दोन मिनिट शांत उभे राहून समधानी चेहऱ्याने सगळ नीट आहे न ते न्याहाळून आणि पहिलं आणि अत्यंत सत्विकपणे , भक्तीने पाहिले हळदीकुंकू तिने गौरीला दिले लगेच मला पाटावर बसवून हळदी कुंकू दिले , ज्योतीला पण तिचे आता लग्न ठरले आहे म्हणत पाटावर बसवले मग वाड्यात माहेरी आलेल्या विद्याला हाक मारली तोवर गावातच सासर असलेली पण मळ्यात राहणारी छाया ताई पण जायला अंधार होऊ नये म्हणत लवकरच रुमालात जाईजुईची फुले घेऊन आली . 

सगळ्या माहेरवाशिणीना आई गौरीच्या रूपात पाहतेय असे वाटत होते . गावात ब्राम्हणाची 25 एक घर होती तर सोनार , तेली , वाणी यांच्या घरी सुद्धा कोळ्याच्या भागाबाई कडून आमंत्रण गेले होते . जवळजवळ 50 बायका तरी आज येणार होत्या . 

आईने कोपऱ्यात खुर्चीवर तिनेच केव्हा तरुणपणी पांढऱ्या दोऱ्यानी विणलेला कोयऱ्या कोयाऱ्याचा रुमाल टाकून ते ताट त्यावर ठेवले आणि बायकांची वाट पाहत बसली पाच वाजता तर तिची जय्यत तयारी झालेली होती . माझ्याबरोबर साडेचार वर्षाचा मनीष होता . त्याला ह्या सगळ्याच भारी आप्रुप वाटत होते . आणि आई-काकांना त्याचं कौतुक होतं तो पण आगदी लाडाने त्यांच्याकडून सगळ करून घेत होता . त्याच सगळ लक्ष गौरी समोरच्या फराळावर होतं . आईने पण पटकन नैवेद्य दाखवला आणि

" लहान मुलं म्हणजे कृष्णाचा अवतार असतात " .

म्हणत त्याच्या पुढ्यात लाडवाचा डबाच ठेवला .

त्यानेही दोन हातात दोन लाडू उचलले आणि खाल्ले आई कौतुक भरल्या नजरेने त्याच्याकडे पाहत होती . खोड्याच गाऱ्हाणं गात होती तोपर्यंत तो अंगणात वाड्यातील मुलासोबत मस्ती करण्यासाठी निघून गेला , त्यांच्यात रमून गेला . बायकांची गर्दी सुरू झाली तशी आईने काकांना त्याच्यावर लक्ष ठेवायला सांगितले आणि आम्ही सगळे सोप्यात येऊन बसलो .

आज सगळ्यांना हा कुतूहलाचा विषय होता की भाऊकाकानी काकीनी मुलींना शिकवलं आणि शिक्षण संपलं की वेचून काढल्यासारखे जावई आगदी वेळेत शोधले .

ज्योतीपण त्या दिवशी माझी साडी नेसून तिनेच डिझाईन केलेलं ब्लाऊज घालून , वेणी गजरा घालून छान तयार झाली होती . ती पण देखणी , घवघवीत , रसरशीत दिसत होती . रांगोळी , आरास , ब्लाऊज या सगळ्याचं बायका अगदी भरभरून कौतुक करत होत्या . चेष्टा , मस्करी , हसणे आणि उखण्याची तर चढाओढ लागली होती . उषा वहिनींनी त्यांचा खास उखाणा गाण्यातून घेतला . तर रमा काकू , प्रभा काकू , अरविंद काकी , देशपांडे वहिनी , शांता वहिनी , पिलू वहिनी आणि बऱ्याच जणी त्या स्पर्धेत होत्या .

" ज्योती लक्ष देऊन ऐक ग , मी नाव घेते आता ते ऐक तुला नक्कीच उपयोगी पडेल " .

असे म्हणत अलंकारीक उखाणे घेत होत्या . तोतो ज्योती लाजेने चुर होत होती . नेमकी आज दुपारीच मुकुंद घळसासी यांची फक्त

" Miss you "

अशी तार आली होती आणि जवळजवळ वाड्यात सगळ्यांना ते माहीत झाले होते . त्यामुळे वाड्यातील तिच्याबरोबरची सगळी भाचे कंपनी , भावंडं , वहिनी तिला चीडवण्याची एकही संधी सोडत नव्हते काका तर हसतच म्हणू लागले  

" मायला मागच्या आठवड्यात यांची ओळख पण नव्हती न लगेच miss you कसं काय ? "

मला पण ज्योतीला छळायला मजा येत होती . हळदी कुंकवाच्या धामधुमीत दोन तीन तास कसे गेले समजले नाही मग गौर उतरवण्यापूर्वी वाड्यातील पुरुषांना डाळ पन्हं घ्यायला बोलावलं पुन्हा गप्पांचा फड रंगला डाळ कित्ती खमंग लागते म्हणत , ज्योतीचे , तिच्या कलेचं , दिसण्याच कौतुक करत डाळीचा डबल राऊंड फिरवून झाला . तिथल्या रीतीनुसार वाड्यात घरोघरी फराळाची ताटे गेली . सगळे आवरून झाले आईने

" शरू , तुझं पोरगं दोडाच किती गुण करतं ग आणि गोंडस दिसतं सगळ्यांच्या नजरेत भरतं आणि मग दृष्टावत , आण मीठ मोहऱ्या , काढते लेकराची दृष्ट , सुखानी जावा बाई तुमच्या तुमच्या घरी "

असे म्हणत मनीषची दृष्ट काढली . लगेच ज्योतीला पण म्हणाली

" या तुम्हीपण , नाचनाचायचं आणि पुन्हा फ्या म्हणून पडायचं ".

असे म्हणत दोघांची दृष्ट काढून दोन्ही हातांची बोटं कपाळाभोवती दुमडून कडकडून मोडली . मी घेरडीत आले की आई जरा घाबरायची कारण दोनतीन वेळा मनिष तिथे गेला की आजारी पडला होता . इथे चांगला दवाखाना नाही म्हणत पळत सुटावे लागे . मी घेरडीत येणार म्हणलं की पहिलं काका नारळ आणून ठेवायचे . संध्याकाळी सोप्याच्या पाठभिंतीत असलेल्या नरसोबाला मनीष कडून नारळ फोडण्याचा कार्यक्रमच असायचा . 

सोप्यातली सगळी आवराआवर झाली .

मग जेवणे करून झोपायला आम्हाला रात्रीचे आकरा वाजले . 

माझे दोन तीन दिवस लग्नाची चर्चा , नियोजन करण्यात कसे गेले समजले नाही . मला सोमवारी बँक होती म्हणून मी रविवारी बर्शीला जाणार होते . आम्ही जेवणे करून आवरुन पारा गाडी संगोल्याहून आली की जाऊ असे म्हणत बसलो होतो , काका गाडीचा अंदाज घ्यायला पेठेत गेले होते आणि गाडीचा आवाज आला म्हणून मी निघायच्या तयारीत होते तर काका परत आले आणि येताना त्यांच्याबरोबर तायडी आणि एमबीके भाऊजी आले होते . आता ती काय सांगते ते ऐकण्यासाठी आम्ही उस्तुकतेने तिच्याभोवती जमलो . आईने तिला सरबत दिले मग तिने उत्साहात सांगितले 

" 20 एप्रिलला किर्लोस्कर वाडीला लग्नाच्या पक्क्या याद्या , लग्नाची तारीख काढणे आणि साखरपुडा करण्याचे पक्के करून आलो आहे " .

सगळं अगदी पटापट ठरत होते . कारण नाना म्हणजे मुलाच्या वडिलांचे आणि काकांचे त्यादिवशी असे बोलणे झाले होते की जूनमध्ये मुहूर्त आहेत तर कशाला लांबवायचे , उडवून टाकू बार लगेच . मग त्या दृष्टीने या हालचाली होत होत्या . तायडी आणि भाऊजी कराडला जाऊन साखरपुड्याचे पक्के करून आले होते . येणाऱ्या गुरुवारी साखरपुडा होता मग तायडी येतानाच लुकतुकेना जेवणाची ऑर्डर , दारात छोटासा मंडप घालायची ऑर्डर ही कामे करून आली होती . तिने आईकाकांच होत असलेले उतारवय , घेरडीत होणाऱ्या गैरसोयी याचा विचार करत सगळा पुढाकार घेतला होता 

" आईकाका आपल्या मुली-जवयाना मुलाप्रमाणे मानतात तर आपण पण त्यांच्या जबाबदाऱ्या घ्यायला हव्यात " 

असे म्हणत तिने ज्योतीच्या लग्नाची तयारी करायला सुरुवात केली होती . आणि त्याप्रमाणे तिने कृती केली होती . 

आता गाडी पाऱ्याहून यायची वेळ झाली होती त्यामुळे 19 तारखेला आम्ही साखरपुड्याला वाडीला येतो असा निरोप घेऊन मी बार्शीला निघाले . 

रिटायर झाल्यापासून काकांची बैठक सोपान कांबळेच्या सायकल दुकानात असे . मला स्टँडवर सोडून काका दुकानात बसले नेमके अंता काका पण आले होते . काका सगळ्यांना कौतुकाने ज्योतीच्या साखरपुड्याचे सांगत होते . तसेच बेबीने कसं सगळं परस्पर पण अगदी व्यवस्थित नियोजन केले हे सांगत होते .भाऊ काकांना सगळ्या मुलीच आहेत कसं होणार असे म्हणणारे आता उलट म्हणू लागले . ज्यांना मुलं आहेत ते नीट पाहत नाहीत काय करायचं मुलांना त्यापेक्षा मुली बऱ्या . आई वडिलांना पाहतात तरी असे उघडउघड काका समोर म्हणायचे आईला पण बरेच जण हल्ली म्हणत असत 

" सगळ्या मुली आहेत तुम्हाला पण नशीबवान आहात तुम्ही , मुलं तरी काय देतात " .

आई-काका मात्र यावर काही बोलत नसत . शांत असायचे , त्यांनी एकूणच जीवनशैली ठरवली होती . काय कसे आणि कधी करायचे याच त्यांचं पूर्णपणे नियोजन झाले होते . त्यांना काळजी फक्त संजूची होती . आई अध्यात्मिक होती 

" जे पूर्वसंचित आहे त्याप्रमाणे होणार आपण त्यात काही बदल करू शकत नाही "

असे ती म्हणत असे तर काका मात्र संजूची काळजी तर करायचेच पण बरोबर तिच्यावर अती जीव टाकत होते . संजूला कोणी बोललेले त्यांना पटत नसे . यावरून आई-काका मधे पण विसंवाद व्हायचे .

      घेरडीहून बार्शीत आल्याबरोबर मी ज्योतीच्या साखरपुड्याचा यांना सगळा वृत्तान्त सांगितला आणि दोन दिवसात आम्ही वाडीला जायची तयारी करू लागलो . काकांनी कपडा खरेदी जवळ्यात केली तर सोन खरेदी सांगलीत गाडगीळकडे करुन वाडीला जा असे तायडीला सांगितले . 

मायडी बदलापूरहून तर गोंदामामा सोलापूर हून यावा यासाठी काकांनी सांगोल्यात येऊन फोन केले . ठरल्याप्रमाणे 19 तारखेला घेरडीहून मोहन आण्णाचे घर , आमचे घर , आम्ही , मयाडी , गोंदा मामा एकएक करत संध्याकाळपर्यंत किर्लोस्करवाडीत हजर झालो . उद्या साखरपुडा होणार होता आज जय्यत तयारी झाली होती . आनंदाला उधाण आलं होतं , दरात मंडपात बसून गप्पांचे फड रंगले होते . ज्योतीच्या मेंदीला रंग चढत होता तिला नव्या नवरीचे तेज आले होते त्यामुळे ती अधिकच उठावदार दिसत होती . घरात तिच्या मोठ्या बहिणी भाऊजी सगळ्यांनी चिडवून तिला बेजार केले होते तर तायडीच्या मुली , धनु तिच्या भोवती घुटमळत होती एकूणच तायडीचे कुटुंब ज्योती मधे गुंतले होते . गाणी , भेंड्या सुरु होत्या तर कोणी आपल्याच डाव्या हातावर उजव्या हाताने मेंदी रेखाटत होते . रात्रीचे आकरा वाजून गेले होते पण कोणीही झोपण्याच्या मनस्थितीत नव्हते . सगळ्यांचा मजा करण्याचा मुड होता . मग नेहमीच्या स्टाईलने काकांनी आवाज दिला 

" चला बास झाल्या गप्पा उद्या पाहुणे लवकर येणार आहेत सगळ्यांनी पहाटे उठायचं आहे त्यामुळे पटापट झोपा सगळे ".

आणि त्यांनी लाईट पण बंद केले . आम्ही सगळ्या बहिणी , आई , उषा वहिनी , चीमु , शुभांगी मामी अंथरुणावर पडून पुन्हा बराच वेळ लग्न कसे जमले , मुलगा कसा आहे , काय करतो याविषयी गप्पा मारत होतो. केव्हा झोपलो कळले नाही तोवर उठायची वेळ झाली .







Saturday, May 1, 2021

कोंदण भाग 5

प्रकरण 25 वे


24/04/2021


माझे लग्न


        आठवड्यावर माझं लग्न आलं आणि घेरडीसारखं बार्शीत सुद्धा घर माणसांनी गच्च भरुन गेलं . मला खूप आनंद होत होता कारण मी जसं बार्शीत येऊन राहिले तसे माझे कुठेही जाणे झाले नव्हते आई-काका , संजू जाऊन आले होते पण रजेच्या कारणाने मला हलता येत नव्हते . आणि मी बँकेत जाॕईन व्हायला घेरडीतून निघालेली  ते पुन्हा घेरडीला न जाताच माझं लग्न होणार होतं . आमचं वऱ्हाड घेरडी व बार्शी या दोन ठिकाणाहून निघणार होतं . काही जण बार्शीला आले होते पण राहिलेल्या लोकांना घेरडीहून सोलापूरला आणण्याची काकांनी व्यवस्था केली होती . बार्शीत भाड्याचं घर त्यामुळे अनेक मर्यादा येत होत्या . पण त्याकडे लक्ष न देता इथे वेगळ काय मिळतं व त्यातून कसा आनंद मिळवायचा व संपुर्ण घर हसतं खेळतं कसं ठेवायचं यासाठी आई-काकांंना आदर्श म्हणूनच पहाव लागेल . 

          आता शरुचं लग्न झालं की आपण घेरडीला जाऊ पुन्हा कधी ही संधी मिळेल म्हणत सगळ्या लेकी-जावई नातवंडं जमल्यानंतर देवब्राम्हणादिवशी पहाटे भगवंताची महापूजा केली . मला अजूनही या गोष्टीचं राहूनराहून आश्चर्य वाटतं की चौथ्या मुलीचं लग्न तितक्याच म्हणण्यापेक्षा काकणभर जास्तच उत्साने आई-काकांंनी कसं केलं असेल ? किती ते कौतुक आणि किती माया , प्रेम ! पाहूणे रावळे वाढले तर कधी चिंता नाही की चिडचीड नाही . बार्शीत आग्रवालकडे रबडी छान मिळते , आंबे छान मिळतात , चार पैसे सोडले की वरकामाला ,  स्वयंपाकाला , बाकी कामाला बायका मिळतात म्हणत रोज एक काहीतरी काकांनी आणायचं आणि आईने व्यवस्थित नियोजन करत चविष्ट पदार्थानी सर्वांना तृप्त करायचं ! आता घरामध्ये आम्हा बहिणींबरोबर एमबीके भाऊजी व एसके भाऊजी आणि नातवंडांच्या गोतावळ्यांनी घर फुलून आलं होतं . त्याचबरोबर गोंदा मामा , उषा वहिनी , प्रभा काकू , तायडीच्या सासूबाई ही मंडळी पण आली होती मग घरामध्ये चेष्टा मस्करी , खाणपीणं आणि गप्पांचे फड रंगलेले असायचे . आठवडाभर पंचवीस तीस माणूस तरी नक्कीच घरात होतं . पद्माकर काकांच कुटुंब जाऊन येऊन असायचं . एकूणच कशाचीही उणीव भासत नव्हती . अगदी घेरडीतल्या सारखेच घरी बांगड्या भरणे , मेंदी , जातीपूजन सगळं यथासांग पार पडले . सोलापूर तसं बार्शीपासून दीड तासाच्या अंतरावर त्यामुळे दुपारची जेवणं झाल्यावर आम्ही तीनच्या नाॕनस्टाॕपने सोलापूरला गेलो . पाच वाजता तर आम्ही कार्यालयात पोहोचलो ! माझ्या मैत्रीणी आणि घेरडीची मंडळी सहा वाजता आली आणि सहा महिन्यांनी खूप जणांच्या भेटी झाल्या . प्रत्येकाला पाहून मला भरुन येत होतं . श्रीमंतपूजन , लग्न अगदी थाटामाटात पार पडले . आता या लग्नकार्याची ,  प्रत्येक समारंभाची व शेवटी नवरीची पाठवणी करायची जणू आमच्याकडे सवय झाल्यासारखे झाले होते . तसे आई थोडंस रडून रिकामी होई पण काका मात्र जेवणे झाली की चेहरा लपवत अस्वस्थपणे इकडून तिकडे करत असत तसे ते हळवेच होते . माझी पण अवस्था फारशी वेगळी नव्हती . एकीकडे भावनावश होत रडणं तर दुसरीकडे नव्याची नवलाई मला खुणावत होती . परांड्याहून वऱ्हाड स्पेशल बसने आलं होतं . आता वऱ्हाडाची बस मला घेऊन सोलापूरहून बार्शीमार्गे  परांड्याला जाणार होती . 

       आमची दोन्ही कुटुंबे दोन टोके असल्याचे मला जाणवत होते . घेरडीच्या वातावरणात मोकळेपणा होता , चेष्टामस्करी व हसतखेळत बोलणं असायचं . तसं आमच्या दोघांच्या बऱ्याच भेटी झाल्यामुळे हेच मला जास्त ओळखीचे वाटत होते . ह्यांचे आमच्याकडे बऱ्यापैकी येणंजाणं झालंं होतं त्यामुळे ह्यांना आमच्या घरातील वातावरणाची पुर्ण कल्पना आली होती व मला थोडंस अवघडल्यासारखे वाटणार याची त्यांना कल्पना आली होती . सासुबाई म्हणजे काकी अगदीच जुजबी म्हणजे कामापुरतंच बोलत होत्या तर नणंदबाई अजिबातच बोलत नव्हत्या . बसमध्ये आम्ही बसलो बस निघाली तरी माझं रडणं सुरु होतं व शेजारी हे बसलेले काय कराव हे त्यांना समजत नव्हते वैराग आलं तसं हे थोडंस वेगळा विषय काढून बोलू लागले . वैरागमध्ये चहाला गाडी थांबली होती ह्यांचे मामा-मामी माझ्याशी बोलू लागले मग मला जरा हायसं वाटलं . परत गाडीत येताना यांनी माझ्यासाठी बानारस पान आणलं . पुढे आर्ध्या तासातच बार्शी आलं पण बार्शी मागे टाकताना मला मात्र हूरहूर वाटली तसं बार्शी काही आमचं मूळ गाव नव्हते पण सहा महिन्यापासून माझे बार्शीत वास्तव्य होते . साधारणपणे सातच्या दरम्यान आम्ही परांड्यात पोहोचलो मग लक्ष्मीपूजन झाले .

काकींचे माहेर शेजारी होते तर त्यांच्या दोन बहिणी पण शेजारीच रहात होत्या त्यामुळे लक्ष्मीपूजन झाले की सगळे पाहूणे आपापल्या घरी गेले त्यामुळे आमच्या घरी फारसे पाहूणे नव्हते , ह्यांच्या एक आत्या व आणखी दोघी कोणीतरी होत्या तसं घरात शांत शांत वाटत होतं . त्यामुळे मला परांडा घेरडी दोन्ही घराणी पुर्णपणे भिन्न संस्कृती असल्याचे जाणवले त्याचं मला खूप दडपण आलं होतं . यांनी मात्र सुरुवातीपासुनच अगदी सतर्कतेची भुमिका घेतली होती . सुनिल भाऊजी मात्र माझ्याशी एकदम मोकळेपणाने बोलत होते तेही बँकेत होते त्यामुळे आम्हाला तिघांना गप्पांना विषय होता . काका म्हणजे सासरे तेही फारसे बोलत नव्हते .

        मला बऱ्याच प्रयत्नांनी एकूण सतरा दिवसांची रजा मिळाली होती . देवब्राम्हणा पासून मी रजेवर होते मग बार्शीतच माझी येतीजाती करायची व नंतर आई-काका बिऱ्हाड घेरडीला हलवणार असे ठरले होते . चारपाच दिवसांनी सकाळी आठ वाजता काका मला येतीजातीसाठी बार्शीला नेण्यासाठी परांड्यात आले . त्यादिवशी आषाढ महिना सुरु झाला होता तर नव्या सुनेनं पहिल्या आषाढात सासूच तोंड पहायचं नसतं म्हणून मी उठण्यापुर्वी पहाटेच काकी त्यांच्या भावाकडे जाऊन बसल्या ! आमचे काका आल्यावर त्यांना  हे समजले ते इतकं हसू लागले आणि म्हणाले

" हाच तो पश्चिम महाराष्ट्रात व मराठवाड्यात फरक आहे . हे सगळे  रितीरिवाज खूप जुने आहेत आजकाल कोणी हे पाळत नाहीत पण अजूनही  मराठवाड्यातील लोक जुन्या  रितीरिवाजांना  घट्ट पकडून आहेत म्हणून  त्यांची 33% मानसिकता आहे असे म्हणले जाते ". 

काका बोलतांना फार स्पष्टपणे बोलायचे . काका आले म्हणून यांचे मामा घरी आले होते त्यांच्याशी काकांनी अशा गप्पा मारल्या तर सगळे हसू लागले व बरोबर आहे असेही म्हणू लागले . मी व काका बार्शीला आलो . इकडे आई व संजू माझी वाटच पहात बसल्या होत्या . दिवसभर आई-काकांशी मी गप्पा मारत होते तर आई व मी रात्री पुन्हा पहाटेपर्यंत गप्पा मारत बसलो होते . आईला मुली आल्यावर रात्री बराचवेळ गप्पा मारायची सवय होती . या गप्पासुद्धा तिच्या कधीही चुगलीखोर किंवा कान भरण्याच्या नसायच्या मुलगी खूष आहे ना याची चाचपणी असायची ती . तर आपल्या मुली कशा वागतात यावरही तिचे लक्ष असे वेळ पडली तर ती मुलींचीच कानउघडणी करायची . दुसरे दिवशी हे लग्नानंतर पहिल्यांदा बार्शीला येणार होते व एक दिवस राहून आम्ही महाबळेश्वरला जाणार होतो . पुन्हा पहिल्यांदा जावई सासुरवाडीला आले  म्हणून कोडकौतुकाला अगदी उधाण आलंं होतं .

        बार्शीत आम्ही फुलवारा चौकात रहात होतो सकाळी सहापासून आमच्या दारातच फुलांचे लिलाव व्हायचे . तो सिझन मोगऱ्याचा होता यांना अत्तर , उदबत्ती , परफ्युम , सुवासिक फुले मानापासून आवडतात त्यामुळे मोगऱ्याचा ढीग दारात पाहून ते इतके खूष झाले . अर्ध्या तासांने बाहेर जाऊन त्यांनी जादा पैसे देऊन फुलवाल्याकडून मोगऱ्याचे स्पेशल गजरे करुन आणले ते पाहून आई खूप खूष झाली व म्हणाली 

" शरु , काळजी करायचं काही कारण नाही परांडकर स्वतः खूप हौशी आहेत बघ , न सांगता एखादी गोष्ट नवऱ्याला समजली की तो दर्दी आहे असं समजावं ".

आणि हे मनोमन हसले . तसा यांचा स्वभाव थोडासा भिडस्तच होता पण अंदाज घेत ते दिलखुलास होत असत . तशी पाचसहा महिन्यात चांगली ओळख झाली होती व आई-काका पण चेष्टेत बोलत असत . महाबळेश्वरला जाण्यासाठी आम्ही जेवणे वगैरे करुन लवकरच निघालो चार वाजता पुण्यात पोहोचलो त्यादिवशी आम्ही पुण्यात फिरलो व दुसरे दिवशी महाबळेश्वरला रवाना झालो . चारपाच दिवस खूप मजेत गेले त्यादरम्यान काकांनी बार्शीहून बिऱ्हाड उचलले होते . आणि घेरडीतील लोक म्हणाले त्याप्रमाणे काकांनी घेरडीतून उचललेले बिऱ्हाड सहा महिन्यातच माझं लग्न करुन देऊन पुन्हा घेरडीत नेले होते . आम्ही महाबळेश्वरहून आल्यावर डायरेक्ट परांड्याला गेलो .

या ट्रीप दरम्यान खूप मजा आली व यांनी सांगितलेले किस्से आठवले तर आजही हसू येते .

        पहिला किस्सा म्हणजे पहिल्यांदा स्थळासाठी काका यांना बँकेत जाऊन भेटले व पत्रिका देऊन आले तर दुसरे दिवशी हे खातं उघडायच्या बहाण्याने आमच्या बँकेत आले होते व माझ्या काऊंटरसमोर उभे राहून फाॕर्म भरत मला व्यवस्थित पाहून गेले होते त्याची मला सुताराम कल्पना नव्हती . तर दुसरा किस्सा म्हणजे आमचा दाखवण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर एका शनिवारी बँक सुटल्यानंतर मी गड्ड्याच्या यात्रेसाठी चंदूकाकाबरोबर सोलापूरला निघाले होते नेमके त्याच वेळेस हे परांड्याला जाण्यासाठी स्टँडवर आल्यावर त्यांना मी दिसले होते . तर हे जवळून दोन चकरा मारुन गेले तरी मला समजले नव्हते म्हणे ! अशा प्रकारे त्यांनी लग्न ठरण्यापुर्वी तीन वेळेस मला पाहिलं होतं पण मी मात्र यांना एकदाच भेटले होते ! 

       महाबळेश्वर ट्रीपमध्ये त्यांनी बोलण्याची सुरुवात एकूणच मोकळेपणानं केली होती . घरातील वातावरण समजून घ्यावं अशी त्यांची तळमळ मला दिसून आली . तीनचार वर्षापासून बहिणीच्या लग्नाचं पहातात पण जमले नाही मग यांना उशीर होऊ लागला मग एक लग्न झालं तर दुसरं होतं असे म्हणून यांच्यासाठी पहायला सुरुवात केली तर लगेच आमचं लग्न जमले होते व झाले त्यामुळे मुलीच्या आधीच मुलाचं लग्न करावे लागणार मग लोक काय म्हणतील म्हणत घरातील वातावरण थोडंस तंग झाले होते . बहिणीचं लग्नाच पहातोच आहे तीचं झालं की लगेचच भावाचं पण करणार आहोत मग सगळी मजा येईल . तर थोडे दिवस आपल्याला समजूतीनं वागावं लागेल . घरात मी मोठा आहे  तू यादरम्यान मला समजून घ्यावस . आपण दोघेही छान नोकरी करतो आपला जम बसायला काहीच अडचण नाही . 

     घेरडीत मुलींमध्ये माझा चौथा नंबर होता त्यामुळे बऱ्यापैकी लहान म्हणून लाडावलेली , थोडासा स्वभावात अल्लडपणा , खोडकरपणा होता ते इकडे आले की हे सर्वात मोठे मग त्यांची बायको म्हणून सगळच बदललं मी वयाने लहान असले तरी मानाने मोठेपणाचं शिक्कामोर्तब झालं . त्यामुळे मला वागण्यात जाणिवपूर्वक जबाबरपणा , समजूतदारपणा आणावा लागला व मी त्यांना पुर्णपणे आश्वस्त केलं . हे जेव्हा मी येतीजातीला आले तेव्हा आई-काकांना सांगितले तर त्या दोघांनी पण

" परांडकरांचे म्हणणे अगदी बरोबर आहे तू ते काही  अडचणीत पडतील असं वागू नकोस आम्हांला पाच मुली आहेत तशीच तुला ती अजून एक बहिण आहे असे समज  तुमच्या घरात ती दोन्ही लग्न झाली की सगळं व्यवस्थित होईल . लग्न जमत नाही म्हणून सगळे हवालदील झालेत व ते सहाजीकच आहे ".

      आमची रजा संपली व आमचे रुटीन सुरु झाले . आई-काका सहा महिने फेरफटका मारुन पुन्हा घेरडीत स्थीरस्थावर झाले . काकांना व एकूणच घेरडीत माझ्या नोकरीचे खूप आप्रुप वाटायचे . एकूणच माझी नोकरी , जावई पण सरकारी बँकेत , तेही दोघेपण एकाच गावात त्यामुळे नोकरीनिमित्त आम्हांला वेगळ रहावं लागणार नव्हत . शरुचं  सगळं कसं व्यवस्थित रांकेला लावलं याबाबत काका स्वतःवर खूष होते . तसेच काका यांच्यावर पण मनोमन खूष होते . 

" परांडकर धोरणी , चाणाक्ष आहेत , त्यांना व्यवहारी ज्ञान भरपूर आहे व ते जबाबदारीने वागतात बरोबर मॕनेज करतील ही खात्री आहे काळजीचं काहीच कारण नाही ".

असं काका म्हणायचे . आता घेरडीत माझ्या पाठोपाठ मोहन आण्णाची मुलगी चिमू लग्नाची होती .  तिला काका बँकेच्या परिक्षा दे म्हणून मागे लागत तर ज्योतीने पण काॕमर्सला जावे व बँकेची परिक्षा दिली तर नोकरी लागायला , लग्न जमायला सोपं जाईल असं त्यांना वाटायचं . आता घरात आई-काका व संजू तिघेच रहायचे त्यांनी शेतीचा व्याप बराचसा कमी करत आणला होता तसंच मुलींच्या जबाबदाऱ्या पण कमी होत चालल्या होत्या . आता त्यांना वाटायचे की मुलींना जिथे गरज आहे तिथे त्यांनी स्वतःचे घर घेऊन स्थीर झाले पाहिजे . ज्योती बदलापूरला शिकत होती , ती दिसायला छान दिसायची , चुणचुणीत व हुशार होती . संजू तर सगळ्या मुलींमध्ये सुंदर दिसत होती पण बुद्धीचा मंदपणा मात्र प्रकर्षाने जाणवत होता . ती शाळेत जायची पण इतर मुलांच्या तुलनेत हिची प्रगती होत नव्हती . शाळेतील सर्वजण ओळखीचे होते मग काकांची मुलगी म्हणून तिला सांभाळून घेणं सुरु झालं . काकांनी शाळेत जाऊन सांगितले होते

" आम्हांला आमच्या मुलीची पुर्ण कल्पना आहे तीला फक्त मुलींसोबत वावरायला मिळावं म्हणून शाळेत पाठवत आहोत तिला आलं पाहिजे हा अट्टाहास नाही . जेवढं येतं तेवढं करुदे ".

खेडेगाव होतं काकांची सगळीकडे उठबस होती मग शाळेनी पण सहकार्य केले व तिला पुढच्या वर्गात ढकलणे सुरु झाले .

      माझा लग्नानंतर पहिला सण मंगळागौरीचा आला . आणि जवळजवळ आठ महिन्यांनी मी घेरडीला जाणार होते . आम्ही दोघेही परांड्याहून रोज जाऊन येऊन करत होतो त्यामुळे काका मला नेण्यासाठी परांड्यात आले होते . आम्ही शनिवारी सकाळी बार्शीला आलो माझी बँक करुन दुपारी तीन नंतर घेरडीला गेलो . घेरडीला केव्हा एकदा पोहोचते असे मला झाले होते मला खूप आनंद झाला होता . रविवारी दिवसभर वाड्यात सगळ्यांकडे जाऊन आले शिवाय संध्याकाळी सगळेजण महादेवाला गेलो . सोमवारी हे पहिल्यांदा घेरडीला आले . मंगळागौरीची पूजा झाली व रात्रीच्या फराळाचा व खेळांचा खूप मोठा घाट आईने घातला होता . उखाणे , गाणी आणि खेळ आनंदाला अगदी उधाण आलं होतं . पहाटे तीन वाजेपर्यंत मंगळागौर जागवली . मला तीन दिवसांची रजा मिळाली होती त्यामुळे गुरुवारी बँकेत जाण्यासाठी मला बुधवारी परांड्याला जावे लागणार होते . तर बुधवारी मुलींना सासरी पाठवू नये 

"जाशील बुधी तर येशील कधी "

 असं होतं असे आई म्हणाली तर काका आईला म्हणाले 

" नविन असेपर्यंत शरुला तीन दिवसांचीच रजा मिळणार व सुट्टीला जोडून आणलं तर तिला नेहमीच बुधवारी जावे लागणार आहे त्यामुळे हे आपल्याला पाळता येणार नाही ".

आणि खरंचच नेहमीच मी बुधवारी घेरडीतून निघत असे . 

      माझी पहिली दिवाळी किर्लोस्करवाडीला झाली आई-काका संजू घेरडीहून , मायडीचे कुटुंब व ज्योती बदलापूरहून तर आम्ही दोघे परांड्याहून किर्लोस्करवाडीला गेलो आम्ही सगळ्या लेकी व जावई माझ्या लग्नानंतर पहिल्यांदा भेटलो पुन्हा गप्पा , चेष्टा , मस्करीला उधाण आलं . आम्ही सगळे नरसोबा वाडीला जाऊन आलो त्यावेळेस पण भारीच गंमत झाली आमच्या दोघांपैकी ह्यांना केळी खूप आवडतात तर मी केळीला हातच लावत नाही तर दुध म्हणजे मला जीव की प्राण तर यांना दुधाचा वास पण नाही आवडत चहा मात्र खूप लागतो पण घरचं ताक दही लोणी अगदी वर्ज्य पण तूप चालतं विकतची बासूंदी , श्रीखंड , दही चालतं अस शास्त्र आहे . घेरडीत मात्र सर्वांनाच दुग्धजन्य पदार्थ भरपूर आवडतात आणि लागतात . यांचे दुध न खाणे हा आमच्याकडे चर्चेचा विषय असायचा . आम्ही नरसोबावाडीला गेल्यावर सगळेजण तीसपस्तीस पायऱ्या उतरुन पाय धुवून वर आलो व दर्शन घेतलं तिथल्या प्रथेप्रमाणे पुजाऱ्यांनी पटपट सर्वांना भरपूर दहीदुध असलेला मोठा चमचाभर पंचामृत दिलं , यांची झाली पंचाईत ! कसतरी पटकन त्यांनी ते पीलं व तितक्याच पायऱ्या उतरुन ते तोंड हात धुवायला पुन्हा खाली गेले . आमच्याकडे सगळ्यांना त्या गोष्टीचे इतके आश्चर्य वाटले की विचारता सोय नाही . तिथून निघताना दिवाळी आहे म्हणून मोठा डबा भरुन तीन किलो बासूंदी घेतली व बसमध्ये चढताना यांनी डब्याची पिशवी घेतली व सीटखाली ठेवली वाडीत आल्यावर आम्ही घराजवळच्या स्टाॕवर उतरलो बस पुढे गेली व लक्षात आले की बसमध्ये बासूंदीचा डबा तसाच गेला ! यांना कससच झालं , आपण अगदीच लहान मुलांप्रमाणे वागतोय असे वाटू लागले . आधी तो पंचामृताचा किस्सा व आता बासूंदीचा ! एमबीके भाऊजींनी पटकन कोणाच्यातरी गाडीवर बसून स्टँड गाठले गाडी अजून उभी होती व सीटखाली डबा पण ! भाऊजी डबा घेऊन परत आल्यावर सगळ्यांना हुश्श्य झालं विशेषतः ह्यांना ! नंतर मात्र सगळे जमले की आजही हा विषय निघाला की सगळे हसत आसतात .

           पुढे डिसेंबरमध्ये माझ्याकडे गोड बातमीची चाहूल लागली व मला खूप त्रास होत होता मग जानेवारीमध्ये संक्रांत सण घेऊन आई आली होती तेव्हा आम्ही बार्शीत रहायला सुरुवात केली होती आई दोनतीन दिवस बार्शीत राहिली व सणासाठी आम्ही परांड्याला गेलो .आई  नविन बाळाची उत्सुकतेने वाट पहात व जाताना मात्र सगळे पुढचे नियोजन करत होती माझ्यावेळी मात्र आईला वेगळीच काळजी वाटायची ती म्हणजे आता हीला रजा कधी मिळणार घेरडीला कधी न्यायचं आणि मुख्य म्हणजे मायडीला पहिल्यावेळी झालेला त्रास व दवाखान्याची सोय नाही व माझी परिस्थिती याचा विचार करत एकीकडे काळजी तर एकीकडे आनंद अशा मनस्थितीत व नविन बाळाच्या स्वागताच्या तयारीत ती घेरडीला गेली !



प्रकरण 26 वे


माझं पहिलं बाळंतपण


05/05/2021


          पहिली दिवाळी साजरी करुन आम्ही  किर्लोस्करवाडीहून आधी परांड्यात व मग बार्शीला आलो . आम्ही दिवाळीत स्कूटर घेतली होती त्याकाळात गाडी असणं हे फार आप्रुप वाटायचं . आम्ही बार्शीत रहात होतो पण प्रत्येक शनिवारी परांड्याला जायचं व सोमवारी परत यायचं तसेच केव्हाही सुट्टी असेल तेव्हा , प्रत्येक सणाला जायचं व बँक असलेल्या दिवशी सकाळी यायचं हा अलिखित नियम होता थोडक्यात बँक नसली की आमचा मुक्काम परांड्यात असे . माझे डोहाळे खूपच त्रासदायक होते मला पाणीसुद्धा पचत नव्हतं .  फक्त आईस्क्रीम तेवढं चालायचं त्यामुळे रोज दुपारच्या सुट्टीत हे आईस्क्रीम घेऊन घरी यायचे व जाताना मला बँकेत सोडून जायचे . गमंत म्हणजे मला परांड्यात गेलं की काही होत नसे तिथे सगळं पचायचं व मी तिथे काम पण करायचे . तब्ब्येत तशी बरीच अशक्त झाली होती . तसं माझ्यावर बराचसा परिणाम हा  परांड्यातील वातावरणाचा झाला होता . एकदा तर मी यांना गंमतीने  म्हणाले 

" मला तर आपलं लग्न म्हणजे घरच्यांचा विरोध असतांना तुम्ही हट्टानं केलेलं लव्ह मॕरेज आहे असं वाटतंय ."

मी असे काही बोलले की यांना खूप अपराध्यासारखं वाटायचं .

" तसं काही नाही , तुला उगाच तसं वाटतं , घरच्यांना कमी बोलायला लागतं जरासं ."

असं म्हणत त्यांची सारवासारवी चालायची . खरंतर सासुबाई नणंद दोघी किंवा शेजारी , मामी यांच्याशी त्यांच्या भरपूर गप्पा चालायच्या माझ्याशी फक्त बोलत नसत . मग मी पण तो विषय सोडून देऊन जसं जमेल तसं अॕडजस्ट करायचं ठरवलं . एकमेकांना त्रास होणार नाही हे पहायचं व पुढे चालायचं असे अगदी ठरवूनच टाकले . माझा स्वभाव एकदम मोकळा , हौशी , बडबड्या व सतत हसरा असल्याने मला हे सगळं जमवायला फार कठीण गेलं . कोणताही सण , समारंभ असला की आम्ही परांड्यात असायचो पण त्यात कौतुक , उत्साह , खेळीमेळीचं वातावरण असं अजिबातच नसायचे . उलट वातावरण तंग असायचं कडक सोवळ ओवळ आणि कडक उपास याचं प्रमाण जास्तच होतं त्यामुळे हे सगळ पचनी पडायला मला त्रासदायक गेलं . माझ्याशी सुनील भाऊजी तेवढे गप्पा मारायचे , माझ्याशी कोणी बोलत नाही हे त्यांच्या पण लक्षात यायचं . त्यामुळे मला ह्यांच्यानंतर घरात भाऊजींचा आधार वाटायचा . हसतखेळत बोलणं काय ते फक्त त्यांच्याशी व्हायचं . ते काहीही आणलं की मला व नणंदेला अगदी एकसारखं आणायचे . 

          आम्ही जेव्हा दिवाळीला किर्लोस्करवाडीला गेलो तेव्हा चारपाच महिन्यांचा हा घरचा अनुभव माझ्यासाठी खूपच त्रासदायक झाला होता . सगळ्यांना ते समजत होतं बऱ्याच गप्पा झाल्या . तेव्हा मग आई-काका व तायडी यांनी मला अगदी समोर बसवून सांगितले होते .

" हे बघ हा सगळा कोरडा त्रास आहे .परांडकर स्वभावाने एक नंबर आहेत . तुला काही त्रास होणार नाही याची ते पुरेपूर दक्षता घेतात त्यांना परांड्यातील जबाबदारी आहे ती झटकून टाकता येणार नाही आता तू त्यांच्याबरोबर उभं राहिलं पाहिजेस त्यांची आडकित्त्यात सुपारी करायची नाही प्रतिभाचं लग्न झालं की वातावरण बदलून जाईल ही खात्री बाळग ."

त्यानंतर मी पण मग विचार करु लागले . सगळं सोडून द्यायला शिकले त्याचा योग्य परिणाम आमच्या दोघांवर झाला . सासू , सासरे , नणंद आणि नवरा अशा चार भूमिका ते एकटेच बजावत असत . आपल्या घरच्यांना कोणी नावं ठेऊ नयेत हा एकच त्यांचा उद्देश असायचा . पण हे सगळं करत असतांना त्यांची दमछाक व्हायची , खूपच त्रास व्हायचा पर्यायाने मला पण त्याच्या झळा बसायच्या . 

       आम्ही तीन महिने रोज परांडा-बार्शी जाऊनयेऊन केलं . पावसाळ्यात पाणी यायचं म्हणून बार्शीत घर केलं तर आमच्या बरोबरसुद्धा कोणी आलं नव्हतं उलट यांच्याशी पण बोलणं बंद केलं . पुढे दिवस गेल्यावरही कधी कोणी आलं नाही आम्हीच परांड्याला जायचो . तेव्हा आम्ही देशपांडे वाड्यात रहात होतो . आमचे घरमालक म्हणजे मम्मी व बाबा मला मुलगी मानत असत . मम्मी मात्र खूप कौतुक करायच्या  हवं नको पहायच्या . त्यांच्या चार दिरांची घरं शेजारी होती त्यांच्याकडे आमची बऱ्यापैकी उठबस असायची . त्याचदरम्यान आई दोनदा बार्शीला आली होती व दोन्हीही वेळेस ती आली की माझी तब्ब्येत जास्तच बिघडली होती व दोन्हीही वेळेस मला अॕडमीट करावे लागले होते त्यामुळे तिला जरा काळजी वाटायची . पण मम्मी व त्यांची जाऊ वर्षा वहिनीनी आईला खूप धीर दिला होता व सांगितले की

" तुम्ही सरिताची अजिबात काळजी करु नका काही झालं तर आम्ही आहोत पहायला ".

पद्माकर काकांनी पण आई-काकांना काळजी करु नका कमीजास्त पहायला आम्ही आहोत असे सांगितले  मग जरा आई बिनधास्तपणे घेरडीला गेली . आमच्या घरी मुलगा मुलगी समान धरलं जायचं पण मुलींपैकी कोणालाही दिवस गेले की आसपास , पाहुण्या रावळ्यात सगळ्यांचे कान अगदी टवकारलेले असायचे . आता हीला काय होणार याविषयी चर्चा असायची . आईपण मग तेवढ्या कालावधीत अस्वस्थ असायची . मग डोहाळे कसे आहेत यावरुन तर्क बांधले जायचे वाड्यात पण सगळ्या काकू , वहिनी चर्चा करायच्या . आईला माझी लक्षणं वेगळीच वाटायची त्यामुळे मला घेरडीला नेणं जरा धोकादायक वाटायचं . मग आई-काकांंनी चर्चा केली व ठरवलं आणि आम्हांला पण  आईने सांगितले

" घेरडीत काही दवाखान्याची सोय नाही , राणीच्या वेळी फजिती झाली होती आता परिक्षा नको पहायला . शरुला  जरा जास्तच त्रास होतोय तिचं  नाव बार्शीतल्या दवाखान्यात  घालू . गणपती झाल्यावरची  तिला तारीख दिलीय त्यावेळी  महालक्ष्म्या झाल्या की लगेच मी बार्शीला येईन व नंतर बाळंतीण झाली की तिला स्पेशल गाडी करुन घेरडीला नेईन . तोवर रजेचं पण कसंकसं आहे ते तुम्ही  बघा काय असेल ते व दवाखान्यात असल्याने बिनधास्त असेल काळजीचं कारण पण रहाणार नाही ."

       आम्ही पण मग त्याप्रमाणे करायचं ठरवलं . पुढे सातव्या महिन्यात आईने घेरडीला डोहाळजेवणाचा मोठ्ठा कार्यक्रम ठेवला होता . परांड्यात  डोहाळजेवण करण्याची आमच्याकडे पद्धत नाही म्हणून आईने सर्वांना घेरडीला यायचे आमंत्रण दिले होते पण घेरडीला पण कोणी आले नाही मग आम्ही दोघेच घेरडीला गेलो होतो . काकांनी पंढरपूरला जाऊन हार , गजरे , फुलं आणली होती . सोप्यात फुलांची सजावट केली होती व गावातील सगळ्या बायका जमल्या होत्या . आईने सगळ्यांसाठी फराळाचं केलेलं होतं . कोणताही कार्यक्रम असो घेरडीत बायका जमल्या की उत्साहाला अगदी उधाण येत असे . उखाणे व गाण्यांची अगदी चढाओढ लागली होती . उषा वहिनी व मावशी सुरेल आवाजात डोहाळे म्हणत होत्या . ह्यांना या सगळ्याचं भारी आप्रुप वाटत असे . ते म्हणत असत

"  खेडेगाव आहे पण घेरडीत असं निवांत व समाधानी वाटतं वातावरण एकदम आनंदी व चैतन्यमय असतं ." 

परांड्यात अजून लग्नाचा जम बसला नव्हता त्यामुळे दिवसेंदिवस ताण वाढतच होता . दोन्हीकडील वातावरणात असलेला फरक बघून यांना फार कसंतरी व्हायचं काय केलं तर सगळं एकदम सुरळीत होईल याचा विचार करुन करुन त्यांना दमायला व्हायचं . 

           पुन्हा आम्ही बार्शीला आलो मग मला प्रवासाचा त्रास व्हायला लागला म्हणून रविवारी हे एकटे परांड्याला जायचे व मी देशपांडे वाड्यात ! आता माझे दिवस भरत आले होते तरी माझ्या उलट्या बंद झाल्या नव्हत्या . पंधरा दिवस आधी आराम असावा म्हणून मी 20 आॕगस्ट सोमवारपासून रजा घेतली होती . 18 आॕगस्टला रात्री 10 वाजता आमचे घरमालक बाबांच्या आईचे सोलापूरला अचानकपणे निधन झाल्याचे समजले व सगळेजण रात्री 11 वाजता सोलापूरला गेले . आख्ख्या वाड्यात आम्ही दोघेजणच होतो . दुसरे दिवशी रविवार होता पण वाड्यात कोणी नाही म्हणून हे परांड्याला गेले नाही . मला अस्वस्थ वाटत होतं म्हणून आम्ही डॉ.यादवच्या दवाखान्यात जाऊन आलो तर रविवार सुट्टीमुळे डाॕक्टर गावाला गेल्या होत्या त्या भेटल्याच नाहीत . फार काही होत नसेल तर उद्या या असे आम्हांला दवाखान्यातून सांगितले मग आम्ही घरी आलो मी स्वयंपाक केला व जेवण करुन आराम केला पाच वाजता मात्र मला पोटातच दुखायला लागलं . काहीच समजेना म्हणून  हे पद्माकर काकांच्या घरी जाऊन काकूंना घेऊन आले . त्या म्हणाल्या 

" जरी दिलेली तारीख लांब असली तरी आपण आता यादव डाॕक्टरकडे जाऊ त्या नसतील तर आपण दुसरीकडे घेऊन जाऊ पण आता घरी नको थांबायला ".

मग आम्ही रिक्षाने दवाखान्यात गेलो अजून यादव मॕडम आल्या नव्हत्या म्हणून रिक्षा तशीच माढेकर हाॕस्पिटलला नेली तर तिथे मला अॕडमीट करायला सांगितले . हे मात्र पुरते गोंधळून गेले होते करावे यांना समजेना तशात त्यांनी डाॕक्टरना विचारलं

" दिलेली तारिख लांब आहे मग कसं अॕडमीट करायचं एकदोन दिवसात तिच्या आईला बोलावतो तोवर चालेल का "

मग डाॕक्टरनी हसूनच सांगितले कोणी असो नसो ती दवाखान्यात आहे आणि आज डिलीव्हरी होणार शक्य असेल कोणाला बोलावणं तर बोलवा नाहीतर तुम्ही व आम्ही आहोतच ".

       तोवर संध्याकाळचे सात वाजायला आले मग यांनी बसस्टाॕपवर जाऊन परांड्याला घरी मला अॕडमीट केल्याचा  निरोप दिला . शेवट गाडीने दहा वाजता काका-काकी आमच्या लग्नानंतर पहिल्यांदा बार्शीला आले तोवर पद्माकर काका पण आले व 19 आॕगस्टला रात्री आकरा वाजता मी सुखरूपपणे मुलाला जन्म पण दिला आणि माझी मॕटर्निटी लीव्ह 20 आॕगस्टपासून सुरु झाली !

    डाॕक्टरनी दिलेल्या तारखेच्या जवळजवळ  पंधरा दिवस आधी बाळाचा जन्म झाला होता . बाळ  एकदम गुटगुटीत साडेनऊ पाऊंडाचे होते . सगळी फजिती झाली होती पण आनंदाला उधाण आलं होतं . आता घेरडीला निरोप जाणे गरजेचे होते . पद्माकर काका ह्यांना म्हणाले 

" परांडकर मी रात्रीच्याच गाडीने निघतो म्हणजे सकाळपर्यंत घेरडीला पोहोचतो . जरा आवराआवारी करुन एकदोन दिवसांत भाऊसाहेबांना यायला सांगतो तोवर आमच्या घरुन डबा देतो ."

तोवर पुन्हा काका-काकींना बार्शीतलं काहीच माहित नाही म्हणून त्यांना घरी सोडणं त्यांची  जेवणाची व्यवस्था सगळं करुन परत दवाखाना अशी यांची पळापळ सुरु होती .

        पद्माकर काकांना रात्री दोन वाजताच्या गाडीत यांनी बसवून दिलं . अशी संध्याकाळी पाच वाजल्यापासून यांची एकट्याचीच स्कूटरवरुन प्रत्येकाला आणायला व सोडायला धावपळ चालू होती . पण बाळ बाळंतीण एकदम मस्त होते त्यामुळे आनंदात सगळी कामं होत राहिली . 

        तेव्हा फोन नव्हते काही समजायला मार्ग नव्हता त्यामुळे यांनी बसमधून परांड्याला घरी निरोप दिला होता तर सुनिल भाऊजींना निरोप मिळताच त्यांनी परांड्यात  दोन किलो पेढे वाटले व दुपारी दोन वाजता दवाखान्यात हजर झाले . त्यांना पण खूप आनंद झाला होता त्यादिवशी श्रावणपोळा होता काकी त्यांना पूजेचं विचारु लागल्या तर ते म्हणाले 

" मला वाटलच होतं इथ काहीतरी गडबड असणार म्हणून मी सकाळीच सगळं केलय , पूजा नैवेद्य करुन आलोय  . आता तू परांड्यातली काही काळजी करु नकोस वहिनी घेरडीला जाईपर्यंत तू इथच थांब काकांना परांड्याला घेऊन जातो तू रहा .

        इकडे पद्माकर काका सकाळी सात वाजताच घेरडीत पोहोचले . स्टँडवर त्यांना आंता काका भेटले . आंता काका तंबाखू चोळत सांगोल्याला जाण्यासाठी बसची वाट पहात उभे होते . पद्माकर काकांना पहाताच त्यांनी येण्याचे प्रयोजन विचारले तेव्हा पद्माकर काकांनी सांगितले 

" भाऊकाकांना नातू झाल्याचा निरोप घेऊन आलोय ".

तेव्हा आंता काकांनी आनंदाने दोन्ही हात जोडून नमस्कार करत कपाळाला लावला तर हे करतांना हातात तंबाखू असल्याचेसुद्धा त्यांच्या लक्षात राहिले नाही सगळी तंबाखू अंगावर सांडली . वाड्याच्या मोठ्या दरवाजातच मोहन आण्णा , उषा वहिनी , फक्कड काका , प्रभा काकू सगळ्यांना बातमी समजली सगळे अगदी आनंदात त्यांच्या बरोबर घराकडे आले . काका आंघोळ करत होते तर आई मागच्या दारात होती . सगळ्यांचा हसण्याचा आवाज व बरोबर पद्माकर काका दिसले तर आई-काकांना आंदाज आलाच . पद्माकर काका आई-काकांंना म्हणाले 

" काय राव नातू तुम्हांला झालाय आणि आख्ख्या घेरडीला आनंद झालाय . बातमी ऐकली की लोकं खूष होतायत . कसं काय असं हो ? त्या आंतामास्तरंना तर तंबाखू हातात असलेलं सुद्धा लक्षात राहिलं नाही ."

यावर सगळे हसू लागले 

" शरुला पहिला मुलगा झाला भाऊकाकांना नातू झाला सगळ्यांना आनंद झालाय "

असे सगळे म्हणू लागले मग  चहापाणी झाल्यावर पद्माकर काकांनी सगळा वृत्तांत सांगितला आई-काकांंच्या आनंदाला अगदी भरतं आलं . पद्माकर काका निघू का म्हणाले तसं आई म्हणाली 

"दोन दिवसांनी नाही फक्त दोन  तास थांबा जेवणं करुन दहाच्या गाडीनं आपण सगळेच जाऊ . "

त्यादिवशी श्रावणी पोळा होता दोनतीन दिवसात गणपती बसणार होते . उषा वहिनीला मदतीला घेऊन आईने सगळी तयारी केली व पद्माकर काकांच्याबरोबर आई-काका दुपारीच बार्शीत आले व चार वाजता दवाखान्यात हजर झाले . बाळाला पाहून तर आई-काका , संजू एकदम खूश झाले . ह्यांची एकट्याची पळापळ झालेली ऐकून आई त्यांना म्हणाली 

" फार मोठ्ठ काम केलंय तुम्ही आता जरा निवांत बसा . सगळ बघतो आम्ही ".

खरंच तसं झालं होतं पण . तायडी , मायडी , गोंदा मामा या तिघांनाही काकांनी लगेचच पत्र पाठवून ही बातमी कळवली . मग दोन दिवस राहून उद्या गणपती बसणार म्हणलं की काका संजूला घेऊन घेरडीला गेले व गणेश चतुर्थीला आम्ही स्पेशल गाडीने घेरडीला जाणार असे ठरले . काकांनी पुढे जाऊन बाळंतीणीचं बाजलं , पडदे टाकून सामान सगळ जागेवर ठेऊन आमच्या स्वागताची अगदी जय्यत तयारी करुन ठेवली ! गणापती बसवून आमची वाट पहात बसले . गणेशचतुर्थीला सकाळी लवकरच आम्ही बार्शीहून निघालो बरोबर हे व पद्माकर काका आले होते . घेरडीत सगळ्खया काकू , वहिनी  काका ,संजू सगळे वाटच पहात होते . खरंतर लक्ष्म्याचा सण झाल्यावर बाळंतपणासाठी आई बार्शीला येणार होती तर लक्ष्म्याच्या सणाला आई मला व बाळाला घेऊन घेरडीला गेली ! आणि लक्ष्म्याला घरी नातू आला म्हणून तिने लक्ष्म्या येण्याच्या दिवशी हौसेनी गोडाचा नैवेद्य म्हणून बेसनाचे लाडू केले व आई  जाईपर्यंत शेवटपर्यंत तिने लक्ष्म्या येतात त्यादिवशी बेसनलाडू करण्याची प्रथा ठेवली !

    घरात बाळ-बाळंतीण असल्यामुळे आईला भरपूर काम होतं तरीही भागाबाई , निलाबाई आणि बाळ-बाळंतीणीसाठी खास शांता परटीणीला हाताशी धरुन आईने नियोजन करत त्यावर्षीचा गौरी-गणापतीचा सण घेरडीत अगदी धुमधडाक्यात केला . आईच्या उत्साहाला उधाण आलं होतं . गुटगुटीत नातवाला कुठे ठेऊ नी कुठे नको असं तिला झालेलं . बाळाची तब्ब्येत छान राहिली पाहिजे यासाठी माझ्या पथ्यपाण्याचं चाललेलं तिचं नियोजन खूप भारी होतं . बार्शीत किराणा छान मिळतो म्हणत बार्शीतून जातानाच डिंक लाडू , वेगवेगळ्या खिरी यासाठी लागणारा वेचक किराणा तिने घ्यायला लावला होता तर घेरडीत गेल्यावर काका आईला सांगायचे

" संपलं तर संपलं कच्चून कर तिला खायला पुन्हा जतेला जाऊन येईन पाहिजे तर ".

असं माझ्यासाठी व बाळासाठी काय करु नी काय नको असं आई-काकांना झालेलं . तायडी मायडीची लगेच पत्राला उत्तर आली होती . सगळ्यांना आता बाळाला पहायची ओढ लागली होती . हे घेरडीहून बार्शीला यायला निघाले तेव्हा मात्र त्यांचा केविलवाणा चेहरा पाहून काकांनी ह्यांना सांगितले 

" तुम्ही आपलं शनिवारी बँक सुटली की घेरडीला येत जावा , आठवड्याला नाही जमलं तर पंधरा दिवसाला येत जावा ". 

मग हे त्या दोनअडीच महिन्यात पंधरा दिवसाला घेरडीला यायचे . पंधरा दिवसात दोन पत्र त्यांनी मला व मी त्यांना उत्तराची वाट न पहाता पाठवायची असं आमचं ठरलं होतं त्याप्रमाणे आम्ही जवळजवळ वीसवीस पत्रे एकमेकांना पाठविली ! आता बारसं कधी करायचं हा मुख्य चर्चेचा विषय होता कारण बारशाला सगळे येणार आणि तोंडावर दिवाळी आलेली तर बाळाची नक्षत्रावर शांत पण करावी लागणार होती . 

       पहिल्यांदा पंधरा दिवसांनी हे जेव्हा घेरडीला आले तेव्हा मग दिवाळीत वसुबारशाला आधी शांत व बारसं करायचं ठरलं . तशी सगळ्यांना पत्र पाठविली . त्याप्रमाणे तायडी मायडी दोन्ही भाऊजी बारशाला आणि दिवाळीला घेरडीला यायचे ठरले व तयारीला सुरवात झाली !!





Wednesday, March 24, 2021

महिलाविशेष संग्रहीत

 

महिलादिनानिमीत्त 2014 मध्ये  काढलेले महत्वाचे परिपत्रक


आंतराष्ट्रीय महिला दिनाच्या शुभेच्छा !!


कॉम्रेड्स
8 मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा करण्याची सुरुवात सर्वप्रथम 1914 साली झाली त्या घटनेला 8 मार्च 2014 रोजी 100 वर्ष पुर्ण होत आहेत . अशा या ऐतीहासिक महत्वाच्या घटनेचे शतक साजरे होत असताना आपणा सर्वांना मनःपुर्वक शुभेच्छा !
18 व्या शतकातील फ्रेंच राज्यक्रातीने स्वातंत्र्य , समता व बंधुता या मुल्यावर आधारीत समाजरचनेची मुहुर्तमेढ रोवली त्यानंतर रशियन राज्यक्रांतीने जगाला वर्गीय तत्वज्ञानाची ओळख करुन दिली . या आधारावर कालांतराने जगभर विविध ठिकाणी धर्म-जात-वंश-प्रांत आणि आर्थिक विषमतेविरुध्दच्या चळवळीची सुरुवात झाली . या दरम्यान झालेल्या औद्योगिक क्रांतीमुळे या चळवळीला बळ मिळाले. कालांतराने विज्ञान आणि तंत्रज्ञान विकसित झाले , साहित्य आणि कला या अधिव्यक्तीप्रकाराचा विकास आणि विस्तार झाला . त्या एका टप्प्यावर युरोपात पहिल्या प्रथम स्त्री स्वातंत्र्यासाठीचा आवाज उमटला . स्त्री स्वातंत्र्यासाठी , मुलभुत हक्कांसाठी स्त्रीया रस्त्यावर उरतल्या , या आंदोलनाला चळवळीचे स्वरुप प्राप्त झाले येथुनच जागतीक महिला दिनाची सुरुवात झाली . जगाची आर्धी लोकसंख्या असलेल्या स्त्री वर्गासाठी समान हक्काच्या मागणीसाठीचे एक सशक्त व्यासपीठ अस्तीत्वात आले. 
जागतीक महिला दिनाचे महत्व जगभरातील स्त्री वर्गासाठी जेवढे आहे तेवढेच ते एकूण समाजासाठी आहे . कारण या स्त्री स्वातंत्र्याच्या चळवळीने समाजव्यवस्थेत  “सुसंस्कृतता” आणली . स्त्रियांना मानवी प्रतिष्ठा मिळवून दिली . या चळवळीमुळेच स्त्री वर्गाला “आत्मभान” मिळाले . समाज जीवनात स्त्रिया आत्मसन्मानाने , आत्मविश्वासाने वावरु लागल्या . स्वत:वरील अन्यायाच्या विरोधात एकटेपणी अथवा संघटीतपणे विरोध करण्यसाठी सरसावल्या आणि हे सारे घडून येण्यात शतकाची वाटचाल पूर्ण करणाऱ्या स्त्रीमुक्ती चळवळीचा खुप मोठा वाटा आहे म्हणूनच जागतिक महिला दिनाला अनन्यासाधारण महत्व आहे.
आज आपण ज्या समाजव्यवस्थेत वावरत आहोत तो समाज लौकिक अर्थाने प्रगत आणि आधुनिक आहे . स्त्रिया घराबाहेर पडून स्वत:ला सिध्द करीत कर्तृत्वाची नवनवी शिखरे गाठत आहेत . मात्र समाजमनाचा स्त्री वर्गाकडे पाहण्याचा दृष्टीकोन पूर्वीपेक्षाही अधिक असहिष्णू बनत चालला आहे . बाजारपेठेवर आधारीत जागतिकीकरणामुळे उपभोगवादी संस्कृतीचेही जागतिकीकरण होत आहे. वर्चस्वाच्या कल्पनेने झपाटलेल्या समाजात स्त्रियांचे आर्थीक-लैंगिक शोषण दिवसेंदिवस वाढताना अनुभवास येत आहे . स्त्री वर्गाविषयीचा आकस तिच्या जन्माला नाकाराण्यातून व्यक्त होत आहे . स्त्रियावरील अत्याचाराने हिंस्त्र रुप धारण केलेले आहे . ही वस्तुस्थिती सामाजिक स्वास्थ , समाजरचना बिघडत चालल्याची लक्षणे आहेत म्हणूनच जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने या सर्व प्रश्नांची गांर्भीयानेफृ चर्चा करण्याची गरज आहे . 
एआयबीईए ही प्रागतिक विचारावर आधारीत ट्रेड युनियन चळवळ आहे . निकोप आणि सामाजिक-राजकीय-आर्थिक समतेवर आधारित समाजरचना आकारास यावी यासाठी ट्रेड युनियन हे माध्यम आहे . या विचाराच्या आधारे आपण आजवर संघटना चालवत आहोत . समतेसाठीचा लढा म्हणून आपण स्त्री मुक्ती चळवळीचे पुरस्कर्ते आहोत. म्हणूनच जागतिक महिला दिन साजरा करण्याची आपली परंपरा आहे.
सात दशकाच्या वाटचाली नंतर देशातील कामगार चळवळीत एआयबीईए ला पथदर्शक संघटना असे स्थान प्राप्त झाले आहे . सभासद-कर्मचारी , बँकींग उदयोग , वित्तीय क्षेत्र या विषया बरोबरच सामाजिक विषमतेविरुध्द कृतीशील पुढाकार घेण्याची एआयबीईएची परंपरा आहे . म्हणूनच स्त्रियांच्या आर्थिक-सामाजिक आणि लैंगिक शोषणाविरुध्द आवाज उठवणे , स्त्रियांच्या मानवी प्रतिष्ठेसाठी चालू असलेल्या चळवळीत सहभागी होणे , त्यासाठी पुढाकार घेणे ही एआयबीईएची शिकवण आहे   
आज खुप मोठ्या संख्येने महिला बँकींग क्षेत्रात आणि पर्यायाने एआयबीईए संघटनेत दाखल होत आहेत  . संघटनेच्या कामकाजातील त्यांचा सहभाग देखील आशादायक पध्दतीने वाढतो आहे . ज्ञान-विज्ञानाची कास धरुन , आधुनिक तंत्रज्ञानाला कवेत घेऊन प्रचंड आत्मविश्वासाने एआयबीईए च्या चळवळीत दाखल झालेल्या तरुण महिला सभासदांनी स्त्री विषयक सामाजिक दृष्टीकोन बदलण्यासाठी , स्त्री वर्गाचा आत्मसन्मान जपण्यासाठी पुढाकार घेण्याची , त्यासाठी पुरुष सहकाऱ्यांना सहभागी करुन घेऊन एक व्यापक चळवळ उभी करण्याची , विविध ठिकाणी  विविध पध्दतीने चालू असलेल्या अशा चळवळींना बळ देण्याची आवश्यकता आहे.
आज जागतिक दिनांची शतकपूर्ती साजरी करीत असताना एआयबीईए च्या झेंड्याखाली आपण सर्वजण या दृष्टीने कृतिशील राहण्याचा संकल्प करु या !
शुभेच्छांसह,
     (धनंजय कुलकर्णी)
       जनरल सेक्रेटरी

---------------------------------------------- 


Only for working ladies....

माझी  नोकरी  म्हणजे .......


माझी  नोकरी  म्हणजे याहूनही खूप काही आहे ,

ती माझा मोकळा श्वास आहे ,

समदुःखीमैत्रीणींचा सहवास आहे ,

जीवनविषयक  अभ्यास आहे ,

तो माझा आत्मविश्वास आहे ,

मनमोकळ्या हास्याचा तास आहे ,

अनुभवाचे आकाश आहे ,

चार  भिंतीबाहेर पडण्याचा पास आहे ,

तिथ काम असूनही विश्रांतीचा भास आहे ,

घरगुती ताणतणावातून  सुटकेचा निश्वास आहे ,

कर्तुत्व सिद्ध करायचा ध्यास आहे , 

म्हणून जाण्यायेण्याचा त्रास आहे

 तरी मला नोकरीची आस आहे . 


---------------------------------------------- 


नवरात्र....


पहिला रंग स्त्रीभ्रूण हत्या थांबवायचा.

दुसरा रंग मुलगी झाल्यावरही मुलगा झाल्याइतकाच आनंद मानायचा.

तिसरा रंग आपल्याच मुलीकडे लायबलिटी म्हणून न पहाता ॲसेट म्हणून पहायच्या वृत्तीचा.

चौथा रंग मुलीला भरपूर शिकवून स्वावलंबी करायच्या मानसिकतेचा.

पाचवा रंग बायकांवरचे फडतूस आणि आकसयुक्त विनोद बंद करायचा.

सहावा रंग पुरुषांनी आपल्या शारीरिक ताकदीचा माज सोडून स्त्रीच्या बौद्धिक आणि मानसिक कणखरतेला सलाम करायचा.

सातवा रंग स्त्री ही फक्त "मादी" नसून अनेक बाबतीत आपल्याहून श्रेष्ठ असलेली "माणूस" आहे हे लक्षात घ्यायचा.

आठवा रंग विनयभंग, बलात्कार, हुंडाबळी ह्याबाबत अत्यंत कठोर कायदे करून, लवकर न्याय करून समाजातील नराधमांच्या मनात भीती निर्माण करायचा.

नववा रंग "स्त्री पुरुष समानता" ह्या विषयावर फक्त टाळ्या मिळवणारी भाषणे, कौतुक मिळवणारे लेख न लिहिता ते अंगी बाणवण्याचा.

जगाने हे रंग पाळले तर आपल्या घरात, शेजारी, समाजात, देशात, जगात आपल्याला रोज भेटणाऱ्या दुर्गा, अंबाबाई, महालक्ष्मी आपल्याला प्रसन्न होतील, अनेक आशिर्वाद देतील. मग प्रत्येक दिवस "विजयादशमी" असेल. सोने लुटावे लागणार नाही....आयुष्याचेच सोने होईल !


---------------------------------------------- 


चला होऊयात पुन्हा सज्ज !!


जागतिक महिला दिनाच्या सर्व समतावादी स्त्री-पुरुषांना मन:पूर्वक शुभेच्छा !! आपण सर्व स्त्री-पुरुष समानतेसाठी प्रयत्नशील आहात, यात गेल्या वर्षीपेक्षा दोन पावलं पुढे गेला असाल अशी आशा करते.

हा दिवस स्त्रियांच्या संघर्षाचा इतिहास सांगणारा दिवस आहे. खरंतर संघर्ष हा स्त्रियांच्या रोजच्याच जगण्याचा भाग आहे. १९०८ च्या ८ मार्चला न्यूयॉर्क शहरात पंधरा हजार कामगार स्त्रिया आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरल्या. काय होत्या त्यांच्या मागण्या?? कामाचे तास सुसह्य , म्हणजे आठ करा, पुरेसा पगार द्या आणि मतदानाचा हक्क द्या.....त्यानंतर दरवर्षी संघर्ष आणि आंदोलने करणाऱ्या स्त्रियांची संख्या वाढतच गेली. मागण्याही अधिक स्पष्ट होत गेल्या. त्याचबरोबर हळूहळू महिला दिनाचे स्वरूपही बदलत जातेय. आज १०८ वर्षानंतरही महिला दिनाचे महत्त्व कमी झालेले नाही. जगभर आणि भारतात काही मोजक्या ठिकाणी या संघर्षाची आठवण केली जाते.

भारतात मात्र बहुतेक ठिकाणी गेल्या दहा वर्षात हा दिवस “साजरा” करण्याची पद्धत जास्त प्रचलित होतेय. हेही चांगलं आहे. बऱ्याच ठिकाणी कर्तृत्ववान महिलांचा सत्कार होतो, यशाची कहाणी सांगितली-ऐकली जाते, संपूर्णपणे स्त्रियांचाच सहभाग असलेले संगीत, नाटक, चित्रकला, नृत्य, इत्यादी कलांचे आगळेवेगळे कार्यक्रम होतात. असं सगळं स्त्रियांसाठी प्रेरणादायी, भारावलेलं वातावरण महिनाभर राहतं. भास होतो की अरे वा!! छान झालं...किती चांगले दिवस आले बायकांना!! उत्सवाची रंगीत धूळ खाली बसायला लागली कि एकेक अस्वस्थ करणाऱ्या बातम्या दिसायला लागतात. छेडछाड, बलात्कार, अपहरण, या बरोबरच आताच्या दुष्काळात तर स्त्रियांचाही धीर सुटत चालल्याच्या बातम्या येऊ लागतात. मग या बातम्या वर्षभर चालूच राहतात. आम्हा बायकांना अस्वस्थ करत राहतात. वर्षभराच्या या अस्वस्थतेवर आम्ही पुन्हा ८ मार्चला उतारा शोधतो.... उत्सव साजरा करून.... म्हणजे तसे वर्षभरात आम्ही भाऊबीज, राखीपौर्णिमा, नागपंचमी, वटसावित्री, हरितालिका, शिवाय जास्तीतजास्त संख्येने वेगवेगळी हळदीकुंकवं, सगळे उपवास करून उत्सव साजरे केलेलेच असतात तरीही आम्हाला अजून एक उत्सव करायला मिळतो ह्याचं समाधान वाटतं. खरंतर इतके उत्सव करूनही आमची भीती, असुरक्षितता अजिबात गेलेली नसते. आमचे प्रश्न सुटलेले नसतात. पण आम्ही स्वत:ची तशी समजूत करून घेतो आणि दिवस ढकलत राहतो. कारण आम्ही तसंच वागणं समाजाकडून अपेक्षित आहे. मग लोक नावं ठेवत नाहीत. हे नावं ठेवणं फार वाईट असतं बरंका!!!! प्राण गेला तरी हरकत नाही पण लोकांनी नावं ठेवायला नकोत. तो घरच्या पुरुषांचा अपमान ठरतो, असं आम्हाला पिढ्यानपिढ्या सांगितलं गेलंय.

कोणताही प्रश्न स्वतःसमोर येऊन उभा ठाकल्याशिवाय त्याचं असणंच आम्ही मान्य करत नाही. मान्य केलं तरी ते घरातल्या घरात राहावं, जाहीर चर्चा करू नये असं आम्हाला वाटत. स्त्रियांचे प्रश्न सोडवायला “महिला संघटना” आहेतच की! महिला मंडळ ही भजन, मंगळागौरीच्या खेळाच्या स्पर्धा, रांगोळीच्या स्पर्धा, अशा पारंपारिक कलागुणांना वाव देण्यासाठी असतात. तिथे असे प्रश्न वगैरे कशाला आणायचे? आणि स्वत:चं डोकं वगैरे कशाला चालवायचं? असा आपला उलटा कारभार सध्या चालू आहे.

कधी बदलेल हे सगळं? विरंगुळा म्हणून आम्ही उत्सव साजरे करू. नक्कीच!! पण महिला दिनाच्या निमित्ताने तरी महिलांच्या आयुष्याचा समग्र विचार आम्ही करणार का? आजपर्यंतच्या चळवळीला कष्टाने जोपासलेल्यांची आठवण करणार का??

१. आमच्या पुरुषकेंद्री सणावारांना बदलून लिंगनिरपेक्ष, निसर्गवादी, पर्यावरण जपणारे, सामाजिक न्यायाला वाव देणारे आणि आरोग्यदायी कधी बनवणार?

२. स्वतःच्या स्त्री शरीराचा दुस्वास न करता सन्मान करायला कधी सुरुवात करणार?

३. स्त्रिया पुरुषांप्रमाणे विचार करत नाहीत. त्यांचे विचारविश्व वेगळे आहे, जास्त सर्वसमावेशक आहे, सांभाळून घेणारे आहे, व्यापक बुद्धीचे आहे हे जगाला सांगायला कधी सुरु करणार?

४. स्त्रियांचं जग हे नुसतंच प्रश्नांनी भरलेलं नाहीय, तर ते वेगळे मानवतावादी, सहृदय आणि अत्यंत कृतिशील, सर्जनशील आणि स्पर्धाविरहित जग आहे हे पुरुष कधी समजून घेतील?

५. स्त्रियांचे विषय स्त्रियांनीच बोलावेत ( आणि इतर विषयात बोलूच नये ), अशी सर्वांची मानसिकता कधी बदलेल?

अशा टिप्पण्यासहित आपण महिला दिन “साजरा” केला तर तो नुसता उत्सव न राहता जास्त अर्थपूर्ण होईल!! आपलं काय मत आहे??

---------------------------------------------- 


स्रियांच्या  परिस्थिती वर अमृता प्रीतमची खूपच बोलकी कविता


वह कहता था,

वह सुनती थी,

जारी था एक खेल

कहने-सुनने का।


खेल में थी दो पर्चियाँ।

एक में लिखा था ‘कहो’,

एक में लिखा था ‘सुनो’।

अब यह नियति थी 

या महज़ संयोग?

उसके हाथ लगती रही

वही पर्ची

जिस पर लिखा था ‘सुनो’।


वह सुनती रही।

उसने सुने आदेश।

उसने सुने उपदेश।

बन्दिशें उसके लिए थीं।

उसके लिए थीं वर्जनाएँ।

वह जानती थी,

'कहना-सुनना'

नहीं हैं केवल क्रियाएं।


राजा ने कहा, 'ज़हर पियो'

वह मीरा हो गई।

ऋषि ने कहा, 'पत्थर बनो'

वह अहिल्या हो गई।

प्रभु ने कहा, 'निकल जाओ'

वह सीता हो गई।

चिता से निकली चीख,

किन्हीं कानों ने नहीं सुनी।

वह सती हो गई।


घुटती रही उसकी फरियाद,

अटके रहे शब्द,

सिले रहे होंठ,

रुन्धा रहा गला।

उसके हाथ कभी नहीं लगी

वह पर्ची,

जिस पर लिखा था, ‘ कहो ’।


-Amrita Pritam

---------------------------------------------- 


🙏तू स्वतःशीच धोकेबाज...🙏


दगडाच्या नागोबाला पुजणारा

जीवंत नागाला मारतो

सांगा बरं मानव

असे का करतो...||1||

हनुमान असतो देव

म्हणत बसतो मंत्र

माकडांना हकलुन देतो

कसलं हे तंत्र...||2||

उंदराला म्हणतो वाहन

करतो त्याची आरती

विष देऊन मारतो

माणूस असतो स्वार्थी...||3||

कुत्रा म्हणे खंडोबा

चित्रापुरता असतो फक्त

त्याला दगडाने ठेचताना

कुठे जातो भक्त...||4||

दगडाला नैवेद्य असतो

दगड खेळतो तुपाशी

जीवंत कोटी कोटी देव

झोपतात रोज उपाशी...||5||

दगडाला देव मानणारा

माणसात मानतो भेद

जन्मदात्रीचा विटाळ त्याला

वाटत नाही खेद....||6||

जीवंत माणसालाही माणूस म्हणन्याची

माणसालाच वाटतेय लाज

माणसा रे भोंदु माणसा

तु स्वतःशीच धोकेबाज...||7||...


---------------------------------------------- 


*अधुनिक स्त्री चे शपथपत्र*


मी 'मी'आहे... 'मी' च राहणार


मी *राधा* नाही होणार

माझ्या प्रेमकहाणीत

दुसऱ्या स्त्रीचा पती नसणार

रुक्मिणीच्या डोळ्यांत

काटा बनून मी नाही सलणार

मी राधा नाही होणार


मी *सीता* नाही होणार

माझ्या पावित्र्याचं

प्रमाणपत्र नाही देणार

अग्निपरीक्षा नाही देणार

तो काय मला त्यागणार

मीच त्याला सोडणार

मी सीता नाही होणार


मी *मीरा*ही नाही होणार

कुठल्याही मूर्तीच्या मोहाने

घर संसार नाही सोडणार

साधुंबरोबर नाही फिरणार

हातात एकतारी घेऊन

जबाबदाऱ्या नाही टाळणार

मी मीरा नाही होणार


मी *यशोधरा* नाही होणार

जो सोडून निघून गेला

सारी कर्तव्ये सोडून 

स्वतः देव बनला

कितीही ज्ञान मिळवू दे

पण अशा पतीसाठी

मी पतिव्रता नाही होणार

मी यशोधरा नाही होणार


मी *उर्मिला*ही नाही होणार

पत्नीच्या सहवासाची

ज्याला कदर नाही

तिच्या त्रासाची ज्याला 

जरासुद्धा जाणीव नाही

तिला एकाकी करून

जो भावासह राहणार

अशा पुरुषाला मी नाही वरणार

मी उर्मिला नाही होणार


मी *गांधारी* नाही होणार

आपले डोळे मिटून

अंधार स्वीकारून

अर्थहीन त्याग मी नाही करणार

अंध पतीचे डोळे होईन

माझ्या डोळ्यांनी तो बघेल

असे प्रयत्न करणार

मी गांधारी नाही होणार


मी त्याच्यासह जगेन, 

ज्याला मनाने वरेन

पण म्हणून त्याचा अन्याय 

मी नाही सहन करणार

कर्तव्याला नाही चुकणार 

सारी निभावणार पण 

बलिदानाच्या नावाखाली

यातना नाही सोसणार

*मी 'मी' आहे आणि 'मी'च राहणार*


---------------------------------------------- 


 *(एक अस्वस्थ करणारी कविता)*
  *.....चिठ्ठी.....*


*तो फक्त बोलायचा*

*ती फक्त ऐकायची*

*एक खेळ सुरू होता*

*बोलण्या-ऐकण्याचा*


*खेळात होत्या दोन चिठ्या*

*एकात लिहीले होते 'बोला'*

*एकात रालिहीले होते 'ऐका'*


*आता हे प्राक्तन होते*

*की फक्त योगायोग?*

*तिच्या हाती यायची तीच चिठ्ठी*

*ज्यावर लिहीले होते 'ऐका'*


*ती ऐकत राहीली*

*कोणाचे तरी हुकूम,*

*कोणाचे तरी उपदेश.*


*बंधने तिच्यासाठी होती*

*तिलाच होते सर्व नकार*

*तिला हेही माहीत होते*

*'ऐकणे आणि बोलणे'*

*या नाहीत फक्त क्रिया.*


*राजा म्हणाला, 'विष पी'*

*ती मीरा झाली.*


*ऋषि म्हणाले, 'शिळा हो'*

*ती अहिल्या बनली.*


*प्रभू म्हणाले, 'चालती हो'*

*ती सीता झाली.*


*चितेतून आली किंकाळी*

*अनेक कानांनी ऐकली नाही*

*ती सती बनली.*


*दबले तिचे गा-हाणे*

*अडकले तिचे शब्द,*

*शिवलेले गेले ओठ..*

*दाटून आलेला गळा..*


*तिच्या हाती मात्र कधीच*

*नाही लागली ती चिठ्ठी*

*ज्यावर लिहीले होते 'बोला'.*



*कवयित्री : अमृता प्रितम्*

*अनुवाद :  राधा देसाई*


---------------------------------------------- 


 *तु खुद की खोज में निकल*,

*तु किस लिए हताश है*।

*तु चल, तेरे वजूद की समय को भी तलाश है*,

*समय को भी तलाश है*।


*जो तुजसे लिपटी बेडियां*।          

*समजना इनको वस्त्र तु*,

*ये बेडियां पिघलाके*,

*बना ले इनको शस्त्र तु*,

*तु खुद की खोज में निकल*


*तु किस लिए हताश है*,

*तु चल*, *तेरे वजूद की समय को भी तलाश है*,

*समय को भी तलाश है*,


*चरित्र जब पवित्र है*,

*तो क्या है दशा तेरी*,

*ये पापियों को हक़ नहीं*, 

*की ले परीक्षा तेरी*,

*तु खुद की खोज में निकल*


*तु किस लिए हताश है*।

*तु चल*, *तेरे वजूद की समय को भी तलाश है*,

*समय को भी तलाश है*।


*जला के भस्म कर उसे*,

*जो क्रूरता का जाल है*,

*तु आरती की लव नहीं*,

*तु क्रोध की मशाल है*,

*तु खुद की खोज में निकल*


*तु किस लिए हताश है*।

*तु चल*, *तेरे वजूद की समय को भी तलाश है*, 

*समय को भी तलाश है*।


*चुनर उड़ाके ध्वज बना*।

*गगन भी कपकपायेगा*।

*अगर तेरी चुनर गिरी*,

*तो एक भूकंप आएगा*,

*तु खुद की खोज में निकल*

 

*तु किस लिए हताश है*।

*तु चल*, *तेरे वजूद की समय को भी तलाश है*,

*समय को भी तलाश है।*


*-पिंक (movie)*


---------------------------------------------- 


सौ. सुधा मुर्ति म्हणतात .........


बऱ्याच स्त्रियांना शारिरीक 

सौंदर्याचा न्युनगंड असलेला,

मी समाजात, वावरत असतांना

माझ्या निरीक्षणात येतो...


पण, खर सांगू मैत्रिणींनो...

पुरूषांना कांय आवडेल, 

याचा विचार करून स्वतःला 

घडवू नका...


पुरूषी नजरेतून स्वतःचं सौंदर्य

तोलणं, म्हणजे स्वतः मधील 

स्त्रीत्वाचं अधःपतन करवून

घेणं आहे...


सकाळी उठून सडा-संमार्जन 

झाल्यावर स्वतःच्या हातानं 

काढलेली रेशीमरेषांची रेखीव 

रांगोळी पाहिलीत, तर तुम्हाला 

तुमच्या बोटातली सुंदरता दिसेल...


स्वच्छ- सुंदर आवरलेलं, स्वच्छ  

स्वयंपाकघर तुम्हाला तुमच्या 

गृहिणीपणाचं सौंदर्य सांगेल...!


तुम्ही शिक्षिका असाल, तर 

तुमचं सौंदर्य फळ्यावर नीटपणे 

लिहिलेल्या अक्षरात असेल. 

विषयाचं आकलन झाल्यावर 

दिसणारे विद्यार्थ्यांचे आनंदी चेहरे, 

ही तुमचीच सुंदरता आहे...


सौंदर्य कपड्यात नाही, 

कामात आहे....


सौंदर्य नटण्यात नाही, 

विचारांमधे आहे... 


सौंदर्य भपक्यात नाही, 

साधेपणांत आहे... 


सौंदर्य बाहेर कशात नाही, 

तर मनांत आहे...!!


आपण करत असलेलं 

प्रत्येक काम म्हणजे सौंदर्याचंच

सादरीकरण असतं...!!


आपल्याला आपल्या कृतीतून

सौंदर्याची निर्मिती करता आली

पाहीजे...


प्रेमानं बोलणं 

म्हणजे सुंदरता...!!


आपलं मत योग्य रीतीनं 

व्यक्त करता येणं 

म्हणजे सुंदरता...!!


नको असलेल्या गोष्टीला 

ठाम नकार देण्याची हिंमत 

म्हणजे सुंदरता...!!


दुसर्‍याला समजावून घेणं 

म्हणजे सुंदरता...!! 


आपल्या वर्तनातून, विचारातून 

आपलं सौंदर्य बाहेर आलं पाहिजे.


हाती आलेला प्रत्येक क्षण 

रसरशीतपणे जगण्यांत 

खरी सुंदरता आहे...!!


आपण करीत असलेल्या 

कामात कौशल्य प्राप्त झालं, 

की आपोआपच आत्मविश्वास

वाढतो, आत्मसन्मानाची 

जाणीव येते...


अशी आत्मविश्वासानं

जगणारी स्त्री आपोआप

सुंदर होते, हा माझा  

स्वानुभव आहे...


इंदिरा गांधींचं सौंदर्य कणखर

निर्णयक्षमतेत होतं,...


मेरी कोमचं सौंदर्य तिच्या 

ठोशात आहे...


बहिणाबाईंचं सौदर्य त्यांच्या

असामान्य प्रतिभेत होतं...


लतादीदींचं सौंदर्य त्यांच्या 

अप्रतिम, दैवी आवाजात आहे...


वेळ प्रसंगी या सर्वजणींची 

आठवणच आपलं जगणं 

सुंदर करायला मदत करेल...


आपण जशा जन्माला आलो 

आहोत, तशा सुंदरच आहोत, 

ही खूणगाठ मनाशी बांधून 

टाकली, की सौंदर्याकरीता 

दुसर्‍या कुणाच्या पावतीची 

गरज पडत नाही आणि  

अवघं विश्व सुंदर भासतं...!!! 


---------------------------------------------- 

 

*'तिचे शूज'*


तिचा हात हातात घेऊन चालता चालता

तो म्हणाला, *"मला एकदा तुझे शूज घालून चालायचंय•••"*


*"नको रे, सोपं नाही ते•••*

*तू तुझे कष्ट झेलतोच आहेस ना,*

*आपला प्रवास सुखात चालला आहे ना",*

ती म्हणाली.


त्याचा *हट्ट* म्हणून तिने *तिचे शूज* त्याला दिले• 

*तिच्या शूज*मधला

त्याचा प्रवास सुरू झाला•


*हिरवळीवर चालता चालता*

*अचानक खडे टोचू लागले*

*करियरसाठीचा विरोध,*

*नोकरीची वणवण,*

*लग्न ठरल्यावरची द्विधा अवस्था,*

*माहेर सुटल्याचं दुःख,*

*आयुष्याचा संघर्ष पायाला जाणवू लागला•*

*गरोदरपणातील अस्वस्थता,*

*बाळंतपण*,

*अन् नंतर तो गोंडस स्पर्श•••*

*रात्रीची जागरण,*

*नोकरीतली ओढाताण,*

*तरीही तिने नेहमी त्याच्यासाठी सुंदर दिसण्याचा केलेला प्रयत्न,*

*त्याच्यासाठी वेळ काढायची धडपड,*

*कधी टोमणे कधी कौतुक,*

*जबाबदाऱ्यांचे ओझे जाणवत होतं थोडं थोडं•••*


केवळ तिचे शूज घालूनसुद्धा काही अव्यक्त सलदेखील आता टोचत होते पायाला•••

कधी चटकेदेखील बसले•••


त्याने झटकन शूज काढले•  म्हणाला,                          *"कसं चाललीस एवढं•••!*


ती हसली• म्हणाली, *"तुझ्यासाठी••• माझ्यासाठी••• आपल्यासाठी•••!!!"*

-

--------------------------------------------- 


             *"स्री"*


एका संध्याकाळी सूर्य डूबत असतांना तिला तिच्या नातीने विचारले आज्जी,


स्त्री म्हणजे काय असते गं ?


सुरकुत्या पडलेल्या चेहऱ्याने, मोतीबिंदू झालेल्या डोळ्याने ती झट्कन बोलली,


 स्री सुद्धा मनुष्य असते तिला तिचे आयुष्य असते 

तुडवली तर नागीण असते 

डिवचली तर वाघीण असते

कडाडली तर वीज असते

तान्ह्या बाळाची नीज असते

आणि बरं का पोरी ,

*तिच्याच गर्भात भविष्याचे बीज असते*   !


----------------------------------------------  


Courtsey Adv. Nilima Kanetkar, mother of Urmila Kothare


प्रत्येक स्त्रीने शिकावं असं काही.....आता


खूप झालं, बास झालं

थकले आता म्हणायला शीक

केलं तेव्हढं पुरे झालं

आता थोडं थांबायला शीक


नाती गोती कुटुंब कबिला

बाजूला जरा ठेवायला शीक

इतरांसाठी आयुष्य वेचलं

स्वतःसाठी जगायला शीक


विसरून रोजची कामं खुशाल

उशिरापर्यंत लोळायला शीक

संसाराचं ओझं आपलं 

थोडं share करायला शीक


कसं होईल, काय होईल

चिंता सर्व टाकायला शीक

माझ्याविना घर हे चालेल

असा विश्वास ठेवायला शीक


जॉब, घर, मुलं आणि बिलं

यांची कसरत विसरायला शीक

Superwoman व्हायचं सोडून

दमानं जरा जगायला शीक


घड्याळाची endless टिकटिक

दुर्लक्षित तू करायला शीक

उठल्यापासून झोपेपर्यंतच्या

कामाचे हिशोब विसरायला शीक


आपल्या उरावर घेतलेली कामं

आतातरी टाकायला शीक

गेलं उडत काम म्हणून

निवांत पुस्तक वाचायला शीक


पाय पसरून, पेपर धरून

चहाचे घोट घ्यायला शीक

Calorie count विसरून जरा

आयतं food मागवायला शीक


याचं जेवण त्याचा डबा

कपडे याचे नि औषध काढा

घर पसारा भाजी पाला

सगळं सगळं सोडायला शीक


कोणासाठी न थांबता

Steering हाती धरायला शीक

नियम सारे मोडून कधी

सुसाट गाडी पळवायला शीक


सगळ्यांसाठी सगळं केलं

कामचुकारपणा करायला शीक

अर्ध अधिक आयुष्य सरलं

आतातरी बाई जगायला शीक

आतातरी बाई जगायला शीक


---------------------------------------------- 


 कामवाली आहे मी !!


कामवाली आहे मी कडाडती वीज आहे

घरमालकिनीनो एक गा-हान गानार आहे

आमच्यामुळे नोकरी तुमची पाचपन्नास हजाराची

त्यातले दोन-अडीच मला दिलेत

तरच मी टिकनार हाय 

एक गा-हान गानार हाय


"सिक" म्हणून "लीव्ह" काढता

घरातुनच "शी-एल" कळवता

मी जेव्हा खरीच तापान फणाफणते 

पगारी खाडा करनार हाय 

एक गा-हान गानार हाय


गॕस दुध पेट्रोल वाढल

गाडी टॕक्शी परवडेना

आम्हाला सादी कापडचोपड  

चटणी भाकरी बी मिळना

महागाईचा कहर हाय

एक गा-हान गानार हाय


तुमचा फंड बिंड पेन्शन

आमच्या नशिबी हलक रेशन

ते आनायला बी पैका  नाय

बचत ? छे ! ती उरतच न्हाय

उधार उचल मागनार हाय

एक गा-हान  गानार हाय


ज्याला त्याला मानस लावुन 

तुमचा संसार निटनेटका

पोरांना महागड शिक्षान

फारीनचा खो-यान पैका

माजबी पोरगं आता शाळत जातेय

त्याला मी इंजिनियर करनार आहे

फाटक्याला ठिगळ मी शिवनार हाय !

म्हणुनच हे गा-हान गानार हाय !


---------------------------------------------- 



 होय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय....


होय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय....

एरव्ही बोललेही नसते,

पण माझ्या विचारांचे

तुम्ही घोटून घोटून क्रिम केलेय.

चक्क माझी देवी बनवून

मला फोटोमध्ये फ्रेम केलेय.


जमेल तेंव्हा,जमेल तसे

माझे सोईनुसार कौतुक करता.

खरे दु:ख याचे की,

तुम्ही मला गृहित धरता.

त्याचा राग मी तुमच्यासमोर खोलतेय..

होय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय....


कुर्‍हाडीचा दांडा गोतास काळ व्हावा,

सगळ्या गोष्टी डोक्यावरून गेल्यात.

ज्या माझ्या वारसा सांगतात,

त्याच बेईमान झाल्यात.

असे होईल,मला काय माहित?

मला कुठे पुढचे दिसले होते?

एका वेगळ्या जगासाठी

मी शिव्याशाप,

दगडाबरोबर शेणही सोसले होते.

तुमच्याच शब्दात सांगायचे तर

रात्रंदिवस घासले होते.

आज मी कसले घाव झेलतेय?

होय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय.... 


ही कही उपकाराची भाषा नाही.

आजच्या बाजारू समाजसेवेसारखा

हा बेंडबाजा अगर ताशा नाही.

मी विसरून गेले होते,

आम्ही कोणकोणते विष पचवले आहे.

हल्ली मात्र तुम्ही 

आमच्या आत्मसन्माला डिचवले आहे.

म्हनूनच तुमच्या बहिर्‍या कानी

हे गार्‍हाणे घालतेय.

होय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय..... 


माय मावल्यांनो,लेकीबाळींनो.

तुम्ही शिकलात सवरलात.

पण नको तेवढ्या शहाण्या झालात.

विकृत स्त्रीमुक्तीच्या

प्रत्येकजणी कहाण्या झालात.

माझा वारसा सांगून,

स्वार्थासाठी राबता आहात.

या सगळ्या संतापापुढे

आज मी भिड्भाड भुलतेय.....

होय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय..... 


बाईपणाचे दु:ख काय असते?

मी तुमच्यापेक्षा जास्त भोगलेय.

आरशात पाहून सांगा,

मी सावित्रीच्या शब्दाला जागलेय?

तकलादू आणि भंपक

स्त्रीमुक्तेची नशा

तुम्हांला आज चढली आहे.

कपडे बदलेले की,

पुरोगामी होता येते,

ही फॅशन तुम्ही पाडली आहे.

शिकली सवरलेली माझी लेक

संस्कृतीच्या नावाखाली

नाकाने कांदे सोलतेय..

होय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय..... 


मान नको,पान नको,

आमचे उपकारही फेडू नका.

किर्तन-बिर्तन काही नको

झोडायची म्हनून

भाषणंही झोडू नका.

वाघिणीचे दूध पिऊन

कुत्र्यांसारखा गोंडा घोळीत आहात.

धर्म-संस्काराच्या नावाखाली

टाकाऊ परंपरा पाळीत आहात.

तुमच्या चिपाडलेल्या डोळ्यात

म्हनून हे अंजन घालतेय...

होय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय.....


तुम्हांला आज 

काहीसुद्धा सोसायचे नाही.

काढणारे काढीत आहेत

तुम्हांला शाळा काढीत बसायचे नाही.

तुम्ही फक्त पुरोगामित्त्वाचा 

खरा वसा घ्यायला पाहिजे.

एखादा दुसरा ’यशवंत’ शोधून

त्याला आधार द्यायला पाहिजे,

शाळा कॉलेजचे पिक तर

हायब्रिडसारखे डोलतेय.....

होय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय.....


मनमानी आणि स्वैराचाराला

पुरोगामित्त्वाचे लेबल लावणे,

यासारखी दुसरी सोपी युक्ती नाही.

फक्त नवरे बदलणे,

घटस्फोट घेणे,

ही काही स्त्रीमुक्ती नाही.

माझी खरी लेक तीच,

जी सत्यापूढे झुकत नाही.

सावित्री आणि ज्योतिबांपूढे

आंधळेपणाने माथा टेकत नाही.

माझी खरी लेक तीच,

आम्हांलासुद्धा नव्याने तपासून

स्वत:ची भाषा बोलतेय.

आमचाही वसा

तावून-सुलाखुन पेलतेय.....

होय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय..... 


आमच्याच मातीत,

आमच्याच लेकरांकडून

दूजाभाव बघावा लागला.

माझा फोटो लावण्यासाठीही

सरकारी जी.आर.निघावा लागला.

आपल्या सोईचे नसले की,

विचारांकडेही कानाडॊळा होतो.

समाजासाठी काही करायचे म्हटले की,

पोटात प्लेगचा गोळा येतो.


ज्योतिबांशिवाय सावित्री,

सावित्रीशिवाय ज्योतिबा,

समजून घेता येणार नाही.

विचारांची ही ज्योती,

एकटी-एकटी नेता येणार नाही.

सुनांना लागावे म्हणून तर

लेकींनो, तुम्हांला बोलतेय....

होय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय...


-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

  मोबाईल-९९ २३ ८४७ २६९

 

साविञीमाईस अभिवादन....!


----------------------------------------------  


*बालिका दिन विशेष*
सावित्रीबाई फुले


सावित्रीबाई फुले (जानेवारी ३ , इ.स. १८३१ – मार्च १०, इ.स. १८९७) या मराठी शिक्षणप्रसारक, समाजसुधारक महिला होत्या. महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाच्या आरंभिक टप्प्यात त्यांचे पती ज्योतिराव फुले यांच्यासह त्यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली.

चरित्र

सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी जानेवारी ३, इ.स. १८३१ रोजी सावित्रीबाईंचा जन्म झाला. आईचं नाव लक्ष्मीबाई तर गावचे पाटील असणार्या वडिलांचं नाव खंडोजी नेवसे पाटील. स्त्री स्वातंत्र्य औषधालाही नसलेल्या समाजात व काळात सावित्रीबाईंचा जन्म झाला. पण बंधनांचा अर्थच ज्या वयात कळत नाही, त्या वयापासूनच त्यांनी आपल्या कार्याला त्यांच्याही नकळत सुरुवात केली. एका दुबळ्या मुलाचे फुल हिसकावून घेणार्या धटिंगणाला त्यांनी अद्दल घडविली, तर पक्ष्यांची अंडी खाणार्या नागाला त्यांनी ठेचून मारले.

फाल्गुन कृष्ण पंचमी, शालिवाहन शक १७६५ (इ.स. १८४०) रोजी ज्योतिराव फुल्यांशी सावित्रीबाईंचा विवाह झाला. लग्नाच्या वेळी सावित्रीबाईंचे वय नऊ, तर ज्योतिरावांचे वय तेरा वर्षांचे होते. म्हणजे त्या वेळच्या रूढीनुसार लग्नाला उशीरच झाल्याचे मानले गेले. सावित्रीचे सासरे गोविंदराव फुले हे मूळचे फुरसुंगीचे क्षीरसागर, परंतु पेशव्यांनी त्यांना पुण्यातील फुलबागेची जमीन बक्षीस दिली म्हणून ते पुण्याला येऊन राहिले व फुलांच्या व्यवसायावरून त्यांना फुले हे आडनाव मिळाले.

सावित्रीबाईंचे पती ज्योतिराव यांना लहानपणापासूनच मातृप्रेम लाभले नाही. त्यांची मावस बहीण सगुणा-आऊ यांनीच त्यांचा सांभाळ केलेला. सगुणाऊ  एका इंग्रज अधिकार्याच्या मुलाच्या दाई म्हणून काम करायच्या. त्यांना इंग्रजी कळायचं व बोलताही यायचं. त्यांनी आपल्या या ज्ञानाचा उपयोग ज्योतिरावांना प्रेरित करण्यासाठी केला. ज्योतिरावही शिक्षणाकडे आकर्षित झाले. सावित्रीबाईंना ख्रिश्चन मिशनर्यांनी लग्नापूर्वी दिलेले एक पुस्तक त्या सासरी घेऊन आल्या होत्या.

‘त्यांनी करेल ते र्मों आणि आपण शिकलो की पाप’ हा ज्योतिरावांनी वडिलांना विचारलेला प्रश्र्न सावित्रीला पतीच्या ध्येयाची जाणीव देऊन गेला

. ‘सेठजी, टाकलं पाऊल मागं घेऊ नका. तुमी शिकावं असं मलाबी वाटतं’…. या शब्दात त्यांनी पतीला ताकद दिली . ज्योतिरावांनाही एक नवा मार्ग सापडला . त्यांनी स्वत: शिकून सावित्रीबाईंना शिकवले. सगुणाऊ तर सोबत होतीच. दोघींनी रीतसर शिक्षण घेतले.

१ मे, इ.स. १८४७ रोजी सावित्रीबाईंनी सगुणाऊला मागासांच्या वस्तीत एक शाळा काढून दिली. ही त्यांची पहिली शाळा. सगुणाऊ तेथे आनंदाने व उत्साहाने शिकवू लागल्या. पुढे भिड्यांच्या वाड्यात शाळा सुरू झाल्यानंतर सगुणाऊंना त्या शाळेत बोलाविण्यात आले. ही पहिली शाळा मध्येच बंद पडली. त्या काळात लोक म्हणत जो शिकेल, त्याच्या सात पिढ्या नरकात जातील. त्यावर उपाय म्हणून त्यांना सांगण्यात आलं की “गोर्या साहेबानं एक शोध लावलाय की, जो शिकणार नाही त्याच्या चौदा पिढ्या नरकात जातील”. नरकाच्या भीतीने का हाईना लोक शिक्षणाला होकार देऊ लागले .

१ जानेवारी, इ.स. १८४८ रोजी भिडे वाड्यात त्यांनी पहिली मुलींची शाळा काढली. तत्कालीन ब्रिटिश भारतातली एतद्देशीय व्यक्तीने काढलेली ही पहिलीच मुलींची शाळा ठरली. सावित्रीबाई मुख्याध्यापिका म्हणून काम पाहू लागल्या. त्या काळात पुण्यातील अन्य भागांतही २-३ मुलींच्या शाळा त्यांनी सुरू केल्या व काही काळ चालवल्या.

सुरुवातीला शाळेत सहा मुली होत्या, पण १८४८ साल संपेपर्यंत ही संख्या ४०-४५ पर्यंत जाऊन पोहोचली. या यशस्वी शाळेचे स्वागत सनातनी उच्च वर्णीयांनी “धर्म बुडाला…. जग बुडणार…. कली आला….” असे सांगून केले . सनातन्यांनी विरोध केला . अंगावर शेण फेकले . काही उन्मत्तांनी तर अंगावर हात टाकण्याची भाषा केली . अनेक संघर्ष करत हा शिक्षणप्रसाराचा उपक्रम चालूच राहिला. घर सोडावे लागले. सगुणाऊ सोडून गेली. अनेक आघात होऊनही सावित्रीबाई डगमगल्या नाहीत .

शिक्षणाच्या प्रसारासाठी अन्य सामाजिक क्षेत्रांतही काम करणे गरजेचे आहे, स्त्रियांचा आत्मविश्वास वाढवणे गरजेचे आहे हे सावित्रीबाईंनी ओळखले. काही क्रूर रूढी परंपरांनाही त्यांनी आळा घातला. लहानपणीच लग्न झालेल्या अनेक मुली वयाच्या बारा-तेराव्या वर्षी विधवा व्हायच्या. पतीच्या निधनानंतर एकतर त्यांना सती जावे लागे किंवा मग त्यांचे केशवपन केले जाई. त्यांना कुरूप बनविले जाई. विरोधाचा अधिकार नसलेल्या या विधवा मग कुणातरी नराधमाच्या शिकार बनत. गरोदर विधवा म्हणून समाज छळ करणार, जन्माला येणार्या मुलाला यातनांशिवाय काहीच मिळणार नाही अशा विचारांनी या विधवा आत्महत्या करत किंवा भ्रूणहत्या करत.

ज्योतिरावांनी या समस्येवर उपाय म्हणून बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले. सावित्रीबाईंनी ते समर्थपणे चालवले. गृहातील सर्व अनाथ बालकांना सावित्रीबाई आपलीच मुले मानत. याच ठिकाणी जन्मलेल्या काशीबाई या ब्राह्मण विधवेचे मूल त्यांनी दत्तक घेतले.

केशवपन बंद करण्यासाठी नाभिक समाजातील लोकांचे प्रबोधन करणे व त्यांचा संप घडवून आणणे, पुनर्विवाहाचा कायदा व्हावा यासाठी प्रयत्न करणे अशी अनेक कामे सावित्रीबाईंनी कल्पकतेने पार पाडली. सत्यशोधक समाजाच्या कार्यातही सावित्रीबाईंचा मोठा सहभाग असे. महात्मा फुले यांच्या निधनानंतरही (इ.स. १८९०) सावित्रीबाईंनी सत्यशोधक समाजाच्या कार्याची धुरा वाहिली. आपल्या विचारांचा प्रसार त्यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातूनही केला. ‘काव्यफुले’ व ‘बावनकशी सुबोध रत्नाकर’ हे काव्यसंग्रह त्यांनी लिहिले. पुढील काळात त्यांची भाषणेही प्रकाशित करण्यात आली.

इ.स. १८९६ सालातल्या दुष्काळात समाजाला सावित्रीबाईंनी सत्कार्याचा आदर्श घालून द िला. पोटासाठी शरीर विक्रय करणार्या बाया-बापड्यांना दुष्टांच्या तावडीतून सोडवून त्यांनी त्यांना सत्यशोधक कुटुंबांत आश्रयास पाठविले. त्यांच्या कार्याला हातभार म्हणून पंडिता रमाबाई, गायकवाड सरकार अशा लोकांनी मदतीचा हात पुढे केला.

इ.स. १८९६-९७ सालांदरम्यान पुणे व परिसरात प्लेगाच्या साथीने धुमाकूळ घातला. हा जीवघेणा आजार अनेकांचे जीव घेऊ लागला. हा रोग संसर्गजन्य आहे हे कळल्यावर ब्रिटिश शासनाने जबरदस्तीने संभाव्य रुग्णांना वेगळे काढून स्थानांतरित करण्याचा खबरदारीचा उपाय योजला. यातून उद्भवणारे हाल ओळखून त्यांनी प्लेगपीडितांसाठी पुण्याजवळ वसलेल्या ससाणे यांच्या माळावर दवाखाना सुरू केला. त्या रोग्यांना व त्यांच्या कुटुंबियांना आधार देऊ लागल्या. प्लेगाच्या रोग्यांची सेवा करताना सावित्रीबाईंनाही प्लेग झाला. त्यातून मार्च १० , इ.स. १८९७ रोजी त्यांचे निधन झाले.

*शिक्षक संदेश समूह*


---------------------------------------------- --------- 


*पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर *


एक अतिशय दानशूर, कर्तृत्ववान, धर्मपरायण व कार्यक्षम राज्यकर्ती म्हणून अहिल्याबाई होळकर, हे नाव मराठ्यांच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले आहे. त्यांचा जन्म चौंडी या छोट्याशा गावात (जिल्हा बीड) माणकोजी व सुशिलाबाई शिंदे या दांपत्यापोटी झाला धनगर समाजात जन्मलेल्या अहिल्याबाईंचे लग्न वयाच्या आठव्या वर्षी सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या मुलाशी, खंडेरावांशी झाले. खंडेरावांच्या आईचे नाव गौतमीबाई होते. खंडेराव हे व्यसनी, छंदीफंदी होते. पण अहिल्याबाईंनी याबाबतीत तक्रार न करता सासऱ्यांनी नेमून दिलेल्या कामात लक्ष घातले.


कुशाग्र बुद्धीची देणगी लाभलेल्या या सूनबाईंवर सासऱ्यांचा मोठा विश्वास होता आणि खूप महत्त्वाचा पत्रव्यवहार ते अहिल्याबाईंवरच सोपवीत असत. खंडेरावांपासून त्यांना दोन अपत्ये झाली. मालेराव हा मुलगा आणि मुक्ताबाई ही कन्या अहिल्या बाईंना वयाच्या अठ्ठाविसाव्या वर्षी वैधव्याला सामोरे जावे लागले. पती खंडेराव कुंभेरी येथे लढाईत मरण पावले. त्यावेळच्या प्रथेप्रमाणे त्या सती जायला निघाल्या, पण सासरे म्हणाले, प्रजाहितासाठी तरी तुम्ही सती जाऊ नये. हे राज्य सांभाळायचे आहे.


आपल्या सासऱ्यांच्या इच्छेचा अहिल्याबाई होळकरत्यांनी मान राखला आणि सती न जाता राज्यकारभारावर आपले लक्ष केंद्रित केले. मल्हारराव ज्यावेळी मोहिमेवर असत, तेव्हा स्वतः अहिल्याबाई राज्याचा बंदोबस्त चोख राखीत असत. मल्हाररावांच्या सल्ल्यानुसार वागत असत.


मल्हारराव होळकरांना पेशव्यांनी इंदूर संस्थानची जहागीर दिली होती. दौलतीचा कारभार मोठा होता. पण १७६६ मध्ये त्यांचे निधन झाले आणि अहिल्याबाईंवर फार मोठी जबाबदारी येऊन पडली. त्यांचा पुत्र मालेराव यांना जरी सुभेदारीची वस्त्रे मिळाली, तरी ती सांभाळण्याची त्यांच्यात कुवत नव्हती. लवकरच त्यांचे देहावसान झाले. अहिल्याबाई आता खऱ्या अर्थाने राज्यकर्ती झाल्या. पुढील अठ्ठावीस वर्षे त्यांनी राज्यकारभाराचा गाडा सैन्याच्या सहकार्याने अतिशय कुशलपणे चालविला. तिजोरीत भर घालीत त्यांनी प्रजाहिताकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले.


अहिल्याबाई होळकर हे नाव मराठ्यांच्या इतिहासात अमर झाले. त्याला त्यांची धर्मपरायण आणि उदारवृत्ती कारणीभूत ठरली. बाई काय राज्य कारभार करणार? ही दरबारी मंडळींची अटकळ त्यांनी सपशेल खोटी ठरविली. अशी शंका घेणाऱ्यात त्यांचा जुना दिवाण गंगाधर यशवंत चंद्रचूड उर्फ गंगोबा तात्या हा प्रमुख होता. राघोबादादांशी त्यांनी अहिल्याबाईंविरुद्ध संधान बांधले आणि इंदूर बळकावण्यासाठी त्यांना प्रोत्साहित केले. अहिल्याबाईंना हे कळले तेव्हा त्या युद्धास तयार असल्याचे त्यांनी राघोबादादास कळविले. राघोबांना ते अडचणीचे झाले. हरलो तर बाईकडून हरलो आणि जिंकलो तरी बाईशी युद्ध करण्यात कोणती मोठी मर्दुमकी? शेवटी राघोबांना माघार घ्यावी लागली. त्यांचा उत्तम पाहुणचार अहिल्याबाईंनी इंदुरात केला. अशा रीतीने बाईंच्या लौकिकात आणखीच भर पडली.


अहिल्याबाईंच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय घटना त्यांचा लौकीक वाढविणारी आहे. आपली कन्या मुक्ताबाई हिचे स्वयंवर घोषित करताना त्यांनी जाहीर केले की, जो कोणी चोर, लुटारु, दरोडेखोर यांचा राज्यात बंदोबस्त करील, त्या शूर व्यक्तीशी मुक्ताबाईचा विवाह लाविला जाईल, त्यावेळी जातपात बघितली जाणार नाही. हा अलौलिक विचार जाहीर करून त्या थांबल्या नाहीत, तर त्यांनी कृतीही तशीच केली. यशवंतराव फणसे या गुणी, शूर तरुणाशी त्यांनी मुलीचा विवाह करून दिला.


अहिल्याबाई एक चाणाक्ष आणि सुधारणावादी राज्यकर्ती होत्या. पूर्वीच्या कायद्यांमध्ये त्यांनी परिस्थितीनुसार काही सुधारणा केल्या. करपद्धती सौम्य केली मात्र शेतकऱ्यांकडून सारा घेणे चालू ठेवले. पाटील कुळकर्ण्यांच्या वतन हक्कांचे संरक्षण करून गावोगावी न्याय देणारे पंच अधिकारी नेमले. त्यावेळी डोंगर मुलखातून भिल्ल व गोंड आदिवासी प्रवाशांना उपद्रव देत आणि त्यांच्याकडून भीलकवडी नावाचा कर वसूल करीत. तेव्हा बाईंनी त्यांच्याशी संवाद साधून त्यांचा कर घेण्याचा हक्क मान्य केला. त्यांच्याकडून पडिक जमिनींची लागवड करून घेतली. शिवाय त्यांना विशिष्ट हद्द नेमून दिली. जमीन करार पट्ट्याने देण्याची पद्धत सुरू केली. राजधानी इंदूरहून नर्मदातीरी महेश्‍वरला हलविली (१७७२). तिथे अनेक वास्तू बांधल्या. राजवाड्यात प्रशस्त देवघर होते. नदीला घाट बांधले. मंदिरांचा जीर्णोद्धार केला व पूर्वजांच्या स्मरणार्थ छत्र्या बांधल्या.


महेश्‍वरहे विणकरांचे मध्यवर्ती केंद्र होते. बाईंनी वस्त्रोद्योगास उत्तेजन दिले, कोष्ट्यांची वसाहत स्थापन केली आणि उत्तम हातमागाची सणंगे तयार होतील अशी पेठ कायम केली. त्यांचा मूळ स्वभाव सौम्य असला तरी राज्यकारभारात त्यांनी मनरूपसिंग सारख्या कुविख्यात डाकूला फाशीदिली. होळकरांच्या टांकसाळीतील नाण्यांवर बिल्वपत्र व शिवलिंग यांचे छाप असत.


त्यांच्या धर्मपरायणतेला प्रांत मर्यादा नव्हती. त्यामुळे त्यांचे नाव आसेतू हिमाचल घेतले जाते. त्यांनी अन्नछत्रे उघडली, राज्यातून विहिरी खोदून त्या चिरेबंद बांधून दिल्या. उन्हाळ्यात राज्यातून प्रवास करणाऱ्यांसाठी पाणपोया, धर्मशाळा, पांथशाळा, आश्रयशाळा बांधल्या. जनावरांसाठी डोण्या बांधून घेतल्या. पशुपक्ष्यांसाठी रुग्णोपचारांची व्यवस्था केली. सर्पदंशावर लगोलग उपचार व्हावेत म्हणून हकीम वैद्य नेमले. स्त्रियांना सुरक्षित स्नानासाठी, कपडे बदलण्यासाठी बंदिस्त ओवऱ्या ठेवल्या. मुंग्यांना साखर आणि जलचरांना कणकेच्या गोळ्या खाऊ घालण्यापर्यंत त्यांचा दानधर्म सढळ होता. गोरगरिबांना सणासुदीला त्या अन्नदान करीत, कपडे वाटत, थंडीच्या दिवसात घोंगड्या वाटल्या जात.


बाईंनी प्रमुख तीर्थक्षेत्री विशेषतः अयोध्या, नाशिक, द्वारका, पुष्कर, हृषीकेश, जेजुरी, पंढरपूर, गया, उदेपूर, चौंढी येथे मंदिरे बांधली. यांशिवाय सोरटी सोमनाथ, ओंकारेश्वर, मल्लिकार्जुन, औंढानागनाथ, काशीविश्वेश्वर, विष्णुपाद, महाकाळेश्वर आदी मंदिरांचा जीर्णोद्धार केला.


वाराणसी, प्रयाग, पुणतांबे, चौंढी, नाशिक, जांब (इंदूर), त्र्यंबकेश्वर येथे नदीला विस्तीर्ण घाट बांधले आणि गोकर्ण महाबळेश्वर, उज्जयिनी, रामेश्‍वर, भीमाशंकर आदी ठिकाणी अन्नछत्रे उघडली. सप्तपुरे-चार धाम या ठिकाणी घाट, बाग, मंदिरे, कुंडे, धर्मशाळा बांधून यात्रिकांची सोय केली. शिवाय त्यांनी जेजुरी येथे श्री मल्हारी गौतमेश्वराची छत्री, इंदूरला मालेराव व गौतमीबाई यांच्या छत्र्या आणि महेश्वरला मुक्ताबाईंच्या स्मरणार्थ नाजूक कारागिरी केलेले मंदिर बांधले व कुंभेरीजवळ खंडेरावांच्या स्मरणार्थ छत्री बांधली.


अहिल्याबाईंचा ग्रंथसंग्रह मोठा व दुर्मिळ होता. त्यात निर्णयसिंधू, द्रोणपर्व, ज्ञानेश्‍वरी, मथुरा माहात्म्य, मुहूर्त चिंतामणी, वाल्मिकी रामायण, पद्मपुराण, श्रावणमास माहात्म्य इत्यादी ग्रंथांच्या हस्तलिखित प्रती होत्या. विद्वानांना त्यांच्या योग्यतेप्रमाणे मानसन्मान दिला जाई. मोरापंत व शाहीर अनंत फंदी यांचा अहिल्याबाईंनी आदर सत्कार करून अनंत फंदीस सल्लाही दिला आणि तमासगिरीपासून परावृत्त केले.


अखेरच्या दिवसांत त्यांना दुःख आणि संघर्षाला तोंड द्यावे लागले. त्यांचे दोन भाऊ वारले, मुलीचा मुलगा नाथ्याबा ऐन तारुण्यात गेला (१७९०), तुकोजी होळकरांची सून आनंदीबाईचे देहावसान झाले. त्यानंतर जावई यशवंतराव फणसे अचानक गेले आणि मुक्ताबाई सती गेली. अशा बिकट परिस्थितीत शिंद्यांचा सरदार गोपाळराव याने १७९२ मध्ये होळकरांच्या फौजेवर हल्ला केला. तेव्हा तरुणासही लाजवील अशा तडफदारीने त्यांनी शिंद्यांचा पराभव केला. त्यांच्या राज्यात सुबत्ता, संपन्नता व शांती होती. त्या अजातशत्रू होत्या पण राज्यावर गुदरलेल्या संकटांना त्यांनी चोख उत्तर दिले.


मध्यम उंचीची, सावळ्या वर्णाची, डोईवर पदर घेतलेली ही स्त्रीकर्तृत्व आणि विचार या दोन्ही दृष्टींनी केवढ्या उंचीची होती, हे त्यांचे आयुष्यच सांगते. महेश्वर येथे वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले.



 जिजाबाई 


जिजाबाई (जिजामाता, राजमाता जिजाऊ) ([[इ.स. १५९८)]- १७ जून, इ.स. १६७४) ह्या मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री होत्या. सिंदखेडचे लखुजी जाधव हे जिजाबाईंचे वडील. आईचे नाव म्हाळसाबाई. जाधव हे देवगिरीच्या यादव घराण्याचे वंशज होते. डिसेंबर इ.स. १६०५ मध्ये जिजाबाईंचा शहाजीराजांशीदौलताबाद येथे विवाह झाला.

जिजाबाई भोसलेराजमाताशिवरायांसमवेत जिजाबाईंचा पुतळापूर्ण नावजिजाबाई शहाजीराजे भोसलेजन्मजानेवारी १२ इ.स. १५९८सिंदखेडराजा,बुलढाणा.मृत्यूजून १७, इ.स. १६७४पाचाड, रायगडचापायथावडीललखुजीराव जाधवआईम्हाळसाबाई उर्फ गिरिजाबाईपतीशहाजीराजे भोसलेसंततीछत्रपती शिवाजीराजे भोसले

संभाजी शहाजी भोसले- (संभाजीराजे भोसले या नावाच्या नातवाशी गल्लत नको)राजघराणेभोसलेचलनहोन" इतिहासा ! तू वळूनी पाहती पाठीमागे जरा ,झुकवूनी मस्तक करशील त्यांना मानाचा मुजरा " 

भोसले व जाधवांचे वैर

पुढे लखुजी जाधव व शहाजीराजे भोसले यांच्यात राजकीय बेबनाव निर्माण झाला, एकदा एक हत्ती पिसाळला होता, हत्तीस पकडण्यास २ पथके तयार केली पहिले जाधवांचे त्याचे नेतॄत्व दत्ताजीराव जाधव लखुजी जाधव यांचा मुलगा व जिजाबाई यांचा भाऊ. दुसरे पथक भोसले यांचे त्याचे नेतृत्व संभाजी भोसले शहाजीराजे भोसले यांचे बंधू करत होते. यात दोघांचे भांडण झाले व संभाजी भोसले यांनी दत्ताजीराव जाधवास ठार केले. हे लखुजी जाधवास समजताच त्यांनी रागाने संभाजी भोसले यांस ठार केले.हे सर्व शहाजीराजांना समजताच ते समशेर घेऊन सासर्‍यावर चालून आले यात शहाजीराजे भोसल्यांच्या दंडावर वार लागला 

या प्रसंगानंतर जिजाबाईंनी  आपल्या माहेराशी संबंध तोडले . नात्यांना, भावनांना बाजूला सारून आपल्या कर्तव्यात कसल्याही प्रकारचा कसूर न होऊ देता धैर्याने आणि खंबीरपणे आल्या प्रसंगाला सामोरे जाण्याचा जिजाबाईंचा हा गुण शिवाजी राजांत पुरेपूर उतरला होता.

जिजाबाईंची अपत्ये

जिजाबाईंना एकूण आठ अपत्ये होती. त्यापैकी सहा मुली व दोन मुलगे होते. त्यांचा थोरला मुलगा संभाजी हा शहाजी राजांजवळ वाढला तर शिवाजी राजांची संपूर्ण जबाबदारी जिजाबाईंवर होती.

जिजाबाईंना पहिले अपत्य झाले त्याचे नाव तो सहा महिन्याचा झाल्यानंतर आपल्या मृत दीराच्या नावाप्रमाणे संभाजी ठेवले. त्‍यानंतर त्यांना ४ मुले झाली; चारही दगावली. ७ वर्षाचा काळ निघून गेला. १९ फेब्रुवारी १६३० फाल्गुन वैद्य तृतीया सूर्यास्ताच्या वेळी शिवनेरी येथे जिजाबाई यांना मुलगा झाला. मुलाचे नाव शिवाजी ठेवले.

राजांचे संगोपन आणि कुशल कारभार

शिवाजी १४ वर्षांचा असताना शहाजीराजांनी त्यांच्या हाती पुण्याची जहागीर सुपूर्त केली. अर्थातच जहागीरीची वहिवाट लावण्याची जबाबदारी जिजाबाईंवर येऊन पडली. कुशल अधिकार्‍यांसमवेत जिजाबाई आणि शिवाजी पुण्यात येऊन दाखल झाले. निजामशाही, आदिलशाही आणि मोगलांच्या सततच्या स्वार्‍यांमुळे पुण्याची अवस्था अतिशय भीषण होती. अशा प्रतिकूल परिस्थितीत  सोन्याचा नांगर घडवून त्यांनी शेतजमीन नांगरली, स्थानिक लोकांना अभय दिले. शिवाजीच्या राजांच्या शिक्षणाची जबाबदारी पेलली. जिजाबाईंनी शिवाजीला पारतंत्र्यात सुरू झालेल्या आणि स्वातंत्र्यात संपलेल्या रामायण, महाभारतातील गोष्टी सांगितल्या. सीतेचे हरण करणार्‍या रावणाचा वध करणारा राम किती पराक्रमी होता, बकासुराचा वध करून दुबळ्या लोकांची सुटका करणारा भीम किती पराक्रमी होता, वगैरे. जिजाबाईंनी दिलेल्या या संस्कारांमुळेच .शिवाजीराजे घडले. जिजाबाईम्नी नुसत्याच्गोष्टी सांगितल्या नाहीत तर सदरेवर शेजारी बसवून राजकारणाचे पहिले धडेही दिले.

शिवरायांच्या मनात कर्तृत्वाची ठिणगी टाकतानाच जिजाबाईंनी त्यांना राजनीतीही शिकविली. समान न्याय देण्याची वृत्ती आणि अन्याय करणार्‍याला कठोरात कठोर शिक्षा देण्याचे धाडस दिले . शस्त्रास्त्रांच्या प्रशिक्षणावर स्वत: बारकाईने लक्ष ठेवले . शहाजीराजांची कैद व सुटका, अफझलखानाचे संकट, आग्रा येथून सुटका अशा अनेक प्रसंगांत शिवरायांना जिजाबाईंचे मार्गदर्शन लाभले. शिवराय मोठ्या मोहिमांवर असताना, खुद्द जिजाबाई राज्यकारभारावर बारीक लक्ष ठेवत असत. आपल्या जहागिरीत त्या जातीने लक्ष घालत. सदरेवर बसून स्वत: तंटे सोडवत.

जीवन

शहाजी राजे बंगळूरात वास्तव्यास असतांना शिवाजीराजांच्या आई व वडिलांची चोख जबाबदारी जिजाबाईंनी मोठया कौशल्याने पेलली. सईबाईंच्या पश्चात संभाजी राजांचीही संपूर्ण जबाबदारी त्यांनी उचलली.

राजांच्या प्रथम पत्‍नी, सईबाईंचे भाऊ बजाजी निंबाळकरयांना जुलमाने बाटवण्यात आले होते. त्यांची हिंदू धर्मात परत येण्याची इच्छा होती, राजांचाही त्याला पाठिंबा होता. या धर्मराजकारणात जिजाबाई राजांच्या पाठीशी ठाम उभ्या राहिल्या. एवढेच नव्हे तर राजांची कन्या सखुबाईंना, बजाजी निंबाळकरांच्या मुलाला देऊन त्यांनी राज-सोयरीक साधली आणि बजाजींना पूर्णपणे धर्मात परत घेतले. या संपूर्ण प्रकरणात त्यांचा द्रष्टेपणा व सहिष्णूता दिसून येते.

राजांच्या सर्व स्वार्‍यांचा, लढायांचा तपशील त्या ठेवत. त्यांच्या खलबतांत, सल्ला मसलतीत भाग घेत. राजांच्या गैरहजेरीत स्वत: राज्याची धुरा वहात. शिवाजी राजे आग्र्याच्या कैदेत असताना राज्याची पूर्णत: जबाबदारी उतारवयातही जिजाबाईंनी कौशल्याने निभावून नेली.

शिवाजी राजांचा राज्याभिषेक व हिंदवी स्वराज्याची स्थापना पाहून राज्याभिषेकानंतर बारा दिवसांनी १७ जून, इ.स. १६७४ ला त्यांनी स्वतंत्र हिंदवी स्वराज्यात शेवटचा श्वास घेतला, आपल्या वयाच्या ८० व्या वर्षी जिजाबाईंचे रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड गावी वृद्धापकाळाने निधन झाले,या गावी राजमाता जिजाबाईंची समाधी आहे.

जिजाबाई ही आपल्या मनात तयार असलेली हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी छत्रपती शिवरायांना ज्ञान, चारित्र्य, चातुर्य, संघटन व पराक्रम अशा राजस व सत्त्वगुणांचे बाळकडू देणार्‍या राजमाता होय.


---------------------------------------------- 


*८ मार्च*

*जागतिक महिलादिन*


महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी, ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो.

दिनांक २८ फेब्रुवारी १९०९ रोजी, न्यूयॉर्क येथे पहिला महिला दिन साजरा करण्यात आला असला तरीही, सन १९१० च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषेदत मांडलेल्या सुचनेनुसार, ८ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून निश्चित करण्यात आला.

*इतिहास*

संपूर्ण अमेरिका आणि युरोपसहित जवळजवळ जगभरच्या स्त्रियांना विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत मतदानाचा हक्क नाकारलेला होता. पुरुषप्रधान व्यवस्थेतील स्त्री-पुरुष विषमतेचे हे एक ढळढळीत उदाहरण. या अन्यायाविरुद्ध स्त्रिया आपापल्या परीने संघर्ष करीत होत्या. १८९० मध्ये अमेरिकेत मतदानाच्या हक्कासंदर्भात `द नॅशनल अमेरिकन सफ्रेजिस्ट असोसिएशन' स्थापन झाली. परंतु ही असोसिएशनसुद्धा वर्णद्वेषी आणि स्थलांतरितांविषयी पूर्वग्रह असणारी होती. दक्षिणेकडील देशांना काळया मतदात्यांपासून आणि उत्तर व पूर्वेकडील देशांना तेथील बहुसंख्य देशांतरित मतदात्यांपासून वाचवण्याकरता स्त्रियांना मतदानाच्या हक्क मिळायलाच हवा, अशा प्रकारचे आवाहन ती करत होती. अर्थात या मर्यादित हक्कांना बहुसंख्य काळया वर्णाच्या आणि देशांतरित कामगार स्त्रियांनी जोरदार विरोध केला आणि क्रांतिकारी मार्क्सवाद्यांनी केलेल्या सार्वत्रिक प्रौढ मतदानाच्या हक्कांच्या मागणीला पाठिंबा दिला. १९०७ साली स्टुटगार्ड येथे पहिली आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषद भरली.

त्यामध्ये क्लारा झेटकिन या कम्युनिस्ट कार्यकर्तीने `सार्वत्रिक मतदानाचा हक्क मिळवण्यासाठी संघर्ष करणे हे समाजवादी स्त्रियांचे कर्तव्य आहे.' अशी घोषणा केली. ८ मार्च १९०८ रोजी न्यूयॉर्कमध्ये वस्त्रोद्योगातील हजारो स्त्री-कामगारांनी रुटगर्स चौकात जमून प्रचंड मोठी ऐतिहासिक निदर्शने केली. दहा तासांचा दिवस आणि कामाच्या जागी सुरक्षितता ह्या मागण्या केल्या. या दोन मागण्यांबरोबरच लिंग, वर्ण, मालमत्ता आणि शैक्षणिक पार्श्वभूमीनिरपेक्ष सर्व प्रौढ स्त्री-पुरुषांना मतदानाचा हक्क मिळावा अशी मागणीही जोरकसपणे केली. अमेरिकन कामगार स्त्रियांच्या या व्यापक कृतीने क्लारा झेटकिन अतिशय प्रभावित झाली. १९१० साली कोपनहेगन येथे भरलेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्नीय समाजवादी महिला परिषदेत, ८ मार्च १९०८ रोजी अमेरिकेतील स्त्री-कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ, ८ मार्च हा `जागतिक महिला-दिन' म्हणून स्वीकारावा असा जो ठराव क्लाराने मांडला, तो पास झाला. यानंतर युरोप, अमेरिका वगैरे देशात सार्वत्रिक मतदानाच्या हक्कासाठी मोहिमा उघडल्या गेल्या. त्यांचा परिणाम म्हणून १९१८ साली इंग्लंडमध्ये व १९१९ साली अमेरिकेत या मागण्यांना यश मिळाले.


*भारतात* मुंबई येथे पहिला ८ मार्च हा महिला दिवस १९४३ साली साजरा झाला. १९७१ सालच्या ८ मार्चला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता. पुढे १९७५ हे वर्ष युनोने `जागतिक महिला वर्ष' म्हणून जाहीर केले. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या. स्त्रियांच्या संघटनांना बळकटी आली. बदलत्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक परिस्थितीनुसार काही प्रश्नांचे स्वरूप बदलत गेले तशा स्त्री संघटनांच्या मागण्याही बदलत गेल्या. आता बँका, कार्यालयांमधूनही ८ मार्च साजरा व्हायला लागला आहे. आजच्या काळात जागतिक महिला दिन सर्वत्र साजरा करताना दिसून येतो. .

१९७५ या जागतिक महिला वर्षाच्या निमित्ताने संयुक्त राष्ट्र संघटनेने आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्याचे ठरविले. १९७७ साली संयुक्त राष्ट्र संघटनेच्या समितीने विविध सदस्यांना आमंत्रित करून ८ मार्च हा आंतरराष्ट्रीय स्तरावर महिलांचे अधिकार आणि जागतिक शांतता या हेतून साजरा करवा यासाठी आवाहन केले. 


---------------------------------------------- 


ती सध्या काय करते......


उड्डाणाच्या वेळी 

फ्लाईट कॅप्टन म्हणून 

तिच्या नावाची उद्घोषणा झाल्यावर

तिच्या उड्डाण कौशल्यावर मनात किंतु येऊ न देता 

निश्चिंत मनाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची 

................... ती वाट बघतेय.


काळा कोट घालून तिनं

कितीही धडाडीने युक्तिवाद केला

कितीही केसेस जिंकलेल्या असल्या तरी 

मनात किंतु न ठेवता तिच्या हातात

विश्वासाने केस देणाऱ्या पक्षकाराची 

................... ती वाट बघतेय.


सारी तयारी करून 

सहायक सर्जन म्हणून नव्हे तर 

मुख्य सर्जन म्हणून 

ऑपरेशन थिअटरमध्ये जाताना 

डॉक्टर यशस्वीपणे शस्त्रक्रिया पार पडतील 

या नातेवाईकांच्या विश्वासाने भरलेल्या नजरेची 

................... ती वाट बघतेय.


अंगावर युनिफॉर्म चढून 

कायद्याचे समर्थपणे रक्षण करणाऱ्या आणि 

धाडसाने गुन्हेगारांशी दोन हात करून

त्यांना जेरबंद करणाऱ्या  

युनिफॉर्ममधील तिच्या देहाकडे न बघता

तिच्यातील आत्मविश्वास, धडाडी आणि 

खांद्यावरील स्टार याकडे लोकांनी बघण्याची 

................... ती वाट बघतेय.


कठीणातील कठीण प्रशिक्षण पूर्ण करून

संरक्षण दलात पूर्ण क्षमतेन काम करून 

स्वतःला सिद्ध करत कॅप्टन पदावर पोहोचून

सारा मानसन्मान मिळाल्यावरही 

सीमेवर प्रत्यक्ष लढून पराक्रम गाजवण्याची   

................... ती वाट बघतेय.


सुट्टी काढून आणि वाट्टेल ते करून 

दिवसभर स्टेडीयममध्य वा टीव्ही पुढे बसणाऱ्या 

क्रिकेटवेड्या प्रेक्षकांच्या या देशात 

तिच्या ‘टीम’ची मॅच पाहण्यासाठी 

प्रेक्षकांनी तुडुंब भरलेल्या स्टेडीयमची 

................... ती वाट बघतेय.


दिवसभर अविश्रांत प्रवास करत 

प्रामाणिकपणे पै ना पै चा हिशोब ठेवत

खचखचून भरलेल्या बस मध्ये 

तिकीट काढण्याची दररोज कसरत करत असताना 

गर्दीचा गैर फायदा घेत लगट न करता 

सौजन्याने वागणाऱ्या प्रवाश्यांची 

................... ती वाट बघतेय.   


कारकून असो वा अधिकारी 

बुद्धिमत्ता आणि कामातील प्रामाणिकपणामुळे

ऑफिसमध्ये प्रमोशन मिळाल्यावर

सहकाऱ्यांनी नाकं न मुरडता वा असूया न दाखवता

मोठ्या मनाने तिचा अभिनंदन करण्याची 

................... ती वाट बघतेय.


दमदार अभिनयाच्या जोरावर 

फिल्म इंडस्ट्रीमध्ये प्रवेश केल्यावर

केवळ तिच्या सौंदर्याकडे न बघता 

तिच्यातील अभिनयाच्या जोरावर

कसदार भूमिका मिळण्याची 

................... ती वाट बघतेय.


आर्किटेक्ट असूनही 

फक्त इंटेरिअर डिझाईनचे काम 

घेऊन येणाऱ्या क्लायंटपेक्षा 

तुम्हीचं माझ्या इमारतीचा प्लॅन काढून द्या 

असे म्हणून विश्वासाने काम देणाऱ्या क्लायंटची 

................... ती वाट बघतेय.


कोणताही वारसा, पार्श्वभूमी नसतानाही 

कोणाच्याही पाठींब्याशिवाय केवळ स्व:कर्तृत्वाने 

राजकारणातील सर्वोच्च पदावर पोहचल्यावर

तिच्या चारित्र्यावर शिंतोडे न उडवण्याची 

................... ती वाट बघतेय.


क्षेत्र कोणतेही असो 

ते क्षेत्र मोठ्या हिमतीनं पादाक्रांत करून 

तिने निर्विवाद यश मिळवल्यावर 

‘ती’च्या बुद्धिमत्तेवर शंका न घेण्याची 

‘ती’च्या विषयी गॉसिप न होण्याची

‘ती’च्या चारित्र्यावर संशय न घेण्याची

तिने कितीही यश मिळवले तरी 

तिला ‘अक्कल’ नसते हे न म्हणण्याची 

किंवा तू स्त्री आहे म्हणून हे करू शकणार नाही 

असे म्हणून तिचे पाय न खेचण्याची

................... ती वाट बघतेय.


ती वाट बघतेय ................... 

‘ती’ म्हणून तिच्या क्षमतेविषयी 

कळत नकळत मनात ‘किंतु’ न येण्याची 

आणि ‘ती’ म्हणून तिच्या कामगिरीवरवर

जाणते अजाणतेपणे ‘अविश्वास’ न दाखवण्याची 


ती वाट बघतेय ................... 

‘ती’च्या कर्तृत्वावर 

‘ती’ म्हणून लेबल न लावता  

एक ‘व्यक्ती’ म्हणून, 

एक ‘माणूस’ म्हणून

‘ती’च्या कर्तृत्वाला 

निर्विवादपणे दाद देण्याची 

ती वाट बघतेय.


---------------------------------------------- 


*आज महिला दिवस आहे. मस्तच!*


*नवरा बायको छापाचे आचरट विनोद वाचणारे आणि ते  हसत शेयर करणारे आज नारी शक्तीचे गोडवे गातील...*

*एक्सरे नजरेने निर्लज्जपणे बायकांना स्कॅन करत मान खाली घालायला लावणारे स्त्रीमुक्तीचे गोडवे गातील...*

*गर्दीच्या ठिकाणी कोपर आणि हात चालवणारे स्त्रियांच्या शील रक्षणाचे बिगुल फुंकतील...*

*घराबाहेर जगाची हाजीहाजी करून घरात राज्य करणारे नरकेसरी आज स्त्री समानतेचे व्याख्यान झाड़तील...*

*स्त्री म्हणजे फक्त "काम" आणि घरकाम करणारे शरीर असे मानणारे शील नामक विषयावर उद्बोधक चर्चा घडवतील...*

*वंशाला दिवा हवा म्हणून दिवा लागेपर्यंत "तेल ओतत रहाणारे" आज बेटी धनाची पेटी असे संदेश देतील...*

*गर्भजल चिकित्सा करून स्त्रीभ्रूण हत्येचे पातक करणारे पापी मातृसेवेतून पुण्यसंचायाची महती सांगतील...*

*घरात बायकोला मारहाण करणारे पशु, स्त्री सबलीकरण नामक विषयावर ज्ञानामृत पाजतील...*

*आपल्याच नात्यातील लहान मुलींचा विनयभंग करणारे, परस्त्री मातेसमान अश्या आरोळ्या देतील...*

*ट्रायल रूम मध्ये कॅमेरे लावून MMS बनवणारे आणि ते लाळ घोटत पहाणारे नारीला सलाम करतील...*

*बलात्कारासारखी क्षुल्लक "चूक" केलेले "बालगुन्हेगार" आणि कायद्यातील पळवाटांचा आधार घेऊन सुटलेली बलात्कारी जानावरे न्याय"देवतेला" वंदन करतील...*

*बायको कितीही शिकलेली असली, कर्तृत्ववान असली तरी, “घरकाम” हेच तिचे मुख्य काम असे मानणारे आधुनिक पुरुष स्त्री शिक्षणाचे महात्म्य कथन करतील...*

*मेन विल बी मेन म्हणत स्त्रियांना कास्पटासमान मानणारे निगरगट्ट MCP स्त्रियांना सन्मान देण्याबद्दल बौद्धिक घेतील...*

*ह्या सर्वाची खरे तर गरज नाहीये. गरज आहे ती स्त्रीला फक्त सन्मान द्यायची, तिचा आदर मनात बाणवायची! तो मनात बणला की विचारात आणि आचरणात आपोआप येईल. मग वर्षातील प्रत्येक दिवस महिला दिवस असेल! तो वेगळा साजरा करायची गरज नसेल!*


---------------------------------------------- 


 *रखमाबाई राऊत*


हरिश्चंद्र यादवजी ह्या त्याकाळच्या 'रायबहादूर' आणि 'जस्टिस ऑफ पीस' अशी नेमणूक असलेल्या गृहस्थांची नात. ते स्वत: उत्तम इंग्रजी शिकलेले आधुनिक विचारांचे गृहस्थ होते. रखमाबाईंची आई, जयंतीबाई ही वयाच्या अवघ्या सतराव्या वर्षी विधवा झाल्यानंतर त्यांनी तिचा दुसरा विवाह करून दिला. रखमाबाई ही जयंतीबाई ह्यांची पहिल्या विवाहापासूनची मुलगी. जयंतीबाईंचे दुसरे पती डॉ. सखाराम अर्जुन (राऊत) हे नावाजलेले वनस्पतीशास्त्राचे प्राध्यापकहोते. तसेच ते शल्यचिकित्साही शिकवत. त्याकाळी त्यांच्या ज्ञातीमध्ये विधवाविवाहाला विरोध नसला तरी बाल विधवा विवाह की प्रौढ विधवा विवाह, हा प्रश्न चांगलाच जोर धरून होता. हा विरोध पत्करून केलेलं सापत्यविधवेसोबतचं लग्न हे हरिश्चंद्रजी आणि डॉ. सखाराम दोघांचंही धाडसाचं पाऊल होतं.

रखमाबाईंच्या जडणघडणीत त्यांच्या कौटुंबिक पार्श्वभूमीचा मोठा वाटा तर आहेच, परंतु त्याचा योग्य वापर करून आपलं व्यक्तिमत्व घडवणं, हेही तितकंच महत्वाचं आहे. त्या काळच्या रितीरिवाजाप्रमाणे वयाच्या नवव्या वर्षी लग्न झालं, तरी विसावं लागेपर्यंत त्यांच्या सासरी जाण्याचा प्रश्न उद्भवला नव्हता. ही तेव्हा सामान्य बाब खचित नसावी. कदाचित वयात आल्याआल्या त्यांना सासरी पाठवलं गेलं असतं तर असा - सासरी जाणं हितावह की नाही - हा विचार कितपत टोकदारपणे त्या करू शकल्या असत्या, हा एक प्रश्नच आहे. सासरी जाण्यास त्यांनी नकार दिल्यामुळे प्रसिद्ध रखमाबाई विरुद्ध दादाजी खटला झाला. त्यांच्या आईनं मुलीसोबत सुनेलादेखील इंग्रजी शिक्षण दिलं होतं. खटल्याच्या पूर्वकाळात (१८८२-८५) शिक्षणासोबतच त्या आर्य समाजाच्या चिटणीसपदाचा कार्यभार सांभाळत. हरिश्चंद्र यादवजी आणि डॉ. सखाराम अर्जुन ह्या दोघांची समाजातील प्रतिष्ठितांत तसेच इंग्रज लोकांत उठबस होती. आपली मतं स्पष्टपणे मांडल्यामुळे आणि कणखरपणामुळे रखमाबाईंनाही ह्या दोन्ही वर्तुळांत विशेष वागणूक मिळत असे. स्वतः लेडी गव्हर्नर, लेडी जस्टिस त्यांना [[चहा पार्टी]साठी आमंत्रणं धाडीत. त्यामुळे त्यांचे विचार आणि कहाणी इंग्रज समाजात थेट परिचयाची होती. नव्या हिंदुस्थानाच्या तरूण पिढीची प्रतिनिधी म्हणून हा युरोपियन समाज त्यांच्याकडे कौतुकानं आणि आदरानं पाहत असे. इतकेच नव्हे तर इंग्लंडमध्ये शिक्षणासाठी गेल्यानंतर तिथेही रखमाबाईंना विचारवंत व अभ्यासू लोक भेटले. ऍलिस (बर्ट्रांड रसेलची प्रथम पत्नी), हेन्रिएट्टा मुल्लर, पंडिता रमाबाई, इव्हा मॅक्लेरन अशी बरीच मंडळी त्यांच्या व्यक्तीसंग्रहात होती. इंग्लंडमध्येसुद्धा त्या वेगवेगळ्या सभांमधून भाग घेत राहिल्या. ह्यावरून त्यांचा सतत कार्यरत राहण्याचा पिंड दिसून येतो.

त्या काळात परदेशातसुद्धा स्त्रियांचे वैद्यकीय शिक्षण तितकं सोपं नव्हतं. असं असताना रखमाबाईंनी भूलतंत्र, सुईणपण, दंतशास्त्र ह्यांचा व स्त्रीरोगचिकित्सेचा विशेष अभ्यास केला. त्यासाठी वेगवेगळ्या कॉलेजमध्ये जाऊन खास शिक्षण घेतलं. बाळंतपणाचं शास्त्र व बाळंतपणातल्या शस्त्रक्रिया ह्या विषयांत 'लंडन स्कूल ऑफ मेडिसिन' इथल्या परिक्षेत विशेष प्रावीण्य मिळवलं. त्याचसोबत शरीराला मालिश करण्याचं तंत्र आणि त्याचा अनुभवही त्यांनी घेतला. वैद्यकीय शिक्षणात स्त्री-पुरुष आपपरभाव न करणार्‍या ह्या कॉलेजात 'मुलींना पदवीदान करणे', हे मात्र विद्यापीठाच्या कायद्यात बसत नसे. तेव्हाच्या पद्धतीप्रमाणे रखमाबाईंनी ही शेवटची परीक्षा 'Onjoint board of the colleges of physicians and surgeons of Edinburgh and Glasgow' ह्या स्कॉटलंडच्या संस्थेत दिली आणि त्या उत्तम तर्‍हेनं उत्तीर्ण झाल्या. 'Licentiate of the Royal College of Physicians and Surgeons' ही पदवी मिळाल्यानंतर त्यांचं नांव इंग्लंडच्या 'मेडिकल रजिस्टर'मध्ये सनदशीर दाखल झालं.

रखमाबाईंना शिक्षणात आर्थिक मदत करणार्‍या 'डफरिन फंडा'तर्फे एकूण सात रुग्णालये उघडण्यात आली. पहिलं दिल्लीत निघालं. त्यानंतर मुंबईत 'कामा हॉस्पिटल', नंतर मग सुरत, बडोदा, मद्रास अशी पुढची रुग्णालयं चालू झाली. रखमाबाईंनी डॉक्टरी व्यवसायाची सुरुवात कामा हॉस्पिटलमध्ये केली. तिथे त्यांची नेमणूक 'हाऊस सर्जन' म्हणून झाली. इथे त्यांनी केवळ सहाच महिने काम केलं. कामा हॉस्पिटलमधल्या तात्पुरत्या नेमणुकीनंतर रखमाबाईंना सुरतच्या तेव्हाच्या 'शेठ मोरारभाई व्रजभूषणदास माळवी हॉस्पिटल'मध्ये 'मेडिकल ऑफिसर' ह्या पदावर नियुक्त करण्यात आलं. परदेशगमन, लग्नासंबंधीचा खटला अश्या सगळ्या वादग्रस्त परिस्थितीत सुरतेची ही नोकरी त्यांच्या पथ्यावरच पडली.

त्यांचा वैद्यकीय कार्यकाल हा मुख्यत्वे वयाच्या साठाव्या वर्षापर्यंत सुरत तर त्यानंतर राजकोट इथे गेला. दोन्ही ठिकाणी त्यांनी फक्त व्यवसाय हेच ध्येय न ठेवता सोबत समाजोपयोगी कामंही केली. सुरतेत तर पायाभरणीपासून सुरुवात होती. आधी तर बर्‍याचश्या स्त्रिया कुठल्याच दवाखान्यात प्रसूतीसाठी जायला तयार नसायच्या. त्यात ह्यांच्या इस्पितळासाठी इमारत तयार होती परंतु ती झपाटलेली असल्याच्या वदंता पसरल्या होत्या. तेव्हा इमारतीत शेळीचं सुखरूप बाळंतपण करून खात्री देण्यापासून ते दवाखान्यात प्रसूतीसाठी न येणार्‍या स्त्रियांचं समुपदेशन तर केलंच आणि त्यासाठी शेवटपर्यंत अथक प्रयत्न करत राहिल्या. उपचारांसाठी आलेल्या स्त्रियांसोबतच्या मुलांसाठी बालक मंदिर स्थापन केलं. समाजाकडून अव्हेरलेल्या विधवा व त्यांच्या मुलांचं त्या आश्रयस्थान बनल्या. इतकंच नव्हे तर आसपासच्या स्त्रियांना लिहितावाचता यावं म्हणून त्या त्यांचे खास वर्गही घेत. स्त्रियांनी घराबाहेर पडून काही करावं म्हटलं तर सर्वसाधारणपणे घरांतल्यांकडून विरोध होतो, पण तोच विरोध त्या धार्मिक कार्यासाठी बाहेर पडत असतील तर तितकासा तीव्र राहत नाही. नेमकी हीच बाब लक्षात घेऊन रखमाबाईंनी प्रथमतः स्त्रियांना धार्मिक पुस्तक वाचनासाठी एकत्र केलं व नंतर त्यातून 'वनिता आश्रम'ची स्थापना केली. इतर उपक्रमांसोबत विधवाआश्रम आणि अनाथाश्रम हे वनिताआश्रमचं मुख्य कार्य होतं. एकीकडे दिवसाचे अठरा तास काम, दर शनिवारी 'आयरिश मिशन'च्या दवाखान्यात मोफत सेवा तर दुसरीकडे समाजिक कार्य, हे शिवधनुष्यत्यांनी सहज पेललं होतं. (रोजच्या कामांच्या भाऊगर्दीत अगदी साडी नेसण्यात वेळ जाऊ नये म्हणून त्या पेटिकोटला साडीच्या निर्‍या शिवून ठेवत.)

एक डॉक्टर म्हणून त्यांचं काम महत्त्वाचं, पण त्यांनी केलेली इतर महत्त्वाची कामंही केली आहेत. सुरतेला असताना रमाबाई रानडेंनी अध्यक्षपद भूषवलेल्या १९०७च्या सुरतेच्या अखिल भारतीय महिला परिषदेच्या स्वागत समितीच्या चिटणीसपदी त्यांनी काम केलं, तर पुढे राजकोटला गेल्यावर 'रेडक्रॉस सोसायटी'ची शाखा उघडली. पहिल्या महायुद्धादरम्यानचं त्यांचं कार्य लक्षात घेऊन १९१८ साली त्यांना रेडक्रॉसतर्फे सन्मानपदक देण्यात आलं.

स्त्रियांसाठी खास विज्ञान-स्त्रीशिक्षकांच्या व्याख्यानमालाचालवल्या आणि अगदी किती स्त्रिया तिथे हजर होत्या, इथपासूनची नोंद ठेवली. इतकंच नव्हे, तर कामाठीपुरामधल्या स्त्रियांसाठी अारोग्यविषयक व्याख्यानं घडवून आणली. स्वतःच्या आजोबांच्या मालकीचं गावदेवीचं मंदिर सर्वांसाठी खुलं केलं. अस्पृश्यांना, त्यांच्या स्त्रियांना हक्क आहेत ही त्यांची धारणा होती. 'असमर्थांना आपण समर्थ बनवण्याचा प्रयत्न केला, परंतु जे दुर्लक्षित आहेत त्यांच्या प्रश्नांचं काय', ही भावना त्यांना छळत असे. त्यातूनच त्यांनी प्रत्येक ज्ञातिचे काय हक्क आहेत त्यांच्या याद्या लिहून काढल्या. उदा. महाराला बावन्न हक्क आहेत, तर त्यांना त्या हक्कांची जाणीव करून दिली. अगदी ऐंशीच्या घरात वय असतानादेखील कुणा एकाकी मुलीला आसरा देणं, तिला लिहायला वाचायला शिकवणं, 'मिडवाईफरी'ची परीक्षा द्यायला लावणं अशी कामं त्या करत राहिल्या. स्त्रियांना बँकांमध्ये खातं काढायला लावून बचतीचं महत्त्व कृतीतून तेव्हाही शिकवत राहिल्या.

जश्या त्या कामामध्ये कणखर, स्वतःवरती अन्याय होऊ न देणार्‍या होत्या, तसंच इतरांवरही अन्याय होऊ नये, अशी त्यांची शिकवण होती. त्यांच्या एका शिष्येनं, रखमाबाईंनी भावाच्या सुनेला दिलेला सल्ला लिहून ठेवला आहे - 'बायकोचे पोट हे नवऱ्याच्या पोटात' हे तत्वत: मान्य कर परंतु पाच-पंचवीस माणसांच्या घरात सर्वात शेवटी जेवायला बसणार्‍या बायकांचे जेवण आधी वेगळे काढून ठेवत जा. वरवर साध्या वाटणार्‍या ह्या वाक्याचं काय मोल आहे, ते अशा परिस्थितीतून गेलेल्या स्त्रीलाच कळेल.

रखमाबाईंचा मूर्तीपूजेवर विश्वास तसाही नव्हताच. निवृत्तीनंतर उत्तरायुष्यात त्यांनी दासबोध-तुकारामाच्या अभंगांचं मनन, संस्कृत श्लोकांचा अभ्यास चालू केला. अस्पृश्यतेविरोधात काही शाळांमधून व्याख्यानं देण्याची व्यवस्था केली. वयानुसार डोळ्यांनी दिसणं अगदीच कमी झालं तेव्हा आजूबाजूच्या मुलांची 'बालसभा' घेत व त्यांच्या अंगी सभाधीटपणा यावा म्हणून गाणी-गोष्टी म्हणायला लावत. दुर्दैवानं रखमाबाईंनी त्यांचा पत्रव्यवहार जपून ठेवला नाही; उलटपक्षी तो वेळोवेळी जाळून टाकला. त्यांच्या टिपणातल्या काही वह्या आहेत त्यावरूनच काय ती त्यांच्या कार्याची थोडीफार माहिती कळते.


---------------------------------------------- 


*आनंदीबाई गोपाळराव जोशी*


*भारतातील पहिल्या महिला डॉक्टर*


*जन्मदिन - ३१ मार्च, इ.स. १८६५*


आनंदीबाई गोपाळराव जोशी (मार्च ३१, इ.स. १८६५- फेब्रुवारी २७, इ.स. १८८७) या भारतातील पहिल्या महिला डॉक्टर होत्या.

आनंदीबाई जोशी यांचा जन्म ३१ मार्च १८६५ रोजी आजोळी, पुण्यात त्यांचा जन्म झाला.आनंदीबाईंचे पूर्वाश्रमीचे नाव यमुना होते. जुने कल्याण परिसरातील पारनाका इथे राहणाऱ्या गणपतराव अमृतेश्वर जोशी यांची ज्येष्ठ कन्या. वयाच्या नवव्या वर्षी बालपणातच त्यांचा विवाह वयाने २० वर्षे खूप थोरले असणाऱ्या गोपाळराव जोशी यांच्याशी झाला. लग्नानंतर गोपालरावांनी आपल्या पत्नीचे जुने यमुना हे नाव बदलून आनंदीबाई असे ठेवले.

गोपाळराव कल्याण ला पोस्ट ऑफिसात कारकून होते. ते स्वतः लोकहितवादी ची शतपत्रे वाचत . आपल्या पत्नीला शिक्षणात रस आहे हे गोपाळरावांनी जाणले होते . लोकहितवादीच्या शतपत्रातून ते प्रेरित झाले आणि आपल्या पत्नीस इंग्रजी शिकविण्याचा निश्चय केला.

लग्नानंतर आनंदीबाईंनी वयाच्या १४व्या वर्षी एका मुलास जन्म दिला. परन्तु दुर्दैवाने पुरेशी वैद्यकीय सुविधा न मिळाल्याने तो केवळ १०च दिवस जगू शकला . हीच खंत आनंदीबाईना वैद्यकीय शिक्षणाकडे खेचून घेण्यास कारणीभूत ठरली . त्यांनी शिकून डॉक्टर होण्याचा निर्णय घेतला. 

वयाच्या एकोणिसाव्या वर्षी "वुमेन्स मेडिकल कॉलेज ऑफ़ पेन्सिल्व्हानिया" मध्ये प्रवेश मिळाला. दरम्यान, नवीन वातावरण आणि प्रवासातील दगदग यामुळे आनंदीबाईंची प्रकृती खूप ढासळली होती. परंतु अमेरिकेतील एका जोडप्याच्या मदतीमुळे सर्व काही पार पडत गेले.

भारतात आगमन

एम.डी. झाल्यावर आनंदीबाई जेव्हा भारतात परतल्या तेव्हा त्यांचे जोरदार स्वागत झाले . सर्वत्र अभिनंदन झाले. त्यांना कोल्हापूर मधील अल्बर्ट एडर्वड हॉस्पीटल मधील स्त्री-कक्षाचा ताबा देण्यात आला.

मृत्यू

वयाच्या विशीतच त्यांना क्षयरोग झाला. पुढे काही महिन्यातच म्हणजे २६ फेब्रुवारी, इ.स. १८८७ रोजी त्यांना पुण्यात मृत्यू आला.

केवळ २१ वर्षाच्या जीवन यात्रेत आनंदीबाईंनी भारतीय स्त्रियांसाठी प्रेरणादायी जीवनादर्श उभा केला. दुदैर्वानं आनंदीबाईंच्या बुद्धिमत्ता आणि ज्ञानाचा फायदा जनतेला होऊ शकला नाही. मात्र 'चूल आणि मूल' म्हणजेच आयुष्य असं समजणाऱ्या महिलांना त्या काळात आनंदीबाई जोशी यांनी आदर्श व मानदंड घालून दिला. एकीकडे सावित्रीबाई व ज्योतिबा स्त्रीशिक्षणासाठी खस्ता खात असतानाच आनंदी -गोपाल हे जोडपे आपले ध्येय प्राप्त करण्यासाठी झटत होते . जिद्द आणि चिकाटी असेल तर कोणतेही मोठे काम अशक्य नाही . समाजात राहून काम करायचे तर अडथळे येणारच. मात्र त्यावर मात करून आपले ध्येय प्राप्त करून दाखविणे यातच जीवनाची खरी सार्थकता आहे, असे आनंदीबाईंच्या आयुष्यावरून उमजते.

स्वतः डॉक्टर होऊनही कुणा देशभगिनीवर उपचार करण्याची संधी तिला मिळालीच नाही. तिकडे अमेरिकेत मात्र कार्पेटर यांनी आपल्या कुटुंबाच्या स्मशानात (Grave-yard) तिचं लहानसं थडगं बांधलं. त्यावर ‘आनंदी जोशी, परदेशात शिक्षण घेऊन डॉक्टर पदवी मिळवणारी पहिली भारतीय स्त्री’ अशी अक्षरं कोरून तिचं स्मारक केलं.



---------------------------------------------- 


 छोडो मेहँदी खडक संभालो

खुद ही अपना चीर बचा लो

द्यूत बिछाये बैठे शकुनि,

मस्तक सब बिक जायेंगे

सुनो द्रोपदी शस्त्र उठालो, अब गोविंद ना आयेंगे|


कब तक आस लगाओगी तुम,

बिक़े हुए अखबारों से,

कैसी रक्षा मांग रही हो

दुशासन दरबारों से|


स्वयं जो लज्जा हीन पड़े हैं

वे क्या लाज बचायेंगे

सुनो द्रोपदी शस्त्र उठालो अब गोविंद ना आयंगे|


कल तक केवल अँधा राजा,

अब गूंगा बहरा भी है

होठ सी दिए हैं जनता के,

कानों पर पहरा भी है|


तुम ही कहो ये अश्रु तुम्हारे,

किसको क्या समझायेंगे?

सुनो द्रोपदी शस्त्र उठालो, अब गोविंद ना आयंगे|

  

---------------------------------------------- 


अरे कोण कुठली असिफा...

मुस्लिम मुलगी...

झाला तर होउदे ना बलात्कार...!

मंदिरात झाला का...?

इतिहासात आमची मंदिरे नाही का यांनी पाडली...

आठ वर्षाच्या मुलीवर सहा दिवस झाला...! 

अरे मग होउदे ना...

आमच्या काश्मिरी पंडित बायकांवर झाला तेंव्हा कुठे होतात...?

अरे या लोकांनी किती अत्याचार केलेत आपल्यावर...!


यांच्या पोरीसाठी कशाला काळे dp लावता...?

अरे कोपरडीच्या भगिणीवेळी कुठे होतात...?

त्यापेक्षा भगवे लावा dp...!


मी चुकीचा नसेन तर खरं सांगा...

हेच चित्र दिसतंय ना बऱ्यापैकी सगळीकडे...?


प्रत्येक प्रखर भावना स्वतःची एक 'रम्य कथा' रचताना दिसते. ही भावना जर एकट्या माणसाचा विशेष गुण असेल तर त्या माणसाने कितीही रम्यकथा उभारल्या तरी त्याला वैयक्तिक पागलपणाच म्हणणार...! पण, काही वेळा एखादी भावना सामुदायिक भावना बनते...! आणि ही सामुदायिक भावना सामूहिक पातळीवर एक रम्य आकार तयार करू लागते...!लढाया,युद्धे यांच्यात अशा रम्यत्व पावलेल्या भावना मोकाट सुटलेल्या दिसतात. ही 'मिथ मेकिंग'ची वृत्ती अनेकदा माणसाच्या दुष्टव्याच्या मुळाशी असते...! नाझी लोकांचा ज्यूंबद्दलचा दुष्टावा या कपोलकल्पित कथांचाच परिणाम होय... अशा कथा असल्या म्हणजे सामुदायिक दुष्टपणा हा मोठा भव्य भासू लागतो व या रम्य कथांनी ही दुष्ट प्रवृत्ती 'सभ्य' बनविली जाते... हे खरं...!


असिफा नावाच्या मुस्लिम मुलीवर बलात्कार झाला... ही गोष्ट या बलात्कारात निराळी नव्हती...

तर त्या बलात्कारांच्या समर्थनार्थ तिरंगे घेऊन रॅली काढली गेली...

थोडक्यात... दबाव टाकला गेला...

याला सामूहिक झुंडशाही म्हणतात...

ही झुंडशाहीच मग न्यायालय बनते... ती जातीचा- धर्माचा आधार घेते...

एखादे मत कितीही अयोग्य असले तरी बहुसंख्यांकांचा त्याला पाठींबा मिळताच ते मत मान्य होऊ लागते...

मग द्वेषापोटी अनेक रम्य कथा जन्माला घातल्या जातात... त्या कथांचे चर्वण सतत केले जाते...


"अमुक अमुक वर्षानंतर मुस्लिम लोकांची संख्या हिंदुपेक्षा वाढून भारत इस्लाम राष्ट्र होणार...!"

अशा आशयाचा मॅसेज वाचला असेलच तुम्ही...!


याच त्या रम्य कथा...!

सतत एका समाजाला शत्रू म्हणून उभं केलं जातं...

आपला समाज धोक्यात आहे असं सतत बिंबवलं जात...

आपण गांडू राहिलो म्हणून आपण मागे राहिलो अस उगाच बिंबवले जातं... ते आक्रमक आहेत... ते बघा कसे धर्मनिष्ठ आहेत... आपलं काय...?

अस सांगूनच दोन्हीकडून ह्या झुंडी तयार केल्या जातात...

हेच जर्मनीत झालं...!


आणि हे घडतं धर्माच्या- जातींच्या अशा झुंडशाहीतून...

या द्वेषभक्तीलाच देशभक्तीचा मुलामा दिला जातो... नव्हे तीच देशभक्ती बनते...

झुंड बहुसंख्यकांची मते बनवते...

आणि आता सोशल मीडियामुळे हे फार सोपं बनलंय..


ह्या झुंडी प्रश्नांची उत्तरं देत नाहीत...

ती एक गेम खेळतात... 'व्हॉट अबाउटरी'चा गेम...

म्हणजे आपण म्हणालो की 'मोदी सरकारने 4 वर्षात काय केलं...? तर ते म्हणतील 'काँग्रेसने साठ वर्षात काय केलं...?'

आपण म्हणलो 'असिफाला न्यायासाठी निषेध म्हणून काळे dp लावा' तर ते म्हणतील 'काश्मिरी पंडितावरील अत्याचाराच्यावेळी कुठे होतात...? भगवे dp लावा'

या गेमला म्हणतात व्हॉट अबाउटरी...

यातले युक्तिवाद वरवर योग्य वाटतात... पण ते टोकाच्या निष्कर्षांवर आधारलेले खोटे असतात...

त्यातून खरे प्रश्न सोडवले जात नाहीत... ना खऱ्या प्रश्नांना त्यातून वाचा फुटते...

असिफावर बलात्कार झाला आणि तिला न्याय मिळाला पाहिजे...

याला धर्माचा मुलामा दिला गेला... बलात्काऱ्यांच्या समर्थनार्थ रॅली काढण्यात आली... तेही तिरंगे घेऊन...!

अरे आपण माणूस म्हणून मेलोय रे...! कधीच...!


हे झालं एक ताजे प्रकरण...

गेले काही वर्षे आपण याच 'मिथ मेकिंग'ने तयार झालेल्या रम्य कथेमध्ये अडकलो आहोत... 

याच 'व्हॉट अबाउटरीने' आपले पोटापाण्याचे प्रश्न बाजूला ठेवले गेलेत...

चर्चेत काय येतंय, तर हिंदू-मुसलमान,बीफ,भगवा-निळा,लव्ह जिहाद आणि बरच काही...


नोकऱ्यांचं काय झालं...?

नोटांबंदीच काय झालं...?

काळ्या पैशाचं काय झालं...?

अच्छे दिनाच काय झालं...?

विकासाचं काय झालं...?


यावर कधी बोलणार आपण...?

इथे लहान मुलीवर बलात्कार झाला... तो सहा दिवस सलग तेही एका मंदिरात म्हणजे धार्मिक स्थळामध्ये झाला... त्यात एक पोलिसही सहभागी झाला... 

हे आपल्यासाठी महत्वाचे ठरलं नाही...

त्या चिमुरडीवरचा बलात्कार आपल्याला हलवून सोडला नाही...

आपण बघितली ती मुस्लिम आहे...


कारण आपण वरवर सभ्य वाटणाऱ्या एका रम्य कथेत आहोत सध्या...

आपण वास्तवात नाही...

आपण कधीच मेलो आहोत... कारण आपले मेंदू आपल्या हातात नाहीत... ते या झुंडीच्या हातात गेलेत...

मेंदू गहाण टाकलेत आपण...

गहाण...

 विनायक होगाडे 


---------------------------------------------- 




आसिफा ने लिखा निर्भया को खत,


तुम कहां हो? दीदी मैं तुम्हें ढूंढ रही हूं क्योंकि मुझे समझ नहीं आ रहा कि मैं किससे अपना दर्द कहूं। हम सगी बहनें तो नहीं लेकिन हमारे बीच दर्द का रिश्ता है। इसलिए मैं तुम्हीं से कहती हूं। दीदी 16 दिसंबर 2012 को तुम्हें 6 लोगों ने कुचला। तुम चली गईं तो खूब शोर हुआ। लगा कि अब लड़कियों के लिए ये देश ज्यादा सेफ होगा। लेकिन दीदी ऐसा नहीं हुआ। देखो तुम्हारे जाने के 6 साल बाद मेरे साथ क्या हुआ?


दीदी मैं सिर्फ आठ साल की हूं। मेरा नाम आशिफा है। मेरा घर जम्मू में कठुआ जिले के रसाना गांव में है। दीदी मैं अपने घोड़े को ढूंढते-ढूंढते इंसान के रूप में जानवर के चुंगल में फंस गई। इन लोगों ने मुझे एक कमरे में बंद कर दिया दीदी। फिर लोग आते गए और मुझ पर जुल्म करते रहे। वो आठ लोग थे। दीदी मुझे बहुत दर्द हुआ। खाली पेट मुझे ये लोग कोई नशीली दवा देते थे। दीदी जो लोग आते थे उनमें पुलिस वाले भी थे। इनमें से एक पुलिस वाला तो वो था जिसे मुझे ढूंढने के लिए लगाया गया था। मुझ नन्हीं सी जान को कुचलने के लिए इन लोगों ने यूपी के मेरठ से भी किसी को बुला लिया। दीदी मुझमें जान तो बची नहीं थी फिर ये लोग मुझे मारने के लिए जंगल ले गए। वहां मुझे मारने ही जा रहे थे कि एक पुलिस वाले ने कहा रुको। मुझे लगा कि शायद उसे दया आ गई। लेकिन दीदी उसने जो कहा उसे सुनकर मुझे जीने की इच्छा भी नहीं रही। उसने कहा - रुको, इसे मारने से पहले मुझे एक बार और रेप करने दो। सबने मुझे फिर नोंचा।

 और मैं तो इतनी छोटी हूं कि मुझे जाति, बिरादरी और धर्म में फर्क तक नहीं पता। मैं बेहद डरी हुई हूं दीदी। कुछ वकील और नेता मेरे गुनहगारों को बचाने के लिए शोर कर रहे हैं। डरी इसलिए हूं क्योंकि अगर ये लोग बच गए तो फिर किसी मासूम को मार देंगे। हां कुछ लोग हैं जो मेरे लिए इंसाफ मांग रहे हैं लेकिन तुम्हें तो मालूम है दीदी ये सब कुछ दिन की बात है। ये सब अपने-अपने घर चले जाएंगे। सब भूल जाएंगे। कुछ नहीं बदलेगा। तुम्हारे जाने के बाद कुछ बदला क्या। कभी बंगाल, तो कभी उन्नाव, तो कभी असम, हर दिन रेप होते हैं। बच्चियों के साथ, बूढ़ी औरतों के साथ।

*Justice for AASIFA*



---------------------------------------------- 


'ति'ला कळतचं नाही ती 'बंधनात' आहे

दागिन्यांच्या 'बेड्या' घालून 

'ती' 'आनंदी' कशी राहू शकते ? 

'त्या'च्यासाठी देह सजवून 

'ती' 'मुक्त' कशी वावरु शकते?


'ति'ला कळतचं नाही ती 'अंधकारात' आहे 

व्रत-वैकल्यांचे तप करून 

'ती' सहनशील कशी होऊ शकते ?

रीती-रिवाजांच्या चक्रात अडकून 

'ती' तृप्त कशी होऊ शकते ? 


'ति'ला कळतचं नाही ती 'गुलामित' आहे 

रांधा, वाढा, उष्टी काढा

ही तिची दिनचर्या कशी ठरू शकते ?

पतीदेवाची (?) सेवा करून  

'ती' स्वतःसाठी कसं जगू शकते ?

                     

      *- मर्जिना मणेर*

*हरिती स्त्रीदास्यांतक संघर्ष सभा* 


---------------------------------------------- 


*हिरकणी गड  उतार झाली होती*


पहाटे डोईवर दोन दुधाच्या घागरी घेऊन ती गड चढली होती . 


सर्व दूध विकून आता परती च्या वाटेला लागली होती . 


तिला घाई होती.  


तिच तान्ह लेकरू उपाशी असेल . पावलं पटापट अंतर कापत होती . 


पण आज नशीब सोबत नव्हत तिच्या.  


गडाचे दरवाजे बंद झाले होते.


 विनवण्या करून करून ती मेटाकुटीला आली.. काय कराव उमजेना . गडाची दार कुणी उघडेना . 


आपलं इथं काही चालणार नाही याचा अंदाज तिला आला . 


आता थांबणे नाही आणि विनवणे तर नाहीच नाही. 


ती मार्ग शोधू लागली . अंधार वाढत चालला होता. आजूबाजूची झाड अक्राळ विक्राळ राक्षसाप्रमाणे वाटत होती.


 तेव्हड्यात एक अरुंद पायवाट दिसली तिला . तिथून रास्ता खाली जात असावा . पण फारच कठीण अश्या कड्या ची उतरती वाट होती ती. मागचा पुढचा विचार न करता अंधारात झोकून दिल तिनं स्वतः ला . काटेरी झुडपांचे ओरखडे बसत होते अंगावर . वाट निसरडी होती. एक जरी पाऊल वाकडं  पडलं तरी कपाळमोक्ष निश्चित होता. 


पण डोळ्यासमोर एकाच लक्ष आपल उपाशी तान्ह बाळ . .... 


अखेर जिवावर उदार होऊन *हिरकणी गड  उतार झाली.*


पहाटे पाच ला सुरु झालेला तिचा दिवस . 


सर्वांचा चहा नास्ता डबे आणि बरेच काही करून तिने पळत पळत ८. १० ची फास्ट लोकल मिळवलीच . 


दिवसभर फाईलींचे गट्ठे उपसले ... दिवस मावळतीला लागला पण काम काही संपेना . शेवटची फाईल तपासून ती भराभर पावल टाकत स्टेशन कडे निघाली . वाटेत उद्याची भाजी आणि थोडा बाजार हाट हे सुद्धा लगेहात उरकले .


 धक्कबुक्क्यांचा , अचकट विचकट नजरेचा स्पर्शाचा राक्षस टाळत  ती लोंढ्या बरोबर पुढे पुढे जात राहिली . नेहिमीची डोंबिवली फास्ट मिळवली ....आणि 


....हूश्शह्ह ... *हिरकणी गड उतार झालीच* .... पिल्लं वाट पहात होती घरी... 



मीटिंग संपली , सर्वांशी हस्तांदोलन झाले, तिनं लॅपटॉप बंद केला, projector बंद केला . कॉन्फेरंस रूम मधले लाईट बंद झाले. सर्वांचा मोर्चा डाईनिंग हॉल कडे वळला . फ़ेसाळत्या ग्लासांची किणकिण झाली ...


 मल्टि कुझीन जेवणाची टेबलं भरली ... बऱ्याच जणांनी तिच कौतूक केल . ..बरीच जणं  तिचं कर्तृत्त्व पाहून जळफळलें सुद्धा. हिला खाली कस पाडायचं ह्याचे प्लांनिंग पण झाले..  ... 


पण तिच लक्ष घडाळ्यात होतं .


 ९ चं विमान होतं तिचं . 


ती कशीबशी सर्वाना चुकवून cab मध्ये बसली . ट्राफिक , गर्दी , गाड्या सर्वाना चुकवत ती कशी बशी  airport ला पोचली . मुलं घरी काय करत असतील , अभ्यास झाला असेल का, प्रोजेक्ट संपवल असेल का ? अनेक विचार  . 


विमान आकाशात उंच उडालं . दोन तासात मुंबईला पोचल......


 *हिरकणी गड उतार झाली....*


 तिची लेकरं एव्हाना वाट पाहून झोपली ... 


काळ बदलला , जागा बदलल्या , आव्हानं  बदलली ... 


पण कधी जीवाचा आटापिटा  करून  किंवा उदार होऊन *हिरकणी गड उतार होतच आहे.....*


*आजच्या अनेक हिरकणींना मानाचा मुजरा...


---------------------------------------------- 

 #ME TOO के साथ ना जोडे ...
कवयित्रि महादेवी वर्मा 


मै हैरान हूं यह सोचकर

किसी महिला ने उंगली नहीं उठाई,

तुलसीदास पर  जिसने कहा:- 

"ढोल,गवार, शूद्र, पशु, नारी

सब है तड़न के अधिकारी।


मै हैरान हूं यह सोचकर

किसी ओरत ने नहीं 

जलाई मनुस्मृति

जिसने पहनाई

उन्हें गुलामी की बेड़ियां।


मै हैरान हूं,यह सोचकर

किसी औरत ने धिक्कारा नहीं

उस "राम" को

जिसने गर्भवती पत्नी को

अग्नि परीक्षा के बाद भी

निकाल दिया घर से बाहर

धक्के मारकर


मै हैरान हूं यह सोचकर

किसी औरत ने 

नहीं किया नंगा, उस कृष्ण को

चुराता था जो नहाती हुई

बालाओं के वस्त्र

योगेश्वर कहलाकर भी 

जो मनाता था रंगरलियां

सरे आम!


किसी औरत ने लानत नहीं भेजी

उन सबको,जिन्होंने

और त  को समझकर "वस्तु"

लगा दिया, जुए के दाव पर

होता रहा जहां"नपुंसक"

योद्धाओं के बीच

समूची और त  जात का  चीर_हरन!


में हैरान हूं ये सोचकर 

किसी महिला ने नहीं किया

संयोगिता_अंबालिका के

अपहरण का विरोध

आज तक!


और मै हैरान ही ये सोचकर,

क्यों इतना होने के बाद भी,

उन्हें अपना श्रद्धेय मानकर

पूजती है मेरी मां,बहन, बेटियां

उन्हें देवता भगवान मानकर

आखिर क्यों?


मै हैरान हूं

उनकी चुप्पी देखकर

इसे उनकी सहनशीलता कहूं या

अंध श्रद्धा  या फिर

मानसिक गुलामी की  पराकाष्ठा !


महादेवी वर्मा।


----------------------------------------------  

कृष्ण तू पाठीशी नको, सोबतीला हवा!


कृष्णा तू आता पाठीशी नको राहुस कारण मग आम्ही तुला गृहीत धरतो. काही संकट आलं की , तू आहेस पाठीशी हा विश्वास असतो पण मग आम्ही आमच्यात असलेल्या क्षमतांचा वापर करायचा, हेच विसरून जातो. अनेक वेळा आम्हीच तुला पाठीशी घालतो , तूझ्या चुका लपवण्यासाठी. 

तू वडीलधारा होऊन आम्हाला पंखाखाली घेतोस, पण किती युग हे असच चालू द्यायचं? तुझ वडीलधारेपण मान्य केलं जातं, तुझ कर्तेपण पाहिलं जात, नकळत तुझ्यातला अहंभाव वाढवण्यात आमचाही हातभार लागतो....आम्ही पण विचार करू शकतो, निर्णय घेऊ शकतो, चुकांमधून काही शिकू शकतो हा आत्मविश्वास आता वाढू दे. 

तेव्हा कृष्णा तू आता पाठीशी नको, सोबतीला रहा! मित्र हो! मैत्र जप! सखा हो, सख्य जप! मनातल सांगण्यासाठी एक हक्काचा सवंगडी हो! तूझ्या हातात निःसंकोचपणे हात देताना तो स्पर्श निर्मळ असू दे. 

कृष्णा तू सोबतच रहा. टाकू पावले सोबतीने, मित्रत्वाने.आम्हालाही चार गोष्टी तुला हक्काने सांगू देत, ऐकवू देत! आमच्याही विचारांना, कल्पनांना फुटू देत धुमारे. 

वाहू देत आम्हाला नदी सारखं कधी खळाळत तर कधी संथ गतीनं आमच्याच नादांत! येऊ देत आमच्याही आयुष्यात वादळ, भरकटू दे आमचं ही सुकाणू....होऊ आम्ही थोड्या हतबल, जाऊ थोड्या गोंधळून पण निश्चितच काढू त्यातून मार्ग! घेऊ मोकळा श्वास, मिळवू नवी उभारी! तू विश्वास ठेव आमच्यावर आणि रहा सोबतीला , पाठीशी नको!

तुझ अस्तित्व मान्य आहे आम्हाला, तुझ दातृत्व, कर्तृत्व ....अभिमान वाटतो तुझा. पण आता आम्हालाही आमाच्यातल "मी" पण सिध्द करायची संधी दे. आम्हालाही फुलू दे , फुलवू दे, हसू दे , हसवू दे, मिळालेला हा स्त्री जन्म मनासारखं जगू दे. दुष्टांचा संहार करण्याची शक्ती दे आणि अनाथ असणाऱ्या अनेकांवर माया करण्याची बुध्दी दे. कर कौतुक आमचं मनापासून आणि चुका दाखव. अरे चुका दाखवच, पण चुका दुरुस्त करण्याची संधी दे. आम्ही पण माणूस आहोत, वागव तूझ्या बरोबरीने. आणि म्हणूनच म्हणते कृष्णा, तू पाठीशी नको....सोबतीने रहा, सोबतीने रहा!!🍃


शुभांगी मांडे खारकर फेसबुक



*।। आपडी-थापडी..।।*


परवा गल्लीतून जात होतो. साठीतील एक आजीबाई त्यांच्या नातवंडांत रमल्या होत्या. चार-पाच वर्षांची गोजिरवाणी मुले त्यांच्या अवतीभवती बसलेली. कोणी समोर, कोणी मांडीवर, कोणी पाठीवर रेललेले. आजीही त्यांच्यातीलच एक होऊन गेल्या होत्या. मुलांना त्या बहुधा गोष्टी सांगत असाव्यात. गोष्टींना कंटाळलेल्या मुलांनी एकच गिल्ला सुरू केला... आजी, आजी ऽ आपडी- थापडी खेळू ना गं. 

रस्त्याने चाललेला मी 'आपडी थापडी' ऐकताच थबकलो. ही आपडी-थापडी पस्तीस-चाळीस वर्षांपूर्वी माझ्या बालमुठीतून घरंगळून गेली होती. मधल्या काळात मोठे होणे काय असते, ते पुरेपूर अनुभवले, त्याचे चटके सोसले. हरवलेल्या बालपणासोबत खूप काही हरवले, पण ही ‘आपडी थापडी’ मेंदूच्या कोठल्या तरी कोपऱ्यात तशीच राहिली. मधल्या काळात माझे लग्न झाले. मला मुले झाली, पण त्यांच्याशी मला कोठे खेळता आली ही ‘आपडी-थापडी’सारखी अवीट जोडीची 'खेळगाणी'? मी मला काळाच्या बदलात केवळ ढकलत राहिलो, पुढे पुढे; पण बालपणीचे किती मोठे वैभव, त्या फुलपंखी दिवसांतील गमतीजमती, ते खेळ, ती गाणी, सारे तेथल्या तेथे सोडून आलो. 

त्या 'आपडी-थापडीच्या' खेळाने मला माझ्या बालपणात नेऊन सोडले. रस्त्याने जात होतो, पण माझा पाय जागेवरून हलेना. मला त्यांची ‘आपडी-थापडी’ पाहायची होती. बिनपैशांचा तो आनंद माझ्या

आपल्या आयुष्यातून निघून गेला आहे. मी लहान होऊन तो पकडू पाहत होतो. 

कोणी काय म्हणेल याची पर्वा न करता मी त्या आजी-नातवंडांच्या खेळाकडे बघू लागलो. मुलांनी कोंडाळे केले होते. आजीसमोर प्रत्येकाने त्यांच्या छोट्या छोट्या हातांचे पंजे एकमेकांवर पालथे ठेवले होते अन् सुरू झाली... 

'आपडी-थापडी.... गुळाची पापडी 

धम्मक लाडू.... तेल पाडू 

तेलंगीच्या.... तीन पुऱ्या 

चाकवताचं.... एकच पान 

धर गं बेबी.... हाच कान' 

आजी मुलांच्या पालथ्या हातांवर क्रमाक्रमाने उलटापालटा हात थोपटत गाणे म्हणत होती. 'धर गं बेबी हाच कान' म्हणताच त्या छोट्या छोट्या बोटांनी एकमेकांचे कान पकडले, आजीचेही पकडले. कान धरून, ते सारे कोंडाळे झुलू लागले आणि पुढचे गाणे सुरू झाले. 

'च्याऊ म्याऊ 

पितळीचं पाणी पिऊ 

भुर्रकन उडून जाऊ' 

असे म्हणत सर्वांनी त्यांचे कानांवरील हात सोडून हवेत फडकावले. जसे छोटे छोटे पक्षीच उडाले. मी तल्लीन झालो होतो. माझे मला मी रस्त्यात उभा राहून मुलांच्या खेळात रमलो आहे याचे भानही उरले नव्हते. मला माझे निसटून गेलेले बालपण त्या खेळगाण्यांतून पुन्हा मिळाले होते. माझ्यातील लहान मूल त्या ‘आपडी-थापडी’ने जागवले होते. माझ्या डोळ्यांपुढून माझे खेड्यात गेलेले बालपण सरकू लागले. संध्याकाळी शाळेतून आले, पाटी-दप्तर घरात भिरकावले, की आम्ही खेळायला मोकळे! गरिबी सगळ्यांच्याच घरी होती. आजूबाजूचे सगळे मित्रही त्याच परिस्थितीतील. आमचे खेळही खर्चिक नव्हते. सगळे तोंडभांडवल किंवा अंगमेहनत असा व्यायाम घडवणारे. 

ओट्यावर बसलेली आजी दोन्ही हातांनी डोळे झाकायची अन् म्हणायची. 

‘आया भोया 

पाटीभर लाह्या 

वाघाचं पिल्लू 

छुट गया.....' 

मग सुरू व्हायची त्याच्या लपलेल्या सवंगड्यांची लपाछपी. वाघाच्या पिल्लावर राज्य आलेले. तो मग इकडे तिकडे कानाकोपऱ्यात शोधीत फिरे. पहिल्यांदा जो सापडला त्याच्यावर राज्य. पुन्हा त्याचे डोळे झाकून 'आया भोया' सुरू! एका खेळाने कंटाळले, की दुसरा खेळ. असेच अन् या सगळ्या खेळांभोवती काही काही गाणी असतच. त्याचे तेव्हा काही वाटत नसे - आज आठवून मोठी गंमत वाटते. आराधरीचा खेळ खेळताना सगळे गडी गोल रिंगण करून जाळी धरत. जाळी धरली, की कोणावर राज्य येणार यासाठी मग... 

'इरिंग मिरिंग 

लवंगा तिरिंग 

लवंगा तिरीचा 

डुगडुग बाजा 

गाई गोपी उतरला राजा... 

उतरला राजा' 

आणि गंमत अशी, की जो राजा बनून उतरायचा त्याच्यावरच राज्य आलेले असायचे. आराधरीत खूप पळापळ व्हायची. हुलकावण्या देत पळणाऱ्यांपैकी कोणा एकाला पकडलं, की त्याच्यावर राज्य! 

मुलींची गाणी आणखी वेगळीच असत- 'इत्ता इत्ता पाणी गोल गोल राणी' म्हणत मुलींचे खेळ रंगत. एरवी भित्र्या, काकूबाई असणाऱ्या मुली खेळताना किती धीट होत! 

'कोरा कागद निळी शाई 

आम्ही कोणाला भीत नाही 

दगड का माती?' 

हा दगड-मातीचाही खेळ छानच होता. दगड म्हटले, की मातीवर उभे राहायचे अन माती म्हटले, की दगडावर! धमाल यायची. 

आकाशात विमानाचा घरघर आवाज ऐकू येऊ लागला, की सगळी बच्चेकंपनी विमान पाहायला अंगणात जाई. आभाळात विमानाचा शोध सुरू होई. ते विमान साखळी सोडून लहान मुलांना विमानात बसवून घेते असाही काहीतरी समज होता... आम्ही 'ईमाईन ईमाईन साखळी सोड...' असेही त्या आकाशात उडणाऱ्या विमानकडे पाहून म्हणत असू. जेव्हा एसटीतही क्वचितच बसायला मिळे त्या काळातील ती कल्पना! 

संध्याकाळी आभाळातून बगळ्यांची माळ हमखास उडताना दिसे, मग आम्ही 'बगळ्या बगळ्या कवडी दे, धारणगावची नवरी दे' असे नखांवर नखे घासून गाणे म्हणत असू. नखांवर तेव्हा तांदळाच्या कणीसारखे काहीतरी डाग असत. अनेक मुलांच्या नखांवर ते असत. त्यालाच आम्ही कवड्या म्हणत असू. बगळे आपले उडत जायचे, पण आम्हाला मात्र कवड्या मिळालेल्या असत, नखांवर... 

पुढे आमच्या मित्राला... प्रकाशला धारणगावची नवरी मिळाली. त्याला दोन्ही गोष्टी साध्य झाल्या. लहानपणी कवड्या अन् मोठेपणी धारणगावचीच नवरीही... आम्ही त्याची खूप मजा घेतली. 

आकाशात ढग भरून आले, की पावसाचे वातावरण तयार होई. मातीचा मस्त सुवास, गार वारा सुटलेला, अशा वेळी अंगणात गोल गोल फिरत... 

'येरे येरे पावसा 

तुला देतो पैसा 

पैसा झाला खोटा 

पाऊस आला मोठा 

येगं येगं सरी 

माझे मडके भरी 

सर आली धावून 

मडके गेले वाहून' 

हे पावसाचे गाणे तर त्या पिढ्यांतील प्रत्येकानेच त्या त्या वेळी म्हटले आहे. पाऊस पडून गेल्यानंतर अंगणातील मऊ वाळूचे खोपे तयार करण्याची लगबग सुरू होई. पायाच्या पावलावर पावसाने मऊ झालेली माती थापून आभाळाला वाकुल्या दाखवत वाळूची घरे बनवत असू. घर हळूच पाऊल काढताना अनेकदा पडून जाई, तर कधी कधी खोपा बने. तो आनंद शब्दांपलीकडचा. 

आम्ही नवरात्रात गावाबाहेरच्या वडजाई देवीला जात असू. रस्त्यात आजूबाजूला खळगी होती. त्या खळग्यांमध्ये इंगळ्यांची बिळं असत. आम्ही त्या बिळांतून विषारी इंगळ्या काढून त्यांची झुंज लावण्याचा थरारक जीवघेणा खेळही त्या नकळत्या वयात खेळत असू. इंगळी काढण्याचा आमचा एक मंत्र होता. आम्ही करवडाचा फोक हातात घेऊन तो इंगळीच्या बिळावर घासत असू. काडीने घासताना बिळातून माती-खडे आत पडत. तोंडाने मंत्र सुरू... 

'इंगळी का पिंगळी सलाम करती 

सलाम करती 

आणाजी पाटलाला बोलीती 

बोलीती 

सुया मारुनी मंत्र फुकिती 

मंत्र फुकिती.....' 

मंत्र म्हणून पुरा होण्याच्या आतच चवताळलेली इंगळी काडीला डंख देत बाहेर येई. कमरेचा करगोटा तोडून, फास मारून इंगळीची नांगी बांधून तिला दुसऱ्या बिळात सोडण्यात येई. पहिली इंगळी दुसरीला बाहेर काढून बरोबर घेऊन येई. तो थरारक खेळ आठवून अंगावर काटा येतो. 

थोड्याच दिवसांत दिवाळीची नवलाई येई. हातात सुरसुऱ्या घेऊन... 

'दिन दिन दिवाळी 

गाई म्हशी ओवाळी 

गाई म्हशी कोणाच्या 

लक्षुमणाच्या' 

असे म्हणत सुरसुऱ्या ओवाळीत दिवाळीचे गाणे म्हटले जाई. दिवाळीची सुट्टी लागण्यापूर्वी सहामाही परीक्षा असे. तिचे ओझे वाटायचे. दिवाळीच्या आनंदापूर्वी केवढा मोठा अडथळा! 

शाळा नेहमी खेळण्याच्या आड येते असे वाटायचे. मग शाळा सुटली की कोण आनंद... 'शाळा सुटली पाटी फुटली, आई मला भज्यानं मारलं, त्याच्या काय बापाचं खाल्लं' आम्ही लहानपणी असे एक रडगाणेही म्हणत असू. घरातील लहान मुले सांभाळण्याची जबाबदारी मोठ्या बहिणीभावांकडे असे. तशा वेळी मोठी बहीण आईची जागा घेत असे. ती तिच्या भावंडांना खेळवताना... 

'इथं इथं नाच रे मोरा 

बाळ देई चारा 

चारा खा... पाणी पी भुर्रकन उडून जा...' 

अशी गाणी म्हटली जात. लहानग्याचे कौतुक करताना, त्याला तीट लावताना... 

'अडगुलं मडगुलं सोन्याचं कडगुलं 

रुप्याचा वाळा तान्ह्या बाळा तीटट् लावू' 

असे छान गाणे म्हटले जाई. लहान मुलांचे संगोपन करताना अशी अनेक गाणी गात त्यांचे बालपण फुलवले जाई. खेळगाण्यांनी तेव्हाचे आमचे बालपण व्यापून टाकलेले होते. ती गाणी एका पिढीकडून दुसरीकडे आपोआप हस्तांतरित होत होती. त्यासाठी वेगळे काही करावे लागत नव्हते. 

मोठी ताई लहानग्या भावाला खेळवताना उताणी झोपून त्याला पायावर बसवी व पायाला झोका देत, खालीवर करत त्याच्याशी ‘हाट घोडा हाट’ खेळू लागे... 

'हाट घोडा हाट 

बाजाराची वाट 

बाजाराला कोण जातं 

दादा वहिनी 

घरी कोण राहतं 

आम्ही दोघी बहिणी' 

असे खेळता खेळता बहिणी भावांचे मेतकुट जमे. ब-याचदा लहान मुले मुलींमध्येच खेळत. बहिणीच्या मैत्रिणींमध्ये मुलगा खेळू लागला, की 'पोरींमध्ये पोरगा भाजून खातो कोंबडा...' असे त्याला चिडवले जाई. कधी एकमेकांना पाठीवर घेत 'वऱ्हाटा का पाटा गोल गोल वाटा' असा वऱ्हाट्या-पाट्याचा खेळ सुरू होई. मुलींचे अंपल-चंपल, सागरबिट्ट्या, ठिकरा-ठिकरी असे खेळही रंगत. ते खेळ खेळताना म्हटली जाणारी खेळगाणी हीच आमच्या पिढीची बडबडगीते होती. ती म्हणत आमचे बालपण समृद्ध झाले. पण आम्ही तो वारसा पुढील पिढीकडे पोचवायला कमी पडलो. ती साखळी आमच्या पिढीशी काळाच्या बदलांमध्ये येऊनच तुटली त्याचे दुःख मोठे आहे. 

मला त्या आपडी-थापडीवाल्या आजींचा हेवा वाटला. कौतुकही वाटले. त्यांनी त्यांचं हरवलेलं बालपण मुलांत मूल होऊन आपडी-थापडी खेळताना पुन्हा जिवंत केले होते. मुलांनी हट्ट धरला तेव्हा त्यांनी गाणे म्हणायला सुरुवात केली. 

'बगळ्या बगळ्या नाच रे, तुझी पिल्लं पाच रे, एक पिल्लू मेलं, गाडीत घालून नेलं, गाडी गेली डोंगराला, आपण जाऊ बाजाराला, बाजारातून आणल्या पाट्या, साऱ्या मुलांना वाटल्या, एक मूल चुकलं, छडी खाली लपलं, छडी लागे छमछम, विद्या येई घमघम' 

मला छमछम छडी आठवली, चिमुकल्या हातांवरचे ते छडीचे वळ घमघमणाऱ्या विद्येकडे घेऊन गेले. प्रतिकूलतेतून मिळणारा आनंद शोधणारे आमचे बालपण कितीतरी समृद्ध होते! बदल होणार आहेतच. मात्र आमच्या पिढीने जे अनुभवले, ते नव्या पिढीला आम्ही नाही देऊ शकलो. आम्ही पुढच्या पिढीला भौतिक सुखे मनमुराद देऊ केली. आम्हाला बालपणी जे मिळाले नाही, ते सुख मुलांना पैशाच्या माध्यमातून नको तितके देण्याचा प्रयत्न केला - पण देण्याजोगे बरेच काही न देताच. त्यातील ती खेळगाणी राहूनच गेली द्यायची.


---------------------------------------------- 


 मित्रहो...

*पुनीत मातकर* या कवीची ही कविता वाचून मी निःशब्द झालो...अस्सल स्त्रीवादाचा हुंकार या पोराने दिला आहे...आपणही ही कविता वाचावी आणि त्याचे कौतुक करावे.

कवितेच्या तळाशी अशा निखळ मायेचं, हळवं प्रामाणिक मन असेल तर कविता किती प्रभावी पणे बोलते याचं हे मूर्तीमंत उदाहरण आहे. 


*अपूर्ण कविता*


शाळा सुटल्याच्या दीर्घ घंटेचा

आवाज विरत नाही तोच

सुसाट वेगानं मी पोहोचायचो 

घराच्या दारात...


पाठीवरलं दप्तर फेकून

घोड्यागत उधळत

पोहोचायचो मैदानात,

मस्तवाल बैलासारखा

धूळमातीत बेभान होऊन 

मिरवत राहायचो स्वतःचं 

पुरूष असणं..


तीही यायची शाळेतून..

चार रांजण पाणी...

घरअंगणाची झाडलोट...

देव्हा-यातला दिवा लावून 

ती थापायची गोल भाक-या

अगदी मायसारखीच

अन् बसून राहायची उंब-यावर..

रानातून माय येईस्तोवर


ती चित्र काढायची..

रांगोळ्या रेखायची..

भुलाबाईची गाणी अन्

पुस्तकातल्या कविता 

गोड गळ्यानं गायची....

धुणंभांडी..सडा सारवण

उष्टं खरकटं..सारं मायवानीच करायची


मी पाय ताणून निजायचो,

ती पुस्तक घेऊन बसायची....

दिव्याच्या वातीत उशीरापर्यंत...


एकाच वर्गात असून मास्तर

माझा कान पिळायचे

कधीकधी हातानं....

कधी शब्दानं ...

"बहिणीसारखा होशील तर 

आयुष्य घडवशील..."म्हणायचे,

मग करायचो कागाळ्या

मायजवळ...


मॕट्रिकचा गड 

मी चढलो धापा टाकत..

तीनं कमावले मनाजोगते गुण,

बाप म्हणला 

दोघांचा खर्च नाही जमायचा

त्याला शिकु दे पुढं...

टचकन डोळ्यात आलेलं पाणी

तसच मागं परतवत

ती गुमान बाजुला झाली 

पाठच्या भावाच्या रस्त्यातून...


ती शेण गोव-या थापत राहिली..

मायसंग रानात रापत राहिली 

काटे तणकट वेचत राहिली...

बाईपण आत मुरवत राहिली


तिच्या वाट्याचा घास घेऊन 

मीही चालत राहिलो 

पुस्तकांची वाट...  

कळत गेलं

तसं सलत राहिलं 

तिनं डोळ्यातून परतवलेलं

पाणी...


तिला उजवून बाप 

मोकळा झाला..

मायला हायसं वाटलं..

मी मात्र गुदमरतो अजुनही 

अव्यक्तशा

ओझ्याखाली...


दिवाळी..रसाळी..राखीला

ती येत राहते

भरल्या मनानं..

पाठच्या भावाच्या वैभवानं हरखते..

बोटं मोडून काढते दृष्ट..

टचकन आणते डोळ्यात पाणी..

पाठच्या भावासाठी

जाताना पुन्हा सोडून जाते..

मनभरून आशीर्वाद...


ती गेल्यावर मी हूरहूरत राहतो 

ज्योतीसारखा

जिच्या उजेडात ती 

उशीरापर्यंत वाचायची पुस्तक,

पाठ करायची कविता...


*जिची कविता राहिली माझ्यासाठी अपूर्ण....* 


                    *पुनीत मातकर* 

                          गडचिरोली


---------------------------------------------- 


मला आवडते तुमची...... colourful generation.


नात: नानी, तू किती generations बघितल्या ?

मी : मी न.......५. बघ हं...माझी आजी, माझी आई, मी, माझी मुलगी आणि माझी नात...तू.

नात: यापैकी कोणती generation तुला सर्वात जास्त आवडते ?" 

मी : तुझी.

नात : वॉव....पण का ?

मी : कारण ती सर्वात जास्त colourful आहे.

नात: म्हणजे कशी ?

मी : म्हणजे असं.....की माझ्या आजीच्या पिढीचा एकच रंग होता...'घर...घर काम, घरच्यांची सेवा आणि घरी येणार्यांचे आदरातिथ्य.

मग माझी आई...या घरकामाच्या रंगात अजुन एक रंग वाढला...तो म्हणजे शिक्षणाचा....आणि या शिक्षणाबरोबर खेळ, कला, जवळपासचा समाज...यामुळे आईच्या जीवनात बरेच रंग आले.

मग माझी पिढी...माझ्या पिढीत उच्च शिक्षण आणि विस्तृत समाज या मुळे आमचं क्षितिज बरचं रुंदावलं...नवनवीन प्रयोग, प्रवाह, पाऊलवाटा तयार होऊ लागल्या... generation colourful होऊ लागली.

मग

तुझ्या आईची generation.. ......technology चा एक जबरदस्त रंग बाकी सगळ्या रंगांवर हावी होऊ लागला....'स्पर्धे' चा नवीनच रंग भराभर गडद होऊ लागला....नवनवीन पाश्र्चिमात्य रंग डोकावू लागले...जागतिकरणाचा पहाट-रंग क्षितिजावर दिसू लागला.

आणि त्यानंतर...

नात : मी.....पण माझीच generation तुला का आवडते ?

मी : कारण आधीच्या सगळ्या रंगात घोळुन 'आत्मविश्र्वासा' चा प्रसन्न रंग लेवून जन्मलेली तुझी पिढी.... technology ला तर तुम्ही आपली दासी बनवलयं. 

जग तुमच्या बोटांवर नाचतं...ग्रहांच्या पलिकडे तुमचं क्षितिज विस्तारलयं 

समानता खर्या अर्थाने तुमच्या नसानसात भिनली आहे....

माझ्या आजीच्या 'घर आणि संस्कार' पासुन ते तुमच्या 'अवकाश' या प्रचंड कक्षेतील सगळे 'सुखद' रंग जपण्याचा आणि 'दु:खद' रंगांशी झुंजण्याचा तुमचा 'Cool' रंग मला फार आवडतो......तुमच्या या रंगात आधीच्या सगळया पिढ्या अक्षरशः न्हाऊन निघतात...

*BE BOLD FOR CHANGE*....

 *व्हा धाडसी...बदलासाठी*.........


---------------------------------------------- 


 मी..स्त्री


नाकारते मी अहिल्या होण्याचे... एक भोगून गेला, एक शापून गेला तरी मी उद्धारासाठी का वाट पहायची अजून एकाच्या पायाची!

         नको पदस्पर्श कोणाचा मला परत माणसात येण्यासाठी.. नाही होऊ देणार मी शिळा माझ्या आत्म्याची!

नाकारते मी सीता पण होण्याचं... मोह नाही टाळता आला कांचन मृगाचा..पण त्याची शिक्षा मी दुसऱ्याच्या घरातून सुरक्षित येऊन पण हक्काच्या घरी स्वतःला जमिनीत गाडून घेऊन नाही घेणार..

     त्यापेक्षा नाकारेल मी अस्तित्वच त्यांचे, ज्यांनी उंचावल्यात भुवया माझ्या चारित्र्या वर!!

नाही व्हायचं मला ऊर्मिला पण, जिच्या 

लक्ष्मण ने मागे ही न पाहता आयुष्य दुसऱ्याच्या नावे केलंय.. आणि थांबलीय ती राजवड्यातील अंधाऱ्या कोपऱ्यानशी आपलं दुःख वाटत..

     मी नाही संपणार अंधारात, घेईन मी शोध प्रकाशाचा आणि जाणवून घेईन माझेच अस्तित्व जे अपूर्ण आहे माझ्याच शिवाय!

  नाकारते मी द्रौपदी ला पण... नाही मला गरज माझ्या लज्जारक्षणे साठी कोणत्या श्री हरीचा धावा करण्याची...

   मी बनवतेय स्वतःला इतकी मजबूत की नाही कोणता दुशा:शन माझ्या सावलीला उभा राहणार!

  नाकारतेय मी वृन्दे ला... नाही मान्य मला ज्याने अस्मितेवर घाव घातलाय.. वर्षानुवर्षे त्याच्याशी लग्न करून आयुष्य जाळून घेण्याचं..

     मी होतेय इतकी सशक्त की नाही गरज कोणत्याही  विष्णू ची माझ्या अस्तित्वासाठी त्याचं कुंपण माझ्या भोवताली बांधायला!!

        मला आवडेल गार्गी, मैत्रेयी होऊन सभामंडप गाजवायला... मंदोदरी होऊन चुकीच्या गोष्टी ना परखड पणे विरोध करायला..

शकुंतले सारखी धीट होऊन माझे अधिकार मागायला..अंबालिका होऊन स्वतः वर झालेल्या अन्यायाची परतफेड करायला, मनू होऊन रणांगणात तळपायला,तारा होऊन स्वतःच्या राज्याचं रक्षण करायला ,आणि जिजाऊ बनून एका शिवाजी ला घडवायला..

हो.. नाकारतेय मी सगळे देवत्व जे मला बहाल केलेय. ज्याची किंमत मला माझे स्वातंत्र गमावून, विचारशक्ती हरवून, निर्णय क्षमता संपवुन मिळालंय.. नाही व्हायचं मला औट घटकेची देवी आणि अनंत काळाची मुकी बाहुली!

    त्यापेक्षा होईन मी स्त्री माझ्या अस्तित्वाची.माहीत आहेत मला माझी

 शक्तीस्थानं त्याच वेळी दुबळ्या पैलूंची पण जाणीव आहे.नाही मिरवत प्रौढी माझ्या शक्ती स्थानांची, त्याचवेळी नाही करत अवास्तव भांडवल माझ्या दुबळेपणाची!! 

   मी आहे, माझ्या दुबळेपणासह..माझ्या 

सशक्तपणासह..जगतेय आयुष्य परिपूर्ण! मीच आहे एकमेवाद्वितीय!!

   माझ्यातला प्रेमाचा झरा भिजवतोय रस्त्यात येणाऱ्या प्रत्येकाला.. निघाली आहे मी प्रवासाला.. सगळे अडथळे पार करतेय कारण लांब उडीची हिम्मत आहे. मी स्वीकारलेय स्वतःला एक परिपूर्ण स्त्री म्हणून!

      नकोय मला तो देव्हारा.. आणि सोन्याची, चांदीची एक मजबूत चौकटी!.कारण सोन्या चांदी ची असली तरी ती चौकटच..त्या चौकटी बाहेर राहायचंय मला भक्कम पाय रोवून, माझ्या पाऊलखुणा उमटवून ठेवायच्या त्या माझ्या अवकाशात..


---------------------------------------------- 

LET HER TAKE HER TIME


*When she takes her time* to drink a barely warm cup of tea, let her. She's given her time to cook your meal and serve it to you before she sat to drink her tea.


*When she takes time* to select a dish from the menu, let her. Every day, for every meal she has prepared she has given her time to think about what to make, how much, and for whom.


*When she takes time* to dress up to go out with you, let her. She has given her time to make sure that your ironed clothes are in their place and knows better than you, where your socks are. She has dressed up her child thoughtfully, to look like the most smartly dressed up child around.


*When she takes time* to watch TV mindlessly, let her. She is only half concentrating and has a clock ticking in her head. As soon as it's nearing dinner time, you'll see her disappear to get things ready.


*When she takes time* to serve you breakfast, let her. She has kept aside the burnt toast for herself and is taking the time to serve her family the nicest ones she could manage.


*When she takes time* after her tea to just sit by the window and stare into nothingness, let her. It's her life, she's given you countless hours of her life..

Let her take a few minutes for herself.


_She's rushing through her life, giving chunks of her time whenever needed, wherever needed._ 

_Don't rush her more than she rushes herself._

_Don't push her harder than she pushes herself._


Tribute to all Women


---------------------------------------------- 

 निःशब्द...
*पान्हा...*


हातातला पेन जरा बाजूला ठेवला. सारखे बसून बसून पाठीला कळ लागली होती. दुपारचे तीन वाजले होते. बाहेर प्रचंड उन्ह होते. फॅन पाच वर असूनही गरम होत होते. दोनला ओपीडी बंद करण्याची वेळ असते पण पेशंट होते त्यामुळे जरा लेटच झाले होते.


जेवण बाकी होते म्हणून आईचा दोनदा फोनही येऊन गेला. येतो पेशंट आहे, असे सांगून मी आपला पेशंट बघण्यात रमलो. बाहेर वेटींगमध्ये अजून तीन पेशंट होते. तेवढे बघावेच लागणार होते. इतक्यात बाळाचा कर्कश कानठळ्या बसावा इतक्या काकुळतीने रडण्याचा आवाज माझ्या कानी पडला.

"साहेब याला बघा ना आधी, रहातच नाही तो..."

केबीनच दार उघडून तीशीतली ती बाई विनवणी करत होती. लाल कलरची मळकट साडी घातलेली. केस भुरकट काळ्या रंगाचे. रंगाने सावळी. कपाळावर आणि हातावर गोंधलेले. खाद्यांवर महीनाभरच बाळ. दार उघडताच घामाचा उग्र वास तिच्यासोबतच आत आला.

बाहेर बसलेले इतर पेशंट तीच्याकडे कुत्सित नजरेनं बघत होते. सोशल डिस्टन्सिंग मुळे आधीच तिच्या पासून चार हात दूर बसलेले तिच्या अशा वागण्यामुळे ते अधिकच तिरस्काराने तिला बघू लागले.

आम्ही आधी आलोय डॉक्टर, असा भाव त्यांच्या डोळ्यात जाणवला पण तरीही या बाळाची अवस्था बघून मी बाळाला आत घेतले.

तरीही बाळ सारखे रडतच होते...

"टेबलवर ठेवा त्याला", मी त्या बाईला सांगितले.

"काय झालं ? कधी पासून रडतोय हा ?"

"त्यो रडतोच हाये सारखा."

"डिलीव्हरी कधी झाली ?"

"महिना झाला".

व्यवस्थित चेकअप केले पण बाळाला बाकी काही लक्षणे जाणवली नाही. पोटात दुःखत असेल म्हणून पॅलपेट करुन बघितले पण तसलं ही काही जाणवेना. "भूक लागली असेल, त्याला पाजून बघा जरावेळ", तिच्याकडे बघत मी म्हणालो.

"कुठून पाजू ? दुधच नाही उतरत", ती बाळाला कडेवर घेत बोलली.

"महिना झाला ना ! मग, दुध तर यायलाच हवं"

"इथं माह्या पोटाला काही भेटना साहेब, फकस्त तांदूळ खाऊन कुठून दुध उतरनार हाये".

तिला समोर बसवले आणि "नीट सांग काय काय होतय बाळाला ? कधी पासून नीट दुध मिळत नाहीये त्याला ? मग दुध नाही तर वरचे दुध, पावडर काही देता का तुम्ही त्याला ?

सगळं सांगा, खरं खरं सांगा.

काय सांगू साहेब !? नशीब करंट आहे माझं. दोन पोरीच्या पाठीवर हे पोरग झालं. पण ह्यो आला आणि तोंडाची भाकरच तुटली बघा आमची.

"फुटक्या पायाच वांग कुठलं !!", त्याचा राग राग करत ती सांगत होती.

एक आई आपल्या पोटच्या मुलाला असे बोलताना पहिल्यांदा बघितले होते मी. त्यामागे निश्चितच तिची निराशा, हताशपणा होता. हे कारण होते तरी एक आई असे बोलते हे मनाला पटत नव्हते. ती पुढे बोलत होती -

"रोजंदारी करतो साहेब आम्ही. घरात दोन पोरी. त्यांचा बाप, सासू - सासरे आणि आता हे पोरं. असे सहा जण एका खोलीत हायेत.

महिना झाला आता हाताला काम नाही. घरात व्हत नव्हतं समद कव्हाच संपलं. हंडाभर पाण्याला वनवन करत फिराव लागतं. छतावर पञा तापतो. घरात टेबल फॅन हाय पण त्योबी एकच. कुणा - कुणाला वारं लागलं त्याचं !?

दर वरीस उन्हाळा लागला की ह्याचा आज्जा - आज्जी मंदिराच्या वसरीत झोपायला जात्यात. पण त्यांना बी बाहेर पडता येइना झालय. आता ते बी नाय. वर पञा तापतो, बाहेर उन्ह मोकार चटके देत्यात. खोलीत जाम उकडतं. मधी घामान जीव कसनूसा होतो. बाहेर जाता येत नाय. पंखा हाय पण याचं म्हातारं चिटकून बसतय त्याला.

"दिस उजाडला की हंडा घेऊन पाणी भरायला कोसभर दुर जाव लागत तेबी लपून छपून. त्यात घरात पोटभर खायला नाय. घाम फुटतो पण पान्हा फुटना. त्याला मी काय करु साहेब. मग तुम्हीच सांगा कुठून ह्याची भूक भागू ?"

तिचे बोलणे ऐकून मी क्षणभर स्तब्धच झालो.

ओली बाळंतीन ती. पोटभर जेवण नाही म्हणून पान्हा फुटत नाही. बाळ भूकेने रडरड रडतयं. पण खायला काही नाही.

कुठले औषध देऊ मी त्या बाळाला ?

माझा वैद्यकीय क्षेत्रातील अनुभव, माझी बौद्धिकता, सायकोडायनामाईकची थेरी, मानसशास्त्र, सर्वच फोल ठरले होते आज. पेन हातात घेतला खरा पण हात थरतरत होता. कुठले औषध लिहावे समजत नव्हते.

घरात आईने स्वयंपाक बनवला होता. ओपीडी झाली कि मस्त जेवणार होतो. माझ्यासारखेच आपणही पुढचा महिनाभराचा किंबहुना जास्त किराणा भरुन ठेवला असेल. खायला कमी पडणार नाही महिना दोन महिने याची सर्व तरतूद करणे फक्त ह्याच एका गोष्टीसाठी आपण बाजारपेठत गर्दी करतोय.

आपल्याला छान कपडे आहेत, खायचीही चंगळ आहे. करमणूक म्हणून टीव्ही, फोन, नेट अशी सर्व साधने उपलब्ध आहेत. फॅन, कूलर, एसी, उन्हाची झळ आपल्यापर्यंत पोहचू देत नाहीये. कमी-जास्त फरकाने आपले सर्वांचेच आयुष्य असे सुरु आहे सध्या. पण या बाहेरही एक दुसरे जग आहे, जिथे सकाळी भेटलेल अन्न पुरवून पुरवून खाल्ले जाते कारण परत मिळेल का नाही याची शाश्वती नाही. हाताला काम नाही म्हणून पुरेसा पैसाही उपलब्ध नाही. बाहेर पडायला भीती वाटते. घरात भूक बसू देत नाही. खूप सारे प्रश्न आहेत पण उत्तर मला सापडत नाहीये.

हातात पेन तसाच होता. बाळ अजूनही रडतच होत. ती माझ्याकडे आशेने बघत होती.

पण ........

औषध नक्की कुणाला देऊ ?

बाळाला !? ज्याला भूक लागलीय म्हणून तो रडतोय, की आईला !? तिला दुध येत नाही म्हणून बाळ उपाशी आहे, की परिस्थितीला !?

आणि .....

मनातली नीस्तब्धता क्षणात बाजूला सारून आईला फोन करून ताबडतोब जेवणाचा डबा कोणाच्या तरी हाती पाठवुन द्यायला सांगितले व तिला थोडावेळ बाहेर बसावयास सांगून दुसऱ्या पेशंटला तपासण्यास सुरवात  केली. दरम्यान मेडिकल मधून एक दुधाच्या पावडरचा डबा मागविला. इतर पेशंट तपासून होईपर्यंत घरून डबाही आला.

तोपर्यंत वाटीत दूध करून बाळाला पाजायला दिल्याने बाळही शांत झाले होते आणि मग, डब्यातील जेवण तिला दिले. दूध पिल्याने रडायचे थांबलेले बाळ आणि पोटात गेलेल्या अन्नामुळे मुलाचा रागराग करणाऱ्या आईच्या मनात एक वेगळीच करुणा दिसू लागली होती मला.

आणि असे असूनही तिने फी म्हणून देऊ केलेल्या पैशांपेक्षाही तिच्या डोळ्यातली कृतज्ञता अधिक काही सांगून आणि शिकवून गेली होती मला.

कोरोना व्हायरस मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या दाहक वास्तवतेमध्येही सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून स्वतःला झोकुन देऊन कार्य करणाऱ्या सर्वांनाच मनापासून अभिवादन


----------------------------------------------  


आसान नहीं होता 

प्रतिभाशाली स्त्री से प्रेम करना,

क्योंकि 

उसे पसंद नहीं होती जी हुजूरी,

झुकती नहीं वो कभी 

जबतक न हो  

रिश्तों में प्रेम की भावना।


तुम्हारी हर हाँ में हाँ 

और 

ना में ना कहना वो नहीं जानती, 

क्योंकि 

उसने सीखा ही नहीं झूठ की डोर में रिश्तों को बाँधना,

वो नहीं जानती 

स्वांग की चाशनी में डुबोकर अपनी बात मनवाना,

वो तो जानती है 

बेबाक़ी से सच बोल जाना।

 

फ़िज़ूल की बहस में पड़ना 

उसकी आदतों में शुमार नहीं,

लेकिन 

वो जानती है,

तर्क के साथ अपनी बात रखना।

वो 

क्षण-क्षण गहने- कपड़ों की माँग नहीं किया करती, 

वो तो सँवारती है 

स्वयं को अपने आत्मविश्वास से, 

निखारती है 

अपना व्यक्तित्व मासूमियत भरी मुस्कान से।


तुम्हारी गलतियों पर 

तुम्हें टोकती है,

तो तकलीफ़ में तुम्हें 

सँभालती भी है।

उसे 

घर सँभालना बख़ूबी आता है,

तो 

अपने सपनों को पूरा करना भी।


अगर नहीं आता 

तो 

किसी की अनर्गल बातों को मान लेना।


पौरुष के आगे 

वो नतमस्तक नहीं होती,

झुकती है 

तो तुम्हारे निःस्वार्थ प्रेम के आगे।

और 

इस प्रेम की ख़ातिर 

वह अपना सर्वस्व न्यौछावर कर देती है।

हौसला हो निभाने का 

तभी ऐसी स्त्री से प्रेम करना, 

क्योंकि 

टूट जाती है वो धोखे से, 

छलावे से, 

पुरुष अहंकार से,

फिर 

जुड़ नहीं पाती किसी प्रेम की ख़ातिर...


 -  *डोमिनेर* 

( पोलैंड की प्रसिद्ध कवयित्री )


---------------------------------------------- 


*सौ. सुधा मुर्ति* म्हणतात .........*


बऱ्याच स्त्रियांना शारिरीक 💕💕

सौंदर्याचा न्युनगंड असलेला,💕💞

मी समाजात, वावरत असतांना💕💕

माझ्या निरीक्षणात येतो...💕💕

💕💕

पण, खर सांगू मैत्रिणींनो...💕💕

पुरूषांना कांय आवडेल, 💕💕

याचा विचार करून स्वतःला 💕💕

घडवू नका...💕💕

💕💕

*पुरूषी नजरेतून स्वतःचं सौंदर्य*💕💕

*तोलणं, म्हणजे स्वतः मधील* 💕

*स्त्रीत्वाचं अधःपतन करवून*💕💕💕

*घेणं आहे...*💕💕

💕💕

सकाळी उठून सडा-संमार्जन 💕💕

झाल्यावर स्वतःच्या हातानं 💕💕

काढलेली रेशीमरेषांची रेखीव 💕💕

रांगोळी पाहिलीत, तर तुम्हाला 💕💕

तुमच्या बोटातली सुंदरता दिसेल...💕💕

💕💕

स्वच्छ- सुंदर आवरलेलं, स्वच्छ  💕💕

स्वयंपाकघर तुम्हाला तुमच्या 💕💕

गृहिणीपणाचं सौंदर्य सांगेल...!💕💕

💕💕

तुम्ही शिक्षिका असाल, तर 💕💕

तुमचं सौंदर्य फळ्यावर नीटपणे 💕💕

लिहिलेल्या अक्षरात असेल. 💕💕

विषयाचं आकलन झाल्यावर 💕💕

दिसणारे विद्यार्थ्यांचे आनंदी चेहरे, 💕💕

ही तुमचीच सुंदरता आहे...💕💕

💕💕

सौंदर्य कपड्यात नाही, 💕💕

कामात आहे....💕💕


सौंदर्य नटण्यात नाही, 💕💕

विचारांमधे आहे... 💕💕


सौंदर्य भपक्यात नाही, 💕💕

साधेपणांत आहे... 💕💕

💕💕

सौंदर्य बाहेर कशात नाही, 💕💕

तर मनांत आहे...!!💕💕

💕💕

आपण करत असलेलं 💕💕

प्रत्येक काम म्हणजे सौंदर्याचंच💕💕

सादरीकरण असतं...!!💕💕

💕💕

आपल्याला आपल्या कृतीतून💕💕

सौंदर्याची निर्मिती करता आली💕💕

पाहीजे...💕💕

💕💕

प्रेमानं बोलणं 💟💕

म्हणजे सुंदरता...!!💕💕

💕💕

आपलं मत योग्य रीतीनं 💕💕

व्यक्त करता येणं 💕💕

म्हणजे सुंदरता...!!💕💕

💕💕

नको असलेल्या गोष्टीला 💕💕

ठाम नकार देण्याची हिंमत💕💕 

म्हणजे सुंदरता...!!💕💕

💕💕

दुसर्‍याला समजावून घेणं 💕💕

म्हणजे सुंदरता...!! 💕💕

💕💕

आपल्या वर्तनातून, विचारातून 💕💕

आपलं सौंदर्य बाहेर आलं पाहिजे.💕💕

💕💕

हाती आलेला प्रत्येक क्षण 💕💕

रसरशीतपणे जगण्यांत 💕💕

खरी सुंदरता आहे...!!💕💕

💕💕

आपण करीत असलेल्या 💕💕

कामात कौशल्य प्राप्त झालं, 💕💕

की आपोआपच आत्मविश्वास💕💕

वाढतो, आत्मसन्मानाची 💕💕

जाणीव येते...💕💕

💕💕

*अशी आत्मविश्वासानं*💕💕

*जगणारी स्त्री आपोआप*💕💕

*सुंदर होते, हा माझा*  💕💕

*स्वानुभव आहे...*💕💕

💕💕

इंदिरा गांधींचं सौंदर्य कणखर💕💕

निर्णयक्षमतेत होतं,...💕💕

💕💕

मेरी कोमचं सौंदर्य तिच्या 💕💕

ठोशात आहे...💕💕

💕💕

बहिणाबाईंचं सौदर्य त्यांच्या💕💕

असामान्य प्रतिभेत होतं...💕💕

💕💕

लतादीदींचं सौंदर्य त्यांच्या 💕💕

अप्रतिम, दैवी आवाजात आहे...💕💕

💕💕

वेळ प्रसंगी या सर्वजणींची 💕💕

आठवणच आपलं जगणं 💕💕

सुंदर करायला मदत करेल...💕💕

💕💕

*आपण जशा जन्माला आलो* 💕💕

*आहोत, तशा सुंदरच आहोत,* 💕💕

*ही खूणगाठ मनाशी बांधून* 💕💕

*टाकली, की सौंदर्याकरीता* 💕💕

*दुसर्‍या कुणाच्या पावतीची* 💕💕

*गरज पडत नाही आणि*💕💕  

*अवघं विश्व सुंदर भासतं...!!!* 💕💕

💕💕


----------------------------------------------