Friday, July 29, 2022

घेरडीच्या आठवणी

बालपणीचा श्रावण


   सांगोला तालुक्यातील छोटंसं , टुमदार गाव म्हणजे माझं माहेर घेरडी ! जेमतेम साडेनऊ हजार लोकसंख्या असलेलं आणि अजूनही दहावीपर्यंत शाळा असलेले ते गाव ! शाळा , बँक या निमित्ताने राहायला आलेली मंडळी म्हणजे देशपांडे सर , वाईकर सर , महाजन सर , बँकेचे कुलकर्णी साहेब अशी चारपाच घरे आणि डोंगरे-पतकी अशी मोजकी घरे सोडली तर  वीस एक घरे तर आमच्या भावकीचीच होती .
त्यामुळे अगदी चैत्राचं हळदीकुंकू , श्रावणातील चारी सोमवार , शुक्रवार , नागपंचमी , महालक्ष्मी , नवरात्र , दसरा , दिवाळी , संक्रांत या सगळ्या दिवसांना उत्साही वातावरण असे .
सगळ्या वहिनी , काकू , मोठ्या बहिणी आम्ही सगळी भावंडं आणि आमच्यात लुडबुड करणारी भाचे कंपनी यांनी वाड्याच गोकुळ झालेलं होतं .
   श्रावण येणार म्हणलं की सगळ्या बायकांची आधीच लगबग सुरू झालेली असायची . जाळया जळमटं काढून घरं स्वच्छ केली जायची मग खरकटे मरकटे हात लागले म्हणत आधी डबे घासून पुसून लख्ख व्हायचे मग सगळी पिठं दळून आणणे , साखर दळून आणणे , धन्याजिऱ्याची पूड , वेलदोडे पूड , खसखस पूड , उपवासाची भाजणी , थालीपीठ भाजणी अशी सगळी ताजीताजी जय्यत तयारी केलेली असायची .
 त्यात मोठा कार्यक्रम हा लाह्या फोडायचा असायचा . थोडीशी पावसाची उघडीप पडली की वाड्यात सगळ्यांनी एकाच वेळी आपापल्या घरी लाह्यासाठी कावळीच उमलं घातलेलं असायचं कारण एका वेळी सगळ्यांनी लाह्या केल्या तर गरम गरम लाहया गिरणीत दळणे दस्तगीर पठाणला सोयीचे व्हायचे . मग गिरणीत दळलेल्या लाह्याच्या पिठाचा गरम डबा कडेवर घेऊन घरी आले की पहिल्यांदा दूध गुळात आणि पीठ गार झाल्यावर ताक साखरेत कालवून खायला जी मजा यायची तशी चव  अजून तरी कशालाच आलेली नाही !
ते पीठ मग पंचमीच्या भावाच्या उपवासाला , आईच्या शुक्रवारच्या भाजणीच्या उपवासाला , मंगळागौरीच्या  पोरींसाठी ते आगदी हरितलकेच्या उपवासापर्यंत नाश्त्याला वापरले जाई .
      अजून एक मजा श्रावणात यायची ती म्हणजे सक्काळी सहा वाजता सगळ्या मुलींचं एक मोठ्ठं काम आसायच ते म्हणजे विठू देशपांडे सरांच्या वाड्यातून जाईची फुले तोडून आणणे ! हातात कुंडा घ्यायचा आणि फुले आणायला पळत सुटायच . त्यांच्या दरवाजाला खेटून दाटीवाटीने दहा बारा पोरी उभारलेल्या असायच्या . आत वेलाला मोठा मंडप केलेला होता आणि चांदण्या दिसाव्यात असा सुवासिक फुलांनी मांडव गच्च भरलेला असे . अगदी दाराजवळ उभी  असणारीने फटीतून आत डोकावून पाहायचं आणि आत काय चालू आहे ते मागे असणाऱ्या सगळ्यांना सांगायचं .
" आज खूप फुलं आहेत . 
आता दार उघडून मामी बाहेर आल्या .
पाठोपाठ मामा पण आले आहेत .
दोघेजण घरच्या साठी फुले तोडून ठेवत आहेत . 
आता घरातून रुक्मिणी वहिनी आल्या . " 
आस सांगितलं की सगळ्यांना आनंद व्हायचं कारण आता त्या वहिनी दराचा दांडू काढायच्या मग सगळ्यांना आत प्रवेश मिळायचा . त्या हसत हसत दार उघडायच्या तर मामा-मामी हातात काठी घेऊन कट्ट्यावर बसायचे . कोणी कळ्या तोडल्या किंवा फाटे खाली ओढले की पाठीत काठी बसे . वहिनींनी दार उघडले की पळत जाऊन वेलीच्या कडेनी गोल करून फुलं तोडायला सगळ्यामध्ये चढाओढ लागे . 
गंमत म्हणजे त्यांची छोटी मुलगी पिली पण आमच्याबरोबर फुले तोडायला सामील होत असे . आपला कुंडा भरला की मागे नेऊन ठेवायचा आणि फ्रॉक / परकर काय असेल त्याचा ओचा करून दोन्हीदोन्ही हातानी भराभर फुले तोडायची . पावसाची सर येऊन गेलेली असली की वेलीवरच्या बिंदूनी सगळ्या अंगावर पाणी पडायचं . फुलं संपली की तुझी किती माझी किती हे बघायची लटपट असायची . सगळ्यात जास्त फुले विद्याकडे असायची कारण ती उंच होती वरची फुले फक्त तिच्या हाताला यायची तर सगळ्यात कमी फुले चीमीकडे असायची तिच्या हाताला फुले यायची नाहीत ती हिरमुसून बसायची मग आमच्यात समझोता व्हायचा सगळ्यांनी थोडी थोडी फुले चीमीला द्यायची अशी गंमत व्हायची . चीमी लहान होती पण तिच्याबरोबरचे कोणी नव्हते मग ती बऱ्याचदा माझ्या मागे असायची . घरी येऊन गजरे करायचे सकाळी एक आणि संध्याकाळी महादेवाला जाताना एक असे घालायचे . 
घेरडीतील महादेव हे एक प्रसन्न वाटणारे प्रकरण आहे . महादेव  स्वयंभू आहे त्यामुळे अजूनही पंचक्रोशित त्याचं महत्त्व खूप आहे . श्रावण सोमवारी  सकाळची आवराआवर झाली की नऊच्या दरम्यान महादेवाला जायचं हे रविवारीच ठरलेलं असे . उद्या शिवामूठ कशाची आहे याची पण चर्चा झालेली असायची त्याप्रमाणे सगळ्या काकू , वहिनी शुचिर्भूत होऊन शुभ्र वस्त्र महादेवाला प्रिय आहे मग साधारण तशी तयारी करून सगळ्या निघायच्या मग त्यांच्याबरोबर आम्ही मुली पण जायचो तसं तर महादेवाच्या मंदिराचे बांधकाम आलीकडे झाले आहे पूर्वी फक्त दिवा लावायला आडोसा होता बाकी उघड्यावर महादेव असे . गावापासून एक कोस दूर माळरानावर ते ठिकाण आहे . जवळजवळ पाच फूट काळीभोर पाषाणाची मोठी मूर्ती आहे मधोमध भली मोठी पिंड आहे . त्याचं वैशिष्ट्य म्हणजे पिंड नेहमी पाण्यात आसते तिथला झरा कधीच आटत नाही . कर्नाटकातील एक महाराज तिथे सेवेला येऊन राहिले होते . मागच्या बाजूला एक खोप करून ते त्यात राहत असत . अंगात भगवी कफनी कपाळावर इबिताचा पट्टा ओढून हातात काठी घेऊन ते ताडताड चालत निघत आणि गावात पाच घरी 
" रेवण सिध्देश्वर कांतीभिक्षा "
ओम भवती भिक्षांदेही"
अशी खणखणीत आवाजात भिक्षा मागून आणायचे ते त्यांचे जेवण असे . महादेवाच्या मागे एक विहीर होती . मग आसपास झेंडू , गोकर्ण , गुलबक्षी अशी फुलबाग त्यांनी लावलेली असायची समोरच्या बाजूला वडाचे झाड होते . जवळ सोनार मळा आहे तिथे आंब्याची झाडे होती . गावाबाहेर पडले की ओढा ओलांडून वर जावं लागे . ओढ्यात मोठे मोठे दगड असायचे  दगडावरुन उड्या मारत ओढा पार करायला मजा यायची . ओढा ओलांडून थोडंसं वर चढले की रस्त्याच्या दुतर्फा झाडी आहे आणि तिथे मोर आहेत . संध्या काळच्या वेळी असे समोरून मोर जाताना पाहून हरकायला व्हायचं ! घेरडीत फिरायला जाण्याचे महादेवाचे देवस्थान हे एकमेव ठिकाण आहे . कोणाकडेही पाहूणा आला तर महादेवाला जाण्याचा कार्यक्रम असतोच . तिथे गेलं की अजूनही रम्य वाटते . 
      श्रावणी शुक्रवार म्हणजे घरोघरी जिवतीची पूजा , आमच्याकडे गंगागौर असल्यामुळे तांब्याला काव लाऊन ते वळले की त्यावर
चुना आणि बुक्का वापरून नाक , डोळे , मंगळसूत्र आगदी काडीने , सुईने कलात्मकतेने रेखाटायचे आणि जेष्ठा गौर घरोघरी तयार
होत असे मग आगदी उत्साहात
तिचं आगमन होत असे . ताटात शुभ्र कापसाची हळदी कुंकवाने रंगवलेली माळा-वस्त्र , हिरव्यागार आघाडा-दुर्वा , धोंडीआप्पा गुरवाने दिलेली बेल , फुटाण्याची पिवळी धम्मक तर चाफ्याची पांढरी अशी विविधरंगी फुले असा सगळा पूजेचा साग्रसंगीत थाट असायचा तर  पुरणावरणाचा चविष्ट स्वयंपाक , जेवायला सवाष्ण ठरलेली असायची . चार वाजले की घरं झाडझुड करून सतरंजी टाकून खुर्चीवर ताटात हळदीकुंकाचे पंचपाळे , फुटाणे , दुधाचे फुलपात्र त्यात मोठा गोल चमचा अशी तयारी करून आपलं आवरून सावरून बसायचं . निमित्त हळदी कुंकाच असायचं पण उखाणे , चेष्टा मस्करी , गप्पा यांना भरत येत असे . आई , मोठ्या काकू , प्रभा काकू , मावशी , उषा वहिनी , शांता वहिनी , पिलू वहिनी या वाड्यातील बायका तर रमा काकू , अरविंद काकी , दिनकर काकू , डोंगऱ्याच्या आणि सोनाराच्या बायका , वरलीकडच्या उषा काकी , माई मावशी ,  छाया ताई असे सगळे जमले की वाडा फुलून जाई आणि उखण्यांची चढाओढ लागे . एकेकजणी चार चार उखाणे घ्यायच्या कोणी तिथल्या तिथे तयार करून घ्यायच्या तर उषा वहिनींचा गाण्यातील उखाणा ठरलेला असायचा . 
कोणाच्या लेकीच नवीन लग्न झालेलं असलं की तिला पंचमीच्या आधी माहेरी आणायचं आणि पहिली मंगळागौर करून मग सासरी पाठवले जाई .
घेरडीत नागपंचमीचा सण फारच उत्साहात व्हायचा . आमच्या वाड्याच्या आणि डोंगरे वाड्याच्या मधे मोठ्ठं पटांगण आहे . ताईआत्याच्या दारासमोर मोठा कट्टा आहे आणि समोर लाईटचा पोल आहे . त्या जागेला आमचं खास नाव आहे 
 " डांबाजवळ !"
पंचमीच्या आधी गवत काढून त्या पटांगणाची साफसफाई केली जायची . सुताराकडून  एक लाकडी चक्करघाणा तयार केलेला होता तो वर्षभर डोंगरे वाड्यात ठेवलेला असायचा तो पंचमीच्या आधी बाहेर आणून पटांगणात मधोमध मोठ्ठा खड्डा खणून रोवला जाई त्यावर कावडीसारखी आडवी दांडी त्याला दोन्ही बाजूला कासरे बांधून झोके तयार केले जायचे . आमच्या गल्लीत कासराची दुकाने होती मग पंचमीला बांगड्या भरायला आख्ख्या गावातील , वस्त्यावरील मुली , बायका यायच्या त्या बांगड्या भरल्या की तिकडून इकडे यायच्या आणि चकारीवर बसूनच घरी परतत असत . चकारी फिरवायला ज्याच्या त्याच्या घरातील मुले असायची . त्या आठवड्यात संध्याकाळी पाच ते सात वाजेपर्यंत तिथे उभे राहायला जागा मिळत नसे . वाड्यातील बायका मुलींसाठी ताई आत्याच्या कट्ट्यावर राखीव जागा असे . डोंगरेच्या वाड्यात पंचमीच्या आधी आणि नंतर असे चांगले आठ दहा दिवस फेर धरून गाणी म्हणणे वेगवेगळे खेळ खेळणे असा कार्यक्रम असायचा . 
झिम्मा , फुगडी , लंगडी ,  कोंबडा , घसर फुगडी , किस बाई किस , काटवट कणा , केळ केळ घूम , आगोटा पगोटा , नाच ग घुमा , मगर माशानो द्या माझी घागर 
असे एक न दोन अनेक पारंपरिक खेळ खेळले जायचे . तर
" हरीच्या नैवेद्याला केली जिलेबी बिघडली "
" कृष्णा घालितो लोळण  "
" धौम्य ऋषी सांगतसे "
"पाच फड्याचा नागोबा" 
" पोरी पिंगा ग "
" हाहाहा हू सजणी तू "
" कीकीच पान बाई कीकी "
आशी अनेक गाणी 
उषा काकी , दिनकर काकी , रमा काकू , आई , उषा वीवहिनी बाकी बायका म्हणायच्या मग सगळे फेर धरुन , खेळत सगळे त्यांच्या मागे म्हणायचे .
अरविंद काकी तब्ब्येतीने चांगल्याच जाड होत्या पण खेळ खेळण्यात त्यांचा कोणी हात धरत नसत . पंचमीच्या दिवशी चांगला अडीच तीन तास हा कार्यक्रम डोंगरे वाड्यात व्हायचा . घरी यायला रात्री आठ वाजत . पण त्यातून जी ऊर्जा मिळायची न ती पुढे अनेक दिवस पुरायची . मंदा आक्का , शोभा , पुष्पा , आक्की , तायडी , पतक्याची शरू , शकू यापैकी कोणीतरी माहेरी आलेल्या असत तर सुधीर , सुनील , पंप्या , सचिन , बबल्या , छबल्या इतकी वाडीतील मुले आणि विद्या , कुंदा , मी , मायडी , नंदा , चिमी, ज्योती , पिंकी , हरणी , बाळी , सारिका , मिनी , स्वाती , चंबी , संजू इतक्या मुली असा वाडा मुलामुलींनी , बायका माणसांनी खचाखच भरलेला असे . झाडूवाली शिवा , परटाची शांता ,  कोळ्याची भागाबाई , भामा या तर आमच्या  वाड्याचा एक अविभाज्य घटक होत्या तर शेतातील गडी बायका हे आपल्याच कुटुंबातील वाटत असत . आत्ता सुद्धा त्या आठवणीने पण उर भरुन येतो . 
नवीन लग्न झालेल्या लेकीची किंवा सुनेची पहिली मंगळागौर असली की त्या घरी पहाटेपर्यंत जागरण केलं जायचं . चारी शुक्रवारी सगळ्या बायका मुली नटून थटून साजरा करायचा . असा अख्खा श्रावण विविध प्रथानी ओथंबलेला असे. घेरडी
गाव छोटंसं आसले तरी गावातील रीतिरिवाज फार मोठे होते . त्या संस्काराची शिदोरी घेऊन त्याच गावात मला लहानाचे मोठे होता आले यासाठी मी स्वतःला खूप नशीबवान समजते .

सौ. सरिता अनिल कुलकर्णी.
saritakulkarni67@Gmail.com
9421607248
बार्शी



शाळेतील गणेशोत्सव



    घेरडी आमचं छोटंसं गाव त्यातली 
" जवाहर विद्यालय घेरडी "
ही माझी शाळा !
छोटीशी , कौलारु , टुमदार शाळा पण त्या शाळेतील आठवणी मात्र आभाळा एवढ्या मोठ्या आहेत . प्रत्येक प्रसंगाच्या आठवणी या सुवर्णाक्षरांनी कोरल्यासारख्या स्मृतीपटलावर लख्ख आहेत . प्रजासत्ताक दिन असो अथवा स्वातंत्र्य दिन असो त्याचं निखळ वेगळेपण आम्हाला खूप अनुभवता आले . आमच्या शाळेत पाचवी ते दहावीचे वर्ग आहेत . सलग पाच वर्गखोल्या आणि दोन्ही बाजूला दोन खोल्या एका बाजूला ऑफिस दुसऱ्या बाजूला स्टाफ रूम . एक वर्ग भरण्यास जागा कमी पडते म्हणून छोटी पटसंख्या असलेला वर्ग शाळेच्या खालच्या बाजूला असलेल्या एका खोलीत भरायचा . शाळेसमोर खेळासाठी मोठ्ठं मैदान आहे , त्याच्या बाजूला प्रयोगशाळा त्याच्या शेजारी खेळाच्या आणि कावयतीच्या सामानाची एक खोली . चोहोबाजूंनी महानंदाची झाडे आहेत  . 
उमेश डोंगरे सर हे हेडसर कोणाला कधी फारसे बोलायचे नाहीत पण उंचे पुरे धिप्पाड ते वर्गावरुन चालले तरी वर्ग एकदम चिडीचूप व्हायचा . तसाच धाक देशपांडे सर आणि खटकाळे सरांचा वाटायचा . पठाण सर , महाजन सर , वाईकर सर आणि डी. व्ही. सर हे त्यामानाने मवाळ होते . काही काळ आमचा भाऊ नंदू आणि आक्कीची मैत्रीण शकू मॅडम हे दोघे पण शिकवायला होते . नंदू सर शाळेत खूप स्ट्रीक्ट असत घरी आलं की भावाप्रमाणे ! कधीच कोणाशीही बोलताना न दिसलेले क्लर्क म्हणजे विठू देशपांडे सर ! तसेच शाळेत सुधाकर , राजाराम आणि विलास हे तीन शिपाई होते . सुट्टीची नोटीस आणणारे खेळासाठी रिंग , दोऱ्या , डंबेल्स , लेझिम , देणारे कोणालाही खेळताना लागले तर लगेच आयोडीन आणि कापूस देणारे आमचे शिपाई गावातीलच असल्यामुळे ते आम्हाला मोठ्या भावाप्रमाणे वाटायचे . तसे तर बरेचसे शिक्षक पण गावातील होते . त्यावेळी दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेसाठी आम्हाला जवळ्याला जावं लागायचं तर वेळेत एस टी बस नसायची म्हणून दहा दिवस आमचा मुक्काम जवळ्यात असे आणि आमचे जेवणाचे डबे शिपाई पोहोच करत असे रोज एक शिक्षक येऊन जात आसत आमची व्यवस्था नीट आहे न हे पाहण्यासाठी .  एकूणच विद्यार्थ्यांची काळजी घेणे ही जबाबदारी पलकांबरोबर शाळा , शिक्षक तितक्याच प्रेमाने पर पाडत असत .
आमच्या शाळेची प्रार्थना 
" हंसवाहिनी सरस्वतीच्या पदकमली रमते 
माझे मन पावन होते "
ही होती . उभ राहून ती एका तालात म्हणाताना आपसूकच मागेपुढे डुलत म्हणली जायची . शाळेत जायला उशीर झाला की प्रार्थना होईपर्यंत शाळेच्या बाहेर उभे राहावे लागे . बहुदा हे शनिवारच्या सकाळच्या शाळेला होई मग उशीर झाला म्हणून कडाक्याच्या थंडीत जोरात दात खाऊन हळूच छडी मारणारे कोळेकर सर आणि त्याच सरांचा शनिवारी पीटीचा तास असे . तो होत असताना हातवारे करत तोंडात असलेल्या शिट्टीने सूचना देत होणारा पीटीचा तास मधूनच तोंडातील शिट्टी काढून ज्या मुली उड्या मारत नसतील त्यांना 
" ए जाफराबादच्या म्हशीनो "
असे रागवत ते हातातच छडी फिरवत मागेपर्यंत चकरा मारत असत आणि सगळ्यांना कवायत करायला लावत असत त्या सरांचा भारी धाक वाटत असे .
     आमच्या शाळेत होणारा गणेशोत्सव आणि त्याचं वेगळेपण हे अधोरेखित करण्यासारखे आहे . तसा तर महाराष्ट्रात घरोघरी , गावोगावी मंडळे करुन गणेशोत्सव साजरा केला जातो पण त्याची आमच्या शाळेत जी मजा आम्ही आनुभवली तशी मजा मला पुन्हा कुठेही दिसली नाही हे मात्र मी खात्रीलायक सांगू शकते .
गणेशाचे आगमन , प्रतिष्ठापना , मिरवणूक , दहा दिवस आरत्या , प्रसाद हे तर सगळीकडे उत्साहात होतच असते . पण आमच्या शाळेत होणारा सांस्कृतिक कार्यक्रम मात्र मला खूप ठळकपणे आठवतो तो तितकाच आनंद देणारा आणि विस्मयचकित करणारा आहे . 
आमच्या शाळेत या उत्सवादरम्यान शाळेच्या प्रत्येक वर्गाला एक दिवस देखाव्यासाठी ठरवून दिलेला असायचा . त्याला आम्ही 
" आमचं डेकोरेशन "
असे म्हणत आनंदाने तयारीला लागायचो .
यामधे त्या त्या वर्गासाठी विशिष्ठ विषय ठरलेले असत उदा 
" सीतेचे हरण "
" संतोषी माता "
" श्रावण बाळ आणि आईवडील "
आणि याचं खास वैशिष्ट्य म्हणजे हे देखावे हे काही वस्तू वापरुन न करता ते मुलामुलीमधून निवड करुन केले जायचे . यामधे मुख्य पात्रासाठी साजेशी ठरविक मुलामुलींची निवड केली जायची यामधे दरवर्षी एक देखावा खूप गाजलेले होता तो म्हणजे 
संतोषी माता .
यासाठी एकच ठरलेली मुलगी होती ती म्हणजे माळ्याची शांता ! 
उंचीपुरी , गोरीपान , तरतरीत नाक , लांबसडक काळेभोर केस तिला सहज जरी पाहिले तरी तिचा चेहरा लक्ष्मीचा मुखवटा असल्यासारखे वाटत असे . 
तिला नऊवार साडी नेसवून , बटवेणी घालून केस मोकळे सोडून कपाळावर टोप घालून सजवायचं तिच्या एका हातात त्रिशूळ एका हातात डमरू देवून उभे करायचे आणि तिला आठ हात दिसले पाहिजे म्हणून तिच्या मागे तीन मुली फक्त हातात तिच्यासारख्या बांगड्या घालून हात बाहेर काढून उभ्या केल्या जायच्या ती समोरून अष्टभुजा देवी दिसत असे . तिच्यासमोर मग बाकी मुली कोणी आरतीचे ताट घेऊन , कोणी हात जोडून नमस्कार करत आहे अशी सहा पात्र केली जायची व तिच्या दोन बाजूला तीन तीन मुली उभ्या केल्या जायच्या . कमी उंचीच्या मुली बाळे होऊन उभ्या राहायच्या . विशेष म्हणजे हा देखावा साधारण सायंकाळी सात वाजता सुरु व्हायचा तो रात्री साडेदहा पर्यंत असे . त्यावेळी वर्गात पंखे नसत मग नवीन कपडे , लाईट यामुळे त्या घामाघूम व्हायच्या , नाकात नथ घातल्यामुळे मध्येच कोणाला शिंक यायची मग सप्लिमेंट लाऊन वाढवलेली वेणी निसटायची . तशातच मग थोडी गर्दी कमी झाली असे वाटले की शकू मॅडम , पानसकर बाई या दार लाऊन घ्यायचं मुलींना पाणी , थोडंसं बिस्कीट केळी खायला द्यायच्या , काहीतरी मेकअप निघालेला , साडीचा पदर , निसटलेली निरी नीट करायची , कोणाचं कानातल गळ्यातील पडलेलं आवरायचं आणि बाहेर गर्दी वाढली की पुन्हा पटापट प्रत्येकानी आपल्या ठरलेल्या स्थितीत जाऊन उभ रहायचं काहीवेळेस मागे हात बाहेर काढून पाठीमागे उभ्या आसलेल्या मुली आवघडल्या की त्यांना बदलायच . पण मुख्य पात्र असलेले चेहरे बदलता येत नसत . हा देखावा पूर्ण गणेशोत्सवात सर्वोत्तम ठरे ! 
असाच दुसरा देखावा ठरलेला असे तो म्हणजे 
सीतेचे हरण 
यात एखादी मुलगी सीता होई , तिला भगवे कपडे घालून तयार केले जाई . बाकी राम , लक्ष्मण , रावण असे मुलांना केले जाई .
अशाच प्रकारचा सुंदर देखावा मुलांच्या मराठी शाळेतपण होत असे . तिथे मोहन आण्णा आणि रमेश आण्णा गुरुजी म्हणून होते तर आंता काका मुख्याध्यापक होते . अंता काका म्हणजे धोतर , नेहरु शर्ट आणि टोपी असा त्यांचा ठरलेला पेहराव होता . अत्यंत शांत , अतिशय हुशार आणि शिस्तबद्ध म्हणून ते पंचक्रोशीत प्रसिद्ध होते . मागे हात बांधून शाळेत काहीही न बोलता चक्कर मारली तरी मुले त्यांना घाबरत असत . त्याच पद्धतीने मोहन आण्णा आणि रमेश आण्णा हे दोघेही होते . त्यामुळे त्यावेळी मराठी शाळेतील मुले खूप नावाजलेली , तरबेज असत . आमच्या गावात सातवी पर्यंत मुलांची आणि चौथी पर्यंत मुलींची मराठी शाळा आहे .
त्यांचा देखावा ठरलेला असे तो म्हणजे श्रावण बाळाचा !
काठया , दोर आणि पुठ्ठ्यांचा वापर करून कावड केली जायची . मुलांची शाळा असल्यामुळे श्रावण बाळाचे आईवडील दोन्ही मुलेच असत आई ज्याला केलेली असे त्याला बाईचे मेकअप केलं जाई आणि डोक्यावरून पदर देऊन ती दोन्ही मुले डोळे झाकून पुठ्ठ्याच्या कावडीत बसवले जायचे . कोपऱ्यात टेबलवर खुर्ची ठेऊन पुढे आंब्याचे फाटे लावून डोक्यावर टोप गळ्यात माळा घालून हातात धनुष्यबाण घेऊन दशरथ राजा उभा असे तर दुसऱ्या कोपऱ्यात दगड माती लावून खऱ्या पाण्याचा झरा केला जाई त्याच्या शेजारी कळशीतून पाणी घेत असलेला श्रावण बाळ असे आणि संपूर्ण वर्गात वेगवेगळ्या झाडांचे फाटे लावून ते जंगल तयार केलं जाई . दुसरे दिवशी वाड्यात हे दोन्ही आण्णा , ककमरे गुरुजी , पालसांडे गुरुजी आणि आम्ही सगळ्या बहिणी उगाचच वाद घालत बसायचो विषय म्हणजे
" देखावा कोणाचा चांगला झाला "
यावरुन बरीच चर्चा रंगत असायची . 
या देखव्यामध्ये आपल्याला संधी मिळावी असे प्रत्येकाला वाटत असे पण ती सगळ्यांना मिळत नसे ज्या मुलांमुलींची यासाठी निवड होई ती आगदी आनंदाने यासाठी तयार होत आसत . अवघडून बसणे , उभे राहणे यात त्यांना आनंद होत असे . गावातील लोक संध्याकाळी आपापल्या सवडीने देखावा पाहायला येत आसत . आख्खा वर्ग स्वयंसेवक म्हणून आसपास फिरत असे . आपल्या ओळखीचे , घरचे लोक पाहायला येत असताना दिसले की आनंदी आनंद होई . घरचे लोक लवकर दिसेना झाले की मधूनच घरी पळत जाऊन यायचं
" चला की लवकर आमचं डेकोरेशन पाहायला "
असा निरोप घरी , शेजारी , मैत्रिणींच्या घरी देऊन परत येऊन स्वयं सेवकासारखे उभे राहायचे . इकडे ज्यांना पात्र करायला मिळालं त्यांना मात्र तीन तीन तास शेवटपर्यंत आजच्या भाषेत
 " स्टॅच्यु "
होऊन उभे राहाव लागे तेही आनंदाने आपली भूमिका पार पाडत असत पण असे सजीव माणसांचे देखावे नंतर मला कुठेही पाहायला मिळाले नाही हे मात्र खरे !
हे संपले की गणेश विसर्जनाच्या आदले दिवशी शाळेच्या स्टेजवर सांस्कृतिक कार्यक्रम व्हायचा यामधे छोट्या छोट्या नाटिका , नकला , गाणी , नृत्य याचे सादरीकरण व्हायचे त्यात मुलामुलींना आपले कलागुण सादर करण्याची संधी मिळायची . यासाठी मुलींबरोबर पानसकर बाई , त्यांचा मुलगा दीपक , सुतराच्या शकू मॅडम खूप कष्ट घ्यायचे . गावातील लोक प्रेक्षक म्हणून बहुतेक आम्हा मुलांचे पालकच असत ते शाळेच्या मैदानात आपापलं बस्कर घेऊन येऊन बसत असत . त्यातच पाऊस येणं , लाईट जाणं असे प्रकार व्हायचे . टाळ्या शिट्ट्या याचा जल्लोष असायचा पण त्यात मजा असायची , उत्साह असायचा . घर , स्टेज , मेकअप करण्यासाठी मिळालेला वर्ग , सामानाची नेआण यासाठी पळापळ करतांना एकप्रकारचा कैफ चढलेला असायचा . रात्री उशिरापर्यंत कार्यक्रम व्हायचा तरी दुसरे दिवशी सकाळी लवकर  उठून गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत सहभागी व्हायचे तेही बेंबीच्या देठापासून 
" गणपती चाल्ले गावाला 
चैन पडेना जीवाला " अशा घोषणा देत बाप्पांचं विसर्जन आणि खिरपतीचे वाटप  झाल्यावरच वातावरण थंड होई . हे सगळं करताना गावातील मुलं मुली एकत्र असत त्यात बहुतांश मुलं आमच्या वाड्यातील , गल्लीतील होती . म्हणजे आम्ही सगळी भावंडं , भाचे कंपनी ही सगळी शाळेच्या वेळेत शाळेत  आणि इतर वेळी वाड्यात असत त्यामुळे आमचं बालपण हे गोकुळात गेल्यासारखे आहे . सगळीकडे गर्दी असली तरी वाटून खाणे आणि मिळूनमिसळून राहणे यासरखे सुख कशातच नाही .
" बालपणीचा श्रावण " सगळ्यांना खूप आवडला मग येणाऱ्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने मन भूतकाळात गेले . खेड्यातील बालपण ज्यांना अनुभवता आले तो एक अनमोल ठेवा आहे त्याची उजळणी केली तर मनाला तरतरी येते मग तेही शब्दबद्ध करावेसे वाटले आजही हे सगळं आठवलं तर त्याकाळात रमायला होतं .




सौ सरिता अनिल कुलकर्णी
9421607248
saritakulkarni67@gmail.com
बार्शी





सोन्यासारखा दसरा


 घेरडी गावात बारा बलुतेदार गुण्या गोविंदाने नांदत होते . प्रत्येकाची कामे , सणवार , रीतिरिवाज ठरलेले असत . घेरडीत धनगर समाज पण जास्त आहे . घेरडी गावाच्या चोहो बाजूंनी त्यांची शेती व वाड्या वस्त्या आहेत . त्यांच्याकडे घरटी एक तरी मुलगा मुंबईला गोदीमध्ये आहे त्यामुळे तिथले लोक सधन आहेत . घेरडीत दसऱ्याचं खूप प्रस्थ आहे . बदामीची देवी हे आमचे कुलकर्ण्यांचे कुलदैवत आहे . त्यामुळे वाड्यात पण नवरात्र व दसरा मोठ्या प्रमाणात आनंदाने साजरा केला जातो .  
     तशी तर दसऱ्याची पूर्वतयारी पक्ष पंधरवड्यात सुरु केली जाई . नवरात्र बसण्यापुर्वी वाड्याच्या आसपासचा परिसर गवत काढून साफ करुन घेतलेला असायचा . गावात एक मुकी होती ती आशी कामे करुन तिचे पोट भागवायची . तीला ऐकायला बोलायला येत नव्हते तरी पण अशा कामाच्या वेळी बरोबर हजर असायची तिला पैशात रोजगार द्यायचा व दिवसभर आपल्याबरोबर चहा, नाष्टा , जेवण सगळं आई द्यायची . इतर वेळी सुद्धा कधीकधी तिला काम नसले की पैसे नसायचे मग बरोबर घरी यायची . उगाचच मागचे दार , परसदार साफ करायची आई ओळखायची आज हीच्याकडे काही नाही लगेच तिला चहा द्यायचा व काही छोटंमोठं काम सांगायची व जेवण करुन जा म्हणायची तिला खूप आनंद व्हायचा . नवरात्र बसायच्या आधी ती वाड्याभोवतीचा परिसर स्वच्छ करुन जायची . घरोघरी साफसफाई , सारवणे , रंग देणे आशी कामे व्हायची अशा कामात वाड्यात नीलाबाईला हाताशी धरले जाई . नवरात्रात बायकांचे उपास आसत तर देवापुढे दिवा तर खारीक खोबरे दोऱ्यातओवून मंडपीला बांधून मंडपी देवघरावर सोडली जायची . रोज धोंडीआप्पा फुले माळ देत आसत . पूजा झाली की गळ्यात कवड्याची माळ घालून दिवटीवर तेल घालून ती पेटवायची व त्याने काका आरती करायचे . नैवेद्याला हरभरा डाळ व गहू भाजून केलेलं पीठ दूध गुळात कालवून ठेवलेलं असे . फार खमंग चव असे त्याची . हे सगळ होत असताना सात्विक भाव असे . धूप , दीप , उदबत्ती याचा सुगंध घरात दरवळे . क्षणभर मंदिरातील गाभाऱ्यात आहोत काय असा भास होई . हे सलग सात दिवस झाले की अष्टमीला कडकण्या करायच्या , जवळचे ठाणे म्हणून अष्टमीला बनाळीच्या देवीला जाऊन कडकण्याचा नैवेद्य , खणा नारळाची ओटी घेऊन जायचं . यासाठी उषा वहिनी , शांता वहिनी , पिलू वहिनी हमखास निघत मग त्यांच्याबरोबर आम्ही मुली निघायचो आई क्वचित यायची . सकाळी सातला जत गाडी असायची पहाटे उठून सगळ आवरून आम्ही निघायचो . खरं तर बनाळी हे आईच आजोळ त्यामुळे तिथे गेलो की पहिल्यांदा आम्ही शंकर मामांकडे जायचो त्यांचं घर पाहुण्यांनी गच्च भरलेलं असे . आम्ही सगळे आधी बनात जायचो , तिथे देवीची यात्रा भरलेली असे . देवीचे मंदिर बनात आहे . मोठाल्या चिरेबंदी विहिरी त्यावर रहाट विहिरीत कासव आणि मासे असल्यामुळे स्वच्छ पाणी . रहाट फिरताना विशिष्ट तालात येणारा आवाज खूप निसर्गरम्य परिसर आहे तो . खूप गर्दीतून सगळ्यांनी एकत्र राहून देवीचे दर्शन घेऊन गाडीच्या वेळेपर्यंत शंकर मामांच्या घरी थांबायचो . इथे मामींनी मोठ्या पातेल्यात भगर , आमटी ,खिचडी केलेली असे . प्रत्येकाने आपल्याबरोबर फराळाचं काहीतरी आणलेलं असायचं . लीला मावशी , सुमा मावशी , सुंता मामी आलेल्या सगळ्यांना केळीच्या पानावर फराळ वाढायच्या . डिकसळ , बनाळी आणि घेरडी या तीन गावात सगळे एकमेकांचे नातेवाईकच होते प्रत्येकाने बरोबर काहीतरी आणलेलं असे केळी , रताळी बाकी फळांनी टोपली भरलेली असे . पका मामाचे उपवास काही वेगळेच असत . शेवटाची तीन दिवस तो फक्त नारळाचे दूध घेत असे . पाच वाजले की सगळे निघायचे सकाळचीच गाडी पुन्हा मुक्कामाला घेरडीला येत असे त्यांनी आम्ही परत यायचो . येईस्तोवर संध्याकाळ होई .
दुसरे दिवशी नवमी की दासरा असायचा .
" दसरा सण मोठा "
या उक्तीप्रमाणे आमचा दसरा होत असे . वाड्यात आमच्या घरासमोरचं आंगणात मधल्या मोठ्या आंगणातून दोन पायऱ्या चढून यावं लागे . आमच्या पाचही घरांचा हा दसऱ्याचा कार्यक्रम एकत्र होत असे . मग आमच्या आंगणाचा स्टेज सारखा उपयोग केला जाई . काका चार वाजताच आंगणात आधी चवाळ त्यावर घोंगडी मग मोठी सतरंजी त्यावर लांबट दोन गाद्या अंथरुन पाच तक्के लाऊन बैठक तयार करून ठेवायचे . आंधार पडला की आंगाणात उजेड दिसायला पाहिजे म्हणून दोनशेचा बल्ब लावायचे वाड्यात सगळ्यांची एकत्र खरेदी केली जायची . मग विड्याच्या पानाची आख्खी करंडी , सुपाऱ्या , आकरा नारळ , भिजवलेली हरभऱ्याची डाळ , हे सगळं तयार करुन ठेवलेलं असायचं . वस्तीवरच्या लोकांना लागते म्हणून दोनचार तंबाखूच्या पुड्या , एखादे बिडीचे पुडके , काडेपेटी , अडकित्ता , सुपारी हे एका ताटात घालून ठेवलेलं असायचं .
         दसऱ्यादिवशी घेरडीत दुपारी दोन वाजल्यापासूनच आसपासच्या वस्त्यावरुन मानाचे ढोल यायला सुरुवात व्हायची . बिरोबाची पालखी असायची प्रत्येक ढोलाबरोबर लेझीम किंवा रुमाल हातात असलेल्या वीस-पंचवीस लोकांच पथक असायचं अंगात शर्ट विजार किंवा धोतर डोक्याला टोपी किंवा बहुतेक गुलाबी रंगाचे पागोटे हातात मोठे गमशे असा पेहराव या लोकांचा असे . जवळजवळ पाच वाजेपर्यंत शाळेजवळच्या चौकात पाळीपाळीने प्रत्येक पथकाचा ढोलाच्या तालावर लेझीमवर गोलाकार नाच व्हायचा . पहायला तुंबळ गर्दी व्हायची बहुतांश पुरुष असायचे आम्ही छोट्या मुली पहायला जायचो . आणि पाच वाजता सिमोल्लंघनासाठी एकामागून एक ढोल निघायचे . मारुतीला जाऊन पुढे ओढ्याच्या वर ते ठिकाण होतं . त्याला गावातून घराघरातून पुरुष मंडळी घटातलं उगवलेलं धान्य टोपीत खोचून आपट्याची फांदी हातात घेऊन सामिल व्हायचे . तिकडे आपट्याची आणि सौंदडाच्या झाडाची पूजा व्हायची त्यासाठी डोंगरे दादा , पोलीस पाटील , तलाठी , ग्रामसेवक अशा लोकांचां मान असायचा . बऱ्याचदा काका घेरडीत ग्रामसेवक असायचे तेव्हा ते तीन वाजताच तयार होऊन बहेर जायचे . मग तिकडून येताना ढोल ठरलेल्या क्रमाने गावात कुलकर्णी वाडा , डोंगरे वाडा , सोनार वाडा, दिवाण वाडा अशा बऱ्याच मानाच्या ठिकाणी जायचे.
      घरी आईचा पण उत्साह भारी असायचा . दुपारी चार वाजताच मोठ्या निळ्या पेटीत सुती कपड्यात गुंडाळून ठेवलेली खास काठपदर असलेली जरीची साडी ती नेसाण्यासाठी काढे . त्यात मधेच केवड्याचं पान ठेवलेलं असे ते वाळलं तरी पण साडीला कसा वास येतो म्हणत घडी उकलून स्वतः हुंगुन पही मग आम्हीपण 
" मला मला "
करत तीच्या भोवती जाऊन वास घ्यायचो . साडी नेसून नीटनेटकं आवरुन ती नऊवार साडी छान काठ काढून नेसत असे मग पितळेच्या डबीत कापसात गुंडाळून ठेवलेले दागिने काढून गळ्यात अष्टपैलू मण्याचं मंगळसुत्र , टपोऱ्या मण्याची एकदाणी पाटल्या , नाकात नथ आणि लांबट डाळींबी खडा व त्याच्या भोवती सोन्याचे बारीक बुंदके असलेली आंगठी घालून आंबाडा वर गजरा असं तिच सोज्वळ रुप नटून थटून तयार होत असे . काकांचा पण दसऱ्यादिवशीचा ठरलेला पोशाख असे पांढरंशुभ्र ब्रासलेटचं धोतर वर भट्टीचा कडक पांढरा शर्ट व डोक्यावर टोक काढून टोपी . आणि बोटात डाळींबी रंगाचा ठसठशीत गोल खडा आसलेली आंगठी असा त्यांचा रुबाब असे . मग आवरुन सगळे सिमोल्लंघनाला निघत .
वाड्यातील प्रत्येकाचा रुबाब वेगळाच असे एकदम तुडतुडीत शरीरयष्टी असलेले पंत काका शुभ्र धोतर-शर्ट काळी टोपी घालून पाठीमागे हात बांधून वाड्यात नरसोबाच्या दारापासून ते मोठ्या दारापर्यंत वडिलकीच्या नात्याने सगळी तयारी नीट झाली न असे पाहत चार वाजल्यापासून हेलपाटे घालायचे . मोहन अण्णा , रमेश अण्णा , नंदू इस्त्रीचे पँट शर्ट तर राजा भाऊ दादा विजार शर्ट घालून तयार होत असे . सगळ्यात शेवटी पाच नंतर फक्कड काका त्यांच्या पाठोपाठ सुधीर बाहेर यायचे . सुनील , सचिन , पंपु , बबलू , छाबलू ही मुलं पण पळापळी करायची . पण प्रत्येकाच्या डोक्यावर टोपी आणि त्यात देवापुढे उगवलेल्या धान्याचा तुरा आणि हातात आपट्याच पेंडक मात्र असायचं . 
सीमोल्लंघन करुन सगळे पुरुष आले की कोणीतरी एखादी काकू वाड्याच्या दरवाजातच भाताची मूद ओवाळून टाके . मग घरात आलं का प्रत्येकीने औक्षण करायचं कडकण्या खायला द्यायच्या .सगळे एकमेकांच्या घरी जाऊन सोनं देऊन किंवा घेऊन आंगाणात टाकलेल्या बैठकीवर बसत . आपापल्या पायरीवर बायका बसत . आम्ही लहान मुलं वाडाभर फिरायचो . मग एक एक ढोल यायचा त्यांचा मधल्या आंगणात नाच होत आसे . ढोलवाल्याला नारळ बाकी सगळ्यांना पान सुपारी सोनं दिलं जायचं . बरेचशे लोक आईला पण सोन देऊन नमस्कार करुन जायचे . शेवटी सगळे आंगणात बसून गप्पा मारायचे . त्यावेळी वाड्यात देशपांडे सर राहायचे त्यांची मुलं सख्या , उन्नती आणि भरती ही पण समिल व्हायची तर वाड्याबहेर एक नर्सबई राहत असत त्यांची मुलं पिंट्या , पाप्या आणि पिंकी ही वड्यातलीच मेंबर असल्यासारखे वाटत असे . फक्कड काकांची बहिण ताई आत्या त्यांच सासर घेरडीच होत . त्यापण वाड्याशेजारी रहायच्या त्यापण आशावेळी वाड्यात येऊन बसत .
आमच्या लहानपणी सणाचा उत्साह असा माणसांच्या गर्दीने आणि उत्साहाने बहरलेला असे .


सौ सरिता अनिल कुलकर्णी
saritakulkarni67@Gmail.com
9421607248
बार्शी








सोन्यासारखा दसरा


    घेरडी गाव बारा बलुतेदारांचा !
प्रत्येकाची कामे , सणवार , रीतिरिवाज ठरलेले असत . घेरडीत कुलकर्णी , पाटील , धनगर , सनगर जरा  जास्त आहेत तिथले पाटील हे मुसलमान  आहेत . पण सगळे गुण्या गोविंदाने राहतात धनगर समाजाची घेरडी गावाच्या चोहो बाजूंनी शेती व वाड्या वस्त्या आहेत . त्यांच्याकडे घरटी एक तरी मुलगा मुंबईला गोदीमध्ये कामाला आहे त्यामुळे घेरडीचे धनगर लोक सधन आहेत . त्यामुळेच गणपतराव देशमुखांच्या प्रयत्नांनी पंचेचाळीस वर्षांपुर्वी
" घेरडी - मुंबई "
गाडी सुरु झाली आजही छोट्याशा खेड्यातून डायरेक्ट मुंबई गाडी  मोठ्या दिमाखात चालू आहे . घेरडीत सगळ्याच सणाचे , उत्सवाचे विशेष वैशिष्ठ आहे त्याचप्रमाणे  दसऱ्याचं पण खूप प्रस्थ आहे . बदामीची देवी हे आम्हा कुलकर्ण्यांचे कुलदैवत , त्यामुळे वाड्यात पण नवरात्र आणि दसरा मोठ्या प्रमाणात आनंदाने साजरा केला जातो .  
     तशी तर दसऱ्याची पुर्वतयारी पक्ष पंधरवड्यात सुरु केली जाई . नवरात्र बसण्यापुर्वी वाड्याच्या आसपासचा परिसर गवत काढून साफ करुन घेतला जाई . गावात एक मुकी होती ती आशी कामे करुन तिचे पोट भागवायची . तीला ऐकायला बोलायला येत नव्हते तरी पण अशा कामाच्या वेळी बरोबर हजर असायची तिला पैशात रोजगार द्यायचा आणि दिवसभर आपल्याबरोबर चहा, नाष्टा , जेवण सगळं तिला आई द्यायची . इतर वेळी सुद्धा कधीकधी तिला काम नसले की तिच्याकडे पैसे  नसायचे मग बरोबर घरी यायची . उगाचच मागचे दार , परसदार साफ करायची आई ओळखायची आज हीच्याकडे पैसे नाहीत लगेच तिला चहा द्यायचा व काही छोटंमोठं काम सांगायची आणि जेवण करुन जा म्हणायची
तिला खूप आनंद व्हायचा . नवरात्र बसायच्या आधी ती वाड्याभोवतीचा परिसर स्वच्छ करुन जायची . घरोघरी साफसफाई , घरे सारवणे , रंग देणे अशी कामे व्हायची अशा कामात वाड्यात सगळ्यांच्या घरी नीलाबाईला हाताशी धरले जाई . 
नवरात्र सुरु झाल्या दिवसापासून रोज सकाळी साडेसातला गावात देवीचे गोंधळी होते ते त्यांच्या खास पोशाखात , कपाळावर कुंकवाचे ठसठशीत पट्टे ओढून , गळ्यात कवड्यांची माळ घालून देवीचे भोपी होऊन पहाडी आवाजात देवीची गाणी म्हणत घरोघरी जात असत साथीला खणखणीत संबळ आणि दिमडी वाजवत वाड्यात प्रत्येकाच्या दारासमोर गाणी म्हणत वातावरण भारावून टाकत असत . वाड्यातील सगळे लोक आंगणात येऊन ते ऐकत असत . हा कार्यक्रम नऊ दिवस रोज होत असे .
नवरात्रात बायकांचे भाजणीचे उपास आसत मग भाजणीची पिठे दळली जायची तर रोजच्या  नैवेद्यासाठी डाळ आणि गहू भाजून पीठ दळले जाई ते दूध-गुळात कालवून रोज त्याचा नैवेद्य केला जाई . फार खमंग चव असे त्याची . नऊ दिवस देवापुढे दिवा तर सुरुवातीला खारीक खोबरे दोऱ्यात ओवून मंडपीला बांधून ती मंडपी देवघरावर सोडली जायची . रोज धोंडी आप्पा फुले माळ देत आसत . पूजा झाली की गळ्यात कवड्याची माळ घालून दिवटीवर तेल घालून ती पेटवायची व त्या दिवटीने काका आरती करायचे . हे सगळ होत असताना सात्विक भाव असे . धूप , दीप , उदबत्ती याचा सुगंध घरात दरवळे . क्षणभर मंदिरातील गाभाऱ्यात आहोत की काय असा भास होई . स्वच्छ्ता , सात्विकता यांनी वातावरण भारावलेले असे त्यामुळे यादरम्यान काका 
 " गुरुचरित्राचे पारायण "
करत असत .
पाचव्या माळेला आई , प्रभा काकू , मावशी , आमच्या काकू , उषा वहिनी , पिलू वहिनी , शांता वहिनी सगळ्या मिळून भावकी सोडून इतर पाच घरी जोगवा मागायला जायच्या . त्यात माई मावशीच्या मळ्यात , डोंगऱ्याची दोन घरे , विठू देशपांडे , देशपांडे वहिनी , महाजन वहिनी अशी घरे ठरलेली असत . सकाळी साडेनऊला जाऊ असां ठरलेली निरोप रमा काकू , वरलीकडच्या उषा काकीना गेलेला असे . गावाबाहेर ओढ्याच्या वर गेलं की माई मावशींचा मळा होता मग सगळेच बरोबर त्यावेळेत त्यांच्या मळ्यात हजर व्हायचे . तिथे छाया ताई अंगणात मोठी सतरंजी टाकून वाट पाहत थांबलेली असायची . आम्ही मुली पण बायकांच्या मागेमागे जायचो तिथे खास आदरातिथ्य , आगत्य होत आसे . मळ्यात गच्च भरलेली चिरेबंदी विहीर त्या विहिरीचं पाणी घराजवळ असलेल्या पाटातून सगळ्या मळ्यात वाहत जात असे . मळ्यात देशी केळीची बाग , विड्याच्या पानाचा मळा , विविध रंगी फुलझाडे होती . खास करून पिवळ्या धम्मक फुटण्याच्या फुलांनी झाड बहरलेले असे . 
एकमेकींना बसण्याचा आग्रह होई मग देवीची जोगव्याची गाणी म्हणली जायची आणि आवडीचा कार्यक्रम म्हणजे चढाओढीत उखाणे घ्यायचे . गप्पागोष्टी , हास्य कल्लोळ होत असे . छोटीशी पण चविष्ट अशी देशी केळी , दूध  सगळ्यांना दिले जायचे
दोन तास कसे जायचे समजत नसे . येताना मग बायका नवरात्रात ब्लाऊज , बांगड्या नवीन घालायचं म्हणून हसन पाठणाकडे महिन्यापूर्वी टाकलेलं ब्लाऊज 
" झालं का बाबा " 
म्हणत डोकावायच्या तर हमखास ते झालेले नसे " आज दुपारी नक्की पाठवतो "
असे तो सांगे 
" आज नाही दिलेस तर पुन्हा तुझ्याकडे टाकणार नाही बघ " 
असा नेहमीप्रमाणे लटकेच रागवून बायका निघायच्या .
पुढे वाड्यालगत असलेल्या मणेऱ्याच्या गल्लीत मालन , प्यारन शहाजानची बायको अशा ठरलेल्या बांगडेवाल्याकडे सगळ्याजणी बांगड्या भरत असत . असा तो त्या दिवसाचा सकाळचा सोहळाच असे .
जोगव्यात भाजणीची मिक्स पिठे येत आसत मग त्या मिक्स झालेल्या पिठात ताक घालून आई त्याची थालीपीठ करत असे ती फार खमंग लागायची . सात दिवस झाले की अष्टमीला कडकण्या करायच्या , जवळचे देवीचे ठाणे म्हणून अष्टमीला बनाळीच्या देवीला  कडकण्याचा नैवेद्य , खणा-नारळाची ओटी घेऊन जायचं . यासाठी उषा वहिनी , शांता वहिनी , पिलू वहिनी हमखास निघत मग त्यांच्याबरोबर आम्ही मुली निघायचो आई क्वचित यायची . सकाळी सातला बनाळीला जायला जत-घेरडी गाडी असायची पहाटे उठून सगळ आवरून आम्ही निघायचो . खरं तर बनाळी हे आईच आजोळ त्यामुळे तिथे गेलो की पहिल्यांदा आम्ही आईचे मामा म्हणजे शंकर मामांकडे जायचो अष्टमीदिवाशी त्यांचं घर पाहुण्यांनी गच्च भरलेलं असे . घरी थोडा वेळ थांबून आम्ही सगळे बनात जायचो , तिथे देवीची यात्रा भरलेली असे . बनात चिरेबंदी दगडाचे देवीचे मंदिर आहे . त्या परिसरात दोन तीन मोठाल्या चिरेबंदी विहिरी आहेत त्यावर रहाट बसवलेले आहेत विहिरीत कासव आणि मासे असल्यामुळे पिण्यायोग्य स्वच्छ पाणी असे . उन्हाळ्यात गावातील सगळ्या विहिरी कोरड्या पडत पण बनातल्या बारवेचं पणी कधी आटत नसे . रहाट फिरताना विशिष्ट लयीत येणारा आवाज ,  विविध प्रकारची फळा फुलांची झाडे , मोर , विविध रंगी पक्षी असा खूप निसर्गरम्य परिसर आहे तो . बनात केवड्याची पण झाडे आहेत . केवड्याच्या झाडाखाली नाग असतो म्हणून तिकडे सहसा कोणाला फिरकू देत नसत . पण केवड्याची पिवळी धम्मक कणसे मात्र तिथे मिळत आसत . आख्ख कणीस विकत घेऊन त्याची पाने घरोघरी बायकांना दिली जायची . बायका पण त्याची विशिष्ठ प्रकारे घडी घालून पिनेतूने वेणीत किंवा अंबड्यावर घालत असत . खूप गर्दीतून सगळ्यांनी एकत्र राहून देवीचे दर्शन घेऊन परत गाडीच्या वेळेपर्यंत शंकर मामांच्या घरी थांबायचो . देवीला आलेले भरपूर पाहुणे घरी येतात म्हणून मामींनी मोठ्या पातेल्यात भगर , आमटी ,खिचडी केलेली असे . प्रत्येकाने आपल्याबरोबर फराळाचं काहीतरी , फळे आणलेली असायची . लीला मावशी , सुमा मावशी , सुंता मामी आलेल्या सगळ्यांना केळीच्या पानावर फराळ वाढायच्या . हरी मामा , विद्या मामी ,  मुरला मामा , शामा मामी  पुण्याहून आलेले असत . डिकसळ , बनाळी आणि घेरडी या तीन गावात सगळे एकमेकांचे नातेवाईकच होते जवळजवळ सगळ्यांच्या त्याठिकाणी गाठीभेटी होत असत मग भरभरून गप्पांना उधाण येतं असे .  प्रत्येकाने बरोबर काहीतरी फराळाचं आणलेलं असे केळी , रताळी बाकी फळांनी टोपली भरलेली असे . पका मामाचे निर्जळी उपवास असत . शेवटचे तीन दिवस तो फक्त नारळाचे दूध घेत असे . पाच वाजले की सगळे परत घेरडीला यायला निघायचे सकाळचीच गाडी पुन्हा मुक्कामाला घेरडीला येत असे त्यांनी आम्ही परत यायचो . येईस्तोवर संध्याकाळ होई .
दुसरे दिवशी नवमी किंवा दासरा असायचा .
" दसरा सण मोठा नाही आनंदा तोटा "
या उक्तीप्रमाणे आमच्या गावचा दसरा होत असे . वाड्यात आमच्या घरासमोरच्या आंगणात मधल्या मोठ्या आंगणातून दोन पायऱ्या वर चढून यावं लागे . आमच्या पाचही घरांचा हा दसऱ्याचा संध्याकाळचा कार्यक्रम एकत्र होत असे . मग आमच्या आंगणाचा स्टेज सारखा उपयोग केला जाई . काका चार वाजताच आंगणात आधी चवाळ त्यावर घोंगडी मग मोठी सतरंजी त्यावर लांबट दोन गाद्या अंथरुन पाच तक्के मागे भिंतीला लाऊन बैठक तयार करून ठेवायचे . आंधार पडला की आंगाणात उजेड दिसायला पाहिजे म्हणून दोनशेचा बल्ब लावायचे वाड्यात सगळ्यांची एकत्र खरेदी केली जायची . मग विड्याच्या पानाची आख्खी करंडी , किलोभर सुपाऱ्या , आकरा नारळ , भिजवलेली हरभऱ्याची  डाळ , हे सगळं तयार करुन ठेवलेलं असायचं . वस्तीवरच्या लोकांना लागते म्हणून दोनचार तंबाखूच्या पुड्या , एखादे बिडीचे पुडके , काडेपेटी , अडकित्ता , सुपारी हे एका ताटात घालून ठेवलेलं असायचं .
     दसऱ्यादिवशी घेरडीत दुपारी दोन वाजल्यापासूनच आसपासच्या वस्त्यावरुन मानाचे ढोल यायला सुरुवात व्हायची . बिरोबाची पालखी असायची प्रत्येक ढोलाबरोबर लेझीम किंवा रुमाल हातात असलेल्या  वीस-पंचवीस लोकांच पथक असायचं अंगात शर्ट विजार किंवा धोतर डोक्याला टोपी किंवा बहुतेक गुलाबी रंगाचे पागोटे हातात मोठे गमशे असा पेहराव या लोकांचा असे . यात रंगा माळी आणि बुरंगेच्या ढोलाची चढाओढ असे  जवळजवळ पाच वाजेपर्यंत शाळेजवळच्या चौकात पाळीपाळीने प्रत्येक पथकाचा ढोलाच्या तालावर लेझीमवर गोलाकार नाच व्हायचा .
पंधरा दिवस आधी प्रत्येक पथकाची प्रॅक्टीस सुरु झालेली असायची . पहायला तुंबळ गर्दी व्हायची बहुतांश पुरुष असायचे आम्ही छोट्या मुली पहायला जायचो . आणि पाच वाजता  सिमोल्लंघनासाठी एकामागून एक ढोल  निघायचे त्यांच्या पाठोपाठ गावकरी निघत असत . मारुतीला जाऊन पुढे ओढ्याच्या वर ते ठिकाण होतं . त्याला गावातून घराघरातून पुरुष मंडळी घटातलं उगवलेलं धान्य टोपीत खोचून आपट्याची फांदी हातात घेऊन सामिल व्हायचे .
घरी आईचा पण 
उत्साह भारी असायचा . दुपारी जेवायला पुरणा वरणाचा स्वयंपाक करुन सगळ आवरुन पुन्हा चार वाजताच  आवरायला घ्यायची . मोठ्या निळ्या पेटीत सुती कपड्यात गुंडाळून ठेवलेली खास काठपदर असलेली जरीची साडी ती नेसाण्यासाठी काढे . त्यात मधेच कधीतरी केवड्याचं पान ठेवलेलं असे ते वाळलं तरी पण साडीला कसा वास येतो म्हणत घडी उकलून स्वतः हुंगुन पही मग आम्हीपण 
" मला मला "
करत तीच्या भोवती जाऊन वास घ्यायचो .  नीटनेटकं आवरुन  नऊवार साडी छान काठ काढून ती नेसत असे मग पितळेच्या डबीत कापसात गुंडाळून ठेवलेले दागिने काढून गळ्यात अष्टपैलू मण्याचं मंगळसुत्र , टपोऱ्या मण्याची एकदाणी , श्रीमंत हार , पाटल्या , बिलवर , नाकात नथ आणि लांबट डाळींबी खडा व त्याच्या भोवती सोन्याचे बारीक बुंदके असलेली आंगठी घालून आंबाडा वर गजरा असं तिच सोज्वळ रुप नटून थटून तयार होत असे .  काकांचा पण दसऱ्यादिवशीचा ठरलेला पोशाख असे पांढरंशुभ्र ब्रासलेटचं धोतर वर भट्टीचा कडक पांढरा शर्ट व डोक्यावर टोक काढून टोपी . आणि बोटात डाळींबी रंगाचा ठसठशीत गोल खडा आसलेली आंगठी असा त्यांचा रुबाब असे .  मग आवरुन सगळे सिमोल्लंघनाला निघत .
वाड्यातील प्रत्येकाचा रुबाब वेगळाच असे सगळ्यात जेष्ठ पण एकदम तुडतुडीत शरीरयष्टी असलेले पंत काका शुभ्र धोतर-शर्ट काळी टोपी घालून पाठीमागे हात बांधून दोन बोटात पेटलेली बिडी असे मग मधूनच त्याचा झुरका घेत वाड्यात नरसोबाच्या दारापासून ते मोठ्या दारापर्यंत वडिलकीच्या नात्याने सगळी तयारी नीट झाली न असे पाहत चार वाजल्यापासून हेलपाटे घालायचे . त्यांच्याकडे सगळेजण आदरयुक्त भीतीने पाहत असत . मोहन अण्णा , रमेश अण्णा , नंदू इस्त्रीचे पँट शर्ट तर राजा भाऊ दादा विजार शर्ट घालून तयार होत असे . सगळ्यात शेवटी पाच नंतर मस्त झोप काढून फक्कड काका त्यांच्या पाठोपाठ सुधीर बाहेर यायचे . सुनील , सचिन , पंपु , बबलू , छाबलू , सख्याहरी ही मुलं पण पळापळी करायची . पण प्रत्येकाच्या कपाळावर कुंकवाचा नाम, डोक्यावर टोपी आणि त्यात देवापुढे उगवलेल्या धान्याचा तुरा आणि हातात आपट्याच पेंडक मात्र असायचं . आम्ही मुली नवीन कपडे घालून तयार व्हायचो कुणाला लहर आली तर उगाच साडी नेसायची सगळं आवरुन सावरुन आम्हा मुलांची पळापळी सुरू असे . तिकडे आपट्याची आणि सौंदडाच्या झाडाची पूजा व्हायची त्यासाठी डोंगरे दादा , पोलीस पाटील , तलाठी , ग्रामसेवक अशा लोकांचां मान असायचा . बऱ्याचदा काका घेरडीत ग्रामसेवक असायचे तेव्हा ते तीन वाजताच तयार होऊन बाहेर जायचे .
सीमोल्लंघन करुन सगळे पुरुष आले की कोणीतरी एखादी काकू वाड्याच्या दरवाजातच भाताची मूद त्यावर गुलाल घालून ओवाळून टाके , दरात आलं की प्रत्येकाच्या पायावर पाणी घातले जाई जस काही युद्ध जिंकून आले असे वातावरण तयार होई . मग घरात आलं का प्रत्येकीने औक्षण करायचं कडकण्या खायला द्यायच्या . सगळे एकमेकांच्या घरी जाऊन सोनं देऊन किंवा घेऊन आंगाणात टाकलेल्या बैठकीवर येऊन बसत . आपापल्या पायरीवर बायका बसत . आम्ही लहान मुलं वाडाभर फिरायचो . 
  मग तिकडून येताना ढोल ठरलेल्या क्रमाने गावात कुलकर्णी वाडा , डोंगरे वाडा , सोनार वाडा,  दिवाण वाडा अशा बऱ्याच मानाच्या ठिकाणी जायचे . वाड्यात ढोल आले की मधल्या आंगणात त्यांचा खेळ रंगे . रंगा माळ्याच्या पथकामध्ये वाड्यातील अगदी मोहन आण्णापासून छोट्या मुलापर्यंत सगळे सामील व्हायचे या ढोलाबरोबर डोंगऱ्याचा सुरेश आवर्जून येत असे आणि मग तो नाच जो रंगे त्याला तोड नसे .
" आडीपांग डीप्पांग "
अशा ढोलाच्या तालावर गोलाकार उभे राहिलेले लोक डावा पाय जागेवर नाचवत उजवा पाय एकदा मागे एकदा पुढे करत नाच सुरु होई मधूनच उलटी सुलटी गिरकी घ्यायची , मधूनच जोर काढायचा असे करताना प्रत्येकाच्या  हातात असलेल्या पितळी झांजेचा , लेझिमचा आवाज कमीकमी करत न्यायचा आणि पुन्हा एकदम आवाज वाढवत तालाची लय वाढवत न्यायचा आणि त्याच कैफेत रंगा माळ्याने उड्या मारत जो नाच केलेला असे त्याला तोड नसे . कमरेला बांधून हातात गमशे घेऊन तालात त्यांचा रंगलेला सोहळा पाहून क्षणभर गोकुळात कृष्ण सवंगड्याबरोबर दंग झाला की काय असे दृश्य दिसे . खेळून झालं की प्रत्येकाने बैठकीवर यायचे सगळ्या काकांना सोनं द्यायचं त्यांना सगळ्यांना पानसुपारी द्यायची , मानकऱ्याना नारळ द्यायचा आणि उभे राहून प्रत्येकाच्या गळाभेटी व्हायच्या अगदी नयनरम्य सोहळा असे तो . थोड्या गप्पा गोष्टी होतात तोवर दुसरा ढोल वाजत गाजत वाड्याबाहेर आलेला असे . रात्री नऊ साडेनऊ वाजेपर्यंत हा उत्सव सुरु असायचा .
       ढोलवाल्याला नारळ बाकी सगळ्यांना पान सुपारी सोनं दिलं जायचं . बरेचशे लोक आईला पण सोन देऊन नमस्कार करुन जायचे . शेवटी सगळे आंगणात बसून गप्पा मारायचे . त्यावेळी वाड्यात देशपांडे सर राहायचे त्यांची मुलं सख्याहरी , उन्नती आणि भारती ही पण सामील व्हायची तर वाड्याबहेर एक नर्सबई राहत असत त्यांची मुलं पिंट्या , पाप्या आणि पिंकी ही वाड्यातलीच मेंबर असल्यासारखे वाटत असे . फक्कड काकांची बहिण ताई आत्या त्यांच सासर घेरडीच होत . त्यापण वाड्याशेजारी रहायच्या त्यापण आशावेळी वाड्यात येऊन बसत . आमच्या वाड्यात बरीच मुलं मुली असल्यामुळे डोंगऱ्याची मुलं-मुली  , अवी-रवी ,
आमच्या वाड्यात यायची आम्ही त्यांच्याकडे जायचो रात्री बराच उशीरपर्यंत हे चालायचे . लहानपणी  सणाचा उत्साह असा माणसांच्या गर्दीने आणि उत्साहाने बहरलेला असे त्याची ऊर्जा पुढे पंधरा पंधरा दिवस मनाला प्रफुल्लित ठेवत असे हे सगळं वैभव आम्हाला घेरडी गावाने दिले त्यामुळे आई-वडील यांच्याइतकेच त्या गावचे आमच्यावर ऋण आहे हे नक्की !!

सौ. सरिता अनिल कुलकर्णी 
मो . 9421607248
saritakulkarni67@gmail.com
बार्शी


घेरडीतील महाशिवरात्र


घेरडीचा महादेव पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे ! त्यामुळे महाशिवरात्र म्हणजे घेराडीत तसा मोठा सोहळाच असे . नेहामीकरता तिथला आठवडा बाजार सुद्धा त्यामुळेच सोमवारी असतो की काय कोण जाणे . महाशिरात्रीनिमित्त तयारी महिनाभर आगोदरच सुरु होत असे . ग्रामपंचायती कडून त्याची पूर्वतयारी केली जात असे . त्या महादेवाच्या कथा ऐकतच आम्ही घेरडीत लहानाचे मोठे झालो आहोत . त्यामुळे दरवर्षी महाशिवरात्र आली की मन फुलपाखराप्रमाणे घेरडीमध्ये जाऊन आठवणीच्या हिंदोळ्यावर झुलत राहते . 
कारण त्याची कथाही तशीच रंजक आहे ! घरातील मोठयाकडून , आत्याकडून , वाड्यातील सर्वाकडून ती बरेचदा ऐकली आहे . ज्यांना माहीत नाही त्यांना माहिती व्हावी म्हणून मी याठिकाणी ती लिहिण्याचा प्रयत्न करते आहे .
साधारणपणे 1958 च्या दरम्यान गावात एक घटना घडली . गावाच्या बाहेर ओढा होता , तो ओलांडून गेलं की चढ होता तिथे पतक्याचा मळा पुढे एकदीड किलोमीटर आंतरावर जनावरं टेकडीवर चरत आसायची . तिथे थोडा खोलगट भाग होता आणि त्या खड्ड्यात गोड पाण्याचा जिवंत झरा होता .गुरख्याचा तिथे पाणी पिण्याचा नित्यक्रम झाला होता . एक दिवस गुराख्यांने सहजच तो खड्डा खणायचा प्रयत्न केला तर त्याला पाषाणाचा घडवलेला भाग हाताला लागला . त्याला त्याचे कुतूहल वाटले म्हणून त्याने गावात येऊन ही घटना गावातील पाटील , कुलकर्णी , सोनार , डोंगरे यांच्या कानावर घातली . गावातील पंच मंडळी व प्रतिष्ठित लोक काय आहे पाहू तरी म्हणून पहायला गेले . गावकऱ्यांनी पण कुतूहलापोटी तो खड्डा आणखी खोदण्याचे काम सुरु केले तर काळाभोर घडीव पाषाण दिसू लागला मग गावकऱ्यांच्या विचार विनिमयाने अलगदपणे ते खोदकाम चालू ठेवले तर तिथे पाषाणाची भली मोठी महादेवाची घडीव पींड असल्याचे लक्षात आले . ती जागा मुस्लिम समाजाच्या मालकीची होती . घेरडीतील सर्व पाटील मुस्लिम आहेत पण पूर्वीपासूनच तिथं हिंदू-मुस्लिम एकोप्याने राहतात . मग ती पींड तिथून काढून दुसरीकडे त्याची प्रतिष्ठापना करायची असे ठरले त्याप्रमाणे काम सुरु झालं पाच फूट दक्षिणोत्तर कोरीव काम केलेला पींडीच्या बाहेरील भाग आणि मधे जवळजवळ एक फूट उंच आडवी गोलाकार पींड होती . कडेला जिवंत पाण्याचा झरा . ती पींड फक्त थोडी हलायची . कडेनी भरपूर खोदकाम करुन मोठ्या पहारी वापरुन पुर्ण मुर्ती काढण्याचा प्रयत्न केला जवळजवळ एकवीस दिवस ते प्रयत्न झाले पण पींड काही जागची हलेना मग ती पिंड स्वयंभू असल्याचे सर्वांचे म्हणणे येऊ लागले . शेवटी गावपंचायत बसली व आहे तिथेच ती पींड ठेवण्याचा निर्णय झाला फक्त जमिन मिळेपर्यंत मंदिर बांधायचे नाही असे ठरले . कारण पाठीमागे शंंभर मिटरवर पीरबाबाचा दर्गा होता . जर दोन्हीही उत्सव एकत्र आले तर गोंधळ होऊन नको त्या वादाला तोंड फुटू नये म्हणून हा निर्णय घेतला . बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि स्वयंभू पींड म्हणून भक्तिभावाने पंचक्रोशीतील लोक महादेवाच्या दर्शनाला येऊ लागले . त्यावर्षी शिवरात्रीला खूप मोठी यात्रा भरली व ती प्रथा आजतागायत आहे . आजही पींडीभोवती जिवंत पाणी आहे कधी आटत नाही . अनेक वर्षे टेकडीवर उघड्यावर महादेव होता आलिकडील काळात ती जमीन देवस्थानला मिळाली व मंदिर बांधले गेले आणि परिसर आधुनिक केला आहे . 
  या महादेव विषयी ऐकून कर्नाटकातील एक महाराज त्यावेळी घेरडीत आले व महादेवाची सेवा करण्यासाठी तिथेच राहिले . पूजा व परिसर स्वच्छ करण्याचे काम करु लागले . पाच घरी रोज भिक्षा मागायचे व जेवण करायचे . मंदिराजवळ एक खोपटी बांधून ते तिथेच राहू लागले . मंदिराच्या मागे विहिर होती त्यामुळे परिसरात त्यांनी बेल , झेंडू , गुलबक्षी , सदाफुली , गोकर्ण , चाफा , जाईजुई , फुटाणा अशी बरीच फुलझाडे लावली होती व स्वच्छता ठेवली होती . समोर एक वडाचे झाड होते त्यामुळे तो परिसर रम्य वाटायचा . घेरडीतील लोकांना फिरायला जाण्याची ती एक मस्त जागा झाली होती . उन्हाळ्याच्या सुट्टीत , कोणी पाहुणे आले तर , व्यायाम म्हणून संध्याकाळी महादेवाला जायचं एवढच काय नवीन लग्न झालेल्या जोडप्याला फिरायला जाण्यासाठी सुद्धा हे ठिकाण होते . त्यामुळे महादेव हा सगळ्यांसाठी आवडीचा विषय होता . कारण जाताना ओढा त्यातल्या दगडा दगडावर उड्या मारत पार करायचा . दुतर्फा महानंदाची झाडी होती सोनाराच्या मळ्यात बांधावर आंब्याची झाडे होती . पुर्वी वाहनांची वर्दळ नसे त्यामुळे रस्त्यावर मोर दिसायचे . महादेवाचे दर्शन झाले की पकडापकडीचे खेळ रंगायचे . कधी कधी तेल मेतकूट लावलेले चुरमुरे खायला न्यायचे अशी धमाल चालायची . सगळ्या वयोगटातील लोक असायचे तिथे .
    खेडेगाव असल्यामुळे घेरडीत मनोरंजनाचे फारसे काही कार्यक्रम नसायचे त्यामुळे यात्रा आली म्हणलं की गावात उत्साहाला उधाण यायचे . यात्रेत चारपाच दिवस सांगोल्याहून सिनेमाच्या टॉकिज यायच्या आसपासच्या गावातून विशेषतः जवळ्यामधून किराणा , कपडा , जनरल स्टोअर्स , बांगड्यांची दुकाने , अशी विविध दुकाने , हॉटेल्स यायची . तेवढ्या काळात आठवडाभर धामधूम असायची . महाशिवरात्रीच्या आधीच्या रविवारी सगळी दुकाने आणि हॉटेल्स , सिनेमाचा तंबू महादेवाच्या टेकडीवर लागायचे . सोमवारचा बाजार गावात न भरता तिकडे भरत असे गावातली पण दुकाने तिकडेच लागत असत . त्यामुळे ओसाड टेकडी गजबजून जात असे . शाळा सुटली की आम्ही तडक तिकडे पळत सुटत असायचो . 
भाजीपाला , फळभाज्या विशेष म्हणजे मोठाली पांढरी आणि लाल रताळी पोत्यानी बाजारात यायची . 
" पाच महिन्याची रताळी "
आशी आरोळ्या ठोकत विक्री चालायची . उन्हाळी कामाची सुरुवात उकडलेल्या रताळीच्या किसाने होत असे . वाड्यात पोत्यानी रतळाची खरेदी होत असे . महाशिवरात्री दिवशी 
"रताळाची हंडी "
हा स्पेशल कार्यक्रम असे रामू कोळी सगळ्यांची रताळी गोळा करून नेत असे ती धुवून जुन्या डेऱ्यात घालायची डेरा गच्च भरला की वर ओल फडके टाकायचं आणि त्यावर गच्च बसेल असे ताट ठेऊन पेटविलेल्या शेकोटीत तो डेरा पालथा घालायचा वरून पुन्हा जाळ घालायचा आणि पहाटेच ती शेकोटी लावली जायची बराच वेळ त्या आरावर ती रताळाची हंडी उकडायची . थोड थंड झाल्यावर भागाबाई आणि रामू कोळी दोघे नवरा बायको ती हंडी काढून सगळ्या वाड्यात घरोघरी रताळाचे ताट पोहोच करायचे . ती उकडलेली रताळी नुसती सोलून खायला , दूध गुळात किंवा ताक मीठ साखर घालून कुस्करून खायला जी मजा यायची ती चव आजपर्यंत कुठेच मिळू शकली नाही .
महाशिवरात्रीच्या दिवशी वातावरण सणासारखं होत असे . नुकतीच उन्हाळ्याला सुरुवात झालेली असे त्यामुळे आदले दिवशीच वाड्यात सगळ्या बायकांचे सकाळी 8 वाजता महादेवाला जायचे ठरलेले असे . आई , प्रभा काकू , उषा वहिनी , पिलू वहिनी , शांता वहिनी सगळ्या अगदी ठरवून बारीक बुंदके असलेल्या पांढऱ्या रंगाच्या साड्या त्यावर चिकनचे पांढरे ब्लाउज , पांढऱ्या फुलांचा गजरा घालून हातात पंचीपाळे , धोंडी अप्पांनी दिलेली पांढरी फुले आणि बेल घेऊन अंगणात येऊन एकमेकींना हाका मारत उभ्या असायच्या . आम्ही मुली पण त्यांच्या पाठोपाठ जाण्यासाठी तयार असायचो . बायका महादेवापर्यंत येईस्तोवर आम्हा मुलांचे पळतपळत दोन हेलपाटे तरी व्हायचेच . यात्रेत काय काय आले आणि गावातील कोण कोण बायका आपल्या आधी आल्यात हे धापा टाकत सांगायचे . सोनाराच्या बायका , रमा काकू , दिनकर काकू , अरविंद काकी , उषा काकी , डोंगऱ्याच्या वहिनी शिक्षक मंडळी , आसपासच्या वस्त्यांवर राहणारी मंडळी सगळे त्याठिकाणी जमलेले असत . त्याचवेळी 9 ची गाडी आली तर ती तिथे थांबत असे सांगोला , जवळा याठिकाणचे पुरुष बायका आलेले असत . तुंबळ गर्दी होत असे महादेवाची मूर्ती त्यादिवशी पिवळ्या पांढऱ्या फुलांनी अच्छादलेली असायची . अभिषेक , धूप , दीप , भजन कीर्तन यांनी परिसर दणाणून जाई . नयनरम्य सोहळा पाहून मान तृप्त होई . त्याठिकाणी जमलेले ओळखीचे लोक घोळक्या घोळक्याने गप्पा मारत बसायचे . एखादा उसाच्या रसाचा चरखा तिथे लागलेला असे . ऊन वाढू लागायचं , पळापळी करुन दमायला व्हायचं त्यात मग रस प्यायला मिळाला की परमोच्च आनंद होई . गारेगारच्या रंगीत कांड्या , गोळा बर्फ याचे गाडे लागलेले असत . पण आजारी पडता म्हणत गारेगार कधी खायला मिळायचा नाही . 
घरी आले की खिचडी , भगर , शेंगदाण्याची आमटी , शाबुदाण्याच्या पापड्या , खजूर , लाडू , ताक , दही वेगवेगळी फळे अशी फराळाची घरात रेलचेल असे . घरोघरी पाहुणे आलेले असत . बनाळी डीकसळ इथून अनेक जण आलेले असत . मग चहा पाणी , सरबत आणि गप्पा रंग भरत असे . थोड शांत झाले की आई शिवलीलामृत वाचत असे . आई महादेव भक्त होती , तिने सोळा सोमवारचे व्रत केले होते . त्यामुळे आम्ही काही गोष्टी लहानपणापासून तिच्याकडून ऐकून आहोत . सोमवारी तूप कढवायचे नाही , वाती वळायच्या नाहीत , आई सोमवारी भगर खात नसे . अशा बऱ्याच गोष्टी ती पाळायची . 
      त्याकाळात आम्हा मुलांना सिनेमाचे फार अप्रूप असे . यात्रेसाठी दोन तीन सिनेमा आणायचं ठरलेले असे यात प्रामुख्याने सुरेश डोंगरेचा पुढाकार असे त्याला रंगा माळी , गावचे पाटील म्हणजे छोटेपीर पाटील यांची साथ असे . शेलाटी अंगकाठी , गोरापान रंग , पांढरी दाढी आणि लुंगी नसलेले छोटेपीर हे गावातील अजब व्यक्तिमत्त्व होते . रजा मुराद सारखा त्यांचा आवाज होता . अशा सार्वजनीक कार्यक्रमात ते पुढे असत पेठेत ओरडले तरी लांबपर्यंत त्यांचा आवाज येत असे .त्यामुळे सिनेमा ज्यादिवशी असेल त्यादिवशी त्यांचा आवाज घुमत असे . एकदोन सिनेमे महादेवाच्या टेकडीवर होत असत रात्री आठ वाजता सुरू होणारा सिनेमा सुरू व्हायला दहा तर कधी आकरा वाजत मग सुटायला मध्यरात्र होत असे . त्यामुळे वाड्यातील सगळेजण मिळून जायचे त्यात सगळी जबाबदारी मोहन आण्णा आणि उषा वाहिनीवर असे . आई काका कधी येत नसत . जाताना पळापळी करत नेलेली मुले अर्धवट झोपेत परत आणायची ही वाहिनी लोकांना कसरत असायची . त्यातला एखादा राहिलेला सिनेमा यात्रा संपल्यावर गावात दाखवला जाई . तोही मारुतीच्या मंदिराला पडदा लावला जाई आणि बाजार भरत असे तिथे बसण्याची सोय ! बसायला आपलं आपलं पोत घेऊन लवकर जायचं आणि जागा पकडून ठेवायची . स्पिकरवर प्रत्येक अर्ध्या तासाने 
" दहा मिनिटात सिनेमा सुरू होईल " 
अशी घोषणा तीन चार वेळेस व्हायची . सिनेमाची पेटी नऊच्या हांगिरगे गाडीने यायची गाडी आली की कोण आनंद होत असे . कसतरी दहा वाजेपर्यंत सगळ लाऊन झाले की रीळ फिरवले जाई आणि चित्रे दिसायला सुरुवात झाली की लाईट जायची पुन्हा गोंधळ , शिट्ट्या , आरडा ओरडा होई लोक जागेवर उठून इकडे तिकडे करायचे सगळी धूळ उठायची . मग कसतरी आकरा वाजता सिनेमा सुरू होई . तो बघण्यात जी मजा केली तशी आता एसी थेटर मध्ये पण येत नाही .
हे सगळं होत असताना आमचे काका , फक्कड काका , रमेश आण्णा , राजाभाऊ दादा ही सगळी वाड्यातील मंडळी तर अंता काका , डोंगरे कंपनी , सोनार कंपनी , शिक्षक मंडळी , पाटील , मणेरी आसपासच्या वाड्या वास्यावरील मंडळी असा अख्खा गाव त्यात सामील होत असे त्यामुळे घेरडीतील महाशिवरात्र हा आमच्या गावचा सण असल्याप्रमाणे साजरा होत असे . त्याकाळी फार काही झगमगाट नसला तरी प्रेम , बंधुभाव , आदर , एकोपा या सगळ्या गुणांची शिदोरी त्या माझ्या छोट्याशा गावाने दिली याचा मला सार्थ अभिमान आहे .

सरिता कुलकर्णी 
बार्शी 
9421607248


घेरडीतील चैत्रागौर 


तसं दहावीनंतर शिक्षणाच्या निमित्ताने मला घेरडी सोडून चाळीस वर्षे होऊन गेली . पण घेरडीचे नाव निघाले की मन एकदम प्रफुल्लीत होते आणि फुलपाखराप्रमाणे विहार करते . घेरडीतील प्रत्येक सणाच्या , प्रत्येक प्रसंगाच्या आठवणींनी मन आगदी तुडुंब भरलेलं आहे . मग  तो दसरा असो की दिवाळी किंवा श्रावण असो की महाशिवरात्र घेरडी सारख्या सणाच्या  आठवणी कुठेच नसतील असं माझं भाबडे मन म्हणते .
आत्ता चैत्र महिना सुरु झाला आणि कुठे कुठे होणारे हळदीकुंकू ,  देखावे प्रत्यक्ष आणि व्हॉट्सॲप मुळे तर अगदी हातातच पाहायला मिळतात . असाच आज प्रत्येक पौर्णिमेची महती सांगणारा देखावा मायडीने पाठवला . दोन दिवस सुट्टीमुळे मी पुण्याला निघाले होते , ट्रेनमध्ये सहज मोबाईल चाळत असताना मी तो पहिला आणि मी एकदम भूतकाळात गेले . चैत्रागौर म्हणलं की अनेक आठवणींनी माझ्याभोवती फेर धरला . चित्रपट सरकावा त्याप्रमाणे ते दिवस माझ्या डोळ्यासमोर तरळून गेले . मला पुण्याला पोहोचायला चार तास लागणार होते म्हणलं चला आपण त्या आठवणी प्रवासात जाता येता लिहूनच काढाव्या आणि लगेच मी लिहायला सुरुवात केली .
घेरडीमध्ये कोणताही सण आला की त्याची सार्वजनिक चर्चा वाड्यात मधल्या अंगणात सायंकाळी पाच वाजता सगळ्या बसल्या की ठरलेली असे . चार दिवसावर पाडवा आला की लगबग सुरु होई . आता पहिल्या तिजेला गौर बसवायची आणि पुढे तिचं मोठं हळदी कुंकू करायचे हा प्रघातच होता . त्याची पूर्वतयारी म्हणजे पाडव्यापूर्वीच घराची स्वच्छता केली जायची . गौरीचा  लाकडी साचा वर्षभर घरात खणाला लोखंडी कडीला सुतळीने बांधून टांगलेला असे तो साचा पाडवा झाला की खाली काढून घेतला जाई . मग पहिल्या तिजेला आईचं स्वतःच आणि मुलींचे पण न्हाऊन माखून होई मग तेवढ्याच प्रेमाने जणू माहेरवाशीण असल्याप्रमाणे त्या लाकडी साचाला आई तेल लाऊन कोमट पाण्याने धूत असे . देवाची पूजा झाली की त्याच्या शेजारी छोट्या पाटावर ती गौर खण पांघरुन बसवली जाई . तिला कुंकू लाऊन गळ्यात साखरेच्या गाठीचा हार , मंगळसूत्र , गेज वस्त्र , सुवासिक फुलांचा गजरा असा साज करुन तिचे रुपडे सजवून तिची प्रतिष्ठापना केली जाई . तिला नैवेद्याला वळवटाची खीर आणि मुरडीचा कानोला केला जाई त्याचबरोबर कैरीचे पन्हे आणि कैरीची डाळ असे . त्यामुळे दुपारच्या जेवणाचा बेत फक्कड होत असे , नुकत्याच आमच्या परीक्षा संपलेल्या असत आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरु झालेल्या असायच्या . कधी कधी आक्की , तायडी त्यांची छोटी छोटी बाळं घेऊन आलेल्या असायच्या .  थोडी विश्रांती झाली की दुपारी दोन अडीच नंतर आम्ही वाड्यातील सगळ्या मुली मी , मायडी , ज्योती , विद्या , कुंदा , हरणी , चिमी , बाळी , मिनी , स्वाती अशा सगळ्या बहिणी भाच्या वाड्यात एकत्र जमायचो आणि एक मोठ्ठा कार्यक्रम असायचा तो म्हणजे शेतं लावण्याचा ! 
 त्याकाळी गौरीच्या देखाव्यात खरीखुरी शेतं ठेवण्याची पद्धत होती . त्यासाठी पंधरा दिवस आधी दोन समान आकाराचे खोलगट कुंडे किंवा थाळ्या त्यात उन्हात रापलेली काळी माती पसरून एकात शक्यतो जोडगव्हाच्या खपल्या टोचल्या जायच्या आणि दुसऱ्या भांड्यात कोणतेही धान्य असे ओळीने जवळजवळ टोचायचे आणि हलक्या हाताने पाणी घातले जाई . सकाळच्या वेळी त्याला ऊन मिळावे म्हणून अंगणात ठेवले जाई . वसंत ऋतू असल्यामुळे तिसरे दिवशी त्याला धुमारे फुटलेले असत ते पाहून आगदी हरकायला होई . आम्ही सगळ्या मुली एकमेकींकडे जात 
" तुझं शेत केवढे आले माझे केवढे आले "
अशी चर्चा करत असायचो . साधारण पंधरा दिवस हा उद्योग चालायचा , धान्य थोडंसं मोठं झाले की आई तर तृप्त चेहऱ्याने , कौतुकाने त्या हिरव्याकंच शेताकडे पाहून म्हणायची 
" यावर्षी शेतात धान्य कसे येणार त्याचे हे प्रात्यक्षिक आहे बरं ".
कोणी गावाला जाणार असेल तर त्यांचे हळदीकुंकाचे नियोजन लवकर असे नाहीतर शक्यतो मधली तिज झाल्यावर तो घाट असे . चांगला दिवस पाहून त्यादिवशी ठरवले जाई . ती तयारी सुद्धा अगदी आठवडाभर चालायची . आई आवर्जून चाफा हरभरा आणायची आदले दिवशी मोठ्या पितळेच्या पातेल्यात आडशीरी हरभरे पाण्यात टाकायची सकाळी मागच्या दाराला ते उन्हात ठेवायचे दुपारी तीन वाजेपर्यंत हरभरे टम्म फुगायचे ते दूरडीत उपसून ठेवायचे . कैरीची डाळ करण्यासाठी सकाळीच हरभरा डाळ भिजत घातलेली असायची ती पण उपसून ठेवायची आणि इकडे गौरीला साडी नेसवण्याचा कार्यक्रम होई . समईला तो साचा बांधून काठापदाराची साडी नेसवली जायची मग मेण लाऊन नथ , मेण लाऊन कुंकू , गळ्यात कोल्हापुरी साज घालून गौर सजवली जाई . मग बाकी तयारी जसं समईत तेलवात करुन ठेवणे , अंगणात मोठा बल्ब सोडणे त्याचबरोबर हमखास वादळवारा सुटतो , अवकाळी पावसाचा सडाका येतो मग लाईट जातात म्हणत कंदील , चिमण्या पण स्वच्छ करुन , वाती काढून , रॉकेल भरुन ठेवल्या जायच्या !
आमची भावकीची घरे , बाकी नोकरीच्या निमित्ताने गावात असलेली शिक्षक मंडळी , बँकेचे लोक , सोनाराची चारपाच घरे असे जवळजवळ चाळीसएक बायका , मुली हळदी कुंकाला यायच्या . बरेचदा एका दिवशी अनेक ठिकाणी हळदीकुंकू असे .     गौरीईचे हळदीकुंकू म्हणजे छोटीशी दिवाळीच जणू !
रव्याचे लाडू , करंज्या , शंकरपाळ्या हे पदार्थ समोर ठेवण्यासाठी केले जायचे तर खायला तिखट काहीतरी बरोबर हवे म्हणून चिवडा , चकली , शेव पण केली जायची . 
      इकडे दुपारी दोन नंतर काकांच्या मदतीने आम्ही मुली सोप्यात खुंट्याना दोऱ्या बांधून त्यावर साड्या टाकून मखर तयार करण्याची सुरुवात करायचो . कमरेच्या उंचीचे धान्याचे पिप ठेऊन त्यावर पाट ठेऊन मुख्य आसन तयार होई समोर भली थोरली लोखंडी पेटी पुढे क्रमाने छोट्या पेट्या ठेऊन पायऱ्या करायच्या त्यावर छानशी शाल टाकायची आणि सुंदर मखर तयार होई . वाड्यात ज्यांच्या घरी त्यादिवशी हळदीकुंकू नसेल त्या मुली रांगोळी आणि सजावटीसाठी मदतीला असायच्या . आदले दिवशीच संध्याकाळी महादेवाला गेले की येताना सोनाराच्या मळ्यात मिळाल्या तर दोन तोतापुरी कैऱ्या किंवा पाच वाजता भाजीवालीकडून चोच असलेल्या दोन कैऱ्या आणायच्या त्याला थोडसं मेण लावून त्यावर कुंकू लावायचे ,  काजळाचे नाक डोळे काडीने काढायचे आणि काचेच्या ग्लासमध्ये गहू घालून त्यावर त्या पोपट म्हणून दोन्ही बाजूला ठेवायच्या , मोठ्ठे कलिंगड आणून ते कलात्मकतेने कापून दोन्ही बाजूला ठेवायचे . दोन्ही बाजूला स्टीलचे डबे ठेवून त्यावर आईने तिच्या लग्नात विणलेले  पांढरेशुभ्र वेलदोडा डिझाईनचे रुमाल टाकायचे त्यावर लाडू , करंजीच्या डिश ठेवायच्या . कपाटावर पेटीत कपड्यात बांधून ठेवलेली खेळणी समोर मांडण्यासाठी निघत . साधारण अशी तयारी घरोघर होत असे . पण हटके काहीतरी करण्याचा सगळ्यांचा प्रयत्न असायचा . मग कोणी परातीत पाणी घालून ते संथ झाले की त्यावर बुक्का चाळायचा आणि त्यावर पांढरी शुभ्र रांगोळी काढायची , तर कोणी छोटासा झोपाळा करुन त्यावर गौर बसवायचे , तर कोणी आंब्याचे फाटे लाऊन आमराईत गौर बसवायचे आशा वेगवेगळ्या कल्पना करुन सजावट केली जायची . 
खिरापतीसाठी कैरीची डाळ असे आईची डाळ पण फार खमंग असे . डाळ मोठसर वाटून त्याला थोडासा कैरीचा  कीस लावायचा चवीप्रमाणे मीठ , साखर ,  कोथिंबीर घालून तिची खास भरलेल्या मिरचीची हिंग , जिरे घालून चरचरीत फोडणी द्यायची .
सगळे आवरलं की कोपऱ्यात स्टूल ठेवायचा त्यावर पण कशिद्याने विणलेला रुमाल टाकून ताट ठेवायचे त्यात स्वच्छ पितळी पंचपाळे , चांदीची अत्तारदाणी , गुलाबदाणी , पान सुपारी तर ट्रेमध्ये कैरीची डाळ घालून पाने आणि स्टीलच्या पाटीत ओटीसाठी हरभरे भरुन ठेवलेले असत . सकाळीच कोळ्याच्या भागाबाई , लाह्यव्वा किंवा परटाची शांता यांच्याकडून घरोघरी हळदीकुंकवाची  आमंत्रणे जात असत . आईची चार वाजेपर्यंत सगळी मांडामांड व्हायची आणि स्वतःची आवर आवर करुन आई गौर मखरात आणून बसवायची समोर मंद समई लावायची मनोभावे पूजा , नैवेद्य करुन येणाऱ्या बायकांच्या स्वागताला ती पाच वाजता नटून थटून सज्ज असे .
सात्विकतेचा शृंगार ल्यायलेले ते दृश्य मनोहर भासे ! आम्ही मुली पण सागरवेणी , पाचपेडी वेणी किंवा काहीतरी केसांची फॅशन करायचो , मनात आले तर साडी नाहीतर ड्रेस घालून तयार व्हायचो . छाया ताई , सोनाराच्या मळ्यातल्या बायका , डोंगऱ्याच्या गीता वाहिनी शेतातून येत असत मग दिवसाबरोबर परत पोहोचले पाहिजे म्हणत त्या लवकर यायच्या आणि थोडस लांब राहणाऱ्या उषा काकी , दिनकर काकू , रमा काकू , अरविंद काकी साडेपाच सहापर्यंत यायच्या आणि बायकांचे आवाज आले की आवरून तयार असलेल्या वाड्यातल्या प्रभा काकू उषा वाहिनी , पिलू वाहिनी , शांता वाहिनी , पमा वाहिनी , वाड्याच्या आसपास असलेल्या ताई आत्या , नर्सबाई , सुमन वाहिनी , डोंगरे वाहिनी , वृषाली वाहिनी , देशपांडे वाहिनी , वाईकर वाहिनी , महाजन वाहिनी हजर होत आणि एकत्र  सगळ्याजणी जमत असत . अंगण आगदी उत्साहाने फुलून येई . निमित्त फक्त हळदी कुंकवाचे असायचे खरं तर ते एक स्नेहसंमेलन असायचे . वाडा गच्च भरायचा आळीपाळीने बायका सोप्यात येऊन हळदीकुंकू घेऊन पुन्हा अंगणात सतरंजीवर येऊन बसत . सगळ्यांच्या आनंदाला भरतं यायचं , चेष्टा मस्करी , निखळ हास्याचे फवारे उडत . आधी बसून गौर पहायची , देखाव्याचे निरीक्षण करत डाळ खायची मग देखाव्याचे , डाळीच्या चवीचे कौतुक करायचे आणि मग मोठ्ठा कार्यक्रम असायचा तो म्हणजे उखाणे घेणे . घेरडीच्या बायका भारी हुशार आणि हजरजबाबी  होत्या . त्यांचे उखाणे इतके विविधतेने नटलेले असत , काहीजणी शीघ्रकवी असल्याप्रमाणे तिथल्या तिथे तयार करून घेत तर काहींचे अलंकारिक असत , उखाणे घेण्याची जणू चढाओढ लागत असे . आम्ही मुली मग इकडून तिकडे करत मजा लुटत असायचो . एखादी माहेरवाशीण आलेली असे तर नवीन कोणाकडे गोड बातमी आहे ही बित्तंबात चर्चा ठरलेली असे . 
संध्याकाळी साडेसात वाजता सगळ्या बायका येऊन गेल्या की वाड्यातील सर्व पुरुषांना गौर पहायला बोलावले जाई मग पंत काका , फक्कड काका , मोहन अण्णा , राजाभाऊ दादा , रमेश अण्णा , सुरेश बापू या मोठ्या मंडळी बरोबर सुधीर , सुनील , पंपू , बबलू , छबलू ही मुलेही असत तसे तर दुपारपासून मुलांच्या येरझाऱ्या असायच्या . या सगळ्यांना कैरीची डाळ आणि हरभरे खायला दिले जायचे मग चहा किंवा सरबत होई . तोपर्यंत आई घरात सहा सात ताटे तयार करी प्रत्येक ताटात सगळं फराळाचे , कैरीची डाळ आणि भिजवलेले हरभरे त्याची उसळ करून ती पण घालून ते वाड्यात सर्व घरी , आसपास एकदोन ठिकाणी , भागाबाई आणि शांता यांना दिले जाई . ही देवाण घेवाण प्रत्येक घरून होत असे . त्यादरम्यान घरी रोजच खिरापत आणि भिजवलेले हरभरे येत असत मग तेल , मीठ घालून हरभरे परतून खाण्याचा आनंद आम्ही घेत असू .
माझं लग्न झाले मग त्यात खंड पडला . एकदोन वर्षांनी मनीष आठ महिन्यांचा झाला तेव्हा एप्रिल महिन्यात गुड फ्रायडे , महावीर जयंती , डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आशा मला लागून सुट्ट्या आल्या . आणि आम्ही अचानक घेरडीला जायचे ठरवले . त्याकाळी मोबाईल नव्हते आणि घरोघरी फोन पण नव्हते निरोपाची देवाण घेवाण पत्राद्वारे व्हायची . आम्ही अचानकपणे दुपारी घेरडीत टपकलो . काका बाहेरच भेटले ते मनिषला घेऊन भरभर पुढे गेले वाड्याच्या दरवाजात सगळी बच्चे कंपनी होती 
" शरू आत्या आली "
असा गोंधळ ऐकताच आई लगबगीने उठली लगेच भाकरी तुकडा घेऊन दारात हजर . आम्हाला पाहून आई काकांना इतका आनंद झाला मुख्य म्हणजे बाळाला पाहून आईचा आनंद गगनात मावेना . जोडून सुट्ट्या आल्या म्हणून आलात आता आलाच आहात चार दिवस राहाल तर आपण करु हळदीकुंकू असे आईने ठरवले . आणि आगदी उत्साहात , जोषात तिची तयारी सुरु झाली आणि नेहमीप्रमाणे उत्साह होता तो दुप्पट झाला . आनंदात ते हळदीकुंकू पार पडले . नोकरीमुळे माझे फारसे राहणे पडत नसे तर आईने सांगुनच टाकले  लागून आलेल्या सुट्टीत घेरडीला येत जावा मग आम्ही पण जायचो . आई काका घेरडीत असेपर्यंत जवळजवळ दरवर्षी आम्ही जायचो आणि आई हळदीकुंकू करायची .
आता देवीच्या निमित्ताने घेरडीला जाणे होते पुढची पिढी पण सगळे उत्सव आगदी जोशात साजरे करताना दिसतात . व्हॉट्सअँप ग्रुप आहे त्यात माधुरी , सारिका , अंता काकांच्या सूना , डोंगऱ्याच्या सूना , बाळू काकांच्या सूना , आणि बऱ्याचणी संक्रांत , वेळ अमावास्या , नवरात्र आणि बरेच उत्सव दिसतात ते पहिले की मन प्रसन्न होते एकप्रकारची ऊर्जा मिळते .

सौ. सरिता कुलकर्णी 
9421607248

 









Wednesday, June 15, 2022

रागांची माहिती परीक्षा 3

 रागांची माहिती

1) राग यमन

थाट कल्याण जाती षाडव - संपुर्ण 

वादी स्वर ग          संवादी स्वर नी

आरोहात प वर्ज्य   तीव्र म'

गायन वेळ रात्रीचा पाहिला प्रहर

आरोह :- नी़ रे ग म' ध नि सा

अवरोह :- सां नि ध प म' ग रे सा

पकड :- सा ऩि ध़ ऩि रे सा , ऩि रे ग रे ऩि ध़ ऩि रे सा , नी रे ग म' पssss , म' धssss प , म' ग रे सा


2) राग अल्हैया बिलावल


थाट बिलावल.         जाती षाडव - संपूर्ण

वादी स्वर ध.      संवादी स्वर ग

वर्ज्य स्वर रात्री आरोहात म वर्ज्य

कोमल निषाद वक्र रूपाने वापरला जातो 

हा जनक राग आहे

गायन वेळ दिवसाचा पाहिला प्रहर

आरोह :- सा रे ग प ध नी सां 

आवरोह :- सां नी ध प ध नी ध प म ग रे 
               ग प म ग रे रे सा





3) राग भैरव


थाट भैरव.      जाती - संपुर्ण संपुर्ण 

वादी स्वर रे.     संवादी ध

रे् ध्  कोमल    

गायन वेळ प्रातःकाळी

आरोह :- सा रे् ग म प ध् नी हा

अवरोह :- सां नी ध् प म ग रे् सा

पकड :- ग म ध् ध् प ग म रे् रे् सा 






4) राग भैरवी

थाट भैरवी.      जाती संपुर्ण संपुर्ण 

वादी स्वर ध्     संवादी ग् 

वर्ज्य स्वर नाहीत रे् ग् ध् नी् कोमल

गायन वेळ केव्हाही 

करुण रस प्रधान 

आरोह :- सा रे् ग् म पण ध् नी हा

अवरोह :- सां नी् रे्ंं सां नी् ध् प म प ध् प म ग्  रे् सा

पकड :- सां नी् रे्ंं सां नी् ध् प म प ध् प म ग् रे् सा





5) राग बिहाग


थाट बिलावल. जाती ओडव संपुर्ण 

वादी स्वर ग. संवादी स्वर नी

वर्ज्य स्वर आरोहात रे ध

गायन वेळ रात्री 9 ते 12

आरोह :- नी सा ग म प नी सां

आवरोह :- सां नी धप प म' ग म ग रे नी़ सा

पकड :- ग म प नी धप प म' ग म ग रे नी सा


6) राग पिलू


थाट काफी.    जाती संपुर्ण संपुर्ण 

वादी स्वर नी.  संवादी स्वर ग 

वर्ज्य स्वर नाहीत 

गायन वेळ दुपारी 1 ते 4

ग ध नी दोन्ही लागतात

आरोह :- नी सा ग रे सा  ग म ग रे सा 

आवरोह :- नी सा ग म प म ग् रे सा ध़ प़ ध़ सा़

पकड :- सा नी़ सा ग रे सा , नी सा ग म ग रे सा ,   ध़ प़ ध़ सा़




7) राग केदार


थाट कल्याण.         जाती ओडव षाडव

वादी स्वर म.           संवादी स्वर सा

वर्ज्य स्वर ग     म आणि नि दोन्ही लागतात

गायन वेळ 7 ते 10

आरोह :- सा म प म' ध नी ध प म' प म सा रे सा

आवरोह :- सां नी ध प म' प धप sss म सा रे सा

पकड :- सा म प , म' प ध नी ध प , म' प म ,                सा रे सा




8)  राग तिलक कमोद

थाट खमाज          जाती ओडव संपूर्ण

वादी स्वर सा.        संवादी स्वर प

वर्ज्य स्वर आरोहात ग आणि ध

गायन वेळ रात्री 9 ते 12

आरोह :- सा रे म प सां 

आवरोह :- सां प ध म ग रे सा रे ग सा

पकड :- सां प ध म ग रे सा रे ग सा















Sunday, June 12, 2022

रागांची माहिती प्रारंभिक

 

रागांची माहिती


1)  राग भूप 

थाट कल्याण   जाती ओडव - ओडव

वादी स्वर ग    संवादी स्वर ध   

वर्ज स्वर म आणि नी

गायन वेळ रात्रीचा पाहिला प्रहार

आरोह :-  सा रे ग प ध सां

अवरोह :- सां ध प ग रे सा

पकड :- ग रे प ग , ध प ग , सां ध प ग , रे ग , सा रे , ध़ सा 



2) राग दुर्गा 


थाट बिलावल       जाती ओडव - ओडव

वादी स्वर ध         संवादी स्वर रे

वर्ज्य स्वर ग आणि नी

गायन वेळ रात्रीचा दुसरा प्रहार

आरोह :- सा रे म प ध सां

आवरोह :- सां ध प म रे सा 

पकड :- रे ध़ सा , म रे प , म प ध sss म रे , 
            रे ध़ सा 
            म रे प , म प , ध प , म रे , ध़ सा 


3) राग सारंग



थाट काफी.       जाती ओडव - ओडव

वादी स्वर रे       संवादी प

वर्ज्य स्वर  ग ध

विकृत स्वर अवरोहत निषाद कोमल

गायन वेळ :- दिवसाचा दुसरा प्रहर

आरोह :-  ऩि सा रे म प नी सां

अवरोह : - सां नी् प म रे सा 

पकड :- ऩि सा रे , म रे , रे म प , म नि् प ,
            प नि् प म रे , म रे , ऩि सा .


4) राग भीमपलास


थाट काफी        जाती ओडव - संपुर्ण

वादी स्वर म     संवादी स्वर सा 

कोमल स्वर नी् आणि ग्

वर्ज्य स्वर आरोहत रे ध

गायन वेळ दिवसाचा तिसरा प्रहार

पकड :-  ऩि् सा ग् रे सा , ऩि् सा ग् म ग् रे सा , 

 ऩि् सा ग् म प नि् नि् ध प , प म ग् रे सा



5)  राग काफी


थाट काफी        जाती संपुर्ण - संपुर्ण

वर्ज्य स्वर नाहीत

वादी स्वर प       संवादी स्वर सा

कोमल स्वर ग् आणि नी्

गायन वेळ केव्हाही

आरोह :- सा रे ग् म प ध नी् सा

आवरोह :- सा नी् ध प म ग् रे सा

पकड :- सा रे रे , ग् ग् , म म प sss , म प ध प

         म ग् रे सा



6) राग देस


थाट खमाज         जाती ओडव - संपुर्ण

वादी स्वर प.      संवादी स्वर नी

आरोहात शुद्ध नी तर अवरोहात कोमल नी 

वर्ज्य स्वर अरोहात ग आणि ध

गायन वेळ

आरोह :- नि सा रे म प नी सा

आवरोह :- सां नी् ध प ध म ग रे ग नि़ सा

पकड :-  रे म प , म प ध म ग रे , रे म ग रे , 
            ग नि सा



7) राग बागेश्री


थाट काफी.         जाती ओडव - संपूर्ण

वादी स्वर म      संवादी स्वर सा

वर्ज्य स्वर आरोहात रे आणि प

कोमल स्वर ग्

गायन वेळ रात्रीचा दुसरा प्रहर ( 10 ते 1 )

आरोह :- नि् सा ग् म ध नि सा 

आवरोह :- सां नि् ध , मपधम ग् रे सा

पकड :- ध़ नि् सा ग् रे सा , सा ग् म , ग् म ध नि ध , मपधमग् रे सा


8) राग खमाज


थाट खमाज.        जाती षाडव संपूर्ण

वादी स्वर ग.       संवादी स्वर नी

वर्ज्य स्वर आरोहात रे वर्ज्य

या रागाला दोन निषाद लागतात 

गायनाची वेळ रात्री 9 ते 12

आरोह :- सा ग म प ध नी सां 

आवरोह :- सां नी ध प म ग रे सा

पकड :- ग म प ध नी ध प ध ग म ग


 

9) राग यमन



थाट कल्याण    जाती षाडव - संपुर्ण 

वादी स्वर ग   संवादी स्वर नी

आरोहात प वर्ज्य    तीव्र म' वापरतात 

गायन वेळ रात्रीचा पाहिला प्रहर

आरोह :- नी़ रे ग म' ध नि सा

अवरोह :- सां नि ध प म' ग रे सा

पकड :- सा ऩि ध़ ऩि रे सा , ऩि रे ग रे ऩि ध़ ऩि रे सा , नी रे ग म' पssss , म' धssss प , म' ग रे सा


10) राग अल्हैया बिलावल



थाट बिलावल. जाती षाडव - संपूर्ण

वादी स्वर ध. संवादी स्वर ग

वर्ज्य स्वर रात्री आरोहात म वर्ज्य

कोमल निषाद वक्र रूपाने वापरला जातो 

हा जनक राग आहे

गायन वेळ दिवसाचा पाहिला प्रहर

आरोह :- सा रे ग प ध नी सां 

आवरोह :- सां नी ध प ध नी ध प म ग रे 
               ग प म ग रे रे सा





11) राग भैरव



थाट भैरव. जाती - संपुर्ण संपुर्ण 

वादी स्वर रे. संवादी ध

रे् ध् कोमल    

गायन वेळ प्रातःकाळी

आरोह :- सा रे् ग म प ध् नी हा

अवरोह :- सां नी ध् प म ग रे् सा

पकड :- ग म ध् ध् प ग म रे् रे् सा 




12) राग भैरवी



थाट भैरवी. जाती संपुर्ण संपुर्ण 

वादी स्वर ध् संवादी ग् 

वर्ज्य स्वर नाहीत रे् ग् ध् नी् कोमल

गायन वेळ केव्हाही 

करुण रस प्रधान 

आरोह :- सा रे् ग् म पण ध् नी हा

अवरोह :- सां नी् रे्ंं सां नी् ध् प म प ध् प म ग् रे् सा

पकड :- सां नी् रे्ंं सां नी् ध् प म प ध् प म ग् रे् सा





13) राग बिहाग


थाट बिलावल. जाती ओडव संपुर्ण 

वादी स्वर ग. संवादी स्वर नी

वर्ज्य स्वर आरोहात रे ध

गायन वेळ रात्री 9 ते 12

आरोह :- नी सा ग म प नी सां

आवरोह :- सां नी धप प म' ग म ग रे नी़ सा

पकड :- ग म प नी धप प म' ग म ग रे नी सा



14) राग पिलू


थाट काफी. जाती संपुर्ण संपुर्ण 

वादी स्वर नी. संवादी स्वर ग 

वर्ज्य स्वर नाहीत 

गायन वेळ दुपारी 1 ते 4

ग ध नी दोन्ही लागतात

आरोह :- नी सा ग रे सा ग म ग रे सा 

आवरोह :- नी सा ग म प म ग् रे सा ध़ प़ ध़ सा़

पकड :- सा नी़ सा ग रे सा , नी सा ग म ग रे सा , ध़ प़ ध़ सा़



15) राग केदार



थाट कल्याण. जाती ओडव षाडव

वादी स्वर म. संवादी स्वर सा

वर्ज्य स्वर ग म आणि नि दोन्ही लागतात

गायन वेळ 7 ते 10

आरोह :- सा म प म' ध नी ध प म' प म सा रे सा

आवरोह :- सां नी ध प म' प धप sss म सा रे सा

पकड :- सा म प , म' प ध नी ध प , म' प म , सा रे सा



16) राग तिलक कमोद



थाट खमाज जाती ओडव संपूर्ण

वादी स्वर सा. संवादी स्वर प

वर्ज्य स्वर आरोहात ग आणि ध

गायन वेळ रात्री 9 ते 12

आरोह :- सा रे म प सां 

आवरोह :- सां प ध म ग रे सा रे ग सा

पकड :- सां प ध म ग रे सा रे ग सा


17)राग आसावरी

थाट असावरी  जाती ओडव संपुर्ण 

वादी स्वर ध   संवादी स्वर ग 

वर्ज्य स्वर आरोहात ग नी 

कोमल स्वर ग् ध् नी् 

गायन वेळ        प्रहर 

आरोह :- सा रे म प ध् सा

अवरोह :- सां नी् ध् प म प ध् म प ग् रे सा 

पकड :-  1 ) रे म प नी् ध् प
2) रेमप , ध् सां , नी् ध् प , मपध् मप , ग् रे सा 





























Sunday, May 8, 2022

मनोरंजन

 उखाणे  

1)

कांडून कुटून केली पंचमी 

सण आला पोळा

पोळ्याची वाटते डाळ 

तोवर आली घटाची माळ

शिलंगणाच सोन

अन दिवाळीनं केलं येणं

दिवाळीची लावते पणती

तोवर संक्रांत आली बाई नेमकी

संक्रांतीचं सुगड

आणि पूनव आली दुगड

पूनवेला केले वड्यान पाट

तेवढ्यात शिमगा आला गजानघाट

शिमग्याला केली खीर

अन रंगपंचमीन दिला धीर

रंगपंचमीचा लावते रंग 

तेवढ्यात पाडवा आला जबर दंग

पडव्याची उभारते गुढी

तोवर अक्षय तृतयेने मारली उडी

अक्षय तृतीयेचा तोरा

........रावांच नाव घेते कारवणी पर्यंत जरा दम धरा 



2)

झुण झुण जाते खिडकीतून पाहते

खिडकीला तीन तारा

अडकित्त्याला घुंगर बारा

तिकडून आला व्यापारी

त्याने दिली सुपारी

सुपारी देते वण्याला

हंडा आणते पाण्याला

पाणी आणते गंगेचं

वाडा बांधते भिंगाचा 

वाड्यात वाडा सात खोल्या

मधल्या खोलीत कॉट

कॉटवर गादी

गादीवर उशी

उशीवर बशी 

बशीत घड्याळ

घड्याळात वाजला एक

..... नाव घेते..... लेक

वाजले दोन 

..... आला फोन

वाजले आठ

.... नाव घेते आज आहे.... थाट

बशीत ओल्या नारळाचे सारण.... नावाला ....कारण



3)

वसंताची लागता चाहूल 

गुढी उभी केली तोच

चैत्रागौर धावत आली 

दारी सजल चैत्रांगण

गौराईचं डाळ पन्हं

तोच झाले अक्षय तृतीयेचा येणे 

वैशाख वणव्यात दरवळला सुगंध मोगऱ्याचा 

हलकेच मनाला थंडाऊन गेला

गंध रोहिण्यातील मातीचा

लागता चाहूल मृगाची 

धरणीमाय अंकुरली

श्रावण सरीत चिंब होऊनी

सृष्टी सारी बहरली 

झिम्मा , फुगडी मंगळागौर 

नाचगाण्याना आला पूर

गणेशाबरोबर आल्या माहेरवाशिणी

त्यांची करते पाठवणी

  स्वच्छ्ता करून करते

नवरात्राची तयारी

तोच धावत धावत दिवाळी आली दारी

भाऊबीज पाडवा वाढवी नात्यातील गोडवा

कणभर तिळ मणभर गूळ 

तुमच्या माझ्यातील स्नेह असाच वाढवा 


.... नाव घेऊन करते आज ..... साठी जागरण



4)

गोठ घेतले पाटल्या घेतल्या 

घेतला राणीहार 

ठुशी घेतली चिंचपेटी घेतली

घेतला लक्ष्मीहार 

आंगठी घेतली वेल घेतले

बाजूबंद आणि वाकी 

आंबड्यातली फुलेही घेतली

राहिले नाही काही बाकी

नाकातील नथ घेतली 

तन्मणी आणि तोडे

सोन्याचांदीचे घेऊन झाले 

म्हणून हिऱ्याचे घेतले थोडे 

जोडवी जोड मासोळ्या 

पैंजण घेतले पायी

छल्ला मेखला घेतला आता 

राहिले नाही काही बाकी

झाली सगळी खरेदी

आता मी करते नट्टापट्टा 

आगबाई घाईघाईत तर घ्याचाच राहिला

बिंदी आणि कंबरपट्टा

तोही घेतला , बाजारात गेले आणि तोही घेतला

झाली खरेदी मनासारखी म्हणून हसत होते गाली 

आणि अनिल म्हणतात कसे 

आग उठ सरिता पहाट झाली







Saturday, July 10, 2021

क्वारंटाईन डायरी



कोरोनाच्या वातावरणात थोडा बदल झाला कंपनीने पुण्यात यावं लागेल म्हणून सांगितलं  म्हणून आम्ही जानेवारीत पुण्यात रहायला गेलो दोन महिने राहिलो आणि कोरोनाची दुसरी लाट सुरु झाली व  मी , आशिष आणि आकांक्षा मार्चमध्ये पुन्हा बार्शीत दाखल झालो ! पुन्हा लाॕकडाऊन , जिल्हाबंदी सुरु झाली . मग उन्हाळ्याच्या सुट्टीप्रमाणे 15 जुनपर्यंत बार्शीत राहिलो आंब्याचा मनमुराद आनंद लुटला . त्यादरम्यान आशिषने व मी दोघांनी नविन कंपनी जाॕईन केली . लाॕकडाऊनमध्ये शिथिलता आली आणि आकांक्षाच पुण्यात काम होतं म्हणून आमचे तिघांचेही पुण्याला जायचे ठरले . एकदा पुण्यात गेलं की थोडंस बाहेर गेलं जातं मग तिकडून मिरजेला जायचा धोका नको म्हणून आमचे बार्शीतून मिरज व मिरजेत आठ दिवस राहून पुण्याला जायचं असे  ठरले .
त्याप्रमाणे रविवारी आम्ही बार्शीहून मिरजेत पोहोचलो केतकी पण मिरजेत आहे मग खूप दिवसांनी सगळे एकत्र रहाणार होतो बार्शीच्या आंब्याचा रस , लोणची , केक , आळूची भाजी असे मी शिकलेल्या पदार्थांचे घरात प्रयोग सुरु होते सगळ्यांनाच एकत्र रहातोय याचा आनंद झाला होता . पण भित्यापाठी ब्रम्हराक्षस म्हणतात तसे गुरुवारी आशिषचा घसा खवखवायला लागला . आमच्या दोन्ही कुटुंबात कोरोनाविषयी प्रचंड काळजी घेणारे मेंबर म्हणजे एक माझी आई व दुसरा आशिष ! आई रोज बँकेत जातात तर दीड वर्ष झालं तरी रोज त्या निघण्यापुर्वी पंधरा मिनिट आधी आशिषची त्यांच्यामागे भुणभूण असते . 
" मास्क नीट घाल सॕनिटायझर वापर " 
अशा सुचना देत देत तो गेटपर्यंत जातो. आईंनी एकदा त्याच्याकडे पाहिलं की
" तू कितीही रागव मी सांगतच रहाणार " 
असे म्हणत हसत घरात येतो . 
मग त्याचा घसा थोडासा खवखवू लागला तसे त्यांने स्वतःला आयसोलेट करुन घेतलं वाफ , गुळण्या औषध लगेच सुरु केल . सकाळी उठला की फार नाही पण सर्दी व घसा दोन्हीही थोडंस त्रास देऊ लागलं .आम्ही आमच्या फॕमिली डाॕक्टरकडे जाऊन आलो . त्यांनी औषधे दिली पाहूया म्हणाले . दुसरे दिवशी संध्याकाळी त्याला थोडीशी कणकण वाटली तसे आम्ही दुसऱ्या डाॕक्टकडे गेलो व टेस्ट केली तर टेस्ट पाॕजिटीव्ह !!
घरातला सगळा मूडच चेंज झाला  आशिषला स्वतःला फारच कसतरी वाटू लागले . तो बेसीन सुद्धा वापरेना आपल्यामुळे घरातल्याना त्रास नको ही त्याची भावना . होम आयसोलेशन सांगितल्यामुळे शेजारचा फ्लॕट किंवा हाॕटेल याचा विचार सुरु झाला इकडे बार्शीला फोन झाला तसे लांब असल्यामुळे आई-पप्पा , आकांक्षा यांना पण काळजी वाटू लागले . होम आयसोलेशन आहे तर बाहेर रहाण्यापेक्षा बार्शीला आलं तर  वरच्या घरात रहाता येईल असं त्यांचे म्हणणे येऊ लागले . पण येणार कसं आशिष तर ड्रायव्हींग करु शकणार नाही आणि ड्रायव्हर मॕनेज करता येणार नाही पप्पा तर म्हणू लागले मीच येतो .
इकडे आई-बाबांना पण आम्हांला बाहेर पाठवणे जिवावर आलं पण इलाज नव्हता . मग  फ्लॅटपेक्षा हाॕटेलवर चांगली व्यवस्था होईल म्हणून बाबानी हाॕटेलवर आमची व्यवस्था केली  व बार्शीला पण फोन करुन सांगितले 
" कोणीच कुठेच हलू नका , काळजी पण करु नका आपण फोनवर संपर्कात राहू आता सतरा दिवस जागा पण सोडता येणार नाही . तब्ब्येतीची काळजी घ्यायची आणि वेळ घालवायचा !"
त्याप्रमाणे आम्ही हाॕटेलवर रहायला गेलो पथ्याप्रमाणे  घरगुती डबा लावला . चौदा दिवसांचा अनुभव सुरुवाती पासूनच मला वेगळा जाणवत होता म्हणून मी तो जसा दिवस जाईल तसा लिहून काढायचे ठरवले . त्याप्रमाणे मी चौदा दिवस डायरी लिहीली . त्याची लींक मी पाठवेन .
आठदहा दिवसांनी आई-बाबांना पण वाटू लागलं क्वारंटाईन संपल्यानंतर चार दिवस घरी राहिलं पाहिजे मग बार्शीला फोन झाल्यावर आई-पप्पा पण म्हणाले थोडंस राहूनच या त्यात माझा 12 जुलैला वाढदिवस ! इंजिनियरींगला असतांना मी वाढदिवसाला मिरजेत होते मग सहा वर्षांनी पुन्हा यावार्षी मिरजेत वाढदिवस  . आज माझ्या बरोबर आशिष आहे सगळे रिलॕक्स मूडामध्ये आहेत , तुम्हा सर्वांच्या शुभेच्छा मला मिळाल्या मजा आली धन्यवाद . आता इकडून पुण्याऐवजी आम्ही बार्शीलाच जाऊ असे वाटतेय  पाहू .

ते चौदा दिवस !!


दिवस एक (26 जून )

आमच्या आई लाॕकडाऊन डायरी लिहितात

मग विचार केला.. आपण पण लिहू क्वारंटाईन डायरी...

आशिष ला कोरोना झालाय. रॅपिड टेस्ट पॉझिटव्ह आली आहे. RTPCR ची प्रतिक्षा सुरू आहे. 

कोरोना ह्या आजाराने सगळे आडाखे नियम रूढी परंपरा पार उखडून टाकले आहेत.

असंख्य विचार आहेत मनात... एकीकडे आशिषला काही त्रास होऊ नये ह्याची काळजी... दुसरीकडे आई बाबांना काही लक्षणे येऊ नयेत ह्याची प्रार्थना... 

वरकरणी शांत आणि धीटच राहावं लागेल कारण आशिष चे मन खात आहे हे जाणवत आहे. 

आम्ही दोघं राजा राणी एका खोलीत बंद आहोत... राणी खाली गादी घालून मास्क मधे बंद.. राजा पलंगावर RTPCR रिपोर्टची चातकासारखी वाट पाहतोय...

सगळ्या सोयी सुविधा आहेत... चहा कॉफी नाश्ता जेवण! मिरजेत असल्याचा फायदा दुसरे काय...

बाबांचा फोन आला... डॉ भट ना दाखवून या. मग आम्ही दोघे गेलो डॉ कडे... त्यांनी आशिषला तपासले... आणि अत्यंत शांतपणे एक डझन निरनिराळ्या प्रकारची औषधे लिहून दिली. RTPCR रिपोर्ट वर फारसे काही अवलंबून नसल्याचे तिथेच स्पष्ट झाले. मला सध्या तरी काहीच त्रास नाही. प्रीकाॕशन म्हणून मला अर्धा डझन गोळ्या... गोळीबार सुरू झाला.

मला कळत आहे की आशिषला कुठे तरी अपेक्षा आहे की RTPCR निगेटिव्ह यावी. मला नाहीये अपेक्षा... एक वर्ष कोरोनाचा अभ्यास झालाय सर्वांचा. एक नक्कीच आहे की हलक्यात घेण्याचा हा आजार नाही. त्यामुळं मी माझ्या मनाची तयारी केली आहे आणि तशी काळजी पण घेत आहे.

कुठेतरी इच्छा आहे की मी साफ चुकीची ठरावे...चमत्कार व्हावा.

पण छे... ह्या कोरोनाच्या आईचा घो!!!

आशिषच्या फोनवर मेसेज आला. अपेक्षेप्रमाणे  रिपोर्ट पॉझिटव्ह आला. आशिष पुरता हादरला! 

नेहमीसारखा डोळे मोठे करून मला लांब रहा बर का.. मास्क घाल की... Sanitize कर ना हात.. असे पालुपद सुरू झाले. मी हे सगळं गेले दोन दिवस त्याचा घसा दुखत असल्यापासून करतीच आहे तरीपण...

नेहमीची वेळ असती तर मी त्याला उलट उत्तर दिली असती (स्वभावदोष?). पण आज वेगळं होत... त्याला भीती वाटली होती. मी खूप शांतपणे त्याच सगळं ऐकून घेतलं!  त्याला हवं तस केलं...

त्याला थोडा वेळ लागणारच होता...

तसा तो मिळाल्यावर मग मला. म्हणाला

 " कीर्त्या, खरंच कोरोना झाला की ग मला..." 

आणि हसायला लागला... हुश्श झालं मला!! मग मी पण "भित्यापाठी ब्रह्मराक्षस..." 

असं म्हणल्या वर मूड लाईट झाला

आता acceptance हा प्रॉब्लेम सुटला होता... आता मुख्य टप्पा आहे... काळजी घेणे आणि पटापट बरे होणे. 

निलेश काका साठे रोज नाश्ता आणि दोन्ही वेळचे जेवण आणून देणार आहे . जेवण मस्त आहे... अगदी सात्विक आणि रुचकर. 

सगळ्यांनी मला सांगितलं आहे की गोळ्यांनी अशक्तपणा येतो आणि त्यामुळं खात राहील पाहिजे. आणि आशिष तर दोन जेवणं सोडली तर अधेमधे चहा सोडून काही म्हणजे काहीच घेत नाही ! आता ह्याला सतत खायला देणे म्हणजे सत्वपरीक्षाच आहे !

आई-बाबा , आई-पप्पा , आकांक्षा सगळे हवालदिल आहेत. त्यांना शक्य तितके अपडेट द्यायचं काम करती आहे...

एक महत्वाचा बदल म्हणजे आशिष थोडा अबोल झालाय... औषधांचा मारा सुरू असल्याने थकवा आहेच.  शिवाय सतत आपल्याला आणि आपल्यामुळे काय होतंय की काय? अशी टांगती तलवार आहेच त्याच्या डोक्यावर! 

खूप विचारांचा गोंधळ उडालाय त्याच्या डोक्यात. मी सगळ्यात जास्त काळजी घेतो.. मग मला कसा काय झालं कोविड? कोणकोणत्या संपर्कात आलोय मी? मी ढिला पडलो का? मला मिरजेला येऊन का झालं हे???? 

एक ना अनेक! परत ते गूगल आहेच छोट्या छोट्या गोष्टींना.. Google the necessary evil!!

सूप पिताना थोडासा खुलला तो... मग आम्ही एकत्र friends बघत जेवण केलं. खूप बरं वाटलं तेवढ्या वेळाने सुद्धा.

12 च्या सुमारास झोपलो दोघेही... अशा रीतीने quarantine पहिला दिवस समाप्त !!


दिवस दोन ( 27 जून )


सकाळी साडेसातला दिवस सुरू झाला माझा.. छान झोप झाली. Ashish अजुन झोपला आहे. मग म्हणलं राहूदे पडून राहावं... उगाच खुडबुड करून त्याला जाग येते. कुठे कोर्टात तारीख आहे गडबडीने आवरायला... निवांत लोळत पडले...

आज आई पप्पांच्या लग्नाचा वाढदिवस ! सगळ्या ग्रुप वर दवंडी पिटवली!!!

8.15 ला आशिषला जाग आली... नित्यनेमाने गुळण्या केल्या ,ब्रश केला . 

Acidity ची गोळी घेऊन दिवसाचा नारळ फुटला!

आता चहा आणि नाश्ता करायचा म्हणून त्याच्या मागे लागले... इडली चटणी नाश्ता आला वेळेत. 

कशाबशा त्याने दोन इडल्या खाल्ल्या... गोळ्या घ्यायच्या असतात म्हणून खातोय तो... कळतंय मला..

थोडा कफ आणि खोकला वाटला म्हणून महेशदादाला औषध आणायला सांगितलं! महेश दादा हा एक पु. लंचा नारायणच आहे ! पेशाने तो दुकानदार आहे... पण सल्ले पार डॉक्टर, वकील, सरकारी, पोलिस सगळे देऊ शकतो.. एका कोविड सेंटरला त्याने वाहून घेतलं असल्याने सगळी इत्यंभूत माहिती आहे आणि पूर्ण वाहवून घेण्याचा स्वभाव. 

बाबांकडे अशी काय जादू आहे काही समजत नाही... माणसं जोडली की कायमचीच.. फेविकॉल का जोड ! आत्ता काय किंवा इतर वेळी काय... कुठे ही गेलो तरी ओळखीचा एक तरी माणूस सापडणारच ! अक्षी मला म्हणते तशी मिरजेत कायम पूर्ण नावच सांगायचं तू.. हेहे. पण आत्ता हे सगळं सुकर होतंय .

पुन्हा फोन मधे डोकं घालून वेळ काढला.. घरी wish करायला फोन झाला . जेवण आल्यावर आशिष भूकच नाही म्हणून बसला होता... फार मुश्किलीने त्याला थोड तर खा म्हणलं... तर पठ्ठ्याने पूर्ण जेवण आणि आईने दिलेली वाटली डाळ पण फस्त केली . औषधाने त्याला भूक लागते आहे... खाणे गरजेचं आहे . वाफ घ्यायचा आणि गुळण्या करायचा प्रचंड कंटाळा येतोय त्याला... पण ते ultimate solution आहे असं आमच्या घरातल्या खुद्द कोविड वॉरियर डॉ. केतकी ह्यांनी सांगितलं आहे.

त्यामुळं किती का चिडचिड करेंना हा... मी मागे लागून करून घेणार.

अतिशय कंटाळा आला आहे आता . एका पिंजऱ्यात बंदिस्त केलेला सिंह कसा असेल... अस्वस्थ येरझाऱ्या सुरू... वेळ झाली म्हणून जेवण आणि झोप . 

संध्याकाळी आज मात्र स्वतःहून आशिष ने घरी फोन केला . काल परवा तूच बोल म्हणत होता मला . आज छान बोलला घरी . आकांक्षाशी पण बोलला..

जरा होमसिक आहे... जाणवत आहे मला . पण सध्या पर्याय नाही . जितका लवकर बरा होईल तितका लवकर कंटाळा मुक्ती !

आज म्हणाला मी pubg खेळतो... आनंदच झाला मला... नॉर्मल कडे वाटचाल... अजून काय !!

थोड मित्रांसोबत वेळ घालवला की फ्रेश होईल . बरं आहे तेच .

आत्ता वाटत आहे केतकीने कसं केलं असेल हे सगळ मॅनेज ? सरकारी दवाखाना.. अपुऱ्या सोयी... काळजी घ्यायला कोणीच नाही... प्रचंड अशक्तपणा , थकवा आणि अखंड एकटेपणा ! मानलं तिला... तावून सुलाखून डॉ झालीये पोरगी . आत्ता समजत आहे.

आता रोज सूप प्यायला सुरू केलंय . गरम पण आहे आणि पोट सुद्धा भरते !

आज मला खूप झोप येतीये . कफ सिरप घेतलय आणि दिवसभर झोपले सुद्धा नाही. 

जेवण करून केव्हा एकदा ताणून देते असा वाटत आहे . जेवण आलं.. मसूर उसळ आणि पोळी होती . आशिष आज म्हणाला संध्याकाळी भात असला तर बरं पडेल... उद्या सांगेन त्यांना... संध्याकाळी भातच द्या म्हणून !

जेवण झालं.. 3-4 मिनिटे चालून ऑक्सिजन चेक करून झाला . सगळं नॉर्मल आहे .

आता शांतपणे आपापले हेडफोन्स घातले आणि झोपायची तयारी सुरू...

अशा रीतीने quarantine दुसरा दिवस समाप्त 😊



दिवस तीन ( 28 जून)


आज सकाळी 6 ला जाग आली . पण मग विचार केला करायचं काहीच नाही.. परत गुडूप झोपले.. थेट 8 ला जागी झाले..

आज ऑफिस आहे माझं

आशिष उठला... तेवढी छान झोप झाली नाही म्हणाला . मी फ्रेश आहे आज . नाश्ता आला... आशिषला कोरडे पोहे जात नव्हते.. मग म्हणलं जातील तेवढे खा आणि मग एक दोन बिस्कीट खा . 

थोडसे पोहे आणि चहा प्यायला फक्त त्याने..

औषधं घेतली.. मी डेटॉलचा स्प्रे मारला रूम मध्ये... आशिष म्हणाला "वास येतोय का ग ह्या स्प्रेचा ?"

 मी म्हणलं "हो येतोय की !"

चटकन लक्षात आलं... वास यायचं बंद झालं आहे !!!

आता त्याचं जर्मन शेफर्ड सारखं सर्व गोष्टी हुंगुन पाहणे सुरू झालं. काय करणार ?? पंचेंद्रिय सुरू असलीच पाहिजेत ही धारणा...

आजची महत्त्वाची प्रगती म्हणजे घसा दुखणे पूर्णपणे बंद आहे... डॉक्टरनी काही औषधे 2 दिवसांनी बंद करायला सांगितली आहेत .

फार बर वाटत आहे ह्यामुळे..

पण जबरदस्त थकवा आलाय त्याला... उठून पाण्याचा ग्लास घेतला तरी थकायला होतंय आणि काहीही झाले तरी मी त्याच्या हातात काहीच नाही देऊ शकत... डोकं दुखायला लागलं तर दाबून नाही देऊ शकत... शेजारी बसून गप्पा मारत चहा नाही पिऊ शकत... बांधून ठेवल्यासारखे झालंय !

सकाळचा चहा झाल्यावर गाढ झोप लागली त्याला . 

थेट जेवायला उठला .

आज जेवायला पण भूक नाही म्हणत होता... पण औषधे इतकी आहेत की जेवलच पाहिजे . मारून मुटकून जेवायला सुरू केलं .

जेवण झाल्यावर थोडी भूक आहे थरथरत आहे म्हणाला.. एक दाण्याचा लाडू आणि अर्धा ग्लास ORS पिल्यावर कुठ शांत झाली भूक .

इतक्या औषधांमुळे भूक निश्चितच लागत आहे.. ह्याची जाणीव झाली मला... 

माझे काम सुरू असल्याने आज वेळ पटकन पळत आहे . कपडे धुवून झाले . अंघोळ झाली . 

एक गोष्ट जाणवत आहे... माणूस जिथे कुठे असेल त्या जागेला आपले घर बनवतो. 

आता ह्या छोट्याश्या खोलीत एक कोपरा माझा आहे आणि एक आशिषचा . वाफेचे मशीन ठेवायची जागा ठरलेली आहे... पाणी उकळायची किटली ठेवायची एका छोट्या टेबल वर . ह्याचे बॉक्स शेजारी शेजारी ठेवून त्यावर औषधे लाऊन ठेवली . 3 hanger ला कपडे वाळत घालायचे . एका टेबल जवळ खाऊ , कपडे आणि पाणी वगैरे आहे .

खोलीभर डेटॉल आणि sanitizer चा गंध (की सुगंध?) पसरला आहे . 

 कंटाळा आला कंटाळा आला असे म्हणत दिनक्रम सुद्धा भरगच्च झालाय . नुसते पाणी उकळा , वाफ घ्या आणि गुळण्या करा... ह्यात अर्धा दिवस संपून जातोय .

कधी एकदा बरे होऊन बाहेरच्या मोकळ्या हवेत जातोय असे झालंय... पण आत्ता waiting period आहे त्यामुळे patience च मदत करेल .

महेश दादा रोज येऊन जातोय... थोड दार खिडक्या उघडा.. थोडे बिनधास्त रहा... बाहेर पडा... चाला... असे सांगतायत.

पण आशिषकडे आत्ता तेवढी ताकद नाहीये की तो बाहेर जाऊन चालून वगैरे येईल...

मी मात्र रोज चालायला सुरू  केलं आहे . नुसत बसून फुगा होईल माझा .

आज थोडी acidity झाली आहे आशिषला . तस तर त्याचं पित्त खवळतच लगेच !!! आता एवढी औषधे... मग नाही झालं तरच नवल!

आज रात्री भात एके भात त्यामुळे :-) 

आज काहीतरी नवीन म्हणून सहज स्विटकॉर्न सूप मागवलं . आणि मस्तच लागलं !! आवडीने खाल्ल .

आज आसावरी पुष्कराज सोबत व्हिडिओ कॉल झाला . खूप दिवसांनी खूप खूप गप्पा झाल्या... जशा आधी व्हायच्या !! बरं वाटलं खूपच . एकटेपणा वाईटच... पण सक्तीचा एकटेपणा जास्त जाणवतो... त्यामुळं हे गॉसिपच टॉनिक लागतच मधे मधे...

जेवण केलं... आशिषची पाठ दुखत आहे . मला वाटतंय की सतत झोपून किंवा बसून राहिल्याने असेल . आईंना कोरोना झालेला तेव्हा त्यांची सुद्धा पाठ दुखत होती. कदाचित आनुवंशिक असेल response शरीराचा...

उद्या सकाळी थोड स्ट्रेचिंग करायला लावेन म्हणजे आखडले असेल तर बरं वाटेल .

बाकी आवाज पण थोडा पूर्वपदावर येऊ लागलाय .

लवकर लवकर आणखी सुधारणा होऊदे म्हणजे झालं...

आता पुन्हा एकदा दोघेही आपापल्या अंथरुणावर आडवे..

अशा रीतीने quarantine तिसरा दिवस समाप्त

🙂



दिवस चार ( 29 जून )


आज सकाळी उठले आणि लगेचच काम सुरू करावं लागलं..

नाश्ता आला होता आणि इकडे कॉल सुरू! आशिष झोपलाच होता अजून... थोडी तारांबळ उडाली माझी आज... ऑफिसच काम आणि रूम मधल्या सर्व गोष्टी मॅनेज करताना...इतकी की मी आज अंघोळच नाहीये केली!!! 

चहा पण उशिराच घेतला आज... आज आशिष एक्स्ट्रा फ्रेश आहे. आज स्वतःहून वाफ आणि गुळण्या लक्षात ठेवून केल्या... 3 मिनिटा ऐवजी 6 मिनिटे  चालून ऑक्सिजन चेक केला!! 

खिडकी दार सगळं बंद असतं रोज.. मला गरम होत  असतं.. पण ह्याला थंडी वाजते... आज स्वतःहून उघड म्हणाला खिडकी.. छोटे छोटे बदल... पण फरक फार मोठा पडतो!

डॉक्टर नी शुक्रवारी रिपीट  चेकअपला बोलावलं आहे... आम्ही अक्षरशः तास मोजतो आहे शुक्रवार यायचे! 

आज मात्र दुपारच्या जेवणानंतर आशिष कुरकुर करायला लागला.. इतके दिवस त्रास होत असल्याने काही सुचत नव्हते त्याला

आता मात्र, कंटाळा आलाय, पडून राहून पाठ दुखती आहे वगैरे तक्रारी ऐकू येत आहेत.

आई बाबा केतकी पण बरे आहेत... 14 दिवस होईपर्यंत आमच्या कोणाचेच चित्त थाऱ्यावर येणार नाही. कोणाला शिंक जरी आली तरी बाकीच्यांची भुवई उंचावलीच म्हणून समजावे! टांगती तलवार आहे ही धास्ती... तरी आई-बाबा, केतकी ह्यांचे vaccine चे दोन्ही डोस झाले आहेत ही एक जमेची बाजू. आमच्या दोघांचा सुद्धा एक झालाय तसा...असो!

आजसुद्धा आशिषला वास येत नाहीये... ऑरेंज क्रीम बिस्कीट दर 2 तासांनी 3-4 वेळ हंगुन गट्ट करतो आहे आज..

सध्या त्याचं डोकं पूर्ण वेळ एकच प्रश्न सोडवण्यात लागलं आहे... त्याला लागण झाली कशी आणि कोणामुळे? मुख्य संशयित आहेत बार्शीचा दहीवाला, मिरजेची फरशीची बाई आणि बिल्डिंगची लिफ्ट! ठोस पुरावा मिळेपर्यंत शोधकार्य चालू ठेवणार आहे तो... हाहा!

आजचं सूप खारटच आलं... मूड ऑफ झाला दोघांचा .

आज दिवस खूप वेगाने सरला... कामात गुंतलेले असले की चांगले किंवा वाईट कसलेच विचार करायला वेळ नाही मिळत.. तस आज झालं मला... काही तास मी कोरोना, sanitizer आणि ताण ह्यापासून लांब होते 

Overall छान दिवस गेला

जेवण झालं... झोप आली आहे बरीच..

त्यामुळे बॅक to comfy position!

Quarantine चा चौथा दिवस समाप्त!




दिवस पाच ( 30 जून ) 


आज उठल्या उठल्या पहिली गोष्ट केली ती म्हणजे अंघोळ... आज भरपूर काम आहे ऑफिसच... सगळं पटपट केलं आणि कामाला बसले...

काल रात्री डास चावत होते त्यामुळे आशिषची झोप झाली नव्हती... तो बराच उशिरा उठला..

आज नाश्त्याला आप्पे आहेत.. इतके मस्त आणि लुसलुशीत होते... मस्त मटामटा खाल्ले!

आशिषने पण नाश्ता केला... आशिष काल पासून हॉटेल मधला पुलाव किंवा बिर्याणी मागवूया म्हणतोय.. पण मला रिस्क वाटत आहे. आत्ताच बरा झालाय तर कशाला...

आज उठल्यापासून तो उचकलेलाच आहे... नुसती चिडचिड!

त्यात आज पुण्याहून आयुर्वेदिक औषधे आली. गुळण्या आणि काढा ह्याची भर! आता त्याला बर वाटत आहे.. त्यामुळं आता मोकळेपणाने फिरावं, खावं, प्यावं असं वाटतंय त्याला... साहजिक आहे... पण ते शक्य नाहीये ना..

मी अस सांगितलं आहे त्याला की आज 5-6 वाजता प्लेन डोसा मागवूया. त्यातल्या त्यात कमी तेलकट म्हणून मी तो मार्ग काढला...

पण कुठलं काय.. लॉकडाऊन मुळे रेस्टॉरंट बंद आहे. फक्त Chinese food मिळेल. मग बाहेरून मागवणे कॅन्सल!!

पुन्हा चिडचिड झाली... 

डॉ. शिवानंदशी फोन वर बोलणे झाले. ते म्हणाले गुरुवारी 1 week पूर्ण होतो आहे ,पहिली लक्षणे दिसून.. त्यामुळं आम्ही मोजत होतो त्याच्या मागे 2 दिवस कॅलेंडर पळाले असे समजले!! त्यामुळे उद्या आम्ही निम्मा पल्ला गाठू शकतो!

केतकीच्या मते आई बाबांना आता काही धोका नाहीये... Thank god!

आता शुक्रवारी डॉना प्रत्यक्ष दाखवायचं आणि मग पुढच्या आठवड्याचा प्लॅन ठरवायचा.

आम्हा दोघांनाही आता खरंच कंटाळा आलाय.. तेच ते जेवण आणि तीच ती खोली...

रोज मागवला की आयता ग्लास मधला चहा हातात येतो आहे.. पण आता आठवण येती आहे ती स्वतः आधण टाकून भरपूर आले घालून केलेल्या वाफाळत्या चहाची...

खोलीचा दरवाजा उघडून निःशंक पणे बाहेर फिरायचे वेध लागलेत. मला आधी वाटायचं की मला माझा फोन, बेड आणि wifi दिले तर मी कुठेही आणि कितीही काळ राहू शकेन.

पुन्हा एकदा कोरोना ने ते सर्व आडाखे चुकीचे ठरवले... 

मी रोज थोडा वेळ गॅलरीमधे जाऊन उभी राहते.

तेवढाच बाहेरच्या जगाशी संपर्क!

आज तर चक्क मी आशिषला म्हणाले की मला खालच्या मोकाट कुत्र्यांचा हेवा वाटतोय.. ती मोकळी, विना मास्कची,बिनधास्त फिरत आहेत. ना कसली भीती.... ना कसली बंधने...

असो.. थोडक्यात, इतका कंटाळा आलेला आहे!

आज रात्री 9 पर्यंत तर मीटिंग होती माझी. त्यामुळे दिवस तर बिझीच गेला

आशिष सगळ्याssss भाज्या खातो. अगदी शेपू आणि कारले सुद्धा आवडीने खातो. नखरे माझे बरेच आहेत ह्या विषयात.. त्याला कमी आवडणारी भाजी एकच! भेंडी...! ( ही माझी आवडती भाजी आहे btw)

आज रात्रीच्या डब्यात जरा भारी भाजी असावी अशी माझी इच्छा... तेवढंच जरा मूड lifting

डबा उघडला तर त्यात भेंडी!

मी म्हणलं बोंबलाsss!! तरी शांतपणे खाल्ली बाबा भाजी! आणि मला तर आवडलीच!

उद्या काहीतरी छान खायला पाहिजे म्हणतोय!

बघू. उद्या सकाळी मातोश्रींना कळवावे! ती काहीतरी बिन तेलाचा, खमंग आणि पचायला हलका असा छान पदार्थ शोधून, खायला देईलच करून.

अशा तऱ्हेने quarantine चा 5 वा भेंडीमय दिवस समाप्त!





दिवस सहा ( 1 जुलै )


आज लिहायची पण इच्छा नाही,इतका कंटाळा आलाय!

पण, माझी प्रथम वाचक(pencil speaks) विचारेलच!! म्हणून हे पांढऱ्यावर काळे..!

आता मला Philips जॉईन करून जवळपास एक महिना होऊन गेला... त्यामुळं नवीन नवीन असतानाचा निवांतपणा आता नाहीये. माझी माझी अशी कामे आहेत आणि first impression जमवायचे आहे. त्यामुळे जरा लक्ष देऊन काम करावे लागते. 

थोडीशी अडचण होती आहे इथून काम करताना. इंटरनेट तशी बरीच साथ देते आहे... पण औषधं, चहा, नाश्ता, जेवण आणि हॉटेलचा स्टाफ हे सगळं मॅनेज करणे थोडंसं कठीण होतंय. तरी 2-3 दिवस झाल्याने schedule बसलय बऱ्यापैकी!

पुण्यातील आयुर्वेदिक डॉ. नीलिमा कुलकर्णी ह्यांची औषधे आम्ही सगळेच (देशपांडे - कुलकर्णी) घेतो. गुण चांगलाच आहे. 

काल त्यांचा 14 दिवसांचा डोस आला. कालपासून सुरू झालाय आशिषला. ते घेतल्यापासून चांगलाच थकवा येतोय त्याला. आयुर्वेदिक उपचार पद्धती अशीच असते वाटतं.

आज दिवसभर नुसता झोपतो आहे आणि रात्री टक्क जागा असतो! 

आज आईने धिरडे पाठवलेले. असली मज्जा आली खायला!! वा वा! अन्नदाता सुखी भव.

आज आशिषला कॉफी पिताना किंचीत वास आला.. इतका आनंद झाला पठ्ठ्याला!! 

उद्या डॉ कडे follow-up ला जायचं आहे. थोडी औषधं कमी केली तर फार फार बर होईल... 

बहुधा तरी राहायची जागा नाही बदलणार. पण किमान खाण्यापिण्यात थोडी सवलत मिळावी  अशी आशा आहे. जिभेचे चोचले... दुसरं काय!

संध्याकाळी आशिषला फोन आला की त्याचं बार्शीत tracelink(त्याची कंपनी) कडून कुरिअर आलंय. 

थोड्या वेळाने family ग्रुप वर आईंनी फोटो टाकला.. कंपनीने "Get well soon! From your tracelink family" असं ग्रीटिंग कार्ड आणि एक मोठा बॉक्स पाठवला आहे.  त्या बॉक्स मधे च्यवनप्राश, 3-4 प्रकारचे मध, लेमन टी अशा healthy गोष्टी आहेत.. किती छान कल्पना!


ही कंपनी जॉईन करून त्याला अवघे 15 दिवस च झाले असताना... कोरोना मुळे अचानक दोन आठवडे सुट्टी घ्यावी लागते. तेवढी रजा अजून जमा देखील नाही झाली. त्या बाबतीत काळजी करू नका आणि लवकर बरे व्हा असे आधीच manager ने सांगितलेलं. त्याऊपपर आता हे गिफ्ट! हुरूप येतो अशाने काम करण्याचा..  त्या गोष्टींच्या किमतीपेक्षा त्या मागचा विचार आम्हाला सगळ्यांनाच भावला!

 काही काळ का होईना आम्हा दोघांची मरगळ झटकून टाकली ह्या गिफ्ट ने!

आज आई आणि दोन्ही मावश्यांशी व्हिडिओ कॉल झाला. सगळ्यांशी बोलून आणि सगळ्यांना बघून बरे वाटले. 

खर तर आम्हाला दोघांनाही एकमेकांना बघायचा आणि बोलायचा कंटाळा आलाय. आता आशिष बऱ्यापैकी नॉर्मल दिसतोय. वास सोडला तर अडचण काहीच नाही. पण अजून त्याला आतून तो बरा झालाय अस वाटत नाहीये.

उद्या डॉक्टरना दाखवल्या नंतर त्याचा confidence थोडा वाढेल की तो बरा झालाय. 

त्यामुळं आता उद्याची वाट पाहत रात्री झोपणे!

अशा तऱ्हेने quarantine चा 6 वा दिवस समाप्त!



दिवस सात ( 2 जुलै)


आज शुक्रवार असल्याने काम कमीच आहे. आज डॉक्टर कडे जायला बाहेर पडायचे आहे..

 तब्बल 8 दिवसांनी बाहेरची माणसं, हवा, वारे मिळणार आहे... मी तर excited आहे.

11.45 ला डॉक्टर कडे गेलो.. त्यांनी टेस्ट करायला सांगितल्या ब्लड, युरीन आणि x-ray वगैरे ..

तपासून तब्येत छान आहे म्हणाले.

पण रिपोर्ट बघून ठरवू पुढचं असे सांगून 1 तासाने या म्हणाले.

जेवायची वेळ झालेली... पण आता आशिषला परीक्षेचा निकाल लागणार असल्या सारखे टेन्शन आले आहे त्या टेस्ट चे!.. जेवायला नकोच म्हणून बसला. 

पण अशक्तपणा इतका आहे की न जेवता त्याला पुन्हा दवाखान्यात नेणे खूप चुकीचे ठरेल. खूप convince केल्यावर थोडंसं जेवला आज...

मग 2 वाजता आम्ही पुन्हा गेलो. 

दवाखान्याच्या बाहेर गर्दी इतकी होती की एक क्षण वाटलं मोर्चा वगैरे आलाय की काय! आत शिरल्यावर(घुसल्यावर?) कळलं की ही रांग MR लोकांची आहे!!

डॉक्टरना रिपोर्ट आणि xray दाखवला. इन्फेक्शन काहीच नाही आता असं सांगितलं! Yesss!

पण मागच्या रिपोर्ट च्या तुलनेत WBC count थोडा कमी झालाय... इन्फेक्शन नंतर तो होतोच असं म्हणाले.

एक डझन गोळ्या पासून दिवसाला 3 गोळ्या अशी बढती झाली आमची!!

आता आम्ही मुख्य प्रश्नाला हात घातला "quarantine कब तक?"

त्यांनी शांत चेहऱ्याने आणखी 

 10 दिवस isolation मधे रहा असं सांगितलं! "घरी बाबा आहेत ना ,त्यामुळे रहा!" अशी अजून फोडणी दिली त्यावर!

आम्ही घासाघीस करायचा निष्फळ प्रयत्न केला.. 

पण ते म्हणाले पुढच्या रविवार पर्यंत रहा तिथेच!

पथ्य काही नाही आता, त्यामुळे खावा काहीही असं म्हणाले.. तेवढाच बुडत्याला काडीचा आधार!

आणखी 10 दिवस आता त्याच रूम मधे राहायचं आहे!!! हे जाम बोअर होणार आहे हे लक्षात आलं!

देशपांडे आणि कुलकर्णी दोन्ही कडे ही साठा उत्तरांची  कहाणी पांचां उत्तरी सुफळ संपुर्ण केली!

आई- पप्पा आता बार्शीला या म्हणत आहेत! तिकडे आरामात isolate होता येईल... वेगळ्या खोल्या, बाथरूम वगैरे सगळी सोय आहेच. 

पण आम्ही तिकडे गेलो तर आई काही ना काही वेगळं खायला करायला लागणार आणि पर्यायी त्यांची दमणूक होणारच! मी isolation मधे असल्याने त्यांना काहीच मदत नाही होणार. त्यामुळे मला ते चुकीचं वाटतंय. आशिष घरी आजी आजोबा असल्याने नको म्हणात आहे जायला.

माझी आई बरं झाल्यावर 1 आठवडा राहून, धष्टपुष्ट होऊन जावा असा काहीतरी अवघड पर्याय देत आहे...

आम्ही दोघांनी शेवटी असं ठरवलं की आज काहीच नाही ठरवायचं. पुढच्या आठवड्यात ठरवू!

आज स्वातंत्र्य मिळाले आहे खाण्याचे!!

मग आम्ही 6 वाजताच मेनू चा मन लाऊन अभ्यास सुरू केला...

शेवटी कमी तेलकट पनीर क्रिस्पी वर एकमत झाले! 

खाऊन तृप्त झालो आणि मग नेहमीचा पोळी भाजीचा डबा आला, तो खाल्ला.

उद्या सुट्टी!! त्यामुळे निवांत झोपायचे आज...

अशा तऱ्हेने quarantine चा 7वा दिवस समाप्त



दिवस आठ (3 जुलै )


कीर्ती उठ, कीर्ती उठ! अशा हाकांनी आज जागी झाले...

8.30 वाजलेले !! बाप रे.. नाश्ता द्यायला आलेले काका दार वाजवत होते. आणि माझी ब्रह्मानंदी टाळी लागली होती...

झोपेतच नाश्ता घेतला. आज उत्तपा होता! भारीच...

मी आवरून पटपट हाणले ! आशिष ने कुरकुर करत अर्धा खाल्ला कसाबसा.

मळमळतय म्हणाला.. मला वाटलं असेल काहीतरी बारीसारीक. थोड्या वेळाने पुन्हा म्हणाला तेव्हा माझ्या डोक्यात प्रकाश पडला. अरे बापरे... नवीन गोळ्यांमधे acidity ची गोळी नाहीये! 

फार काही खाल्ले नसल्याने त्याला गोळी दिली. मग जरा वेळाने बरं वाटलं लगेचच... हुश्श्य

आमचं पुण्यात फ्लॅट घ्यायचा प्लॅन सुरू आहेच. पण मागच्या आठवड्यात रिकामपणाच्या उद्योगात मी एका scheme वाल्यांना वीकेंड ला व्हिडिओ कॉल करू असे सांगितलेले! 

आज दोघेही जॉईन झालो त्या कॉलला. तेवढाच टाइमपास. आता ते माग लागलेत साईट वर या आणि बघा वगैरे वगैरे... त्यांना कोण सांगणार की आम्हाला आमचे डॉक्टर कुठेच नाही सोडत म्हणून :-( 

वेळ बाकी छान गेला .

आज आईने मेथीची पीठ पेरून भाजी आणि गोड सांजा पाठवला आहे!! Yayy!

आसावरी पुण्यात आहे आणि अक्षी पण!

आमचा भेटायचा प्लॅन होता ह्या आठवड्यात पुण्याला... Excited होते मी.

आता पुन्हा आसावरी येणार 3-4 महिन्यांनी.

मग भेट लांबणीवर पडलीच.

आम्ही पण इथून आता बार्शी लाच जाऊ... त्यामुळं अक्षी पण नाही भेटणार 

पुढच्या सोमवारी ( 12 जुलैला) माझा वाढदिवस आहे. आणि आमचं quarantine 10-11 ला संपत आहे 

त्यामुळं बार्शी का मिरज हा मोठा प्रश्न आहे!!

आई (बार्शी) म्हणल्या की घरात सगळीकडे फिरता येणार का हे डॉक्टरना विचारून रहायचं ठरवा!

माझ्या आईने डॉ. भट आणि डॉ. शिवानंद दोघांना फोन करून confirm केलं की आम्ही रविवारी घरी आलो तर चालेल का! दोघांनीही ग्रीन सिग्नल दिला.

त्यामुळे अजून एक आठवडा तरी आम्ही मिरजेतच आहोत असं सध्या तरी ठरतंय.

आज माझी थोडी चिडचिड झाली असं मला जाणवत आहे. 8 दिवस एकच एक खोली आणि तेच तेच करून कंटाळा आलाय.

नुसत खायचा आणि झोपायचा पण कंटाळा आला आहे.

शेजारच्या खोलीत कोणीतरी माणसं राहायला आली आहेत. आज आम्ही जेवताना त्यांच्या जोरजोरात हसण्याचा आवाज ऐकू आला. 

मला अक्षरशः त्यांच्यामध्ये जाऊन गप्पा माराव्यात असं वाटलं... इतकी विटली आहे मी ह्या रूमला!

आज meditation केलं मी शांत राहायला.

हे अनुभव लिहून ठेवायचं कारण हेच की जेव्हा मी 4 माणसात गप्पा मारायला बसेन तेव्हा मला फोन कडे दुर्लक्ष करण्याची सद्बुद्धी यावी!! 

मी एकदा वाचलेलं की अत्यानंद, तीव्र दुःख आणि खूप भीती ह्या feelings येतात तेव्हा त्या मेंदू मधे कोरून घ्याव्यात. तेव्हा आपण जे काही केलं ती आपली ताकद बनते म्हणे.

 म्हणून हा अनुभव जो सुरवातीला भीती आणि दुःख घेऊन आला, तोच अनुभव  प्रचंड कृतज्ञता शिकवत आहे.

 रोजचा डबा, औषधे आणि असीम मानसिक आधार देणारे मित्र मैत्रिणी आणि नातेवाईक ह्यामुळे एका संकटातून सुखरूप बाहेर आलो आहे. Thankful, grateful and blessed!!

अशा तऱ्हेने quarantine चा 8वा दिवस समाप्त




दिवस नऊ (4 जुलै)


"माणूस हा समाजशील प्राणी आहे ", असं शाळेत शिकवलं होतं. 

पण ते खऱ्या अर्थाने शिकले मी ह्या 14 दिवसात.

सोयी, सुविधा, अन्न,वस्त्र, निवारा सगळं सगळं आहे. पण, चार लोकात बसून गप्पा मारणे हे काही शक्य होत नाहीये.. तसे तर मागचे पूर्ण वर्ष विशेष बाहेर फिरणे, मिसळणे, गप्पा गोष्टी हे फार कमी प्रमाणातच आहे... पण बार्शीमधे सुद्धा मी दिवसभर आशिष, आकांक्षा, आई आणि पप्पा ह्यांच्याशी आलटून पालटून गप्पा मारत असायचे. तेव्हा त्या routine चा सुद्धा कंटाळा आला होताच. पण आत्ता आहे ह्यापेक्षा ते लाखपटीने बरे!

व्हिडिओ कॉल सुरूच आहेत सगळ्यांशी... चॅट सुरू आहे. महेश दादा येऊन भेटून जातोय. आशिष आहेच समोर. (Thank god!!)

एकेकदा वाटतं अती होतंय माझं. एवढं काय बंदिस्त राहावं लागलं तर आभाळ कोसळलं की काय??

जरा चिडचिड व्हायला लागली आहे माझी. Actually दोघांची! 

मोबाईल मधेच असतो आम्ही बराचसा वेळ. गप्पा मारायच्या मूड मधे नाहीये अजून तो... जास्त force केला तर irritate होतोय. त्यामुळे मी पण आवरतच घेती आहे. त्याच्या कलाकलाने सुरू आहे.

माझी तर लोकांचे फिरताना किंवा ट्रेकिंग करतानाचे स्टेटस पाहिले ना, चिडचिड होत आहे. 

आम्ही ठरवलेलं की पुण्यातील परिस्थिती बघून थोड फिरायला जाऊ.. अगदी फार नाही तर पावसात रस्त्यावर फिरून तरी येऊ! असे अनेक प्लॅन होते जुलै महिन्यात... पण असुदे... Everything happens for a reason!

आता positive गोष्टींवर focus करायच आहे. कुढत आणि रडत बसून फक्त वेळच वाया जाणार आहे. 

आता आम्ही पुढच्या रविवारी घरी जाणार आहे. त्यामुळे countdown begins! 

(आता येऊद्या ना घरी!!!)

मी ठरवलं आहे की रविवारी haircut करायचा. पूर्ण वेगळा लूक यायला हवा. गंडला तरी चालेल. पण बदल हवा आहे!!

इथे वापरलेले कपडे फेकून द्यायचे अस म्हणत आहेत सगळे... आता मी मागच्याच महिन्यात जॉकीच्या पँट आणि टीशर्ट विकत घेतले आहेत. ते खरचं फेकून द्यावे लागतात की काय असं वाटतं आहे!!

आज आम्ही संध्याकाळी हॉटेल खालच्या पार्किंगमधे फेऱ्या मारून आलो. हालचाल गरजेची आहे...

मी रूम मध्ये आल्यावर मोबाईल आणि किल्लीवर डेटॉलचा sanitizer स्प्रे मारला. आशिष माझ्याकडे खूप आनंदाने बघायला लागला. त्याच्या डोळ्यात काहीतरी हरवलेलं सापडल्याची चमक दिसत होती. म्हणाला की "अग मला डेटॉलचा किंचीत वास येतोय.." भारीच!! फारसे काही अडत नसले तरी एक क्षमता आहेच की वास येणे. हे एक recovery चेच लक्षण! Yesss...

ह्याचे सेलिब्रेशन म्हणुन की काय आज डब्यात सोया chunks ची भाजी होती... नेहमीपेक्षा बरीच झणझीत होती. अर्थातच आशिषला खूप आवडली. शिवाय रविवार म्हणून जिरा राइस पण होता. 

मज्जा आली जेवायला. 

आता राहिले फक्त 6 दिवस!!

अशा तऱ्हेने quarantine चा ९वा दिवस समाप्त...





दिवस दहा (5 जुलै)



आज सोमवार!

मागचा शुक्रवार डॉक्टर डॉक्टर खेळण्यात गेला होता. त्यामुळे काम बरचसं अर्धवट राहिलेले. त्यामुळं आज on toes राहावं लागणार आहे.

सकाळी 9 ला काम सुरू केलं. आज leadership address ची एक मीटिंग होती, त्यात "Return to work" ची थोडीफार वाच्यता सुरू झाली आहे असं लक्षात आलं. पण "ह्या ह्या दिवशी या ऑफिसला!" असा हळदी कुंकू लावून निरोप येत नाही तोपर्यंत काही विचार करण्यात अर्थ नाही.

मी philips जॉईन केली ती लॉक्डाऊन सुरू असतानाच. लॅपटॉप सुद्धा घरपोच कुरिअर ने आलेला. त्यामुळे ऑफिस कसं दिसतं हे माहीतच नाही. पण घरापासून फार फार लांब आहे हे मात्र माहित आहे!! त्यामुळे आत्ता लगेच सुरू होऊ नये असं वाटतं आहे सध्या... असो!

आज घरून वांग्याची भाजी आली... डब्यात घेवडा. मजा आली जेवायला. 

आशिष परवा दिवशी ऑफिस जॉईन करेल म्हणातोय. मग आज त्याचा लॅपटॉप पण आणायला सांगितला घरून. त्या बॅगमधे बाकरवडी आणि लाडू पण होते!! Surprise!!

आशिष आज खूपच चिडचिड करतोय. औषधांमुळे असेल किंवा बांधून ठेवल्याने... पण वैतागला मात्र आहे आज. त्याच त्याला पण जाणवत आहे पण आवरत नाहीये. दिवसभर गेम खेळतो आहे म्हणून मी दुसर काहीतरी कर म्हणते आहे त्याला. 

भूक लागत नाहीये नुसत बसल्याने. खूप मागे लागून त्याला फेऱ्या मार वगैरे सांगती आहे. त्याने पण वैतागतो आहे.

फेऱ्या मारून पण थकवा येतोच आहे. पण हालचाल नाही झाली तर भूक लागत नाहीये... गोळ्या घ्यायच्या आहेत त्यामुळे जेवण चुकवून चालत नाही. सगळं गुंतागुंतीचे शास्त्र!

 रोज 9 ला जेवतो आम्ही. अजिबात भूक लागली नाही म्हणाला आणि खाणार नाही असं declare केलं. 

मला आज ऑफिसच्या कामाने थकवा आलेला. मला जेवताना बघून त्याची भूक चाळवेल असं वाटून मी जेवायला सुरुवात केली. त्याला हळूच म्हणलं "समोरच्या पॅसेज मधे फेऱ्या मारतोस का?"

काय माहित कसं काय.. पण तयार झाला आणि 10 min फिरून आला... 

मग मी त्याला अजिबात जेवायचा आग्रह केला नाही. शेवटी 9.50 ला स्वतःहून डबा घेतला आणि व्यवस्थित संपवला. (भूक लागलेली असते)

आजारी माणूस म्हणजे एक लहान मूल असतं! हे खरंच आहे बाबा... भूक लागलेली कळत नाही. फक्त हट्टीपणा जमतो... रागवता येत नाही. वगैरे वगैरे...

उद्यापासून सकाळ संध्याकाळ चालायला सुरू केलं पाहिजे. त्याशिवाय पोटाची भट्टी सुरू होणार नाही 

रविवारी घरी जायचंय!! आता राहिले फक्त 5 दिवस...

अशा तऱ्हेने quarantine चा 10 वा दिवस समाप्त!





दिवस आकरा (6 जुलै)


एक गाणं आहे संदीप खरेच "कंटाळयाचा देखील आता कंटाळा येतो!!!" 

तसे काहीसे दिवस चालले आहेत.

आज मला 7.30 लाच जाग आली. काम होत थोड त्यामुळं आवरून 8.30 लाच कामाला सुरुवात केली. आशिष गाढ झोपेत होता. मग एकटीनेच चहा घेतला. फक्त चहासाठी उठवण्यात काही तथ्य नाही.

आज जरा जास्त काम आहे आणि किचकट काम आहे. Data हाताळायची सवय नाहीये त्यामुळे थोडा गोंधळ उडतो आहे. पण नवीन गोष्टी शिकायला मिळत आहेत. 

आज संध्याकाळचे 7.30 झाले काम उरकायला.

बाबा आणि महेश दादा भेंडवाडला (शेतात) गेले आहेत, त्यामुळे आज कोणीच दुसरं भेटलं नाही.

मी आजकाल सगळ्यांना व्हिडिओ कॉल करते. आशिषला कंटाळा येतो व्हिडिओ कॉल वर बोलायचा.

 माणसं दिसली की बर वाटतंय मला.

आज उशीर झाला आईंना फोन करायला.. आशिषला कॉल करायला जबरदस्तीने बसवलं.

 तर कॉल आकांक्षाने उचलला. आशिषची कळी खुललीच! एकतर खूप दिवसांनी आकांक्षा दिसत होती आणि बोलणं पण धड अस झाल नव्हत!!

मला पण बरं वाटलं बघून तिला... नवीन चेहरा आणि नवीन विषय! गप्पा, चेष्टा, मस्करी झाली. 

मज्जा आली... मी थोडी थकलेले होते कॉलवर बोलायला...

पण आशिष मात्र उत्साहात बोलला आज बऱ्याच दिवसांनी.

जेवणाची आज गंमतच झाली... 

मला भात आवडत नाही. म्हणजे मी खातच नाही. बिर्याणी,पुलाव वगैरे उच्चवर्णीय पदार्थ माझ्यासाठी "भात" ह्या प्रकारात मोडतात...(ह्याबद्दल अनेक भातप्रेमी मंडळींचा रोष मी ओढवून घेतला आहे)

त्यामुळे मी दुसऱ्या दिवशीच सांगितलेलं की माझ्या डब्यात फक्त पोळीच द्या. भात नकोच.

आता 2 दिवस आशिषला देखील रात्रीचा भात नको वाटत आहे. आज दुपारचा डबा आला की त्या काकांना हा निरोप द्यायचा अस ठरलं.

डबा आला तेव्हा नेमका माझा कॉल सुरू होता. त्यामुळे आशिषने डबा घेतला आणि त्यानेच निरोप दिला..

आज रात्री उत्साहात french fries मागवले, सूप घेतलं. मग डबा आला. मी आत घेतला आणि उघडून बघते तर काय!!!  सगळ्या कप्प्यात खचाखच भरून नुसता भात!!!

आणि छोट्या दोन कप्प्यात वरण दिलेलं.

"फक्त भात नको" च्या ऐवजी "फक्त भातच द्या" असा "ध" चा "मा" झाला असावा!!!

खो खो हसलो दोघं ती फजिती बघून..

तो भात संपवेपर्यंत नाकी नऊ आले ते वेगळंच!!

उद्या पहिली लक्षणे दिसून 14 दिवस पूर्ण होत आहेत! त्यामुळे रूम मधले social distancing उद्या संपेल. हातातल्या sanitizer spray ला आणि पर्यायी मला थोडीशी विश्रांती मिळेल उद्यापासून. 

आता राहिले फक्त 4 दिवस...

अशा तऱ्हेने quarantine चा 11 वा दिवस समाप्त!


 


दिवस बारा (7 जुलै)



आजचा दिवस माझा सॉलिड बिझी आहे 

सकाळी 9 ला लॅपटॉप उघडला आहे तो रात्री 10 वाजता बंद केला आहे. आज आशिषने पण ऑफिस जॉईन केले. त्यामुळे दोघेही तसे बिझी बिझी!

आज आमच्या रूम मधला टीव्ही सुरू झाला.. गेले 11 दिवस रोज सकाळी महेश दादा आला की पहिला प्रश्न: "टीव्ही सुरू आहे?"

मी नित्यनेमाने "सुरू नाही. पण असुदे, आम्ही नाही पाहत! " असं उत्तर देते. 

ते मात्र आमच्या उत्तराला न जुमानता हॉटेल स्टाफला गोळा करतात आणि दुरुस्त करून घ्या असं सांगून जातात. मग 1-2 लोक येऊन आपापल्या परीने काहीतरी करून बघतात. टीव्ही काही सुरू होत नाही. महेश दादाची पाठ फिरताच बाकी सगळे थंड!

आज मात्र रूमच बदलून द्या अशी मागणी केल्यावर येन केन प्रकारेण टीव्ही सुरू झालाय!!

आम्ही बघितला नाहीच ही गोष्ट वेगळीच!

आज मला प्रचंड काम आहे त्यामुळे चहा पाणी मागवणे, ग्लास कचरा रूम बाहेर नेऊन ठेवणे, काढा वगैरे वगैरे काम आज आशिष करतो आहे.

इतके दिवस त्याला त्याचा ग्लास, चमचा वगैरे सोडून कुठेच हात लावून दिला नव्हता. आज 14 दिवस पूर्ण झाले quarantine चे, आता तशी काही काळजी नाही. जरा मोकळेपणाने वावरू शकेल आज तो..

 पण पार कामाला जुंपल्यासारखच झालं त्याला! :-(

मला मान वर करून बघायला सुद्धा उसंत नव्हती आज.. 

घरी फोनसुद्धा झाला नाही आज माझा. एक क्लिष्ट काम आलंय. त्यावरच दिवसभर डोकेफोड सुरू आहे. उद्याचा दिवस पण असाच जाणार वाटत. 

आता घरी जायचं आहे लवकरच, त्यामुळे इथला stay enjoy करुया असं ठरवलं आहे आम्ही. आज पनीर क्रिस्पी मागवलं! मस्त लागलं...

शुक्रवारी किंवा शनिवारी पूर्ण जेवण इथलं करायचा प्लॅन आहे... बघू आता कसं execute होतंय.

आता राहिले फक्त 3 दिवस...

अशा तऱ्हेने quarantine चा 12वा दिवस समाप्त!





  दिवस तेरा ( 8 जुलै )


आज Philips ने दिलेल्या अमर्यादित, अति किचकट, सकाळी 9 ते रात्री 11 चालणाऱ्या कामाचा निषेध म्हणून डायरी लेखन बंद राहील!


ता. क. आता राहिले फक्त 2 दिवस

Quarantine चा 13 वा दिवस भुर्रकन उडून समाप्त!



दिवस चौदा (9 july)


आजसुद्धा philips च्या नावाने खडे फोडून डायरी लेखन चुकवायची पूर्ण शक्यता आहे. कामाला अगदी पूर आला आहे..

पण आज डायरी लिहलीच पाहिजे असा दिवस आहे!

2 दिवस इतकी कामात बुडाले होते की कोणाशीच फोन,मेसेज काहीच होत नव्हते. आज आईने सकाळी सकाळी 8 ला फोन केला आणि म्हणाली की तुम्ही उद्याच(शनिवारी) घरी या! 

आता मी थोडी संभ्रमात पडले की डॉक्टर तर रविवारी जावा म्हणाले आहेत... 

ही हाय कोर्टची चर्चा ऐकून, सुप्रीम कोर्टाने सूत्रे हातात घेतली... बाबांनी एकच वाक्यात सांगितलं "एका दिवसाने काहीही फरक पडणार नाही! डॉ. ना फोन करा आणि जातो आहे उद्या घरी असं सांगा"  विषय बंद! 

आम्हाला काय .. घरी जायचेच आहे! आनंदी आनंद गडे...!

आम्ही लगेच प्लॅन केला, आज रात्री हॉटेल मध्ये जेवण करायचं!!

दुपारी महेशदादाला फोन केला की आजचं डॉ कडे जाऊन येऊ. आज सकाळपासूनच मिरजेच्या पावसाने रंग दाखवायला सुरू केले आहे... संततधार पाऊस आहे. 

दुपारी डबा द्यायला काका आले, तेव्हा त्यांना सांगितलं की आता घरी जाणार आहोत. त्यामुळे, आज रात्रीपासून डबा नको... ते त्यावर चटकन म्हणाले " आधी सांगायचं नाहीस का? काहीतरी गोड दिलं असतं!!!"इतकं मस्त वाटलं ते ऐकून. 

मग डबा बनवणाऱ्या काकुंशी फोन झाला.. त्यांना मनापासून thank you म्हणलं.. 

संध्याकाळी 6 ला डॉ ना फोन केला ,तर डॉ म्हणाले की काही त्रास नाही तर यायची काहीच गरज नाही आत्ता.... वाटल्यास सोमवारी एक चक्कर मारून जावा, recovery चेक करायला. 

उद्या घरी जायला ग्रीन सिग्नल दिला!!! आणखी काय हवं??

लगेच, ही सुवार्ता घरी कळवली. आईचं प्लॅनिंग सुरू झालं की नाश्त्याला काय? भाजी कोणती करू? एक ना अनेक...

उद्या अमावस्या सकाळी 7 वाजता संपते, त्यामुळे नाश्ता करून 10 पर्यंत घरी पोचायचे असे ठरले. 


कोरोनाला successfully चितपट केल्याबद्दल रात्री हॉटेलमध्ये जेवण मागवलं. पनीरची भाजी, स्प्रिंग रोल आणि रोटी अशा जेवणावर ताव मारला... खूप बरं वाटलं बाहेरच खाऊन!


गेले 14 दिवस ज्या गोष्टीची वाट पाहत होतो ते finally होतंय. आम्ही घरी जाणार आहे. Yayyy!

आता गेले 2 आठवडे असलेली बंधने नाहीत, ते 

निःशंक मनाने घरी जाणार आहे उद्या!

हे 14 दिवस आम्ही जो काही अनुभव घेतला, तो मी रोज जसा वाटला तसा रोज शब्दबद्ध करत गेले.

तसे पाहिले तर दोनच आठवड्याचा हा काळ. पण आत्ता ह्या 14व्या दिवशी जर पहिल्या दिवसाचे लिखाण वाचले तर आम्हा सगळ्यांच्याच मनस्थितीमधे जमीन अस्मानाचा फरक आहे हे कळते. दिवस सरतील तशी सुधारत जाणारी तब्येत, कमी होणारी भीती आणि मुख्य म्हणजे बदलत जाणारी मानसिकता ह्याचे विस्मरण होऊ नये म्हणून हा लेखनप्रपंच!

आज हा quarantine मधला 14 वा आणि शेवटचा भाग...

आणि आता घरवापसी! 😊











Wednesday, June 2, 2021

आकांक्षा कार्तिक स्पेशल


24/11/2021



कु. आकांक्षास
गोड गोड आशीर्वाद 
सर्वप्रथम रौप्य महोत्सवी वाढदिवसाच्या आभाळ भरून शुभेच्छा !!!
आत्ता आत्ता पायात पायात घुटमळणारी , सगळ्या घरात छोट्या छोट्या पावलांनी दुडूदुडू धावत , जिवाच्या आकांताने दाद्याबरोबर गोंधळ म्हणण्यापेक्षा अगदी धुडगूस घालणारी तक्या आज पंचवीस वर्षांची झाली यावर विश्वासच बसत नाही . अगदी पहिल्यापासून आशिष जगमित्र होता तर आई - पप्पा - दादा एवढ्याच चौकटीत रमणारी तू ! 
जन्मल्यावर पहिल्यांदा अगदी पाचवेच दिवशी पप्पाकडे पाहून तू हसलीस आणि आम्हाला वाटल की तू काही ते कळून हसली नसावीस , बाळाला सटवाई हसवते तस असेल ते , पण पुढे रोजच तू फक्त पप्पांकडे पाहून अगदी समजून हसायचीस आणि आम्हाला त्याचं खूप आश्चर्य वाटायचे हे कमी म्हणून की काय तीन आठवड्यांतच तू त्यांना पाहून हुंकार द्यायला लागलीस . आम्ही सगळे आवकच झालो , अस हे बाप-लेकीच जगातील सुंदर नात !! तुझा जन्म पंधरा वीस दिवस उशिरा झाला होता तर काका गमतीने म्हणायचे तिची एक महिना पोटात जास्त वाढ झाली आहे त्यामुळे तिला समज जरा जास्त आहे .
अजूनही तुझ्या वयापेक्षा जास्त समज असल्यासारखीच तू शहण्यासारखी वागतेस .
लहानपणापासूनच अभ्यासाबरोबरच गायन , नृत्य , चित्रकला , वक्तृत्व , अभिनय या सर्व कलामध्ये तू तरबेजच आहेस . स्पर्धा परीक्षा , स्कॉलरशिप आणि दरवर्षीच्या परीक्षा प्रत्येक ठिकाणची पारितोषिक पटकावत असायचीस . तुझ्या certificates आणि trophy नी तर फाईल आणि शोकेस खचाखच भरले आहेत . आम्हला ते अभिमानास्पद वाटते . हे कमी की काय म्हणून जगातील सर्वात मोठी सुगरण म्हणून मान्यता पावलेली माझी आई तिच्याकडून पाककलेच्या विद्यापीठातून तू मान्यता मिळवलीस आणि अगदी पुरण पोळी सुद्धा झकास बनवतेस . आता सध्या तर तू तुझ्या उच्च शिक्षणाच्या जोरावर मिळवलेला जॉब आणि जोडीला तुझी अभिनयाची सुप्त इच्छा जोपासण्याचे काम करतेस .
तुझ्या लहानपणीचे काही गमतीदार प्रसंग आजूनही आठवले तर हसायला येते .
     काहीही मनाविरुद्ध झालं की पहिलं रडायला सुरुवात करायची आणि आम्ही रागावलो की म्हणायचीस
 " मी रडत नाही माझे डोळे रडतात मी काय करू ".
     पप्पा बाहेर निघाले की त्यांच्या आधी आवरून तू चप्पल घालून बाहेर जाऊन उभी राहायची त्यामुळे तुला बरोबर नेण्याशिवाय पर्याय नसे . एवढंच काय तर दादाला सोडताना पण तू बरोबर जयचीसच . थंडीच्या दिवसात सकाळी साडेसहाला दादाला ट्युशनला सोडायला पप्पाना जावं लागे . अजिबात आवाज न करता तुला चुकवून जायचा प्रयत्न असायचा पण तुला कसं समजायचं माहीत नाही ते निघण्यापूर्वी बरोबर दोन मिनिटे आधी उठून स्वेटर टोपी घालत तू पळत जावून गाडीवर बसायचीस .
       कोणताही नाद इतका करायचा आणि कंटाळा आला की मला काहीच माहीत नाही असे दाखवत सोडून द्यायचा . भरतनाट्यम शिकण्याचा इतका हट्ट केला घुंगरू पूजा केली तीन परीक्षा दिल्या पण तुला क्लासचा कंटाळा आला आणि काहीतरी बहाणा करत क्लासला तू दांड्या मारायला सुरुवात केलीस आणि नंतर आम्हाला न बोलता परस्पर मैत्रिणीकडून सराना तू डान्स क्लास बंद केल्याचा निरोप पाठवलास .
  एकदा घेरडीच्या आजोबांना सोडायला पप्पाबरोबर तू स्टँडवर गेली होतीस व तिथूनच आंगवरच्या कपड्यानिशी 
" मला आजीकडे यायचं " म्हणत त्यांच्याबरोबर घेरडीला गेली होतीस .
         सातवीत असताना दहाबारा मुलींचा ग्रुप करून तू दिल्ली ट्रीपचा प्लॅन केलेलास . शाळा सुटण्याच्या वेळी सगळ्या मुलींना न्यायला आया येऊन बसलेल्या असायच्या माझी बँक करून मी न्यायला यायचे कधीतरी माझी सगळ्यांची भेट व्हायची तर तेव्हा सगळ्यांनी सांगितलं होत तुमची आकांक्षा मुलींच्या डोक्यात काहीही भरवून देते पोरी उगाच हट्ट करत बसतात बघा .
       तुझे गुण मात्र मॅडम कौतुकाने सांगायच्या त्या म्हणायच्या
 " जरा आगाऊ आहे पण हुशार आहे सतत पोरींचा घोळका हिच्या मागे असतो चमकणार आहे बघा ही ".
       आमच्या लग्नाच्या पंचविसाव्या वाढदिवसाला तू स्वतः तयार केलेले ग्रीटिंग आणि तू लिहिलेल्या भावना ग्रेटच होत ते ! 
    दाद्यावर जीवापाड प्रेम करणारी तू ! त्याचा वाढदिवस वेगळ्याच पद्धतीने एकदा तू केलेलास 
दादा म्हणजे तुझ्यासाठी जिवश्य कंठश्य त्याची अर्धांगिनी कीर्ती ! ती म्हणजे तुझ्यासाठी एक रेशीम धागाच ! तिच्या पंचविसाव्या वाढदिवसा दिवशी तू केलेलं सेलिब्रेशन अहाहा ! आणि नंतर त्यांचा साखरपुडा त्याची तयारी त्यावेळचा तू बसवलेला डान्स , आणि लग्न होईपर्यंत प्रत्येक इव्हेंट खुलवण्यासाठी मला सांगत केलेले सुरेख नियोजन व्वा !!
        त्यानंतर कोरोना कालावधीत तुम्ही तिघेही बार्शीला आलात आणि आपलं आख्ख कुटुंब जवळजवळ दोन वर्ष झाली एकत्र राहते आहे . शिक्षणाच्या निमित्ताने आधी आशिष नंतर तू बाहेर पडलात आणि बऱ्याच वर्षांनी पुन्हा एकत्र राहिलो त्या कालावधीत अनेक प्रसंग घडले .ज्योती मावशीच्या लग्नाच्या पंचविसाव्या वाढदिवसाचे आपण केलेले ई-सेलिब्रेशन आणि त्यासाठी तू काढलेल्या वेगवेगळ्या भन्नाट कल्पना ! मजा आली 
नेहमीच कोणालाही सरप्राइज देणं हा तुझा आवडीचा छंद आहे . त्यातल्या त्यात वाढदिवस हा तुझ्या आवडीचा विषय आहे . आपल्याकडे वाढदिवस करत नाहीत याचा तुला लहानपणापासूनच खूप राग यायचा पण हल्ली या आठदहा वर्षात तुझ्या मनाप्रमाणे करायचं म्हणत आपण तोही करायला सुरुवात केली .
तुझ्या आजच्या स्पेशल रौप्य महोत्सवी वाढदिवसाच्या निमित्ताने या सगळ्याची उजळणी झाली . सर्वच क्षेत्रातील हुशारी याबरोबरच अंगी असलेला सुसंस्कृतपणा यामुळे मला नेहमीच तुझा अभिमान वाटतो .
दादा आणि तू तुमच्या दोघात एक मोठा फरक म्हणजे सगळ्या गोष्टी तो सहज घेतो त्यामुळे त्याला त्रास होत नाही पण तेही काही फार चांगले नाही . तुझं मात्र सगळ शिस्तीत ठरलेलं असतं . तू सहसा कोणामध्ये ढवळाढवळ करत नाहीस त्यामुळे तुला पण कोणी ढवळाढवळ केलेली आवडत नाही . तोही चांगलाच गुण आहे खरं . कारण मला एका गोष्टीचं इतके कौतुक वाटते की आशिषपेक्षा कीर्तीचा आग्रह होता की तू त्यांच्याजवळ राहावे , मला कीर्तीपण बोलली होती की
" आई आकांक्षा नणंद कमी आणि बेस्टफ्रेंड जास्त वाटते . ती किती समजूतदारपणाने आणि धोरणाने वागते , आम्हाला तिचा काही त्रास होणार नाही याची कटाक्षाने काळजी घेते . उलट मदत कशी होईल हे पहाते . आणि मी खरंच नशीबवान आहे कारण अशी ज्यांची मुलगी आहे त्यांची मी सून झाले आहे . काहीही न सांगता तुम्ही दोघीपण मला कशात आनंद मिळतो हे शोधत असता आणि प्रयत्नपूर्वक तसे वागता याचा मला खूप आनंद होतो . माझ्या मैत्रिणी म्हणतात अशी माणसं आपल्या आयुष्यात येणे यासाठी नशीब लागते त्यामुळे आकांक्षाचे लग्न होईपर्यंत आकांक्षा आमच्याबरोबर राहिली पाहिजे हे पहा ".
तेव्हा माझी खात्री पटली की माणूस म्हणून तुला जस स्वातंत्र्य हवे असते तसे दुसऱ्याला मिळावे यासाठी तू दक्ष असतेस .
आणि नाही नाही म्हणत आता तू दादाजवळ राहतेस . तू माझं पण खूप मोठं काम हलकं केलं होते ते म्हणजे आजकालच्या मुलींची मानसिकता कशी असते त्याप्रमाणे मला तुझे बोलणे कीर्ती बरोबर वागताना दिशादर्शकच ठरले . तसा माझा संघटनेच्या माध्यमातून तुमच्या वयाच्या मुलींमध्ये वावर असतोच पण तुझ्यामुळे मला आणखी सोपं गेलं आणि मी छान सासू होऊ शकले की जे आजकाल दुर्मिळ होत चालले आहे . एवढंच काय पण कीर्तीची आई सुद्धा मनापासून सांगते 
 " आम्हाला कीर्तीची अजिबात काळजी नाही आशिष तर सोळा आणे खणखणीत नाणं आहे . त्याचा कोणताच अट्टाहास नसतो तो नेहमीच कीर्तीला म्हणतो तुला कसे बरे वाटेल तसे कर कोणीही तुझ्याकडुन अस्सच कर अशी अपेक्षा करणार नाहीत . हे सगळे आम्हाला कीर्तीकडून समजते . आकांक्षा तर मला माझी तिसरी मुलगीच वाटते मला आमच्याकडे सगळे म्हणतात सगळ्यांना सांगू नकोस कीर्तीचे कौतुक , दृष्ट लगण्यासारखी माणसे तिला मिळाली आहेत ".
तेव्हा खरच खूप चांगले वाटते . जरी जगाची रीत असली तरी वयाची पंचवीस वर्षे एका संस्कृतीत वाढलेल्या मुलीने दुसऱ्या घरात जाऊन आपले आयुष्य घडवणे ही सोपी गोष्ट नसते . त्यामुळे आज माझे परमेश्र्वराकडे एवढं एक मागणं आहे की देवा कीर्ती सारखे सुखी , समाधानी , आनंदी आणि भरभराटीचे आयुष्य आकांक्षालाही लाभो . असो शेवटी हा परमेश्वरी खेळ आहे . 
आई म्हणून तुझं फक्त गुणगान करावे असे नाही . तुझ्यातला खटकणारा गुण म्हणजे लहानपणापासूनच तू सनकी , हट्टी आणि आग्रही आहेस पण हट्टीपणावर कसा ताबा मिळवायचा हे मात्र तू फार छान पद्धतीने हाताळले आहेस आणि तेही कौतुकास्पद आहे की जे तुला तुझ्या आयुष्यात सुखी कसं राहायचं यासाठी मदतच करणार आहे . आणि हे तुला खूप लहान असताना माझ्या आईने समजावून सांगितले आहे . विशेष म्हणजे याबाबतीत तू आजीचे ( माझ्या आईचे ) उपदेश मानलेस आजही ते आचरणात आणत असतेस. ते तुझ्यासाठी हिताचे आहे .
मुलं घडविण्यात आईवडिलांची मेहनत असतेच पण तुझ्या बाबतीत माझ्या आईचा खूप छान सहभाग आहे आणि तुलाही ते पावलोपावली जाणवत असते त्यामुळे आजी हा तुझ्या जीवनातील अविभाज्य घटक आहे . सकारात्मकता आणि सुगरण पणा या दोन्हींची शिदोरी तुला माझ्या आईकडूनच मिळाली हे खरे ! आपण एकटे आपले मालक नसतो . सुख असो वा कठीण प्रसंग असो आपल्याबरोबर आपल आख्ख कुटुंब त्यात आपल्याबरोबर असते हा सर्वसमावेशक विचार नेहमी डोक्यात ठेवायचा म्हणजे सगळ्या गोष्टी सोप्या होतात .
असो , आता तू आयुष्याच्या एका महत्त्वाच्या टप्प्यावर आलेली आहेस . तुला हा शब्दरुपी पुष्पगुच्छ देत परमेश्वराने सर्व सुखे तुझ्या झोळीत ओतावीत हीच अपेक्षा . तुझ्या भोवती असणाऱ्या माणसांचे आयुष्य नेहमीच सुगंधी होऊन जाते असाच सुगंध आयुष्यभर दरवळत राहो . नेहमीच तुझ्याकडून सत्कर्म घडो , घवघवीत यश मिळो , सुखी , समाधानी , आनंदी , आरोग्यदायी आयुष्य तुला लाभो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना !









28/10/2023


चि. कार्तिक ,
अनेक शुभाशीर्वाद
सर्वप्रथम तुला रौप्यमहोत्सवी वाढदिसानिमित्त आभाळभरुन शुभेच्छा .
तुला सुखी , समाधानी , संपन्न , आनंदी आणि निरोगी आयुष्य लाभो . 
तशी आत्ताआत्ताच आपली ओळख आणि मग भेट झाली पण आपली खूप जुनी ओळख असल्यासारखा भास झाला ! प्रत्येक आई वडिलांना आपले मूल सुखी समाधानी असावे असे वाटत असते . माझ्या दृष्टीने आशिष-कीर्ती ही अनुरुप जोडी आहे तसेच आकांक्षा पण आयुष्यात व्यवस्थित सेटल व्हावी असे वाटत होते . तिला अनुरुप , निर्व्यसनी , सुसंस्कृत मुलगा मिळाला पाहिजे  अशा माफक अपेक्षा आहेत आमच्या .
त्या मला तुझ्यात दिसल्या असो , मला जेव्हा आकांक्षाने अत्यंत संयमाने फोनवर  तुझ्याविषयी सांगितले तेव्हा तुला पाहण्याची , भेटण्याची ओढ लागली . लग्नाच्या बाबतीत एकदम निवांत असणारी मुलगी एखादा मुलगा पहा म्हणून स्वतः हून सुचवते तेव्हाच वाटलं याला तर भेटलच पाहिजे . प्रत्येक आईला जगात एक नंबर आपले मूल आहे असेच वाटत असते पण खरचच आकांक्षा तशी चौकोनी चिरा आहे . आणि सर्वगुण संपन्न असणे ही गोष्ट पण लग्न ठरवताना तारेवरची कसरत असते . ती कलाकार आहे मग त्यात सगळ्या कला आल्या अभ्यास , करियर , नृत्य , गायन , चित्रकला , वक्तृत्व , पाककला , उत्साहीपणा , सौंदर्यदृष्टी , वाचन ,  थोडेफार लेखन   हजरजबाबीपणा , चिडकेपणा , रडकेपणा आणखीच बरच काही .....
आमचे सर्व नातेवाईक तिला 
" बावन्न कशी सोन "
असे म्हणतात .
मजेने 
" हिला अनुरुप नवरा कुठे शोधावा बाई "
असेही म्हणायचे .
काहीही करायचा तिने ध्यास घेतला की तो पूर्णत्वास नेणे हा तिचा स्वभाव लहानपणापासून आहे . तशी ती हट्टी पण आहे बरका .
या सर्व गुणदोषांची पारख करणारा आणि त्याला वाव देणारा , त्यासाठी साथ देणारा  साथीदार , त्याचे कुटुंब असावे अशी अपेक्षा होती . कारण लग्न जरी दोघांचे झाले तरी त्यानिमित्ताने दोन कुटुंबे जोडली जातात .
मुलगा कसा असावा याचे तिचे काही निकष होते . ते गुण तुझ्यात तिला दिसले असणार म्हणूनच गोष्टी पुढे गेल्या . निवड तिच्याकडून झाली ही पण समाधानाची गोष्ट आहे . आपला अजून फारसा संपर्क आला नाही पण पाहताक्षणी आपल्या मुलीचा जोडीदार म्हणून  मलापण तू आवडलास . पण त्यादरम्यान घरात बारसे ठरलेले होते त्यामुळे हलता येणार नव्हते . पुन्हा पक्षपंधरवडा , नवरात्र या गोष्टींचा विचारविनिमय दोन्ही कुटुंबांनी केला आणि आपली पहिली भेट आगदी धावपळीत झाली . तुमचे एकूणच कुटुंब , आई-बाबा , कपिल पण मला लिब्रल , कलेची जाण असणारे आणि सपोर्ट करणारे वाटले . तू पण डान्स करतोस , एकांकिकेत काम केले आहेस पण फोकस करियरवर आहे असे आकांक्षा सांगते .  काळाप्रमाणे वागत गेल्यास गोष्टी सोप्या होतात . प्रत्यक्ष भेटीमुळे स्पष्टता आली पुढच्या गोष्टी ठरवणे सुलभ गेले . आता लवकरच आपली दुसरी भेट होईल तेव्हा सविस्तर बोलूच .
पुनश्च एकदा तुला वाढदिसानिमित्त भावी आयुष्यासाठी तुझ्या सर्व इच्छा , मनोकामना पूर्ण होवोत हीच श्रीस्वामी समर्थ चरणी प्रार्थना 🙏🙏
💐💐🎂🎂🍫🍫🥳🥳




23/07/2024


कर्तिकच्या बाबांच्या पत्रास उत्तर

नमस्कार
लग्न झाल्यापासून लग्न सोहळा खूप छान झाला या आशयाचे  अनेकजणांचे फोन आले . तुम्ही तर आगदी सविस्तर पत्रच लिहिले आहे . 
प्रत्येक आईवडिलांना आपल्या मुलांचे कौतुक व्हावे , कशातच कमतरता राहू नये असेच वाटत असते . त्यादृष्टीने आपण दोघांनीही प्रयत्न केला . आनंद तर सगळ्यांनी लुटला पण तो भरभरुन शब्दात तुम्ही व्यक्त केलात त्यासाठी पण मन मोठं असावं लागतं .
तुम्ही पण इतक्या लोकांना घेऊन इतक्या दूरवरचा प्रवास अगदी ठरल्याप्रमाणे काटेकोर वेळेत केला . तसेच त्या 24 तासात ठरल्याप्रमाणे आपण वेळेचं बंधन पाळले  त्यामुळे सगळे सुरळीत पार पडले .
नव्या सुनेला घरी नेणे , तिचे स्वागत , कौतुक करणे तसेच रिसेप्शनसाठी तर राधिका ताई खूपच उत्सुक होत्या . तेही खूप मस्त झाले , आम्हाला सुरवातीपासूनच त्यांचा
" तुम्ही सगळ्यांनी रिसेप्शनसाठी आलच पाहिजे " 
हा गोड आग्रह होता त्यामुळे दुसरेच दिवशी आम्ही निघालो . पण त्यामुळे आम्हाला तुमच्या कुटुंबाविषयी , कार्तिक-कपिल विषयी त्यांच्या हुशारीविषयी अनेकांकडून कौतुक ऐकायला मिळाले . कपिल तर बेभानपणे पण अतिशय उत्साहात काम करत होता . आदले दिवशी त्याने अरेंज केलेलं संगीतसंध्या सर्वांना आनंद देऊन गेले .
काय असेल ते आपण आपल्या मुलांसाठीच केलं . आपण एकमेकांचा आदर करतो हीच गोष्ट पुढच्या नात्याची विण घट्ट होण्यासाठी उपयोगी पडत असते . असेच प्रेम असू द्यावे , लोभ असावा तो वाढावा .
धन्यवाद 
श्री. अनिल आणि सौ. सरिता कुलकर्णी 
बार्शी

दिनांक 12/10/2024


सौ. आकांक्षा आणि कार्तिक

 सर्वप्रथम तुम्हाला दसऱ्याच्या सोन्यासारख्या शुभेच्छा 💐.

नवरात्री सेलिब्रेशन एकदम झकासपणे पार पडले त्याबद्दल खूप खूप खूप खूप अभिनंदन आणि मनापासून कौतुक !

सुरुवातीला कीर्तीने कौतुक केले , मधे बाबांचे बूस्ट मिळाले रोज दोन्ही कुटुंबे , नातेवाईक , आप्तेष्ट , स्नेही यांच्याकडून आतुरतेने वाट पाहणे आणि पाहायला मिळाले की होणारा कौतुकाचा वर्षाव सारे काही आनंद देणारे होते . मग म्हणलं शेवट ( सुरुवात )🥰 गोड आपण करावा  .

हा उपक्रम राबवत असताना या नऊ दिवसामध्ये आकांक्षा तू एकूण 19 व्यक्तिरेखा सादर केल्यास , 19 व्यक्तीचे आवाज काढलेस आणि  21 वेशभूषा केल्यास !! फक्त अभिनय नाही तर तो करत विविध सामाजिक विषय हाताळत एक संदेश देण्याचा प्रयत्न केलास 

 हॅट्स ऑफ 👮

याला खांद्याला खांदा लाऊन भरभरुन साथ मिळाली ती कर्तिकची 👩‍❤️‍👨

त्याच्यासुद्धा तीन व्यक्तिरेखा , पाच ठिकाणी आवाज आणि अथक परिश्रम . दोघांनी मिळून स्क्रिप्ट लेखन , आयडिया , शूटिंग , एडिटिंग आणि एवढे करुन ते दीड मिनिटाच्या रीलमध्ये बसवायचं आणि बरोबर त्या टायमिंगला ते पोस्ट करायचं ही काही खाऊची गोष्ट नव्हती . एखादी फिल्म असते त्यात वेगवेगळे लोक वेगवेगळी कामे करतात हे सगळे दोघांनीच करायचे ( फक्त दोघे नव्हे बरं मध्येच कपिल डोकावून गेला आशिष कीर्ती तर पहिल्यापासून भक्कमपणे तुझ्या साथीला आहेत ते तुझे डावे उजवे हात आहेत आणि दोन्ही आई वडिलांचा पाठिंबा तर आहेच नव्हे दोन्ही फॅमिली ही तुमची support systym आहे.) हे खरच खूप आचंबित करणारे आहे . त्यात तुमचे बिझी असलेले शेड्युल ! लग्न होऊन अजून तीन महिने व्हायचे आहेत अजून तुमचेच रूटीन बसत आहे सगळी धावाधाव आहे त्यात हे इतक्या सुंदर पद्धतीने झालं आहे ते शब्दात सांगणे कठीण . आवड असली की सवड मिळते हे याठिकाणी सिद्ध झाले . यादरम्यान मीडियाचा पण चांगला प्रतिसाद मिळाला . 

तुमची अशीच प्रगती होत राहो , मनासारख्या संधी मिळोत , यशाचे उच्च शिखर गाठता येवो हीच आज दसऱ्याच्या निमित्ताने अजून एकदा शुभेच्छा आणि श्री. स्वामी समर्थचरणी प्रार्थना 🙏🙏 ☺️☺️


सौ. सरिता कुलकर्णी



28/10/2024

चि. कार्तिक यास

सर्वप्रथम तुला वाढिवसानिमित्त आभाळभरुन शुभेच्छा

💐💐💐💐

तुला सुखी , समाधानी , आनंदी , निरोगी आणि भरभराटीचे आयुष्य लाभो ही श्री. स्वामी समर्थ चरणी प्रार्थना .

 🙏🙏🙏🙏

लग्नानंतरचा तुझा हा पहिला वाढदिवस आहे त्यामुळे स्पेशल तर असणारच . आपली ओळख होऊन एक वर्ष होऊन गेले . आपण अनेकदा भेटलो बरेचदा फोनवर बोलतो पण मला बऱ्याचदा पत्र लिहायला जरा जास्त आवडतं स्पेशली वाढदिसानिमित्त तर जरा जास्तच कारण आपण आपल्या भावना त्यातून छान प्रकारे मांडू शकतो दोघांतील सुसंवाद अर्थपुर्ण होऊ शकतो कारण आपण पत्र पुन्हापुन्हा वाचतो . बोलताना काही गोष्टी राहून जातात बोललेल्या विसरतात म्हणून माझा हा आवडीचा छंद आहे .

🥰🥰🥰🥰

 आकांक्षा तर memorable वाढदिवस आगदी खास करत आसते . मग तो पहिला असो की पंचवीसावा असो आटापिटा चाललेला असतो तिचा . गेल्यावर्षी पंचवीसावा झाला यावर्षी पहिला ! मग कसं आहे गिफ्ट आवडलं ना ? 

बरं कसं वाटते नवीन संसार करताना ?

जीवनशैली एकदम 360 मध्ये फिरते ना !

प्रायोरिटीज बदलतात वेगळेच रुटीन सुरु होते . करियर , पॅशन , पळापळी , धावपळ , कसरत , एन्जॉयमेंट या सगळ्याचा कसा क्रम लावायचा याची कसरत होते . काय करावे काय सोडावे समजत नाही . आणि म्हणूनच लग्नाविषयी अनेक गमतीशीर म्हणी आहेत .

    अजून एक म्हणजे यानिमित्ताने मला एक उदाहरण द्यावेसे वाटते . ठराविक ओव्हरची मॅच असते तेव्हा सुरुवातीच्या ओव्हर्समध्ये भक्कम धावसंख्या असेल तर विजय टप्प्यात असतो त्याची खात्री असते . आणि म्हणून सचिन तेंडुलकर नेहमीच नंबर वन राहिला . त्याच्यापेक्षा जनतेला त्याच्यावर जास्त विश्वास असायचं . तसेच जीवनाचे असते तुमचे आत्ताचे वय असे आहे की you should have to focus on your career and passion right now .

एकदा का तुमच्या मनाप्रमाणे यशाचे शिखर गाठले , अपेक्षित उंचीवर गेलं की पुढच्या गोष्टी आपोआप होतात . मग आपण त्याप्रमाणे आपल्या रुटीनचा sequence ठरवायचा . आमच्या संघटनेत नेहमीच सगळ्या मुलींना , महिलांना आवर्जून सांगितले जाते की 

" तुम्ही सुपरवुमन बनण्याचा प्रयत्न करु नाकात . त्याचा परिणाम तुमच्या वैयक्तिक आयुष्यावर होतो ".

मला वाटतं हे मुलांसाठी सुद्धा लागू होते . आजकाल करिअर करणे सोपे नाही , प्रामुख्याने आयटी मध्ये आणि तेही युनिक व्हावे वाटत असेल तर तुम्हाला योगदान द्यावेच लागते . तुमचा त्याठिकाणी कस लागतो . त्यासाठी वेळ द्यावा लागतो अभ्यास करावा लगतो आणि सध्या ती तुमची प्रायोरिटी आहे . ते करत असताना काही गोष्टी नेटाने करणे ते करत असताना काही करु ना शकणे हे स्वाभाविक आहे . कुठेतरी addition करायचे असेल तर काहीतरी delet करावे लागते . फक्त addition करायचे झाल्यास hang होते हे तर माहिती आहे तुम्हाला 🤭🤭🤭असो तुम्ही दोघेही आटोकाट तो प्रयत्न करताय त्याला यश नक्कीच मिळेल . फक्त त्यासाठी तुमच्या रुटीनचा sequence आणि time management ठरवणे गरजेचे असते . मग यश आपल्या हाताशी येते .

मस्त रहा , स्वस्थ राहा तब्ब्येती महत्त्वाच्या ते सांभाळत सारं काही करा , व्यायाम करा . बाकी मस्त प्रत्यक्ष भेटीत बोलूच .

आणखी एकदा वाढिवसानिमित्त भरभरुन शुभेच्छा सर्व मनोकामना पुर्ण होवोत हीच प्रार्थना . 

Enjoyyyyyy your day

 👩‍❤️‍👨👩‍❤️‍👨👩‍❤️‍👨👩‍❤️‍👨👩‍❤️‍👨


13/07/2025


चि.कार्तिक आणि सौ. आकांक्षा 

अ. अ. उत्तम आशीर्वाद 

सर्वप्रथम तुम्हाला लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या आभाळभरुन शुभेच्छा , उभयतांना सुखी , समाधानी , आनंदी , निरोगी आणि भरभराटीचे सुंदर दिर्घायुष्य लाभो हीच श्री स्वामी समर्थ चरणी प्रार्थना !

🙏🙏🙏🙏

आत्रेयला म्हणत म्हणत तुमच्या लग्नाला सुद्धा एक वर्ष कधी पुर्ण झाले समजलेच नाही . खूपच धावपळीत हे वर्ष संपले एवढे खरे !

😍😍😍😊😊😊 

मग आज काय स्पेशल ठरवले आहे ? आकांक्षाला काहीतरी suprise ठरवायची सवय आहे कार्तिकही मला तसाच दिसतोय त्यामुळे तुम्ही काय केले असेल याचा मला तरी अंदाज नाही . काहीही ठरवलेले असो तुमचा आजचा दिवस स्वस्थ आणि मस्त जावो .

Enjoy your day

❤️❤️❤️❤️

इथून पुढचे आयुष्य तुम्हाला हवे तसे लाभो , ठरवलेल्या सर्व गोष्टी पुर्ण व्हाव्यात हीच सदिच्छा !!

       गेल्या वर्षी याचदिवशी तुम्ही काही स्वप्ने उराशी बाळगत एकमेकांचे झालात . आता त्याची ॲनिवर्सरी करताय . कसं वाटतं मग ? काय काय गोल ठरवले होते , काय काय कमिटमेंट होत्या , काय काय पुर्ण झाले , पाइपलाईन मध्ये काय काय आहे आणि काळाच्या ओघात विसर कशाचा पडला याचाही लेखाजोखा तुमचा तुम्ही घेतला पाहिजे . त्यात काही मिस होते का पहायला हवं आणि त्याच्यात सुधारणा व्हायला हवी .

आजच्या दिवशी मी एकच गोष्ट सांगणार आहे त्याच जमल्यास रोज स्मरण करा किंवा आठवड्यातून एकदा तरी नक्कीच स्वतःला विचारा . 

  माणसाच्या आयुष्यात तीन टप्पे असतात एक बालपण दुसरे तरुण आणि प्रौढ तर तिसरे म्हातारपण . पहिला टप्पा तुमच्यासाठी आपोआप पुढे सरकत जातो त्यात तुम्हाला विशेष काही करावं लागत नाही . पण आता तुम्ही मधल्या आणि महत्वाच्या टप्प्यात आहात की जो तुमचा तुम्हाला स्वतः घडवावा लागतो आम्ही पालक म्हणून आमचा  supportive रोल राहतो तो आम्ही नक्की करु. पुर्वीचा जमाना वेगळा होता आता तसा नाही जीवन धकाधकीचे झाले आहे , प्रायोरिटीज बदललेल्या आहेत त्यामुळे महत्त्व तुमच्या पिढीला आलेले आहे . त्यात तुम्ही पुण्यासारख्या मेट्रो सिटीमध्ये राहता त्याप्रमाणे लाईफ स्टाईल मेन्टेन करावी लागेल .मुख्य म्हणजे आत्ता तुमच्या तरुणपणातील खऱ्या आयुष्याला सुरुवात झाली आहे शिक्षण झालं , नोकरी लागली , लग्न झालं म्हणजे घोडं गंगेत न्हालं असं होत नाही तर या फक्त बेसिक गोष्टी झाल्या . खऱ्या जीवनाला आत्ता कुठे सुरुवात होते . एक आयडियल जीवन जगायचं असेल तर आता तुम्हाला काय अचिव्ह करायचं यावर फोकस केला पाहिजे यासाठी उत्तम आदर्श म्हणजे आशिष आणि किर्ती आहेत ! ते योग्य दिशेने वाटचाल करत आहेत , त्यांना आम्ही फक्त दिशा दाखवत राहिलो त्याप्रमाणे त्यांनी स्वतःवर फोकस केला आता स्मुथ चालते गाडी .

आकांक्षा तर खूपच महत्वाकांक्षी मुलगी आहे सर्वसामान्य जगणे तिला मान्य नाही त्यामुळेच तिला लहानपणापासून पोषक वातावरण देण्याचा आमचा प्रयत्न राहिला आहे , आणि तिला हवे ते करु देणे हा अलिखित नियम होता .   मला कार्तिकपण ध्येयवादी असावा असे जाणवते , त्याच्यामध्ये मला चमक दिसते , स्पार्क दिसतो कदाचित यामुळेच तुम्ही एकत्र आला असाल . फक्त गोल ठरवून होत नाही  त्याचे दृश्य परिणाम पण आता दिसायला हवेत , दोघांनी एकमेकांना पूरक वातावरण निर्माण करुन देऊन , एकमेकांची मूल्ये जपत तुमचा विकास घडवून आणायचा आहे , तुमच्याकडे असलेल्या असामान्य गुणांचा विसर पडू देऊ नकात , तुम्ही तुम्हाला जे करायचं आहे त्याचा रोज अभ्यास केला पाहिजे , तुमचे रोजचे रुटीन सांभाळत त्याला वेळ द्या .  स्पेशलायझेशन तर हवंच , तरच तुम्ही पुढे सरकता . सगळ्यां सारखे काम करत राहिलात तर फारसे हातात येत नाही कॉमन लाईफ जगावे लागते . 

पाच दहा वर्षे कष्ट घ्या आणि पुढचे पन्नास वर्षे सुखी , समाधानी , आपल्याला हवे ते मिळवले या भावनेने आयुष्य जगा . अभ्यास , चिंतन , मनन फक्त विद्यार्थीदशेत करावे असे नाही तर आपल्याला समाधान मिळेपर्यंत करावे , आत्ता तर तुम्ही करावेच कारण आता तुम्ही पोटेन्शियल असलेल्या वयात आहात , आकांक्षाची बकेट लिस्ट मला माहित आहे , कार्तिकची पण असणार त्यासाठी हे सगळे आवश्यक आहे .

    पण त्यासाठी आज स्वतःला नियमावलीत बांधव लागेल , प्रायोरिटीज ठरवाव्या लागतील . काही addition तर काही deletion होत राहणार हा तर निसर्गनियम आहे . आपण सगळच नाही करु शकत त्यासाठी ideal राहिलं पाहिजे असही नाही . काहीवेळेस स्वतःकडे लक्ष देणे गरजेचे असते तरच हे साध्य होऊ शकते . हे करत असताना तब्ब्येत पण तेवढीच महत्वाची आहे हे लक्षात ठेवा . तुमचे जीवन पण तुम्ही एन्जॉय केलंच पाहिजे . आता कसं आहे तुमच्या नोकऱ्या , जबाबदाऱ्या ,  रोजचे जाणेयेणे यात दिवस जातो . पण टाईम मॅनेजमेंट करायला शिका , वायफळ गोष्टीत वेळ घालवू नका , एकमेकांना जास्तीत जास्त वेळ द्या , चैतन्य द्या , आनंद द्या , आदर द्या , चर्चा करा आणि मग पाहा तुम्हाला हवं ते साध्य करता येईल . आणि आम्ही फक्त मार्गदर्शन करु शकतो प्रत्यक्ष अंमलबजावणी तुम्हाला करावी लागते .

तुम्ही ते नक्की कराल याची खात्री आहे .

लास्ट बट नॉट लिस्ट आता आपण भेटू तेव्हा मी दोघांचेही क्रॉस व्हेरिफिकेशन घेणार आहे 🤣🤣

बौद्धिक खूप झाले आता एकदम चील मारा

 ❤️❤️❤️❤️

पुनश्च एकदा आजच्या दिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा , इथून पुढील वाटचालीसाठी 

All the best !

👍👍👍👍👍

😍😍😍😍😍



तुमचीच 

आई


कार्तिकचे आकांक्षास पत्र 

Hello Bayko,


Kashi Ahes ?

Aaj 1 Varsha zala Aplya lagnala. 

Khup cheesy vatel pan kharach asa vattay barech Varsha zale Aplya lagnala.


He patra lihayla ghetla ani mhantla chala mag chya eka Varshat kay kay moments ghadlya tyachi ek ujalni karavi.


Switzerland trip,

Mangalagaur,

Gauri-Ganpati,

Navratri videos, 

Apla ghar setup,

Garba night,

Diwali Stall in office,

Apla pahila extra baghitlela natak var varche vadhuvar,

Maza birthday, cake & bapreeee IPhone,

Mazi dental treatment

Pahili Diwali Akola & barshi 

Lagech tuzya bday chi Tamilnadu trip 

LASIK surgery

Pahili sankarant

Holi 

ARAI

Barshi Shet Visit 

International trip 

Eye surgery 

Daily Yoga & yoga day

Jar tar chi goshta etc etc


He sagla baghun asa vattay ki Apan Universal madhlya Cyclone ride peksha mothi ani bhari ride keliye. I mean really, it has been a roller coaster of emotions and a series of special moments. 


Apan ekmekana bhetun ata 2 Varsha houn gele, but atta atta kuthe ekmekana actually olkhayla lagloy asa vattay. 


Apan doghahi vegveglya vatavaranat vadhloy. Apla culture ani traditions jari sarkha asla tari te palaychya ani sajra karaychya paddhati jara veglya ahet. 


Ya var 2 states sarkha 2 pradesh asa movie kadhayla harkat nahi. 


Jokes, apart, Hyamulech, Sansaraychya hya Multi-National company madhe Aplya Fresher Jodi la suruvatila jara sagla Navin adopt karayla thoda vel lagla. 

Veglya experiences cha Anubhav ala. Ekhadya vishayavar ekmekanche kay Mat ahet he kalala. Vicharsarni, approach kalale. 


Ani tuza barobar ki maza barobar hya peksha barobar chukichya palikadle , Aplya doghansathi soyiskar ase Suvarna madhya kadhayla apan shiklo. Aplya doghansathi best Ase decision apan ghyayla shiklo. 

Ekmekana jast samjun ghyayla shiklo. 

Ani Fresher varun 1 Varshachach, pan extraordinary ani दांडगा experience aslele couple mhanun grow zalo. 


Tu survatila mhanaychis, Kartik tu manat khup goshti thevtos, tuzya manat kay challay he mala kasa kalnar. 

Eka arthi mala Patla te, ani mi jast tuzya samor vyakta vhayla laglo, clear bolayla laglo. Tyamule conversations ani expectations clear vhayla lagle. 

Ani parallely tu, mazya manatlya goshti olkhayla shiklis. Hyacha far kautuk vatta mala. 


Mala Aplyadoghanchi saglyat best goshta avadte ti mhanje doghahi firayla, adventure karayla, Navin goshti nirbhidpane try out karayla ekdum tayar asto. 

Fakt kunitari karuya ka? / karaycha ka? Mhanaychi der, ani apan lagech ready. 


Ani ajun ek mhanje, 

jevha mi Ekta Astana maze gharche mala sangtat ki, “Bara zala, Aakanksha milali aplyala, ani tuza kautuk karat” ani tasach tu sangtes mala ki kasa tuzya ghari maza kautuk kartat, he ek family Validation milalyavar aplya Arranged Love marriage baddal bhari vatta. Ani asa vatta ki hya Genz generation madhe kharach apan ek bhari life partner choose kelay. (Aga hooo, tuza ghar maza ghar asa nahi, donhi Aplya doghanchehi ghar ahet).


Aplya building cha Paya ata majboot zalay asa mhanayla kahi harkat nai. 

Bharpur individual ani couple goals planned ahet, te ekmekachya support ni achive karu ani ek ek floor majboot banvat jau. 


Chala, bharpur lihila.

Btw, Thanks for coming into my life !

Ani ho rahilach, Happy First Marriage Anniversary ❤️


Shevti ek ukhana, 


एक वर्षात कळालं – संसार म्हणजे teamwork,

Aakanksha बोलते आणि मी "Hmm" म्हणतो – that's how things work!





आकांक्षाची स्पेशल गाणी

1) मराठी
1) मोगरा फुलला

रचना ः संत ज्ञानेश्वर संगीतकार : हृदयनाथ मंगेशकर
स्वर ः लता मंगेशकर 
ताल : केरवा राग :


मोगरा फुलला , मोगरा फुलला 
फुले वेचिता बहरु कळियासी आला II धृ II

इवलेसे रोप लावियले द्वारी
तयाचा वेलू गेला गगनावेरी 
मोगरा फुलला...... II 1 II

मनाचिये गुंती गुंफियला शेला 
बापरखुमा देवीवरु विठ्ठले अर्पिला
मोगरा फुलला ......II 2 II




2) भरजरी ग पितांबर दिला फाडून

चित्रपट : श्यामची आई
गीतकार : प्र. के. अत्रे संंगीतकार : 
स्वर : आशा भोसले
ताल : राग : जयजयवंती


भरजरी ग पितांबर दिला फाडून
द्रौपदिसी बंधू शोभे नारायण 2

सुभद्रा कृष्णाच्या पाठीची बहिण
विचाराया गेले नारद म्हणून
बोट श्रीहरीचे कापले ग बाई
बांधायाला चिंधी लवकर देई 
सुभद्रा बोलली 2
 " शालू नि पैठणी फाडून का देऊ चिंधी तुम्हांसी मी ?"
पाठची बहिण झाली वैरीण
द्रौपदीसी ........

द्रौपदी बोलली " हरिची मी कोण
परि मला त्यांने मानिली बहिण 2
काळजाची चिंधी काढून देईन
एवढे तयाचे माझ्यावरी ऋण
वसने देऊन प्रभू राखी माझी लाज
चिंधीसाठी आला माझ्या दारी हरी आज 2
त्रैलोक्य मोलाचे वसन दिले फाडून
द्रौपदीसी .........

प्रेमाचे लक्षण भारी विलक्षण
जैसी ज्याची भक्ती तैसा नारायण
रक्ताच्या नात्याने उपजे ना प्रेम
पटली पाहिजे अंतरीची खूण
धन्य तोची भाऊ धन्य ती बहीण
प्रीती जी करती जगी लाभावीण 2
चिंधी पाहून हरी झाले प्रसन्न
द्रौपदीसी .......




3) कृष्णा नाही कान्हा नाही 

पारंपारिक गौळण  
ताल : भजनी ठेका
 

कृष्णा नाही कान्हा नाही 
इथं कशाला थांबायच 2
ग गौळणींनो मथुरेला जायाच 3

दही दूध घेऊनी मथुरेला जायाचं 2
दही दूध घेऊन मथुरेला जायाचं नी आनंदाने विकायचं ग गौळणींनो.....II1II 

कृष्ण सख्याची पडता गाठ 2
कृष्ण सख्याची पडता गाठ
आनंदाने नाचायचं ग गौळणीनो II 2II

एका जनार्दनी कृष्ण कृपेने 2
एका जनार्दनी कृष्ण कृपेने
हरीचरणासी लागायचं ग गौळणींनो II 3 II

4 ) चांदणे चाहूल होती कोवळ्या .....
5 ) माझी रेणुका माऊली