Monday, May 11, 2020

कोरोना आणि बँका भाग 1

कोरोना आणि बँका 


     कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आता तिसऱ्यांदा देशात लॉकडाऊन वाढवलेले आहे . कोरोनाची कारणे , परिणाम , उपाय हे आता सर्वसामान्यापर्यंत पोहोचले आहे . तुरळक क्षेत्रातील लोक कामानिमीत्त बाहेर पडतात  . त्यापैकी एक म्हणजे बँकिंग क्षेत्र आहे . 
       देशाभरातील राष्ट्रीयकृत  बँकातील दहा लाख कर्मचारी व अधिकारी या सेवाक्षेत्रांमध्ये निस्सीमपणे ,  विनाथांबा आपली सेवा सर्वसामान्यांपर्यंत पुरवत आहेत .  मग त्या जनधन खात्यातील पैसे काढण्यासाठी उसळलेली गर्दी असो किंवा मुलभूत गरजा भागवण्यासाठी लागणारा पैसा घेण्यासाठी आलेला  नोकरवर्ग , पेन्शनर , कष्टकरी , शेतकरी , आम जनता असो .सेवा देण्याचे  काम बिनबोभाटपणे बँकांतून चालू आहे . मुख्य म्हणजे ती सेवा पुरवत असताना कुठल्याही प्रकारच्या  कौतुकाची ,  प्रसिद्धीची किंवा उपकाराची भावना नाही , अपेक्षा नाही , गाजावाजा नाही . विशेष म्हणजे सरकारने  30 महिन्यांपासून कर्मचाऱ्यांचा देय असलेला पगारवाढीचा करार लटकत ठेवलेला आहे . पण या असल्या  गदारोळात 1 एप्रील 2020 रोजी नियोजित असलेल्या बँक एकत्रीकरणासारख्या कृतीचे सोपस्कार बिनबोभाटपणे पार पाडून घेतले . पण विरोधाची ही वेळ नाही रात्र वै-याची आहे इतका सुज्ञपणा बँकींग क्षेत्रातील संघटनांनी दाखवला . आणि नियोजित  आंदोलने तात्पुरती स्थगित केली .
       पण समाजाकडून विशेषतः प्रसार माध्यमातून काहीवेळा विरोधाभासच दाखावला जातो . आज घराबाहेर पडायला कोणी धजत नाही तिथे बँकांच  सेवा देण्याचं काम आविरत चालू आहे . आणि जाणीवपूर्वक त्याची फारशी दखल घेतली जात नाही हे दुर्दैव ! दखल नाही तर नाही पण या क्षेत्राविषयी समाजामध्ये किमान विरोधाभास तरी निर्माण करु नये ही अपेक्षा . परवा  तर TV वर
"मे महिन्यामध्ये तब्बल नऊ दिवस बँका बंद राहाणार "
आशी बातमी रंजकतेने  सांगितली जात होती . तसं पाहिलं तर त्यात 5 रविवार व  2 शनिवार आहेत . 1 मे ची सुट्टी तर सगळ्यांना नेहमीच असते . त्यात इतकं  रंजकपणे दाखवण्यासारखे काय होते हे समजले नाही . उद्या वर्षभराचे दिवस मोजून त्यातले शनिवार रविवार मोजून
 " बँकेला तब्बल .... सुट्ट्या " 
  असे सांगितले तर फारसे नवल नाही वाटणार . सध्या परिस्थितीत डॉक्टर , पोलीस , सरकारी आधिकारी यांचे काम तर कौतुकास्पद आहेच पण गल्लीपासून दिल्लीपर्यंत समाजातील  प्रत्येकाच्या सेवेसाठी सांगेल त्यावेळेला सेवा द्यायला बँका तत्पर राहिल्या  आहेत . त्यामध्ये शुगर बीपी सारख्या काही व्याधी स्वतःला  असलेले कर्मचारी असतील तर काहीजणांची छोटी बाळं किंवा  वयस्कर आई-वडिल घरी असतील . काही गर्भवती महिला असतील . पण कशाचीच तमा न बाळगता जास्तीत जास्त लोक आपली सेवा देत आहेत . या एका कर्मचाऱ्यांच्या पाठीमागे त्याचं आख्ख कुटुंब चिंतेत आहे . पण स्वतः कर्मचारी मात्र न डगमगता काम करत आहेत . यावेळी संघटना मात्र नेहमीप्रमाणे खंबीरपणे कर्मचाऱ्यांच्या पाठीशी उभी आहे . आणि म्हणूनच कोणतेही दडपण न घेता काम करणे सुलभ होतंय .
" न भूतो न भविष्यती" 
अशी सध्याची परिस्थिती आहे . परंतु सातत्याने भविष्याचा वेध घेत परिस्थितीवर मात कशी करायची याचं संघटनेकडून विचारमंथन चाललेलं असतं .आणि धैर्य वाढवलं जात. तातडीने बारिकसारीक आडचणींचा विचार केला जातो . पाठपुरावा केला जातो .  सहज शाखेत चर्चा चाललेली असते 
"असं झालं तर काय करायचं "
लगेच उत्तर तयार असतं
" बघु की संघटना काहीतरी सांगेल की "
संघटना फक्त कर्मचाऱ्यांचा विचार नाही करत . तर त्याहीपेक्षा  सामाजीक बांधीलकी अधिक  जपण्याचा प्रयत्न करतेय . भविष्याचा वेध घेतेय अपेक्षा एवढीच आहे की  समाजातील सुजाण लोकांनी याकडे लक्ष दिलं पाहिजे . बँकांच राष्टीयकरण अबाधीत रहाणं हे कर्मचाऱ्यांइतकच किंबहुना त्यापेक्षा जास्तीचच सामान्य जनतेसाठी आवश्यक आहे . त्यांचा पैसा जर सुरक्षित रहायचा असेल , तळागाळातल्या जनतेपर्यंत जर बँकिंग पोहोचवायचं असेल , बँकांच जाळं अजून विस्तृत करायचं असेल तर बँकेची मालकी ही सरकारी असली पाहिजे . आजच्या कठीण परिस्थितीत सुद्धा सरकारी कर्मचाऱ्यांनीच स्वतःची तमा न बाळगता  जास्तीत जास्त सेवा देण्याचा प्रयत्न केला आहे . 
        म्हणून आता सरकारची जी हळुहळु वाटचाल चालू आहे आधी एकत्रीकरण आणि मग खाजगीकरण त्याकडे डोळेझाक करुन चालणार नाही . त्यात सध्या इतका गदारोळ चालू असतांना देखील 1 एप्रील 2020 रोजी नियोजित बँकांच्या  एकत्रीकरणाचे सोपस्कार पार पाडले त्याची समाजाने दखलच घेतली नाही . सोयीस्करपणे डोळेझाक केली हे घातक आहे  .पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे होणाऱ्या परिणामाचे चटके हे  सर्वसामान्यांना बसणार आहेत हे  नक्की ! त्यामुळे आपल्यासाठी आपणच लढा दिला पाहिजे . वेळीच विरोध केला पाहिजे . त्यासाठी हा प्रश्न बँक कर्मचाऱ्यांचा आहे ही भावना प्रथम दूर केली पाहिजे . "सर्वांसाठी सर्वांनी "
ही भावना आसायला हवी तर आणि तरच आपण आपल आर्थिक स्वातंत्र्य आबाधीत ठेऊ शकू हे नक्की !!

कॉम्रेड सरिता कुलकर्णी 
महिला प्रतिनिधी 
बीओएमईयु औरंगाबाद युनिट

4 comments:

  1. अत्यंत मोजक्या शब्दांत व्यक्त झालात , पण खूप सार सांगून गेलात .

    बँक कर्मचाऱ्यांच्या कथा आणि व्यथा असे खूप चांगले दीर्घ लिखाण का अरू शकाल .

    शुभेच्छा !

    ReplyDelete